Wednesday, December 31, 2008

०८ चे आठवावे अनुभव

जानेवारी ०८
डिसेंबरच्या शेवटास झालेल्या जुन्या मित्राचा मृत्यू आणि नव्या नोकरीसाठी झालेली मुलाखत अशा संमिश्र वातावरणात वर्ष सुरू झाले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कॉल येईल असे सांगितलेले असल्याने त्याची वाटच पाहत होतो. अशात ४ तारखेच्या सुमारास इकडची पगारवाढ आणि तिकडची नोकरी असे दोन्ही एकाच वेळेस योग आले. अशा वेळेस दुसरा पर्याय लाथाडणे हा मूर्खपणा ठरला असता. त्यामुळे तोच स्वीकारला. त्याचा फायदा एवढाच झाला की आठ ते दहा दिवसांची सुट्टी मिळाली. या काळात नांदेडला मुक्काम केला आणि आठवण्यासारखी गोष्ट म्हणजे शेवटच्या चार दिवसांत केलेला सुमारे एक चतुर्थांश भारताचा प्रवास! आधी ता. १४ ला नांदेडहून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे गेलो. तेथे एक दिवसाचा मुक्काम करून दर्शन वगैरे करून परतलो. मध्ये एक दिवसाचा खंड करून १६ तारखेला नांदेडहून आधी सिकंदराबादला गेलो. का? तर पॉंडिचेरीच्या नेहमीच्या मार्गापेक्षा वेगळा मार्ग निवडायचा म्हणून. शिवाय नियोजन करून प्रवास करण्याने माणसाने भौतिक स्थानांतरण होते, पण त्याच्या अकलेत काडीमात्र बदल होत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे. ‘यस्तु संचरते देशान’ वगैरे झाल्यानंतर ‘तैलबिंदुरिवाम्भसा’ होण्यात नियोजन हा फार मोठा अडसर आहे. 

असो. मग गाडी थेट सिकंदराबादला जात नाही म्हणून सिताफळमंडी येथे उतरणे, तेथून सिंकदराबादला जाणे असे सव्यापसव्य केले. सिकंदराबादला कळाले, की तेथून चेन्नईला जाण्यासाठी गाडी नाही. मग सिंकदराबादहून हैदराबादला जाणे क्रमप्राप्त झाले. जायचे कसे हे तर माहित नाही. ऑटोरिक्षाला विचारले तर ८० रु. भाडे. शेवटी तीन ठिकाणी विचारणा करून सिटीबसमध्ये चढलो. हैदराबादच्या स्थानकावरून अनेक वर्षांपूर्वी चारमिनार एक्सप्रेसने चेन्नईला गेलो होतो. आता गेलो तर तिथूनही चैन्नईला दुसऱया दिवशीच गाडी असल्याचे कळाले. मला तर तीन दिवसांत पुण्याला परतायचे होते. त्यासाठीही आधी खासगी ट्रॅवल्सकडे चौकशी केली. अशा चार लोकांशी बोलल्यानंतर एवढेच लक्षात आले, की चैन्नईला जाणाऱया बसेस नेल्लुरूहून जातात आणि तिथले भाडे चारशेच्या खाली नाहीत. मग तेथून बस स्थानक गाठले. त्यासाठीही रिक्षावाल्यांशी चार समजुतीच्या गोष्टी बोलून झालेच होते. 

सुदैवाने आंध्र प्रदेशच्या राज्य परिवहन सेवेची भाड्यांच्या बाबतीत तरी खासगी गाड्यांशी स्पर्धा नाही. त्यामुळे दोनशे रुपयांत नेल्लुरूचे तिकिट मिळाले. थंडी मी म्हणत असताना केलेला रात्रभराचा प्रवास आजही मला आठवतो!
 
नेल्लुरूला बारा वाजता पोचल्यानंतर तेथून पुन्हा चैन्नईसाठी गाडी पकडणे आलेच. माझी अपेक्षा अशी होती, की ज्याअर्थी सगळ्या ट्रॅव्हल ऑपरेटर्सच्या तोंडी नेल्लुरूचे नाव होते, त्याअर्थी ते चेन्नईपासून जवळ असेल. मात्र दुपारी दोनच्या सुमारास गाडीत बसल्यावर जेव्हा साडे सहा वाजले तरी चैन्नईची चिन्हे दिसेनात तेव्हा काळजी वाटायला लागली. सरतेशेवटी दिवेलागणीच्या सुमारास चेन्नईच्या भूमीवर पाय टेकले. नांदेडहून निघून एव्हाना चोवीस तासात रेल्वे, ऑटो, सिटीबस आणि दोन राज्यांच्या बस असा एकूण वीस तासांचा प्रवास केला होता. त्यामुळे कोयम्बेडु मोफुसिल बस टर्मिनसवर उपलब्ध असलेल्या डॉर्मिटरीचा उपयोग करण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दुसऱया दिवशी सकाळी पॉंडिचेरीकडे प्रस्थान केले. तिथे श्री अरविंद आश्रमाच्या विश्रामगृहात एक दिवस मुक्काम. तिथेही एका दिवसाच्या बोलीवर खोली मिळाली. त्यामुळे आदल्या दिवशी अकरा वाजता ताबा घेऊन दुसऱया दिवशी सकाळी नऊ वाजता तिथून निघावेही लागले. मलाही एका दिवसापेक्षा जास्त थांबणे शक्य नव्हते. दुपारी पॉंडिचेरीहून निघालो आणि संध्याकाळी चैन्नईला पोचलो. तिथून मुंबई मेल रात्री निघत असल्याने स्टेशनवरच वेळ काढला आणि गाडीत बसलो. तिथून सुमारे चोवीस तासांनंतर पुण्यात उतरलो तेव्हा स्वयंस्फूर्त प्रवासाची हौस मोठया प्रमाणात भागली होती.

आता वर्षभराच्या दगदगीनंतर आणि बंदिस्त जीवनशैलीनंतर मला कोणी विचारलं, असा प्रवास पुन्हा करणार का तर उत्तर देईनः नक्कीच!



यस्तु संचरते देशान पंडितानपर्युपासते
विस्तारते तस्य बुद्धी तैलबिंदुरिवाम्भसा

जो विविध प्रदेशात प्रवास करतो आणि विद्वानांची सेवा करतो, त्यांच्या सहवासात राहतो त्याची बुद्धी तेलाचा थेंब ज्याप्रमाणे पाण्यावर पसरतो त्याप्रमाणे विस्तारते.

नव्या वर्षाचा संकल्प

नव्या वर्षासाठी माझा संकल्प...कोणालाही नव्या वर्षाच्या शुभेच्छा पाठवायच्या नाहीत. गेल्या वर्षीच्या शुभेच्छा अजून संपल्या नाहीत. अन २००८ ची काया अवस्था झाली आहे हे वेगळे सांगायची गरज आहे असे मला वाटत नाही.

Saturday, December 6, 2008


Friday, December 5, 2008

देशाच्या सुरक्षेबाबत देशात मोठी चर्चा चालू आहे. जेथे मूळ हल्ला झाला त्या राज्यात मात्र वेगळीच समस्या उभी आहे.

Friday, November 28, 2008

हा हल्ला नव्हे, युद्धच

मुंबईत गेले दोन दिवस जे घडत आहे, ते नवीन आहे ते केवळ पद्धतीमध्ये. एरवी तसाच अचानक हल्ला, सुरक्षा यंत्रणांची तीच हतबलता, मृतांचे वाढत जाणारे आकडे तेच असं सगळं काही तेच ते आणि तेच ते आहे. एवढे दिवस स्वतः छुपे राहून बॉम्बस्फोट घडविणारी मंडळी आता खुलेआम शहरात घुसून माणसांना त्यांच्या इच्छेप्रमाणे टिपू लागली आहेत. हा अतिरेकी हल्ला म्हणायचा का युद्ध यावर संरक्षण क्षेत्रातील काही तज्ञांची मते घेतली. त्यावर त्यांचे म्हणणे हे हल्ला नव्हे, युद्धच आहेः

व्हाईस एडमिरल (निवृत्त) ओमप्रकाश बन्सल यांच्या मते, "बुधवारी मुंबईत घडलेला हल्ला किंवा त्याआधी दिल्ली, अहमदाबाद इ. शहरांमध्ये घडलेले हल्ले हे युद्धाची घोषणाच आहेत. केवळ ते अपारंपरिक युद्धात मोडते, त्यात शांतताप्रेमी नागरिक हे मुख्य लक्ष्य असतात आणि सत्ता नसलेले पक्ष त्यात भाग घेतात. यातील शत्रू हा दहशतवादी असतो आणि त्याला कोणताही देश, जात वा धर्म नसतो. मग आपण कोणाशी लढायचे, चर्चा करायची किंवा विध्वंस करायचा? यात कोणत्याही एका संस्थेचे अपयश नाही. देशात अनेक संस्था आहेत. त्यामुळे हे एकूणच व्यवस्थेचे अपयश आहे. समुद्र किंवा किनाऱयाजवळील प्रत्येक बोटीची तपासणी करणे अशक्यच आहे कारण भारताच्या एवढ्या विशाल किनाऱयावर ते महाकठीण काम आहे. गुप्तचर संस्थांकडून येणारी माहिती संकलीत करणे, त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर कारवाई करणे यासाठी एखादी संस्था असली तर त्याचा फायदाच होईल. मात्र अशा एखाद्या संस्थेला नीट कार्य करायचे असेल तर त्यासाठी संसदेच्या मान्यतेचे पाठबळ हवे. केंद्रीत झालेल्या जबाबदारीची संस्था आपल्याला हवी आहे आणि तिला सर्वांकडून सहकार्य हवे. "

कर्नल (निवृत्त) अजय मुधोळकर म्हणाले, "मुंबईतील संघर्ष हा लो इन्टेन्सिटी कन्फ्लिक्ट आहे. तो निश्चितच युद्ध नाही. कारवाईच्या स्वरूपावरून तिन्ही दलांनी त्यात भाग घ्यायचा अथवा नाही याचा निर्णय घेण्यात येतो. आपल्या सागरी हद्दीत मात्र टेहळणी यंत्रणा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. एवढा मोठा किनारा आणि फारसे सख्य नसलेले शेजारी देश या पार्श्वभूमीवर टेहळणी सुधारण्याची खरोखर गरज आहे. तेलांच्या विहिरींसारख्या आपल्या आर्थिक हितसंबंधांसाठीही ते महत्त्वाचे आहे. मात्र या क्षेत्रात असलेल्या संस्थांची मोठी संख्या आणि स्पष्ट धोरणाचा अभाव यांमुळे ही घटना या संस्थांचे अपयश नाही तर त्यांनी केलेली हयगय भोवली असे म्हणावे वाटते. आता यासंबंधात स्पष्ट धोरण ठरविण्याची आवश्यकता राज्यकर्त्यांना वाटायला हवी. सगळेच विचारी राजकारणी अशा धोरणाची गरज मांडत आले आहेत, मात्र कोणत्यातही अनाकलनीय कारणांमुळे ते प्रत्यक्षात उतरू शकलेले नाही. खासकरून आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे देशात एखाद्या एकीकृत यंत्रणेची गरज आहेच, कारण अशा तंत्रज्ञानाचा फायदा दहशतवाद्यांनाही होतोच.

पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि धोरणात्मक संशोधन विभागातील प्रपाठक डॉ. विजय खरे यांच्या मते, "भारताच्या धरतीवर आणि परकीय मदतीने लढविले जात असलेले हे पहिलेच असिमेट्रिक वॉर आहे. पोलिस दल, अर्धसैनिक बले आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये अधिक सुसूत्रीकरण हवे. असे सुसूत्रीकरण असते तर करकरे व अन्य अधिकाऱयांचे प्राण वाचले असते. पोलिस दलांना आधुनिक आणि सुटसुटीत शस्त्रे मिळायला हवीत."

Saturday, November 22, 2008

गर्व से कहो अतिरेकी है

सुमारे महिनाभर झाला असेल. आमची तबियत बहोत खुश आहे. काय आहे, की फुसके बॉम्ब करू नका अशी समज खुद्द शिवसेनाप्रमुखांनी दिल्यानंतर देशात माणसांना मारण्यासाठी बॉम्बनामक अस्त्रे वापरण्याची खुबी हिंदुनीही उचलल्याची खात्री आताशा होऊ लागली आहे. हिंस्रपणात मागे राहण्याची जी खंत एवढे दिवस आम्हाला लागून राहिली होती, तिची जागा अभिमानाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, शांतता आणि सबुरी पाळण्याची शिकवण सतत ऐकत राहण्याची आता आपल्याला गरज राहिली नाही. आता अन्यधर्मीयांनाही ते ऐकावे लागणार.

म्हणजे बघा, की आताआतापर्यंत काय व्हायचं की कुठेतरी एखादा फटाका उडावा तसा बॉंब फुटायचा अन लगेच सगळीकडे बोंबाबोंब व्हायची. पोलिस कुठेतरी एक-दोघांना उचलायचे. ते नेमके मुस्लिम निघाल्याने पुढील कारवाई काय करायची याची चिंता सरकारला लागायची. (जे बॉंब फोडल्याशिवाय जागचे सरकत नाही, ते सरकार अशी सरकारची अलिकडची व्याख्या आहे.) मग सरकार हिंदु आणि तत्सम बुळबुळीत धर्मीयांना शांतता आणि सलोखा बाळगण्याचा शहजोग सल्ला द्यायचे.
आता मात्र ती परिस्थिती पालटली. आता हिंदुंचे स्वतःचे दहशतवादी तयार झाले आहेत. आता हे पहिल्या पिढीचे दहशतवादी असल्याने फक्त सायकल किंवा मोटारसायकलींचे तुकडे करणे, एक दोन लोकं मारणे असे किरकोळ प्रकार चालू आहेत. थोड्याच काळात मात्र आपल्या या अतिरेकी बंधुंच्या कौशल्यात बऱयापैकी सुधारणा होणार आणि फुल फ्लेज्ड् दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते सराईत होतील याची आम्हाला शंका नाही.

बाकी हिंदु दहशतवाद्यांची उपद्रवक्षमता काहीशी वादग्रस्त असली तरी त्यांची दखल मात्र अगदी व्यावसायिक दहशतवाद्यांसारखी घेतली जात आहे. आता हेच बघा ना, कोणत्याही घटनेत एखाद्या संशयिताला पकडला, की कशा त्यांच्या शेजाऱयांच्या नाही हो, आम्हाला कधी वाटलंच नाही तो असं काही करत असेल म्हणून, या छापाच्या बातम्या येतात. तो संशयित शाळेत असताना कसा कुशाग्र विद्यार्थी होता, सोसायटीत सगळ्यांना मदत करायचा वगैरै कहाण्या येऊ लागतात. आपल्या हिंदु अतिरेकींबाबतच्या अशा अनेक कथा येऊ लागल्या आहेत. म्हणजे काय, भर रस्त्यातून येता जाता तो ओरडून सांगायचा की मी अतिरेकी आहे, मी अतिरेकी आहे असं अजूनतरी कोणी म्हणालेले नाही, याचा अर्थ आपले अतिरेकी योग्य मार्गावरून जात आहेत.

हिंदु लोकांनी असेच नवनवीन बॉम्बस्फोट घडवून आणले, की मग त्यांनाही आपले खरे जीवन दहा अकरा शतकांपूर्वीच्या कल्पनांनुसार चालवायला हवे, असा साक्षात्कार होईल. पुराणातील कायदे हेच जगाचा उद्धार करू शकतील, हे दाखवून देण्यासाठी हिंदु अतिरेकीही वेबसाईट, ब्लॉग अशा अत्याधुनिक साधनांचा वापर करू लागतील. त्यांचा उद्देश माणसं मारण्याचा नव्हता तर ते गरीब आहेत आणि नोकरी धंदा नसल्याने टाईमपास म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगायला अनेक राजकारणी पुढे येऊ लागतील. मग आधी मुळात दहशतवाद्यांना पकडू न शकलेले आणि पकडलेल्यांना शिक्षा न देऊ शकलेले सरकार लोकांना (म्हणजे स्फोटात मरणे शक्य न झालेल्यांना) शांतता पाळण्याचे आवाहन करू शकेल. त्यामुळेच म्हणा, गर्व से कहो अतिरेकी है.

Saturday, November 1, 2008

पहिले दिवाळी लेखन

दिवाळी म्हणजे फराळ, फटाके आणि जाडजूड दिवाळी अंक. दिव्यांच्या उत्सवाची आमच्या मनावर ठसलेली ही छबी. जसजसं वय वाढू लागलं तसतसं या छबीतील अन्य छटा धूसर होऊ लागल्या. नाही म्हणायला दिवाळी अंकांचा उजेड मात्र दरवर्षी पडायचा. त्याच त्या लेखकांची, केवळ नावामुळे झालेली भरती आणि मानधनाच्या हव्यासापायी त्यांनीही केलेले बेचव लेखन यामुळे दिवाळी अंक काय दिवे लावतात हेही लख्ख दिसू लागले. त्यामुळे यथावकाश त्यांच्याशी संबंधच तुटला.

पत्रकारितेत सहा वर्षे घालविल्यानंतरही त्यामुळेच कधी दिवाळी अंकांच्या वाटेला जायचे धाडसच झाले नाही. मात्र काही सहकाऱयांना दसरा उलटला की अगदी सुगीचे दिवस आल्याचा आनंद व्हायचा. "यंदा अकरा अंकांमध्ये हजेरी आहे आपली," भविष्यापासून पुराणकालीन संस्कृतीपर्यंत तलवारीप्रमाणे सपासप लेखणी चालविणाऱया एका सहकाऱयांनी टाळीसाठी हात पुढे करत सांगितले होते. माध्यमांत पहिलेच वर्ष असल्याने रिकामे बसून अनेक कामे लिलया करणारी अनेक माणसे प्रत्येक संस्थेत वारत असतात, याची तेव्हा जाणीव नव्हती. त्यामुळे त्या सहकाऱयाच्या वाक्याला माझी दाद टाळीच्या स्वरूपात नव्हे तर त्यांना टाळायच्या स्वरुपात होते. मात्र अशा पद्धतीने एका अंकात 'मी आणि माझा देव', दुसऱया अंकात 'एक दुर्लक्षित स्थानः मौजे टुकारवाडी', तिसऱया अंकात 'राष्ट्रीय एकात्मता आणि महिला मंडळांचे कार्य' अशा नाना रितीने मजकूर पाडणाऱया लेखकांकडे भुईनळ्यांकडे पहावे तितक्याच अंचब्याने पाहतो.

गेल्या वर्षी एका दिवाळी अंकात लेख लिहिला होता. दौंड तालुक्यात प्रसिद्ध होणाऱया एका गावप्रसिद्ध (जगप्रसिद्धच्या धर्तीवर) अंकाच्या संपादकांनी अत्यंत प्रेमाने तो मागितला. माझ्याही खिशाची तब्येत तेव्हा अशीच होती, की अशा प्रकारचा कोणताही डोस त्याला चालला असता. सुपरस्टार चिरंजीवीवर लिहिलेला एक लेख मी त्या अंकात खपवला. त्या अंकाचा सगळाच प्रकार हौशी मामला असल्याने त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तरीही मानधनाची रक्कम आणि लेख छापलेला अंक मला त्यावेळी मिळाला, ही त्या हौशी प्रकाशकाची व्यावसायिकता कौतुकास्पदच म्हटली पाहिजेत. कारण 'लोकमत समाचार' या हिंदी वर्तमानपत्राला कविता पाठविल्या होत्या तेव्हा मार्चमध्ये छापलेल्या कवितांचे मानधन (तब्बल रु. १५) मे महिन्यात मिळाले होते. पाठविलेल्या पाच कवितांपैकी नक्की कोणत्या कविता छापल्या होत्या हे मला आज बारा वर्षांनीही माहित नाही.

आता हे सांगायचं कारण म्हणजे, यंदाच्या दिवाळीत आमच्या ह्या 'अनाघ्रात पुष्प' अशा प्रतिभेला ऑनलाईन पंख फुटले. खऱया अर्थाने चर्चा आणि वाद करत ज्ञानाची आराधना करणाऱया 'उपक्रम' या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवाळी अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला. भाषा आणि तंत्रज्ञान हे माझे जिव्हाळ्याचे दोन विषय. (या लेखाचे १०० हून अधिक वाचने झाल्याचे दिसते त्यावरून लोकांनाही तो भावला असावा, अशी आशा आहे.) या दोन्ही विषयांची गुंफण असणारा एक लेख लिहिला कारण या विषयावर मराठीत एकही बातमी किंवा लेख मी वाचला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षभरात बातम्यांच्या निमित्ताने मिळालेल्या माहितीच्या आधारे लेख लिहिला. विशेष म्हणजे 'उपक्रम'च्या संपादक मंडळानेही तो प्रकाशित करण्याच्या लायकीचे मानले.

उपक्रमच्या दिवाळी अंकाचा हा दुवा आणि माझ्या लेखाचा हा दुवा.

Sunday, October 26, 2008

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

दिव्यांच्या संगतीने आपले आयुष्य आणि आत्मा उजळून निघावा! दिवाळी आणि नववर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!

Tuesday, October 21, 2008

आधीच मर्कट त्यात...कॅमेरा मिळाला

नाशिक जिल्ह्यातील वणी हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ. तेथील सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी दुरदुरून लोक येतात. (त्यांना सरसकट भाविक असं म्हटलं जातं.) महाराष्ट्रात मांगल्य कायम असलेल्या मात्र ते झपाट्याने गमावत असलेल्या काही स्थळांपैकी ही जागा. ज्याला पर्यटनाला जायचे त्याने पर्यटनाला जावे आणि त्याला श्रद्धेने जायचे त्याने श्रद्धेने जावे अशी ही विशिष्ट जागा आहे.

सर्वच डोंगराळ भागांमध्ये असतात तसेच येथेही माकडं आहेत. देवीच्या दर्शनाला आलेल्या लोकांच्या हातातील, स्वतःला हवाशा वाटतील त्या वस्तू हिसकावून घेणे हा या माकडांचा हातखंडा प्रयोग. शिवाय त्यांनी तसे हिसकावून घेतलेच, तर परत ५०० पायऱया उतराव्या लागतील म्हणून या दर्शनार्थ्यांनी प्राणपणाने स्वतःच्या वस्तू जपण्यासाठी केलेली धडपड, हे त्यातील ऍडिशनल मनोरंजन. देवीच्या मंदिरात त्या माकडांना पाहून लोकांना जेवढी गंमत वाटते, त्याहून कित्येकपट गंमत त्या माकडांना या लोकांच्या चेष्टा पाहून होत असाव्यात असं माझं ठाम मत आहे.

अलिकडे तर कॅमेरा आणि मोबाईलच्या सुळसुळाटामुळे माकडांचे वंशज खूपच चेकाळले आहेत. माकडांना गाण्यातील काही कळत नाही, दुर्दैवाने त्याच्या वंशजांना गाता तर येतेच शिवाय ते गाणे कुठंही वाजविण्याची सोय मोबाईलमुळे झाली आहे. त्यामुळे तारस्वरात कुठला तरी गदारोळ चालू करून मोबाईल मिरविण्याचा चंग बांधणारे वीर आताशा जास्त दिसू लागले आहेत. परवाच एके ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलेला प्रकारः
सकाळचे पावणे पाच वाजले आहेत. समोर बसलेली व्यक्ती कोणालातरी मोबाईलवरून कॉल करते. त्या तेवढ्याच धन्य पुरुषाने लावलेली डायलर टोन याला इतकी आवडते की ही पहिली व्यक्ती स्पीकर फोन सुरू करते. ज्याला कॉल केलेला असतो तो चरफडत फोन उचलतो, या वेळेला कशाला त्रास देतो म्हणून शिव्या घालतो (स्पीकरफोन चालू बरं का!) आणि फोन ठेवून देतो.

पहिली व्यक्ती पुन्हा फोन लावते. तो पुन्हा उचलतो.पुन्हा चरफडणे. पहिली व्यक्ती समोरच्याला फोन सायलंट करायला सांगते. त्यानंतर सार्वजनिक शांतता भंगाचा तो अत्याधुनिक बिग बँग प्रयोग चालू राहतो.

तर आपण वणीत होतो. या ठिकाणी माकडांना भरपूर खाद्य मिळत असल्याने त्यांची गर्दी असणे हे नवल नव्हते. मात्र त्यांच्या लीला पाहून माझ्यासकट सगळ्याच कॅमेराबाजांनाही चेव आला. मग काय, मंदिरात माकड पुढे पळतंय आणि आम्ही आपले कॅमेरे घेऊन त्यांच्यामागे पळतोय, अशा दृश्यांची मालिका सुरू झाली. तेही बेटे आपले फोटो सेशन करण्यासाठी नाना क्लृप्त्या करत होते.

काही वेळ असे फोटो काढल्यानंतर मात्र कंटाळा आला. आपण आलो कशासाठी आणि करतोय काय, असं वाटायला लागलं. आधीच मर्कट त्यात मदिराच प्याला, अशी काहीशी म्हण ऐकलेली होती. मात्र मदिरा न घेताही कशा मर्कटलीला करता येतात, हे या वेळी कळाले.
(या मर्कटचेष्टांची क्षणचित्रे इथे आहेत.)

Friday, October 3, 2008

चल भाऊ, डोकं खाऊ!

मी पुण्यात राहतो. आता खरं तर हे आपणहून सांगायची गरज नाही. कारण कोणतीही व्यक्ती इतरांना न कळालेली गोष्ट आपल्याला कळाली आहे अशा आविर्भावात सांगू लागला, की तो एकतर पुण्यात राहतो किंवा केव्हा ना केव्हा पुण्याचं पाणी चाखलेला आहे हे लक्षात येतं. पुण्यात राहणार्‍या प्रत्येकाला नागरिकत्वाचा दाखला मिळो न मिळो, पण शहाणपणाचा मक्ता मिळालेला असतो हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट नाही तरी शनिवारवाड्याइतके उघड खचितच आहे.
तर अशा या शहाणपणाच्या पुण्यनगरीत अन्य लोकांना असतात तशाच सवयी मलाही आहेत. 'अभिमानाने सांगाल रांगेत उभे राहून या हॉटेलमध्ये जेवलो,' हे माझही ब्रीद आहे. 'ज्ञान मिळविताना असे मिळवा की आपल्या कधी मॄत्यू येणारच नाही, पुण्य करताना असा विचार करा की आपल्याला उद्याच मॄत्यू येणार आहे,' असं एक संस्कॄत वचन आहे. त्यात बदल करून मी असं वागतो, की 'जेवण करताना मी असं करतो की आपल्याला उद्याच मरण येणार आहे आणि जगाला उपदेश देताना असा देतो, की जगाच्या सुरवातीपासून मी येथे एकटाच शहाणा आहे.' तास तासभर दरवाजाजवळ 'ताट'कळत उभे राहिल्याशिवाय माझं पोटच भरत नाही. आणि एकदा का पोट भरलं की अख्ख्या जगाला फुकटची शिकवणी देण्याची जी मजा आहे, ती अन्य कशात आहे काय?

असं एकूण बरं चाललं असलं तरी आपण जास्त खातो की काय, अशी एक शंका मनाला चाटून जात होती. सांगणारे असंही सांगतात, की मी जगण्यासाठी खात नसून खाण्यासाठी जगत असतो. अन त्या खाण्याची रेंजही मोठी आहे. मात्र माझ्या या भूकेला आता शास्त्रीय आधार मिळाला आहे. मी माझ्या आयुष्यासाठी, वैयक्तिक फयद्यासाठी खावखाव करत नसून त्याचा माझ्या कौतुकास्पद बुद्धिमत्तेशी थेट संबंध आहे, असं शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. त्यांच्या मते, बौद्धिक काम करणारी माणसं अधिक खातात. माझ्यावर खार खाऊन असणार्‍या लोकांच्या हे संशोधन पचनी पडणार नाही, हे मला पक्कं ठाऊक आहे। मात्र कोंबडं झाकलं तरी सूर्य उगवायचा राहतो थोडाच? आता शास्त्रज्ञांनी आणखी एक उपकार करावा। त्यांनी बुद्धिमान माणसे आळशी असतात असाही एक शोध लावावा. दिवस रात्र बसून राहणारी, कोणतंही काम व करणारी आणि आराम करायला मला वेळ पुरत नाही, अशी तक्रार अभिमानाने करणारी जी मोजकी मंडळी आहेत, त्यांची बुद्धिमत्ता इतरांपेक्षा जास्त असते, असा निष्कर्ष काढणारे एखादे संशोधन त्यांनी करावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी लागेल तितक्या वेळा सँपलिंग करण्यासाठी इतरांना सांगण्याचे माझी तयारी आहे। म्हणजे कसं, माझी प्रोफाईल पूर्ण होईल.

Sunday, September 28, 2008

वाघनखांचा शिर ‘पेच’

इंग्रजी पत्रकारितेत आलो, तेव्हा कोणत्या बातम्या कराव्या लागतील किंवा मी करेन, याबाबतीत इतरांइतकीच मलाही शंका होती. मात्र गेल्या महिन्यात मी दिलेल्या दोन बातम्यांमुळेच मला स्वतःला मी करत असलेल्या कामाबाबत अभिमान वाटत आहे। पहिली बातमी विंचूरकर वाड्याच्या बाबत होती. माझी गेली पोस्टही त्याचसंबंधात होती. ती बातमी पुणे मिररमध्ये आल्यानंतर मुंबई मिररनेही छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यात उल्लेख असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेतली. ते स्वतः गणेशोत्सवाच्या काळातच पुण्यातील विंचूरकर वाड्यात येऊन गेल्याचे मला कळाले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधात फॉलो-अपसाठी विचारणा करण्याची जबाबदारी साहजिकच येऊन पडली.

विविध मार्गांनी आर. आर. आबांशी संपर्क साधल्यानंतर, यथावकाश मूळ बातमीचा इम्पॅक्टही छापला. त्याचवेळेस आणखी एक मोठी बातमी माझ्या हाताला लागली. ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असल्याची.

आता ही बातमी मूळातच एवढी मोठी होती, की ती अगदी व्यवस्थित तयारी करून, सर्व माहिती करून आणि खातरजमा करूनच द्यावी लागणार होती। त्यामुळे आधी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून आधी यासंबंधात माहिती मागवली. ‘कदाचित शिवाजी महाराजांची असणारी वाघनखे आमच्या संग्रहात आहेत. ती प्रदर्शनासाठी पाठविण्याबात आम्हाला विनंती करण्यात आली आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांचे उत्तर आले. अर्धे काम त्यात फत्ते झाले!

आता जबाबदारी होती आबांना स्वतःला विचारण्याची. त्यासाठी त्यांना फॅक्स केला, फोन करायचा प्रयत्न केला मात्र उत्तर काही आले नाही. त्यावेळी गणेशोत्सव चालू असल्याने साहेब गणपती पहायला गेले आहेत, असे त्यांचे कर्मचारी सांगायचे. (होय, असंच सांगायचे.) शेवटी जलसंपदा विभागातील यांत्रिकी विभागाच्या कार्यक्रमासाठी आबा येणार आहेत, असे कळाले तेव्हा तिथेच त्याना गाठायचे ठरविले. त्याच कार्यक्रमाच्या संबंधात मानार हाऊसची एक बातमी दिलेली असल्याने तिथंही अर्धे काम झाले होतेच.

त्या कार्यक्रमात तानाजी खोत याच्यासोबत नेट लावून बसलो. चार मंत्र्यांची बडबड, एका राजकीय कार्य़कर्त्याची चापलूसगिरी आणि काही सरकारी अधिकाऱयांची लाचारी सहन केल्यानंतर आबा व्यासपीठावरून उतरताना त्यांना गाठले. पाऊस मी म्हणत होता आणि इकडे आमच्या बातमीदारीचा कस लागत होता. कार्यक्रमाला आलेल्या अन्य सात-आठ बातमीदारांना झुकांडी देऊन, एकदाचा आबांचा कोट आम्हाला मिळाला.

“प्रस्ताव दिला होता त्यांना. आम्ही सुरक्षा पुरवावी अशी त्यांची मागणी आहे. ती फाईल चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली आहे,” आर. आर. पाटील म्हणाले आणि आमचे घोडे गंगेत न्हाले (म्हणजे शेजारून वाहणाऱया मुळा नदीत) नंतर जेवणावर ताव मारला तरी पोट आधीच भरले होते.

त्यानंतर इतिहास तज्ज्ञांना विचारावे, तर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. त्यामुळे त्यांच्या आधीच्या एका लेखातूनच माहिती घेतली. निनाद बेडेकर यांना फोन केला तर त्यांचे म्हणणे असे, की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. हा एक नवाच पेच निर्माण झाला होता. होता म्हणजे आहे. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.
विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ते छायाचित्र खरे आहे अथवा नाही, याबाबत काहीही भाष्य केलेले नाही। मात्र मूळ वाघनखांचे छायाचित्र मला पाठविल्याचा मेल पाठविला. पण त्यात छायाचित्राची लिंक नाही. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता वाघनखांचे (टाईगर क्लॉ) एक वेगळेच छायाचित्र दिसते. मात्र त्यात महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. असा हा घोळ आहे. अन तरीही, वाघनखांची बातमी ही माझ्या पत्रकारितेचा शिरपेच आहे!

Tuesday, September 2, 2008

विंचूरकर वाड्याची दुरवस्था

वघ्या महाराष्ट्रात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. उत्साहाच्या या काळात, ज्या ठिकाणी या उत्सवाने बाळसे धरले, जेथे तो वाढला ती जागा मात्र आज दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाची बळी ठरत आहे. बहुतेकांना तर या जागेचे महत्त्वही माहित नाही. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली ही वास्तु अगदी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहे.

विंचूरकर वाडा ही तशी पेशवेकालीन वास्तु. पेशव्यांच्या सरदारांपैकी असलेले विठ्ठ्ल शिवदेव यांनी बांधलेला हा वाडा सुमारे १६,००० चौ। फुट आकाराचा आहे. लोकमान्य टिळक येथे १८९२ पासून १९०७ पर्यंत राहत होते. याच काळात लोकमान्यांनी १८९४ साली पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. लोकमान्यांच्याही आधी भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गणपतीची स्थापनी केली होती. मात्र त्याला सार्वजनिक आणि सुसंगत रूप मिळाले लोकमान्यांमुळे. त्यावेळी लोकमान्य टिळक कायद्याच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत असत. त्यामुळे या गणपतीला 'लॉ क्लासचा गणपती' म्हणून ओळखले जात असे. लोकमान्य गायकवाड वाड्यात जाईपर्यंत येथेच सार्वजनिक गणपती बसत असे.

आज मात्र हा वाडा अगदीच दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राचे घोषणाशूर गॄहमंत्री आर। आर. पाटील यांनी या वाड्याला भेट दिली होती. त्यावेळेपासून या वाड्याबद्द्ल मला उत्सुकता होत्ती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात आम्ही या वाड्याला भेटही दिली होती. तेव्हा तिथली अवस्था पाहून मन जरा खट्टूच झाले. त्यामुळे यंदा बातमी करण्याची संधी मिळाली, तेव्हा या वाड्यावर मी लक्षच ठेवून होतो. बातमी करण्यासाठी गेलो तेव्हा कळाले, की वाड्याचा ताबा मुळात या गणेश मंडळाकडे नाहीच आहे. 'लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट' या मंडळाला गणपतीच्या केवळ दहा दिवसांसाठी ताबा मिळतो. इतर वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हा ताबा असतो. या मंडळाचे कर्मचारी सामान ठेवण्यासाठी या खोलीचा वापर करतात, असे कळाले. ट्र्स्ट्चे एक विश्वस्त रविंद्र पठारे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी तर या कर्मचार्‍यांनी खोलीतील ऐतिहासिक तसबिरी बाहेर काढण्याची मजल गाठली होती. हे ऐकून मी मराठी माणसांच्या इतिहास प्रेमाला मनातूनच साष्टांग दंडवत घातला.

पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाडा विकल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. "पुढच्या वर्षी गणपती बसवू का नाही, याची आम्हाला शंकाच आहे," पठारे म्हणाले तेव्हा परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव झाली।

केवळ गणपतीच नाही, आणखी एका ऐतिहासिक घटनेमुळे या वाड्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद यांचे या वाड्यात काही दिवस वास्तव्य होते. लोकमान्य टिळक मुंबईहून पुण्याला येताना त्यांची आणि स्वामींजीची भेट झाली होती. स्वामींजीच्या विद्वत्तेने प्रभावित झालेले लोकमान्य त्यांना घरी घेऊन आले. याच विंचूरकर वाड्यातील एका खोलीत स्वामीजी राहत होते. काही दिवस वास्तव्य केल्यानंतर स्वामीजी कोणालाही न सांगता एके दिवशी निघून गेले. अशा या विलक्षण घटनेची माहिती आज केवळ मोजक्या लोकांना आहे. आमच्या वर्तमानपत्राने घेतलेल्या लोकांच्या मुलाखतीतून हीच माहिती समोर आली. खरे तर स्मृतीस्थळ म्हणून वर्षभर सुरू असावे, अशी योग्यता असलेली ही वास्तू आज शेवटच्या घटका मोजत आहे. 'कालाय तस्मै नम:' दुसरे काय?

Friday, July 25, 2008

युवराज बहु भाषणात बडबडला

नेहमीच्या शहरी गुत्त्यावरची, म्हणजेच बीअर बारमधील एक संध्याकाळ. नेहमीचीच चार, म्हणजे चार वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील आणि वाहिन्यांतील कार्यकर्ते. चर्चा नेहमीसारखीच म्हणजेच त्या दिवशीच्या महत्त्वाच्या, म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यात पडलेल्या बातम्यांची. घशाखाली उतरणाऱया प्रत्येक घोटाबरोबर प्रत्येक बातमीची चिरफाड आणि शवविच्छेदन चालू. त्यातच जगात कोणाच्याही डोक्यात न आलेली गोष्ट आपण कशी केली आणि त्यावर (काहीही न समजणाऱया) वरिष्टांनी कसा बोळा फिरविला याची साग्रसंगीत वादावादी चालू। हेही नेहमीचेच. फक्त नेहमीसारखी एकच गोष्ट त्या ठिकाणी आहे ती म्हणजे या चार चतुरांच्या सोबत एक पाचवा, पण न पचवणाराही सामील आहे.

"आज काय विश्वासदर्शक ठराव होता ना,” पहिल्याला ओला कंठ फुटतो.
"हो रे, जाम बोर झालं,” दुसरा ओलेता आवाज जणू काही आपणच सर्वांची भाषणे लिहून दिल्याप्रमाणे सांगतो.
"आडवाणी म्हणजे बोगस माणूस. उगीच बडबड करत होता,” तिसरा कॉकटेल आवाज. यावेळी त्या आवाजाच्या मालकाला प्रत्यक्ष पाहिलं असतं तर खुद्द आडवाणींनाही आपली आख्खी राजकीय कारकीर्द फुकट घालविल्याचे आगळे समाधान लाभले असते. चौथा आणि त्यानंतर परत पहिला ते तिसरा असे आळीपाळीने मग मायावती, लालूप्रसाद, करात, चंद्राबाबू नायडू, शरद पवार यांना काडीचीही अक्कल कशी नाही, याची ग्वाही देत देतात. बरं झालं, जॉर्ज बुश किंवा महात्मा गांधी यांचा या नाट्यात सहभाग नाही. नाही तर त्यांनीही राजकारण आणि प्रशासनाचे धडे याच बारमध्ये बसून कसे घ्यावेत, यावर या चौघांनी बौद्द्धिक घेतले असते, याबाबत पाचव्याला शंका उरत नाही.
एव्हाना पहिली फेरी संपलेली असते। दुसऱया फेरीची मागणी झालेली असते. स्वतःची शुद्ध घालवून बसलेले हे चौघे योग्य का शुद्धीवर असूनही निर्बुद्धासारखे बसलेले आपण मूर्ख असा प्रश्न पाचव्याला पडतो.

"राहुलचे भाषण सॉलिड झालं ना,” चौघांपैकी एकजण नव्या बाटलीसह नवा विषय सुरू करतो. नक्की कोण काय म्हणतंय, याची नोंद करणं पाचव्याने बंद केलेलं असतं.
"बेस्ट. आपल्या विदर्भाच्या दोन बायांचे उल्लेख केले. त्यांच्या घरी जाऊन आला तो,” चौघांपैकी एकजण बरळण्याच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या आवाजात बोलतो.
"तुला माहितेय का, तो जो बोलला ना, की गरीबीचे निर्मूलनही ऊर्जेतूनच होणार आहे, ते भारीच होतं. सही पॉईंट काढला ना, " आणखी एक कापरा आवाज बोलला.
"आपण मानलं त्याला. नाहीतर हे लोकं,' पुन्हा सर्व नेत्यांचा उद्धार करत दोन आवाज एक साथ बोलले.
दुसरी फेरी संपत आलेली असते। कोसळण्याच्या बेतात आल्याशिवाय सगळ्या ज्ञानाचे हलाहल पिण्याचे कार्य थांबवायचे नाही, या नेहमीच्या संकेताला अनुसरून तिसरी फेरी सुरू होणार असते.

एकाच टेबलावरच्या दुसऱया काठावर आपला आवाज जात आहे का नाही, याची पर्वा न करता पाचवा बोलू लागतो, "ते तुमचं सगळं ठिक आहे। पण मला एक सांगा, या दोन्ही बाया, ज्यांच्या झोपड्यात तुमचे युवराज गेले त्या विदर्भात गेले होते ना आणि विदर्भातच वीजनिर्मितीचे दोन मोठे प्रकल्प आहेत ना. मग आतापर्यंत ती वीज त्या झोपड्यांत कशी पोचली नाही. दोन झोपड्यांपैकी एका झोपडीतील महिलेच्या नवऱयाने आत्महत्या केली होती. तो विदर्भातीलच शेतकरी असल्याने बाकीच्यांना काही सोयरसुतक नाही हे मी समजू शकतो. पण तेथील शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर करून वर्ष होत आले तरी आत्महत्या थांबत नाहीत, त्या कोणती ऊर्जा मिळाल्यानंतर थांबणार आहेत. देश स्वतंत्र झाल्यापासून (म्हणजे ब्रिटीशमु्क्त) तुमच्या युवराजांच्याच पणजोबा, आजी, वडील आणि आईचे राज्य चालू आहे. त्यांनी कोणते दिवे लावले म्हणून आज कोट्यवधी लोक अशा परिस्थितीत जगत आहेत. त्या भाषणाबद्दल बोलताना आणि लिहिताना तुम्हाला हे प्रश्न पडत नाहीत का रे?”

पाचव्याचे स्वगत संपल्यानंतर चौघेही एकमेकांकडे पाहतात. पार्टी ऐन रंगात आलेली असताना असा थर्ट पार्टी व्यत्यय त्यांना नको असतो. नव्हे, एव्हाना ते याला विसरलेलेही असतात. त्यांची ती अवस्था पाहून पाचवा जायला निघतो. तो गेटबाहेर गेल्याची खात्री झाल्यानंतर पहिला उरलेल्या तिघांना म्हणतो, "तरी मी म्हणत होतो, न पिणाऱयाला आपल्यामध्ये घेत जाऊ नका,” अन ते परत तिसऱया फेरीचे चिअर्स करतात.

Tuesday, July 22, 2008

विश्वासदर्शक ठराव २०-२० चा हवा

दोन दिवस चाललेल्या उखाळ्या पाखाळ्या, निंदानालस्ती आणि काथ्याकुटीनंतर अखेर डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाने, मात्र प्रत्यक्षात सोनिया गांधी यांनी चालविलेल्या सरकारने आपले बहुमत लोकसभेत सिद्ध केले. लोकसत्ताच्या भाषेत सांगायचे तर या दोन महामानवांच्या विरूद्ध समस्त असुर मंडळींनी छेडलेल्या युद्धात, या असुर टोळ्यांचेच नाक कापले गेले. (सोनिया आणि कॉंग्रेस यांच्या नेतृत्वावर शंका घेणारा कोणताही पक्ष लोकसत्ताच्या दृष्टीने टोळ्या असतो.) 

नेहमीच्या चर्चांप्रमाणे आम्हीही टीव्ही बंद ठेवून ही चर्चा एन्जॉय केली. मात्र त्यात मतदानाच्या वेळी ज्याप्रमाणे चुरस निर्माण झाली, त्यावरून २०-ट्वेंटी स्पर्धेची आठवण झाली की नाही? त्यामुळेच येथून पुढे होणाऱया सर्व चर्चा याच स्पर्धेच्या साच्यात व्हाव्यात, असे आमचे एक मत पडले. त्यासाठी हवे तर काही नियम आपण ठरवायलाही तयार आहोत. शंभर स्पर्धांमध्ये मार खाल्ल्यानंतर योगायोगाने २०-ट्वेंटीमध्ये जिंकल्यानंतर, मुंबईत खेळांडूंची वरात काढून मिरवून घेणारे शरद पवारच संसदेतही फिक्सिंगच्या प्रयत्नात असतात. सोबतीला अंबानी बंधू, विजय मल्ल्या अशी मातब्बर आणि क्रीडाप्रेमी मंडळी आहेतच. त्यामुळे त्या अर्थानेही हा योग योग्यच ठरेल यात काय शंका.

आता तुम्ही विचाराल, की नक्की कशा प्रकारचा फॉर्मॅट हवा, तर असं बघा. सुरवात होईल आय़कॉन खेळाडूंच्या लिलावाने. सोनिया, अडवाणी, करात, अमरसिंग, मायावती अशा आयकॉनला आधी आपण विक्रीसाठी ठेवू. त्यानंतर ते स्वतःच्या बहुमतासाठी अन्य खेळाडू विकत घेतील. म्हणजे लालूप्रसाद यादव, चंद्राबाबू नायडू, फारूख अब्दुल्ला वगैरै मंडळी. या मंडळींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या खेळात सातत्य नसलं तरी अडचणीच्या वेळी धावून जाण्यात ते वाकबगार आहेत. (धावून जाण्यात म्हणजे मित्रांच्या मदतीला आणि विरोधकांच्या अंगावर, या दोन्ही अर्थाने!) आणखी एक तिसरा प्रकार आहे देवेगौडा, अजितसिंग यांच्यासारख्या खेळाडूंचा. ही मंडळी मुळात आधी कोणत्या टीमकडून खेळतायत याचा नेमच नाही, शिवाय त्यांना खेळापेक्षा जाहिरातीत अधिक रूची आहे. जाहिरातीच्या या छंदापायी ते कधी कधी चिअऱ लीडर्स व्हायलाही तयार असतात, अशी चर्चा आहे. खासकरून फिक्सिंग करणाऱया बुकींच्या दृष्टीने ही मंडळी अधिक आकर्षक असतात, कारण स्वतःच्या परफॉर्मन्सपेक्षा त्यांना इतरांना रन आऊट करण्याची कला अधिक अवगत असते. 

ही अशी उतरंड केली आणि एकदा का खरेदीचा व्यवहार पारदर्शक केला, की कोणाची बिशाद आहे संसदेत घोडाबाजार होतो म्हणायची. (एकूणात, घोडाबाजार हा शब्द शोधून काढणाऱया व्यक्तीने, भारताच्या संसदेत चालणारे व्यवहार बघून घोड्यांना काय वाटते याचा विचार केला नसावा!) तर एवढ्या पूर्वतयारीनंतर ठराव मांडला गेला पाहिजे.

आता २०-ट्वेंटीमध्ये कसं, गडी खेळपट्टीवर आला की अंदाज घ्या, सेट व्हा अशा भानगडीत पडत नाही. महापालिकेचे कर्मचारी कसं, दिसलं कुत्रं की घाल गाडीत अशी मोहीम राबवितात, तसंच हा खेळाडूही दिसला चेंडू की हाण हवेत असं करत राहतो. तो खेळ वगैरे तिकडे, इथं आपल्याला मनोरंजन करायचं हाच त्याचा खाक्या. संसदेच्या आम्ही प्रस्ताव ठेवलेल्या नव्या फॉर्ममध्ये असाच प्रकार असणार आहे. चर्चा कशावर आहे, मुद्दा काय आहे याकडे फारसं लक्ष न देण्याची मुभा सगळ्या खेळाडूंना आम्ही देणार आहोत. प्रत्येकाने फक्त माईक घ्यायचा आणि समोरच्यावर (म्हणजेच विरोधकांवर) आरोप करायचे. आरोप जेव्हढा बेफाम तेवढं आपलं एंटरटेनमेंट जास्त, कसं? हरभजन-इशांत प्रकरणासारखे एखाद्याने तोंडाऐवजी हाताचा वापर केला तर त्यासाठी चौकशी समिती नेमून एकमेकांना पाठिंबा देण्याच्या बोलीवर निर्दोषही सोडले जाईल. (मात्र कोणत्याही परिस्थितीत डोके वापरू देणार नाही, ते काम राजकारण्यांचे नाही!) 

अशारितीने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून झाले, चिखलफेक करून झाले की याच खेळाडूंना त्यांच्या सामन्याचा निर्णय घेऊ द्यावा. त्यासाठी कोणत्याही त्रयस्त पंचाचा वेळ जायला नको. आपल्याला बुवा ही आय़डीया खूप आवडली. त्यामुळे संसदेतल्या चर्चा दोन दोन दिवस चालण्यापेक्षा एकाच दिवसांत येतील, कसे? यात फक्त एकच समस्या आहे. बीसीसीआयच्या २०-ट्वेंटी आणि आयपीएलला फक्त आयसीएलची स्पर्धा आहे. संसदेतल्या चर्चेच्या खेळाला मात्र विधानसभा, विधान परिषद, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद,नगर पंचायत, ग्राम पंचायत अशी स्पर्धकांची साखळीच आहे. त्याचं बुवा बघा कोणीतरी.  

----------

Friday, July 4, 2008

...तर बुशकडे मदत मागणार?

साहित्याचा आणि माझा तसा काही संबंध नाही. तसा म्हणायला पत्रकारितेत असलो आणि मराठी, इंग्रजी व अन्य भाषांमधून सर्रास उचलेगिरी करत असलो, तरी साहित्यविश्वाशी नाळ जोडण्यासाठी ते पुरेसे आहे का, ,याबाबत माझ्या मनात दाट शंका आहे. लेखन तर कोणीही करते, पण जगात महत्वाचे काही असले तर ते आपले व आपले आवडते लेखनच असा आव जो आणतो त्याला साहित्यिक म्हणायची आजकाल प्रथा आहे। त्यामुळे हाकेच्या अंतरावर साहित्य संमेलन होऊनही ते घरात बसल्या बसल्या टीव्हीवर एन्जॉय करण्याचीच आपली साधी मराठमोळी प्रवृत्ती आहे। हो, ऊगाच खोटं कशाला बोला?
माझ्या मते मराठीत दोन प्रकारचे लेखक आहेत। जे सातत्याने सकस लेखन करतात आणि दुसरे आपण साहित्य संमेलनात का जात नाहीत, याची दिसेल त्या व्यासपीठावर चर्चा करतात असे. त्यातील दुसऱया प्रकारच्या लेखकांशी आपली जरा जास्त जवळीक आहे. म्हणजे काय की, आपण कसं चपलेचा अंगठा तुटलेला आहे हे लपवत लपवत आजकालच्या वस्तूंचा घसरलेला दर्जा आणि पायांचे विकार अशी तात्विक चर्चा करतो, तसे हे दुसरे लेखकही करतात. शेजारून जाणारा माणूस आपल्याला ओळख देणार नाही म्हणून संमेलनाच्या मंडपात न येणारे लेखक, संमेलन म्हणजे केवळ वायफळ खर्च आहे किंवा तत्सम सैद्धांतिक बडबड करतात, त्या एका क्षणात कलेसाठी कला का जीवनासाठी कला असे क्षुल्लक वाद निकाली निघतात. जीवन जगताना खोटं बोलण्यासाठी कला, असं त्याला स्वरूप येतं. एक माजी संमेलनाधध्यक्ष शनिवारवाड्याजवळच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला आले असताना वेटरनेही त्यांना ओळखले नव्हते, ही घटना मी डोळ्यांनी पाहिलेली आहे. नंतर अशाच माणसांची “त्यांनी कोणताही बडेजाव न मिरवता सामान्य माणसासारखं जगले, ” अशी प्रशंसा केलेली बघितल्यावर हसू येणार नाही तर काय होणार?

त्यामुळेच यंदा दोन मराठी साहित्य संमेलने घेण्याची तयारी कौतिकराव ठाले पाटील यांनी दाखविली तेव्हा जरा हायसे वाटले. चला, म्हणजे नेहमीप्रमाणे प्रतिनिधींना पास देण्याची, त्यानिमित्ताने त्यांनीही आपल्या नातेवाईकांना जरा ‘गाव’ दाखवायला आणण्याची परंपरा पाळली जाणार तर. आपल्या नेहमीच्या संमेलनाची संयोजन व्यवस्था उत्तम। भिकार असल्याच्या बातम्या देण्याची सोय झाली. (संयोजन व्यवस्थेबाबतच्या बातम्या एकाआड एक वर्षी अनुकूल वा प्रतिकूल देण्यात येत असाव्यात असा मला अनेक वर्षांपासूनचा वहीम आहे. शेवटी संयोजकांना शिव्या देण्याशिवाय किंवा ते बडे राजकीय आसामी असल्यास त्यांची तारीफ केल्याशिवाय मराठीविषयीची आपली कळकळ, संमेलनाला हजर राहण्याची तत्परता आणि स्वभाषेसाठी कोणतेही कष्ट उपसण्याची तयारी कशी समजून येणार?) नेहमीप्रमाणे अध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचेच भाषण जोरदार झाल्याचा अभिप्राय यंदाही .येणार तर. शिवाय कोणी मराठीचा अधिकाधिक वापर करायला हवा, असं म्हणालं की यांचीच मुलं कॉन्व्हेंटमध्ये शिकतात म्हणून रकानेही भरणार. (कोणा कोणाची मुलं इंग्रजी माध्यमात शिकतात यावर पी. एच.डी करणारे पत्रकार आहेत तसे वाचकांचा पत्रव्यवहारचे नेहमीचे यशस्वी कलाकारही आहेत. जणू काही मराठी माध्यमांच्या शाळेत शिकलेले सर्वच विद्यार्थी सरस्वतीच्या दरबारात नाच करतात.) सामाजिक बांधिलकीच्या नावाने गळा काढत गद्य न रचणाऱया कवींना मान्यता न देण्याच्या या काळात, असे मनोरंजक आणि वास्तवाशी संबंधित नसलेले लेखन प्रसवणारा कोण लेखक आहे आज?

बाय द वे, अमेरिकेत संमेलन होणार त्यामुळे महामंडळाच्या ग्लोबल कळवळुचीही बूज राखली जाणार. अमेरिकेतल्या यजमानांनाही वाईट वाटायला नको. तसं बघायला गेलं तर घरटी एक अपत्य अमेरिकेत वा इंग्लंडमध्ये असणाऱया कोणाही साहित्यिकाने किंवा साहित्यिक संस्थेच्या पदाधिकाऱयांनी या संमेलनासाठी खर्च मागू नये. तिथल्या अन्य संस्थांचा विरोध असलातरी त्याची काळजी करण्याची गरज नाही. आपण इथल्या, देशातल्या कोणाच्या विरोधाची पर्वा करतो का?

ठाले पाटील यांना या निर्णयावर प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी कॅलिफोर्निया आर्टस असोसिएशनच्या पत्राबाबत विचारले. ते म्हणाले, “अमेरिकेतल्याच दोन संस्थांमध्ये काहीतरी अंतर्गत भांडणे आहेत. त्यामुळे त्यांनी ते पत्र पाठविले आहे.” दोन संस्थांमध्ये भांडणे? ही तर मराठी संस्कृती. ठाले पाटील यांना म्हणालो, “म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आधीच तिथे पोचली म्हणायची.” मात्र ते विनोदाच्या मूडमध्ये नसल्याने माझ्या विनोदावर मीच हसून लाज राखली.

दोन संमेलनाच्या निर्णयाचे द. मा. मिरासदार, राम शेवाळकर यांनीही स्वागत केले. मात्र खरी प्रतिक्रिया दिली ती विठ्ठल वाघ यांनी. ते म्हणाले, “साहित्य संमेलन अमेरिकेत घेण्याचा निर्णय म्हणजे आता मराठीबाबत महाराष्ट्रात काहीही करण्यासारखे नाही, असे होईल. मागच्या वेळी सोलापूर संमेलनात ठाले पाटील बेळगावच्या प्रश्नावर अत्यंत कळवळ्याने बोलले होते. आता ते अमेरिकेतील संमेलनात इराक-इराण प्रश्नावर बुश यांची मदत मागणार आहेत का.”

जाता जाताः कोकणचा कॅलिफोर्निया करण्याच्या घोषणेने दोन दशकांपूर्वी महाराष्ट्रात हवा निर्माण केली होती. या संमेलनाच्या निमित्ताने का होईना रत्नागिरी आणि कॅलिफोर्निया एका पातळीवर येतील.
----------------

Friday, June 20, 2008

मूर्ती महान व किर्तीही महान...

माणसाने किती नम्र असावे?. गेल्या दोन दिवसांमध्ये दोन मोठ्या माणसांना भेटण्याची संधी मला मिळाली. (याचे कारण अर्थातच पत्रकारितेचा धंदा!) पण या दोन्ही माणसांना भेटून  त्यांच्या साधेपणाची आणि ऋजुतेची चुणुकच मला पहायला मिळाली. दोन्ही व्यक्तिंबद्दल मी यापूर्वी वाचलेलं, ऐकलं होतं. मात्र त्याची प्रचिती मला इतक्यात मिळेल, असे वाटले नव्हते.


यातील पहिली व्यक्ती म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक आणि सर्वेसर्वा एन. आर. नारायण मूर्ती. मूर्ती यांच्याबद्दल आधी खूपच ऐकलं होतं. आमच्या वर्तमानपत्राच्या सकाळच्या मिटिंगमध्ये मूर्ती आज शहरात आहेत, असं मी सांगितलं. त्यावर साहेबांचा हुकूम आला, की त्यांची एक एक्स्लूजिव मुलाखत घेऊन ये. मी (मनातल्या मनात) कपाळाला हात लावला. आता नारायण मूर्ती म्हणजे पुण्यातील कोणी पत्रकबाज पुढारी नाहीत, की उचलला मोबाईल अन मिळविली प्रतिक्रिया.




आधी मिडिया को-ऑर्डिनेटरला फोन लावला...त्यानं मोघम उत्तर दिल्यावर केवळ नशिबावरच हवाला ठेवला. त्यानंतर ल मेरिदियन या पंचतारांकित हॉटेलमध्ये पोचलो. मूर्ती तिथे आलेले आहेत, हे कळाल्यावर जीवात जीव आला. पण त्यांच्यापर्यंत पोचायचे कसे ते कुठल्या सूटमध्ये आहेत, हे आधी शोधून काढले. त्यानंतर दारावरच स्वयंसेवकाने अडविले. पुन्हा प्रतिक्षा. थोड्या वेळाने शेवटी धीर करून आणि निर्वाणीचा उपाय म्हणून त्यांना विचारले, “सर, तुमच्याशी दोन मिनिटे बोलता येईल का?”


“नाही, मला आता वेळ नाही. कार्यक्रम सुरू होत आहे,” मूर्ती यांनी फारशा रुक्ष नसलेल्या स्वरात सांगितले. 


“सर, मग कार्यक्रम संपल्यावर तरी बोलूया,” मी चिकाटी न सोडता म्हणालो.


“नाही, कार्यक्रम संपला की लगेच मला विमान पकडून बंगळूरला जायचे आहे,” मूर्तींनी सांगितले. हा संवाद अर्थातच इंग्रजीत चालू होता. 


त्यानंतर मात्र मूर्ती यांची खास मुलाखत मिळण्याची आशा संपली. मात्र मी कार्यक्रमात बसलो होतो आणि आम्हाला हवं तसं ते मोजकेच मात्र पूरेसे बोलले. खासकरून ‘त्यावेळी आम्ही नऊ रुपयांत पोटभर जेवत असू,’ ही त्यांची आठवण मला खूप भावली. त्यातून आमची एक बातमी पूर्ण झाली.


दुसरे दिवशी कोल्हापूरचे राजे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज पुण्यात होते. शिवरायांच्या नावाने आजकाल कोणीही दुकान थाटतो आणि येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवितो. त्यावर महाराजांचे मत मिळवावे, अशी कल्पना मीच मांडली होती. त्याप्रकारे महाराष्ट्रातील गड किल्ले या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी ते आलेले आसताना त्यांना गाठण्याची संधी साधली. प्रकाशन समारंभानंतर दोन मिनिटांच्या विश्रामकाळात महाराजांकडे जाऊन त्यांना स्वतःची ओळख सांगितली. मग विषयाला हात घातला. त्यांनीही कुठलेही आढेवेढे न घेता बोलायला संमती दिली.


“महाराज, आजकाल कोणीही उठतो आणि शिवरायांचे नाव घेतो. त्यातून अनेकदा चुकीच्या गोष्टी घडत आहेत. यावर तुमचे मत काय आहे,” मी त्यांना विचारले. 




“शिवराय सर्वांचे आहेत. त्यांचे नाव कोणीही घेऊ शकतो. महाराष्ट्रात शिवरायांना वगळल्यास काय राहते. मात्र त्यातून चुकीच्या गोष्टीही घडत आहेत,” शाहू महाराज म्हणाले. त्यानंतरही आमचे प्रश्नात्तेर चालूच होते. कोणताही त्रागा न करता किंवा रुबाब न दाखविता शाहू महाराज उत्तरं देत होतं. कुठलाही लवाजमा न बाळगता आणि ‘पोझ’ न घेता ते बोलत होते. आदल्याच दिवशी काही सरकारी संस्थानिकांचा आणि मंत्र्यांचा बडेजाव आणि नाटकीपणा पाहणाऱया माझ्यासारख्याला हा प्रकार नवा होता. केवळ आजूबाजूच्या लोकांची गर्दी आणि गडबड वाढत असल्याने आम्हाला ती भेट आटोपती घ्यावी लागली.


अशाप्रकारे दोन दिवसांत दोन मोठ्या माणसांची भेट झाली होती. दोघांच्याही साधेपणाचा ठसा मनावर चांगलाच ठसला आहे. 


Saturday, June 7, 2008

पत्रकाराची प्रतिज्ञा

भारत माझा हल्ल्यांचा देश आहे. सारे हल्लेखोर भारतीय माझे बांधव आहेत. हल्ल्यांनंतर येणाऱया पुळचट प्रतिक्रियांवर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध, तसेच वांरवार घडणाऱया हिंसक घटनांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा लक्ष्य होऊ नये, यासाठी मी प्रत्येक क्षणी देवाचा धावा करण्याचा सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या मालकांचा, राजकीय नेत्यांचा, पोलिस अधिकाऱयांचा व गावगुंडांचा नेहमी मान ठेवीन आणि त्यांच्याशी शक्य होईल तेवढे सौजन्याने वागेन.

माझ्या अवतीभवतीचे गुंड, समाजकंटक आणि टोळ्या यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझ्या जीवाचे सौख्य आणि संरक्षण सामावले आहे.

Friday, May 30, 2008

मराठीशी केवळ सख्य…सहवास नको

एका छोट्या शहरातील तितक्याच छोट्या असलेल्या वर्तमानपत्राचे कार्यालय...एक होतकरू व्यंगचित्रकार आपली व्यंगचित्रे घेऊन संपादकाच्या केबिनबाहेर उभा आहे. खूप वेळ वाट पाहायला लावल्यानंतर संपादक महाशय (ज्यांची पदाची एकमेव अर्हता म्हणजे संबंधित वर्तमानपत्राचे मालक असलेल्या राजकारणी व्यक्तीचे ते क्लासमेट...वर्गमित्र आहेत!) आत बोलावतात. सगळी व्यंगचित्रे पाहिल्यानंतर आणि त्यांच्यावर आपल्या मगदुराप्रमाणे भाष्य केल्यानंतर ते प्रवचनबाजीकडे वळतात...

“टाईम्स ऑफ इंडियातील कार्टून पाहात जा. आर. के. लक्ष्मण बघा कसे अगदी फर्स्ट क्लास कार्टून काढतात. व्यंगचित्रात रेखाटनासोबतच कल्पनाही अगदी उत्तम असल्या पाहिजेत. लक्ष्मणना त्यासाठी मानायलाच पाहिजे...,” संपादक महाशयांची रसवंती अशीच चालत राहायची. दोन-तीनदा त्यांच्या केबिनमध्ये आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांची प्रशंसा ऐकल्यानंतर व्यंगचित्रकार एकदा थेट मालकांशी संपर्क साधतो. त्यांच्या राजकीय परिस्थितीला अनुकूल असलेले एक व्यंगचित्र निवडून मालक ते छापायला देतात अन ते छापूनही येतं.

सुमारे १३ वर्षांनंतरच्या या घटनेनंतर आजपर्यंत मला त्या व्यंगचित्राचे मानधन मिळालेले नाही. संपादक महाशय मला लक्ष्मण यांचे उदाहरण देऊन थकले मात्र लक्ष्मणना टाईम्स ऑफ इंडिया फुकट राबवून घेत नाही, हे तेव्हा वर्तमानपत्रांच्या धंद्यात नसलो तरी मला कळत होतं. शेवटी मराठीतील व्यंगचित्रांचा नाद सोडून मी जीवनाचे अन्य प्रांत धुंडाळत फिरलो. त्यात एक-दोनदा संस्कृतमध्ये व्यंगचित्रेही काढली आणि ती विनासायास प्रकाशितही झाली!

पोटासाठी अनेक उद्योग केल्यानंतर दहा वर्षांनी पुन्हा वर्तमानपत्रांच्याच जगात प्रवेश झाला. मात्र यावेळी भाषा आणि भूमिकाही बदलली होती. ‘आज का आनंद’मध्ये काम करत असताना पत्रकारितेचा आनंद मिळायचा मात्र मराठीत काम करण्याची इच्छा मात्र उसळी मारत होती. खरं तर तशी निकड कोणतीही नव्हती आणि मला हिंदी येत नसल्याची मालक, मुद्रक, प्रकाशक आणि वाचकांचीही तक्रार नव्हती. तरीही काही जणांना नसते उपद्व्याप करण्याचा जीवघेणा छंद असतो. त्यामुळे मराठीत काम करण्याची हौस भागविण्यासाठी केसरीत गेलो. लोकमान्यांचे वर्तमानपत्र म्हणून केसरीबद्दल मला तेव्हा आदर होता. केसरीत गेलो नसतो तर तो, तसेच लोकमान्यांबद्दलचाही आदर तसाच टिकला असता. त्याचे सहानुभूतीत रुपांतर झाले नसते. बिन पगारी फुल अधिकारी हा काय प्रकार असतो ते केसरीत काम करत असताना पहिल्यांदा कळाले. पोटभर पगार आणि मनमुराद काम, ही आपली साधी अपेक्षा. त्याची फलश्रुती इथे पोटापुरता पगार आणि मणभर काम, अशी झालेली होती.

त्यानंतर पुण्यातील सर्वात मोठ्या मराठी वर्तमानपत्रात प्रवेश झाला. आता तरी इतरांसारखा पगार मिळेल, असे काही काळ वाटले. मात्र आपल्याला जे वाटते त्याच वास्तवाशी संबंध असायलाच हवा, असे नाही, हे मला इथे कळाले. शिवाय या लेखाच्या आरंभी सांगितल्याप्रमाणे, टाईम्स ऑफ इंडियाचे संदर्भ जोडीला होतेच. शासकीय कर्मचाऱयांना ज्याप्रमाणे हस्तपुस्तिका वाटलेल्या असतात, तसे टाईम्स ऑफ इंडिय हे मराठी वर्तमानपत्रांची हस्तपुस्तिका आहे. मात्र ते केवळ कामाच्या बाबतीत...पगाराच्या नव्हे. पगारासाठी रेफरन्स पॉइंट हा केसरी किंवा प्रभात हाच. तुमच्याकडे किती कौशल्य आहे, तुम्हाला काम काय येतं या मुद्यांना काहीही किंमत नाही. तुम्ही मराठीत काम करत असाल तर तुम्हाला तेवढाच पगार मिळणार. शिरीष कणेकर यांच्याच शब्दांत सांगायचे म्हणजे, “लोकमान्य-आगरकर कशी पत्रकारिता करायचे हे सगळेच सांगतात, ते काय खायचे हे कोणीच सांगत नाही.”

त्यामुळे आता खाण्यासाठी मिळेल, इतपत मिळेल अशा जागी आलो आहे. तात्पर्य एवढेच, की आता मी पुणे मिरर या इंग्रजी दैनिकात रुजू झालो आहे. त्याचमुळे काही कारणांनी नवीन पोस्ट टाकायला उशीर झाला...पण आता नियमित नक्की!

Saturday, January 5, 2008

चला मिटिंग मिटिंग खेळू...

करंद हा तसा सज्जन माणूस. त्याच्यासारखा सज्जन माणूस संपूर्ण शहरात सापडायचा नाही. कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. त्यामुळे होतं काय, की त्याच्या शेजाऱ्यांनाही त्याचं नाव माहित होत नाही. सालस तर एवढा, की लोक त्याच्या चारित्र्याचे उदाहरण आपल्या नादावलेल्या मुलांना आदर्श म्हणून देत. अन्‌ ती मुलं दिवसातील चोवीसपैकी सोळा ते सतरा तास त्याच्या नावाने खडी फोडत. मकरंदच्या गल्लीतच काय, तो गल्लीबाहेर निघाल्यावरही त्याच्या नजरेला नजर देण्याची टाप बाया-मुलींना होत नसे. तो दिसला की बाया आपला पदर नीट करत आणि मुली आपल्या ओढण्या सावरून घेत. इतका आसपासचा परिसरात त्याचा दरारा होता.

असा सदाचारी माणूस असतो तसाच मकरंदही निर्व्यसनी होता. त्याला कधी कोणी चहा पिताना अथवा चहाचे पैसे देतानाही पाहिले नव्हते. दारूची तर गोष्टच दूर. त्याच्यावर खार खाणारे म्हणत, की ऑफिसमध्ये फुकटात मिळणारा चहा पिऊनच तो आपली तल्लफ भागवत असे. राहता राहिली दारूची गोष्ट, तर दररोज हॉटेल किंवा बारचे पैसे चुकते करणारा मित्र कोणाला मिळणार? त्यामुळेच त्याचे दारूचे प्रमाण नियंत्रणात होते, अशीही एक वदंता होती. असो. लोकं काहीबाही बोलणारच. 'तत्को नाम सुगुणिनां यो दुर्जनैनाङ्कितः?' तर असा हा सत्ययुगातून थेट कलियुगात टपकलेला मकरंद नामे प्राणी जगतो कसा, हा कुतुहल निर्माण करणारा प्रश्‍न होता. त्या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढी सवड शहरवासियांना नव्हती, म्हणून त्याचे बरे चालले होते म्हणायचे.

अशा या सुखी प्राण्याला व्यसन एकच, व्यसन कसले it was his passion, अन्‌ ते म्हणजे मिटिंगचे! तसा तो एका वर्तमानपत्रात कामाला होता, अन्‌ सध्याच्या कार्यालयात येण्यापूर्वी तसा तो अन्य द्विपाद प्राण्यांप्रमाणेच होता. दिवसभर काम करावे आणि घरी जावे, असा माणसासारखा त्याचा दिनक्रम होता. मात्र सध्याच्या कार्यालयात तो आला आणि त्याचे जीवनच बदलले. पूर्वी "आली लहर केला कहर,' असा बाणा हाडीमासी खिळलेला मकरंद आता "चर्चेने होत आहे रे, आधी चर्चाच पाहिजे,' अशा सैद्धांतिक भूमिकेपर्यंत आला होता. कार्यालयातील काम असो अथवा जीवनातील छोटा-मोठा निर्णय, तो सर्वांनी एकत्र बसून आणि चर्चा करूनच सोडविला पाहिजे, यावर त्याची ठाम श्रद्धा होती. त्यानुसार सोसायटीच्या मिटिंगपासून विविध चर्चासत्रापर्यंत जेथे म्हणून तोंड उघडता येईल, तेथे तोंड घालण्याची त्याने सवयच अंगी बाणवली होती.

एक बरं होतं, मकरंदचं लग्न आधीच झालेलं होतं. नाहीतर त्याने मुलगी पाहायला एक, साखरपुड्याला एक, कपडे खरेदीला एक, लग्नाआधी एक अशा मिटिंगांचा बारच उडविला असता. 'आधी लगीन मिटिंगचे, मग माझे' अशी त्याने गर्जनाच केली असती. मात्र तो या कार्यालयात आला आणि तो मकरंदराव ऐवजी मिटिंगराव झाला. त्यामुळे दर दोन दिवसांनी एखादा नवा प्रसंग उद्‌भवला, की सासरवाडीच्या माणसांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायची, हा त्याचा नित्यक्रम झाला. सासरवाडीच्या माणसांना जावयाचे हे खूळ पसंद नसले, तरी ते काही करू शकत नव्हते. त्यामुळे ते मुकाट्याने चर्चेला तयार होत. मकरंदच्या या मिटिंगवेडाचा सर्वात मोठा फटका त्याच्या बायकोला बसला होता. नाही, म्हणजे दुसऱ्या घरातील बायका बडबड करायच्या आणि नवरे मुकाट ऐकायचे, इकडे मात्र मकरंदही बडबड करायचा आणि तिलाही बोलायला लावायचा, याचं शल्य तिला नव्हतं. तिचं दुःख वेगळंच होतं. मिटिंग आणि चर्चेच्या नावाखाली मकरंदची असंबद्ध बडबड तिला ऐकावी लागत होती. बरं त्याला विषयाचीही मर्यादा नव्हती.

एखाद्या दिवशी तिच्या हातून चहात कमी साखर पडली, तरी तिला सांगता यायचं नाही. कारण एकदा तिने असंच म्हणून दाखवलं, तर मकरंद म्हणाला, "चहा करण्यापूर्वी तू चर्चा का करत नाहीस? त्यामुळं नक्की किती साखर टाकायची, याचा तुला अंदाज येईल ना!''

ती साध्वी काय बोलणार? मकरंदची हौस सर्वाधिक फिटायची ती त्याच्या कार्यालयात. त्याच्या कार्यालयातच चर्चेची संस्कृती भिनलेली असल्यामुळे. "काम कम, बाते ज्यादा,' असा प्रकारच नव्हता. मोबाईलची रेंज मिळत नाही यापासून ते उद्या कोणत्या ड्यूटीला यायचं, यातील कोणत्याही विषयावर त्याच्या कार्यालयात मिटिंग भरू शकते. या वातावरणात त्याला इतकं बरं वाटतं, की कधीकधी आपण आयुष्यभर दिवस-रात्र कार्यालयातच रहावं, असं त्याला वाटतं. अर्थात त्याचीही गंमत आहे. या मिटिंगमुळे आणि चर्चेच्या फेऱ्यांमुळेच आपल्या संस्थेचं बरं चालू आहे, असे सर्वच मिटिंगरावांना वाटायचे; तर हे लोकं मिटिंगमुळे गुंतल्यामुळेच आपले काम चांगले करता येते, असा त्यांच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांचा अनुभव आहे.

एका संध्याकाळी मकरंदची बायको लाडात आली.

"अहो, आपण कित्येक दिवसात बाहेर फिरायला गेलो नाही, चला ना आज जाऊ,'' ती म्हणाली.

अर्थात ही नांदी दुपारच्या वेळेस झाली होती. त्यावर बरीच भवती न भवती झाल्यानंतर बाहेर पडायला संध्याकाळ होणार, याची तिला खात्री होती. तिच्या या विश्‍वासाला मकरंदनेही तडा जाऊ दिला नाही. सायंकाळी सूर्य अस्ताचलाला जात असताना हे जोडपे अंधारलेल्या रस्त्यावर अवतरले. बागेत जरा फिरणे वगैरे (म्हणजे वगैरेच जास्त) झाल्यावर दोघांनी प्रथेप्रमाणे काही खाद्यपदार्थ पोटात ढकलले. मकरंदच्या बायकोला खूप दिवसांचा बॅकलॉग भरून काढायचा होता. त्यामुळे एका बाईची साडी चांगली आहे, एक मुलगी जरा "ओवर'च वागतेय, तिच्या भावाला अमेरिकेत जाण्याची संधी मिळतेय अशा अनेक गोष्टी मकरंदला नव्यानेच कळाल्या. मकरंदचं मात्र चित्त थाऱ्यावर नव्हते. त्याला आठवण येत होती त्याच्या मिटिंगची. एकावर एक कडी करणाऱ्या (आणि प्रचंड शिळ्या कढीलाही ऊत आणणाऱ्या) चर्चा त्याच्या डोळ्यासमोर फेर धरत होत्या. बिचारा! तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार सहन करत होता. बागेच्या फाटकातून मकरंद आणि त्याची बायको बाहेर पडतच होते, त्यावेळी तिथे एक रिक्षा भर्रकन आली आणि तिथेच उभ्या असलेल्या एका व्यक्तीला जाऊन धडकली. अंगाने कृश आणि चेहऱ्यावर दयनीय भाव असलेला तो माणूस भेलकांडत एकीकडे गेला आणि तिथेच कोसळला. त्याच्या पायाला काहीशी जखम झाली होती. मकरंदने हे दृश्‍य पाहिले आणि त्याच्या तोंडून स्वाभाविकच "अरे,' असा उद्‌गार निघाला.

इकडे अशा प्रसंगी होते तसेच दृश्‍य निर्माण झाले. बागेबाहेरच्या हातगाड्यांवर इतका वेळ काहीबाही खात असलेला जमाव रिक्षाचालकावर तोंडसुख घेण्यास सरसावला. एक दोन तरुणांनी त्याची गचांडीही धरली. काहीजण कोपऱ्यात पडलेल्या व्यक्तीला उठविण्यास धावले. बघता बघता जमाव जमा झाला आणि बाचाबाची सुरू झाली. त्याचक्षणी...होय, त्याच क्षणी मकरंदचा डावा डोळा फडकू लागला. आता आपल्याला काही एक भूमिका निभावयास मिळणार, अशी त्याची खात्री पटू लागली. तोही त्या जमावात शिरला.

"मारो साले को,'' एक "नऊ ते पाच' कॅटॅगिरीतला चाकरमानी रिक्षावाल्याकडे पाहून ओरडला. इतर वेळी रिक्षातून उतरताना तोंडातल्या तोंडात "मीटर आजकाल जास्तच जोरात पळतं यांचं,'' असं म्हणणारे माणसं गर्दीत एकदम "गिअर'मध्ये येतात. त्याच्या वाक्‍यासरशी एक दोघांच्या तोंडून मराठी आणि हिंदीतील एकत्रित विदग्ध रसवंती ओसंडून वाहू लागली. भांडण आणि फुकटचा तमाशा म्हटले, की काही लोकांच्या प्रतिभेला प्रचंड बहर येतो. तसा तो इथेही आला आणि सारेच वातावरण मोहरून गेले.

"ए xxx, उसको भरपाई दे,'' एक होतकरू "अँग्री यंग मॅन' वसकन रिक्षावाल्यावर ओरडला. आता मकरंदच्याने राहवणार नव्हतं. त्याला आता एंट्री घ्यावीच लागणार होती. त्याने आवाज टाकला, "अरे, थांबा थांबा, असं एकदम घायकुतीवर येऊ नका. आधी चर्चा करा. संयम पाळा. चूक कोणाची हे आधी ठरवा.''

त्याच्या या वाक्‍याने एकदम शांतता पसरली. हा "राणीच्या बागे'तील आयटम बागेबाहेर कसा आला, या अर्थाने काहीजणांनी त्याच्याकडे नजरा फेकल्या. "ए चूप बैठ,'' मकरंदने आजपर्यंतच्या एकाही मिटिंगमध्ये न ऐकलेलं वाक्‍य एका टारगटानं उच्चारलं. त्यामुळे इथल्या चर्चेचा अजेंडा काही वेगळाच आहे, हे त्याच्या लक्षात आलं.

"हे बघा, आपण एक मिटिंग घेऊ. त्यात चूक कोणाची हे ठरवू,'' त्याने पुन्हा आपला मुद्दा रेटला. काही मुद्दा नसतानाही काहीतरी बोलायचं म्हणून अर्धा अर्धा तास बोलायचे प्रयोग त्याने अनेक मिटिंगमध्ये केले होते. त्यामानाने हे काहीच नव्हतं.

"ए सूट बूट, जा इथून, नाहीतर तूच मार खाशील,'' पुन्हा कोणा अज्ञात इसमाने त्याला इशारा दिला. हे चालू असताना कोपऱ्यात भेलकांडलेला इसम बऱ्यापैकी भानावर आला होता. पाचशे वगैरे रुपयांची कमाई करण्याची संधी त्याला चालून आली होती. या "मिटिंगखोरा'मुळे ती संधी आता जाणार, अशी साधार भीती त्याला वाटू लागली. त्याने हळूच संधी साधून जोराने कण्हण्याचा अभिनय केला. त्यामुळे जमावाची सहानुभूती पुन्हा त्याच्याकडे वळली.

"बघा, तो किती कण्हतोय. त्याला डॉक्‍टरकडे नेऊ, त्यांच्याशी चर्चा करू, मग ठरवू आपण काय करायचे ते. वाटल्यास या रिक्षावाल्याचा नंबर आपण घेऊन ठेवू,'' तो म्हणाला. आता मात्र जमावाचा संयम ढळू लागला. भेलकांडलेल्याला पाचशे रुपये मिळवून देऊन त्याच्याकडून शंभर रुपये कमिशन काढायचा विचार होतकरु "अँग्री यंग मॅन'चा होता. तो सफल होण्याची शक्‍यता मावळणे त्याला परवडणारे नव्हते.

"साला, ये साहब लोगही ट्रॅफिकका प्रॉब्लेम करते है,'' त्याने डरकाळी फोडली. त्यामागची आर्तता त्याला आणि भेलकांडलेल्यालाच ठाऊक होती. तो आवाज विरतो न्‌ विरतो तोच त्याचा हात खाली येताना मकरंदला दिसला आणि पुढच्याच क्षणी त्याच्या डोळ्यांपुढे अंधारी आली. मुसळधार पावसाच्या धारांप्रमाणे जमावाचे हात त्याच्यावर कोसळू लागले. जमावाच्या मागे उभी असलेली बायको बिचारी तगमग करत उभी होती, मात्र त्याचा काही उपयोग नव्हता. मकरंदच्या तोंडातून शब्द फुटणार नाहीत, या अवस्थेत येईपर्यंत त्याला बेदम मारल्यानंतर जमावाने रिक्षावाल्याला घेरले. रिक्षावाल्याने आयुष्यात कधी मिटिंग घेतलेली नसल्यामुळे त्याला तडकाफडकी निर्णय घेणे शक्‍य होते. चर्चेच्या गांधीमार्गापेक्षा पाचशेचे गांधीबाबा अधिक प्रभावी ठरतात, हे शहाणपण त्याच्याकडे होते. ते अनाठायी नव्हते. त्यामुळे लगेच जमाव पांगला.

भेलकांडलेला आणि होतकरु "अँग्री यंग मॅन' मिळून कुठंतरी गेले. ओठांतून रक्त येत असलेला आणि डोळ्यांखालचा भाग काळानिळा झालेला मकरंद झोकांड्या खात होता. त्याची बायको जवळ आली. तिने त्याच रिक्षावाल्याला दवाखान्यात जाण्याची गळ घातली.

"मॅडम, इसका तो पुलिस केस होगा,"? त्यानेही "धंदा' ओळखला. शेवटी पाचशे रुपये देते, म्हटल्यावर तो तयार झाला. त्यानतंर दवाखान्यात मकरंदला ओळखपट्टी करण्यात आली. या घटनेला आता पंधरा दिवस होत आहेत.?मकरंद आता बोलावं तिथंच बोलतो आणि शांत रहावं तिथं शांत राहतो. अलिकडे तर कधी तो बाथरुममध्ये आंघोळ करत असतो, बाहेर टीव्ही चालू असतो. त्यावर गाणं लागलेलं असतं, "राया चला बागामधी, रंग उडवू चला...'

मकरंद ते ऐकून म्हणतो, "राया चला ऑफिसमधी, मिटिंग खेळू चला....''

Friday, January 4, 2008

नववर्षाचे आगळे अभिनंदन


नववर्षाच्या स्वागतदिनी आपल्यापैकी बहुतेकांना आलेला अनुभव. फ्रेंच व्यंगचित्रकार शपाते याने ते अचूक पकडला आहे. मला आवडलेले हे अलिकडचे सुंजर व्यंगचित्र!

Tuesday, January 1, 2008

काही शुभेच्छा आणि काही संकल्प

शुभेच्छा...




...अन संकल्प
राखी सावंतचा संकल्प ः यंदा कोणत्याही वाहिनीवरील कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही. सह्याद्री वाहिनीवर राखीपौर्णिमेनिमित्त होणाऱया कार्यक्रमाचा अपवाद वगळता ती छोट्या पडद्यावर दिसणार नाही तसेच कोणत्याच वाहिनीवर आरोपही करणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा संकल्प ः ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियातच काय, जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर दोन हात करून त्यांचा पराभव आम्ही करू, हे केवळ तोंडानेच म्हणणार नाही तर कृतीतूनही सिद्ध करू.

नारायण राणे यांचा संकल्प ः मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदात काडीचाही रस नसून केवळ मराठी जनेतेची सेवा करण्यातच मी माझी हयात खर्च करणार आहे, अशी घोषणा करेन. विशेष म्हणजे त्या घोषणेवर किमान चार आठवडे अंमलही करेन.

गोपीनाथ मुंडे यांचा संकल्प ः या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही, हे वाक्य वर्षभरात तोंडातून चुकूनही काढणार नाही.

मराठी कलावंतांचा संकल्प ः तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या गाण्यांचेच कार्यक्रम करण्याऐवजी लोकप्रिय होतील असे गाणे रचून तेच सादर करू.मराठी चित्रपट निर्मात्यांचा संकल्प ः नवीन मराठी चित्रपट मुंबईसह महाराष्ट्रात एकाचवेळेस प्रदर्शित करू. त्यांच्या कथा जुन्या हिंदी चित्रपटांवरून घेतलेल्या नसतील आणि माझी विनंती आहे, की या चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, अशी दिग्दर्शक-कलावंतांना विनंती न करण्यास लावणार नाही. तरीही हे चित्रपट धो-धो चालवू.

मराठी साहित्यिकांचा संकल्प ः साहित्य हे संमेलन (मेळावा) घेऊन वाद घालण्यासाठी नसून वाचकांना मिळतील, परवडतील आणि वाचावीशी वाटतील अशी पुस्तके लिहिण्यासाठी आहे, हे एकमताने मान्य करू. म. द. हातकंणगलेकर यांच्या समीक्षेची लंडनच्या गल्लीगल्लीतही सटीप चर्चा चालू असते, असे मीना प्रभू यांच्याकडून वदवून घेऊ. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रभू यांच्या लिखाणात ग्लोबल लोकमान्यता मिळविण्यासाठीचे गुण असतील, अशी कबुली हातकणंगलेकर यांच्याकडून घेऊ. विशेष म्हणजे केवळ या दोघांच्या मतांनाच किंमत देण्यात येत आहे, असा सूर अन्य उमेदवारही काढणार नाहीत.

मराठी जनतेचा संकल्प ः आणखी एक दोन मराठी व्यक्ती आंतरराष्ट्रीय बँका आणि कंपन्यांच्या प्रमुखपदी विराजमान झाले तरी त्यामुळे मराठी अस्मिता धोक्यात आल्याचे कोणालाही वाटणार नाही. तसेच त्या व्यक्तींचे अभिनंदन करतानाच ब्रेन ड्रेनमुळे भारताचे नुकसान कसे होते, यावरही कोणी प्रवचन देणार नाही. परप्रांतीय लोकांविरोधात कितीही बोंबाबोब केली तरी आपण स्वतः काम करणे, हाच त्यावर उपाय असल्याचे मराठी लोकांना कळून येईल. काही मराठी व्यक्ती अगदी परप्रांतांत जाऊनही नोकरी-व्यवसाय करण्याचा निर्धार करून तो पाळतीलही.

मराठी वृत्तपत्रांचा संकल्प ः पाकिस्तानशी मैत्री, विश्वबंधुत्व या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्यासाठी महाराष्ट्रातील मराठी जनतेने जीवंत राहिले पाहिजे, हे जाणून घेऊ. त्यानुसार धोरणात बदल करू.
कंपन्यांचा संकल्प ः आता कोणतीही मराठी वृत्तवाहिनी सुरू होणार नाही व त्यावर चार तास बातम्या आणि बाकीचे वीस तास बॉलिवूडचे लफडे, भविष्यकथन, हेल्थ टिप्स अशा वायफळ गोष्टींवर खर्च करणार नाही.
----------