Friday, June 12, 2015

घुमानच्या निमित्ताने-6 अमृतसरी कुलचा आणि लस्सी

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo5_500[1] नाही म्हणायला, अमृतसर शहरात आल्याची भरभक्कम जाणीव होते ती येथील हॉटेल आणि लस्सीचे दुकान पाहून. त्यातही हरमंदिर साहिबच्या परिसरातील जी हॉटेल आहेत ती खऱ्या अर्थाने आस्वाद घेतलाच पाहिजे या वर्गवारीत मोडणारी आहेत.

हरमंदिर साहिबच्या आधी जी पहिली गल्ली आहे तिथेच थोडे आत गेले, की शर्मा भोजन भांडार नावाचे हॉटेल आहे. घुमानहून परतल्यानंतर मी हरमंदिर साहिबची परत भेट घेतली तेव्हा सकाळी या हॉटेलमध्ये गेलो होतो. अमृतसरी कुलचा नावाचा पराठ्याचा एक लांबचा नातेवाईक लागेल असा पदार्थ येथे खूप प्रसिद्ध आहे. पराठ्याप्रमाणेच नाना पदार्थ आतमध्ये सारून हा पदार्थ तयार केला जातो. मी आधी गोबी-बटाटा मिक्स कुलचा मागविला. त्याच्यासोबत हरभऱ्याची (चना) भाजी आणि कांदा, मिरची व आणखी काही पदार्थ असा बेत दिसला. शिवाय कुलच्यासोबत चमचाभर लोण्याचा 'चढावा' होताच. सर्वात आधी कुलच्याचा तुकडा आणि हरभऱ्याच्या भाजीचा घास घेतला आणि मन तृप्त झाले. शंभर मटणाच्या तोंडात मारेल, असा विसविशीत शिजलेला चना आणि तो कुलचा यांची चव म्हणजे ज्याचे नाव ते. त्यानंतर वाघा सीमेवरून परतल्यानंतर मी परत त्याच ह़ॉटेलमध्ये गेलो आणि दोन कुलचे खाल्ले. एक पनीर कुलचा आणि दुसरा गोबी कुलचा. प्रत्येकासोबत भाजी आणि चटणी होतीच. ही चटणी काही वेगळाच पदार्थ असेल, म्हणून मी वेटरला विचारले, याला काय म्हणतात. तो म्हणाला, "इसे चटनी बोलते है”. मग मात्र मी मूग गिळून गप्प बसावे, त्याप्रमाणे चने आणि कुलचा गिळून गप्प बसलो. अमृतसरी कुलच्याचा हा आस्वाद घेतल्यामुळे नंतर पानीपतला गेल्यावर तिथे जे कुलचे मी पाहिले, ते काही माझ्या गळी उतरले नाहीत. वेगवेगळ्या गाड्यांवर अगदीच लुसलुशीत कुलचे विकायला काढले होते त्यावरून त्यांच्या तोंडी न लागण्यातच शहाणपणा आहे, हे मी ताडले. tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo6_400[1]

अमृतसरच्या आणखी दोन खासियत म्हणजे लस्सी आणि कुल्फी. महाराष्ट्रात मिळणारी लस्सी हे लस्सीच्या नावावर चालणारे थोतांड आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु  असे म्हणता येईल, की पंजाबी लस्सी म्हणजे कुंभमेळा आहे आणि महाराष्ट्रातील लस्सी ही गावची जत्रा आहे. यहां की लस्सी जैसी कोई नहीं. इतक्या दूर पंजाबमध्ये आल्यानंतर एखादी व्यक्ती लस्सी न पिता परत जाणार असेल तर त्या व्यक्तीकडे रसिकता नावालाही नाही, असे बेलाशक म्हणता येईल. 'हाय जालीम तूने पीही नहीं,' असे शायर म्हणतो ते अशा लोकांसाठीच.

आपल्याकडे जे ग्लास असतात त्याच्या साधारण दीडपट उंच आणि गोल स्टीलच्या पेल्यांमध्ये पुढ्यात आलेली थंडगार लस्सी जेव्हा घशाखाली जाते तेव्हा जगात दुःख, दैन्य, उपद्रव, भांडणे वगैरे गोष्टी असल्याची सूतराम आठवणही राहत नाही. उमर खय्याम म्हणतो त्याप्रमाणे थंडगार लस्सीने भरलेली एक सुरई आणि एक कवितेची वही, एवढ्या भांडवलावर कोणा व्यक्तीचे आयुष्य सहजपणे व्यतीत होऊ शकते.

गंमत म्हणजे, कुलच्याबाबत जे झाले ते लस्सीबाबत झाले नाही. अमृतसरला जी लस्सी मिळाली, त्या चवीची नाही परंतु आकार आणि घट्टपणाच्या बाबतीत त्याच तोडीची लस्सी पानीपतलाही मिळाली. त्यामुळे तेथेही मी दोनदा लस्सीशी दोन हात केले. या दोन्ही शहरांमधील लस्सी पिण्याचा उल्लेख केवळ भाषेची सवय म्हणूनच करायला पाहिजे. वास्तविक त्यांच्याबाबत लस्सी खाल्ली असे म्हणायला पाहिजे. तेवढी त्यांची घनता आणि घट्टता होतीच होती. तमिळमध्ये कॉफी पिली असे न म्हणता कॉफी खाल्ली असेच म्हणतात. (कॉफी साप्पिटेन). त्याच प्रमाणे पंजाबमध्ये लस्सी प्यायची बाब नसून खायची बाब आहे आणि कामचलाऊ पोट भरायचे असेल तर तीस रुपयांत पोटभर लस्सी हा उत्तम पर्याय आहे, एवढे ध्यानात घ्यावे. तसेही केवळ जेवायचे म्हटले तरी खुशाल एखाद्या हॉटेलात जावे आणि ३० ते ५० रुपयांत पोटोबाची सोय करून यावी, हे येथे अशक्य नाही.

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo10_500[1] संस्कृतमध्ये लास या शब्दाचा अर्थ उत्सव करणे, नाचणे, मौजमजा करणे असा आहे. उल्लास, विलास वगैरे शब्द त्यांतूनच आलेले आहेत. पंजाबमधील लस्सीचे प्याले पाहिल्यानंतर या लस्सीचे कुळ लासमध्येच असावे, अशी खात्री पटते. एखाद्या मटक्यात 'लावायला' ठेवलेली लस्सी मस्त थंडगार झाली आणि ऐन तळपत्या उन्हात ती घशाखाली ओतली, तर मेजवानी, सेलिब्रेशन, स्वर्गसुख अशा सगळ्या कल्पना हात जोडून समोर उभ्या राहतात. अन् अशी मनसोक्त लस्सी पिल्यानंतर पेट भर गया लेकिन दिल नहीं भरा, अशी अवस्था होते. खल्लास!

Monday, June 8, 2015

पीत पुरोगाम्यांनी जात दाखवली!

महाराष्ट्रातील (कु)प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी नामक कोणा व्यक्तीमधील संभाषण सध्या व्हाटस अॅप, फेसबुक आणि ट्विटरवरून गाजत आहे. वागळेंनी ब्राह्मण जातीतील लोकांना 'ठोक के भाव' में खूनी आणि दंगेखोर ठरवून टाकल्याचे या संभाषणातून दिसत आहे. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आधार घेत वागळेंनी मनातील (बहुतांश) सगळी गरळ ओकली असल्याचे कोणालाही ही ध्वनिफीत ऐकल्यावर वाटेल. मोदी सरकार आल्यापासून समस्त पीत पुरोगाम्यांचा झालेला कोंडमारा आणि या सरकारमुळे (किंवा हिंदुत्ववाद्यांमुळे) आपल्याला बेकार व्हावे लागले, या वैफल्यातून कदाचित वागळेंनी 'पॉईंट ब्लँक'वरून शूट केला असावा. यातील वागळेंची ख्याती अलम जगाला माहीती आहे तर हे अनिरुद्ध जोशी कोण, काळे की गोरे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वागळेंच्या या समाजवादी बहादुरीची 'मी मराठी' नावाच्या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर यांनी पाठराखण केली आहे. याच वाहिनीवरून वागळेंचा कार्यक्रम प्रसारित होत असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे जीवन समृद्ध केलं, तर त्यात कोणाला काही वावगे वाटायचे नाही. प्रामाणिकपणाची कमाई आणि पाठराखण ही नेहमीच कौतुकास्पद असते. ब्राहण जात आणि ब्राह्मणी मनोवृत्ती या वेगळ्या आहेत, अशी मखलाशी आंबेकरांनी केली आहे. अरे बाबा, पण वागळे त्यात चक्क 'तुम्ही भटांनी, तुम्ही ब्राह्मणांनी' असे शब्द पेरतो, त्याचे काय?

वागळेंच्या प्रामाणिकपणाबद्दल भाऊ तोरसेकरांसारख्या ज्येष्ठ आणि वागळेंच्या समकालीन पत्रकाराने पुरेसे पुरावे दिलेच आहेत. त्यातून त्यांच्या चारित्र्यावर झक्क उजेड पडतो. चार वर्षे ज्या दर्डा शेठचा पगार खाल्ला, त्यांनीच कामावरून कमी केल्यानंतर ट्वीटरवरून शिव्या घालताना वागळ्यांची जीभ सैलावते. दर्डा हे कोळसा गैरव्यवहारातील आरोपी आहेत, हे यांना आधी माहीत नव्हते का? की केवळ 2014 च्या जून महिन्यांनंतरच हा साक्षात्कार झाला. गुटख्याच्या निर्मात्यांकडून स्वतःच्या पुस्तकाला प्रायोजकत्व मिळवून आपण समाजासाठी काहीतरी भव्यदिव्य केले आहे, अशी फुशारकी मिरविणारे हे पत्रकार.

 

A Police Complaint has been Lodged against Nikhil Wagle for inciting communal hatred @Dev_Fadnavis Plz take Action? pic.twitter.com/ZdwaPkWtT4

— Chandrabhushan Joshi (@MatruBhakt) June 7, 2015

अनिरुद्ध जोशींच्या संभाषणातून वागळेंनी ब्राह्मण जातीवर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत, त्या त्यांनाच लखलाभ. पण त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू (आणि नव्याने कळलेले पेरियार! तेच ते, "तमिळनाडू हा स्वतंत्र देश आहे, सगळे हिंदी भाषक आणि तमिळ भाषक ब्राह्मण हे सैतानाचा अवतार असून त्यांचे शिरकाण करावे,” असे विचार मांडणारे पेरियार!) यांचे नाव घेऊन हे कृत्य केले आहे, ते जास्त धोकादायक आहे. आंबेडकरवादी, दलित संघटना आणि कोणत्याही प्रागतिक विचाराच्या व्यक्तीने याचा निषेध करायलाच पाहिजे. कारण बाबासाहेब आम्हीही वाचले आहेत आणि त्यांच्या विचारावर आमची श्रद्धाही आहे.

'कुठल्याही व्यक्तीचे चारित्र्य किंवा गुण हे तो कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मला यांवर आधारित नसून तो काय करतो, त्याचे विचार काय आहेत, यावर ठरतात,' ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे, असे वाटते. याच्या उलट व्यक्तीला जन्मजात गुण, दोष किंवा योग्यता चिकटविणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एखाद्या वंचित गटातील व्यक्तीचे आई-वडिल निरक्षर आहेत म्हणून ती व्यक्तीही शिकण्यास किंवा इतरांच्या बरोबरीने समाजात भाग घेण्यास नालायक आहे, हे मानणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका ब्राह्मण व्यक्तीने म. गांधींना मारले म्हणून सगळ्या ब्राह्मणांच्या संपत्तीला आगी लावणे, त्यांना जीवे मारणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका शीखाने इंदिरा गांधींना मारले म्हणून सगळ्या शिखांचे शिरकाण करायला निघणे, ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. या उलट प्रत्येक व्यक्तीशी व्यक्ती म्हणून वागणे, हा आंबेडकरवादी विचार आहे.

कुठल्या तरी प्रसंगात ब्राह्मण दोषी आढळला, म्हणून जोशी यांना गृहित धरून वागळे जेव्हा सगळ्या ब्राह्मण जातीला आरोपी बनवितात (पिंजऱ्यात उभे करतात नव्हे!) तेव्हा निखिल वागळे नावाचा एक महाभंपक इसम बाबासाहेबांच्या नव्हे तर ब्राह्मणी विचारांच्या मार्गाने जातो. म्हणून दलित संघटनांनी ताबडतोब त्यांच्यापासून दूर व्हावे. जोशी हे नाव गैर-ब्राह्मणांमध्येही असते हे वागळ्यांना माहीत असायला पाहिजे. आणि तेवढेच असेल तर गेल्या पाच वर्षांतील अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंद झालेल्या किती प्रकरणांचे आरोपी ब्राह्मण जातीतील आहेत, हे 'आमच्यामुळे झाला, आमचा इम्पॅक्ट' असं जेव्हा तेव्हा छाती पिटून सांगणाऱ्या 'मी मराठी' वाहिनीने शोध करून सांगावे.

खरं पाहिलं तर निखिल वागळे आणि अरविंद केजरीवाल या दोन इसमांची कारकीर्द एकाच गोष्टीवर उभी आहे - लोकांना चिथावून मारहाण करायला लावायची आणि बघा, मी कसा अत्याचाराला बळी पडलोय याची जाहिरातबाजी करायची. (समानशीलेषु सख्यम). जेव्हा जेव्हा वृत्तपत्र चालत नाही, नोकरी सुटलेली असते किंवा आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसते तेव्हा वागळेंना कोणाची तरी छेड काढून मोठे व्हायची तल्लफ येते. बरे, जेव्हा शिवसैनिक मारायला येतात तेव्हा 'मला मारू नका, मी हर्ट पेशंट आहे' असा कांगावाही करता येतो.

जोशींशी बोलताना मी धर्मांतर करीन, अशी धमकी वागळे देताना ऐकू येते. असल्या दांभिकांच्या धर्मांतराची काय पर्वा बाळगायची? बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्याला नैतिक अधिष्ठान होते, एक तपश्चर्या होती. त्यांच्याकडे बोट दाखवून कोणीही दुकानदार करू पाहत असेल तर त्याला खुशाल जाऊ द्यावे. प्रासादशिखरस्थो ऽपि काको न गरुडायते (राजमहालावर बसल्याने कावळ्याचा गरूड होत नाही).

वारुणी आणि तरुणी यांचा आस्वाद घेत दलित, शोषितांच्या नावाने बाळंतकळा दाखविणाऱ्या झोळीवाल्यांचे एक पीक गेल्या पन्नासेक वर्षांत फोफावले आहे. याचे उदाहरण म्हणजे सध्या गजाआड असलेला तरुण तेजपाल. हाही असाच समाजाचा सगळा व्यभिचार मीच झाडून काढणार, अशा तोऱ्यात सफाई अभियान करायचा. (याच तहलका आणि तेजपालाच्या प्रत्येक ट्वीटला रिट्वीव करण्याचा पूर्णवेळ उद्योग वागळे करायचे, हे येथे नोंदण्याजोगे). यथावकाश त्याच्या लीला उजेडात आल्या, अन् तेही धर्मांध, प्रतिगामी व फॅसिस्ट सरकार सत्तेत नसताना, आणि तहलका काहीसा हलका झाला. परंतु याच पंथातील आणखी काही मंडळी आपल्या मार्गावरून ढळली नव्हती. माकडांनी एकमेकांनी पाठ खाजवावी, तसे एकमेकांची स्तुती करून मोठे करायचे आणि गरिबांच्या दुखण्यावर आपल्या पोतड्या भरायचा, हा यांचा उद्योग. विशेष म्हणजे या पंथातही ब्राह्मण जातीतील लोकांचीच संख्या जास्त असते.

दारु पिताना तोंडी लावायला खारे शेंगदाणे तोंडात टाकावेत तशी ही मंडळी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहूंची नावे घेणार आणि आपली समाजवादी दुकाने चालविणार, असा हा प्रकार होता.

गेल्या पन्नासेक वर्षांत म्हणायचे कारण म्हणजे त्यापूर्वी जी मंडळी होती ती अस्सल समाजवादी होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सचोटी होती. साने गुरूजी आणि ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या समाजवाद्यांकडे त्याग होता, प्रामाणिकपणा होता. समाजवादाच्या नावाखाली दाढी वाढवून आपली दुकाने मांडणारी वागळेंसारखी पिढी तेव्हा नव्हती किंवा असली तरी कमी प्रमाणात होती. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना मान मिळतो हे पाहिल्यानंतर केवळ संस्कृत पोपटपंची करून पोटार्थी भटांची जशी पूर्वी पैदास झाली तशी अलीकडे समता, बंधुता वगैरे बडबड करून तुंबड्या भरणारी एक जमात उगवली आहे. तीच पीत पुरोगाम्यांची जमात. सवंग, नाटक्या आणि पोकळ पुरोगाम्यांची जमात.

जोपर्यंत वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी ही माध्यमे मूठभर कम्युनिष्ट आणि पीत पुरोगाम्यांच्या ताब्यात होती, तेव्हा यांचे चांगले चालले होते. वाचक-प्रेक्षकांकडे त्यांना आव्हान देण्यासाठी काही साधनेच नव्हती. मात्र आंतरजालाच्या प्रसारामुळे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची सोय झाली आणि यांच्या पोटात मुरडा आला. तुम्ही जे बोलताय, त्यामागे तर्क काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या. त्यात यांच्या आक्रस्ताळी, एकांगी आणि अतार्किक वागण्यामुळे आपल्या ब्रँडला धोका पोचतो, हे कळाल्यावर वागळे-केतकर-राजदीप संप्रदायाला त्यांच्या त्यांच्या मालकांकडून नारळ मिळाले. (अंबानींनी काढल्यानंतर वागळेंना कोणीही घेतले नाही, हे सूचक होते.) पण हे सर्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षामुळेच घडल्याचा समज वागळेंचा झाला. आताच दर्डा शेठच्या मदतीने नवीन चॅनल काढून परत हातवारे करायला मिळणार, असा मनसुबा चालला होता. पण तोही फिसकटला आणि प्रसिद्धीला चटावलेल्या या पीत पुरोगाम्याने जोशीच्या निमित्ताने आपली 'जात' दाखवली.

(निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या संभाषणाची हीच ती ध्वनिफीत - https://t.co/Mx7BOxklCi)