Wednesday, December 12, 2007

खराखुरा दलपती

हिंदीतील 'अंधा कानून' या चित्रपटाद्वारे रजनीकांत उत्तर भारतातील प्रेक्षकांना माहित झाला. मात्र त्यापूर्वीच तेलुगु आणि कन्नड प्रेक्षकांचा तो गळ्यातील ताईत झाला होता. तमिळनाडूत तर त्याच्या नावाचे नाणेच तिकिटबारीचालत होते. १९८७ साली एमजी रामचंद्रन यांचे निधन झाले आणि त्यानंतर रजनीकांत राजकारणात येणार अशा अफवा सुरू झाल्या. याचवेळी त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल, अध्यात्माच्या ओढीबद्दल, समाजसेवेच्या वृत्तीबद्दल चर्चा होऊ लागल्या.

या सर्वाँचा फायदा चित्रनिर्मात्यांनी घेतला नसता तरच नवल. त्यामुळे रजनीकांतला केंद्रस्थानी ठेवून चित्रपट जसे होऊ लागले, तसे रजनीकांतच्या जीवनावरच चित्रपट तयार होऊ लागले. 'अण्बुळ्ळ रजनीकांत' हा असा जगात कुठेही बनला नसेल अशा प्रकारचा चित्रपट. या संपूर्ण चित्रपटात रजनीकांतने रजनीकांतचीच भूमिका केली आहे. त्यात त्याचे घर, आध्यात्मिक गुरु यांचे चांगलेच चित्रण घडते.

त्यानंतर 'अन्नामलै', 'मुथु', 'पडैयप्पा', 'बाशा' व 'बाबा' आणि आता 'शिवाजी'...अशा चित्रपटांमध्ये पडद्यावर एखाद्या पात्राच्या वेशात रजनी असला तरी त्या पात्राचा सूत्रधार रजनीकांत असल्याचेच जाणवते ते त्यामुळे. त्याच्या सर्व चित्रपटांत रजनीकांत मातृप्रेमी असतो, देवभक्त असतो ते यासाठी. त्याच्या गाण्यातही त्याच्या तत्वज्ञानाच्या ओळी असतात. रजनीकांत बोलतो ते संवादही त्याचेच तत्वज्ञान सांगतात. पडद्यावर तो जे बोलतो त्यात वास्तवाचा अंश असतो असे त्याचे चाहते मानतात. नान ओरु तडवै सोन्ना, नुरु तडवै सोन्न मातिरी (मी एकदा जे सांगितले ते शंभरदा सांगितल्यासारखं आहे) किंवा नान एप्पो वरुवेन एप्पडी वरुवेन यारुक्कुम तेरुयादु. आणा वर वेण्डिय नेरत्तिले नान करेक्टा वरुवेन, (मी कधी येणार कसा येणार कोणालाही माहित नाही. मात्र येण्यासाठी योग्य वेळी मी नक्की येईन) अशा त्याच्या वाक्यांना त्याच्या राजकारणप्रवेशाशी जोडून पाहण्यात येते.

यादृष्टीने 'पडैयप्पा' हा चित्रपट रजनीकांतच्या जीवनाचेच पडद्यावरील दर्शन आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. या चित्रपटात रजनीकांतच्या समोर खलनायक नाही तर खलनायिका आहे (जयललितांचे रुपक), त्याच्या खऱया जीवनाप्रमाणेच चित्रपटातही दोन मुली दाखविल्या आहेत. चित्रपटातील अनेक दृश्यांमध्ये त्याच्या तोंडचे संवादही वास्तव जीवनाशी निगडीतच दाखविण्यात आले आहेत. मला आठवते १९९९ सालच्या फेब्रुवारीत हा चित्रपट आला होता. त्यावेळी एन वळी तनी वळी या त्याच्या खास 'पंच डायलॉग'ने संपूर्ण तमिळनाडूला वेड लावले होते. या चित्रपटाच्या एका दृश्यात तो खलनायिकेला म्हणतो, पोंबळ पोंबळेया इरुक्कनुम. (बाईने बाईसारखे रहावे.) त्यावेळी अख्ख्या थिएटरमध्ये 'जयललिता...जयललिता'चा आवाज घुमायचा. 'पडैयप्पा'चे दिग्दर्शक के. एस. रवीकुमार यांनी चित्रपटाच्या यशाचे वर्णन इमालय वेट्री (हिमालयासारखे उत्तुंग यश) असे केले होते.

'बाबा' हा तसा (रजनीकांतच्या मानाने) अपयशी चित्रपट. या चित्रपटात एक दृश्य होते...नायिका (मनीषा कोईराला) हिला सिनेमाची तिकिटे हवी असतात. बाबा (रजनीकांत) तिला तिकिटे काढून देण्याची ऑफर देतो. नायिका यावर अविश्वास दाखविते. त्यानंतर बाबाचा मित्र (गौंडमणी) तिला म्हणतो, "याने मनात आणलं तर सिनेमाचीच काय, खासदारकीचीही तिकिटे मिळतात." या वाक्याला टाळ्यांची दाद मिळाली नसती तरच नवल. 'शिवाजी'मध्येही अशा प्रत्यक्ष आणि पडद्यावरील जीवनाची सीमारेषा प्रचंड धूसर आहे. रजनीबाबतच्या या वास्तवाचा वेगळाच अनुभव मणीरत्नमलाही आला. 'दलपती' चित्रपटात रजनीकांत मुख्य नायक. सोबत अरविंद स्वामी आणि मलयाळम अभिनेता ममूट्टी हेही होते. चित्रपटाच्या कथेच्या मागणीनुसार रजनीकांतचा मृत्यू अपेक्षित होता. मात्र तमिळ प्रेक्षकांना हा शेवट कधीही खपला नसता. रजनीकांतचा मृत्यू असलेला चित्रपट अद्याप तमिळमध्ये निर्माण व्हायचा आहे...अन आता तशी शक्यताही नाही. तर मणीरत्नमला अपेक्षेनुसार मोठी विरोध झाला. वितरकांनीही त्याच्या चित्रपटाला (रजनी असूनही) हात लावायला नकार दिला. अखेर क्लायमॅक्स बदलून त्याला तो चित्रपट तमिळनाडूत वितरित करावा लागला. केरळमध्ये मात्र मूळ क्लायमॅक्स असलेली मलयाळम आवृत्ती वितरित करण्यात आली.

रजनीकांतच्या पडद्यावरील भूमिकेचा वास्तव जीवनात काय परिणाम होतो, हे मी डोळ्यांनी पाहिले आहे. 'बाशा' चित्रपटात रजनीकांत ऑटोचालक दाखविला आहे. त्याच्या ऑटोवर प्रसवूक्काक इलवसम (गरोदर स्त्रियांसाठी मोफत) असे ठळक लिहिलेले दिसते. तमिळनाडूत गेलो असताना तेथील अनेक रिक्षांवर मला अशा प्रकारचीच सूचना लिहिलेली दिसली. प्रत्यक्षाहूनि प्रतिमा उत्कट असा अनुभव चित्रपट क्षेत्रातील अनेकांना येतो. मात्र प्रत्यक्ष आणि प्रतिमा यांच्यातील फरक क्षीण झालेला रजनीसारखा एखादाच. तो मराठी आहे हा योगायोगाचा भाग आहे. काही झालं तरी आमच्यासारख्या 'मनोरंजन के मारें'चा तो बॉस आहे, हे नक्की!

Tuesday, December 11, 2007

उद्या 'बॉस'चा वाढदिवस...

क्रावू नका. मी 'बॉस' म्हणजे आपल्या रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड याच्याबद्दल बोलतोय. तमिळनाडूचा सुपरस्टार उर्फ तलैवर उर्फ स्टाईल किंग!

रजनीकांतचा जन्म १२ डिसेंबर १९५० रोजीचा. म्हणजे उद्या तो वयाची ५७ वर्षे पूर्ण करून ५८ व्या वर्षात प्रवेश करेल. साधा झोपडपट्टीत राहणारा एक मुलगा, नंतर बस कंडक्टर आणि त्यानंतर काही दिवस संघर्ष करणारा अभिनेता ते थेट तमिळ चित्रपटांचा अनभिषिक्त सम्राट होण्यापर्यंत रजनीकांतचा प्रवास झाला. आजही नम्र आणि प्रसिद्धीपराङमुख वर्तनासाठी प्रसिद्ध असलेला हा 'शिवाजी' साठीच्या दिशेने प्रवास करतोय.

रामजीराव गायकवाड आणि रमाबाई यांच्या पाच अपत्यांपैकी चौथा शिवाजी. त्याचे बालपण हलाखीत गेले. लहाणपणी रामकृष्ण मिशनच्या शाळेत त्याचे शिक्षण झाले. ते संस्कार आजही कायम असल्याचे तो दाखवितो. बंगळूरच्या शहर बस सेवेत कंडक्टर म्हणून हा मुलगा दाखल झाला. याच काळात विविध नाटकांतून भूमिकाही करायचा. त्याच्या जो़डीला विक्षिप्त तरीही भूरळ घालणारे हातवारे करायचा. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला अभिनेता बनण्याचा आग्रह केला. त्यातून कंडक्टरकी सोडून शिवाजीचा प्रवास झाला चेन्नईतील फिल्म इन्स्टिट्यूटकडे. तिथला अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर सुरु झाला भूमिका मिळविण्यासाठीचा प्रवास.
यावेळी आलेला एक अनुभव त्याने एकदा सांगितला होता...'त्यावेळच्या एका मोठ्या अभिनेत्याकडे शिफारस मागण्यासाठी गेलो होतो. त्या अभिनेत्याने उद्या ये, म्हणून सांगितले. त्यावेळी रहायचे कुठे हा प्रश्न होता...तेव्हा मग चेन्नई सेंट्रलच्या प्लॅटफॉर्मवर रात्र काढली. दुसऱया दिवशी गेलो, तर पुन्हा दोन दिवसांनी येण्यास सांगितले. पुन्हा मुक्काम प्लॅटफॉर्मवर. अशा रीतीने पाच दिवस काढल्यानंतर मी त्या अभिनेत्याकडे जाणेच बंद केले.'

कन्नड भाषेतील 'कथा संगम' हा रजनीकांतचा पहिला चित्रपट. (त्यावेळी त्याला हे नाव मिळाले नव्हते.) ३२ वर्षांपूर्वी म्हणजे १९७५ साली 'अपूर्व रागङगळ' या चित्रपटातील काही मिनिटांचे दृश्य हा रजनीकांतचा तमिळ रजतपटावरील पहिला प्रवेश. चित्रपटाची नायिका भैरवी हिच्या कॅन्सरग्रस्त पतीची भूमिका त्याने केली होती. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी शिवाजीरावला ही भूमिका दिली. तमिळमधील गाजलेल्या 'बॅरिस्टर रजनीकांत' या चित्रपटावरून त्यांनी शिवाजीला हे नाव दिले. याच चित्रपटात तमिळ चित्रपटातील त्यावेळी उदयोन्मुख असलेल्या एका कलाकाराची महत्वाची भूमिका होती. वयाच्या पाचव्या वर्षापासून पडद्यावर झळकणाऱया या कलाकाराचा तो पंचविसावा चित्रपट होता. काही वर्षांनी रजनीकांतला चित्रपटसृष्टी सोडण्याची इच्छा झाली होती, त्यावेळी याच त्याच्या कलाकार मित्राने त्याला परावृत केले होते. लोकांच्या दृष्टीने रजनीचा प्रतिस्पर्धी असलेला हा मित्र म्हणजे कमल हासन.

मूळात 'अपूर्व रागङगळ' कधी आला आणि कधी गेला, हे चित्रपटगृहांच्या कर्मचाऱयांनाही कळाले नसेल. तो यशस्वी झाला असता तरी रजनीकांतला त्याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नव्हती. मात्र के. बालचंदर यांनी आपल्या सहायकाला जे सांगितलं ते शंभर टक्के खरं ठरलं. "या माणसावर लक्ष ठेव. त्याच्या डोळ्यांत आग आहे. तो एक दिवस खूप मोठा होणार आहे," ते म्हणाले होते. त्यानंतर 'मुण्ड्रु मुडिच्चु', 'गायत्री', '१६ वयतिनिले' अशा अनेक चित्रपटांतून त्याने खलनायकाच्या भूमिका निभावल्या. 'भुवन ओरु केल्विकुरी' या चित्रपटाने रजनीकांतला खऱया अर्थाने नायक केले. त्यानंतर १९७९ साली आलेल्या 'भैरवी' या चित्रपटाने रजनीकांतला सुपरस्टार हे बिरुद चिकटविले.

अमिताभ बच्चन नावाचे वादळ उत्तरेतील चित्रसृष्टीत घोंघावत असताना त्याचा प्रभाव दक्षिणेत पडणे स्वाभाविकच होते. त्यानुसार अमिताभच्या हिट चित्रपटांचे सर्व भाषांत आपापल्या मगदुराप्रमाणे रिमेक होत होते. तमिळमध्येही अमिताभच्या रिमेक झालेल्या अनेक चित्रपटांपैकी १२ चित्रपटांत रजनीकांत हिरो होता. अमिताभ, रजनीकांत आणि अन्य अभिनेते या सर्वांचे बहुतांश चित्रपट मी पाहिले आहेत. त्यावरून अमिताभची बरोबरी रजनीकांत करू शकला, असे म्हणता येत नसले तरी तो कुठे पडल्याचेही म्हणवत नाही. अमिताभच्या 'विजय' चित्रपटांमध्ये अमिताभ खालोखाल जर कोणी त्याची जादू निर्माण केली असेल तर ती रजनीकांतने. ती (दिवार), पडिक्कादवन (खुद्दार), बिल्ला (डॉन), पय्युम पुली (लावारिस), नंदवनत्तील तलैवन (कस्मे वादें) अशा अनेक चित्रपटांची यासाठी काढता येईल.

यांपैकी १९८० साली आलेल्या 'बिल्ला'ने रजनीकांतला अफाट यश मिळवून दिले. हा रजनीकांतच्या कारकीर्दीचा माईलस्टोन मानला जातो. शिवाजी गणेशन आणि एमजी रामचंद्रन यांसारखे जुने अभिनेते काहीसे निवृत्त झाल्याने तरुण रजनीला रान मोकळे होते. एकमात्र कमलहासनचा अपवाद होता. मात्र त्याचा प्रेक्षकवर्ग मर्यादित होता. रजनीच्या स्टाईल आणि टोटल मनोरंजनाच्या फॉर्म्युलाने एक ते दहा पर्यंतची जागा आधीच बुक केली होती. त्यामुळेच ऐंशीच्या दशकात अमिताभच्या रिमेक चित्रपटांत काम करणारा सामान्य रजनीकांत पाच वर्षांच्या आत दक्षिणेतला अमिताभ म्हणून ओळखला जाऊ लागला. याचवेळी बोफोर्समुळे बदनाम झालेल्या अमिताभच्या कारकीर्दीला किंचित ओहोटी लागलेली असली तरी रजनीकांतने कटाक्षाने स्वतःला सर्व वादांपासून बाजूला ठेवले होते. आपला अभिनय, घर आणि अध्यात्म यांतच समाधानी असलेल्या रजनीच्या चित्रपटांनी यशाचे नवे नवे सोपान चढायला सुरवात केली. अन यानंतर सुरू झाला रजनीचा रिल आणि रिअलमधील अंतर संपवणारा सोनेरी अध्याय...