Friday, September 28, 2007

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

दुसरी इनिंग
----------
हमदशाह अब्दाली याच्या भारतातवर तीन स्वाऱया झाल्यानंतर त्याला हग्या मार देऊन परत कधीही न येण्यासाठी जाण्यास मराठ्यांनी भाग पाडले. त्याप्रमाणेच गेल्या दीड एक वर्षात सर्व स्पर्धांमध्ये मार खाल्यानंतर अचानक बीसीसीआयच्या संघाने विजय मिळविला. यात त्यांचे कर्तृत्व होतेच. विजयासाठी त्यांचे कौतुक होणेही साहजिकच होते. मात्र 'अति सर्वत्र वर्जयेत्' या पूर्वजांच्या सल्ल्याकडे लक्ष देतील तर ते भारतीय कसले? त्यामुळे मग केवळ एखाद्या राजाचा राज्याभिषेक सोहळाच भासावा, असा या खेळाडूंचा जंगी सत्कार करण्याचा घाट घालण्यात आला. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच युवराजची आई, रोहितचे बाबा अशा नामवंत आणि तज्ज्ञांच्या मुलाखती विविध वाहिन्यांवरून दाखविण्यात आल्या, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र संघ जिंकल्यानंतर पालीचे हे चुकचुकणे डायनासोरच्या गुरगुराटीत बदलले होते.

रणांगण आणि 'रनांगण' यात भारतीयांची नेहमीच गल्लत होते. त्यात समोर पाकिस्तान म्हटल्यानंतर तर काही बोलायलाच नको. बीसीसीआयचा संघ मुंबईत दाखल झाला आणि तेथून वानखेडे मैदानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी अख्ख्या मुंबई महानगरीच्या वाहतुकीला वेठीस धरण्यात आले. मुंबई म्हणजे काही पुणे नाही, की वाहतूक चालेल आपली रामभरोसे. आधीच गणेश विसर्जनासाठी आदल्या दिवशी शहराला विश्रांती मिळालेली नव्हती, त्यात हा त्रास. अनुत्पादक कामासाठी देशाच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरण्याची काय ही वृत्ती? अन गप्पा करायच्या महासत्ता होण्याच्या.

आता पब्लिक जमा झाली म्हणजे आपले स्वयंघोषित पब्लिक सर्वंटही तिथे पोचणारच. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे या खेळातील 'मंजे हुए खिलाडी.' साहेब सर्वांत आधी मैदानात शड्डू ठोकून हजर होते. त्यांच्या जोडीला महाराष्ट्राचे अतिकर्तृत्ववान मुख्यमंत्री विलासराव देशमुखही मांड ठोकून बसले होते. पवार यांच्या कारकीर्दीतच तर भारतीय क्रिकेटची भरभराट झाली ना! इंग्लंड, दक्षिण आफ्रिका दौऱयातील एकदिवसीय सामन्यांतील मानहानीकारक पराभव, चॅपेल गुरुजींच्या ट्यूशन घेऊन गांगुलीच्या कारकीर्दीचा केलेला खेळखंडोबा, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत १९७९ नंतर न जमलेली पहिल्याच फेरीतील एक्झिट...अशा एकाहून एक चढत्या पायऱयांनी बीसीसीआयचा संघ प्रगती करत होता. त्यात विश्वचषक, मग ती वीस-२०चा का असेना, संघाने जिंकल्यानंतर आपल्या अध्यक्षपदाचे सार्थक झाल्यासे साहेबांना वाटले तर काय नवल? त्यामुळे समस्त भारतीयांना सात शतकांत न मिळालेला गौरव मिळवून दिलेल्यांचा गौरव करण्यासाठी ते ही आले.

'राष्ट्रवादी' आल्यावर 'महाराष्ट्र'वादी न येऊन कसे चालेल. त्यामुळे लातूरचे देशमुखही आले. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पॅकेज दिल्यानंतरही विदर्भात दीडशे-दोनशे शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. तेव्हा देशमुखांचे मन द्रवल्याचं दिसलं नाही. उलट केंद्रातील शंकरसिंह वाघेला नामक नेत्याच्या साथीने गेल्याच महिन्यात शेतकऱयांबद्दल आक्षेपार्ह उदगार काढल्य़ाबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी उद्धारही झाला. मात्र वीस-२० स्पर्धेत संघाने विजय काय मिळविला, देशमुखांची देशभक्ती १०० टक्के जागी झाली. त्यातून त्यांनी खेळाडूंसाठी बक्षीसही जाहीर केले. महाराष्ट्रातील पन्नासेक जवान तरी गेल्या वर्षभरात काश्मीर आणि देशाच्या अन्य भागात शहीद झाले. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही केल्याचे, केल्याचे कशाला जाहीर केल्याचेही आठवत नाही.
याच राज्यातील अन्य खेळांतील अनेक खेळाडू प्रोत्साहनावाचून खितपत पडले आहेत. कोल्हापूरच्या वीरधवल खाडे या जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळावी, यासाठी सकाळने गेल्या वर्षी मोहीम चालविली. शिवछत्रपती पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार जाहीर करूनही अनेक खेळाडूंना ते वेळेवर मिळत नाहीत. त्यावेळी सरकार हलल्याचं दिसत नाही. आता मात्र क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार वाटण्यात पुढाकार घ्यायला तयार. एकतर बीसीसीआय आणि अन्य पुरस्कर्त्यांनी जाहीर केलेल्या पुरस्कारांपुढे राज्य सरकारचे पुरस्कार म्हणजे हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते असाच प्रकार आहे. पण काय करणार, सभा हसली की माकडाला हसावंच लागतं.

एकूणात भारतीयांचं सेन्स ऑफ प्रोपोर्शन चांगलंच बहरू लागलंय. आपल्याच देशात आपण असे वागू लागलो, तर परकीय शत्रूंची गरजच काय?

Thursday, September 27, 2007

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

सबकुछ ट्वेंटी-२०!

त्रिभुज हिंदुस्तानी उपखंडात एकदिवसीय क्रिकेटचं वेड कमी होतं म्हणून की काय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 'आयसीसी' आता ट्वेंटी-२० क्रिकेट सुरू केलं आहे. खरं सांगायचं तर या सामन्यांना आपला मनापासून पाठिंबा नव्हता. आताही नाही. त्यात या सामन्यांमध्ये डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी पाच साडेपाच फुटांचे हलते आणि जीवंत देखावे उभे केल्यामुळे हे क्रिकेटचे सामने आहेत, की रामगोपाल वर्मा किंवा डेव्हिड धवनचे सिनेमे आहेत, हा कूटप्रश्नच निर्माण झाला.

तरीही भारतीय संस्कार असे एकाएकी थोडेच जाणार? त्यामुळे एकदा सामन्यांना सुरवात झाली आणि 'मन मॅचरंगी रंगले' अशी अवस्था झाली. संपूर्ण स्पर्धा बारा-तेरा दिवस चालली. यात दोन वेळेस हृदयविकाराचे झटके येण्याची वेळ आली होती. मात्र त्याच वेळेस गणेशोत्सव चालला असल्याने तेवढे एक विघ्न टळले.

पहिल्या काही सामन्यांमध्ये किरकोळ संघांशी गाठ पडली. नंतर मात्र पाकिस्तानशी सामना आला आणि ट्वेंटी-२० विरोधातील सगळा अभिनिवेश मागे टाकून आपण बीसीसीआयच्या संघाला पाठिंबा दिला. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत नाही, असे प्रतिज्ञापत्र बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी दाखल केले होते, आठवते ना.) त्या सामन्यात बीसीसीआयच्या संघाने ट्वेंटी-२०च्या मानाने अत्यंत कमी धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल ऐकणे आपल्या कानाला झेपणार नाही, याची खूणगाठ बांधली होतीच. मात्र त्या दिवशी निळ्या कपड्यांतील गड्यांनी वेगळाच डाव केला. त्यांनी पाकिस्तान संघाच्या एकामागोमाग विकेट काढल्या. झालं, आता आम्हाला काम सोडून मॅच पाहावा लागणार! झालंही तसंच. हातातलं जे काय काम होतं, ते उरकलं, नाहीतरी दुसऱया दिवशी आम्ही लावलेले पान कोणी वाचणारच नव्हतं. लोकं मॅचची बातमीच वाचणार होते. साधारण अकराच्या पुढे स्वारी दूरचित्रवाणी संचाच्या समोर स्थानापन्न झाली. (म्हणजे उभी राहिली. ऑफिसमधील खुर्च्यांचे बुकिंग आधीच झाले होते.) क्रिकेटच्या मोठ्या सामन्यांचं एक बरं असतं. जमलेली गर्दी त्यांच्या कॉमेंटस् अगदी जीवाच्या कराराने देत असतात, त्यामुळे आपल्यासारख्या नाठाळ क्रिकेटबाजाला सामना कसा चालू आहे, ते कळत राहतं.

गर्दीच्या कॉमेंटमधून वाट काढत मॅच अशा वळणावर पोचला की, आता १९८६ सालच्या शारजातील सामन्याची रिप्ले बघायला मिळणार याची खात्री पटली. मात्र शेवटच्या चेंडूवरही धावा काढण्यात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले आणि सामना बोल आऊट मध्ये गेला. आता बोल आऊट, फ्री हिट इ. इ. यावर भवती न भवती सुरू झाली. छातीवर मणामणाचं ओझं ठेवणारे ते काही मिनिटे गेले. बॉल आऊट सुरू झालं आणि काही मिनिटांनी बीसीसीआयचा संघ जिंकल्याचंही दिसलं. आपले गंगेत घोडे न्हाले. आता विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, तरी काळजी नाही, असं निश्चिंत बसलो होतो. पण हाय रे दैवा, यंदा बाप्पा काही वेगळाच प्लॅन करून आले होते. एरवी काळेनिळे होईपर्यंत मार खाणारे मेन इन ब्लू आता पार अंतिम फेरीपर्यंत गेले होते.

सोमवार. २४ सप्टेंबर. सुदैवाने अंतिम सामना साडेपाच वाजता सुरू व्हायचा होता. त्यामुळे स्वारी कार्यालयात असली तरी कामात नव्हती. याहीवेळी समोर पाकिस्तान होता. आता साखळी सामन्याची रिप्ले होणार का छोड दे इंडिया होणार, हे याची देही याची डोळा पाहणे ही काळाची गरज होती. प्रथेप्रमाणे कार्यालयातील टीव्हीसमोर मानाचा शेवटचा प्रेक्षक म्हणजे डीडी आल्यानंतर सामना सुरू झाला. याही वेळी १५७ धावा काढून नीलपुरूष कपड्यांच्या खोलीत (ड्रेसिंग रूम) परतले. आता पुढे काय होणार याची स्थानिक, प्रामाणिक, वैतागिक आणि अगतिक(ही) तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली. काही वेळाने पाकिस्तानचा डाव सुरू झाला. तेव्हाच मॅच संपल्याशिवाय पान लावायला येणार नाही, असा निरोप पाठविला होता. पाकिस्तानचा डाव मागील पानावरून सुरू झाला आणि तिथेच संपला. कोण खेळतंय, कोण हरलंय आणि कोण जिंकलंय, अशा मूलभूत जिज्ञासेपलिकडे जाण्याचा आपला स्वभाव नाही. त्यामुळे कोण बाद झालंय, कोण आबाद झालंय...वगैरे वगैरे बाबींकडे आपलं लक्षच नव्हतं. क्रिकेटचे सामने पहायचे ते केवळ प्रेक्षकांतील हलते देखावे पाहण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे प्रबोधन करून घेण्यासाठी, असं आपलं नेटकं धोरण आहे.

या धोरणाला पहिला तडा गेला सामन्याच्या शेवटून दुसऱया षटकात. मिस्बाहने एकामागोमाग षटकार आणि चौकारांची मालिका सुरू केली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार गेला आणि हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याची चिन्हे दिसू लागली. चार चेंडू अन् सहा धावा...इकडे बाप्पांचा धावा सुरू झाला. मात्र बाप्पांनी तोपर्यंत तरी निरोप घेतलेला नसल्याने ते धावून आले...मिस्बाहने विनाकारण विकेट फेकली आणि चेंडू उंच भिरकाविला...हाताचा रिस्टबँड नीट करण्यात गुंतलेल्या श्रीशांतनेही तो फटका लीलया झेलला आणि एकदिवसीय क्रिकेटच्या लिंबू-टिंबू स्पर्धेत बीसीसीआयच्या संघाने विजेतेपद पटकावले.

स्पर्धेची एक इनिंग इथे संपली. आता दुसरी इनिंग आपण पाहणारच आहोत, मात्र ते ब्रेक के बाद!