Saturday, September 1, 2007

भागो...मोहन प्यारे!

प्रिय मोहनलाल,
मल्याळम चित्रसृष्टीतील सुपरस्टार आणि प्रियदर्शनच्या भाषेत भारतातला सर्वांत नैसर्गिक अभिनय करणारा अभिनेता, अशी तुझी आतापर्यंत ख्याती ऐकून होतो. तू तीन वेळचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता अशीही त्याला एक किनार होती. मात्र मुंबईच्या टोळीयुद्धावर स्वतःची उपजीविका चालविणारे राम गोपाल वर्मा यांच्या "शोले' या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तू काम करणार, ही घोषणा झाली आणि पोटात गोळा आला. ही गोष्ट माहीत झाल्यापासूनच तुझ्याविषयी सहानुभूती वाटायला लागली.
याआधी रामूच्याच "कंपनी' नामे सिनेमात अधूनमधून बंदुकीच्या गोळ्या सुटत नाहीत, अशा तुकड्यांमध्ये तू झळकला होतास. भलेही ती भूमिका तू (नेहमी च्याच) सहजतेने जिवंत केलीस. पण यावेळी प्रकरण वेगळे होते.

तुझ्या कारकिर्दीत आजवर एकाही रिमेकमध्ये तू काम केलेले नाही, म्हणजे आता नव्हते म्हणावे लागेल. "किलुक्कम,' "काला पानी', "मुकुंदेट्टा सुमित्रा विळुक्कुन्नु,' किंवा "तलवाट्टम,' "उदयोन' अशा चित्रपटांमध्ये एकाहून एक सरस भूमिका करणारा तू, तुझ्यावर कोणता सूड घेण्यासाठी रामूने तुला "बळीचा ठाकूर' केले काय माहीत? अन्‌ तुलाही कोणती दुर्बुद्धी सुचली काय माहीत, तूही ती भूमिका स्वीकारली. ओणमच्या निमित्ताने "एशियानेट'वर तुझी मुलाखत चालू होती. हिंदी चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग असल्याने, त्यातून अधिक "रिस्पॉंस' मिळत असल्याचे तू त्या मुलाखतीत सांगितले. अशा पडेल चित्रपटांमध्ये फडतूस भूमिका केल्यावर कोणता चांगला प्रेक्षक तुला अनुकूल होणार आहे, हे स्वामी अय्यप्पाच जाणो!

अरे, ती ठाकूरची भूमिका एव्हढी सोपी नव्हतीच. मुळात तू संजीवकुमारच्या तोडीस तोड अभिनय केलाही असतास, मात्र उत्तरेतील "जाणकार' प्रेक्षकांचे त्याने समाधान झाले असते का? न्यू जर्सी किंवा टेक्‍सासच्या "ऍसेंट'मध्ये बोलणारे हिरो आम्हाला चालतात, पण आपल्याच देशातील मराठी किंवा दक्षिणी ढंगात हिंदी बोललेले चालत नाही आम्हाला. त्यामुळे तू कधीही ठाकूर होऊ शकला नसतास, याबद्दल आमच्या मनात शंका नव्हती.

त्यानंतर रामूने कधीतरी "राम गोपाल वर्मा के शोले' नावाच्या चित्रपटाचा मुहूर्त केला. त्यावेळी अमिताभ बच्चन याच्या घेतलेल्या पहिल्या दृश्‍याचे छायाचित्र पाहिल्यावरच या "प्रोजेक्‍ट'मध्ये रामू हात पोळून घेणार हे पक्के झाले होते. त्यानंतर चित्रपटाचे नाव "आग' करण्यात आले आणि या आगीची झळ सर्वांनाच पोचणार, याची खूणगाठ पटली. अमिताभचं काही नाही, तो अशा कित्येक आगींचे रिंगण त्याने पार केले आहे. आपण काय करत आहोत, याचं भान न ठेवता, केवळ कॅमेऱ्यासमोर येण्याचे पैसे घेऊन "डाबर अनारदाना' पासून "रिड अँड टेलर'पर्यंत; मुलायमसिंहांच्या प्रचारसभांपासून "आयफा ऍवॉर्ड' समारंभापर्यंत, कुठलाही प्रसंग अथवा जाहिरातची कहाणी "साठा सुफळ' करण्यात त्याची हयात गेली. तुझं काय?

हिंदी (अन्‌ मराठीही, ते फारसे वेगळे काढणे शक्‍य नाही ) प्रेक्षकांना तुझे नाव आणि क्षमता माहितीही नाही. आता प्रियदर्शनचे चित्रपट पाहून लोकांची हसून हसून पुरेवाट होते. त्यांना काय माहीत, एकेकाळच्या तुझ्याच चित्रपटांचे हे अधिक चकचकीत रिमेकस्‌ आहेत ते? तू केलेल्या करामतीच आज अक्षयकुमार, सुनील शेट्टी आणि प्रियदर्शन कॅंपची अन्य मंडळी करतात व दुनियाभरातली तारीफ मिळवितात. तू तरी इकडच्या प्रेक्षकांपर्यंत येताना काळजी घ्यायला हवी. एकेकाळी रजनीकांतनेही मोठ्या एक्‍स्पोजरसाठी हिंदीत बाष्कळ भूमिका केल्या. त्यानंतर त्याने इथला नाद सोडला. आज तो स्वतःच्या मनाप्रमाणे काम करतो आणि इकडच्या लोकांना त्याच्या तमिळ चित्रपटाचीही दखल घ्यावी लागते.

तुझं काम अधिक अवघड करून ठेवण्यास रामू समर्थ आहेच. त्याने "शोले'चा खून, शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार एकाच वेळी करण्याची अद्‌भूत कामगिरी केलीच आहे. त्यात तुझ्यासारख्या एका चांगल्या अभिनेत्याची झालेली गोची आणि मुखभंग आमच्यासारख्यांना वेदना देतो.

त्यामुळे, आता तुला एकच सांगणे आहे...

अलम्‌ दुनियेला तू माहित झाला नाहीस, तरी चालेल. मल्याळममध्ये मनासार ख्या भूमिका कर...यशस्वी हो..अन्‌ चुकूनही मुंबईला येवू नकोस...
भागो, मोहन प्यारे...
तुझ्या अनेक प्रेक्षकांपैकी एक

Thursday, August 30, 2007

मान न मान, तू मेरा सलमान!

नमस्कार,


आवाज : प्रसिद्ध आणि लोकोद्धारक अभिनेते समलान खान यांच्या कारागृह प्रवासाच्या धावत्या वर्णन ऐकणाऱ्यांचे स्वागत आहे. मी, हांजी हांजी खां आणि प्रसिद्ध चाटुकार अखंड तोंडपुजे, आम्ही तुम्हाला या जगहितकारक यात्रेचे इत्थंभूत वर्णन देण्यासाठी सज्ज आहोत. खान यांच्या या लोकविलक्षण त्यागाबद्दलची हरतऱ्हेची माहिती घेण्यासाठी आपल्याला प्रचंड उत्सुकता आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यासाठीच आपण सध्या खान यांच्या घरासमोरील गल्लीत उभे आहोत. ते बाहेर येऊन कारागृहात प्रवेश करतील, तसतशी ताजी माहिती आम्ही देऊ. त्यासाठी आपल्याला कुठेही जायची गरज नाही. पाहत रहा आमची वाहिनी. आता घेऊ आपण एक ब्रेक. त्यानंतर पहा आमचा वृत्तांत.


(एक ब्रेक : प्रसिद्ध "खपा बनियान -ये धोने की बात है' यांच्या मार्फत प्रायोजित.)


चाटुकार ः ब्रेकनंतर आपले पुन्हा थेट प्रक्षेपणात स्वागत. आपण सध्या उभे आहोत समलान खान यांच्या घराबाहेरील एका गल्लीत. या गल्लीपासूनच समलान यांच्या घराच्या मुख्य दरवाजापर्यंत रस्ता जातो. याच रस्त्यावर समलान लहानपणी गोट्या खेळत होता. त्याच्या खेळादरम्यान उडालेल्या गोट्या लागून चेहऱ्यावर जखमा झालेले अनेक जण इथे आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना समलान खान आज "स्टार' असल्याचा अभिमान आहे. यांतीलच एक आहेत हे वयोवृद्ध मामू. आपण त्यांच्याशीच बोलूया...


आप कोई याद बताएंगे? कोई ऐसी बात जो आप नहीं भूले है?


मामू : हां, जरूर याद है. समलान बचपन से बहुत शरारती था. केंचुले तो वो खेलता ही था...क्रिकेट भी कहता था. बल्ला नहीं थे तो एक-दो बार मेरे दरवाजे की बल्लिंयॉं ही तोड के ले गया. बहुत शरारती था. लेकिन मैंने उसको कभी डांटा नही, क्यों कि वो कहता, चाचा, मैं बडा होने के बाद आपको एक फ्लैट दे दूंगा. और उसने दिया भी...वो स्टार बनने के बाद जुहू में हुसेन भाई से कह के उसने एक फ्लैट मेरे बडे बेटे को दिया.


बघा, म्हणजे समलान हा किती परोपकारी आहे पहा. वयोवृद्ध मामूंना फ्लैट देणारा समलान आता जेलच्या कोठडीत किती कष्ट सहन करतो, हीच आता उत्सुकता आहे.


आताच मिळालेल्या बातमीनुसार, समलान झोपेतून उठला आहे. थोड्या वेळाने तो उठेल. त्यानंतर आंघोळ करून तो कारागृहाकडे रवाना होईल. या प्रत्येक क्षणाचे वृत्त आम्ही तुम्हाला देऊ. कुठेही जाऊ नका. आपण तोपर्यंत घेऊ एक ब्रेक...


(एक ब्रेक : आधीचेच प्रायोजक)


हांजी हांजी खां : मी उभा आहे समलान खान यांच्या बंगल्याच्या बाहेरच्या बाजूस. समलानकडे पाच कुत्रे पाळलेले आहेत. त्यातील दोन तुम्हाला या फ्रेममध्ये दिसत आहेत. याच्याच बाजूला त्यांचे टॉइलेट आणि बाथरूम आहे. सध्या समलान अंघोळ करत आहे...असा अंदाज आहे कारण आतून पाणी वाहण्याचा आवाज येत आहे. थोड्याच वेळात ते बाहेर येतील. त्यानंतर निघतील निदान काही दिवस तरी कारागृहात काढण्यासाठी...


चाटुकार : हांजी हांजी, तुला काय वाटतं...समलानचा गुन्हा त्याला झाली त्या शिक्षेएवढा गंभीर आहे का?


हांजी हांजी खां : चाटुकार, हे पहा समलानला उच्च न्यायालयाने शिक्षा दिली आहे. त्यामुळे आपण त्याबद्दल बोलणे योग्य नाही. चाटुकार, तुला माहितेय...काही वर्षांपूर्वी समलान एका जंगलात तेथील आदिवासींना कपडे आणि केक वाटायला गेला होता. त्यावेळी त्याला जंगलात एक लाकडाचे हरिण दिसले. समलानच्या खेळकर स्वभावानुसार तो त्या लाकडी हरिणाशी खेळू लागला. त्यात ते हरिण तुटले. त्यामुळे त्याला ही शिक्षा झाली नाही. कायदेतज्ज्ञांचे या शिक्षेबाबत वेगवेगळे मत आहे. मात्र, समलानच्या अनेक चित्रपटांत न्यायाधीशाची भूमिका करणारे अभिनेते मैलेश भोट यांच्या मते, ही शिक्षा फारच जास्त आहे. समलानचा स्वभाव, त्याची उदारता आणि सज्जनासारखी वागणूक पाहून त्याला सोडून द्यावे...


चाटुकार ः एक मिनट हांजी हांजी, आताच खबर आली आहे, की समलानची आंघोळ झाली आहे. त्याने पांढरी पॅंट घातली असून, बूट घालण्यासाठी पाय पुढे केला आहे. यावेळी त्याच्या घराच्या गच्चीवर सर्व नातेवाईक जमले होते. त्यांना समलानवर पुष्पवृष्टी करायची होती, मात्र जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे त्यांना ते जमले नाही. समलानने बूट घातले असून, तो तुरुंगात जाण्यापूर्वी घरातले शेवटचे जेवण घेत आहे. आपण त्याच्या मागावरच राहणार असून, कुठेही जाऊ नका...तोपर्यंत घेऊया थोडीशी विश्रांती!


(ब्रेक : प्रायोजक शामदेव मसाले...इसके बिना खाना अधूरा है!)


हांजी हांजी : नमस्कार, ब्रेकनंतर आपले स्वागत आहे. आपण पहातच आहात समलानच्या घराबाहेर किती मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. प्रत्येकाला आपल्या आवडत्या अभिनेत्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत, त्याची एकदातरी झलक पहायची आहे...समलानचा शेवटचा चित्रपट प्रदर्शित झाला सहा महिन्यांपूर्वी...आता त्याच्या तुरुंगात जाण्याने किमान एक वर्षभर लोकांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्याचे दर्शन होणार नाही. त्यामुळे आज त्यांना एकदा तरी समलानला डोळे भरून पहायचे आहे. त्यातीलच एकाशी आपण बोलूया...


आप कभी आये?


मैं तो आज ही यहां आया. अपने सम्मू भाई को जेल जाना है, ये मालूम हुआ तो वैसेईच भाग के आया.


आप क्याआ करते है?


हमारा तो साईकिल रिपेरिंग का दुकान है.


आप को क्याा लगता है, सम्मू भाई को दी गई सजा सही है?


बिलकुल गलत है जी. उनको कुछ सजा होना ही नहीं चाहिये था. अपुन के यहां कितने जानवर लोग मारते है. और यहां तो एक लकडी का हिरण टूट गया. अदालत को मंगता था तो थोडा सा फैन लेने का था. एक्टहर लोगों को जम में भेजनाईच नहीं चाहिये. हम फिर बात करते है.


आताच कळाले आहे, की समलान खान यांचे जेवण झाले आहे. जेवणात त्यांना त्यांचे आवडते मस्का-पाव आणि बकरीचे मटण दिले होते, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. त्यांचा जो जुना नोकर आहे, तुगलक, त्याच्याशी मी बोललो. त्याने सांगितले, की जेवण झाल्यानंतर समलानने दोनदा ढेकर दिला आणि एकदाच पाणी पिले.


चाटुकार : आता तुम्ही पडद्यावर पहात आहात, की समलान त्याचा छोट्या पुतण्या-भाच्यांशी भेटत आहे. तुम्हाला माहित आहे, की समलानला छोटी मुलं खूप आवडतात. त्याच्या नातेवाईकांवर त्याचे खूप प्रेम आहे. आता सहा महिने त्याला या मुलांशिवाय काढायचे आहे. त्यामुळे तो खूप इमोशनल झाल्याचे दिसत आहे. पडद्यावर अत्यंत कठोर भूमिका करणारा समलान मनातून अत्यंत हळवा आहे . त्याचे इथे प्रत्यंतर येत आहे. हांजी हांजी : आणि ती घडी आली...तुम्ही पहात आहात...अर्धा बाह्यांचा शर्ट आणि पांढरी पॅंट घातलेला समलान खान त्याच्या गाडीत बसत आहे. चाहत्यांच्या गराड्यातून वाट काढण्याचे त्याला कष्ट पडत आहे, हे त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच आहे. तरीही किती शांतपणे तो मार्ग काढत आहे...जीवनातील संकटावर त्याने याच शांततेने मार्ग काढला आहे...असंच वाटत आहे जणू...अन्‌ समलानने त्याच्या गाडीच्या काचा खाली केल्या आहेत...काचा वर चढल्या तरी त्याच्या नजरा त्याच्या घरावरच टिकल्या असल्याचे जाणवत आहे...गाडी स्टार्ट झाली आहे...चाहत्यांच्या गर्दीतून वाट काढत गाडी पुढे सरकत आहे...मुख्य रस्त्याला लागल्यानंतर गाडी डावीकडे सरकेल आणि त्यानंतर समलान खान सहा महिन्यांसाठी तुरुंगात पोचेल...मात्र तुम्ही दुसरीकडे वर जाऊ नका...मार्गावरील प्रत्येक चौकात आमचे प्रतिनिधी उभे आहेत. ते तुम्हाला खडा न खडा माहिती देतील. कुठेही जाऊ नका. फक्त थोडीशी विश्रांती...


(ब्रेक ः प्रायोजक हिरो गुंडा मोटार सायकल कंपनी)


(याहून अधिक माहिती घेण्यासाठी कृपया कोणतीही वृत्तवाहिनी पाहणे. माझ्याच्याने ते शक्यH नाही. आपण मूर्खपणाची कोणती पातळी गाठू शकतो, याची मी चाचणी घेत होतो. ही माझी हद्द आहे. तुमची?)

Monday, August 27, 2007

आंध्रातील स्फोट आणि बेजबाबदार "वायएसआर'

केवळ तीन महिन्यांच्या अंतराने हैदराबाद शहरात दोन स्फोट झाले आणि त्यात सुमारे चाळीस जणांचे प्राण गेले. ज्या दिवशी हे स्फोट झाले, त्या दिवशी मक्का मस्जिदमधील स्फोटाला शंभर दिवस पूर्ण झाले होते. त्याच दिवशी दुपारी हैदराबादेतच सुमारे दोन कोटी 70 लाख रुपयांच्या बनावट नोटा दाऊदच्या हस्तकांकडून पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. या दोन्ही घटनांचे आपल्याकडच्या माध्यमांमध्ये फारसे प्रतिबिंब उमटले नाही. मी मूळ तेलुगु वाहिन्यांवरील बातम्याच त्या दिवशी पाहिल्या नसत्या तर मलाही या बाबी कळाल्या नसत्या. आंध्रातील सर्वच माध्यमांनी या बाबींवर विशेष जोर दिला आहे. मक्का मस्जिदच्या स्फोटांची उत्तरेतील माध्यमांनी त्या दिवशीचे दळण दळण्यासाठी दखल घेतली. त्यानंतर आताच्या हल्ल्यात महाराष्ट्राच्याच विद्यार्थ्यांचे जीव गेल्यामुळे इकडील वर्तमानपत्रांनी या घटनांची अधिक नोंद घ्यावी लागत आहे.

ताज्या स्फोटानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. आर. राजशेखर रेड्डी यांच्या प्रतिक्रियांनी जनतेत आणखी रोष निर्माण झाला आहे. "इदी आंतरजातिय उग्रवादम...पाक, अफगाणिस्तानलो मन निघु नेटवर्क विस्तरिंचलेम कदा?' (हा आंतरराष्ट्रीय दहशतवाद आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तानमध्ये आपले गुप्तचर वाढवायला हवेत,' या रेड्डी यांच्या विधानाची "ईनाडू' या तेलुगुतील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्राने खिल्ली उडविली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यानंतर जॉर्ज बुश यांनी दाखविलेल्या दहशतवाद्यांच्या नायनाटाच्या निर्धाराशी रेड्डी यांच्या विधानाची तुलना करून, "ईनाडू'ने म्हटले आहे, ""प्रत्येक हल्ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या खास शैलीत दहशतवाद्यांवर केलेला हा प्रतिहल्ला आहे.'' त्यांच्या या गुळचट विधानामुळे स्फोटातील मृत आणि जखमींच्या जखमांवर मीठ चोळले गेले आहे, असे वर्तमानपत्राने म्हटले आहे. "बंगळूर, मालेगाव, लंडन, बगदाद...इथेही दहशतवादी हल्ले होतातच,' या रेड्डी यांच्या उद्‌गारांवर तर "ईनाडू'ने म्हटले आहे, ""वा..वा! यादवी युद्धाने धुमसत असलेल्या इराकमधील बगदादशी आंध्र प्रदेशची तुलना होऊच कशी शकते. सप्टेंबर 11च्या हल्ल्यानंतर अमेरिकेत पुन्हा दहशतवाद्यांना धुमाकुळ घालता आलेला नाही, हे माहित असतानाही मुख्यमंत्री असे बोलूच कसे शकतात.''

दहशतवाद्यांनी वैफल्यातून हे कृत्य केल्याचे राज्य सरकारने म्हटले होते. त्यावर "इनाडू'चे म्हणणे, "" इदि प्रभुत्वाल वैफल्यम. (हे दहशतवाद्यांचे नव्हे, सरकारचे अपयश आहे.''

आंध्र प्रदेश हे त्यामानाने एक गरीब राज्य आहे. मात्र आधीच्या चंद्राबाबू नायडू यांच्या कारकीर्दीत तिथे किमान शांतता तरी होती. नक्षलवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्यात नायडू सरकारला बव्हंशी यश मिळाले होते. त्या तुलनेत रेड्डी यांच्या सरकारने डोळ्यांत भरण्याजोगी काहीही काम केलेले नाही. नक्षलवाद्यांवर कारवाई न करण्याचा निर्णय त्यांनी सत्तेवर येताच काही दिवसांनी जाहीर केला होता. मात्र त्याला फारसे यश मिळाले नाही. गेल्याच महिन्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या आंदोलनात तिथे सात पोलिस कर्मचारी ठार झाले. तिरुपतीतील जमीनी मिशनऱ्यांना वाटणे, मुस्लिमांना आरक्षण देणे अशा "नॉन इश्‍यू'मध्ये रेड्डी सरकारने वेळ घालविला. त्यामुळे आंध्रसारख्या चांगल्या व सुंदर राज्याचा बघता-बघता "इराक' झाला आहे.