Saturday, July 7, 2007

मराठी पुस्तकांच्या विश्वातील एक नवे पान

आमचे ‘लेटेस्ट’ संशोधन
साहित्याच्या प्रांतात सध्या भरभराटीचे दिवस असल्याने दररोज कुठे ना कुठे एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. पुस्तकांना प्रचंड मागणी असल्याने सर्व पुस्तकांच्या प्रची हातोहात खपत आहेत. गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांची तर आवृत्ती प्रकाशनापूर्वीच संपल्याचीही चर्चा आहे. (आतल्या गोटातील) आनंदाची गोष्ट अशी, की मराठी प्रांतात वाङ्‌मयाबद्दलची ही आस्था केवळ आताच नसून, नेहमीप्रमाणे त्याचे मूळ प्राचीन काळात आहे. आम्ही हे विधान करत आहोत, त्याला आधार काय असा सवाल काही जण करतीलही. (प्रत्येक बाबीवर शंका घेणे हीही मऱ्हाटी जनांची प्रागैतिहासिक काळापासूनची परंपरा!) तर त्यांच्या या शंकेला खोडून काढण्यासाठी एक सज्जड असा पुरावा नुकचाच आमच्या हाती लागला. त्यावरून आम्ही असे छातीठोक विुधान करून शकतो, की मराठीतील पुस्तक प्रकाशन समारंभ अगदी पहिल्या पुस्तकापासूनच सुरू झाले.
काही दिवसांपूर्वी आम्ही बिकानेर चाटवाल्याकडे कचोरी घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्याने माल बांधून देण्यासाठी वर्तमानपत्रांची पाने फाडायला सुरवात केली. त्यातील एक पान काहीसे पिवळसर आणि जीर्ण झालेले वाटले. त्यामुळे आमचा संशोधक मेंदू जागा झाला. त्याला तो कागद मागितला, तर त्यात ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचा वृत्तांतच छापलेला! आता हा वृत्तांत छापलेला असल्याने साहजिकच वर्तमानपत्रही असणारच. मात्र कागद काहीसा फाटलेला असल्याने आणि त्याचा तुकडा केलेला असल्याने आम्हाला वर्तमानपत्राचे नाव कळू शकले नाही. बिकानेर'च्या मालकालाही ते सांगता आले नाही, की कागद कुठून मिळाला तेही सांगता आले नाही.
आम्ही त्याला रागावलो, ""अरे, अमृताशी स्पर्धा करणारा हा ग्रंथ! तो तू कचोरीच्या पुड्या बांधायला वापर करतोस?''
"आमाला काय साब. कोन काय कागदं विकतो, आमि काय वाचून घेतो काय,'" त्याच्या या प्रश्‍नावर आम्ही निरुत्तर झालो. असो.
अशा रितीने हाती आलेल्या या कागदाची हकीगत सांगितल्यानंतर आता आपण मूळ मजकूराकडे वळू. शके 1116 म्हणजे इ. स. 1284 मध्ये कधीतरी छापलेला हा वृत्तांत आहे. मुख्य म्हणजे "ज्ञानेश्‍वरी'च्या पहिल्या नाही, तर दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाची त्यात माहिती आहे. आता हा तर्जुमा (मजकूर) आम्ही जसाच्या तसा येथे देत आहोत. काही ठिकाणी फाटलेल्या जागांमध्ये मजकूर कळत नाही, तेथे तसा उल्लेख केला आहे. तो मजकूर येणेप्रमाणेः


वाङ्‌मयाला "ज्ञानेश्‍वरी'मुळे नवी सुरवात

निवृत्ती महाराज यांचे मत
नेवासा ः ""यावनी आक्रमणामुळे पीडलेल्या आणि संस्कृतच्या प्रभावामुळे दबलेल्या मराठी वाङ्‌मयाला "ज्ञानेश्‍वरी'मुळे नवी सुरवात झाली आहे,'' असे मत निवृत्तीनाथ महाराज यांनी आज व्यक्त केले.
संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी लिहिलेल्या आणि ........(कागद फाटलेला) यांनी प्रकाशित केलेल्या "ज्ञानेश्‍वरी' या ओवीमय ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन निवृत्तीनाथ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संत ज्ञानेशवर यांचे बंधू सोपान महाराज आणि भगिनी मुक्ताबाई यावेळी प्रमुख पाहुणे होते. यावेळी व्यासपीठावर देहू, आळंदी आणि नेवासे येथील मान्यवर विद्वान उपस्थित होते.
निवृत्तीनाथ म्हणाले, "भगवद्‌गीतेतील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे ही सध्या काळाची गरज आहे. "ज्ञानेश्‍वरी'च्या रूपाने जनेतची ही मोठी गरज भागणार आहे.'' संस्कृतचा एकाधिकार मोडण्यासाठी अशा तऱ्हेच्या अनेक ग्रंथांची निर्मिती झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, ""यावनी सत्तेमुळे कितीक शब्द इकडे शिरले आहेत. माय मराठी विसरू की काय, असे भय आहे. त्यासाठी जुने वाङ्‌मय पुनरहू वाचण्याचे संस्कार करायला हवे.''
संत ज्ञानेश्‍वर म्हणाले, ""समाजाचे बहू आघात सोसले तरी, समाजाचे कल्याण व्हावे, हीच मनी वांछा. त्यासाठीच ग्रंथाचा अट्टाहास केला.''

जरी संपली आवृत्ती। ग्रंथ येतील आणिक किती।।
तरी त्यासी घेऊनि हाती। पारायणे करावी।।
असा काव्यात्मक संदेशही त्यांनी दिला.
प्रकाशक ........(कागद फाटलेला) नेवासेकर म्हणाले, "या ग्रंथाची सहा महिन्यांतील ही दुसरी आवृती आहे. येत्या काही महिन्यांत ग्रंथाच्या सचित्र आणि छोट्या आवृत्त्या काढण्याची योजना आहे.''
-------
अशा तऱ्हेने या बातमीवरून मराठीतील पुस्तक प्रकाशनाचा एक जीवंत इतिहासच आमच्या हाती लागला आहे. आता या विषयावर एक प्रबंध लिहिण्याचा आमचा मानस आहे. तूर्तास जगाला माहिती व्हावी, यासाठी हा प्रपंच.

1 comment:

  1. आतल्या गोटातील माहिती वाचुनी
    धन्य झालो आम्ही मनोमनी !
    धन्य तो डी.डी. या "सकळ'जनी
    खाद्य पुरवोनी आम्हासी तृप्त करी सदा !!
    -प्रशांत

    ReplyDelete