Saturday, August 19, 2017

भाजपला रजनीकांत मिळाला…कर्नाटकात!

भारतीय जनता पक्षाने तमिळनाडूत हातपाय पसरण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत. सुपरस्टार रजनीकांत यांना पक्षाने हाताशी धरले आहे. भाजपने मारलेल्या हवेमुळेच रजनीकांत यांची महत्त्वांकाक्षा जागृत झाली आणि म्हणूनच त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी बोलवा आहे. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या जाण्यानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याची भाजपची इच्छा आहे. निर्नायकी अण्णा द्रमुक आणि भाऊबंदकीत अडकलेला द्रमुक यांच्यातील फटीतून सत्तेपर्यंत जाण्याचा त्या पक्षाना मनसुबा आहे. त्यात रजनीकांत यांच्यासारखा मोहरा त्यांना दुसरा सापडणार नाही.
परंतु भाजपची ही स्वप्नपार्टी ऐन रंगात येत असतानाच कमल हासन नावाच्या गड्याने त्या दुधात मिठाचा खडा टाकला. सत्ताधारी अण्णा द्रमुकवर एकामागोमाग शरसंधान करत कमल हासननेही सिंहासनाच्या खेळाल शड्डू ठोकला. आता तीन-चार (किंबहुना जास्तच!) फळ्या झालेल्या अण्णा द्रमुक माणसाळवण्यासाठी भाजपला किती तोशीस पडली, हे भाजपला माहीत! शक्य तोवर रजनीकांतला पक्षात घ्यायचे आणि ते नाही जमले तर त्याला स्वतंत्र उभे करायचे आणि त्यातून द्रमुकला एका प्रतिस्पर्ध्यात गुंतवून ठेवायचे, इकडे आपण अण्णा द्रमुकशी युती करून त्यांच्या भरभक्कम संघटनेचा लाभ घ्यायचा, ही भाजपची शक्कशल होती. परंतु पडद्यावयर सकारात्मक व नकारात्मक अशा भूमिका लीलया करणाऱ्या कमल हासनने येथे नकारात्मक पात्र उभे केले. कमलने तेथे कमळाला नख लावले म्हटले तरी चालेल.
तमिळनाडूत उधळलेला भाजपचा मनसुबा कर्नाटकात मात्र पूरा होताना दिसतोय. तिथे आगलावू राजकारण करणाऱ्या सिद्धरामय्या यांच्या विरोधात ‘चकचकीत’ स्पर्धा उभी राहिली आहे. या स्पर्धेचा भाजपला कितपत फायदा होईल, हे काळच सांगेल. पण कर्नाटकातील तीन पायांच्या शर्यतीला त्यामुळे एक वेगळा आयाम मिळलाय, हे नक्की!
कन्नड नट उपेंद्र याने नुकताच राजकारणात प्रवेश करण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. त्याच्या पक्षाचे नाव जाहीर झालेले नसले, तरी आपल्या सार्वजनिक कार्यासाठी ‘प्रजाकीय’ असा छान शब्द त्याने दिला आहे. त्याच्या या उपक्रमाला प्रतिसादही चांगला मिळाला आहे. ही घोषणा करताना थेट खाकी सदऱ्यात येऊन त्याने फिल्मी रंगही दिला. कुठल्याही कार्यालयाचा गणवेष असतो, तसा राजकारण्यालाही हवा, म्हणून मी खाकी सदरा घातल्याचे स्पष्टीकरण त्याने दिले आहे.
कर्नाटकात राजकारणातील नट-नट्या हा काही अप्रूपाचा विषय नाही. सुपरस्टार राजकुमार यांच्यापासून अनेक जणांनी हा मार्ग चोखाळला आहे. खुद्द सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात अंबरीष आणि उमाश्री हे दोन मंत्री चित्रपट क्षेत्रातील होते. त्यातील अंबरीष यांनी आता काँग्रेसला रामराम केला आहे. याशिवाय रम्या (दिव्या स्पंदना) ही कांग्रेसची माजी खासदार व पक्षाच्या सोशल मीडियाची प्रमुख ही सुद्धा चित्रपट क्षेत्रातीलच आहे. मात्र स्वतंत्र पक्ष काढण्याची हिंमत आतापर्यंत कोणीही केली नव्हती. ती पुढील महिन्यात वयाची 50 वर्षे पूर्ण करणाऱ्या उपेंद्रने केली आहे.
कर्नाटकातील राजकारण म्हणजे कॉंग्रेस, भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दल (जेडीएस) या तीन पायांची शर्यत झाले आहे. उपेंद्रचा प्रजाकीय आता त्या राजकारणाचा चौथा खांब बनणार का, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. वास्तविक उपेंद्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. अमित शाह यांचा नुकताच कर्नाटक दौरा झाला, त्याच मुहूर्तावर तो हातात कमळ घेईल अशी अपेक्षा होती. मात्र नवा पक्ष काढून त्याने या कथेला वेगळेच वळण दिले आहे. अमित शहा कर्नाटकाच्या दौऱ्यावर असतानाच उपेंद्रने आपला इरादा जाहीर केला, हे महत्त्वाचे. वास्तविक शहा यांच्या दौऱ्यातच उपेंद्र भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा कर्नाटकात सुरू होत्या. पण कथेत नवीन वळण आले आणि त्यांनी वेगळी चूल मांडली.
आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष उतरणार असून सर्व 224 मतदारसंघांमध्ये पक्ष उमेदवार उभे करणार आहे, असे त्यांनी जाहीर केले आहे. “विजय किंवा पराभव यांपैकी कशानेही मी निराश होणार नाही. मी कर्मावर विश्वास ठेवतो, ” असे भगवद्गीतेतील श्लो भगवद्गीतेतील श्लोक उद्धृत करून त्यांनी सांगितले. याचा अर्थ निव्वळ दुसऱ्यांची मते खाल्ली तरी त्यांना चालणार आहे. “मला टार्गॆट्‌ असे नाही, राजकारणात येणे एवडेच बस,“ असे त्याने उदयवाणी या वृत्तपत्राला सांगितले. आपल्या महाराष्ट्राप्रमाणेच ‘भारतक्के नरेंद्र, कर्नाटकक्के उपेंद्र’ ही घोषणाही फेसबुकवर दिसते.
थोडक्यात म्हणजे भाजपने तमिळनाडूसाठी लिहिलेल्या पटकथेचे चित्रीकरण कर्नाटकात होत आहे. तिथे रजनीकांतचे तळ्यात-मळ्यात संपत नसताना इकडे कर्नाटकात मात्र ती पटकथा प्रत्यक्षात उतरली आहे.

Wednesday, August 16, 2017

फतवे-आदेशांच्या पलीकडचा भारत

स्वांतत्र्यदिन! हा दिवस म्हणजे भारतीयांच्या आशा-आकांक्षांची उजळणी करण्याचा दिवस. हक्काची सुट्टी म्हणूनही अलीकडे त्याकडे पाहिले जात असले, तरी राष्ट्रीय सण म्हणून त्याचे महत्त्व अबाधित आहे. दिडशे वर्षे ब्रिटीशांच्या आणि त्यापूर्वी 800 वर्षे तुर्कांच्या-मुगलांच्या जोखडात सापडलेल्या भारतमातेने 70 वर्षांपूर्वी स्वातंत्र्याचा पहिला श्वास घेतला. भारत मातेचा जयजयकार गगनाला भेदून गेला.


अर्थातच 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री भारतीयांच्या मनात सुराज्याची जी ऊर्मी होती, ती आज क्षीण झाली आहे. देशभक्तीची जागा व्यवहाराने घेतली आहे. हा बदल हळूहळू झाला आहे. अक्षम राजकारणी, निर्ढावलेले नोकरशहा व कमुकवत विचारवंत अशा सर्वांनीच या अधःपतनाला हातभार लावला आहे. आज झेंडावंदनासारख्या पवित्र प्रसंगाला उपस्थित कोण राहतात तर केवळ सरकारी कर्मचारी आणि शालेय विद्यार्थी! अन् त्यासाठी सरकारी परिपत्रके काढावी लागतात, त्याच्यावरही वाद-विवाद होतात आणि मूळच्या स्वांतत्र्यालाच हरताळ फासण्याच्या स्वातंत्र्याचे दाखले दिले जातात.


एरवी केंद्र सरकारच्या परिपत्रकाला विरोध करण्याची दुर्बुद्धी ममता बॅनर्जींना झाली नसती! केंद्रीय मनुष्यबळ खात्याने ७ ऑगस्ट रोजी सर्व राज्यांना हे पत्र पाठवले होते. केंद्राने काय सांगितले होते, तर फक्त नजीकच्या हुतात्मा स्मारकावर जा आणि श्रद्धांजली वाहा! बरे, हा आदेशही नव्हता तर केवळ सल्ला होता. पण त्या सल्ल्यातही ममतांना (त्याच त्या, शिवसेनेच्या भाषेतील बंगालच्या वाघीण!) त्यातही हुकूमशाहीचा वास आला. आम्ही हा आदेश पाळणार नाही, असे त्यांनी सांगितले. भाजपकडून आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे शिकण्याची गरज नाही, असे ममतांनी ट्वीटरवरून जाहीर केले. अर्थात मोदी आणि कंपनीच्या दहशतीमुळे असेल कदाचित, पण हे त्यांनी नेहमीच्या कर्कश पद्धतीने सांगितले.एरवी केंद्र सरकारला विरोध करायचे धाडस आजकाल कोणात उरलेय?



दुसरीकडे योगी सरकारने स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत आणि ध्वजारोहण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर मध्य प्रदेशत सरकारने असेच आदेश काढले होते. आणि नेहमीप्रमाणे मुस्लिम मौलवींनी त्याला विरोधही केला. एका मौलवींनी तर सांगितले, की वंदे मातरम आणि राष्ट्रगीत म्हणू नका.


सुदैवाने सगळा भारत एवढा संकुचित नाही. मातृभूमीबद्दल आदर दाखवायला काचकूच करण्याची अक्कल सगळ्यांच्या डोक्यात आलेली नाही. त्यामुळेच 71व्या स्वातंत्र्यदिनाला एक वेगळा रंग चढला आणि तो रंग होता आसाममधील काही छायाचित्रांचा.


एरवी फडकलेले झेंडे आणि देशभक्तीच्या खोट्या उमाळ्याची सवय लागलेल्या डोळ्यांना या दृश्याने एक नजर दिली. आसाममधील ढुबरी जिल्ह्यातील हे चित्र. सगळीकडे होते तसेच तेथील एका सरकारी शाळेत मंगळवारी झेंडावंदन झाले. फरक एवढाच, की झेंडा फडकवणारे शिक्षक आणि त्याला सलामी देणारे विद्यार्थी, हे दोघेही छातीएवढ्या पाण्यात उभे होते. वेळ होती सकाळी सव्वा सातची.


या शिक्षकाचे नाव आहे मिझानूर रहमान आणि शाळेचे नाव नसकारा प्राथमिक शाळा. त्यांनी सकाळी फेसबुकवर ही छायाचित्रे टाकली आणि संध्याकाळपर्यंत त्याला जवळपास पाऊण लाख लोकांनी शेयर केले. विशेष म्हणजे रहमान यांनी ही छायाचित्रे टाकल्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला. त्यांच्या भागात वीज नियमित येत नसल्याने त्यांनी थेट संध्याकाळीच फेसबुक उघडले. तेव्हा ही चित्रे एवढी प्रसिद्ध झाल्याचे त्यांना कळाले.


अमुक कर वाढविला म्हणून अमुक पैसे देऊ नका, इतका कर देतो तर या सुविधा का नाहीत अशा कृतक संतापाच्या पोस्टी टाकणाऱ्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही घटना आहे.


“झेंडावंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्हाला वाटले, की फेसबुकवर टाकण्यासाठी काही छायाचित्रे घ्यावीत. पोहता येणाऱ्या दोन मुलांना झेंड्याजवळ जाऊन सलाम करण्यास आम्ही सांगितले आणि आम्ही छायाचित्रे घेतली,” असे रहमान यांनी बीबीसीला सांगितले. अर्थात स्वांतत्र्यदिनाच्या कार्यक्रमाची छायाचित्रे त्यांना शिक्षण विभागाला पाठवावीच लागतात, त्यामुळे तशीही ती त्यांना काढायचीच होती.


या अशा लोकांनीच हा देश बांधून ठेवलाय. हा सामान्य भारत आहे – फतवे आणि आदेशांच्या पलीकडचा भारत! हा अस्सल भारत आहे, सरकारी कागदपत्रे आणि बेगडी क्रांत्यांच्या व मतलबी समतेच्या लढ्याच्या संघर्षापलीकडचा भारत. अन् हे दर्शन घडविले ज्याच्या नावाने उठता-बसता माध्यमे बोटे मोडतात त्या नव्या माध्यमाने – सोशल मीडियाने. देशाचा 71वा स्वांतत्र्यदिन त्या अर्थाने कारणी लागला म्हणायला हरकत नाही.

खासगीपण आणि टेलिग्राम

खासगीपण हा मूलभूत अधिकार असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे काही जणांना आनंदाचे भरत आले आहे. हा हर्षवायू एवढा जबरदस्त होता, की खासगीपण आणि गोपनियता यांतील फरकही त्यांना कळेनासा झाला. राईट टू प्रायव्हसी हा खासगीपणाचा अधिकार असतो, गोपनियतेचा नसतो, हेही समजून घ्यायचीही त्यांची तयारी नव्हती. हा निकाल म्हणजे मोदी सरकारला चपराक असल्याचेही त्यांनी परस्पर जाहीर केले.
पण वस्तुस्थिती काय आहे? हा मूलभूत हक्क असला तरी सरकार त्यावर काही निर्बंध घालू शकते, हेही त्याच न्यायालयाने निकालात म्हटले आहे याचीही नोंद घेण्याची त्यांची तयारी नव्हती.
सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखालील 9 न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा एकमताने निकाल दिला आहे. राज्यघटनेच्या कलम 21 नुसार जगण्याच्या स्वातंत्र्यातच खासगीपणाचा समावेश आहे, असे खंडपीठाने म्हटले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच आधार कार्डच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका न्यायालयासमोर आहेत. त्यात आधार कार्डमुळे वैयक्तिक गोपनियतेच्या अधिकाराची पायमल्ली होत असल्याचा दावा करणारी याचिका सर्वात महत्त्वाची मानली जात होती. त्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे खासगीपणावरचे भाष्य केले.
मात्र त्यात आधारबाबत त्यांनी काहीही टिप्पणी केली नाही, हे महत्त्वाचे. त्यामुळे आपण आता सरकार किंवा सार्वजनिक व्यवस्थेला जबाबदार नाही, असे मानून दिवाळी साजरी करणाऱ्यांचे बुद्धिचे दिवाळेच वाजलेले दिसून येते. ज्या प्रकारे या निर्णयाचे वर्णन चालू होते, त्यावरून आता देशातील प्रत्येक नागरिक निरंकुश झाल्याचेच चित्र निर्माण होत होते. ते खरे मानायचे तर उद्या न्यायालयात एखादा साक्षीदार साक्ष देताना माझी ‘गोपनियता’ कायम ठेवण्यासाठी मी साक्ष देणार नाही, असे म्हणून शकतो. तेव्हा काय करणार? म्हटले तर काय होईल?
शासन संस्थेने किंवा समाजाने व्यक्तीच्या जीवनात अतिरेकी ढवळाढवळ करणे हे जसे अयोग्य, तसेच अतिरेकी खासगीपण जपणे हेही वाईटच. म्हणजे सरकारने गुन्हेगारी आणि दहशतवाद रोखावा मात्र त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजू नयेत. अन् जे योजायचे आहेत ते परस्पर, आमच्यापर्यंत काही येऊ नये, असे म्हणण्यासारखे हे झाले. गोपनियतेचा अतिरेक कसा जीवावर बेतू शकतो, हे पाहायचे असेल तर आपल्याला टेलिग्राम या अॅपचे उदाहरण पहावे लागेल.
व्हॉट्सअ‍ॅपचा उत्तम पर्याय म्हणून ‘टेलिग्राम’ हे अॅप ओळखले जाते. संदेशांची गोपनीयता ही या ‘टेलिग्राम’ अॅपची सर्वात मोठी खासियत. हे अॅप ‘एमटीपी प्रोटो’ या डाटा प्रोटोकॉलवर आधारीत आहे. त्यामुळे एखाद्याने पाठवलेला मेसेज ती व्यक्ती दुसऱ्याला पुढे पाठवू शकत नाही, कारण त्याचे एन्क्रिप्शन झालेले असते. तो संदेशही विशिष्ट काळानंतर स्वतःच नष्ट होतो. कारण हा संदेश टेलिग्रामच्या सर्व्हरवर नसतो. म्हणूनच व्यक्तिगत संवादासाठी हे अॅप उपयुक्त मानले जाते.
परंतु याचा फायदा कोणाला झाला? तर इस्लामिक स्टेट म्हणजे इसिसला! दोन वर्षांपूर्वी पॅरिसमध्ये इसिसचा हल्ला झाला तेव्हा इसिसने 34 पानांचे एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्यात आपल्या अनुयायांना फक्त टेलीग्राम अॅप वापरण्याचे आवाहन केले होते. जेणेकरून जगभरातील सुरक्षा संस्थांना त्यांच्या संवादाचा माग लागू नये. त्या हल्ल्यानंतर पॅरिसचा हल्ला हा वादळाची फक्त सुरूवात आहे, असा संदेश इसिसने टेलिग्रामवरच पाठवला होता.
अहमद एस. यायला (Ahmet S. Yayla) नावाच्या तंत्रज्ञाने घेतलेले टेलिग्रामवरील इसिस चॅनलचे स्क्रीनशॉट .
त्यानंतर जगभरात आरडा-ओरडा झाल्यानंतर कंपनीने इसिससाठी कार्यरत असलेले 78 चॅनल बंद केले. टेलिग्राम हे अॅप रशियातील पॉवेल आणि निकोलाय नावाच्या दोन भावंडांनी सुरू केले होते. यातील निकोलाय हा रशियाच्या सुरक्षा संस्थेच्या टेहळणीच्या विरोधात होता. त्यामुळेच त्याने त्यात या सुरक्षेच्या तरतुदी केल्या होत्या. त्याचा सर्वसामान्यांना किती फायदा झाला माहीत नाही. पण इसिस नावाच्या आग्यावेताळाने त्याचा पूरेपूर लाभ घेतला.
अगदी या आठवडयातही इसिसने असाच एक प्रक्षोभक व्हिडिओ प्रसारित केला आहे. ‘द कॉन्क्वेस्ट ऑफ बार्सिलोना’ या शीर्षकाखाली हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि तो टेलीग्रामवरूनच पाठवण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात बार्सिलोना हल्ल्याबद्दल आनंद व्यक्त करणारा व्हिडिओही त्यांनी टेलीग्राम वरूनच पाठवला होता.
केरळमधून जे 15 युवक इसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय व्यक्त झाला होता, त्यातील एकाने आपल्या कुटुंबाला गेल्या वर्षी संदेश पाठवला होता. “लोक मला उद्या दहशतवादी म्हणून बोलवतील, अल्लाहच्या मार्गावर लढणे दहशतवाद असेल तर हो, मी दहशतवादी आहे. इसिसचे काम संपवून मी परत येईन. त्यानंतर मला काश्मीर, गुजरात आणि मुझफ्फरनगरमधल्या पीडीत मुसलमानांना मदत करायची आहे,” असा संदेश मोहम्मद मारवान याने पाठवला होता. अन् हो, बरोब्बर ओळखंलत. त्याने हा संदेश टेलिग्रामवरूनच पाठवला होता. त्यामुळेच सुरक्षा संस्थांना त्याला शोधता आले नव्हते.
बीफ आणि दारूच्या पलीकडे पाहू न शकणाऱ्या लोकांनी एवढा किचकट विचार करणे अपेक्षितच नाही. म्हणूनच “हा निर्णय सरकारसाठी मोठा झटका आहे. नागरिकांच्या वैयक्तिक गोपनियतेशी संबंधित माहितीवर कायदा बनवताना तर्कशुद्ध मुद्द्यांवर विचार करावा लागेल. सरकारी धोरणांवर आता नव्याने पुनरावलोकन करावं लागेल,” वगैरे भाष्य करण्यात येत आहे. आपलं नाक कापले तरी हरकत नाही, शेजारणीला अपशकुन करायचाच या ईर्षेपलीकडे त्यात काही नाही.