Thursday, December 27, 2007

इतना सन्नाटा क्यों है भाई

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर नरेंद्र मोदी आरूढ होऊन आता पाच दिवस होत आले आहेत. मात्र या काळात मराठी ब्लॉग (अलिकडे कोणत्याही मुद्रित अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांपेक्षा मी यांवर जास्त भिस्त ठेवतो. ) अथवा माध्यमांमध्ये फारशी चर्चा झालेली दिसत नाही, हे खरोखरीच खूप आश्चर्यकारक आहे. मोदी विरूद्ध इतर सर्व असा (निवडणुकीचा) लढा ज्या गुजरातेत झाला, तेथील वर्तमानपत्रे वगळता कोणीही या विजयाबद्दल फारशा कौतुकाने बोलतानाही दिसत नाही. (या घटनेचाच उल्लेख अगदी अपरिहार्य झाले म्हणून केला असल्यास न कळे!) मोदी यांचा पराभव झाला असता, तर हेच चित्र दिसले असते का, हा प्रश्न त्यामुळेच विचारावासा वाटतो.

गुजरातमधील निवडणुकांबाबतचे हे बिनविरोध मौन मात्र निकालानंतरच जाणवत आहे, अशातला भाग नाही. निवडणुका संपल्यानंतर म्हणजे मतदानाचे दोन टप्पे पार पडल्यानंतरही त्याबाबत लक्षणीय सामसूम होतीच. बोटाला शाई लागलेला मतदार केव्हा एकदा बाहेर पडतो आणि केव्हा आपण त्याच्या ताज्या मतदानाचा अदमास घेऊन एक्झिट पोलची पोतडी दर्शकांपुढे रिकामी करू, अशा बेतात असलेल्या वाहिन्याही यावेळी बेताबेतानेच आपले अंदाज व्यक्त करत होत्या. त्यांना शक्य असतं, तर मोदी यांचा सपशेल पराभव होणार, असा जाहीर हाकारा त्यांनी केव्हाच घातला असता. संपूर्ण प्रचाराच्या काळात आणि मतदानाच्या वेळेसही (स्पष्टच सांगायचं तर गेल्या एक दीड वर्षातही) वाहिन्या आणि वर्तमानपत्रांनी आडून आडून तसे सुचविलेही होते. मात्र थेट आपली कल्हई उघडी न करता वेगवेगळ्या मिषाने मोदींचा उपमर्द करण्याचा प्रयत्न चालूच होता.

मोदींच्या विरोधात बंड करणारे कोण, त्यांचा इतिहास काय याचा काडीमात्र अभ्यास न करता त्यांच्या बळावर गुजरातेत भारतीय जनता पक्षाला पराभवास सामोरे जावे लागेल, असे भाकित वर्तविणारे काही जण होते. त्याचप्रमाणे सोनिया गांधी यांच्या 'चाणाक्ष राजकीय' खेळीमुळे सोहराबुद्दीन प्रकरणाच्या जाळ्यात मोदी सपशेल अडकले, असे ठोकून देणारेही या काळात पाहायला मिळाले. एका मोठ्या मराठी वर्तमानपत्राने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मणीनगरमध्ये (नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ) प्रचार सभा घेऊन कॉंग्रेसच्या बाजूने हवा कशी निर्माण केली, याचा ऑंखो देखा हाल वर्णन केला होता. सोहराबुद्दीनप्रकरणी
तिस्ता सेटलवाड सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 'अशा प्रकरणांतून न्यायालयांनी दूर राहायला हवे,' अशा आशयाचा अग्रलेख 'मुंबई समाचार' या १५० वर्षांहून अधिक जुन्या गुजराती वृत्तपत्राने लिहिला होता. मात्र त्याची दखल घेण्याची कोणाला गरज वाटत नव्हती.

रविवारी, २३ डिसेंबरपासून मात्र कोणत्याही तज्ज्ञांचा आवाज ऐकू येईनासा झाला आहे. केवळ हिंदूत्वाच्या आणि पुराणकथांच्या गोष्टी करणाऱयांना विकास काय कळणार, असा प्रश्न विचारणाऱयांना केवळ विकासाच्या मुद्यावर एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याने विजय मिळविल्याचे पाहावे लागावे, यांहून अधिक दुर्दैव ते कोणते? मॅडमनी सांगितले तर मी घरीही बसेन किंवा मॅडमच्या गेल्या पाच पिढ्यांच्या कर्तृत्वामुळेच या देशाला भाग्याचे दिवस आले आहेत, असे सांगणाऱया स्वाभिमानी नेत्यांच्या या देशात, अमेरिकेने व्हीसा नाकारल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्योजकांशी संपर्क साधून विक्रमी गुंतवणूक आकर्षित करणारा नेता काय कामाचा? अशांचे कुठे कौतुक करायचे? त्यामुळे गेल्या काही दिवसांत सुरू झालेल्या चर्चेची धूळ अचानक खाली बसली आहे. शोलेचे निर्माते जी. पी. सिप्पी यांचे नुकतेच निधन झाले. याच चित्रपटातील एका संवादाची त्यामुळे अवचित आठवण झाली...

"इतना सन्नाटा क्यों है भाई?"

Wednesday, December 19, 2007

निषेध असो...

पुण्यातील कोणत्याही गल्लीबोळातील, कोणालाही सहजासहजी सापडणार नाही अशा इमारतीतील कुठल्याही एका राजकीय पक्षाचे कार्यालय. साधारण दोन खोल्या बसतील असा एकच हॉल. एका कोपऱयात मोठा टेबल. त्याच्यासमोर तीन चार खुर्च्या. सध्या या खुर्च्या रिकाम्या आहेत. पलिकडच्या बाजूस एक खिडकी. टेबलच्या थेट समोर एक टीव्ही. त्याच्यावर कुठलेतरी गाण्याचे एक चॅनल चालू असल्याचे दिसते. त्यावर हिमेश रेशमिया किंवा बेसुरेपणात त्याच्याशी स्पर्धा करेल, अशा एखाद्या गायकाचा चेहरा झळकतो. अधूनमधून काही जाहिरातीही.

हॉलमधील टेबलवर बसलेली व्यक्ती सर्वात प्रथम नजरेत भरते. साधारणतः चाळीशीची व्यक्ती. डोक्यावर मध्यम आकारचे केस, मात्र त्यांचा भांग पाडून खूप वेळ झाल्याचे चटकन जाणवते. पान किंवा गुटखा खाल्ल्यामुळे लाल झालेले ओठ. या व्यक्तीच्या खिशात एक मोबाईल आणि टेबलवर एक मोबाईल ठेवलेला. शिवाय टेबलवर एक टेलिफोन वेगळा. टेबलवर पडलेल्या वर्तमानपत्रांच्या गठ्ठ्यातून एक एक वर्तमानपत्र काढून वाचण्यात ही व्यक्ती दंग आहे. प्रत्येक पेपरमधील प्रत्येक पानाचे अत्यंत काळजीपूर्वक वाचन चालू असल्याचे दिसत आहे. तितक्यात आणखी एक व्यक्ती खोलीत प्रवेश करते. सुमारे वीस-बावीस वर्षांचा मुलगा. याच्याही तोंडात गुटखा. मात्र त्यातही कसलेतरी गाणे गुणगुणण्याचा त्याचा प्रयत्न.

“अरे नेते, कधी आलात,” युवकाचा प्रश्न. त्यावर आत्ताच असे नेत्याचे उत्तर. पाठोपाठ नेत्याचा प्रश्न, “काय रे वाचलेस का आजचे पेपर?”

“वाचले ना, काय नाय सापडलं नेते,” युवकाचे लागलीच उत्तर. दरम्यान त्याने गाण्याचे चॅनल बदलून बातम्यांचे चॅनेल लावलेले असते. त्यावर काही वेळ जाहिरातीच चालू. मुलगा पुन्हा बोलू लागतो, “सगळे चॅनेल पाहून झाले. आज काय नाहीच दिसतं. तिकडंबी ते शारुखचं पिक्चर हिट झाल्याचीच बातमी देतायत. नव्या कोण्या पिक्चरची बातच करत नाय कोणी.”

नेते उत्तर देणार एवढ्यात त्यांचा एक मोबाईल वाजतो. सवयीने ते खिशातला मोबाईल काढून बोलू लागतात, “हां, बोलतोय. हां, आरं तयार हायेत पत्रकं सगळी. पन आज काय कोणी चान्स दिलेला दिसत नाय. सगळ्या बातम्या पाहिल्या. कशावर पत्रक काढणार?.”

काही वेळ नेते पलिकडच्या व्यक्तीचं ऐकतात. त्यानंतर पुन्हा सुरू, “हां...पन आज आहे पालिकेला सुट्टी. तिथलं काय लफडं नाही कळालं. तिकडं दिल्लीतल्या सरकारनं जबानच बंद केली ना राव. कोणी काही बोलतच नाही...आरं तो कसला तरी करार आहे ना तेच्यावर. सालं कम्युनिस्ट बी आता तेच्यावर बोलत नाही त्यांचं नंदीग्राम झाल्यापासून. इकडं मुंबईतले सगळे गेलेत गुजरातला. त्यांच्याकडून बी काही ऐकायला मिळत नाही. कोणाला पकडावं आता तूच सांग. सगळा धंदा मंद झालाय भाऊ...”

नेते फोन ठेवतात. त्यानंतर काही वेळ खिडकीशी जाऊन बाहेर पाहात उभे राहतात. मध्येच हाक मारतात, “ए संज्या.” लगेच संज्या त्यांच्याजवळ जाऊन उभा राहतो. “का रे, रस्त्यावर एवढी गर्दी का,” नेते विचारतात.

“रोजच होते ना नेते. शाळा आहे ना पलिकडे. तिथल्या पोरांमुळे इथे ट्रॅफिक जॅम होतं,” संज्या प्रामाणिकपणे माहिती पुरवतो.

“अरे, मग याच्यावरच काढू ना पत्रक. या रस्त्यावर विद्यार्थ्यांमुळे गर्दी होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. याबाबत वारंवार तक्रार करूनही प्रशासन दाद घेत नाही. याचा आम्ही निषेध करतो...,”नेत्यांनी तोंडपाठ असल्यासारखा पत्रकाचा मजकूर सांगितला. त्यांना अर्ध्या रात्री उठविलं असतं तरी हाच मजकूर त्यांनी पाकिस्तानकडून बाबर क्षेपणास्त्राची चाचणी किंवा खटखटवाडीत डांबरी रस्ता करण्याकडे दुर्लक्ष अशा कोणत्याही विषयाला धरून सांगितला असता. मात्र त्यांचा आज्ञाधारक सेवक संज्या जागचा हालत नसल्याचे पाहून नेत्यांचा पारा चढू लागतो. तेवढ्यात संज्याच तोंड उघडतो, म्हणजे आधी खिडकीतून गुटखा थुंकायला आणि त्यानंतर नेत्यांना माहिती द्यायला, “नेते, परवाच दिला ना हा मजकूर. तीन पेप्रांत छापून बी आलाय ना.”

या उत्तरावर नेत्यांचा चेहरा गोरामोरा होतो. पुन्हा खिडकीबाहेर पाहून ते शून्यांत हरवतात. पंधरा वर्षांच्या त्यांच्या राजकीय कारकीर्दीत अशी वेळ कधी आली नव्हती. प्रसंग कोणताही येवो, बातमी वर्तमानपत्रांत नंतर छापून यायची अन नेत्यांच्या निषेधाचं पत्रक आदी वर्तमानपत्रांच्या कार्यालयात पोचायचं. एक दोन वेळेस त्यांच्याकडून पत्रक वेळेवर गेले नव्हते, त्यामुळे काही वर्तमानपत्रांनी मूळ बातमीच छापायला नकार दिला होता. नेत्यांचं पत्रक आलं नाही त्याअर्थी ती बातमी खोटी आहे, अशी बिचाऱया पत्रकारांची समजूत. इतका पत्रकारांचा नेत्यांवर विश्वास! अन आज त्याच नेत्यांवर पत्रकासाठी विषय शोधायची वेळ यावी?

नेत्यांनी एकदा टेबलामागे ठेवलेल्या लेटरहेडच्या गठ्ठ्याकडे पाहिलं. पगाराच्या दिवशी एखाद्याला प्रत्येक दुकानाच्या शो-केसमध्ये ठेवलेल्या वस्तूंना खुणवावं, तसे ती होतकरू पत्रकं त्यांना आव्हान देत होती. थोड्या वेळाने त्यांना पत्नीसमवेत एका हॉटेलमध्ये जायचं होतं. पंधरा मिनिटांच्या आत पत्रक लिहून पाठविणं आवश्यक होतं. नाहीतर उद्या छापून आलं नसतं.

विमनस्कपणे नेते पुन्हा टेबलकडे येतात. चालू असलेल्या चॅनेलवरील कोणताही कार्यक्रम पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे इतका वेळ स्पोर्टस चॅनेलवर रेसलिंगची हाणामारी सुखैनैव पाहणारा संजू अस्वस्थ होतो. “चहा सांगू का,” तो विचारतो. नेते मानेनेच होकार देतात. लगेच संजू कोणातरी छोटूच्या नावाने चहाची ऑर्डर देतो.

थोड्या वेळाने चहा येतो. नेते एक घोट घेतात. दरम्यान आता टेबलवरील मोबाईल वाजलेला असतो. “हो निघालोच,” लगेच पाच मिनिटांत असं काहीबाही बोलून ते संभाषण आटोपतं घेतात. संजू आपले लक्ष नाही असं दाखवितो.

“साखर कमी टाकलीय का रे यानं,” नेत्याच्या या प्रश्नावर तो दचकतो. एका चॅनेलवर बातम्या म्हणून एका हिरोईनचं लफडं दाखवित असतात. त्यात त्याचं लक्ष असतं. चहात साखर कमी असल्यानं त्याला काहीही फरक पडलेला नसतो.

“मला बी वाटलं तसं,” तो उगाच सांगतो. इतक्यात नेते पुढला प्रश्न विचारतात, “साखर संकुलात ती बैठक होती ना रे ती आज?”.

“नाय झाली आज,” संज्या उत्तरतो, “अशा दहा बैठका लिहिल्यात त्या तुमच्या डायरीत. एक बी झाली नाही. त्यात काही झालं असतं तर आपल्याला बरं, नाही का?”

त्याच्या या उत्तरावर नेत्यांचा चेहरा अचानक उजळतो. लगेच ते मागे वळून लेटरहेडचा गठ्ठा काढतात. त्यातील एक लेटरहेड घेऊन लगेच लिहायला बसतात. थोड्या वेळाने लिहून झाल्यावर संज्याला सांगतात, “संज्या, आजचं आपलं पत्रक झालं. आता याची झेरॉक्स काढून सगळ्यांना पाठव. सालं, आलंच पाहिजे उद्या-परवा सगळीकडे.”

संज्याच्या चेहऱयावर प्रश्नचिन्हांची गर्दी होते. त्याला अजून राजकारणात गती नसल्याने पत्रकात काय लिहिलंय हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. त्याचा तो प्रश्न नेते सोडवतात, “ऐक काय लिहिलंय...आपल्या शहरात आणि राज्यात तसेच देशातही अनेक प्रश्नांचं थैमान सुरू आहे. त्यासाठी आमच्या संघटनेने अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर शासनाने समित्यांची नियुक्ती केली. मात्र त्या समित्यांची बैठक होत नाही. राज्याच्या या प्रश्नांकडे सरकारचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. सरकारच्या या वेळकाढूपणाचा आम्ही निषेध करतो. या संदर्भात त्वरीत काही कारवाई न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहोत...”

नेत्यांच्या या वाक्यासरशी संज्याच्या चेहऱयावरही हास्य खेळू लागतं. निरनिराळ्या वर्तमानपत्रांच्या कार्यालयात जाण्यासाठी पेट्रोलचा खर्च म्हणून त्यालाही शंभर-दीडशे रुपये मिळणार असतात अन आपला आजचा निषेधाचा कोटा पूर्ण झाला, या आनंदात नेते पत्नीसह सुखाचा घास घेऊ शकणार असतात...

Monday, December 17, 2007

इंग्लिश पिक्‍चर? कुठं आहेत?

इंग्रजी सिनेमा पाहणे, ही एके काळी प्रतिष्ठेची बाब होती. त्यातील चित्रीकरण (पाहणाऱ्यांच्या शब्दांत फोटोग्राफी!), मोटारींचा पाठलाग, नेत्रसुखद लोकेशन्स अशा गोष्टींवर बोलताना चित्रपट पाहणारे थकत नसत. ज्यांना इंग्रजी चित्रपट समजत नसत, असे बापडे (हेच संख्येने अधिक!) साहजिकच त्यांच्याकडे कौतुकमिश्रित आदराने बघत. चित्रपट जेम्स बॉंडचा असेल, तर त्यातील सुंदरी आणि विविध यांत्रिक करामतींची यात भरच पडत असे. दुसऱयाही काही इंग्रजी चित्रपटांची हवा तेव्हा होती, आताही आहे. त्यांच्याही बाबत उत्सुकता तेव्हा होती, आताही आहे. मात्र आपण बोलत आहोत ते काही प्रतिष्ठीत चित्रपटांविषयीच. कारण मी ज्या वातावरणातून आलो आहे, तिथे इंग्रजी चित्रपटांचे नाव निघाले की ऐकणाऱयांचे डोळे एक तर विस्फारतात तरी किंवा आंकुचित तरी होतात.


दुसऱयाही काही इंग्रजी चित्रपटांची हवा तेव्हा होती, आताही आहे. त्यांच्याही बाबत उत्सुकता तेव्हा होती, आता आहे. मात्र आपण बोलत आहोत ते काही प्रतिष्ठीत चित्रपटांविषयीच. कारण मी ज्या वातावरणातून आलो आहे, तिथे इंग्रजी चित्रपटांचे नाव निघाले की ऐकणाऱयांचे डोळे एक तर विस्फारतात तरी किंवा आंकुचित तरी होतात. अठरा वर्षे वय झालेल्या व्यक्तीनेच (म्हणजे पुरुषांनी) असे चित्रपट पाहावेत, त्याच्यावर आपल्या समवयस्क लोकांतच त्याची चर्चा करावी, असं वातावरण लहानपणापासून पाहात असल्यामुळे मोठं होण्याचे वेध फार लवकर लागले. (टॉकिजमध्ये प्रवेश करण्यासाठी वयाची खात्री कशी पटवावी, असा प्रश्न मला अनेक वर्षे पडला होता. शेवटी अठराचं वय पार केलं आणि तो प्रश्न निकालात निघाला.)

मोठं झाल्यावर इंग्लिश चित्रपट पाहायला मिळतील, ही जी कल्पना होती ती मात्र सपशेल धुळीला मिळाली. साधारण तेरा वर्षांपूर्वी स्टीव्हन स्पिलबर्गचा "ज्युरासिक पार्क' हिंदीत आला. हॉलिवूडची भारतीय भाषेमधील ही "एंट्री'! त्या चित्रपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे अन्य हॉलिवूड निर्मात्यांनीही चित्रपट डब करायला सुरवात केली. गेल्या काही वर्षांतील महत्त्वाचे चित्रपट आठवून पाहा...त्या सर्वांच्या हिंदी आवृत्त्या चित्रपटगृहांत आल्याचेही तुम्हाला आठवेल. आतापर्यंत हिंदी, तमिळ व तेलुगु भाषेतच हॉलिवूडचे चित्रपट येत असत. गेल्या वर्षी "स्पायडरमॅन ३'ची भोजपुरी आवृत्ती आल्याने आणखी एक पाऊल पुढे पडले. त्यानंतर "ए नाईट इन म्युझियम' हा चित्रपट "वार्नर ब्रदर्स'ने भारतात हिंदी आणि तमीळ, तेलुगु भाषांमध्येच प्रदर्शित केला. केवळ डीव्हीडीवर तो मूळ इंग्रजीत उपलब्ध आहे. मराठी चित्रपटांची सध्याची चांगली स्थिती पाहता, मराठीतही चित्रपट डब झाल्यास नवल नाही.

आता होतं काय, की इंग्रजी चित्रपट पाहायला हक्काची जागाच राहिली नाही. सध्या मी पुण्यात राहतो. तिथे इंग्रजी चित्रपटांच्या खास जागा म्हणजे अलका आणि विजय टॉकिज. मात्र गेल्या काही काळापासून या दोन्ही चित्रपटांगृहांत इंग्रजी चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. "अलका'मध्ये दोन आठवड्यांपासून हॉलिवूडचे हिंदीतील डब चित्रपट दिसत आहेत; तर "विजय'मध्ये इंग्रजी चित्रपटाच्या हिंदी आवृत्त्यांशिवाय हिंदी, मराठी किंवा अगदी कन्नड चित्रपटही झळकत आहेत. मल्टिप्लेक्‍स हीच इंग्रजी चित्रपटांची हक्काची जागा आहे, असं म्हणावं तर "सिटीप्राईड सातारा रोड'मध्येही सध्या "आय ऍम लिजेंड'चा हिंदी अवतार "मैं जिंदा हूं' चालू आहे. अन्य मल्टिप्लेक्‍समध्येही त्याचे अनुकरण होण्याची शक्‍यता कशी नाकारणार? "मंगला', "फेम जय गणेश' आणि "अपोलो'मध्येही हा चित्रपट हिंदीतच आहे. त्याशिवाय "30 नाईट डेज'चीही हिंदी आवृत्ती एक दोन चित्रपटगृहांत सुरू आहे. शिवाय प्रत्येक इंग्रजी चित्रपट मल्टिप्लेक्समध्ये पाहावा, एवढे काही आपले उत्पन्न अमेरिकेच्या तोडीचे नाही.

पुढील आठवड्यात येणारा "मिनोटॉर' हा चित्रपटही प्रामुख्याने हिंदीतच येत आहे. त्यामुळे काही दिवसांनी इंग्रजी चित्रपट कुठं आहेत, असंच म्हणावं लागेल! खरं सांगायचं तर तमिळ, तेलुगु किंवा अन्य दाक्षिणात्य आणि चीनी भाषेतील चित्रपटांच्या तुलनेत हॉलिवूडच्या डब चित्रपटांची गुणवत्ता चांगली असते. मात्र इंग्रजी चित्रपटाची इंग्रजीची म्हणून जी मजा असते, ती या चित्रपटांत उतरत नाही. 'विजय'मध्ये मी 'ओशन्स ट्वेल्व', 'ब्रिजेट जोन्स डायरी-२' असे एक दोन चित्रपट पाहिले. 'अलका'मध्ये 'द मिथ', 'ब्रोकबॅक माउंटन', 'फ्लाईट ऑफ द फिनिक्स', 'प्राईड अँड प्रिज्युडिस' असे काही चित्रपट पाहिले. आता तिथे हिंदीत चित्रपट पाहणे जीवावर येतं.

डब चित्रपटांचा एक महत्वाचा दोष म्हणजे ते मुख्यत्वे मारधाडीचे चित्रपट असतात. चांगले इंग्रजी चित्रपट भावभावनांना महत्त्व देणारे असतात. त्यामुळे त्या प्रकारचे चित्रपट आवडणाऱयांना डब चित्रपटात काय मजा येणार? तरीही बहुसंख्य लोकांना डब चित्रपट पाहण्यात गंमत वाटत असल्याने चित्रपटगृहांत असेच चित्रपट येणार, हे मी गृहित धरलं आहे. इंग्रजी चित्रपट कुठं आहे, असं विचारण्याची वेळ नक्की येणार, हेही नक्कीच!


Wednesday, December 12, 2007

खराखुरा दलपती

हिंदीतील 'अंधा कानून' या चित्रपटाद्वारे रजनीकांत उत्तर भारतातील प्रेक्षकांना माहित झाला. मात्र त्यापूर्वीच तेलुगु आणि कन्नड प्रेक्षकांचा तो गळ्यातील ताईत झाला होता. तमिळनाडूत तर त्याच्या नावाचे नाणेच तिकिटबारीचालत होते. १९८७ साली एमजी रामचंद्रन यांचे निधन झाले आणि त्यानंतर रजनीकांत राजकारणात येणार अशा अफवा सुरू झाल्या. याचवेळी त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, अध्यात्माच्या ओढीबद्दल, समाजसेवेच्या वृत्तीबद्दल चर्चा होऊ लागल्या.

या सर्वाँचा फायदा चित्रनिर्मात्यांनी घेतला नसता तरच नवल. त्यामुळे रजनीकांतला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट जसे होऊ लागले, तसे रजनीकांतच्या जीवनावरच चित्रपट तयार होऊ लागले. 'अण्बुळ्ळ रजनीकांत' हा असा जगात कुठेही बनला नसेल अशा प्रकारचा चित्रपट. या संपूर्ण चित्रपटात रजनीकांतने रजनीकांतचीच भूमिका केली आहे. त्यात त्याचे घर, आध्यात्मिक गुरु यांचे चांगलेच चित्रण घडते.

त्यानंतर 'अन्नामलै', 'मुथु', 'पडैयप्पा', 'बाशा' व 'बाबा' आणि आता 'शिवाजी'...अशा चित्रपटांमध्ये पडद्यावर एखाद्या पात्राच्या वेशात रजनी असला तरी त्या पात्राचा सूत्रधार रजनीकांत असल्याचेच जाणवते ते त्यामुळे. त्याच्या सर्व चित्रपटांत रजनीकांत मातृप्रेमी असतो, देवभक्त असतो ते यासाठी. त्याच्या गाण्यातही त्याच्या तत्वज्ञानाच्या ओळी असतात. रजनीकांत बोलतो ते संवादही त्याचेच तत्वज्ञान सांगतात. पडद्यावर तो जे बोलतो त्यात वास्तवाचा अंश असतो असे त्याचे चाहते मानतात. नान ओरु तडवै सोन्ना, नुरु तडवै सोन्न मातिरी (मी एकदा जे सांगितले ते शंभरदा सांगितल्यासारखं आहे) किंवा नान एप्पो वरुवेन एप्पडी वरुवेन यारुक्कुम तेरुयादु. आणा वर वेण्डिय नेरत्तिले नान करेक्टा वरुवेन, (मी कधी येणार कसा येणार कोणालाही माहित नाही. मात्र येण्यासाठी योग्य वेळी मी नक्की येईन) अशा त्याच्या वाक्यांना त्याच्या राजकारणप्रवेशाशी जोडून पाहण्यात येते.

यादृष्टीने 'पडैयप्पा' हा चित्रपट रजनीकांतच्या जीवनाचेच पडद्यावरील दर्शन आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटात रजनीकांतच्या समोर खलनायक नाही तर खलनायिका आहे (जयललितांचे रुपक), त्याच्या खऱया जीवनाप्रमाणेच चित्रपटातही दोन मुली दाखविल्या आहेत. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये त्याच्या तोंडचे संवादही वास्तव जीवनाशी निगडीतच दाखविण्यात आले आहेत. मला आठवते १९९९ सालच्या फेब्रुवारीत हा चित्रपट आला होता. त्यावेळी एन वळी तनी वळी या त्याच्या खास 'पंच डायलॉग'ने संपूर्ण तमिळनाडूला वेड लावले होते. या चित्रपटाच्या एका दृश्यात तो खलनायिकेला म्हणतो, पोंबळ पोंबळेया इरुक्कनुम. (बाईने बाईसारखे रहावे.) त्यावेळी अख्ख्या थिएटरमध्ये 'जयललिता...जयललिता'चा आवाज घुमायचा. 'पडैयप्पा'चे दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांनी चित्रपटाच्या यशाचे वर्णन इमालय वेट्री (हिमालयासारखे उत्तुंग यश) असे केले होते.

'बाबा' हा तसा (रजनीकांतच्या मानाने) अपयशी चित्रपट. या चित्रपटात एक दृश्य होते...नायिका (मनीषा कोईराला) हिला सिनेमाची तिकिटे हवी असतात. बाबा (रजनीकांत) तिला तिकिटे काढून देण्याची ऑफर देतो. नायिका यावर अविश्वास दाखविते. त्यानंतर बाबाचा मित्र (गौंडमणी) तिला म्हणतो, "याने मनात आणलं तर सिनेमाचीच काय, खासदारकीचीही तिकिटे मिळतात." या वाक्याला टाळ्यांची दाद मिळाली नसती तरच नवल. 'शिवाजी'मध्येही अशा प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनाची सीमारेषा प्रचंड धूसर आहे. रजनीबाबतच्या या वास्तवाचा वेगळाच अनुभव मणीरत्नमलाही आला. 'दलपती' चित्रपटात रजनीकांत मुख्य नायक. सोबत अरविंद स्वामी आणि मलयाळम अभिनेता ममूट्टी हेही होते. चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार रजनीकांतचा मृत्यू अपेक्षित होता. मात्र तमिळ प्रेक्षकांना हा शेवट कधीही खपला नसता. रजनीकांतचा मृत्यू असलेला चित्रपट अद्याप तमिळमध्ये निर्माण व्हायचा आहे...अन आता तशी शक्यताही नाही. तर मणीरत्नमला अपेक्षेनुसार मोठी विरोध झाला. वितरकांनीही त्याच्या चित्रपटाला (रजनी असूनही) हात लावायला नकार दिला. अखेर क्लायमॅक्स बदलून त्याला तो चित्रपट तमिळनाडूत वितरित करावा लागला. केरळमध्ये मात्र मूळ क्लायमॅक्स असलेली मलयाळम आवृत्ती वितरित करण्यात आली.

रजनीकांतच्या पडद्यावरील भूमिकेचा वास्तव जीवनात काय परिणाम होतो, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. 'बाशा' चित्रपटात रजनीकांत ऑटोचालक दाखविला आहे. त्याच्या ऑटोवर प्रसवूक्काक इलवसम (गरोदर स्त्रियांसाठी मोफत) असे ठळक लिहिलेले दिसते. तमिळनाडूत गेलो असताना तेथील अनेक रिक्षांवर मला अशा प्रकारचीच सूचना लिहिलेली दिसली. प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट असा अनुभव चित्रपट क्षेत्रातील अनेकांना येतो. मात्र प्रत्यक्ष आणि प्रतिमा यांच्यातील फरक क्षीण झालेला रजनीसारखा एखादाच. तो मराठी आहे हा योगायोगाचा भाग आहे. काही झालं तरी आमच्यासारख्या 'मनोरंजन के मारें'चा तो बॉस आहे, हे नक्की!

Tuesday, December 11, 2007

उद्या 'बॉस'चा वाढदिवस...

क्रावू नका. मी 'बॉस' म्हणजे आपल्या रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड याच्याबद्दल बोलतोय. तमिळनाडूचा सुपरस्टार उर्फ तलैवर उर्फ स्टाईल किंग!

रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजीचा. म्हणजे उद्या तो वयाची ५७ वर्षे पूर्ण करून ५८ व्या वर्षात प्रवेश करेल. साधा झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा, नंतर बस कंडक्टर आणि त्यानंतर काही दिवस संघर्ष करणारा अभिनेता ते थेट तमिळ चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट होण्यापर्यंत रजनीकांतचा प्रवास झाला. आजही नम्र आणि प्रसिद्धीपराङमुख वर्तनासाठी प्रसिद्ध असलेला हा 'शिवाजी' साठीच्या दिशेने प्रवास करतोय.

रामजीराव गायकवाड आणि रमाबाई यांच्या पाच अपत्यांपैकी चौथा शिवाजी. त्याचे बालपण हलाखीत गेले. लहाणपणी रामकृष्ण मिशनच्या शाळेत त्याचे शिक्षण झाले. ते संस्कार आजही कायम असल्याचे तो दाखवितो. बंगळूरच्या शहर बस सेवेत कंडक्टर म्हणून हा मुलगा दाखल झाला. याच काळात विविध नाटकांतून भूमिकाही करायचा. त्याच्या जो़डीला विक्षिप्त तरीही भूरळ घालणारे हातवारे करायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला अभिनेता बनण्याचा आग्रह केला. त्यातून कंडक्टरकी सोडून शिवाजीचा प्रवास झाला चेन्नईतील फिल्म इन्स्टिट्यूटकडे. तिथला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सुरु झाला भूमिका मिळविण्यासाठीचा प्रवास.
यावेळी आलेला एक अनुभव त्याने एकदा सांगितला होता...'त्यावेळच्या एका मोठ्या अभिनेत्याकडे शिफारस मागण्यासाठी गेलो होतो. त्या अभिनेत्याने उद्या ये, म्हणून सांगितले. त्यावेळी रहायचे कुठे हा प्रश्न होता...तेव्हा मग चेन्नई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मवर रात्र काढली. दुसऱया दिवशी गेलो, तर पुन्हा दोन दिवसांनी येण्यास सांगितले. पुन्हा मुक्काम प्लॅटफॉर्मवर. अशा रीतीने पाच दिवस काढल्यानंतर मी त्या अभिनेत्याकडे जाणेच बंद केले.'

कन्नड भाषेतील 'कथा संगम' हा रजनीकांतचा पहिला चित्रपट. (त्यावेळी त्याला हे नाव मिळाले नव्हते.) ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ साली 'अपूर्व रागङगळ' या चित्रपटातील काही मिनिटांचे दृश्य हा रजनीकांतचा तमिळ रजतपटावरील पहिला प्रवेश. चित्रपटाची नायिका भैरवी हिच्या कॅन्सरग्रस्त पतीची भूमिका त्याने केली होती. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी शिवाजीरावला ही भूमिका दिली. तमिळमधील गाजलेल्या 'बॅरिस्टर रजनीकांत' या चित्रपटावरून त्यांनी शिवाजीला हे नाव दिले. याच चित्रपटात तमिळ चित्रपटातील त्यावेळी उदयोन्मुख असलेल्या एका कलाकाराची महत्वाची भूमिका होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून पडद्यावर झळकणाऱया या कलाकाराचा तो पंचविसावा चित्रपट होता. काही वर्षांनी रजनीकांतला चित्रपटसृष्टी सोडण्याची इच्छा झाली होती, त्यावेळी याच त्याच्या कलाकार मित्राने त्याला परावृत केले होते. लोकांच्या दृष्टीने रजनीचा प्रतिस्पर्धी असलेला हा मित्र म्हणजे कमल हासन.

मूळात 'अपूर्व रागङगळ' कधी आला आणि कधी गेला, हे चित्रपटगृहांच्या कर्मचाऱयांनाही कळाले नसेल. तो यशस्वी झाला असता तरी रजनीकांतला त्याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र के. बालचंदर यांनी आपल्या सहायकाला जे सांगितलं ते शंभर टक्के खरं ठरलं. "या माणसावर लक्ष ठेव. त्याच्या डोळ्यांत आग आहे. तो एक दिवस खूप मोठा होणार आहे," ते म्हणाले होते. त्यानंतर 'मुण्ड्रु मुडिच्चु', 'गायत्री', '१६ वयतिनिले' अशा अनेक चित्रपटांतून त्याने खलनायकाच्या भूमिका निभावल्या. 'भुवन ओरु केल्विकुरी' या चित्रपटाने रजनीकांतला खऱया अर्थाने नायक केले. त्यानंतर १९७९ साली आलेल्या 'भैरवी' या चित्रपटाने रजनीकांतला सुपरस्टार हे बिरुद चिकटविले.

अमिताभ बच्चन नावाचे वादळ उत्तरेतील चित्रसृष्टीत घोंघावत असताना त्याचा प्रभाव दक्षिणेत पडणे स्वाभाविकच होते. त्यानुसार अमिताभच्या हिट चित्रपटांचे सर्व भाषांत आपापल्या मगदुराप्रमाणे रिमेक होत होते. तमिळमध्येही अमिताभच्या रिमेक झालेल्या अनेक चित्रपटांपैकी १२ चित्रपटांत रजनीकांत हिरो होता. अमिताभ, रजनीकांत आणि अन्य अभिनेते या सर्वांचे बहुतांश चित्रपट मी पाहिले आहेत. त्यावरून अमिताभची बरोबरी रजनीकांत करू शकला, असे म्हणता येत नसले तरी तो कुठे पडल्याचेही म्हणवत नाही. अमिताभच्या 'विजय' चित्रपटांमध्ये अमिताभ खालोखाल जर कोणी त्याची जादू निर्माण केली असेल तर ती रजनीकांतने. ती (दिवार), पडिक्कादवन (खुद्दार), बिल्ला (डॉन), पय्युम पुली (लावारिस), नंदवनत्तील तलैवन (कस्मे वादें) अशा अनेक चित्रपटांची यासाठी काढता येईल.

यांपैकी १९८० साली आलेल्या 'बिल्ला'ने रजनीकांतला अफाट यश मिळवून दिले. हा रजनीकांतच्या कारकीर्दीचा माईलस्टोन मानला जातो. शिवाजी गणेशन आणि एमजी रामचंद्रन यांसारखे जुने अभिनेते काहीसे निवृत्त झाल्याने तरुण रजनीला रान मोकळे होते. एकमात्र कमलहासनचा अपवाद होता. मात्र त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. रजनीच्या स्टाईल आणि टोटल मनोरंजनाच्या फॉर्म्युलाने एक ते दहा पर्यंतची जागा आधीच बुक केली होती. त्यामुळेच ऐंशीच्या दशकात अमिताभच्या रिमेक चित्रपटांत काम करणारा सामान्य रजनीकांत पाच वर्षांच्या आत दक्षिणेतला अमिताभ म्हणून ओळखला जाऊ लागला. याचवेळी बोफोर्समुळे बदनाम झालेल्या अमिताभच्या कारकीर्दीला किंचित ओहोटी लागलेली असली तरी रजनीकांतने कटाक्षाने स्वतःला सर्व वादांपासून बाजूला ठेवले होते. आपला अभिनय, घर आणि अध्यात्म यांतच समाधानी असलेल्या रजनीच्या चित्रपटांनी यशाचे नवे नवे सोपान चढायला सुरवात केली. अन यानंतर सुरू झाला रजनीचा रिल आणि रिअलमधील अंतर संपवणारा सोनेरी अध्याय...

Saturday, December 8, 2007

घेता किती घेऊ दो कराने?

मी श्रीमंत व्हावे, ही नियतीचीच इच्छा दिसत आहे. मी सुखात राहावे, चंगळ करावी, खूप पैसा-अडका मला विनासायास मिळावा, देश-परदेशांत भरपूर भटकंती करायला मिळावी, किरकोळ दुकानदारांपासून मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये मी बेधडक प्रवेश करून खरेदी करावी...आणि त्याची किंचितही झळ माझ्या खिशाला लागू नये, अशी सोयच माझ्या नशीबात झालेली दिसत आहे. आता फक्त मी होय म्हणायची खोटी आहे, की बस्स! नेमकं इथंच घोडं पेंड खातंय...

स्थावर घर नसतानाही जगाच्या संपर्कात राहण्यासाठी सोय करून देणारा इ-मेल आला तेव्हा मला काय आनंद झाला होता. मात्र त्याच इ-मेलमुळे मला जगाच्या कानाकोपऱयातून संपत्तीचा वर्षाव होईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. मात्र मी मुळातच नशीबाचा सिंकदर, त्यामुळे नायजेरिया, इथियोपिया, इरिटेरिया अशा नाना नावाच्या आणि आकारांच्या देशांतून मला पैसा मिळवून देण्याच्या ऑफर्स येत आहेत. या ऑफर्स एवढ्या अनपेक्षित, अनोख्या आणि अनोळखी देशांतीली आहेत, की मला अनेकदा त्या देशांची जागा बघण्यासाठी जगाच्या नकाशाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागले आहे. या ऑफर्समुळे माझ्या एक लक्षात आलंय हं, की नायजेरियातल्या प्रत्येक दोन माणसांमागे एकाचा शंकास्पद परिस्थितीत मृत्यू झालेला असतो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर अफाट संपत्ती ठेवलेली असते. (अन ते राष्ट्रसंघाच्या अहवालांतील दुष्काळाची छायाचित्रे, मला तर आता त्यांचीच शंका येत आहे.) मात्र माझ्या सज्जन स्वभावाची, सच्चरित्राची आणि वरती असलेल्या कनेक्शनची ख्याती अख्ख्या जगात असल्याने त्या व्यक्तीचे वारसदार मला मेलद्वारे कळवतात. त्यांची संपत्ती मिळवून देण्याच्या बदल्यात ते मलाही प्रचंड मोठी रक्कम द्यायला तयार असताता म्हाराजा...!

अशा किती ऑफर आल्या आणि म्या करंट्याने त्या तेवढ्या ऑफरचा अव्हेर केला की हो! नायजेरिच्या ७० टक्के, इरिटेरियाच्या ४० टक्के आणि बुर्किना फासोच्या २० टक्के लोकांनी मला अशा प्रकारे मदत देऊ केली आहे. पण माझा स्वभाव पडला भिडस्त आणि दळभद्री. त्यामुळे मी त्यांचा लाभच घेतलेला नाही. तसा घेतला असता तर आतापर्यंत मी किती श्रीमंत झालो असतो, कल्पना करता का. आतापर्यंतच्या ऑफरपैकी अर्ध्या ऑफऱ जरी मी स्वीकारल्या असत्या तरी अमेरिकेचे तीन अध्यक्ष, दोन बिल गेटस आणि एक किंवा दीड अझीम प्रेमजी मी विकत घेऊ शकलो असतो. (लालूप्रसाद यादव किंवा अन्य राजकारणी घेणे मला शक्य नाही, तेवढ्या ऑफर अजूनही मला आल्या नाहीत. याची खरोखर खंत वाटते.)

हे कमी होतं म्हणून की काय, अलिकडे मी न काढलेल्या लॉटरी तिकिटांनाही प्रंचड मोठ्या रकमेची बक्षीसे लागत आहेत. इग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांतील लॉटरी कंपन्या केवळ माझ्या सुखासाठी त्यांची बक्षिसे मला देऊ करत आहेत. माझा इ-मेल ऍड्रेस साक्षात कुबेरानेच तयार केला असल्यामुळे त्या ऍड्रेसवर जगाच्या कानाकोपऱ्यातून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अगदी गेल्या आठवड्यात मला याहू-एमएसएन या कंपन्यांच्या नावे असलेल्या लॉटरीचे बक्षिस देऊ करण्यात आले. त्यातील रक्कम पाहूनच मला विचार आला, की अंबानी-टाटा वगैरे मंडळी कशासाठी एवढ्या कंपन्या काढतात आणि मेहनत घेतात. त्यांनी इ-मेल अकांउंट काढला तर घरबसल्या त्यांना सध्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा मिळेल. मी मात्र खरोखर या ऑफरचा लाभ घेऊ शकलो नाही. माझी मध्यमवर्गीय मानसिकता माझ्या मला तसं करूच देत नाही, काय करू?

या ऑफरचा लाभ घेतला नाही म्हणून काय झाले. इकडे भारतातल्या कंपन्याही माझ्या सुखासाठी काही कमी धडपड करत नाहीत. काहींनी क्रेडिट कार्ड काढले आहेत, काहींनी तरुणांसाठीच्या विमा योजना काढल्या आहेत, काहींनी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना काढल्या आहेत. नुसत्या काढल्या आहेत, असे नव्हे. या योजनांचा मी पुरेपूर वापर करावा, याचाही ते प्रेमळ आग्रह करतात. बरं, त्यांचं अगत्य एवढं की मी योजनांचा लाभ करून न घेता माझ्या गरिबीच्या दिवसांत राहिलो तरी त्या योजनांची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मला कळविल्याशिवाय त्यांना सुखाचा घास जात नाही. एका क्रेडिट कार्डच्या कंपनीने त्यांच्या कार्डचा आकार १० सेंमीवरून आठ सेमी केला, हे त्यांनी मला नऊ वेळा मेल करून कळविले. माणूस अर्धमेला होणे म्हणजे काय हे मला तेव्हा कळाले. एका विमा कंपनीच्या दरात बदल नाही, मुदतीत बदल नाही का प्रिमियममध्ये बदल नाही. तरीही ती कंपनी मला सारखी ती माझ्या पाठीशी उभी असल्याची जाणीव करून देते. कारण काय, तर त्या कंपनीच्या जाहिरातीतील मॉडेल अलिकडे बदलली आहे. पूर्वीची मध्यमवयीन ललनेच्या जागी आता एक षोडशवर्षीय नवोढा आली आहे. आता सांगा, याहून अधिक काळजी कोण घेणार?

माझ्या सौख्यासाठी नेट लावून प्रयत्न केवळ मेलद्वारे होतायत असे नव्हे. प्रत्यक्ष जगातही त्यासाठी अनेकजण दिवसरात्र एक करत आहेत. मोबाईल नामक यंत्राद्वारे त्याची अनेक प्रात्यक्षिके अधून-मधून (म्हणजेच सातत्याने) चालू असतात. एका कंपनीने गुंतवणुकीची खूप छान योजना आणली होती. त्यामुळे मला महिन्याच्या महिन्याला मोठी रक्कम मिळणार होती. ही सर्व माहिती सांगणारी मुलगी अशा सुरांत सांगत होती, की अगदी त्या कंपनीचाच मालक असतो तरी त्या आवाजाल भूलून मी गुंतवणूक केली असता. पण हाय रे दैवा! मी त्या कंपनीचाच काय, मी काम करत असलेल्या कंपनीचाही मालक नाही. त्यामुळे तिची सगळी योजना सांगून झाल्यावर मी तिला एका शब्दांतच सांगितलं, “तुम्ही सांगताय ते खरं आहे. मला तुमची योजना आवडली. पण त्यात गुंतवणूक करण्यासाठी माझा सध्याचा पगार वाढवायला पाहिजे. तुम्ही जरा आमच्या कंपनीत फोन करून सांगता का, त्याबद्दल?”

यानंतर त्या मुलीने संवाद आटोपता घेतला व पुन्हा कॉल केलाही नाही. पण मला विश्वास आहे, की मला परवडेल आणि फायदा होईल, अशी एखादी योजना तयार करायला तिने तिच्या कंपनीला सांगितलेच असेल. पण असे प्रयत्न करणारी ती एकटीच थोडी आहे. विविध क्रेडिट कार्ड, बँका त्यांच्या मोठमोठ्या आणि प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये माझे नाव जोडण्यासाठी उतावीळ झाल्या आहेत. त्यामुळे माझ्या मोबाईलवर मित्र आणि नातेवाईकांच्या कॉलपेक्षा या कंपन्यांच्या कॉलचीच संख्या जास्त झाली आहे.

या सगळ्यांना नाराज करायला माझ्या जीवावर येतं. पण करणार काय. आपल्याला पडली कष्टाची भाकर खाण्याची सवय. त्यामुळे या सुख-समृद्धीच्या योजना डोळे दिपवून टाकत असल्यातरी नजरेत भजत नाहीत. त्यामुळे मी अजूनही करंट्यासारखा या योजना केवळ वाचून सोडून देतो. या सर्वांचा त्यामुळे हिरमोड होत असेल, याची मला जाणीव आहे. पण शेवटी आपल्या घेण्यालाही मर्यादा आहेतच ना. घेता किती घेशील दो कराने, हे आपल्याला लक्षात घ्यावंच लागतं.

Thursday, December 6, 2007

क्रेमलिनचा विजेता

शियाच्या जनतेने संसदेच्या निवडणुकीत "युनायटेड रशिया' या पक्षाला मोठ्या बहुमताने विजयी केले आहे. मतदारांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शविला आहे. साहजिकच पुतिन यांनीही या आनंदाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका महान देशाच्या नेतृत्वपदी पुन्हा एक कणखर नेता पाहण्यास यानिमित्ताने मिळणार आहे.

पुतिन यांच्या विजयाबद्दल माध्यमांनी, विशेषतः पाश्‍चिमात्य माध्यमांनी नाराजीचा सूर काढला असून, रशियातील निवडणुकांच्या निष्पक्षपातीपणावरच संशय व्यक्त केला आहे. ही खास पाश्‍चिमात्यांची स्टाईल! त्यांना नेतेही पश्‍चिमेच्या रंगातील हवे असतात आणि लोकशाहीही पश्‍चिमेच्या ढंगाची हवी असती. मात्र खमकेदारपणे रशियाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या पुतिन यांनी पाश्‍चात्यांच्या या कोल्हेकुईकडे लक्ष न देण्याचे धोरण बाळगले आहे. त्यांच्या परिस्थितीत ते योग्यही आहे. खंडप्राय देशाच्या, तेही अण्वस्त्रधारी देशाच्या प्रमुखावर त्याच्या जनतेचा विश्‍वास असेल, तर त्याने इतरांकडून आपली भलामण होण्याची अपेक्षा का बाळगावी?

रशियातील निवडणूक "वेस्टमिन्स्टर' पद्धतीने झाली नाही, ही गोष्ट खरी आहे. ही पद्धतच जगात लोकशाहीचा एकमेव मार्ग आहे, असे ज्यांना वाटते त्यांची गोष्ट वेगळी. काही ठिकाणी लोकांना टोकाचा आग्रह करण्यात आला तर काही ठिकाणी त्यांना सामूहिकरीत्या मतदान करण्यास (पण विशिष्ट पक्षाला नव्हे!) भाग पाडण्यात आले, असे "बीबीसी' आणि "रॉयटर्स'च्या काही बातम्यांमधून दिसते. मात्र त्याच बीबीसीने "जोरदार टीकाही पुतिन यांची लाट झाकू शकत नाही,' अशीही "स्टोरी' दिलीच आहे.

व्लादिमीर पुतिन हे नाव घेताच डोळ्यांपुढे येतात धीर, गंभीर चेहऱ्याचे आणि मीतभाषी पुतिन. "केजीबी'शी संबंधित भूतकाळामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच शंकेच्या सुरांत बोलल्या गेलं (आपल्याकडेही!). मात्र गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये रशियाच्या कोणत्याही नेत्याने (किंवा जगातील कोणत्याही नेत्याने असंही म्हणता येईल) न केलेली गोष्ट पुतिन यांनी केली. ती म्हणजे अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या रशियाला स्वतःच्या पायांवर उभं केलं. "पुतिन ः रशिया'ज चॉईस' या पुस्तकात रिचर्ड साकवा यांनी पुतिन यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. या पुस्तकात लेखक अलेक्‍झांडर झिनाविएव यांचे मत उद्‌धृत केले आहे. झिनोविएव यांच्या मते, ""पुतिन यांचे अधिकारपदी येणे ही रशियाच्या अमेरिकाकरणाला पहिला गंभीर विरोध होण्याचे निदर्शक होते.'' पुतिन यांच्या अंगचे गुण माहित असते तर त्यांना अमेरिका किंवा पुतिन यांच्या पुर्वसुरींनी सत्तेवर येऊ दिले असते असेही निरीक्षण झिनोविएव यांनी नोंदविले आहे.

पुतिन यांनी मात्र अमेरिकाविरोध हा आपला "ब्रांड' म्हणून विकसित केला नाही. आर्थिक सुधारणांबाबत काहीसे समजूतदारपणाचे धोरण बाळगतानाच आणि त्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी करतानाच आपल्या राष्ट्राचे (देशाचे नव्हे!) स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासही त्यांनी कमी केले नाही. मॉस्को येथील थिएटरमधील ओलीस नाट्य असो (शंभर बळी) किंवा बेस्लान येथील ओलीस नाट्य असो (21 शाळकरी मुलांचे बळी), आपल्या धोरणापासून एक इंचही मागे न सरणारा नेता रशियन जनतेने त्यावेळी पाहिला. 2001-2002 मध्ये अमेरिकेने रशियातून आयात होणारा गहू निकृष्ट असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली. त्यावेळी पुतिन यांनी लगोलग अमेरिकेतून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घालून "हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. पुतिन यांच्या कारकीर्दीकडे पाहिले असता ते नेहमीच विजेता ठरल्याचे दिसून येते. जुन्या सोव्हिएत संघातून नवा रशिया उभा करण्याची लढाई ते जिंकले, रशियन लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्यांना यश आले, आता निवडणुकांमध्ये स्वतःच्या पक्षाला विजय मिळवून देऊन त्यांनी नवा विजय मिळविला आहे. खऱ्या अर्थाने ते क्रेमलिनचे विजेते ठरले आहेत.
------


Tuesday, December 4, 2007

मृत्यूदूत मांजर...एक सत्यकथा

मांजर हा प्राणी आपल्याकडे काहीसा भीतीदायक मानला जातो. मार्जारवर्गातील वाघ, सिंह बिबट्या अशा प्राण्यांचं सोडा, अगदी घरातील मांजरीकडेसुद्धा संशयाने पाहिलं जातं. त्यात आत्मा, भूत अशा रहस्यात्मक गोष्टींशी त्याची सांगड घातल्या गेल्याने तर समस्त मार्जारवर्गच गूढतेत गुरफटला गेला आहे. अनेक तथाकथित रहस्यपटांमध्ये मांजरीचे दर्शन (तेही काळ्या) ‘बाय डिफॉल्ट’ आवश्यक मानल्या गेल्याने तर त्यात भरच पडली आहे. मात्र एखाद्या रुग्णालयातील मांजर आजारी रुग्णांजवळ जाऊन त्यांच्या मृत्यूचे भाकित करत असल्याचे सांगितल्यास कसे वाटेल. ही प्रत्यक्षात घडलेली कथा आहे आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशात सध्या घडत आहे. नुकतीच ही कथा मी रेडियो नेदरलँडसच्या साईटवर वाचली.

ही मांजर आहे अमेरिकेतील. ऱहोड आयलंड येथील प्रोव्हिडंस या शहरात स्टीर हाऊस नर्सिंग अँड रिहॅबिटेशन सेटर आहे. या रुग्णालयाने ऑस्कर या नावाच्या एका बेवारस मांजराला आश्रय दिला. या मांजराने मरणपंथाला लागलेल्या अनेक रुग्णांची भविष्यवाणी केली. इतकी की या मांजराच्या वर्तवणुकीवरून आता कोणाचा ‘नंबर’ लागणार आहे, हे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांना कळून येते.

ऑस्कर काय करतं, तर त्याला एखाद्याच्या मरणाचा वास आला, की त्या रुग्णाच्या खोलीबाहेर ते वाट पाहत थांबतं. यासाठी काही वेळेला अगदी घंटोगणती प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी असते. एखाद्या नर्ससोबत ते खोलीत जातं आणि थेट रुग्णाच्या अंथरुणात उडी मारून बसतं. तिथं काही वेळ हुंगल्यासारखं करतं आणि तिथेच झोपीही जातं. यानंतर चार तासांच्या आत त्या रुग्णाची जीवनयात्रा संपलेली असते. बरं, हा पेशंट मरत असताना ऑस्करला तिथेच थांबायचं असतं. कोणी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केल्यास ते निषेधाचा आवाज काढते.

अशा रितीने ऑस्करने आतापर्यंत पंचवीस रुग्णांना वरची वाट दाखविली आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांच्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. एखाद्या रुग्णाजवळ ते गेलं की नर्सेस त्या रुग्णाच्या कुटुंबियांना बोलावतात. खास बाब म्हणजे, ऑस्करच्या या जगावेगळ्या गुणाचे रुग्णाच्या कुटंबीयांना मात्र कौतुकच वाटते. ऑस्करच्या कौतुकादाखल रुग्णालयात एक फलकही उभारण्यात आला आहे.

इथपर्यंतचं सारं ठीक होतं. मात्र यातही गमतीचा भाग असा, की न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या प्रतिष्ठेच्या नियतकालिकातही ऑस्करवर एक लेख प्रकाशित झाला. डॉ. डेविहड एम. डोसा यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात ऑस्करचे विचित्र गुण आणि वर्तणूक यांची माहिती देतानाच, त्याचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला आहे. डॉ. डोसा यांच्या मते, मृत्यूप्राय व्यक्तींच्या शरीरातून काही विशिष्ट रसायने निघत असावीत आणि ऑस्करला त्यांचा गंध लागत असावा. ते काही असले, तरी या लेखावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र नियतकालिकाच्या मते, डॉ. डोसा यांच्या लेखाला काही आधार देता येत नसला तरी त्याला नाकारते येणेही शक्य नाही.

या वादात मात्र ऑस्करचे काम अजून चालूच आहे. आता तो आणखी किती जणांना परलोकाचा रस्ता दाखवितो, ते त्यालाच माहित!.
--------


हेच ते मृत्यूची चाहूल लागणारे जगावेगळे मांजर

Wednesday, November 28, 2007

टीव्हीशप्पथ हसणार नाही.....

हॅलो...कोण? अच्छा तू होय? का रे कशाला फोन केला? नाही रे, नाही पाहिला तो प्रोग्राम- तुला माहितेय मी असले प्रोग्राम पाहत नाही. अरे, असतं काय त्या कार्यक्रमांमध्ये मला सांग ना? 'आनंदी आनंद गडे' असं हे जग असल्याचं आपल्या काही कवितांमध्ये म्हटलं आहे ना मग आता कोणाला आनंद कमी पडला म्हणून हे असले माकडचाळे रे?

...ए ए मला काय हसण्याची ऍलर्जी नाही हां. मलाही जोक कळतात. ....हो हसताही येतं. पण कोणीतरी उगीच डोळ्यापुढे उभं राहतं आणि काहीतरी अंगविक्षेप करून तुम्हाला हसायला भाग पाडतं, यात कसला विनोद? ....तू पाहतोस ना असले कार्यक्रम. मग तुलाच लखलाभ असोत रे ते.

...माझा आक्षेप? अरे, हे कार्यक्रम हसण्यासारखे असण्याऐवजी हास्यास्पद असतात, हाच माझा ऑब्जेक्शन आहे. नाही, विनोदाच्या नावाखाली असे आचरट उद्योग पूर्वीही होत असत. असरानी, जगदीप अशा लोकांची कारकीर्द त्यातच उभी राहिली माहितेय मला. पण दक्षिण भारतातून रिमेक केलेल्या चित्रपटांमध्ये कादरखान-शक्ती कपूर या जोडगोळीने काही काळ अशा प्रकारचा उच्छादच मांडला होता, हे तुला माहित नसावं कदाचित. हिंदी कशाला, आपल्या मराठीतही लक्ष्या-अशोक सराफ जोडीचे अनेक सिनेमे असेच नाहीत का? आता सुद्धा...

...थांब थांब... त्या उच्छादात आणि आताच्या टोळधाडीत एक फरक माहितेय का तुला? तो प्रकार थिएटरपुरता होता. आता हा टीव्हीतून घरात आलाय...अन हिंदी चॅनेल्सनी जे केलं ते मराठीतही झालंच पाहिजे, हा सॅटेलाईटचा नियम यांना पाळायलाच पाहिजे ना...त्यामुळे कोणी ‘हास्यसम्राट’ घ्या कोणी ‘हास्य़ दरबार’ घ्या चालू आहे ना बाबा. आता तुझ्यासारखे काही प्रेक्षक मिळाले की त्यांचे कार्य तडीस गेलेच म्हणून समज...मला कालच माझ्या ओळखीच्या एकाने विचारलं, “ तुम्ही पाहता का असले हसायचे कार्यक्रम?” मी सांगितलं, “ मी एकदा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुरवातीपासून शेवटपर्यंत हसत होतो. आता कधीतरी त्यात काय असते तेही पाहायचे आहे.”

....एक मिनिट, एक मिनिट...मला एक सांग, तू पु. ल. आचार्य अत्रे वगैरंची पुस्तके वाचली आहेस ना? मग तरीही तुला ही असली थेरं चालतात. नाही म्हणजे आपल्याकडे शिमगा वगैरेला असं काहीबाही चालत असतं...पण त्याचा असा बारमाही रतीब नाही घालत कोणी. अन हसण्यासाठी कोण कोण काय करतं, ते पाह्यलं का? म्हणजे ते पाहून हसू येण्याऐवजी किवच येते की रे. कोणी रेड्यासारखं रेकतं काय, कोणी बेंबीच्या देठापासून ओरडतो काय? एका कार्यक्रमात बालनाट्यातील राजा-प्रधानांसारखी वेशभूषा केलेले परीक्षक आहेत.

काहीच कळेनासं होतं. त्या हिंदीत तर भाड्याने आणल्यासारख्या मॉडेलच आणतात ना. हसण्यासाठी. म्हणजे विनोद फालतू असला तरी यांच्याकडे पाहून हसू यावं! काय रे ही खऱया विनोदाची ट्रजेडी?

तुला एक सांगू. सगळ्या प्राण्यांमध्ये हसू शकणारा प्राणी एकच माणूस. त्यातही कशाला हसावं आणि कशाला नाही, हे ज्याला समजतं तो शहाणा माणूस. तुला माहितेय का, अमेरिकेत एक विनोद आहे. कम्प्युटर कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाही, कारण साहेबांच्या विनोदावर हसण्याची कला त्याला येत नाही. तर कळालं ना...हसण्यासाठी आणखी जागा आहेत ना...साहेबांचे विनोद आहेत, चोवीस तास बाता मारणारे बातम्यांचे चॅनेल्स आहेत, गेला बाजार टीव्ही नको असेल तर एखाद्या वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार वाच...

...नको ना? ठीक आहे. तू नकोच वाचू. मी वाचेन आणि हसेनही. पण टीव्हीशप्पथ, ते कार्यक्रम पाहून हसणार नाही!

Wednesday, November 21, 2007

सिनेमातील "खेल खेल में'

चित्रपट आणि क्रिकेट दोन्ही आपल्याकडे लोकप्रिय आहेत. तरीही चंदेरी पडद्यावर त्याचे अभावानेच दर्शन घडते. अन्य खेळांची गोष्टच सोडा. आता गेल्या महिन्यात "चक दे इंडिया'ने हॉकीला केंद्रस्थानी ठेवून एक आकर्षक कथा सादर केली. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तर चित्रपटात खेळ आणि खेळाडूंची अनुपस्थिती आणखी तीव्रतेने जाणवू लागली आहे. त्याचवेळेस खेळांवरील अन्य चित्रपट येत असल्यामुळे भारतात खास क्रीडापटांचा उदय होत आहे, हेही जाणवत आहे.

बॉलिवूडने खेळांना कधी पडद्यावर जागाच दिली नाही, असं नाही. "ऑल राउंडर', "बॉक्‍सर', "जो जीता वही सिकंदर' अशा चित्रपटांमधून खेळांचे दर्शन प्रेक्षकांना झाले. मात्र, ते केवळ तोंडी लावण्यापुरते. मुख्य भर बॉलिवूडच्या परंपरेप्रमाणे नाच गाणे, मेलोड्रामा आणि नायकाचे उदात्तीकरण याच चक्रावर होता. त्यामुळे चित्रपट खेळांशी संबंधित असूनही क्रीडा क्षेत्राला ते कधीही आपले वाटले नाहीत. प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांचे कधी खुल्या मनाने स्वागत केल्याचा इतिहास नाही. त्यामुळेच की काय, या वाटेने जाणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांची संख्या अगदीच अत्यल्प म्हणावी अशी आहे. आपल्याकडे चित्रपटांचे खेळ होतात पण खेळांचे चित्रपट होत नाही, असं का?

खेळांशी संबंधित चित्रपटांचा आढावा घेतल्यास काय दिसते? अगदी तीस वर्षांपूर्वी आलेल्या "सावली प्रेमाची' हा चित्रपट घ्या. त्यात विक्रमवीर सुनील गावसकर नायक होता, हीच या चित्रपटाची ओळख. क्रिकेट खेळाडू संदीप पाटील याला हिरो म्हणून झळकावणाऱ्या "कभी अजनबी थे' या चित्रपटाची कथाही काही वेगळी नाही. त्यापेक्षा कुमार गौरव, विनोद मेहरा आणि रती अग्निहोत्री यांची भूमिका असलेल्या "ऑल राउंडर' या चित्रपटात क्रिकेटचे अधिक जवळून दर्शन झाले.

भारतात आर्थिक उदारीकरणानंतर आणि उपग्रह वाहिन्यांचे प्रमाण वाढल्यानंतर येथील प्रेक्षकांना सगळ्या प्रकारचे चित्रपट आणि मालिका पाहावयास मिळू लागल्या. त्यामुळे आपले हिंदी चित्रपटही बदलले. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे क्रीडापट अधिक तयार होऊ लागले. "लगान,' "इक्‍बाल', "चक दे इंडिया' आणि आता येऊ घातलेला "धन धना धन गोल' असे महत्त्वाचे क्रीडापट गेल्या पाच वर्षांतच आले आहेत, हे लक्षात घ्या. "स्टम्प्ड' सारखे केवळ क्रिकेटच्या क्रेझचा फायदा घेण्यासाठी आलेले चित्रपट वेगळेच! या ट्रेंडची सुरवात झाली सहा वर्षांपूर्वी आलेल्या "बेंड इट लाइक बेकहम' या चित्रपटाने. खरं तर हा चित्रपट इंग्रजी होता; मात्र त्यातील कथा भारतीय कुटुंबाची आणि फुटबॉलवेड्या युवतीची होती. त्यामुळे त्या चित्रपटाला मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर अनेकांनी क्रीडा विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस दाखविले आहे.

----------

(सकाळमध्ये १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखाची ही संक्षिप्त आवृत्ती)

Monday, November 19, 2007

फटाक्‍यांचे बार आणि स्मृतींच्या पणत्या

स्मृतींचे हे भांडार दिवाळीच्या अन्य बाबींमध्ये जेवढे समृद्ध आहे, त्याहून जास्त समृद्ध ते फटाक्‍यांच्या बाबतीत आहे. अगदीच खरं सांगायचं म्हणजे फटाक्‍यांच्या बाबतीत माझ्या आठवणी खूप स्फोटक आहेत.न उडालेल्या बॉम्बमधील दारू वेगळी काढून घेऊन, ती पुन्हा पेटवावी तशी या आठवणी मी अनेकवेळेस अनेकांना पुन्हा पुन्हा सांगितल्या आहेत. तरीही त्यातली गंमत अजून जशास तशी आहे. या आठवणींबाबत काय सांगू? फटाक्‍यांच्या आतषबाजीची सुरवात दसऱ्याच्या दोन-चार दिवसांनंतर सुरू व्हायची. गल्लीत येता जाता बॉम्ब, टिकल्या आणि नागाच्या गोळ्या विकायला बसलेले छोटे छोटे स्टॉल दिसू लागले, की ठिणगी पडायची. त्यानंतर फटाक्‍यांसाठी वडिलांकडे हट्ट करावा लागे. तोही कितीसा? तर आठ आणे किंवा चार आण्याचा! अन्‌ तरीही वडिलांनी कधीही चर्चेच्या पहिल्या फेरीत मागणीला दाद दिल्याचे आठवत नाही. निवेदने, मोर्चे अशा शांततावादी मार्गांनी पदरात काहीही पडणार नाही, याची खात्री पटल्यानंतर एखाद्या वेळी निषेधाचा मार्ग अवलंबावा लागे. त्यानंतर मात्र वडील कानाखाली असा काही जाळ काढत, की ज्याचं नाव ते! त्यानंतर मग यथावकाश खरेदीचा पूर्वनियोजित कार्यक्रम पार पडे आणि घरात दारूगोळा येऊन पडे.

त्यानंतर प्राधान्य असायचं ते फटाक्‍यांच्या वाटपाचं. कारण पुढच्या सगळ्या गमतीचा आधार तोच असायचा. आपलाच दारूगोळा आपणच उडवून दिवाळी साजरी केली, तर त्या दिवाळीत काहीही अर्थ नाही असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यामुळे स्वतःच्या वाट्याचे फटाके मागे ठेवून इतरांचे फटाके आधी उडविण्याची लज्जत मी खूपदा अनुभवली. मराठी व्यक्ती असल्याने बहीण-भावंडांवरच या गनिमी काव्याचा वापर करण्याचीही दक्षता मी अनेकदा घेतली. मात्र गल्लीतील अनेक मुले आणि शाळेतील मित्र यांनाही या प्रकारच्या लढाईचा मी अनेकदा प्रसाद दिला. अगदी बंदुकीच्या टिकल्यांपासून सुतळी बॉम्बपर्यंत अनेक प्रकारचे स्फोटके मी अशीच कमावली. त्यानंतर इतरांची रसद संपल्यावर आपल्या भात्यातले अस्त्र काढायचे आणि त्यांना वाकुल्या दाखवत ते उडवायचे...हा हा काय ते रम्य बालपण! आता तर काय, दिवसरात्र मी चॅनेलवर कुठेतरी गोळीबार, बॉंबस्फोट आणि हाणामाऱ्या पाहायचो...पण बालपणीच्या त्या स्वकर्तृत्वाच्या आतषबाजीची मजाच काही और!
दिवाळी म्हटलं, की नवे-नवे कपडे, काही चीजवस्तूंची खरेदी अशा अनेक गोष्टी असायच्या. माझ्या बालपणी तर दिवाळीची खरेदी म्हणजे एक जंगी कार्यक्रमच असे. "तुला नवे कपडे घ्यायचेत,' असं सांगून आई-वडील मला बाहेर घेऊन जायचे. त्यानंतर दुकानात गेल्यावर वडिलांचे कपडे घेऊन झाल्यावर माझ्या कपड्यांचा विषय अजेंड्यावर यायचा. आता जनरेशन गॅप म्हणा, का आणखी काही, पण आई-वडिलांची पसंती आणि माझी पसंती यात गुढी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्याएवढे अंतर पडे. या प्रामाणिक मतभेदांच्या फुलबाज्या मग कपड्यांच्या दुकानातच पडू लागत आणि वडिलांच्या रागाचा सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर ते अग्निदिव्य पार पडे. अशारीतीने कोणाच्यातरी पसंतीने माझ्या कपड्यांची खरेदी होई, त्यावर भावंडे आणि शाळासोबती कॉमेंट्‌स करून मनोरंजन करून घेत आणि दिवाळी साजरी झाल्याचं समाधान मी करून घेई.
असो. गेले ते दिन गेले. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है...असं गाणं गात सध्या फिरत आहे. तूर्तास सांगायचं म्हणजे, माझी यंदाची दिवाळी खूप छान गेली आहे. या दिवाळीच्याही काही आठवणी तयार झाल्या आहेत. पण त्या आता म्हातारपणीच प्रकाशित कराव्या लागणार...त्याशिवाय "तरुणपणीच्या दिवाळीची म्हातारपणात मजा नाही,' अशा वाक्‍याला धार येणार नाही!

Wednesday, November 14, 2007

दिवाळी, केवळ आठवणींचीच...

दिवाळी म्हटली, की मला आठवणी सुचू लागतात. दरवर्षी दिवाळी आली, की आपल्या बालपणीची दिवाळी किती चांगली होती आणि त्या तुलनेत आजची दिवाळी किती फिकी आहे, याची जाणीव मला होऊ लागते. मराठी जगताच्या परंपरेनुसार भूतकाळातील दिवाळीचे वर्णन करण्यासाठीही मोठी संधी मिळालेली असते. खासगी गप्पा, सार्वजनिक गप्पा, वर्तमानपत्रे, वाहिन्या, गेला बाजार "पवनाकाठचा मावळा' किंवा "सा. गायब बहाद्दर' यांसारख्या दिवाळी अंकसुद्धा सध्याच्या दिवाळीपेक्षा बालपणीच्या दिवाळीत आपण काय दिवे लावले, याचीच जास्त खबरबात घेतात. मीही त्यामुळे दरवर्षी नवरात्र संपली की लेखणी सरसावून बसतो. (म्हणजे आताशा किबोर्ड सरसावून बसतो. जुन्या काळची पेन हातात घेण्याची मजा आता राहिली नाही!) लहानपणीच्या दोन-चार आठवणींचा खजिना कोऱ्या पानावर रिता करून, एखाद्या ठिकाणी तो छापून यावा यासारखी मजा शंभर सुतळी बॉंबमध्येही नाही. त्यामुळे दीपावली हा साजरा करायचा सण नसून तो आठवणी काढायचा सण आहे, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे.

यंदाच्या वर्षीही मी माझ्या आठवणींची पोतडी रिकामी करण्यासाठी सज्ज बसलो होतो. पण काय करणार, यंदा कोणीही मला पांढऱ्यावरती काळे करायला आमंत्रण दिले नाही. कोण्या पाहुण्याकडेही जायचा चान्स मिळाला नाही. त्यामुळे माझा अगदी कोंडमारा झाला आहे. पोट फाटेस्तोवर खाल्लेला दिवाळीचा फराळही आता पूर्ण पचत आला आहे, मात्र माझ्या आठवणींचं हे संचित काही जीरता जीरत नाही. त्यामुळे कुठेतरी पोट मोकळं करावंसं वाटतंय! त्यासाठीच हा लेखप्रपंच.

दिवाळी म्हटली, की आनंद, मांगल्य, सुख-समृद्धीच्या शुभेच्छा वगैरे वगैरे...शालेय अभ्यासक्रमात निबंध लिहिण्यासाठी पाठ केलेल्या या ओळी कोणत्याही वेळेस वापरायच्याच असतात ना? पण मला मात्र आता खरं खरं सांगायचंय...त्यामुळे मी खऱ्या आठवणी सांगतो. अन्‌ नीट सांगायचं तर मला लहानपणीच्या कोणत्याही दिवाळीच्या वेळेसचं काहीच आठवत नाही. शेजारच्या पिंटूचे फटाके चोरून तेच दिवाळीत उडविले, आजोळी गेलो असताना लाडू चोरून खाल्ले आणि ती चोरी पकडली गेल्यावर धम्मकलाडूही खाल्ले...अशा काही रंजक घटना सोडल्या तर दिवाळी म्हणजे एकदम संस्मरणीय असं काही आठवतच नाही हो!

एक तर दिवाळी म्हटली की लहानपणी मला हुडहुडी भरायची. कारण दिवाळीच्या चारही दिवसात सकाळी लवकर उठावं लागायचं. (ही शिक्षा अजूनही कमी झालेली नाही!) माझ्या सूर्यवंशी प्राण्याला रामप्रहरी उठायची गरजच काय, हा मूलभूत प्रश्‍न तेव्हा पडायचा. दिवाळीच्या सगळ्या फराळावर अन्‌ फटाक्‍यांवर ताण करणारा हा त्रासदायक प्रकार असायचा. बाहेर झुंजुमुजु व्हायच्या आत घरात झुंज सुरू व्हायची. आईच्या पहिल्या हाकेने युद्धाचा बिगुल फुंकला जायचा. दोन हाकांनंतर चादर अंगावरून काढल्यानंतर लढाई हातघाईवर यायची. या प्रयत्नात दोनदा लाथा झाडून मी अंगावर पुन्हा चादर घ्यायचो. ""मेल्या, दिवाळीच्या काळात तरी लवकर उठत जी नं. एरवी तर पडलेला असतोच दुपारपर्यंत अंथरुणात,'' अशी रणगर्जना कानावर आली, की मी पांढरे निशाण फडकावत असे. दिवाळीची सुरवात 'रागा-रागां'नी करायची असते व त्यासाठी तिकीटही काढावे लागते, हे मला खूप उशिरा अलीकडे कळाले. लहानपणी मात्र माझ्या सर्व दिवाळींची सुरवात रागातच झालेली आहे. अलीकडे मी पार पहाटेच्या वेळेसच झोपतो, मात्र लहानपणी त्या शिव्या खाण्याची मजाच काही और होती.

जी गोष्ट उठण्याची, तीच गोष्ट उटण्याची. तिळाचा तो लिबलिबित लगदा अंगावर चोपडून अंघोळ केल्याने पुण्य मिळते यावर माझा तेव्हाही विश्‍वास नव्हता आणि आजही नाही. मुळात थंडीच्या दिवसांत अंघोळ करण्याची गरजच काय, यावर एक बौद्धिक घेण्याची मला खूप इच्छा होती. पण त्या बौद्धिकाचे रूपांतर लगेच चर्चासत्रात झाले असते, अन्‌ घरातील सगळीच मंडळी त्या चर्चासत्रात माझ्यापेक्षा ज्येष्ठ वक्ते होण्याची शक्‍यता असल्याने माझ्या त्या शुभसंकल्पाला मी अनेक वर्षे आवर घालत होतो. आताही मी दिवाळीत उटणे लावतो, मात्र त्यावेळी त्या उटण्याचा जो कंटाळा यायचा, तो आता येत नाही. असो.

आणखी काही आठवणी "ब्रेक के बाद'...

Friday, November 2, 2007

रजनीरसिकाचा रसास्वाद

जनीकांत का नया ऐक्शन धमाका...पोस्टरवरील हे वाक्य वाचले आणि पावले आपोआप त्या दिशेने वळली. तमिळ सुपरस्टार रजनीकांतचा पुण्यातील एकमेव फॅन म्हणून बहुतेक परिचितांनी नियुक्ती केली असल्याने त्याशिवाय पर्यायही नव्हता. शेवटी किती दिवस रजनीचे तमिळ चित्रपटच पाहणार? रजनीकांतच्या डब चित्रपटांची एक स्वतंत्र मजा असते, हे मुथ्थु महाराजा आणि तत्सम चित्रपट पाहून अगदी तोंडपाठच झालेले. म्हणजे बघा, की डब चित्रपटांमध्ये अगदी कपाळावर आडवे गंध लावलेल्या, इरकली साड्या नेसलेल्या बायका 'दैया रे दैया' असा 'ठेठ' उत्तर भारतीय उदगार काढताना पाहिल्यावर मनोरंजन होत नाही, असं म्हणायची कोणाची बिशाद आहे?

त्यामुळेच शंकरदादा या अतीव आकर्षक आणि चित्तथरारक नावाने आलेल्या चित्रपटाची वारी करणे क्रमप्राप्तच होते. त्यात पुण्यनगरीचे भूषण ठरलेल्या रतन या चित्रपटगृहात हा सिनेमा आल्यामुळे तर मंगळवारच्या सुट्टीचे नियोजन करायला काहीच अडचण नव्हती. आता ज्यांना रतनची ख्याती माहित नाही, त्यांच्यासाठी सांगायचे तर या चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी कोणताही सामाजिक थर नसून, तिकिट काढणाऱया प्रत्येक व्यक्तीला एकाच पातळीवर आणण्याची किमया साध्य करण्यात आली आहे. चित्रपटगृहाची क्षमता सुमारे शंभर ते दीडशे जणांची असली, तरी एकसमयावच्छेदे करून एवढा जमाव तिथे जमल्याला फार काळ लोटला आहे. त्यामुळे चित्रपट चालू असतानाही अँगल आवडला नसल्यास उठून दुसऱया सीटवर बसण्याचेसुद्धा अन्यत्र दुर्मिळ असलेले स्वातंत्र्य इथे लाभू शकते.

चित्रपटाच्या पोस्टरवर पडैयप्पातील एक दृश्य, चंद्रमुखीतील दोन दृश्ये व मुथ्थुमधील गाण्याची एक झलक, असा सारा जामानिमा बघितल्यानंतर तर एका तिकिटात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल पाहायला मिळणार, याची खूणगाठ बांधली. कधी एकदा थिएटरला जाऊन चित्रपट पाहतो असे झाले होते. शेवटीचा तो दिवस आला. सुट्टीचा मुहूर्त साधून स्वारी पोचली थिएटरवर. तिथे अपेक्षेप्रमाणे चार चुकार चेहऱयांव्यतिरिक्त कोणीही नव्हते.

तिकिट काढून आत पोचलो आणि बऱयापैकी, चालू असलेल्या एका पंख्याखालची जागा पटकावली. टॉकिजमधील पंख्याखाली रजनीकांतचा पंखा (फॅन) असा एक पीजेही (मनातल्या मनात) मारून घेतला. आपल्यासारखेच चुकले फकीर पाहून मात्र मन खट्टू झाले. अरे, कुठं रजनीकांतच्या चित्रपटाची रिळे उशिरा पोचल्याने मलेशियाच्या एका थिएटरमध्ये झालेली तोड़फोड आणि कुठं ही रिकामी टॉकिज! 'रजनीकांतच्या चित्रपटाला प्रेक्षक जमण्याची गरज'...एक हेडिंगही डोक्यात तरळून गेलं. मात्र स्वतःलाच आवरलं...अरे बाबा, तू ऑफिसला आलेला नाहीस...पिक्चर पाहायला आलायस...मग मात्र सगळं शरीर, मन आणि डोकं आवरून धरलं...

शंकरदादा हे चित्रपटाचे नाव असले तरी चित्रपटाशी त्या नावाचा नाममात्र संबंध आहे, हे समजायला साधारण दोन तास लागणार होते. पिक्चर डब करणाऱयांना कदाचित ते महत्त्वाचं वाटलं नसावं...खरं तर आपल्याकडची सिनेमावाली मंडळी बिनकथेचेही चित्रपट काढतात... मग केवळ नावापुरते काढायला काय हरकत आहे. असो. आता दोन तासांच्या हाणामारीची दृश्ये पाहिल्यानंतर चित्रपटाच्या कथेचा निघालेला निष्कर्ष एवढाच, की रजनीकांत (वीरा) कुठल्यातरी गावात राहत असतो. तो कशासाठी तरी शहरात येतो. एका गायन स्पर्धेत गाणं म्हणतो. (अर्धंच!) कॅसेट कंपनीच्या मालकाच्या मुलीशी त्याचं लग्न होतं. मात्र त्याची आधीची एक बायको असते. ती येते. मध्ये एक दोन प्रसंग घडतात आणि चित्रपट संपतो. वीरा या चित्रपटाची ही हिंदी आवृ्ती आहे, हे आधीच माहित होतं म्हणून बरं.

तिकिटाची संपूर्ण रक्कम मारामारीची दृश्ये पाहण्यासाठी खर्च करण्याचाच प्रेक्षकांनी चंग बांधला आहे, अशी समजूत करून केलेला हा खटाटोप. त्यामुळे हा चित्रपट मुख्यत्वे विनोदी म्हणून मानला जात असला तरी विनोदी दृश्ये शोधण्यातच टाईमपास झाला. नाही म्हणायला गंभीर प्रसंगातील 'क्यों रे, यहां पर ही तेरे कॅरियर (!) आरंभ हुआ था, यहां पे ही मै उसे खतम करूंगा' किंवा 'जब तर तुम मुझ से सामाजिक रूप से विवाह नहीं कर लेते' अशा वाक्यांनी काय जी विनोदनिर्मिती केली असेल तेवढीच.

शंकरदादा चित्रपटात अभिनेता रजनीकांत असला तरी प्रमुख भूमिका साऊंड इफेक्टचीच आहे. पार्श्वसंगीत खरोखरच चित्रपटाला आवश्यक आहे का, याची चर्चा करणाऱया मंडळींनी एकदा हा चित्रपट पाहावा. रजनीकांत पाऊल टाकतो...ठीश्श ठीश्श ठीश्श...तो मान वर करतो...ठीश्श ठीश्श ठीश्श...हात हलविला...ठीश्श ठीश्श ठीश्श...गुंडाला चोपले...ठीश्श ठीश्श ठीश्श. आता प्रत्येकच चित्रपटागृहात डॉल्बी सिस्टिम असली तर चित्रपटाची मजा ती काय? चित्रपट हे बुद्धीला चालना देणारे असावेत, असं मालकांनी कुठंतरी वाचलं असावं. त्यामुळे त्यांनी संवाद समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर टाकली. घ्या बुद्धीला आणि मेंदूला चालना...त्यामुळे अर्धा चित्रपट असाच संवादातल्या रिकाम्या जागा भराचा खेळ खेळत काढावा लागला. असे आणखी चार चित्रपट पाहिले तर आपणही एखाद्या चित्रपटाचे संवाद लिहू शकू बाप. अशा या आवाजाच्या आंधळी कोशिंबीरीत (का बहिरी कोशिंबिरीत!) केवळ ठीश्श ठीश्श ठीश्श...चा आधार फार मोठा वाटू लागला. विशेष म्हणजे थिएटरची शोभा वाढवायला आलेली मंडळीही त्याचा आस्वाद घेत होती, असं दिसलं.

एकूणात हा दोन तासांचा बहारदार कार्यक्रम संपला आणि खूपच ओकेबोके वाटू लागले. पण एका तिकिटात किती मनोरंजन करून घ्यायचं? आपण चित्रपट का पाहतो...तर ममोरंजनासाठी. मग एवढं मनोरंजन करणारा चित्रपट संपल्यावर वाईट तर वाटणारच. असो. मात्र प्रत्येक डब चित्रपट पाहायचा असा निश्चय केलेला मी आता वाट पाहत आहे पुढच्या डब चित्रपटाची. तोही रजनीकांतचा!

Wednesday, October 31, 2007

प्रश्न लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा

भारतात आपण अनेक गोष्टी स्वाभाविक मानलेल्या असतात. त्यात विविध पातळींवरील निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा उपयोग हीही एक गोष्ट आहे. अगदी ग्रामपंचायतींच्या पातळीवरही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर आपण आता गृहित धरलेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या दृष्टीने ते योग्यही आहे. लोकशाहीच्या बाबतीत भारताला तोडीस तोड आणि अन्य सर्व बाबतींत जगात सर्वांनाच वरचढ अशा अमेरिकेत मात्र याच प्रश्नावरून संभ्रम आहे. वॉईस ऑफ अमेरिकेच्या एका वृत्तांकनात नुकतीच या विषयाची चर्चा वाचनात आली.
सात वर्षांपूर्वी अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व अशा निवडणुकीच्या गोंधळाला सामोरे गेल्यानंतर त्या देशातील (म्हणजे राज्यांच्या संघाने) कागदी मतपत्रिकांऐवजी यंत्रांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. आता चार वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला तोंड देताना मात्र अमेरिकेसमोर या मतदान यंत्रांच्याही विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारत आणि अमेरिकेतील मतदान यंत्रांच्या स्वरूपात काही मूलभूत स्वरूपाचे फरक आहेत. भारतातील मतदार यंत्रांवरील बटन दाबून उमेदवारांची निवड करतात. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आणि उमेदवारांच्या नावापेक्षा त्यांच्या निवडणूक चिन्हाला अधिक महत्त्व असल्याने ही व्यवस्था सोयीची ठरते. अमेरिकेत मात्र उमेदवारांची संख्या अत्यंत मर्यादीत असल्याने, तसेच मतदार तुलनात्मकदृष्ट्या सुशिक्षित असल्याने मतदानासाठी 'टच स्क्रीन' यंत्रे असतात.
नेमक्या या यंत्रांच्याच त्रुटीबद्दल आणि परिणामतः निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दल अमेरिकी तज्ज्ञांनीच शंका घ्यायला सुरवात केली आहे. यंत्रात नोंदल्या जाणाऱया आकड्यांवर कोणीही लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे यंत्रांनी जाहीर केलेला निकाल अंतिम मानला जातो. या दोषावर वॉशिंग्टन, डिसीच्या यू. एस. पब्लिक इंटरेस्ट रिसर्च ग्रुपचे विश्लेषक गॅरी कालमन यांनी बोट ठेवले आहे. मतगणनेला कोणी आव्हान दिले आणि पुन्हा मतमोजणी घ्यायला सांगितली, तरी शेवटी यंत्र जे सांगेल तेच आपल्याला ऐकावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
वॉशिंग्टन येथीलच जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीचे बेंजामिन गिन्सबर्ग यांनीही या त्रुटीमुळे यंत्रांसोबतच कागदी मतांनाही स्थान देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, "कोणत्याही ठिकाणी संगणक किंवा त्यावर आधारित यंत्रणा आली, की त्याच्याशी छेडछाड करण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या यंत्रांना कागदी दस्ताऐवजाचा आधार द्यायलाच हवा." एखाद्या मतदाराने मत टाकले, की त्याची प्रिंट आऊट मिळावी. त्यामुळे पुन्हा मतमोजणी केल्यास फायदा होईल, असे गिन्सबर्ग यांनी मत मांडले आहे.
---------
इथे अमेरिकेच्या निवडणुकीबद्दलचा वृत्तांत संपला. मात्र खरा प्रश्न पुढे आहे. आपल्याकडे या यंत्रांचे स्वागत एक मोठी व आधुनिक घडामोड म्हणून झाले. मात्र त्या यंत्रांची कार्यक्षमता, उपयोग आणि त्यांची विश्वासार्हता यांबाबत कोणतीही चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. सरकार काही सांगणार आणि लोकांनी तो मुकाट ऐकायचा, हीच आपली परंपरा आहे. त्यामुळेच कुठलाही अभ्यास वा संशोधन न करता रामसेतू मानवनिर्मित नसल्याचा दावा सरकार न्यायालयात करतं आणि १०० कोटींच्या देशात त्यावर कोणी प्रश्नही विचारत नाही. हा या दोन देशांतील फरक आहे.
----------

Sunday, October 28, 2007

चिरंजीव मेगास्टार

आंध्र प्रदेशातील कोणत्याही गावातील कोणतेही थिएटर...प्रचंड मोठे पोस्टर्स आणि कट-आऊटस्‌वर एक चेहरा झळकतोय...तो चेहरा पाहून गावातील लहान मुलांपासून म्हाताऱ्या व्यक्तींपर्यंत प्रत्येक जण थिएटरच्या दिशेने निघालेला...टॉकिजची घंटा वाजते आणि दिवे मालवून थिएटरमध्ये अंधार पसरतो...समोरचा पडदा उजळताच काही क्षणांत प्रत्येक प्रेक्षकाला हवा असलेला चेहरा व त्याचे झळकू लागते...थिएटरमध्ये थिएटरचे छत फाटेल एवढ्या मोठ्या आवाजात टाळ्या, शिट्यांचे आवाज...काही दर्दी रसिक खिशातील आहे नाही तेवढी चिल्लर पडद्याच्या दिशेने उधळतात. पुढचे तीन तास या प्रेक्षकांना त्यांची दुःखे विसरायला लावण्यासाठी चिरंजीवीची एंट्री झालेली असते.

सामान्यतः आंध्र प्रदेशात नेहमी दिसणारे हे चित्र. चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटले की त्यांची लफडी, नखरे अशाच बातम्या (आवडीने) वाचायची आपल्याला सवय असते. तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी याच्याबद्दल गेल्या आठवड्यात आलेल्या बातम्या याला अपवाद नव्हत्या. त्याच्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने माध्यमांनी त्याला मोठी प्रसिद्धी दिली. आपल्याकडच्या लोकांनीही त्याची चविष्टपणे चर्चा केली. कोट्यवधी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला, मोठ्या मुलीचे थाटामाटात लग्न करून देणारा, निवृत्तीची भाषा बोलणारा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी चॅरिटी संस्था चालविणारा चिरंजीवी मात्र या संपूर्ण प्रकरणात फुकट बदनाम झाला.

आंध्र प्रदेशात तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, चिरंजीवी हे नाव काढताच तुम्हाला वेगळी ट्रिटमेंट मिळालीच म्हणून समजा. हैदराबादेत फिरत असताना 1111 या क्रमांकाची मोटार जाताना दिसली तर बेलाशक समजा, की चिरंजीवी चालला आहे. चाहत्यांमध्ये चिरु या नावाने ओळखल्या जाणारा चिरंजीवी हा तेलुगु प्रेक्षकांचा जीव की प्राण. चिरुच्या चित्रपटांसाठी गर्दी झाल्याने काही जणांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोनिदेला शिव शंकर वरा प्रसाद हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं का? नाही ना? अहो, या नावाचीच व्यक्ती देश-परदेशांत चिरंजीवी या नावाने ओळखली जाते. पश्‍चिम गोदावरी जिल्ह्यातील मुगल्तुर येथे 22 ऑगस्ट 1955 रोजी चिरंजीवीचा जन्म झाला. वडिल वेंकट राव पोलिस अधिकारी असल्याने ते बदलीच्या गावी असत. त्यामुळे आजी-आजोबांकडे चिरु लहानाचा मोठा झाला. बी. कॉम. ची पदवी घेतल्यानंतर अकाऊंटन्सीचा कोर्स करण्यासाठी तो मद्रासला दाखल झाला. "पुनादिराल्लु' नावाच्या एका सिनेमात काम करण्यासाठी यावेळी त्याला ऑफर आली. त्याने कॉलेजच्या आपल्या प्राचार्यांना आजोबा वारल्याचे खोटेच सांगून सुट्टी घेतली.

या चित्रपटातील पहिल्या दृश्‍यात चिरंजीवीला पाय धुण्याचे काम होते. त्यावेळी त्याने आधीचे दृश्‍य काय होते, अशी विचारणा केली. तेथील दिग्दर्शकांनी त्या दृश्‍याची कल्पना चिरंजीवीला दिली. त्याने मग तेथीलच थोडी धूळ घेऊन पायावर रगडली. त्याची ही कृती सिनेमाटोग्राफर पाहत होता. तो चिरंजीवीकडे आला आणि त्याला म्हणाला, ""एक दिवस तू मोठा स्टार होशील.'' तेथूनच चिरंजीवीच्या मनात अभिनेता होण्याची ठिणगी पडली. याच वेळेस तेथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्याने नाव नोंदविले. यावेळी त्याची एका सिनियरशी घनिष्ठ मैत्री झाली. पुढे चालून चिरुप्रमाणेच त्याचा हा मित्रही दक्षिण भारतातील मोठा सुपरस्टार म्हणून नावा रूपाला आला. तो सुपरस्टार म्हणजे आपला रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड!

चिरंजीवीने 1977 मध्ये "प्रणाम खरीदु' या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हनुमानाचा भक्त असल्याने त्याने पडद्यावर चिरंजीवी हे नाव घेतले. "मोसगाडू', "47 रोजुलु' आदी चित्रपटांमधून मात्र त्याने खलनायक रंगविले. जितेंद्र, जयाप्रदा यांच्या भूमिका असलेला "कैदी' हा सिनेमा तुम्हाला आठवतो का? हा चित्रपट मुळात "खैदी नं. 786' या चित्रपटाचा रिमेक होता. याच चित्रपटातून मारधाड करणारा ऍक्‍शन हिरो म्हणून चिरंजीवीने स्वतःची ओळख निर्माण केली. आता टीव्ही चॅनल्स आणि सीडीच्या जमान्यात तेलुगु, तमिळसारख्या भाषांतील अनेक चित्रपट हिंदीत डब करून आपल्यापुढे आणले जात आहेत. मात्र 1980 आणि 90 च्या दशकात चिरंजीवीच्या अनेक सिनेमांचे हिंदीत रिमेक झाले. अनिल कपूरचे अनेक सिनेमे चिरंजीवीच्या चित्रपटांचे रिमेक होते. चिरंजीवीच्या "जमाई मजाका'चा "जमाई राजा', "घराना मोगुडु'चा "लाडला', "रौडी एमएलए'चा "लोफर' असे अनेक रिमेक आपण पाहिले. हे सर्वच चित्रपट हिट झाल्याचं तुम्हाला आठवत असेलच.

हाणामारीच्या चित्रपटांबरोबरच चिरुने त्यावेळी ब्रेक डान्सची वेगळीच आवृत्ती पडद्यावर साकारण्यास सुरवात केली. त्यामुळे त्याच्या चाहते तर वाढलेच, शिवाय त्याची अनेकांनी नक्कलही करण्यास सुरवात केली. 1990 मध्ये चिरंजीवीने "प्रतिबंध" चित्रपटातून हिंदीत प्रवेश केला. त्याला प्रचंड यश मिळाले. रामी रेड्डीचा "स्पॉट नाना' सर्वांच्या डोळ्यांत भरला तेवढाच चिरुचा जिगरबाज पोलिस इन्स्पेक्‍टर प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटाच्या यशानंतर लगोलग "आज का गुंडाराज' आला. चिरंजीवीचा "हिटलर' (1995) हा सिनेमा आला आणि तेलुगु चित्रपटांमध्ये त्याला मेगास्टार या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर आंध्र प्रदेशात त्याचे स्थान इतर कोणाहीपेक्षा मोठे झाले. यानंतर चिरुच्या यशस्वी चित्रपटांची लाटच तेलुगुत आली आणि एकापाठोपाठ त्याचे चित्रपट तिकिटबारीवर गल्ला करू लागले.

खरं तर तेलुगु चित्रपटसृष्टीला "टॉलिवूड'ची स्वतःची ओळख देण्याचे काम चिरंजीवीने केले होते. त्याच्या पूर्वी एन. टी. रामाराव आणि अक्किनेनी राघवेंद्र राव हे तेलुगु चित्रपटांचे मोठे स्टार होते. मात्र चिरंजीवीला सुपरस्टारपदाचे एकछत्री राज्य लाभले. तेलुगु भाषेत चिरुनामा म्हणजे पत्ता. चिरंजीवीच्या चिरु नावातही टॉलिवूडचा पत्ता लपला आहे. रजनीकांत याच्या प्रमाणेच तोही अध्यात्मात रमणारा माणूस आहे. सुमारे तीस वर्षे चित्रपटसृष्टीत काढूनही कोणत्याही वादात न सापडलेला चिरु लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसला. लोक त्याला "अन्नया' (मोठा भाऊ) या नावाने ओळखू लागले. त्याच्या या लोकप्रियतेवर गेल्या वर्षी पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने शिक्कामोर्तब केले. अथेन्स येथे 2004 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान "कोका कोला' कंपनीने चिरंजीवीला खास पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते.

स्वतःबाबत चिरंजीवी म्हणतो, ""मी मदर तेरेसा बनण्यासाठी किंवा लोकांनी मला आध्यात्मिक म्हणावं, यासाठी काही करत नाही. मला वाटतं म्हणून मी ते करतो. लाखो लोकांचे प्रेम मिळाल्यानंतर, एवढे मोठे स्थान प्राप्त केल्यानंतर एखाद्याच्या आयुष्याला काहीतरी मोठा उद्देश असायलाच पाहिजे.''

चिरंजीवी जेवढा चित्रपटांसाठी ओळखला जातो त्याहून जास्त आंध्र प्रदेशात सामाजिक कार्याबद्दल त्याची ओळख आहे. नऊ वर्षांपूर्वी त्याने "चिंरजीवी चॅरिटेबल ट्रस्ट'ची स्थापना केली. ब्लड बॅंक (रक्तपेढी )आणि आय बॅंक (नेत्रपेढी) चालविण्याचे काम हा ट्रस्ट करतो. आंध्र प्रदेशात या रक्तपेढीने आतापर्यंत 96 हजार लोकांना मदत केली आहे आणि नेत्रपेढीने एक हजार लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हैदराबादमध्ये "चिरंजीवी चॅरिटेबल फाउंडेशन'चे उद्‌घाटन करण्यासाठी तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम आले होते.

Thursday, October 25, 2007

सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय...

कल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय, तबे कोन ओ हाडा खाय, अशी बंगाली भाषेत एक म्हण आहे. तिचा अर्थ असा, की सगळेच कुत्रे जर स्वर्गात गेले तर या पृथ्वीवरील हाडकं कोण खाणार? आता आपल्या सर्वच भाषांमध्ये जुन्या म्हणींमध्ये असते, तसे याही म्हणीत काही एक तथ्यांश आहे. खरं तर सध्या भूतदयावादी (का भूतवादी?) मंडळींच्या कृपेने कुत्र्यांचे एवढे लाढ चालू आहेत, की 'हर कुत्ते के दिन दिन होते है' असं म्हणण्याऐवजी 'सिर्फ कुत्तों के दिन होते है,' असं म्हणावसं वाटतं. मात्र आपण या सुदैवी कुत्र्यांना त्यांच्या सुखराज्यात तसेच सोडू आणि याच म्हणीच्या धर्तीवर आणखी काही गोष्टी ताडून पाहता येतील. अगदीच उदाहरण द्यायचे म्हटले तर...

* सगळेच होतकरू तानसेन आपला घसा मोकळा करण्यासाठी टीव्हीच्या पडद्यावर झळकत असतील तर देशभरातील बाथरूमचा उपयोग फक्त स्नान करण्यापुरताच राहणार की
काय?

* शहरात सगळीकडे मॉलच उभे राहणार असतील तर नागरिकांनी राहण्यासाठी काय जाहिरातींच्या होर्डिंग्जच्या खाली जागा भाड्याने घ्यावी की काय?

* बॉलिवूडमधला प्रत्येक उपटसुंभ सुपरस्टार आणि 'किंग' होणार असेल तर सहायक अभिनेते काय फक्त निधन पावलेल्या एखाद्या मोठ्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहायला किंवा 'शनिवार की रात अमिताभ के साथ'मध्ये बच्चन चालिसा म्हणण्यापुरतेच उरणार की काय?

* सगळेच क्रिकेटपटू जीवाचे रान करून खेळू लागले, खेळांवर लक्ष केंद्रीत करू लागले आणि खेळात जान आणू लागले, तर विविध जाहिरातींसाठी मॉडेल को-ऑर्डिनेटर्स कोणाच्या तोंडाकडे पाहणार?

* देशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंतचा प्रत्येक राजकीय नेता अणु करारावर बोलू लागला, तर ग्रामीण भागांतील पाण्याचा प्रश्न, शेतकऱयांच्या आत्महत्या किंवा विकास कामे यांचा विचका करण्याचे महत्कार्य कोण करणार?

* सगळेच साहित्यिक संमेलनाध्यक्ष होण्याची धडपड करू लागले, तर 'चिकनच्या ५०१ चविष्ट पाककृती' किंवा 'घरच्या घरी चायनीच करा' असे बेस्टसेलर वाङमय (अन वाङगंमयही!) प्रसविण्याची जबाबदारी कोण घेणार?

* प्रत्येक जाहिरातीत लहान मुलेच जर झळकू लागली, तर पुरुषांनी प्रेक्षणीयतेची भूक काय सास-बहूच्या मालिका पाहून भागवायची काय?

* प्रत्येक वाहनचालकाने वाहतुकीची शिस्त बाळगण्याचा निश्चय केला, तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या थोबाडीत मारील अशा कवायती रस्त्यांवर करण्याचा थरार कोण अनुभवणार?

* प्रत्येक महागडी वस्तू हप्त्यांवर अन सुखासुखी मिळू लागली, तर 'सुखवस्तू' घराची व्याख्या बदलण्याची जबाबदारी कोण घेणार?
-----------
असे अनेक प्रश्न आहेत. दिवसेंदिवस अशा प्रश्नांची यादीही वाढत आहे आणि त्यांची उत्तरेही ऑबवियस होत चालली आहेत. फक्त तुम्हाला कोणी असा प्रश्न विचारलाच, तर उत्तर देण्याऐवजी एवढंच म्हणा, 'सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय...'

Friday, October 19, 2007

वाचनाच्या बेटावरील श्रद्धेचा शोध

पूनम छत्रे यांनी त्यांच्या लेखात मनाला भावलेल्या उताऱ्यांचा हा प्रवाह पुढे नेण्याची जबाबदारी टाकली आणि मला पुन्हा वाचनाच्या दिवसांत जावे लागले. गेली काही वर्षे आपणच लिहावं आणि इतरांनी वाचावं, ही भावना प्रबळ होत गेल्यामुळे वाचनसंस्कृती हळूहळू मागे पडली. फक्त "वाचनामुळे माणूस घडतो' किंवा "उत्तम संस्कृतीसाठी वाचन आवश्‍यक' अशा सुसंस्कारी सुभाषितां पुरतेच वाचन मर्यादीत झाले होते. मात्र ज्या काळात वाचन केले त्या वाचनाचे ठसे मनावर अद्याप कायम असल्यामुळे त्याच फडताळात जाऊन शोध घेतला. वाचलेल्या पुस्तकांतून आवडता उतारा द्यायचा, त्यातही मराठी उतारा द्यायचा ही जरा जोखमीचीच बाब. कारण शुद्ध मराठी साहित्याची कास सोडूनही मला आता फारा काळ लोटला आहे. असो.

"रॉबिन्सन क्रुसो' ही महाकादंबरी (सुमारे 500 पृष्ठे ) वाचून मला आता सतरा वर्षे होत आली. डॅनिएल दे फो याने लिहिलेली ही कादंबरी मानवी आकांक्षी, कर्तृत्व आणि प्रयत्नवादाचे एक महास्तोत्रच आहे. त्याहूनही विश्‍वाच्या पसाऱ्यात मानवाचे परावलंबी अस्तित्व आणि ईश्‍वराची महीमा, यांचीही कहाणी सांगणारी ही कथा आहे. सुमारे तीनशे वर्षांपूर्वी आलेल्या या कथेच्या असंख्य आवृत्या अगदी तीन वर्षांपूर्वी आलेल्या "कास्टअवे' या चित्रपटापर्यंत निघत आल्या आहेत. मूळ इंग्रजीतील ही कादंबरी मी वाचली ती मराठीतूनच. मात्र अस्सल मराठी वाचकांच्या प्रथेप्रमाणे या वाचनाचे प्रायोजकत्व मी शहरातल्या एकमेव नगरपालिका ग्रंथालयाला दिले होते. त्यामुळे अनुवादकाचे नाव किंवा अन्य तपशील बाळगण्याचे प्रयोजन नव्हते. आता ती कादंबरीही मिळत नाहीशी झालेली. त्यामुळे आवडता उतारा द्यायचा म्हटल्यावर संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून सुरवात म्हणतात, तसे आपणच मूळ कादंबरी शोधून उताऱ्याचे भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. (कार्यसिद्धीस गुगुल समर्थ!) त्यामुळे काही उणीवा राहिल्या असल्यास चूकभूल देणे घेणे!

इंग्रज दर्यावर्दी रॉबिन्सन क्रुसो अनेक सागरी सफरींमध्ये तऱ्हेतऱ्हेच्या अनुभवांतून गेला असला तरी पुनःपुनः नव्या सफरींसाठी निघण्यास तयार. अशाच एका सफरीदरम्यान वादळात सापडून त्याचे जहाज फुटते आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांना जलसमाधी मिळते. फुटलेल्या जहाजाच्या अवशेषासह आणि काही सामानासह क्रुसो एका निर्जन बेटाला लागतो. तेथेच तो 28 वर्षे काढतो आणि स्वतःच्या एकाकी जीवनाला अर्थ देण्याचा प्रयत्न करतो. बेटावरील प्राण्यांशी मैत्री करणे, तेथीलच गवत व वनस्पतींपासून झोपडी तयार करणे, गुहेत राहणे, नरभक्षक आदिवासींशी गाठ पडूनही त्यांच्याबद्दल "जगा व जगू द्या'ची भूमिका घेणे...अशा विविध प्रकारांनी आयुष्याला आकार देण्याचा प्रयत्न क्रुसो करतो. इतिहासात प्रगतीच्या ज्या काही पायऱ्या मानव चढल्या, त्या सर्वांचे प्र तिकात्मक चित्रण या कादंबरीत येतं. त्यामुळे एका अर्थाने माणसाच्या अस्तित्वाच्या लढाईचीच ती कहाणी होते. मात्र मला त्यात सर्वाधिक भावते अन्‌ सतरा वर्षांनंतरही लक्षात राहते तो क्रुसोच्या ईश्‍वराच्या अस्तित्वाबद्दल बदलत्या भूमिकेचे चित्रण. स्वतःच्या परिस्थितीचे निरीक्षण, त्यातून चिंतन करत असतानाच आपण ईश्‍वराच्या इच्छेनेच या परिस्थितीत सापडलो असल्याचा साक्षात्कार क्रुसोला होतो. हा या कादंबरीतला सर्वांत हृद्य प्रसंग.
---------------------

माझ्या या निष्कर्षांना खोटं ठरवंल, असं काहीही घडलं नाही, त्यामुळे हे सर्व ईश्‍वरानेच घडविले आहे, ही भावना माझ्या मनात आणखी प्रबळ होऊ लागली-त्यानेच मला या दयनीय परिस्थितीत आणून ठेवले आहे, कारण त्याच्याकडे माझ्यावरच नाही, तर जगातील वस्तुमात्रावर स्वामित्व गाजविण्याची शक्ती आहे. त्यानंतर लगेच विचार आला-ईश्‍वराने माझ्यासोबत असे का केले? मी असे काय केले होते?
त्या प्रश्‍नासरशी माझ्या विवेकबुद्धीने मला टोचले, जणू काही मी एखादे पाखंड केले आहे अशा पद्धतीने आणि मला वाटले की ही विवेकबुद्धी माझ्याशी बोलत आहे, ""मूर्खा! तू विचारतोस की तू काय केले आहेस? अतिशय वाह्यातपणे घालविलेल्या आपल्या आयुष्यावर नजर टाक आणि स्वतःलाच विचार, की तू काय काय केलं नाहीस? विचार स्वतःला की तू याआधीच नष्ट का झाला नाहीस? यरमाऊथ रोडसमध्ये तु का वाहून गेला नाहीस, जहाजावर चाचांनी हल्ला केला तेव्हा लढाईत का मारला गेला नाहीस, आफ्रिकेच्या किनाऱ्यावरील जंगली प्राण्यांनी तुला मारून का खाल्ले नाही, अगदी तुझे सगळे सहकारी बुडाले असताना तू येथे वाहून गेला नाहीस? तू स्वतःला विचार "मी असं काय केलंय.'
या विचारांसरशी मी स्तब्ध झालो, एखाद्या मूर्तीसारखा. बोलण्यासाठी माझ्याकडे एकही शब्द नव्हता. निराश आणि विचारमग्न अवस्थेतच मी उठलो आणि माझ्या आश्रयस्थळी परत आलो. झोप आल्यासारखं झाल्याने मी माझ्या भींतीकडे गेलो. पण माझ्या विचारांची गर्दी एवढी झाली होती, की झोपण्याची माझी परिस्थिती नव्हती. त्यामुळे मी खुर्चीत बसलो आणि अंधार पडू लागल्याने दिवा लावायला घेतला. आता पुन्हा माझी तब्येत बिघडण्याच्या शक्‍यतेने मी एवढा घाबरलो होतो, मला आठवलं ब्राझीलचे लोक त्यांच्या सर्व दुखण्यांवर कोणत्याही औषधाऐवजी तंबाखू घेतात. तंबाखूची एक गुंडाळी एका संदुकीत होती. ती वाळलेली होती. काही हिरवी आणि न वाळलेली गुंडाळीही होती. मी संदुकीजवळ गेलो. त्यामागे नियतीचाच हात होता यात संशय नाही कारण त्या संदुकीत मला माझ्या शरीराचंच नव्हे तर आत्म्याच्याही दुखण्याचं औषध सापडले.
मी संदुक उघडली आणि हवी असलेली तंबाखू शोधली आणि मी जपून ठेवलेली काही पुस्तके तिथेच पडली असल्याने मी आधीच उल्लेख केलेले बायबल उचलले. मला आतापर्यंत हे बायबल वाचायला वेळ मिळाला नव्हता म्हणा वा इच्छा नव्हती म्हणा-त्याला बाहेर काढून ते आणि तंबाखु दोन्ही घेऊन मी टेबलजवळ आलो. माझ्या स्वभावाच्या अस्वस्थतेवर तंबाखूचा काही उपयोग होईल का, ती त्यासाठी चांगली आहे का वाईट, यांबाबत मला काहीच माहित नव्हतं. परंतु कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती परिणाम करेल, याबाबत निर्धार केल्यासारखं मी त्या तंबाखुचे अनेक प्रकारे सेवन केले. मी तंबाखुचे एक पान घेतले आणि तोंडात चघळायला सुरवात केली. तंबाखू हिरवी व कडक होती आणि मला तिची सवयही नव्हती. त्यामुळे खरोखरीच माझ्या मेंदूला गुणगुण्या आल्या. त्यानंतर मी काही पाने घेऊन रममध्ये एक-दोन तास बुडवून ठेवली. आडवं पडल्यानंतर ती रम प्यायचा मी निर्णय घेतला. त्यानंतर अखेर मी एका भांड्यात कोळसे पेटवून त्यावर काही पाने जाळली. अगदी सहन होईल तोपर्यंत त्याचा धूर घेण्यासाठी मी माझे नाक धुराजवळ घेतले.
या सर्व उचापतीदरम्यान, मी बायबल घेऊन वाचण्यास सुरवात केली. पण माझे डोके तंबाखूमुळे असे बधीर झाले होते, की किमान त्या वेळेपुरते तरी वाचणे अशक्‍य झाले होते. फक्त चाळण्यासाठी म्हणून पुस्तक उघडले आणि मला आढळलेले पहिले शब्द होते, ""संकटाच्या वेळेस मला हाक मार, मी तुझी सुटका करेन आणि तू माझे नाव घेशील.'' माझ्यासारख्याला हे शब्द अगदी चपखल होते. ते वाचून माझ्या मनावर मोठा परिणाम झाला. मात्र त्यानंतरच्या काळात हा परिणाम अधिक होता. कारण सुटका या शब्दाला काही अर्थ नव्हता, असे मी म्हणेल. माझ्या हताश परिस्थितीत ही शक्‍यता एवढी दूर होती, की माझी स्थिती इस्राएलच्या मुलांसारखी झाली. त्यांच्यासाठी खाण्यासाठी मांस देण्याचे आश्‍वासन मिळाल्यावर त्यांनी विचारले होते, ""या उजाड माळरानात भगवंत टेबल मांडू शकतो?'' तसंच मीही विचारायला लागलो, ""भगवंत स्वतः मला येथून सोडविणार का?'' त्यानंतर अनेक वर्षे काहीही आशा नजरेच्या टप्प्यात न आल्याने तर ही शंका नेहमीच माझ्या विचारविश्‍वात ठाण मांडून राहिली होती.
तरीही या शब्दांनी माझ्यावर खूप परिणाम केला होता व त्याबद्दलच मी नेहमी चिंतन करत असे. आता खूप उशीर झाला होता, आणि मी म्हटल्याप्रमाणे तंबाखूने एवढी गुंगी आली होती की मला झोप येऊ लागली होती. रात्री काही लागलं तर हाताशी असावा, या हेतूने दिवा जळताच ठेवून मी अंथरुणावर पडलो. मात्र पाठ टेकण्यापूर्वी मी ती गोष्ट केली, जी त्यापूर्वी आयुष्यात कधीही केली नव्हती-मी गुडघे टेकले आणि ईश्‍वराने मला दिलेले आश्‍वासन पूर्ण करण्याची, तसेच संकटकाळात मी हाक मारल्यानंतर मदतीला येण्याची प्रार्थना केली. माझी तोडकीमोडकी आणि अडाण प्रार्थना पूर्ण झाल्यानंतर, तंबाखूची पाने बुडवून ठेवलेली रम मी प्यायलो. ती एवढी कडक झाली होती आणि तंबाखूच्या चवीनी भरली होती, की माझ्या घशाखाली ती उतरेना. त्यानंतर लगेच मी झोपण्यासाठी आडवा पडलो. त्यामुळे माझ्या डोक्‍यात आग होत होती, तरीही मला शांत झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा सूर्याच्या स्थितीवरूनच दुपारचे तीन तरी वाजले असावेत, असा अंदाज मी केला.

-------------
असो. मला वाटते या पोस्टमध्ये जरा जास्तच लांबण लावली. एकूणात मला ही संधी दिल्याबद्दल (म्हणजेच माझ्यावर ही जबाबदारी टाकल्याबद्दल) मी आभारी आहे. आता ही जबाबदारी मी आणखी पुढे देतो.

Sunday, October 14, 2007

तंटाभक्तांची तंटमुक्ती

- रामराम म्हादबा, उठलासा नव्हं?

- हां उठलो हाय...काय काम काढलं सकाळच्या पारी?

- काय नाय. काल काय तू लय दंगा केला म्हणं ग्रामसभेत...मी वाईच तालुक्याला गेलो व्हतो. आल्यावर बायलीने सांगितलं...तवा म्हणलं सकाळचं जाऊन समक्षच विचारावं...एक घाव ना दोन तुकडे...काय?

- आरं बाबा, आता मलाच बोल लावा दंगा केलान म्हणून. आरं अख्ख्या गावाला पूस काल काय झालं त्या सभेत. त्या ग्रामसेवकाला न सरपंचाला असा फाडला ना आडवा न उभा...ज्याचं नाव ते. टीव्ही लावू देत नाही XXX

- आरं म्हादबा, असं डोसक्यात काय पाई राख घालून घेतो रे बाबा? आरं त्या टीव्हीची मामलत ती काय अन तू भांडणं काय पाई करतो रं? काय झालं तं सांग बाबा समदं...तवर वहिनी बी चहा आणतील... - हे बग भाऊ, काल गांधी जयंती म्हून आपल्याकडं ग्रामसभा होती, हे तर तुला ठावं होतंच. आपलं काय ठरलं होतं का गावात तंटा करायचा नाय, भांडण करायचा नाय...त्यासाठी तं ही सभा बोलाविली होती..खरं का नाय...आता तुला म्हायत हाय भाऊ, का सरपंच किती डांबरट अन ग्रामसेवक किती आतल्या गाठीचं बेणं हायंत...गावात तीन पिढ्यांपासून लीडरकी हाय आमच्या घराण्याची...गेल्या विलेक्शनला विपरीत घडलं अन हा कावळा खुर्चीत जाऊन बसला. म्या म्हण्लं...जाऊ दे. परत्येक कुत्र्याचे दिस असतात. तं यानं काय केलं का ग्रामसभेचं आवताण मला द्यायला नको? बरं नाय दिलं...तरी बी म्या गेलो...का म्हण्लं गाव आपलं हाय...गावातली शांती आपली हाय....

- आरं म्हाद्या, पर तु तं सांगत होता का पाटलांच्या शांतीवर तू आताशा लाईन मारीत न्हाय म्हणून...

- ती शांती न्हाय रं भाऊ...बायकोशप्पथ लगीन झाल्यापासून म्या कोण्या बी मुलीकडं नजर उचलून पाहत नाही...आन तुला म्हणून सांगतो...आताशा 'त्या' शांतीत बी दम रायला नाही...ते जाऊ दे...तं तुला सांगत होतो आपल्या गावच्या शांतीचं म्हणजे बापूंनी सांगितलेल्या शांतीचं...तं ती शांती हवी म्हणून सभेला गेलो...

- आरं सभा तंटा मिटविण्यासाठी...तू गेला शांतीसाठी...अन तिथं करून आला मारामारी...? आरं ह्याला म्हणायचं तरी काय?

- सांगतो...सभेला समदा गाव जमला व्हता...त्यात सरपंचानं मिजास मारायला त्याच्या बायका पोरांना बी बोलाविलं होतं...तं मी विचारलं का हे एवढं लटांबर हितं कशाकरता. आता यात काय चूक हाय काय. तवा बसली ना दातखीळ सरपंचाची. तोंडातून शब्द फुटत नव्हता xxxच्या. तवा तं ग्रामसेवक मंदी पडला. त्याच्याखातर मी बी जरा आवरलो...का की आपन बी गेल्या वख्ताला बायकोला नेलंच व्हतं की तिथं...तं त्यानंतर वग सुरू केला का बेट्यांनी...सभा जमली तंटा मिटविण्यासाठी आन हे बोलू लागले हागणदारीचं...का गावात हागणदारी बंद कराया पायजे...परत्येकाने शौचालये बांधावीत...

-मंग तुला कायची अडचण रं बाबा? हागणदारी तं हागणदारी...तुला कायचा प्रोब्लम?

- प्रोब्लम आरं काय नाही...पण मी म्हन्तो, आन मी त्या दोगांच्या बी तोंडावर सांगितलं का बाबा, हागणदारीचा प्रश्न आमच्या घरात आम्ही संपविला आहे...इथं तुमी शांततेचं बोला...तं दोघं बी जोक् मारू लागले की रं...एक म्हन्ला का हागणदारीत शांतीच असती न्हवं...दुसरा काय म्हन्ला मायतंय का? त्यो म्हन्ला का तुमच्या आख्ख्या फॅमिलीनं हगायचं बंद केलं का? आता आसं कुनी बोलल्यावर तुझं टाळकं सरकणार नाय का? तं माझं बी टकुरं सराकलं...तरीबी मी शांत व्हतो...

- आरं मग भांडण कामून झालं?

- आरं ते समदं आपल्या मास्तरांचं झेंगट हाय...त्यानंच सांगितलं का टीव्हीवर आबांचं प्रवचन चालू हाय अन आबा आपल्याला शांततेचं महत्त्व सांगतायत...तर मंग काय...तुला तं माहितंय...ग्रामसेवकावर लायन मारण्यासाठी सरपंचानं टीव्हीला हात की रे घातला...आता मात्र आपला स्टॅमिना संपला व्हता बरं का! मी मोठ्यांदा आवाज काढून सांगितलं का पयले ही सभा व्हयंल अन त्येच्यानंतरच ज्याला हवा त्यानं टीव्ही बघावा...यात काय खोटी हाय काय?

- नाय....बिल्कुल नाय.

- त्येच...मी त्येच सांगत व्हतो...तं सरपंच अन त्येच्या गुंडांनी म्होरं येऊन मलाच खुन्नस दिली...अन माझ्याम्होरं येवून मला धमकी देऊ लागले...तं मी काय मागं हटणार होतो व्हयं...मी बी त्येंना त्यांच्याच भाषेत दम दिला...ही दमबाजी चालू असतानाच दोन पोरटी टीव्हीकडं गेली अन खटका दाबला...ती सरपंचाचीच कार्टी व्हती वाटतं...XXच्यांनी टीव्ही लावला तं लावला....त्यावर फॉरिनची गाणी लावली...अन ती हालणारी चित्रं...आता मी बी ती चित्रं पाहण्यात गुंतलो अन तितक्यात कुणीतरी ठोसा लावला माझ्या थ्वबाडावर...आसला कळवळला जीव...मंग मी बी काय पाहिलं नाही...हात न पाय...वाटेल तसं फिरविलं दांडपट्ट्यासारखं...ल्हानपणापासून सकाळ संध्याकाळ चार-चार लिटर दूध पिऊन केलेली तब्येत हाय ही...काय मुकाट मार खातो का मी...हे हाण हाणला...मार खावून समदे पळाले असतील हागणदारीत...हा हा हा!

- आरं हां...तो सरपंच पडला हाय तिकडं घरात तळमळत...तुझ्या नावानं शंख करतोय...अन ग्रामसेवक रात्रीपासून गेला हाय पळून...पोलिसांत फिर्याद देतो म्हून बोंबलत होता...

- बोंबलू दे भाऊ...सरकार म्हन्तं तंटामुक्त व्हा...आता तंटा करण्याऱयांनाच गावातून हाकलल्याबिगर गावात शांती कशी राहणार? आता बघ हे बोंबल्ये दवाखान्यात हायेत तवर गावात कशी शांती ऱहाते....बघच तू...चल, तंवर आपण आदर्श कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज देवून येवू...!

Tuesday, October 9, 2007

पाण्यात न गेलेले पैसे

देवा, याही देशात पाऊस पाड
देवा, याही शहरात पाऊस पाड...

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी देवाला उद्देशून ही कविता लिहिली. त्यामागे त्यांचे जे काय हेतू असायचे ते असोत. (जर्मनमध्ये तिचं भाषांतर व्हावं, असा हेतू निश्चितच नसावा.) मात्र हीच कविता सध्या मी दिवस रात्र आलापत आहे. मेघराजांची अशी आराधना एखाद्या जातीवंत बेडकानंही केली नसेल. अर्थात तळमळीतील ही उणीव आवाजाने भरून निघते, हा भाग अलाहिदा.

तर, पर्जन्यराजाचा हा असा धावा करण्यामागे माझा काय स्वार्थ असावा, असं वाटलं ना?. शहरातच राहत असल्याने भरपूर पाऊस होऊन चांगले पीक काढावे, असा मी शेतकरीही नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासरशी कवितेचे पाट वाहू घालण्याएवढी काव्यप्रतिभाही आता राहिली नाही. खरं तर, पावसाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मात्र तरीही पाऊस पडावा, यासाठी मी अगदी चातकासारखी वाट पाहत आहे. कारण...

कारण...माझे जर्कीन उर्फ जॅकेट उर्फ् सामान ठेवायची पिशवी उर्फ....बरंच काही! चार महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या या सर्वऋतूसमभाव चीजेसाठी मला हवाय पाऊस. एकदा या शहरात चांगला दणदणीत पाऊस पडू दे, त्यात न भिजण्यासाठी या प्रावरणाचा उपयोग करू दे...मग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी चिंता नाही, (एक्चुअली कोरडा दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ...मी कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. याबाबतीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि माझं एकमत आहे.) एवढीच माझी आता महत्त्वाकांक्षा आहे.
काय आहे, गेली दोन वर्षे महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीची परंपरा चालू आहे. त्या दोन संकटांशी झगडता झगडता तनू भागलेल्या जुन्या जर्कीनने यंदा कॉलर टाकली आणि त्याच्या रिप्लेसमेंटची तरतूद करण्याची जबाबदारी आली. आता हा योजनाबाह्य खर्च अंगावर पडल्यावर त्यासाठी हालचाली करणंही आलंच. आधीच खरेदीची काडीचीही अक्कल नसल्याची पंचक्रोशीत ख्याती! त्यात पावसाळ्याचा हंगाम बघून विक्रेत्यांनी केलेली सुगीची बेगमी. मग काय विचारता?

म्या पामराने कसाबसा छातीचा कोट करून जून महिन्यात एक जंगी जर्कीन विकत घेतले. आठशेपासून सुरू झालेली बोली खाली आणत पाचशे रुपयांत विक्रेत्याला पटविले आणि काखोटीला मारून ते गाठोडं आणलं. तरीही मनात धाकधूक होतीच. त्यामुळे आधी नव्या वस्तूचं खासगी प्रदर्शनही सुरू झालं. त्यात सर्वांनी 'छान छान, चांगलं आहे' असे शेरे मारल्यावर आमचे गंगेत घोडे न्हाले. आता हा पाऊस आणि हे जर्किन...पहिल्या पावसाच्या मेघगर्जनने मोराने पिसारा फिरवून नाचावे, तसा आनंद झाला.

हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता, हे मला लवकरच कळाले. (दोन अतिपरिचित वाक्यांचे कॉम्बिनेशन करण्याची खुमखुमी बऱयाच दिवसांपासून होती. त्याची आज संधी मिळाली.) खरं सांगायचं तर अपेक्षांवर पाणी फिरले असं म्हणायचंही संधी दिली नाही. जून महिन्यापासून आकाशात ढग जमतायत, वातावरण कुंद होतंय, पण...पावसाचे थेंब काही पृथ्वीपर्यंत येत नाहीत. पावसापासून बचाव करण्यासाठी जर्किन घालून फिरावं आणि घरी परतताना जर्किनमुळे घामाघूम होऊन, ओल्या अंगाने परतावं हेच आता नशिबी आलंय.

हे जर्किन नावाचं प्रकरण अंगावर घेतल्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पाचशे रुपये पाण्यात गेल्याचं दुःख मला दिवसरात्र खायला लागलं. त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी या जर्किनचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यायचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला. (व्यवस्थापनशास्त्रातील मॅक्झिमाईजिंगची संकल्पना हीच ना?) त्याचा पहिला प्रयोग जर्किनच्या दोन्ही बाजूंच्या खिशांवर झाला. मोबाईल, ऑफिसचे कार्ड, पासबुक...अशा चीजवस्तू वाहण्यासाठी हे दोन्ही खिसे अगदी चपखल कामी आले. त्यामुळे वेगळी एखादी बॅग ऑफिसला नेण्याची गरज नाहिशी झाली. मात्र त्याचा एक परिणाम असा झाला, की जर्किनचे दोन्ही खिसे पाण्याने भरलेल्या पखालीसारखे आकाराने फुगु लागले. त्यामुळे आजबाजूच्या लोकांच्या नजरा वेगळ्या अर्थाने जर्किनवर खिळू लागल्या.

त्यानंतर हीच उपयोगाची क्लृप्ती थोडी ताण देऊन वाढविण्याचा मार्ग पत्करला. जर्किनचा विस्तार तसा ऐसपैस असल्याने याबाबतीत फारसा विचार करावा लागला नाही. पूर्वीच्या काळी धोतराचा ज्याप्रमाणे शरीराचा खालचा भाग झाकण्यापासून अंथरूण-पांघरूण होण्याएवढा सर्वप्रकारे उपयोग होत असे, त्याप्रमाणे या जर्किनचा उपयोग होऊ लागला. छातीपर्यंत चेन ओढून घेऊन सदऱयाचे तुटलेले बटन झाकणे, बसमध्ये मळलेल्या सीटची धूळ टाकण्यासाठी असे जर्किनवर प्रयोग सुरू झाले. अगदी अलिकडे तर रेल्वेच्या बर्थवर झोपण्यासाठी अंथरण्यापर्यंत या वस्तुच्या उपयोगाचे क्षितिज रुंदावले आहे. त्यामुळे डेल कार्नेजीसारखं मीही ‘हाऊ टू यूझ जर्किन इन १०० वेज इन इव्हरी वेदर' या किंवा तत्सम नावाने एखादे पुस्तक लिहावे असा विचार करतोय. (या प्रस्तावित पुस्तकासाठीची काही टिपणे जर्किनच्या डाव्या खिशात ठेवली आहेत. )

हे एवढे प्रात्यक्षिक करूनही त्यातून मिळतं ते एकप्रकारचं कोरडं समाधानच! एवढे होऊनही माझा आशावाद मला अद्याप सोडून गेलेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचाही नसेल एवढा माझा विश्वास आहे. आज ना उद्या शहरात पाऊस पडेल, आज ना उद्या पावसापासून बचावल्याच्या आनंदाचा शिडकावा तरी मिळेलच, याची आशा अद्याप माझ्या मनात शिल्लक आहेच. त्यासाठीच...केवळ त्यासाठीच पाऊस पडावा, यासाठी मी देवाचा धावा करतोय!
--------------

कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !

गेला सुमारे महिनाभर झाला तमिळनाडू आणि खासकरून त्या राज्याचे मुख्यमंत्री मुथ्थुवेल करुणानिधी चर्चेत आहेत. अर्थात ही चर्चा त्यांना किंवा अन्य कोणालाही फारशी भूषणावह ठरावी, अशी नाही. मात्र करुणानिधी यांचा वैचारिक आणि राजकीय प्रवास ज्यांना माहित आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट फारशी नवी नाही. इंग्रजी माध्यमांतील खबरांवर पोसलेल्या आणि तमिळ वगळता अन्य माध्यमांनीही यात करुणानिधी यांच्याबद्दल वेगळवेगळ्या बातम्या देण्यात कसूर ठेवली नाही. मात्र देवाच्या नावाने बोटे मोडणारे करुणानिधी स्वतः अंधश्रद्धाळू असून, आपली पिवळी शाल घेतल्याशिवाय घराबाहेरही पडत नाहीत, अशी एखादी माहिती कोणी दिली असेल तर शप्पथ! मात्र कशी देणार? त्यासाठी तेथील माहिती असायला हवी ना?


असो. मात्र करुणानिधींच्या या बडबडीमुळे त्यांचे काही चांगले कामही दुर्लक्षिले जातात. या संपूर्ण काळात मला आठवत होते सुमारे वर्षभरापूर्वी तमिळनाडूत सत्तांतरानंतर घडलेले एक सांस्कृतिक नाटक. एखाद्या देशात, राज्यात आपल्या आवडत्या अथवा कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करणे ही सामान्य बाब आहे. ही व्यक्ती कोणती असावी, याचेही निकष सामान्यतः ठरलेले आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे सत्तांतरानंतर रस्त्यावरील धुळीत मिळाल्याची चित्रेही दिसतात. मात्र एखाद्या साहित्यकृतीतील पात्राचा पुतळा एखाद्या शहराने मानाने उभारावा, त्याला अस्मितेचे प्रतिक बनवावे आणि हा पुतळा हलविल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सत्तांतराचा कौल द्यावा, ही जगाच्या इतिहासात क्वचितच घडणारी घटना. ती घडली तमिळनाडूत. कण्णगीच्या पुतळ्याच्या निमित्ताने!
जैन आचार्य व कवी इलंगो अटिगळ याने लिहिलेल्या "सिलप्पदीकारम्‌' या महाकाव्याची कण्णगी ही नायिका. तमिळ साहित्यात गेली सुमारे हजार एक वर्षे हे महाकाव्य अभिजात कृती म्हणून मान्य पावले आहे. त्यातील कण्णगीला स्त्रीशक्तीची प्रतिनिधी, देवी, न्याय मागणाऱ्यांची एक प्रतिमा असे स्थान आहे. तिच्या याच रुपातील एक पुतळा तमिळनाडू सरकारने तयार करवून, चेन्नईतील "मरीना बीच'वर स्थापित केला. सुमारे चार दशके मानाने उभा असलेला हा पुतळा पाच वर्षांपूर्वी जयललिता यांच्या सरकारने रातोरात हलविला. अन्‌ त्यानंतर तिच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू झालेल्या मागण्यांची परिणती गेल्या वर्षी करुणानिधी सरकारने हा पुतळा पुन्हा "मरीना'वर बसविण्यात झाली. एका राजकीय लढ्याचा विषय ठरलेली कोण ही कण्णगी आणि तिचे स्थान काय?


या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आपल्याला "सिलप्पदीकारम'चा कथाभाग लक्षात घ्यावा लागेल. कण्णगी, तिचा पती कोवलन आणि त्याची प्रेयसी माधवी ही यातील मुख्य पात्रे. कण्णगी व तिचा पती ही दोघेही संपन्न व्यापाऱ्यांची मुले. कावेरीपूम्पट्टीनम या गावात त्यांचा सुखाचा संसार चालू असतो. अशातच कोवलनची गाठ माधवी या नृत्यांगनेशी पडते व तो तिच्या प्रेमात वाहवत जातो. त्यात सर्व संपत्ती गमावल्यावर दरिद्र कोवलनचा माधवी उपहास करते, अन्‌ पश्‍चात्तापदग्ध कोवलन कन्नगीकडे परततो. त्यानंतर दोघेही शहर सोडण्याचा निर्णय घेऊन, मदुराईच्या दिशेने निघतात. या वेळी त्यांच्याकडे असते फक्त कण्णगीची रत्नांनी भरलेली तोडयांची जोडी! कोवलन व कण्णगी मदुराईत येतात. त्या वेळी तिथे पांड्य राजा नेडुनचेळियन याचे राज्य असते. तेथे पैशांची जमवाजमव करण्यासाठी कण्णगीचे एक तोडे बाजारात विकण्यासाठी कोवलन घेऊन जातो. त्याच वेळेस राणीच्या तोड्याची चोरी केल्याचा आरोप ठेवून त्याला पहारेकरी अटक करतात. तडकाफडकी सुनावणी करून राजा चोरी केल्याबद्दल कोवलनचा शिरच्छेद करण्याची आज्ञा देतो. त्याची लगेच अंमलबजावणीही होते.


हे ऐकून कण्णगी दरबारात धाव घेते. राजाला जाब विचारते. राणीच्या तोड्यात मोती भरलेले असताना, स्वतःचे तोडे मोडून त्यात भरलेली रत्ने दाखवते. राजाशी वादविवाद करून न्यायनिवाड्यात त्याची चूक झाल्याचे सिद्ध करते. हे ऐकताच अन्यायाची जाणीव होऊन राजा व राणी प्राणत्याग करतात. तरीही कण्णगीचे समाधान होत नाही. ती मदुराई शहराला शाप देते अन्‌ तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने शहर जळून खाक होते. यानंतर शहराच्या ग्रामदेवतेच्या कृपेने तिला मोक्ष मिळतो, अशी या महाकाव्याची कथा आहे. स्त्रीचे पावित्र्य, निष्ठा यांसाठी दक्षिण भारतात कण्णगी प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळविण्यापूर्वी ती पोलची पर्वतांकडे गेली होती. या भागांतील आदिवासी देवीस्वरूपात "कण्णगी अम्मन'ची पूजा करतात. येथील "मुदुवन' आदिवासी स्वतःला कन्नगीसोबत आलेल्यांचे वंशज मानतात. श्रीलंकेतही तिची पूजा होते. तेथे सिंहली बौद्ध लोक "पतिनी' या नावाने; तर तमिळ हिंदू "कण्णगी अम्मन' नावाने तिची पूजा करतात.


एका हातात तोडा घेऊन, दुसऱ्या हाताचे बोट राजाकडे करणाऱ्या कण्णगीचा पुतळा चेन्नईकर अभिमानाने मिरवित. त्यांच्यासाठी तो तमिळ अस्मितेचे प्रतिक होता. द्रमुक पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आला, तेव्हा दुसरी जागतिक तमिळ परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी जानेवारी 1968 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. सी. अन्नादुराई हे मुख्यमंत्री व करुणानिधी तेव्हा सार्वजिक बांधकाम मंत्री होते. कवि, लेखक, पटकथा लेखक व समीक्षक असलेल्या करुणानिधी यांना "कलैञर' (कलामर्मज्ञ) असे म्हटले जाते. "सिलप्पदिकारम'मधील अनेक वचने ते भाषणांत वापरतात आणि या महाकाव्यावर आधारित "पुम्पुहार' या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांच्याच पुढाकाराने हा पुतळा "मरीना'वर बसविण्यात आला.


डिसेंबर 2001च्या एका मध्यरात्री जयललिता यांच्या आदेशावरून हा पुतळा हलविण्यात आला. एगमोरमधील एका संग्रहालयात त्याला हलविण्यात आले. त्याचे निश्‍चित कारण अद्याप माहित नाही. ती जागा सपाट करून त्यावर रस्ता तयार करण्यात आला. "वास्तुशास्त्रा'च्या दृष्टीने तो अशुभ असल्याचे ज्योतिषाने सांगितल्याने जयललितांनी हा आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यावर मोठा गदारोळ झाला. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत रंगीत टीव्ही, दोन रुपये किलो तांदूळ अशा मुद्यांबरोबरच कण्णगीची पुनर्स्थापना करण्याचेही आश्‍वासन करुणानिधी यांनी दिले. तेरा मे रोजी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन जून रोजी त्यांनी या पुतळ्याची खरोखरच पुनर्स्थापना केली. करुणानिधी यांच्या या निर्णयाचे राजकीय नेत्यांबरोबरच कवी, विद्वान आणि साहित्यिकांनी स्वागत केले. त्यावेळी पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचे प्राध्यापक एरिक मिलर यांनी 'हिंदू'मध्ये लेख लिहून या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात,"" संपत्ती नसतानाही अथवा कुटुंबीयांचे पाठबळ नसतानाही एखादी स्त्री न्याय मागू शकते, तो मिळवू शकते हे कण्णगी दर्शविते. ती खरोखरच न्याय मागणाऱ्या सामान्यांची प्रतिनिधी आहे.'' न्यायदानातील चुकीमुळे पतीचा जीव गेल्यामुळे आकांत करणारी कण्णगी "मरीना बीच'वरून विनाकारण हलविल्यानंतर काही करू शकली नाही. एरवी कित्येक क्षुल्लक पुतळ्यांवरून राजकारण होणाऱ्या समाजात कुठल्याशा काव्यातील एका पात्राच्या पुतळ्यासाठी कोण दाद मागणार? मात्र तमिळ साहित्य जगत आणि करुणानिधी यांच्यासारख्या कलाप्रेमी राजकारण्यामुळे पाच वर्षांनंतर तिला तिचे स्थान परत मिळाले. हे कण्णगीचे सौभाग्यच! मात्र त्याच करुणानिधी यांना वावादुक विधाने करून स्वतःची प्रतिमा काळवंडून घेण्याची दुर्बुद्धी सुचावी हे त्यांचे दुर्दैव!

---------------


Friday, September 28, 2007

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

दुसरी इनिंग
----------
हमदशाह अब्दाली याच्या भारतातवर तीन स्वाऱया झाल्यानंतर त्याला हग्या मार देऊन परत कधीही न येण्यासाठी जाण्यास मराठ्यांनी भाग पाडले. त्याप्रमाणेच गेल्या दीड एक वर्षात सर्व स्पर्धांमध्ये मार खाल्यानंतर अचानक बीसीसीआयच्या संघाने विजय मिळविला. यात त्यांचे कर्तृत्व होतेच. विजयासाठी त्यांचे कौतुक होणेही साहजिकच होते. मात्र 'अति सर्वत्र वर्जयेत्' या पूर्वजांच्या सल्ल्याकडे लक्ष देतील तर ते भारतीय कसले? त्यामुळे मग केवळ एखाद्या राजाचा राज्याभिषेक सोहळाच भासावा, असा या खेळाडूंचा जंगी सत्कार करण्याचा घाट घालण्यात आला. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच युवराजची आई, रोहितचे बाबा अशा नामवंत आणि तज्ज्ञांच्या मुलाखती विविध वाहिन्यांवरून दाखविण्यात आल्या, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र संघ जिंकल्यानंतर पालीचे हे चुकचुकणे डायनासोरच्या गुरगुराटीत बदलले होते.

रणांगण आणि 'रनांगण' यात भारतीयांची नेहमीच गल्लत होते. त्यात समोर पाकिस्तान म्हटल्यानंतर तर काही बोलायलाच नको. बीसीसीआयचा संघ मुंबईत दाखल झाला आणि तेथून वानखेडे मैदानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी अख्ख्या मुंबई महानगरीच्या वाहतुकीला वेठीस धरण्यात आले. मुंबई म्हणजे काही पुणे नाही, की वाहतूक चालेल आपली रामभरोसे. आधीच गणेश विसर्जनासाठी आदल्या दिवशी शहराला विश्रांती मिळालेली नव्हती, त्यात हा त्रास. अनुत्पादक कामासाठी देशाच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरण्याची काय ही वृत्ती? अन गप्पा करायच्या महासत्ता होण्याच्या.

आता पब्लिक जमा झाली म्हणजे आपले स्वयंघोषित पब्लिक सर्वंटही तिथे पोचणारच. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे या खेळातील 'मंजे हुए खिलाडी.' साहेब सर्वांत आधी मैदानात शड्डू ठोकून हजर होते. त्यांच्या जोडीला महाराष्ट्राचे अतिकर्तृत्ववान मुख्यमंत्री विलासराव देशमुखही मांड ठोकून बसले होते. पवार यांच्या कारकीर्दीतच तर भारतीय क्रिकेटची भरभराट झाली ना! इंग्लंड, दक्षिण आफ्रिका दौऱयातील एकदिवसीय सामन्यांतील मानहानीकारक पराभव, चॅपेल गुरुजींच्या ट्यूशन घेऊन गांगुलीच्या कारकीर्दीचा केलेला खेळखंडोबा, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत १९७९ नंतर न जमलेली पहिल्याच फेरीतील एक्झिट...अशा एकाहून एक चढत्या पायऱयांनी बीसीसीआयचा संघ प्रगती करत होता. त्यात विश्वचषक, मग ती वीस-२०चा का असेना, संघाने जिंकल्यानंतर आपल्या अध्यक्षपदाचे सार्थक झाल्यासे साहेबांना वाटले तर काय नवल? त्यामुळे समस्त भारतीयांना सात शतकांत न मिळालेला गौरव मिळवून दिलेल्यांचा गौरव करण्यासाठी ते ही आले.

'राष्ट्रवादी' आल्यावर 'महाराष्ट्र'वादी न येऊन कसे चालेल. त्यामुळे लातूरचे देशमुखही आले. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पॅकेज दिल्यानंतरही विदर्भात दीडशे-दोनशे शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. तेव्हा देशमुखांचे मन द्रवल्याचं दिसलं नाही. उलट केंद्रातील शंकरसिंह वाघेला नामक नेत्याच्या साथीने गेल्याच महिन्यात शेतकऱयांबद्दल आक्षेपार्ह उदगार काढल्य़ाबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी उद्धारही झाला. मात्र वीस-२० स्पर्धेत संघाने विजय काय मिळविला, देशमुखांची देशभक्ती १०० टक्के जागी झाली. त्यातून त्यांनी खेळाडूंसाठी बक्षीसही जाहीर केले. महाराष्ट्रातील पन्नासेक जवान तरी गेल्या वर्षभरात काश्मीर आणि देशाच्या अन्य भागात शहीद झाले. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही केल्याचे, केल्याचे कशाला जाहीर केल्याचेही आठवत नाही.
याच राज्यातील अन्य खेळांतील अनेक खेळाडू प्रोत्साहनावाचून खितपत पडले आहेत. कोल्हापूरच्या वीरधवल खाडे या जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळावी, यासाठी सकाळने गेल्या वर्षी मोहीम चालविली. शिवछत्रपती पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार जाहीर करूनही अनेक खेळाडूंना ते वेळेवर मिळत नाहीत. त्यावेळी सरकार हलल्याचं दिसत नाही. आता मात्र क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार वाटण्यात पुढाकार घ्यायला तयार. एकतर बीसीसीआय आणि अन्य पुरस्कर्त्यांनी जाहीर केलेल्या पुरस्कारांपुढे राज्य सरकारचे पुरस्कार म्हणजे हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते असाच प्रकार आहे. पण काय करणार, सभा हसली की माकडाला हसावंच लागतं.

एकूणात भारतीयांचं सेन्स ऑफ प्रोपोर्शन चांगलंच बहरू लागलंय. आपल्याच देशात आपण असे वागू लागलो, तर परकीय शत्रूंची गरजच काय?