Friday, August 24, 2007

आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रिय बंधु आणि भगिनींनो,
आज आपण माझा "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा अध्यक्ष या नात्याने जो सत्कार करत आहात, त्याबद्दल मी मनापासून आनंद आणि आभार व्यक्त करतो. खरं तर आपण माझा हा जो गौरव करत आहात, त्यातून माझ्याबद्दल आपल्या मनात असलेला जिव्हाळा अन्‌ आपुलकीच नजरेस पडते. जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्वत्र चंगळवाद आणि पैशाचीच महती असताना, केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर उद्योग करण्याची आणि यशस्वीही होण्याची उमेद मला आपल्यासारख्या सर्वसामान्यांमुळेच मिळाली आहे, हे मी अभिमानाने नमूद करू इच्छितो.

खरं तर एकेकाळी मीही आपल्यासारखाच साधा एक कर्मचारी होतो. महिन्याच्या महिन्याला संसाराचा गाडा रेटताना मेटाकुटीला येण्याचे प्रसंग नेहमीच यायचे. दर महिन्याला पगाराकडे डोळे लावून बसायचे आणि पगार झाला, की निरनिराळी बिले चुकवायची हा माझा शिरस्ता होता. एखाद्या पापभीरू माणसाने खोटा आळ आल्यावर अटकपूर्व जामीन मिळवावा, तसे मी पगारपूर्व बिलांची व्यवस्था करायचो. त्यावेळी दहा तारखेला माझा पगार व्यायचा आणि अकरा तारखेला माझा "मंथ एंड' सुरू व्हायचा. जगात खर्चाचे मार्ग चोहोदिशांनी खुले होत होते आणि बचतीचे मार्ग खुंटत होते. त्यावेळी या अर्थप्रधान जीवनाला काही पर्याय आहे की नाही, हा प्रश्‍न मला पडला. त्या प्रश्‍नाला मिळालेले उत्तर आज या कंपनीच्या यशाने रूपाने आपल्यासमोर आहे.

या प्रवासाची सुरवात कशी झाली, ते येथे सांगितल्यास अप्रस्तुत ठरणार नाही. असाच एका महिन्यात पगाराची रक्कम बिलांमध्ये खर्ची पडल्यावर मी वाण्याच्या दुकानात गेलो होतो. चहासाठी घरात पावडर होते आणि साखर मात्र संपलेली होती. (जीवनातील गोडवा आधीच संपला होता, आता साखरही संपलेली होती.) दुकानदार उधारीने काही देण्याची शक्‍यता नव्हतीच. मात्र मी गरीब असल्याने माझ्याकडे प्रेम आणि करुणा खूप असल्याचे मी ओळखून होतो. त्यामुळे अत्यंत कळवळून दुकानदाराला म्हणालो, ""मालक, जरा एक किलो साखर हवी होती. माझ्याकडे आता पैसे बिल्कुल नाहीत. पण आपुलकी आणि जिव्हाळा भरपूर आहेत. तर जरा थोडासा जिव्हाळा घेऊन साखर देता का?''

मित्रहो, सांगायला खूप आनंद वाटतो. तो दुकानदार साधा किराणा दुकानदार होता. देशात अद्याप मॉलचे वारे पोचले नव्हते. त्यामुळे सौजन्य शिल्लक असलेल्या त्या दुकानदाराने मान डोलाविली आणि म्हणाला,

"साहेब, आपुलकी देत असाल तर पैशांची काय गरज आहे? अन्‌ जिव्हाळा असल्यानंतर एक काय दोन किलो साखर घ्या ना.''

हीच ती सुरवात होती. केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर व्यवहार करता येतो, हे मी ओळखले. त्यानंतर सिटी बस, रेल्वे, मल्टिप्लेक्‍स, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मी जिव्हाळा व आपुलकीचाच वापर करून व्यवहार केला. त्यातूनच "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा जन्म झाला. कंपनीने कणाकणाने जिव्हाळा व आपुलकी जोडली व आज ती पैशांऐवजी केवळ जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकीद्वारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनाला नवा आनंद देत आहे, याचा सर्वांनाच आनंद व्हायला हवा.

जरा आमच्या कंपनीच्या धोरणाबद्दल सांगतो. पैसा हा जगातील सर्वच संघर्षाचे मूळ असल्याचे मार्क्‍सने म्हटले आहे. (आपल्या पूर्वसुरींनी व ज्येष्ठांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायलाच हवे, नाही का?) त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कधीही पैशांमध्ये पगार देत नाही. पैशांमध्ये पगार दिला, की त्यांच्या अपेक्षा खूप वाढतात अन्‌ मानवाच्या जीवनातील सर्व दुःखांचे मूळ अपेक्षांमध्ये आहे, असे भगवान गौतम बुद्धांनी म्हटले आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कर्मचाऱ्यांना पैशांऐवजी प्रेम आणि जिव्हाळा द्या. आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सकाळी कामावर आल्यापासून घरी जाईपर्यंत आपुलकीचा वर्षाव होतो. त्यामुळे त्यांची चित्तवृत्ती तर उल्हसित राहतेच, शिवाय कार्यक्षमताही अनेक पटींनी वाढते. एवढेच नाही, तर बाहेरच्या जगातही सर्वत्र केवळ जिव्हाळा आणि आपुलकीचाच व्यवहार करण्याचीही त्यांना सवय लागली आहे. यादृष्टीने पाहिली असता, संपूर्ण जगात आता या गोष्टींचाच प्रसार होत आहे.

जे आमच्या कर्मचाऱ्यांशी, तेच आमच्या ग्राहकांशी. आज "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड' इतक्‍या विविध उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. परंतु कुठेही आम्ही पैशांची तडजोड न करता स्नेह, जिव्हा आणि आपुलकी यांच्याच बळावर प्रगती करत आहोत. भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये चालणारे अर्थपूर्ण व्यवहार जगप्रसिद्ध आहेत. मात्र तिथेही मी, माझे कर्मचारी आणि ग्राहक केवळ याच बाबींचा उपयोग करतात. बंधु-भगिनींनो, माझं आज आपल्या सर्वांपुढे एकच सांगणे आहे. पैशांचा मोह टाळा. जागतिकीकरण आणि चंगळवाद आपल्या देशासाठी चांगला नाही. केवळ स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी याच शाश्‍वत बाबी आहेत. त्यांच्या उपयोगातून आपण नवीन, समाधानी आणि सुखी जग निर्माण करू शकतो. आपण केलेल्या या गौरवाबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो अन्‌ माझे भाषण संपवितो.

Sunday, August 19, 2007

श्रावणमासी "डीडी' उपाशी

तुराज श्रावण! या महिन्याचे नाव घेतले की अनेकांमधला कवी "फणा' वर काढतो. चहूकडे हिरवळ पसरली आहे, पावसाच्या धारा अधून-मधून उन्हाच्या तिरीपेशी लपंडाव खेळत आहेत...वातावरणात एक तजेला पसरला आहे आणि नव्या नव्या वेली जमिनीतून डोके वर काढत आहेत. पुणे शहर नसेल, तर तिथे चिमण्या-कावळे व अन्य पक्षी निसर्गाने त्यांना दिलेल्या मर्यादित आवाजात, पण हिंदी चित्रपटातील गाण्यांहून कित्येक पटींनी मधुर गाणी गात आहेत...असं काहीसं रम्य चित्र श्रावणाच्या नावासरशी डोळ्यांपुढे उभे राहते. त्यात ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ असे साक्षात बालकवींचे वचन. त्यामुळे श्रावण म्हणजे केवळ गोडवा असंच काही जणांनी वाटत राहतं. अर्थात हे फक्‍त काही जणांच्या बाबतीत.

श्रावण महिना म्हटला, की माझ्या पोटात गोळा उभा राहतो. कारण श्रावणाचा पहिला हल्ला पोटावरच होतो. या महिन्याचे आगमन होताच पहिले छूट शाकभाज्यांच्या पर्यायी अन्नावर गदा येते. आपल्या "प्राण'प्रिय खाद्यावर असे पाणी सोडण्याचे जीवावर आले, तरी कर्तव्य करावेच लागते. कारण प्रश्‍न श्रद्धेचा असतो, संस्कारांचा असतो. "ममैवांशो सर्वलोके जीवभूत सनातनः' असे भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेत सांगितले आहे. तरीही एका विशिष्ट महिन्यात भगवंताला कोथींबीर, कारले, पालक आणि तत्सम सजीवच का चालतात आणि अन्य पदार्थ अभक्ष्य का ठरतात, याचे कोडे उलगडत नाही. अन्‌ वरून याला श्रावण"मास' म्हणून आम्हाला खिजवायचे?

बरं, एवढ्यावरच उरकलं तर एवढ्या महिन्याभराचे फारसे दुःख वाटले नसते. प्रश्‍न येतो तो चार सोमवार, एक चतुर्थी अशा एकाहून एक एकदिवसीय कसोटींचा! काय सांगावं, या दिवसांचा सामना कसा करावा, या विवंचनेत अन्नपाणी गोड लागत नाही हो! एक तर मराठी पत्रकार असल्याने उपासमारी ही तशी पाचवीलाच पुजलेली! त्यात आणखी कसेबसे दोन घास घशाखाली घालायचे, तर त्याचीही चोरी. "चरैवेति चरैवेति एतद्‌ सत्यम्‌' हा ज्याचा बाणा, त्याला या दिवशी ज्या अग्निदिव्याला सामोरे जावे लागते, त्याची कल्पना इतरांना येणार नाही. वर्षाचे 357 दिवस (चार सोमवार, दोन एकादशी, एक चतुर्थी आणि एक महाशिवरात्री धरून) भलेही हा माणूस वडापावच्या गाड्याकडे तुच्छतादर्शक आढ्यतेने जातो. मात्र नेमका या दिवशी वडापावचा वास त्याला आपल्याकडे ओढून घेतो. "कळेना कळेना वळेना वळेना' असं समर्थ रामदासांनी म्हटले आहे, त्याची प्रचिती यावेळी येते. अन्‌ उपास करणाऱ्याला तोंड दाबून बुक्‍क्‍यांचा मार!

एवढे उपास केल्यानंतर मला एक शंका राहून राहून येते. उपासाच्या खाद्यांचे आणि "इंडियन पीनल कोड'चे (ग्रामीण वर्तमानपत्रांत बव्हंशी आढळणारा भारतीय दंड विधान उर्फ भा. दं. वि.) नियम एकाच व्यक्तीने केले असावेत. त्याशिवाय या दोन्ही नियमांमध्ये विचित्रपणाबाबत एवढे साम्य आढळले नसते. उपासाच्या दिवशी काय खायचं आणि काय खायचं नाही, हे लक्षात ठेवायचे म्हणजे खायची गोष्ट नाही. अहो, पिष्टमय पदार्थ असलेला साबुदाणा उपासाला चालतो, मात्र यज्ञात आहुती देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साळींचे पोहे निषिद्ध! दक्षिण अमेरिकेतून युरोपमार्गे भारतात आलेला बटाटा ओ.के.., वनस्पती तेलांपासून बनलेला डालडा ओ.के. मात्रत्याच वनस्पतींची भाजी हद्दपार! तांदळाची जातभाई भगर उपासाच्या दिवशी मानाने मिरविणार आणि अरबस्तानातील खजूरही शेखी मिरविणार! बाहेरच कुठे उपासाचे खावे म्हटले, तर साबुदाणा वडे आणि नायलॉन चिवडा या हॉटेलचालकांमध्ये अतिलोकप्रिय पदार्थांशिवाय अन्य काही मिळण्याची खोटी! त्यात हे वडे आणि चिवडा पामोलिव तेलातून काढलेला...तेही अन्य पदार्थ तळलेल्याच! म्हणजे करमणूक हवी म्हणून मराठी चित्रपटाला जायचं आणि प्रखर वास्तवाचं प्रतिबिंब, भावभावनांचे कंगोरे, वैचरिक घुसळण अशा नावांखाली जमेल तेवढी (अन्‌ अत्यंत स्वस्तातली)पिळवणूक सहन करून यायचं! उपास करणाऱ्या प्रत्येक माणसाकडे अशा "सेल्फ गोल'चे पोटभर अनुभव असतातच.

श्रावणात ज्या दिवशी उपास नसतात, त्यादिवशी उपासही परवडतील असे सण असतात. ईश्‍वराने सगळे महिने तयार केल्यानंतर अनेक सण राहून गेल्याची त्याला आठवण आली आणि ते सर्व सण त्याने श्रावणातच कोंबले असावेत, असा माझा एक सिद्धांत आहे. बरं, हे सणही कसे गोडधोड करून खायचे...साग्रसंगीत पुरणाची पोळी तोडायचे. म्हणजे आमची डबलबार अडचण. गोडधोड करायचे म्हटले, की वेळेवर खायला मिळणार नाही, याची "अनुभव हीच खात्री!' अन्‌ समजा मिळालेच तर पुरणाची पोळी खाऊन "डोळे मिटून' ऑफिसमध्ये जायला सगळेच काही सरकारी कर्मचारी नसतात. त्यात पंचामृत, चटण्या हे जेवणाच्या ताटातले "साईड हिरो' या महिन्यात एकदम सुपरस्टारशी स्पर्धा करायला जमतात. त्यामुळे "जेवण नको पण पदार्थ आवर,' अशी अवस्था होऊन जाते. या महिन्यात सत्यनारायणाच्या पूजाही फॉर्ममध्ये असल्यामुळे तिकडे कुठे जेवायचे तोंडभरून आमंत्रण असतेच. इकडे श्रावणातील पाऊस व उन्हाची लपाछपी चालू असते, दुसरीकडे जेवण अन्‌ उपासाचा "मेरी गो राऊंड' चालू असते.

उपास पुराणाच्या या अडचणींचे हे एवढे अध्याय असले, तरी या सर्व रसांचा परिपोष एका अध्यायात होतो. तो अध्याय म्हणजे उपास करणारा एकटा माणूस. त्याला उपासाचे करून द्यायला कोणी नाही, अन्‌ उपास सोडण्यासाठी करून द्यायलाही कोणी नाही. असा माणूस फारतर काय करेल, काही नाही "मेरे नैना सावन भादो...फिर भी मेरा मन उपासा...' असे गाणे गाईल. कारण काय, तर एका दिवसाच्या उपासाने आपण मरत नाहीत, याची त्याला पुरेपूर जाणीव असते. शेवटी काय, तर व्हरायटी ऍडस्‌ स्पाईस टू लाईफ...अन्‌ कधी कधी हा मसाला उपासदार असतो...एवढंच!!!