Sunday, December 13, 2015

शरद पवार सगळं सगळं खरं सांगतील?


महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य (केवळ वय आणि ज्येष्ठत्वाच्या दृष्टीने, प्रतिज्ञापालनाच्या दृष्टीने नव्हे) शरद पवार यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस काल, १२ डिसेंबर रोजी, साजरा झाला. पवारांनी विधानसभेत प्रवेश केला तेव्हा ते सर्वात तरुण राजकारण्यांपैकी एक होते. आज ते राज्यातील सर्वात ज्येष्ठ व देशातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. या त्यांच्या प्रवासात पवारांचे मौन किंवा त्यांचे सूचक वक्तव्य हीच त्यांनी ओळख बनली आहे. गमतीने असं म्हटलं जातं, की पवारांच्या मनात काय चालले आहे हे प्रतिभाताईंनाही ठाऊक नसते. असंही म्हणतात, की पवार जांभई देतात तेव्हा त्याचेही वेगवेगळे अर्थ असतात.
सोयिस्कर मौन आणि राजकीय कसरती, यांची अशी जबरदस्त प्रतिमा असणाऱ्या पवार साहेबांनी लेखणी हाती धरून राजकीय आत्मकथा लिहीली आहे. साहेबांच्या शब्दांभोवती गूढ वलय आणि साहेबांच्या वाक्याला रहस्याची झालर. साहेबांचे वजन असे जबर, की सत्ता गमावल्यानंतर एका वर्षानंतरही सध्याचे सरकार त्यांच्याच जोरावर चालल्याचे  लोक मानतात.
ही सगळी रहस्ये साहेब आता उलगडून दाखविणार आहेत, असं म्हणतात. तसं महाराष्ट्राचे शाश्वत सत्ताधारी असलेल्या पवार साहेबांवर साहित्य काही कमी आहे, असे नाही. परंतु आतापर्यंत ते सगळे अंदाज, अनुमान आणि आराखडे यांच्या पलीकडे नाही. राजकारणाच्या रंगपटलावरील हा महानायक स्वत: काही बोलायला तयार नाही आणि बोलणाऱ्यांची धाव अनमान धपक्यापलीकडे नाही, अशी ही अवस्था होती.
'लोक माझे सांगाती' हे पवारांचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले असून १० डिसेंबर रोजी ते प्रकाशित झाले. राजहंस प्रकाशनाचे संपादक डॅा. सदानंद बोरसे यांच्या मते, "शरद पवारांची राजकीय कारकीर्द अनेक उतार-चढावांनी भरलेली आहे. ती अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये अडकलेली आणि अनेक प्रवाद-विवादांमध्ये सापदलेली आहे. पवारांच्या स्वभावातील अनेक वैशिष्ट्यांमुळे, त्यांनी रेखाटलेल्या राजकीय व्यक्तिचित्रांमुळे तसेच अनेक राजकीय घडामोडींच्या त्यांनी केलेल्या वर्णनामुळे ही आत्मकथा म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध-शतकाच्या राजकीय वाटचालीचा महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे."
आता या पुस्तकात पवारांनी पुलोदची स्थापना, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, पंजाब व अयोध्या यांसारखे विषय यावर लेखन। केले असल्याचे प्रकाशकांनी जाहीर केले आहे. पवारांनी अनेक वेळा केलेले पक्षबदल, त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुख्य म्हणजे दाऊद इब्राहीमशी संबंधांचे आरोप यांबाबत त्यांनी लिहिले आहे, असेही सांगितले गेले.

आता पवारच हे सांगतायत म्हटल्यावर हे पुस्तक चर्चेला खाद्य देणार, हे नक्की. याचे कारण म्हणजे ज्यांची उत्तरे पवारांकडून हवी आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. मावळमधील गोळीबार झाला तेव्हा पवार उत्तर न देता पत्रकारांसमोरून (पळून) गेले, स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेत स्वतः कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या देशातील सर्वाधिक आत्महत्या कशा घडू दिल्या, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना शेती सोडा असा सल्ला का दिला, अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून कोलांटउड्या का मारल्य, असे अनेक प्रश्न पवारांभोवती पिंगा घालत होते आणि घालत राहतील. त्यांची उत्तरे त्यांनी द्यावीत, ही सामान्य अपेक्षा आहे.
मात्र सह्याद्रीच्या फत्तराप्रमाणे अभेद्य असणारे पवारांचे मौन सुटणार का आणि त्यांच्या मनातील संपूर्ण संचित बाहेर पडणार का, हा खरा प्रश्न आहे. 

Thursday, December 3, 2015

तीन शहाण्यांची वर्षपूर्ती

Fadnavis
गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला शपथविधी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले, ही खरोखरच एक उपलब्धी मानायला हवी. आधी बहुमताच्या अभावात आणि नंतर उधार घेतलेल्या बहुमताच्या ओझ्याखाली हे सरकार चालताना लोकांनी पाहिले.
महिन्याभरापूर्वी भाजपच्या मंडळींनी आपली वर्षपूर्ती साजरी करून वचनपूर्ती केल्याचेही सांगितले. परंतु शिवसेना या सरकारमध्ये एक महिना उशिराने सामील झाली आणि तोपर्यंत सरकारचे अस्तित्व कागदोपत्रीच होते. पहिला एक महिना बहुमताची तजवीज करण्यातच गेला होता अन् कामाला मुहूर्त मिळालाच नव्हता. त्यामुळे ती वर्षपूर्ती फक्त भाजपची होती, सरकारची नव्हे, असेच म्हणावे लागेल.
आधीच्या सरकारांनी जराजर्जर केलेली राज्याची यंत्रणा आणि तिजोरी, कायद्याच्या राज्यावरील लोकांची उडालेली श्रद्धा आणि वेगळेपणाचे लेबल लावल्यामुळे आलेली जास्तीची जबाबदारी - ही नव्या सरकार पुढची भली मोठी आव्हाने होती. थोडक्यात उत्तर पेशवाईच्या वर्णनाशी जुळणारी मागील सरकारची कारकीर्द आणि तीवर मात करण्यासाठी नव्या सरकारच्या बुद्दीचा लागलेला कस, असा हा सामना होता. परंतु ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईला साडे तीन शहाण्यांनी सावरून धरले होते, त्या प्रमाणे या सरकारच्या वर्षभरात केवळ तीन शहाण्यांनी कामातून आपले अस्तित्व दाखवले.
खुद्द मुख्यमंत्री फडणवीस हे पहिले आणि निर्विवाद शहाणे. सर्वात मोठ्या खुर्चीवर बसल्यानंतर आलेली जबाबदारीची जाण, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, केवळ परीक्षा देणार एवढ्यावर न थांबता पेपर उत्तम सोडविणारच हा निश्चय अशा सर्व आघाड्यांवर फडणवीसांची छाप उमटताना दिसली. परदेशी गुतवणूक खेचून आणायचा विषय असो अथवा स्वपक्ष, विरोधी पक्ष आणि मित्रपक्ष अशा तीन पातळ्यांवरील विरोधकांना पुरून उरणे असो, हा माणूस एकहाती लढताना दिसत होता. राज्यात अभूतपूर्व दुष्काळ पडल्यावर त्याच्याशी दोन हात करतानाही फडणवीस एकटेच होते. जन्मजात ब्राह्मण आणि वास्तव्याने शहरी, हे खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणालाही जोखड ठरणारे गुण. मात्र फडणवीस यांनी आतापर्यंत तरी या वैगुण्याची झळ जाणवू दिलेली नाही.
अर्थात फडणवीस यांच्या कारभारात काही गोष्टी अजूनही झालेल्या नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी अद्याप कमी झालेली नाही. मंत्र्यांचा - अगदी मुख्यमंत्र्यांचाही - त्यांच्यावर दरारा असल्याचे दिसत नाही. गेल्या दहा वर्षांनपासून पोलिस खाते भरटकल्यासारखे झाले आहे, ते आजही भानावर आल्याचे दिसत नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र आहेत, हनुमान नाहीत. त्यामुळे एका घासात सूर्य गिळण्याची अपेक्षा त्यांच्याकडून करता येणार नाही. फक्त किमान त्या दिशेने ते काही प्रयत्न करत असल्याचे तरी दिसले पाहिजे.
शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री असलेले विनोद तावडे हे आणखी एक शहाणे म्हणावे लागतील. आपल्या खात्याचे मंत्रीपद हे काही एक धोरण आखण्यासाठी आहे, एक दिशा देण्यासाठी आहे याची पुरती जाणीव तावडे यांच्या देहबोलीतून जाणवते. त्यांच्या घोषणाप्रेमाची टिंगल होत असली तरी त्यातील बऱ्यापैकी घोषणा मार्गी लागल्या आहेत, हे महत्त्वाचे! तावडे यांच्या पदवीचा वाद अर्थहीनच होता, त्याला फारशी किंमत देण्याची गरज नाही. तावडे यांची आपल्या खात्यावर किती पकड आहे, माहीत नाही. पण आपल्या खात्याचा आवाका आणि मगदूर असलेली ही व्यक्ती आहे, यात संशय नाही.
सुभाष देसाई हा फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील तिसरा शहाणा. काहीसा अनपेक्षित. देसाईंच्या पक्षाची मंडळी नाना विधाने करून नको ते उद्योग करत असली, तरी उद्योग हे नाव व कार्यक्षेत्र असलेल्या खात्याची हाताळणी देसाई ठीकठाक करतायत, असे दिसते. भाजप आणि शिवसेनेतील संबंधांची लागण देसाईंच्या खात्याला झालेली दिसली नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जगभर फिरून, पदर पसरून गुंतवणूक आणायची आआणि उद्योग खात्याने त्यात खोडा घालायचा, किंवा देसाईंनी काही कल्पना मांडली आणि भाजपने त्याची बोळवण केली, असे घडलेले नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांचा एकूण रागरंग पाहिला, तर देसाईंनी पाळलेला संयम हाच त्यांच्या शहाणपणाचा भक्कम पुरावा म्हणायला हवा.
उद्धव ठाकरेंच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर "त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पूरेपूर वापर करून घेतला जात असावा."
आता एकीकडे हे तीन शहाणे नीट काम करत असताना त्यांना दृष्ट लागू नये म्हणून काही मंडळी जोमाने कामाला लागली होती. पंकजा मुंडे-पालवे, गिरीष बापट, गिरीष महाजन आदी मंत्री या आघाडीवर अगदी पुढे होती. केवळ सरकारचे सुदैव म्हणून त्यांच्या मागे ओढण्याच्या बळापेक्षा या लोकांचे पुढे ढकलणारे बळ किंचित जास्त ठरले आणि म्हणून त्यातल्या त्यात ते जराSSSS बरे वाटते. एवढ्यावर सरकारला समाधान मानायचे असेल, तर त्यांनी मानून घ्यावे. बाकी कालचे मनोरंजन आजही चालू, इतकेच.

Monday, November 2, 2015

तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?

pen-red एखाद्या जंगलात शिकार करण्यापूर्वी काही लोक हाकारे घालतात आणि शिकार होणाऱ्या प्राण्याला जाळ्यापर्यंत ढकलत नेतात. हे लोक त्या जनावराला एका दिशेने ढकलतात जेणेकरून त्याची शिकार सहजतेने करता येईल. सध्या देशात पुरस्कार परतीचा जो तमाशा चालू आहे, त्यामुळे या हाकारे घालण्याचीच आठवण येते. स्वतःला साहित्यिक आणि कलावंत म्हणवून घेणारे एका सुरात ओरडत आहेत, जेणेकरून वातावरणात गोंधळ माजेल आणि सरकारला एका दिशेने जाणे भाग पडेल व मग त्याची शिकार करणे सोपे जाईल.

परत करण्यासाठी आपापले पुरस्कार फडताळ्यातून काढणाऱ्यांचे म्हणणे आहे, की देशात फॅसिस्ट विचारसरणी वाढत आहे आणि अभिव्यक्तीचा गळा घोटला जात आहे. त्यांच्या या म्हणण्यात प्रामाणिकता असती तर त्यांच्या बोलण्यावर लक्षदेता आले असते. परंतु वास्तव तसे नाही. जे लोक तारस्वरात अभिव्यक्ती स्वतंत्र्याची भलामण करत आहेत, त्यांच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. अन् हा सवाल अन्य कोणी नाही तर अशा व्यक्तीच करत आहेत, ज्यांच्या अभिव्यक्तीचे दमन करण्यातच या लोकांनी सहा दशके कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.

"अभिव्यक्तीचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आज ज्या व्यक्ती आवाज काढत आहेत, त्याच लोकांनी वैचारिकता आणि शिक्षणाच्या क्षेत्रावर आपला एकाधिकार ठेवला होता. त्यांच्यापेक्षा वेगळ्या अशा कुठल्याही विचाराला पायदळी तुडविणे, हेच त्यांनी जीवनकार्य बनविले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्यांची ही चाड कुठे गेली होती," हा थेट सवाल आहे प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांनी. स्वतःला विवेकाचे ठेकेदार म्हणविणाऱ्यांकडे याचे काय उत्तर आहे?

भैरप्पा हे कोणी सामान्य लेखक नाहीत. आधुनिक कन्नड साहित्यातील सर्वोच्च शिखरांपैकी ते एक होत. कर्नाटकातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना दैत्य प्रतिभेचे लेखक म्हणजे विराट प्रतिभा असलेले लेखक म्हणून ओळखले जाते. केवळ कन्नडच नव्हे तर भारतीय साहित्यात लोकप्रियता, विक्री तसेच समीक्षकांची मान्यता या निकषांवर त्यांच्या कादंबऱ्यांनी विक्रम स्थापित केले आहेत. अशा लेखकाला सरकारी मान-सन्मान मिळू नये, यासाठी अनेक प्रकारचे घाणेरडे राजकारण खेळले गेले आहे.

पाटील पुटप्पा हे कन्नड भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. चार वर्षांपूर्वी भैरप्पांना बाजूला सारून डा. चंद्रशेखर कंबार यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला, तेव्हा पुटप्पा यांनी जाहीर आरोप केला होता, कि 'विशिष्ट विचारांच्या लोकांनी लॉबिंग करून भैरप्पांना ज्ञानपीठापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते.'

तीन वर्षांपूर्वी गिरीश कार्नाड पुण्यात आले होते, तेव्हा भैरप्पांबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी ते म्हणाले होते, “भैरप्पा चांगले लिहितात, परंतु ते हिंदुत्ववादाच्या नादी लागले.“ याचा अर्थ एवढाच, की साहित्यिक लिहितो कसा, तो काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही तर तो कोणत्या विचारांचे अनुसरण करतो हे महत्त्वाचे आहे.

म्हणूनच डाव्या मंडळींच्या या मुस्कटदाबीचा मीही बळी आहे, या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलण्याचा काही एक हक्क नाही, असे भैरप्पा म्हणतात तेव्हा त्याला विशेष धार येते. लालभाईंच्या या सुनियोजित थयथयाटामागे कुठले ईप्सित आहेत, याबद्दल वेगळे सांगावे लागत नाही.

डाव्या मंडळींच्या एकांगी अभिव्यक्तिप्रियतेवर हा काही पहिलाच प्रहार नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात असाच एक आवाज पुढे आला होता. मोकळ्या वातावरणाच्या नावाने गळे काढून सुनियोजित पुरस्कार परती सुरू करण्यापूर्वीची गोष्ट आहे ही.

हा आवाज होता प्रा. शेषराव मोरे यांचा. त्यांच्या संशोधन आणि विद्वत्तेचे स्वरूप असे, की भारताच्या फाळणीवर त्यांनी पुस्तक लिहिताना आवाहन केले होते, की या पुस्तकाचे खंडन कोणी केले, तर त्याचेही पुस्तक प्रकाशित केले जाईल.

मात्र प्रा. मोरे हे नेहरूंना नायक आणि डाव्या मंडळींना मुक्त विचाराचे प्रेषित मानण्यास नकार देतात, म्हणून महाराष्ट्रातील विचारवंतांनी त्यांना जवळपास वाळीतच टाकले होते. परंतु गेल्या महिन्यात अंदमान येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. मोरे यांची निवड झाली आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी याच सेक्युलर दुटप्पीपणावर तोफ डागली.

स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांवर हल्ला करताना त्यांनी याला पुरोगामी दहशतवाद असे नाव दिले. त्यामुळे पुरोगामी गोटामध्ये खळबळ माजली. त्यानंतर प्रा. मोरे यांना दुर्लक्षित केले गेले किंवा त्यांना छुपा हिंदुत्ववादी म्हटले गेले. परंतु जे भैरप्पा आज म्हणत आहेत, तेच मोरे तेव्हा सांगत होते आणि त्यांच्या पूर्वीही अनेक लोकांनी हेच सांगितले होते, की डाव्या मंडळींच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निरपेक्ष नाही. जेव्हा त्यांचा स्वतःचा आवाज क्षीण होतो, तेव्हाच ते जागे होते.

महाराष्ट्रातच बोलायचे झाले, तर पु. भा. भावे हे एक प्रसिद्ध नाव आहे. मराठी नवकथेच्या चार शिलेदारांपैकी ते एक. मात्र भावेंना त्यांच्या पात्रतेनुसार कधीही सन्मान मिळाला नाही. इतकेच नाही, 1977 मध्ये ते मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा ते संमेलनच उधळून लावण्यात आले आणि हे मुख्यतः ते हिंदुत्ववादी असल्यामुळे, सावरकरांचे अनुयायी असल्यामुळे. त्यावेळी कोणत्याही कलावंत, कोणत्याही साहित्यिकाला अभिव्यक्तीचे दमन झाल्याचे मनातही आले नाही. फक्त गेल्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि या लोकांना वाटू लागले, की देशात द्वेषाचे वारे वाहू लागलेत.

हे म्हणजे कुरुक्षेत्रात युद्धाच्या वेळेस कर्णाला त्याच्या रथाचे चाक फसल्यावर धर्मसंमत आचरण आठवला होता तसे आहे. त्यावेळी कृष्ण आणि अर्जुनाने जो प्रश्न कर्णाला विचारला होता, तोच प्रश्न आज डावे, समाजवादी आणि स्वयंघोषित विचारवंतांना विचारता येईल – तेव्हा तुमचा धर्म कुठे होता?

Friday, October 9, 2015

कार्यक्रम तर झालाच पाहिजे…

गुलाम अली यांचा कार्यक्रम झालाच पाहिजे. कारण त्याशिवाय आमचे पुरोगामीत्व कसे सिद्ध होणार?

9 Oct 2015

Tuesday, October 6, 2015

संस्कृतला विरोध सेक्युलरांचाच

18 व्या शतकातील अल्लोपनिषद हा मुस्लिम धर्मियांसाठी ग्रंथ संस्कृतमध्ये असून बायबलच्या कितीतरी संस्कृत आवृत्या आहेत. या शिवाय केरळमधील पी सी देवाशिया यांनी क्रिस्तुभागवतम् या नावाने येशु ख्रिस्तावर एक महाकाव्य लिहिले आहे अन् त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ही मिळालेला आहे. म्हणजे संस्कृतला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो सेक्युलरांच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये. त्यांच्या या अतिरेकी विरोधामुळेच आणि उपेक्षेमुळेच हिंदुत्ववाद्यांना संस्कृतवर एकाधिकार करता आला आहे. हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या झापडा काढाव्या imageलागतील. ते करतील तो सुदिन!

ता. 3 ऑक्टोबर रोजी डॉ. रुपा कुळकर्णी यांच्या 'मोदी, संस्कृत आणि धर्मनिरपेक्षता' हा लेख प्रकाशित झाला आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासिका असे म्हणविणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांनी या लेखात सत्याचा अत्यंत अपलाप केला आहे आणि दिशाभूल करणारी अनेक विधाने केली आहेत. या विधानांना कुठलाही आधार नाही आणि त्यात तर्काधिष्ठितता तर नाहीच नाही. उलट या लेखातील प्रत्येक वाक्याला द्वेषाची किनार आहे.

"भाजपाला एकहाती सत्ता मिळाली तेव्हाच, दोन गोष्टींचं आता महत्त्व वाढणार हे ठरून गेलं होतं. एक म्हणजे देशाचं हिंदुस्थान हे नाव व दुसरं म्हणजे संस्कृत," असं वाक्य लिहून लेखिकेने हिंदुत्ववाद आणि संस्कृत यांची सांगड स्वतःच घातली आहे आणि वर ‘संस्कृत फक्त हिंदूंची’ असा शिक्का मारण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनाच जबाबदार धरलेले आहे.

या देशात 1994 साली, म्हणजे नरेंद्र मोदी राजकीय रडारवर ठिपक्या एवढेही नसताना संतोषकुमार आणि अन्य लोकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात शालेय अभ्यासक्रमात संस्कृतला ऐच्छिक विषय म्हणून उपलब्ध करून देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याच याचिकेत न्यायालयाला अशी विनंती करण्यात आली होती, की संस्कृतला जर शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले तर तिच्या सोबत फार्सी (पर्शियन) आणि उर्दू यांनाही स्थान द्यायला हवे. न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावताना असे स्पष्ट म्हटले होते, की संस्कृत शिक्षणाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा काहीही संबंध नाही.

त्यानंतर 2000 साली अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती आणि त्यातही हीच मागणी केली होती. मात्र न्यायालयाने तेव्हाही त्यांची मागणी धुडकावून लावत 1994 मधील याचिकेवरील निकालच कायम ठेवला.

आता डॉ. कुळकर्णी यांच्या लेखातही "पाली आणि अरेबिक या भाषा अभिजात" आहेत, असे वाक्य आहे. पाली ही भारताच्या सांस्कृतिक महत्त्वाची भाषा आहेच आणि अनेक विद्यापीठांमधून त्याचे शिक्षणही चालू आहे. पण अरेबिकचे काय? अरबी भाषेचा आणि भारताचा संबंधच काय? अगदी मोगल सत्ताधाऱ्यांचा कारभारही फारसीत चालत असे. परंतु ज्या धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) विचारांचे प्रतिनिधित्व डॉ. कुळकर्णी करू पाहतात, त्यांनी अरबी, उर्दू अशा भाषांना धर्मनिरपेक्षतेशी जोडले आहे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल त्या आग्रही दिसतात.

घटना समितीत बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृतला राष्ट्रभाषा करावी, असे म्हटले होते. त्यांच्या जोडीला नजीरुद्दीन अहमद यांनीही संस्कृतच्या बाजूने मत व्यक्त केले होते. त्यांच्या मते, "एवढ्या विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या या देशात राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जाणारी भाषा ही निष्पक्ष असावी. ती कोणत्याही प्रदेशाची मातृभाषा नसावी, सर्व प्रांतांना सामाईक असावी आणि तिचा स्वीकार केल्याने एका प्रांताचा फायदा तर दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये". संस्कृतमध्ये हे गुण असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्यासारख्या ज्ञानी माणसाने संस्कृतला केवठे मोठे योगदान दिले! संस्कृतची सांगड हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या धर्माशी घातली होती, तर या स्पष्टपणे अहिंदु असलेल्या व्यक्तींच्या संस्कृतमधील कर्तृत्वाची माहिती देण्यासाठी सेक्युलरांनी तरी काय केले?

त्यानंतर लेखिकेने काही ग्रंथांची नावे दिली आहेत आणि ते हिंदूंची धर्मग्रंथ आहेत, असे सांगितले आहे. कालिदासाची काव्ये, काही नाटके आणि अन्य साहित्याचाही त्यांनी या धर्मग्रंथात समावेश करून टाकला आहे. ही तर या लेखातील कमालच म्हटली पाहिजे! वास्तविक हिंदु समाज कधीही ग्रंथाधारित नव्हता. अगदी वेदांपासून भगवद्गीतेपर्यंत सर्व ग्रंथ हिंदूंच्या दृष्टीने पूज्य असले, तरी ते त्यांच्या व्यवहाराचे आधार कधीच नव्हते. 'शास्त्रात् रूढीर्बलियसी' हाच येथील लोकांचा मंत्र राहिलेला आहे. त्यामुळे कुराण किंवा बायबल यांच्या प्रमाणे धर्मग्रंथात काय म्हटले आहे, या ऐवजी लोकाचार आणि कुळाचार काय आहे, हेच महत्त्वाचे ठरत आले आहे.

हिंदू समाजाला आलेल्या ग्लानीचे कारण म्हणजे त्यांना वेदांचे झालेले विस्मरण होय, इसे आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी निदान केले होते. याचाच अर्थ वेद बाजूला ठेवून सुद्धा हिंदू संस्कृती जीवंत राहू सकते. त्याचप्रमाणे मध्य युगात ८० टक्के समाजाला संस्कृतमधील ग्रंथ आणि पुराणांपासून अनभिज्ञ होता. तरीही हा समाज हिंदूच राहिला. त्यामुळे संस्कृत ही अपरिहार्यपणे हिंदू समाजाशी जोडली गेलेली आहे, या म्हणण्यात काही तथ्य नाही.

एवढे कशाला, बौद्ध आणि जैन धर्मियांनी संस्कृतमध्ये विपुल ग्रंथरचना केली, असे खुद्द लेखिकाच म्हणतात. ते खरेही आहे. याचाच अर्थ संस्कृत ही ब्राह्मणांपुरती मर्यादित नव्हती. बौद्ध जातककथा या पंचतंत्र आणि हितोपदेश एवढ्याच आवडीने वाचल्या जातात. आता बौद्ध आणि जैन साहित्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हा लेखिकेने स्वतःच काढलेला निष्कर्ष आहे. शिवाय या साहित्याला नास्तिक म्हणण्यात आले, ही सुद्धा तद्दन थापच होय. नास्तिक मत वेगळे आहे आणि त्यालाही यथोचित मान मिळाला होता, म्हणूनच आजही चार्वाकांसारख्या विद्वानांचा उल्लेख आपण करू शकतो.

लेखिकेने आणखी स्वतःच म्हटले आहे, की मुस्लिम, ख्रिश्चनांनी संस्कृतला कधीच विरोध केला नाही. त्यात तथ्य आहे. पण लेखिकेने असे म्हटले आहे, की धर्मनिरपेक्षतावाद्यांनी त्याला कधीच विरोध केला नाही, ते निखालस खोटे आहे. ते कसे, ते वर उल्लेख केलेल्या याचिकांवरून दिसून येईल. इतकेच कशाला, कर्नाटक (2009) आणि केरळमध्ये (2002) संस्कृत विद्यापीठांच्या स्थापनेचे प्रस्ताव आले, तेव्हा विधिमंडळात त्याला विरोध करण्यात स्वतःला सेक्युलर म्हणविणारे होते आणि तेव्हाही त्यांनी संस्कृतसोबत उर्दू विद्यापीठ स्थापन कराव्यात, असे सांगितले होते. म्हणजे भाषा आणि धर्माचा संबंध कोण कसा जोडते, ते समजेल.

'टी.व्ही. वरील शास्त्रीय नृत्याचे सर्वच कार्यक्रम विविध हिंदू देवी-देवतांच्या पौराणिक आख्यानांवरच बेतलेले असतात. इतर धर्मांमधील महापुरुष म्हणजे येशू, मुहम्मद, बुद्ध किंवा झरतृष्ट हे या शास्त्रीय नृत्यांचे विषय होताना माझ्या एकदाही पाहण्यात आले नाहीत,' असं एक विनोदी विधान लेखिकेने केले आहे.

भरतनाट्यम, कथकली यांसारख्या कला देवळांमध्ये जन्मल्या आणि वाढल्या. आता २१व्या शतकातील सेक्युलर विचारांना पात्र होण्यासाठी १०-१२व्या शतकात कोणीतरी देवळांमध्ये बुद्धवंदना किंवा इस्लामी आख्यान सादर करावे, ही अपेक्षा अगोचर म्हणायला हवी. शिवाय इस्लाममध्ये ईश्वर (अल्लाह) आणि पैगंबर सोडून अन्य कोणाची स्तुती करणे निषिद्ध आहे, त्याला कलावंत काय करणार? पण १८ व्या शतकातील अल्लोपनिषद हा मुस्लिम धर्मियांसाठी ग्रंथ संस्कृतमध्ये असून बायबलच्या कितीतरी संस्कृत आवृत्या आहेत. या शिवाय केरळमधील पी सी देवाशिया यांनी क्रिस्तुभागवतम् या नावाने येशु ख्रिस्तावर एक महाकाव्य लिहिले आहे अन् त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ही मिळालेला आहे.

लोकांना माहीत नाही परंतु हे सांगावेच लागेल, की अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण होत असून त्यातील किमान तीन महाकाव्ये महत्त्वाची मानली जातात. पहिले बलदेव मेहराद्ध यांचे 'अम्बेडकरदर्शनम्', प्रभाकर जोशी यांचे 'भीमायनम्' आणि बौद्ध विद्वान सुगतकविरत्न शान्तिभिक्षु शास्त्री यांचे 'भीमाम्बेडकरशतकम्'.

थोडक्यात सांगायचे म्हणजे संस्कृतला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो सेक्युलरांच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये. त्यांच्या या अतिरेकी विरोधामुळेच आणि उपेक्षेमुळेच हिंदुत्ववाद्यांना संस्कृतवर एकाधिकार करता आला आहे. हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या झापडा काढाव्या लागतील. ते करतील तो सुदिन!

Monday, September 7, 2015

'आमच्या' मोरे सरांचे अभिनंदन!

अंदमान येथे विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पुरोगामी मंबाजींचे बुरखे टराटराWP_20150717_009  फाडत शेषराव मोरे सरांनी त्यांच्यावर वैचारिक दहशतवादाचा जो हल्ला केला तो खऱ्या अर्थाने वैचारिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा निदर्शक आहे. 'हम बोले सो कायदा, हम बोले सो पुरोगामी' या लाल मठांमधून उठणाऱ्या हाळीला मोरे सरांनी एक जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'सौ सुनार की एक लुहार की' असा त्यांनी एकच तडाखाच दिला आहे. पुरोगामी या शब्दाच्या नावाखाली चालणाऱ्या अनाचाराला वैचारिक दहशतवाद असा स्वच्छ शब्द त्यांनी दिला आहे. त्याबद्दल मोरे सरांचे अभिनंदन.

विश्वास पाटील यांच्यानंतर 'बहुजनां'मधून स्वयंनियुक्त पुरोगाम्यांवर आणखी एक पेटता गोळा पडला आहे. अंदमानातून लागलेल्या ही या अग्नीचा मुकाबला करण्यासाठी प्रगतीशील विचारांनी एव्हाना अग्निशमनाची बुकिंग करायला सुरूवातही केली आहे.

मोरे सरांची निवड झाली, तेव्हाच या संमेलनातून काहीतरी खणखणीत ऐकायला मिळणार, हे स्पष्ट झाले होते. त्यांची निवड झाली, तेव्हा वैयक्तिकरित्या मला अनेक कारणांनी आनंद झाला. एक तर स्वा. सावरकर यांच्या विचारांचे परखड अभ्यासक म्हणून इतरांप्रमाणेच मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यात ते नांदेडचे त्यामुळे या आदराचे मूल्यवर्धन झाले . एवढ्यावर न थांबता, मला त्यांच्या हाताखाली शिकता आले, ही दुधात सागर होती. योगायोगाने अंदमानच्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली तीही शिक्षक दिनीच.

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून साहित्य परिषदेत त्यांचा सत्कार झाला तेव्हा गेलो असताना नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनची आठवण त्यांना करून दिली आणि मी तुमचा विद्यार्थी होतो, हेही सांगितले. त्यावर सध्या काय करता, असे त्यांनी विचारले. पत्रकार आहे, म्हणून सांगितले तेव्हा ते अंमळ खुश झाल्यासारखे वाटले. आपला विद्यार्थी अभियंता न बनता अन्य चांगल्या मार्गाला लागला, याचा कदाचित त्यांना आनंद झाला असावा!

WP_20150725_005 मोरे सरांचे पहिले पुस्तक - सावरकरांचा बुद्धिवाद: एक चिकित्सक अभ्यास - गाजत होते त्याचवेळेस ते शिकवत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माझा प्रवेश झाला, हा अगदी योगायोगच म्हणावा लागेल. त्यातही विशेष म्हणजे स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणाचे ते २५ वे वर्ष होते. त्यापूर्वी एक-दोन वर्षे सावरकरांच्या साहित्याने मला झपाटले होते.

त्यामुळे तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेताना तेतील अभ्यासक्रमापेक्षा आकर्षण होते ते मोरे सरांना भेटता येणार याचे. आम्हाला पहिल्या वर्षी सर शिकवत नसले तरी त्यांच्याबद्दल ऐकायला मिळायचे. अत्यंत नैष्ठिक आचरण आणि आपला विषय तळमळीने मांडणे, ही त्यांची खासियत.

त्या काळात घडलेला एक किस्सा. एकदा एका संस्थेने त्यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथे गोपाळ गोडसे हेही तिथे हजर असल्याचे सरांना दिसले. त्यावेळी त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि गोपाळ गोडसे असतील तर मी बोलणार नाही, असे ठामपणे सुनावले.

या गोष्टीची त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "माझ्या एक-दोन पुस्तकांची नावे झाल्यावर आमच्या गावाकडच्या लोकांनी मला सत्कारासाठी बोलावले. सत्कार झाल्यावर गावाचे कारभारी बोलायला उठले. ते म्हणाले, की मोरे सरांनी आतापर्यंत बामणांवर लिहिले (सावरकर), दलितांवर लिहिले (आंबेडकरांवर), आता त्यांनी आपल्या माणसांवर (मराठा) लिहावे. तेव्हा मी त्यांना माझ्या भाषणात सुनावले, की मी असे जाती पाहून लिहीत नाही."

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पहिल्याच वर्षी माझा सरांशी संबंध आला. त्या वर्षी शासकीय तंत्रनिकेतनात स्नेहसंमेलन झाले नाही. म्हणून वसतिगृहातील मुलांनी मुद्दाम थाटात स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्यात वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केली होती आणि तिचा विषय होता 'अंधश्रद्धा आणि समाज'. या स्पर्धेसाठी परीपरीक्षक होते मोरे सर आणि स्पर्धकांपैकी एक होतो मी. सांगायचा भाग हा, की त्या स्पर्धेत मामाझा पहिला क्रमांक आला होता.

दुसऱ्या वर्षी मात्र मोरे सर प्रत्यक्ष आम्हाला शिकवायला होते. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हा विषय ते आम्हाला शिकवत. फ्लक्स कसा वाहतो आणि मॅग्नेटिक फिल्ड कशी तयार होते, हे ते विषयाशी एकरूप होऊन शिकवत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याची खास चर्चा असायची. तेव्हा मोठमोठ्या विद्वज्जड ग्रंथांचे परिशीलन करणारे हेच का ते सर, असा प्रश्न पडायचा. याच वेळी त्यांच्याशी थोडासा परिचय वाढला, पण तेवढ्यात सरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे कळाले. आम्हाला शिकविलेले १९९४ हेच सरांच्या अध्यापनाचे शेवटचे वर्ष ठरले. (मात्र त्यात माझा कोणताही हात नाही!).

याच काळात नांदेडहून मुंबईला माझ्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. एकदा 'तपोवन एक्स्प्रेस'मध्येच सरांची भेट झाली. हातात कुठलेतरी जाड पुस्तक आणि नोंदी काढण्यासाठी एक डायरी. त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती. पण त्या व्यक्तीशी चर्चा न करता सर कुठल्याशा पुस्तकातून नोंदी काढण्यात मग्न होते. धावत्या गाडीतही सरांचे ज्ञानाराधन अविरत सुरू होते.

त्या नंतर नांदेडमधील सरांच्या घरी एक-दोनदा जाणे झाले. तेव्हाही पुस्तकात गाढ बुडालेले आणि संशोधनात रममाण झालेले सरच पाहायला मिळाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे, "गेल्या अनेक वर्षांमध्ये मी चित्रपट पाहिलेला नाही. कित्येक वर्षांमध्ये मी शर्ट विकत घ्यायला गेलेलो नाही इतकेच काय चप्पल सुद्धा विकत घ्यायला गेलेलो नाही. "

पुण्याला आल्यानंतर मात्र सरांशी संपर्क तुटला. या काळात त्यांचे एकामागोमाग ग्रंथ प्रकाशित झाले. पुण्यात त्यांच्या जाहीर मुलाखतीही झाल्या पण पत्रकारितेचा व्यवसाय असा विचित्र, की आपल्याला जेव्हा रामेश्वरला जायचे असते तेव्हा सोमेश्वरला जाणे भाग पडते. त्यामुळे त्यांची भेट होत नव्हती.

आता परत योगायोग असा आला, की सरांच्या विद्वत्तेचा सन्मान होत असताना त्याचा साक्षीदार होण्याची मोकळीक मला मिळाली. म्हणूनच साहित्य परिषदेत त्यांना आवर्जून भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी आपल्या संशोधनाची मांडणी जशी केली तसेच त्या मागच्या ध्यासाचीही पोतडी काही प्रमाणित मोकळी केली.

त्याच वेळेस गोडसेंच्या संदर्भातील घटनेची मी त्यांना स्मरण करून दिले. त्या नंतर ते भरभरून बोलायला लागले. कार्यक्रमाच्या त्या घाईतील संभाषणातसुद्धा त्यांचे सावरकरांवरचे प्रेम लपून राहत नव्हते. "गांधीहत्येत सावरकरांचा यत्किंचितही हात नव्हता. त्यांना थोडी जरी कटाची कल्पना असती तर ती हत्या टाळण्याचे त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले असते. पण सरकारने त्यांना या गुन्ह्यात गुंतविले आणि नंतर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांचे भयंकर नुकसान केले," असे त्यांनी परखडपणे सांगितले.

मात्र त्यांचा हा परखडपणा प्रागतिक विचारांच्या पथ्यपाण्याला मानवत नाही. प्रागतिक पद्धतीत सेक्युलरिझम म्हणजे नेहरूवादी सेक्युलरिझम आणि हिंदू किंवा हिंदुत्ववादी म्हणजे दुष्ट, असा थेट कृष्ण-धवल मामला असतो. हाही बरोबर असू शकतो आणि तोही काही प्रमाणात योग्य असू शकतो, अशा विचारांचे तिथे वावडे असते. मग त्यात रोगी मेला तरी चालते. तेव्हा मोरे सरांनी पुरोगाम्यांच्या दंभावर प्रहार केल्यावर त्याचे प्रतिध्वनी उठणे स्वाभाविकच होते.

म्हणूनच मग ज्या लेखकाने आपल्या ग्रंथाचा प्रतिवाद करण्याचे आवाहन करून त्याचा एक वेगळा ग्रंथ बनविला, त्या लेखकावरच हेत्वारोपाचे आरोप करण्यास लोक सरसावतात. अर्थात् कावळ्यांच्या ट्वीटने गायी मरत नसतात, पण ज्या प्रवृत्तीबद्दल मोरे सर बोलतायत, तिची खरीखुरी झलकच यातून दिसते.

Shesharao More comments आता तर सुरूवात झाली आहे. अंदमानच्या काळ्या पाण्यातून उठलेल्या या उज्ज्वल विचारांचे तरंग येथून आणखी उमटणार आहेत. हिंदुत्ववादी आणि पुरोगाम्यांचे टोळीयुद्ध पाहण्यास आता खरी मजा येणार आहे!

Tuesday, August 18, 2015

हा पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावहच!

image

गेल्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सत्तापालट झाला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या तुलनेत वेगळे वाटतील असे फार काही निर्णय घेतले नाहीत. फक्त निर्णय घेणाऱ्या व्यक्ती बदलल्या, निर्णयामागचे तत्वज्ञान आणि विचार बदलले आहे, असे जाणवलेच नाही. जे काही मोजके वेगळे निर्णय घेतले त्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा हा पहिला आणि त्यानंतर आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय हा दुसरा. त्यातील पहिल्या निर्णयाची (निर्णय कमी आणि आदेश जास्त!) उपयुक्तता आणि औचित्य वादग्रस्त आहे मात्र हा दुसरा निर्णय निर्विवादपणे उत्तम आहे. महाराष्ट्राचे भूषण म्हणून हा पुरस्कार दिला जात असला तरी या पुरस्काराचे भूषण महाराष्ट्रालाच वाटावे, असे हे पाऊल आहे.

एरवी महाराष्ट्रात गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थिती असली तरी पुरस्कारांच्या बाबतीत सुकाळ आहे. कोणतीतरी संस्था, कोणत्या तरी कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून काढून कोणते तरी भूषण म्हणून ठरवून टाकते. अन् सत्कारार्थी व्यक्तीही 'अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीन जातं तुण्डम्' अशा अवस्थेत मंचावर जाऊन त्या पुरस्कारामुळे मी धन्य झालो, असे जाहीर करून टाकते. मात्र काही व्यक्ती अशा स्थानी असतात, की त्या कोणत्याही पुरस्कारांच्या पलीकडे गेलेल्या असतात. बाबासाहेब पुरंदरे हे अशाच व्यक्तीमत्वांपैकी एक!

ज्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाला विरोध करून आपल्या जातमंडूक (कूपमंडूक तसे जातमंडूक!) वृत्तीचे ढळढळीत प्रदर्शन करायचे आहे त्यांना ते खुशाल करू द्या. 'आमचेच ऐका नाहीतर खड्ड्यात जा,' अशा मानसिकतेची ही मंडळी राज्यात सत्ताधाऱ्यांच्या कृपेने पुन्हा डोके वर काढून बसली आहेत. ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईत रावबाजीच्या आश्रयाने भट-पुरोहितांचे वर्चस्व वाढले आणि त्यांनी सगळ्या समाजाच्या विवेकबुद्धीला ग्रहण लावले तशीच प्रवृत्ती आजही आहे. खरे तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था, किरकोळ मुद्द्यांना आलेले महत्त्व आणि खुज्या लोकांचे वाढलेले महत्त्व, हे पाहिल्यावर ज्यांनी उत्तर पेशवाईचे वर्णन वाचले आहे त्यांना तोच काळ आठवेल.

पुरोगामीपणाचे सोवळे सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिगेडी बांशिद्यांना मोकळे सोडले. भांडारकरसारख्या निरूपद्रवी आणि बऱ्यापैकी जमिनी बाळगून असलेल्या संस्था ते फोडत होते तोपर्यंत चांगले चालले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मात्र याच लोकांची मजल शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत गेली आणि तेही सरकारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर! त्यानंतर नाकापेक्षा जड होऊ पाहणाऱ्या या मोत्यांचे प्रस्थ हळूहळू आश्रयदात्यांनीच कमी केले. नंतर वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने परत या लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु दादोजींप्रमाणे हा मुद्दा काही फळला नाही. उलट त्याची तीव्र प्रतिक्रिया आली म्हणून तलवारी म्यान करून ही मंडळी बसली. आता बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार मिळणार म्हटल्यावर परत आपले हमखास यशस्वी नाट्य रंगेल म्हणून ही मंडळी आपली शीतनिद्रा सोडून बोलायला लागली आहेत.

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी खरे तर आवर्जून सांगायची गरज नाही. आपण इतिहासकार नाही, हे त्यांनी स्वतःच्या मुखाने अनेकदा सांगितले आहे. स्वतःच्या इतिहास वर्णनात काळानुरुप बदल करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे. तरीही ब्रिगेडींनी एकदा ही जमीन मऊ लागली आणि मग कोपऱ्याने खणण्याची सवय त्यांना लागली. परत त्यांना जितेंद्र आव्हाडांसारखा भक्कम आधारस्तंभ मिळाला म्हणल्यावर काय पुसता? मुंब्र्यातील बेकायदा बांधकाम पाडू न देण्याचा विडा उचलणारे, दहीहंडीची घातक उंची कमी करू देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे आव्हाड याबाबतीत मागे कसे राहतील? राम जेठमलानींनंतर नेहमी चुकीच्या बाजूने सकृद्दर्शनी तार्किक मांडणी करणारा पण रेटून खोटे बोलणारा एक बडबडतज्ज्ञ आव्हाडांच्या रूपाने देशाला मिळाला, एवढेच म्हणायचे. उरला त्यांच्या टिकेचा प्रश्न तर त्याला भर्तृहरीनेच उत्तर देऊन ठेवले आहे – तत्को नाम सुगुणिनां यो न दुर्जनै नाङ्कित (सज्जनांचा असा कोणता गुण आहे ज्यावर कद्रू मंडळी टीका करत नाहीत)?

स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले पाहवत नाही, अशा कायम दुखणाईत अवस्थेतील ब्रिगेडची मंडळी सकारात्मक गोष्टीसाठी कधी पुढे आल्याचे महाराष्ट्राला आठवत नाही. शिवाजीराजांचे सावत्र राजे व्यंकोजी यांनी राजांचा कायम दुस्वास केला. त्यांच्या सततच्या किरकिरीला कंटाळून राजांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी व्यंकोजींना 'पराक्रमाचे तमाशे दाखवा' असे एक मार्मिक वाक्य लिहिले आहे. विनाकारण कुरकुर करण्यापेक्षा काहीतरी घडवून दाखवा, असे त्यांनी सांगितले होते. ब्रिगेडच्या सदस्यांना आज परत हेच वाक्य ऐकविण्याची वेळ आली आहे.

Tuesday, August 11, 2015

घुमानच्या निमित्ताने-9 घुमानचे इष्टकार्यं सिद्धम्!

tumblr_nm9z1uycif1u5hwlmo1_500[1] अमृतसरला हरमंदिर साहेब आणि जालियांवाला बागेचे दर्शन झाल्यानंतर त्या दिवशी तिथेच मुक्काम केला. तेथून परतताना वाघा सीमेवर नेणाऱ्या ऑटोवाल्यांचा पुकारा चालला होता. मात्र एकाच दिवशी हे सर्व करण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय संमेलनानंतरचा एक दिवस मी त्यासाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे त्या दिवशी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि बस स्थानकावरील खोलीत परतलो.

रात्री बस स्थानकाशेजारीच एका हॉटेलमध्ये जाऊन मिनी थाळी मागविली. तमिळनाडूत ज्या प्रमाणे राईस प्लेट या संज्ञेत चपातीचा समावेश होत नाही, त्याच प्रमाणे पंजाबमध्ये थाली या संज्ञेत भाताचा समावेश होत नाही, अशी माहिती या निमित्ताने झाली. तरीही मिनी थाली ४० रुपये आणि भाताची प्लेट ३० रुपये या हिशेबाने ७० रुपयांत अगदी शाही जेवण झाले. बटाटा आणि टोमॅटोची भाजी आणि शेजारी गरमागरम रोटी असा जामानिमा होता. गायकाला जसा जोडीला तंबोरा लागतो तसा या जेवणाला सोबत करण्यासाठी अख्खा मसूर होताच. आधी ते दृश्यच पोटभर पाहून घेतले. आचार्य अत्रे असते तर 'तो पाहताच थाला, कलिजा खलास झाला' असे एखादे गाणे त्यांनी नक्कीच लिहिले असते. मग जेवण जे काय रंगले म्हणता, पाककर्ता सुखी भव असा तोंडभरून आशिर्वाद देऊन मी रजा घेतली आणि झोपेच्या स्वाधीन झालो.

सकाळी खाली उतरून लगेच समोरच्या प्लॅटफॉर्मवर घुमानची गाडी शोधली. पंजाबच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असे झाले असेल, की अमृतसरहून सुटणाऱ्या बसमध्ये पंजाबी लोकांपेक्षा मराठी लोक जास्त असतील. एकूण प्रवाशांपैकी सुमारे अर्धे लोक मराठी होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांकडे शबनमी होत्या. परंतु ते संमेलनालाच निघाले होते, हे ओळखण्यासाठी शबनमींची गरजच नव्हती. ज्यांच्याकडे शबनम नव्हती, त्यांच्याही तोंडातून मराठी शब्द बाहेर पडला, की त्यांचे तिकिट कुठले असणार, याचा अंदाज यायचा. एखाद्या जत्रेला निघावे, तशी ही मंडळी घुमानला निघाली होती. त्यात अकोला, बुलढाणा अशा गावांमधून आलेले लोक होते. माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पुण्याहून आली होती. त्यांच्यासोबत देहू संस्थानचे माजी विश्वस्त आणि तुकाराम महाराजांचे वंशज होते. ते बियासवरून आले होते. त्यांनी एक गंमत सांगितली. मुंबईहून सुटणारी गाडी येणार म्हणून जागोजागच्या गुरुद्वारांमधील लोकांनी स्वागताची, पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. परंतु या गाडीला उशीर झाल्यामुळे त्या लोकांची तयारी फलद्रूप होऊ शकली नाही. माझ्या सोबत बसलेली मंडळी जेव्हा बियासला उतरली तेव्हा या लोकांनी त्यांना बळेबळेच आपल्यासोबत नेले आणि मुक्काम करायला लावला. त्यांना खाऊ-पिऊ घातले.

ते काही असो, घुमानला गाडी पोचली आणि तेथील चौकातच पताका-झेंडे आणि बॅनरनी आमचे स्वागत केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर तर लावले होतेच पण काही स्थानिक शिवसैनिक गळ्यात भगव्या पट्टे घालून उत्साहाने जमले होते. संपूर्ण रस्त्याच्या कडेने पांढरी रांगोळी होती, रस्त्यावर पताका फडकत होत्या. घुमानचा गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला सजावा तसा सजला होता. जागोजागी लोकांनी लंगर लावले होते आणि चहा-पकोडे मुक्तहस्ते वाटल्या जात होते. मुख्य म्हणजे संपूर्ण गावात पंजाबीपेक्षा मराठी वाक्ये अधिक ऐकू येत होती.

गावात लॉज आहे का, असे मी एकाला विचारले. कारण मी आगाऊ नोंदणी केली नव्हती. संमेलनासाठी पुण्यातून जे वऱ्हाड निघाले होते त्यात मी नव्हतो. इतकेच काय, संजय नहार यांची ओळख असली तरी मी येणार आहे, हे मी त्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे गावात उतरायला जागा मिळेल का, ही माझ्या मनात धाकधूक होतीच. मला उत्तर मिळाले, की गावात लॉज नाही. गुरुद्वाऱ्याचे यात्री निवास आहे, मात्र त्याची नोंदणी आधीच झाली असणार. मग एका इंटरनेट कॅफे चालकाने सल्ला दिला, की शेजारच्या शाळेमध्ये जागा असेल तिथे चौकशी करा. तेथे गेल्यावर जागा आहे का, असे विचारल्यानंतर तेथील व्यक्तीने होकार भरला आणि नाव-गावाची नोंद केल्यानंतर एका मुलाला मला जागा दाखविण्यास पाठविले. दशमेश पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात अशा तऱ्हेने माझा मुक्काम पडला.

Saturday, July 4, 2015

घुमानच्या निमित्ताने-8 जालियांवाला बाग का खेलियांवाला बाग?

अशा रितीने हरमंदिर साहेबला पहिली भेट दिल्यानंतर बाहेर पडलो  आणि चार पावले पुढे जात नाही तोच जालियांवाला बाग लागली. म्हणजे तशी हरमंदिर साहिबकडे येताना ही जागा दिसतेच; परंतु दर्शन झाल्यानंतर तिथे जाऊन भेट दिली. जालियांवाला बाग हत्याकांड हे भारतीय इतिहासातील एक दुर्दैवी पान. १३ एप्रिल १९१९ रोजी जनरल डायर याच्या आदेशावरून ब्रिटीश सैनिकांनी येथेच हजारो भारतीय लोकांची हत्या केली. लहानपणापासून इतिहासाच्या पुस्तकात वाचलेली ही हकिगत, 'गांधी' चित्रपटात अंगावर काटे येतील अशा पद्धतीने चित्रित केलेली ही घटना जालियांवाला हत्याकांडाच्या स्मारकात प्रवेश करताना सर्रकन डोळ्यासमोरून गेली.

जालियांवाला बाग हे नाव थोडेसे दिशाभूल करणारे आहे. म्हणजे गोष्ट अशी, की इथे बाग वगैरे काही नव्हते. जल्ले ही पंजाबमधील जातीच्या उतरंडीत खालच्या थरावर मानलेल्या जातींपैकी एक जात. या जातीतील अनेकांच्या नावावर असलेल्या जमिनीच्या तुकड्यांचे मैदान म्हणजे ही जागा. म्हणून तिला जालियांवाला असे नाव. एकेकाळी येथे केरकचरा आणि गवताचे साम्राज्य होते. नंतर ती जागा साफसूफ करण्यात आली. सुवर्ण मंदिराला जवळ असल्यामुळे बहुतेक राजकीय सभा येथे भरत असत. रौलेट कायद्याच्या दडपशाहीच्या विरोधात भरलेली सभा ही त्यापैकीच एक.

चारी बाजूंनी इमारती आणि आत जाण्यासाठी केवळ एक अरुंद गल्ली, अशी तिची स्थिती. आजही या स्मारकात जाण्यासाठी हीच एक गल्ली वापरण्यात येते. तेथून जाताना लावलेल्या पाटीवरची अक्षरे वाचताना त्या कोंडलेल्या निष्पाप माणसांचे आक्रोश आणि आकांत आपल्या कानावर आदळू लागतोआता या जागी व्यवस्थित उद्यान विकसित केले आहे. उद्यानाच्या एका कोपऱ्यात अखंड तेवणारी ज्योत असून तिला अमर ज्योति असे नाव आहे. एका ठिकाणी छोट्याशा मंदिरासारखी एक वास्तू आहे. एका कोपऱ्यात एक विहीर असून तिला शहीदी विहीर असे नाव आहे. सोजिरांच्या गोळीबारापासून वाचण्यासाठी सैरावरा धावणाऱ्या अनेक सत्याग्रहींनी याच विहीरीत उड्या मारून आपल्या प्राणांची आहुती दिली. त्या विहीरीची खोली फारशी नाही मात्र त्याच्या इतिहासाची भीषणता रौद्र आहे. ही विहीर नसून साक्षात काळाचा जबडा आहे, असे आपल्याला वाटू लागते. येथेच एका दालनात जालियांवालाशी संबंधित एक प्रदर्शन लावले असून तिथे या घटनेतील शहीद, पत्रव्यवहार, घटनाक्रम अशी माहिती मांडली आहे.

मात्र या सर्वांत सर्वार्थाने मनाला विद्ध करणारी कोणती निशानी असेल तर ती म्हणजे येथील भिंतीवर पडलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचे ठसे. या हत्याकांडात बंदुकीच्या … फैरी झाडल्या गेल्या त्यातील ३८ गोळ्यांच्या निशाण्या येथील लाल विटांच्या भिंती अद्याप अंगावर बाळगत आहेत. प्रत्येक निशाणीभोवती पांढरी चौकट आखली असून त्यातून गोळ्या लागल्यानंतर निर्माण झालेल्या खाचा दिसतात. या खुणा पाहत असताना प्रत्यक्ष गोळ्या अंगावर आल्याचा भास होतो.


जालियांवाला बागेत फिरत असताना खरे तर आपल्याला इतिहासाचे स्मरण व्हायला हवे. या हत्याकांडाला अजून पुरते शंभऱ वर्षही लोटले नाहीत. त्यामुळे त्या हजारो लोकांच्या बलिदानाची स्मृती जागवणे एवढे अवघड नाही. परंतु येथे येणारे लोक हे एखाद्या सामान्य बागेत आल्यासारखे नाचत-बागडत असतात. लहान मुले उंडारत असतात आणि त्यांच्या पोरकट आया कौतुकाने पाहत असतात. घटनेचे गांभीर्य आणि जागेचे पावित्र्य याचा लवलेशही कोणाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. जालियांवाला बाग स्मारक अशी पाटी जिथे लावली आहे तिथे पर छायाचित्रेच्छुकांच्या झुंडी लोटत असतात. कोणी त्या अक्षरांकडे तोंड करून सलाम करण्याचा आविर्भाव करतो, कोणी ताठ उभे राहतो तर कोणी चार मित्रांना कवेत घेऊन आपणच इतिहास घडविल्याच्या ढंगात छबी टिपून घेतो. त्याचवेळेस वाघा सीमेवर नेण्यासाठी ग्राहकांना हाकारे घालत ऑटोवाले तिथे फिरत असतात. त्यामुळे ही जालियांवाला बाग आहे की खेलियांवाला बाग आहे, असा प्रश्न पडतो.


एखाद्या जागेचे पावित्र्य कायम ठेवायचे तर तिथे देवाची मूर्ती किंवा धर्मग्रंथातील वचनेच लावायला पाहिजेत, असा काहीतरी भारतीयांचा नियम असावा. एरवी पुण्यातील शनिवारवाडा किंवा आगाखान पॅलेस असो, मदुराईतील गांधी स्मारक असो, कन्याकुमारीतील गांधी मंडपम किंवा विवेकानंद स्मारक असो अथवा पानीपतचे युद्ध स्मारक असो, कुठल्याही जागी लोकांची प्रवृत्ती तळमळीऐवजी खेळीमेळीकडेच असल्याचे मी पाहिले आहे.

Friday, June 19, 2015

घुमानच्या निमित्ताने-7 पोट भरण्याची चिंताच नाही!

WP_20150406_010तसे पोट भरायचे झाले तर पंजाबमध्ये खरे तर एक पैसाही खर्च करण्याची गरज नाही. कुठल्याही गुरुद्वाऱ्यात जावे आणि लंगर साहिबमध्ये बसून मनसोक्त आहार घ्यावा. काही गुरुद्वाऱ्यांमध्ये विवक्षित वेळी लंगर चालतो तर काही ठिकाणी चोवीस तास चालतो. शीख पंथामध्ये लंगर (सामुहिक स्वयंपाकघर आणि अन्नदान) याचे मोठे महत्त्व आहे. शिखांचे पाचवे गुरु अर्जुनदास यांची अटच होती, की 'पहले पंगत फिर संगत'. म्हणजे पाहुण्याने आधी जेवायचे आणि मगच त्यांची भेट घ्यायची. एकदा अकबर बादशहा त्यांची भेट घेण्यास गेला असता त्यालाही ही अट सांगण्यात आली. त्यावेळी मुकाट्याने बादशहालाही सामान्य लोकांसोबत पंगतीत बसावे लागले आणि लंगर घ्यावा लागला.

डोक्यावर रुमाल पांघरायचा, कुठलीही लाज न बाळगता पंगतीत बसावे आणि प्रशादा म्हणून मिळणारी रोटी हातावर झेलावी. ही एवढी तयारी असेल तर मक्के दी रोटी, एखादी भाजी, दाल, चावल आणि पेलाभर चहा मिळून जातो. जात, धर्म किंवा लिंग असा कुठलाही भेदभाव यात असत नाही. हरमंदिर साहिबमध्ये दोनदा गेलो असताना दोन्ही वेळेस मी तेथील लंगर साहिबमध्ये जेवलो. अर्थात पैसे वाचविणे किंवा पोट भरणे हा हेतू नव्हता. कारण वर म्हटल्याप्रमाणे हॉटेलमध्ये कुलचा खाल्ल्यानंतरही मी लंगरमध्ये गेलो होतो. मी गेलो कारण ती सवय आहे. घुमानच्या गुरुद्वारातही लंगर साहिब आहे आणि तेथे मी गेलो होतो. तिथे सुधीर गाडगीळ म्हणाले, "मला भूक लागलीय.”

मी म्हणालो, "चला लंगरमध्ये" आणि त्यांना तेथील लंगरच्या जेवणाचा अनुभव दिला.

नांदेडला चोवीस तास चालणारा एक गुरुद्वारा आहे आणि मुख्य गुरुद्वाऱ्यात, सचखंड साहिबमध्ये, रात्री लंगर लागतो. कधीकाळी मी तेथे जेवलोही आहे आणि सेवाही केली आहे. तशी ती शीख पंथियांमधील बहुतेक मंडळी करत असतात. ही सेवा करणारे लोक कुठले आलतू-फालतू नसून चांगले अनिवासी भारतीय, मोठे व्यावसायिक आणि कर्ती-सवरते लोक असतात. बाहेर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारी व्यक्ती येथे आपले जोडे सांभाळायला असते. त्यामुळे हरमंदिर साहिबचा लंगर पाहण्याची, तेथील अनुभव घेण्याची मला खूप इच्छा होती.

tumblr_nm9zq08oep1u5hwlmo1_500[1]  मात्र हरमंदिर साहिबमध्ये मी जो लंगर पाहिला, तो छाती दडपून टाकणारा होता. एका वेळी किमान एक हजार लोकांची पंगत येथे बसते आणि त्याच वेळेस किमान शे-दोनशे लोक सेवेत गर्क असतात. चोहोकडे भांड्यांचा, ताट-वाट्यांचा खणखणाट चालू असतो. सुवर्ण मंदिरातील लंगर साहिब दोन मजली असून त्याच्या विस्ताराचे काम चालू आहे. एकीकडे चहाची जागा होती. म्हणजे आपल्याकडे जशी पाणपोई असते तशी चहापोई होती. तिकडे जातानाच एक सरदारजी आपल्या हातात वाडगा देणार आणि पुढे फिल्टरच्या टाकीतून आपण तोटीद्वारे पाणी घेतो, तसा तोटीद्वारे चहा मिळणार. त्यासाठी दोन सेवेकरी बसलेलेच असतात. तिकडे न जाता आपण सरळ पायऱ्या चढून वर गेलो, की लंगर साहिबचे मुख्य दालन लागते. लंगर 'छकणाऱ्या'(सेवन करणाऱ्या) लोकांच्या शेकड्यांनी ओळी बसलेल्या असतात. पद्धत अशी, की भारतीय बैठकीत पाठीला पाठ लावून लोकांनी बसायचे. वाढकरी एकामागोमाग रोटी, दाल, भात इ. पदार्थ घेऊन फिरतात. मी गेलो तेव्हा एकदा शेवयांची खीर आणि एकदा भाताची खीर होती. आता या पदार्थांचे वाटप पंगतीत करायचे म्हणून त्यांच्या दर्जात कोणतीही तडजोड नसते. अख्ख्या मसुराच्या दालीत तुपाचा ओशटपणा आढळणार म्हणजे आढळणार. भात बासमती तांदळाचाच असणार आणि त्यातही तुपाची झाक असणार म्हणजे असणार. तेव्हा असे जेवण जेवल्यानंतर कोणत्या व्यक्तीला आणखी काही खाण्याची इच्छा होणार? गंमत म्हणजे इतके सारे मोफत उपलब्ध असूनही पंजाबमध्ये हॉटेल अगदी भरभरून चालतात.

हरमंदिर साहिबची आणखी एक खासियत येथील प्राकारात तुम्हाला छायाचित्र काढण्यापासून कोणीही रोखत नाही. हवी तेवढी छायाचित्रे काढा. मी तर हरमंदिर साहिबच्या अगदी गाभाऱ्यात प्रवेश करेपर्यंत मोबाईलमध्ये छायाचित्रे काढत होतो. फक्त गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारापासून सेवेकरी छायाचित्रांना मनाई करत होते. आणखी विशेष बाब म्हणजे हरमंदिर साहिबच्या अगदी घुमटापर्यंत जाण्यास प्रत्येकाला मुभा आहे. तेथून आजूबाजूचे दिसणारे दृश्य मनोहर खरे. चारी बाजूला संगमरवराच्या भिंती ढगांशी स्पर्धा करत असतात आणि पांढरे शुभ्र घुमट निळ्या आकाशात घुसखोरी केल्यासारखे दिसतात. चारीकडच्या भिंतींमध्ये दिसणाऱ्या कमानींमधून बसलेले भाविक छायाचित्रकारांसाठी एक पर्वणीच भासतात. कोणी गुरु ग्रंथसाहिबचे पारायणे करतोय, कोणी डोळे मिटून ध्यान करतोय, एखादी स्त्री सोन्याच्या घुमटाकडे तोंड करून हात जोडून आणि डोळे मिटून प्रार्थना करतेय, अशा कमानींच्या पार्श्वभूमीवरच्या प्रतिमा चित्रमय वाटणार नाहीत तर काय? बरं, याच्या जोडीला शुद्ध शास्त्रीय रागांमध्ये बसविलेल्या आणि मंजुळ व सौम्य आवाजात चालणाऱ्या शबद किर्तनांचे पार्श्वसंगीत. या धवल चौकटीच्या बाहेरही काही जग आहे आणि तिथेही काही घडामोडी होतात, याचे विस्मरण ज्याला होत नाही त्याला जगातील सौंदर्य पाहण्याची दृष्टीच नाही, हे छातीठोकपणे सांगता येते.

Monday, June 15, 2015

भुजबळं बलिं दद्यात् सरकारो पवाररक्षक:

bhujbal

गेल्या वर्षी महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि आधी भारतीय जनता पक्षाचे व नंतर भाजप-शिव सेना युतीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यावेळी शरद ऋतू सुरू होता, ही नियतीचीच इच्छा होती. सत्तेवर आल्यानंतरही या सरकारवर शरदाच्या चांदण्याची छाया असल्याचे गावगन्ना मानले जात होते आणि त्याबद्दल सरकारबद्दल लोकांमध्ये चीडही होती.

ज्या सिंचन गैरव्यवहारावर भाजपने बहुमताचे पीक काढले, त्याची काही तरी तड लावणे त्या पक्षाला आवश्यक होते. पण शिवसेनेच्या संभाव्य दगाफटक्याची दहशत आणि मुळातच 'राष्ट्रवादी'ला दुखावण्याची अनिच्छा, यामुळे कारवाईचा बांध काही फुटत नव्हता. एकीकडे 'राष्ट्रवादी'वर कारवाई झाल्याशिवाय, किंवा झालेली दिसल्याशिवाय, लोकांचे समाधान नाही आणि कारवाई करण्याची तर इच्छा किंवा तयारी नाही, अशी जबरदस्त कात्री 'छत्रपतींचा आशीर्वाद' मिळविणाऱ्या पक्षाची झाली होती. इकडे आड आणि तिकडे विहीर म्हणजे काय, याचा अनुभव भाजपच्या मंडळींना येत होता.

मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये राष्ट्रवादीशी सोयरिक करायची, निरनिराळ्या जिल्हा बँकांच्या निवडणुकांत त्यांच्या गळ्यात गळे घालायचे आणि मुंबईत त्यांच्यात म्होरक्यांना जेरबंद करायचे, ही कसरत जमणार तरी कशी?

याच्यावरचा एक जबरदस्त उतारा म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांच्या प्रभावळीतील अधिकाऱ्यांवर या आठवड्यात फिरलेला रोडरोलर. 'राष्ट्रवादी'चे 'दादा' अजित पवार यांना एसीबीच्या चौकशीसाठी प्रत्यक्ष न येण्याची सूट मिळते आणि एका आठवड्याच्या आत भुजबळांच्या भ्रष्ट कारभाराचा एक एक चिरा निरा निखळून काढण्यास सुरूवात केली जाते...सरकारी कामकाजात योगायोग या शब्दाला जागा नसते, हे ज्यांना माहीत असते त्यांना या दोन घटनांमधील संगतीही कळेल.

खुद्द भुजबळ यांना संपविण्यासाठी 'राष्ट्रवादी'ची अनेक मंडळी एका पायावर तयार होती. 'मराठ्यां'च्या मळ्यात हा 'ओबीसी माळी' तसा उपराच होता. सुंठीवाचून हा खोकला जाणार असेल तर कोणाला नको होते? त्यामुळे त्यांना निशाण्यावर घेऊन 'पहिलटकर' सरकार शिकार करू लागले, तर त्यांना वाचवायला कोण येणार होते?

याच कारणाने अजापुत्रं बलिं दद्यात या न्यायाने राष्ट्रवादीच्या खऱ्या सूत्रधारांना बाजूला ठेवून सरकारने छगन भुजबळाच्या संस्थानात आपले घोडे धाडले आहेत. त्यातून 'राष्ट्रवादी'ची गचांडी धरल्याचे पुण्यही मिळणार आणि दोस्ताची मैत्रीही कायम राहणार, असा हा खेळ आहे. नाहीतर कुटुंबियांसकट आपल्याला संपविण्याचा हा कट आहे, असा टाहो भुजबळ यांनी फोडला नसता. 'अश्वं नैव गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च अजापुत्रं बलिं दद्यात देवो दुर्बलघातकः' हा केवळ श्लोक नाही, ते राजकारणाचे वास्तव आहे. सत्ताधारी कोण, हा प्रश्न गौण आहे.

एरवी भुजबळांच्या पंखांखाली इमले उभे करणारे दीपक देशपांडे सापडतात आणि पवार कुटुंबियांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या अनिरुद्ध देशपांडेंच्या 'अमनोरा'मध्ये मुख्यमंत्री गाणे म्हणतात, हे चित्र काय सांगते? सत्ता गेल्यानंतरही फक्त भुजबळांच्या शाही बंगल्याच्या सुरस कथा बाहेर येतात आणि राष्ट्रवादीच्या बाकी मंत्र्यांची आलिशान जीवनशैली मागील पानावरून पुढे चालू राहते, याचा तरी अर्थ काय?

भुजबळ आणि त्यांचे कुटुंबीय हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, हे तर खरेच. पण हा डागाळलेला तांदूळ ज्या कुजकट डाळींसोबत आजपर्यंत खिचडी शिजवत होता, त्या दाळींना कोण हात घालणार?

तेव्हा फडणवीस सरकारला खरोखर भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळायच्या असतील तर पवार कुटुंबियांसहित भुजबळांवर कारवाई करावी लागेल. अन्यथा शक्तिशाली महागुरुंना सोडायचे आणि त्यांच्या गणंगांना बळी द्यायची, हीच परंपरा हेही सरकार चालवत आहे, एवढेच म्हणावे लागेल.

Friday, June 12, 2015

घुमानच्या निमित्ताने-6 अमृतसरी कुलचा आणि लस्सी

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo5_500[1] नाही म्हणायला, अमृतसर शहरात आल्याची भरभक्कम जाणीव होते ती येथील हॉटेल आणि लस्सीचे दुकान पाहून. त्यातही हरमंदिर साहिबच्या परिसरातील जी हॉटेल आहेत ती खऱ्या अर्थाने आस्वाद घेतलाच पाहिजे या वर्गवारीत मोडणारी आहेत.

हरमंदिर साहिबच्या आधी जी पहिली गल्ली आहे तिथेच थोडे आत गेले, की शर्मा भोजन भांडार नावाचे हॉटेल आहे. घुमानहून परतल्यानंतर मी हरमंदिर साहिबची परत भेट घेतली तेव्हा सकाळी या हॉटेलमध्ये गेलो होतो. अमृतसरी कुलचा नावाचा पराठ्याचा एक लांबचा नातेवाईक लागेल असा पदार्थ येथे खूप प्रसिद्ध आहे. पराठ्याप्रमाणेच नाना पदार्थ आतमध्ये सारून हा पदार्थ तयार केला जातो. मी आधी गोबी-बटाटा मिक्स कुलचा मागविला. त्याच्यासोबत हरभऱ्याची (चना) भाजी आणि कांदा, मिरची व आणखी काही पदार्थ असा बेत दिसला. शिवाय कुलच्यासोबत चमचाभर लोण्याचा 'चढावा' होताच. सर्वात आधी कुलच्याचा तुकडा आणि हरभऱ्याच्या भाजीचा घास घेतला आणि मन तृप्त झाले. शंभर मटणाच्या तोंडात मारेल, असा विसविशीत शिजलेला चना आणि तो कुलचा यांची चव म्हणजे ज्याचे नाव ते. त्यानंतर वाघा सीमेवरून परतल्यानंतर मी परत त्याच ह़ॉटेलमध्ये गेलो आणि दोन कुलचे खाल्ले. एक पनीर कुलचा आणि दुसरा गोबी कुलचा. प्रत्येकासोबत भाजी आणि चटणी होतीच. ही चटणी काही वेगळाच पदार्थ असेल, म्हणून मी वेटरला विचारले, याला काय म्हणतात. तो म्हणाला, "इसे चटनी बोलते है”. मग मात्र मी मूग गिळून गप्प बसावे, त्याप्रमाणे चने आणि कुलचा गिळून गप्प बसलो. अमृतसरी कुलच्याचा हा आस्वाद घेतल्यामुळे नंतर पानीपतला गेल्यावर तिथे जे कुलचे मी पाहिले, ते काही माझ्या गळी उतरले नाहीत. वेगवेगळ्या गाड्यांवर अगदीच लुसलुशीत कुलचे विकायला काढले होते त्यावरून त्यांच्या तोंडी न लागण्यातच शहाणपणा आहे, हे मी ताडले. tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo6_400[1]

अमृतसरच्या आणखी दोन खासियत म्हणजे लस्सी आणि कुल्फी. महाराष्ट्रात मिळणारी लस्सी हे लस्सीच्या नावावर चालणारे थोतांड आहे, असे मी म्हणणार नाही. परंतु  असे म्हणता येईल, की पंजाबी लस्सी म्हणजे कुंभमेळा आहे आणि महाराष्ट्रातील लस्सी ही गावची जत्रा आहे. यहां की लस्सी जैसी कोई नहीं. इतक्या दूर पंजाबमध्ये आल्यानंतर एखादी व्यक्ती लस्सी न पिता परत जाणार असेल तर त्या व्यक्तीकडे रसिकता नावालाही नाही, असे बेलाशक म्हणता येईल. 'हाय जालीम तूने पीही नहीं,' असे शायर म्हणतो ते अशा लोकांसाठीच.

आपल्याकडे जे ग्लास असतात त्याच्या साधारण दीडपट उंच आणि गोल स्टीलच्या पेल्यांमध्ये पुढ्यात आलेली थंडगार लस्सी जेव्हा घशाखाली जाते तेव्हा जगात दुःख, दैन्य, उपद्रव, भांडणे वगैरे गोष्टी असल्याची सूतराम आठवणही राहत नाही. उमर खय्याम म्हणतो त्याप्रमाणे थंडगार लस्सीने भरलेली एक सुरई आणि एक कवितेची वही, एवढ्या भांडवलावर कोणा व्यक्तीचे आयुष्य सहजपणे व्यतीत होऊ शकते.

गंमत म्हणजे, कुलच्याबाबत जे झाले ते लस्सीबाबत झाले नाही. अमृतसरला जी लस्सी मिळाली, त्या चवीची नाही परंतु आकार आणि घट्टपणाच्या बाबतीत त्याच तोडीची लस्सी पानीपतलाही मिळाली. त्यामुळे तेथेही मी दोनदा लस्सीशी दोन हात केले. या दोन्ही शहरांमधील लस्सी पिण्याचा उल्लेख केवळ भाषेची सवय म्हणूनच करायला पाहिजे. वास्तविक त्यांच्याबाबत लस्सी खाल्ली असे म्हणायला पाहिजे. तेवढी त्यांची घनता आणि घट्टता होतीच होती. तमिळमध्ये कॉफी पिली असे न म्हणता कॉफी खाल्ली असेच म्हणतात. (कॉफी साप्पिटेन). त्याच प्रमाणे पंजाबमध्ये लस्सी प्यायची बाब नसून खायची बाब आहे आणि कामचलाऊ पोट भरायचे असेल तर तीस रुपयांत पोटभर लस्सी हा उत्तम पर्याय आहे, एवढे ध्यानात घ्यावे. तसेही केवळ जेवायचे म्हटले तरी खुशाल एखाद्या हॉटेलात जावे आणि ३० ते ५० रुपयांत पोटोबाची सोय करून यावी, हे येथे अशक्य नाही.

tumblr_npgsoaDu0p1u5hwlmo10_500[1] संस्कृतमध्ये लास या शब्दाचा अर्थ उत्सव करणे, नाचणे, मौजमजा करणे असा आहे. उल्लास, विलास वगैरे शब्द त्यांतूनच आलेले आहेत. पंजाबमधील लस्सीचे प्याले पाहिल्यानंतर या लस्सीचे कुळ लासमध्येच असावे, अशी खात्री पटते. एखाद्या मटक्यात 'लावायला' ठेवलेली लस्सी मस्त थंडगार झाली आणि ऐन तळपत्या उन्हात ती घशाखाली ओतली, तर मेजवानी, सेलिब्रेशन, स्वर्गसुख अशा सगळ्या कल्पना हात जोडून समोर उभ्या राहतात. अन् अशी मनसोक्त लस्सी पिल्यानंतर पेट भर गया लेकिन दिल नहीं भरा, अशी अवस्था होते. खल्लास!

Monday, June 8, 2015

पीत पुरोगाम्यांनी जात दाखवली!

महाराष्ट्रातील (कु)प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी नामक कोणा व्यक्तीमधील संभाषण सध्या व्हाटस अॅप, फेसबुक आणि ट्विटरवरून गाजत आहे. वागळेंनी ब्राह्मण जातीतील लोकांना 'ठोक के भाव' में खूनी आणि दंगेखोर ठरवून टाकल्याचे या संभाषणातून दिसत आहे. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आधार घेत वागळेंनी मनातील (बहुतांश) सगळी गरळ ओकली असल्याचे कोणालाही ही ध्वनिफीत ऐकल्यावर वाटेल. मोदी सरकार आल्यापासून समस्त पीत पुरोगाम्यांचा झालेला कोंडमारा आणि या सरकारमुळे (किंवा हिंदुत्ववाद्यांमुळे) आपल्याला बेकार व्हावे लागले, या वैफल्यातून कदाचित वागळेंनी 'पॉईंट ब्लँक'वरून शूट केला असावा. यातील वागळेंची ख्याती अलम जगाला माहीती आहे तर हे अनिरुद्ध जोशी कोण, काळे की गोरे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वागळेंच्या या समाजवादी बहादुरीची 'मी मराठी' नावाच्या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर यांनी पाठराखण केली आहे. याच वाहिनीवरून वागळेंचा कार्यक्रम प्रसारित होत असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे जीवन समृद्ध केलं, तर त्यात कोणाला काही वावगे वाटायचे नाही. प्रामाणिकपणाची कमाई आणि पाठराखण ही नेहमीच कौतुकास्पद असते. ब्राहण जात आणि ब्राह्मणी मनोवृत्ती या वेगळ्या आहेत, अशी मखलाशी आंबेकरांनी केली आहे. अरे बाबा, पण वागळे त्यात चक्क 'तुम्ही भटांनी, तुम्ही ब्राह्मणांनी' असे शब्द पेरतो, त्याचे काय?

वागळेंच्या प्रामाणिकपणाबद्दल भाऊ तोरसेकरांसारख्या ज्येष्ठ आणि वागळेंच्या समकालीन पत्रकाराने पुरेसे पुरावे दिलेच आहेत. त्यातून त्यांच्या चारित्र्यावर झक्क उजेड पडतो. चार वर्षे ज्या दर्डा शेठचा पगार खाल्ला, त्यांनीच कामावरून कमी केल्यानंतर ट्वीटरवरून शिव्या घालताना वागळ्यांची जीभ सैलावते. दर्डा हे कोळसा गैरव्यवहारातील आरोपी आहेत, हे यांना आधी माहीत नव्हते का? की केवळ 2014 च्या जून महिन्यांनंतरच हा साक्षात्कार झाला. गुटख्याच्या निर्मात्यांकडून स्वतःच्या पुस्तकाला प्रायोजकत्व मिळवून आपण समाजासाठी काहीतरी भव्यदिव्य केले आहे, अशी फुशारकी मिरविणारे हे पत्रकार.

 

A Police Complaint has been Lodged against Nikhil Wagle for inciting communal hatred @Dev_Fadnavis Plz take Action? pic.twitter.com/ZdwaPkWtT4

— Chandrabhushan Joshi (@MatruBhakt) June 7, 2015

अनिरुद्ध जोशींच्या संभाषणातून वागळेंनी ब्राह्मण जातीवर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत, त्या त्यांनाच लखलाभ. पण त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू (आणि नव्याने कळलेले पेरियार! तेच ते, "तमिळनाडू हा स्वतंत्र देश आहे, सगळे हिंदी भाषक आणि तमिळ भाषक ब्राह्मण हे सैतानाचा अवतार असून त्यांचे शिरकाण करावे,” असे विचार मांडणारे पेरियार!) यांचे नाव घेऊन हे कृत्य केले आहे, ते जास्त धोकादायक आहे. आंबेडकरवादी, दलित संघटना आणि कोणत्याही प्रागतिक विचाराच्या व्यक्तीने याचा निषेध करायलाच पाहिजे. कारण बाबासाहेब आम्हीही वाचले आहेत आणि त्यांच्या विचारावर आमची श्रद्धाही आहे.

'कुठल्याही व्यक्तीचे चारित्र्य किंवा गुण हे तो कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मला यांवर आधारित नसून तो काय करतो, त्याचे विचार काय आहेत, यावर ठरतात,' ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे, असे वाटते. याच्या उलट व्यक्तीला जन्मजात गुण, दोष किंवा योग्यता चिकटविणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एखाद्या वंचित गटातील व्यक्तीचे आई-वडिल निरक्षर आहेत म्हणून ती व्यक्तीही शिकण्यास किंवा इतरांच्या बरोबरीने समाजात भाग घेण्यास नालायक आहे, हे मानणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका ब्राह्मण व्यक्तीने म. गांधींना मारले म्हणून सगळ्या ब्राह्मणांच्या संपत्तीला आगी लावणे, त्यांना जीवे मारणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका शीखाने इंदिरा गांधींना मारले म्हणून सगळ्या शिखांचे शिरकाण करायला निघणे, ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. या उलट प्रत्येक व्यक्तीशी व्यक्ती म्हणून वागणे, हा आंबेडकरवादी विचार आहे.

कुठल्या तरी प्रसंगात ब्राह्मण दोषी आढळला, म्हणून जोशी यांना गृहित धरून वागळे जेव्हा सगळ्या ब्राह्मण जातीला आरोपी बनवितात (पिंजऱ्यात उभे करतात नव्हे!) तेव्हा निखिल वागळे नावाचा एक महाभंपक इसम बाबासाहेबांच्या नव्हे तर ब्राह्मणी विचारांच्या मार्गाने जातो. म्हणून दलित संघटनांनी ताबडतोब त्यांच्यापासून दूर व्हावे. जोशी हे नाव गैर-ब्राह्मणांमध्येही असते हे वागळ्यांना माहीत असायला पाहिजे. आणि तेवढेच असेल तर गेल्या पाच वर्षांतील अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंद झालेल्या किती प्रकरणांचे आरोपी ब्राह्मण जातीतील आहेत, हे 'आमच्यामुळे झाला, आमचा इम्पॅक्ट' असं जेव्हा तेव्हा छाती पिटून सांगणाऱ्या 'मी मराठी' वाहिनीने शोध करून सांगावे.

खरं पाहिलं तर निखिल वागळे आणि अरविंद केजरीवाल या दोन इसमांची कारकीर्द एकाच गोष्टीवर उभी आहे - लोकांना चिथावून मारहाण करायला लावायची आणि बघा, मी कसा अत्याचाराला बळी पडलोय याची जाहिरातबाजी करायची. (समानशीलेषु सख्यम). जेव्हा जेव्हा वृत्तपत्र चालत नाही, नोकरी सुटलेली असते किंवा आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसते तेव्हा वागळेंना कोणाची तरी छेड काढून मोठे व्हायची तल्लफ येते. बरे, जेव्हा शिवसैनिक मारायला येतात तेव्हा 'मला मारू नका, मी हर्ट पेशंट आहे' असा कांगावाही करता येतो.

जोशींशी बोलताना मी धर्मांतर करीन, अशी धमकी वागळे देताना ऐकू येते. असल्या दांभिकांच्या धर्मांतराची काय पर्वा बाळगायची? बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्याला नैतिक अधिष्ठान होते, एक तपश्चर्या होती. त्यांच्याकडे बोट दाखवून कोणीही दुकानदार करू पाहत असेल तर त्याला खुशाल जाऊ द्यावे. प्रासादशिखरस्थो ऽपि काको न गरुडायते (राजमहालावर बसल्याने कावळ्याचा गरूड होत नाही).

वारुणी आणि तरुणी यांचा आस्वाद घेत दलित, शोषितांच्या नावाने बाळंतकळा दाखविणाऱ्या झोळीवाल्यांचे एक पीक गेल्या पन्नासेक वर्षांत फोफावले आहे. याचे उदाहरण म्हणजे सध्या गजाआड असलेला तरुण तेजपाल. हाही असाच समाजाचा सगळा व्यभिचार मीच झाडून काढणार, अशा तोऱ्यात सफाई अभियान करायचा. (याच तहलका आणि तेजपालाच्या प्रत्येक ट्वीटला रिट्वीव करण्याचा पूर्णवेळ उद्योग वागळे करायचे, हे येथे नोंदण्याजोगे). यथावकाश त्याच्या लीला उजेडात आल्या, अन् तेही धर्मांध, प्रतिगामी व फॅसिस्ट सरकार सत्तेत नसताना, आणि तहलका काहीसा हलका झाला. परंतु याच पंथातील आणखी काही मंडळी आपल्या मार्गावरून ढळली नव्हती. माकडांनी एकमेकांनी पाठ खाजवावी, तसे एकमेकांची स्तुती करून मोठे करायचे आणि गरिबांच्या दुखण्यावर आपल्या पोतड्या भरायचा, हा यांचा उद्योग. विशेष म्हणजे या पंथातही ब्राह्मण जातीतील लोकांचीच संख्या जास्त असते.

दारु पिताना तोंडी लावायला खारे शेंगदाणे तोंडात टाकावेत तशी ही मंडळी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहूंची नावे घेणार आणि आपली समाजवादी दुकाने चालविणार, असा हा प्रकार होता.

गेल्या पन्नासेक वर्षांत म्हणायचे कारण म्हणजे त्यापूर्वी जी मंडळी होती ती अस्सल समाजवादी होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सचोटी होती. साने गुरूजी आणि ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या समाजवाद्यांकडे त्याग होता, प्रामाणिकपणा होता. समाजवादाच्या नावाखाली दाढी वाढवून आपली दुकाने मांडणारी वागळेंसारखी पिढी तेव्हा नव्हती किंवा असली तरी कमी प्रमाणात होती. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना मान मिळतो हे पाहिल्यानंतर केवळ संस्कृत पोपटपंची करून पोटार्थी भटांची जशी पूर्वी पैदास झाली तशी अलीकडे समता, बंधुता वगैरे बडबड करून तुंबड्या भरणारी एक जमात उगवली आहे. तीच पीत पुरोगाम्यांची जमात. सवंग, नाटक्या आणि पोकळ पुरोगाम्यांची जमात.

जोपर्यंत वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी ही माध्यमे मूठभर कम्युनिष्ट आणि पीत पुरोगाम्यांच्या ताब्यात होती, तेव्हा यांचे चांगले चालले होते. वाचक-प्रेक्षकांकडे त्यांना आव्हान देण्यासाठी काही साधनेच नव्हती. मात्र आंतरजालाच्या प्रसारामुळे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची सोय झाली आणि यांच्या पोटात मुरडा आला. तुम्ही जे बोलताय, त्यामागे तर्क काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या. त्यात यांच्या आक्रस्ताळी, एकांगी आणि अतार्किक वागण्यामुळे आपल्या ब्रँडला धोका पोचतो, हे कळाल्यावर वागळे-केतकर-राजदीप संप्रदायाला त्यांच्या त्यांच्या मालकांकडून नारळ मिळाले. (अंबानींनी काढल्यानंतर वागळेंना कोणीही घेतले नाही, हे सूचक होते.) पण हे सर्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षामुळेच घडल्याचा समज वागळेंचा झाला. आताच दर्डा शेठच्या मदतीने नवीन चॅनल काढून परत हातवारे करायला मिळणार, असा मनसुबा चालला होता. पण तोही फिसकटला आणि प्रसिद्धीला चटावलेल्या या पीत पुरोगाम्याने जोशीच्या निमित्ताने आपली 'जात' दाखवली.

(निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या संभाषणाची हीच ती ध्वनिफीत - https://t.co/Mx7BOxklCi)

Tuesday, June 2, 2015

घुमानच्या निमित्ताने-5 भिंडराँवालाचा गुरुद्वारा!

Gurudwara यातीलच एक गुरुद्वारा जर्नैलिसिंग भिंडराँवाला (भिंद्रनवाले) याचाही आहे. पंजाबमध्ये खालसा चळवळ जोरात होती, त्यावेळी या भिंडराँवाला आणि त्याच्या हस्तकांच्या कारवायांमुळे सुवर्णंमंदिर बदनाम झाले होते. ६ जून १९८४ रोजी भिंडराँवालाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार लष्कराने‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ राबविले. त्यावेळी मंदिराचे बरेच नुकसान झाले. यात भिंडराँवाला मारला गेला. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याच्या स्मृत्यर्थ एक गुरुद्वारा बनविला आहे.

हा गुरुद्वारा केवळ तीन वर्षांपूर्वी (2012) बांधला आहे. आधी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्थळ बनविण्याची योजना होती. पण केंद्र सरकारने घेतलेला आक्षेप,काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेली टीका आणि लेफ्ट. जन. (निवृत्त) कुलदीपसिंग ब्रार व केपीएस सिंग गिल यांच्यासारख्यांनी केलेला विरोध, यामुळे स्मृतिस्थळाऐवजी गुरुद्वाऱ्यावरच काम भागले.

हरमंदिर साहिबला जाण्यासाठी जी रांग लागते त्या रांगेच्या बाजूलाच हा गुरुद्वारा आहे. भिंडराँवालाला येथेच गोळ्या घालून मारण्यात आले, असे म्हणतात. 'काँग्रेस सरकारने राबविलेल्या मोहिमेत शहीद झालेले जर्नैलिसिंग भिंडराँवाला' असा या गुरुद्वाऱ्याच्या पायथ्याशी शिलालेख आहे.

इतकेच कशाला, सुवर्णंमंदिराच्या प्रवेशद्वाराशी शिखांचे संग्रहालय असून त्यात शीख हुतात्मे, लढाया आणि इतिहास यांची माहिती आहे. त्यातही भिंडराँवालाचे गुणगान गायले आहे. मात्र त्याची फिकीर करण्याची गरज वाटली नाही. कारण मी पाहिले, की गुरुद्वाऱ्यात जाणारे भाविक भिंडराँवाला किंवा खलिस्तानबाबत फारशी आस्था बाळगून जात नाहीत. हरमंदिर साहिबच्या प्राकारातील सर्व उपासना स्थळ त्यांना पवित्र वाटतात. त्यामुळे तिथे डोके टेकवून ते जातात. याच प्रांगणात एक बोराचे झाड असून त्यात दैवी शक्ती आहे, असे मानतात. त्या झाडाची लोक जशी पूजा करतात तशीच या गुरुद्वाऱ्यात माथा टेकतात.

दमदमी टाकसाळ किंवा भिंडराँवाला किंवा खलिस्तान अशा बाबींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. एकीकडे भिंडराँवालाला हुतात्मा बनवून हळूच त्याच्या आंदोलनाची हवा काढण्याची उत्तम राजकीय चाल भारतीय सरकारने खेळली आहे. कारण या गोष्टी उभारण्याची परवानगी दिली नसती, तर विनाकारण खलिस्तान्यांच्या हाती कोलीत मिळाले असते आणि ती नसती डोकेदुखी ठरली असती. तीन वर्षांपूर्वी सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या दिवशी झालेली तलवारबाजी डोळ्यांपुढे आणली, तर कल्पना येईल की काय गहजब झाला असता.

ते असो. पण हरमंदिर साहिबमध्ये फिरताना दोनदा शिरा खाल्ला. गुरुद्वाऱ्याचा प्रसाद म्हणून नांदेडला असताना हा शिरा कितीदा तरी खाल्लेला. आता येथे परत तीच चव, तोच तुपकट ओशटपणा आणि तोच सुगंध. शुद्ध आटीव तुपाचा घमघमाट ल्यालेला हा शिरा हातातून तोंडात टाकण्याची इच्छाच होत नाही. या शिऱ्याच्या बदल्यात शीख धर्म स्वीकारण्याची अट असती तर तीही मान्य केली असती, इतकी त्याची लज्जत भारी. घास न घेता या शिऱ्याचा मुटका ओंजळीत घेऊन त्याचा सुवासच घेत राहावा, अशी इच्छा होत राहते. मात्र त्याही मोहावर विजय मिळवून त्याला गिळंकृत केले.

याच्या जोडीला नांदेडहून आलेली एक यात्रा आणि घुमानला जाण्यापूर्वी आलेले अनेक लोक, असे बहुतांश मराठी लोक त्याचवेळेस हरमंदिर साहिबमध्ये आलेले असल्याने अवतीभवती मराठी स्वर कानावर पडत होते. येथे परत काळ आणि वेळेची गल्लत होऊ लागली. मी कुठे आहे? अमृतसर का नांदेड? आणि पुण्याचे काय झाले? या मधल्या १८ वर्षांचे काय झाले? असे प्रश्न पडू लागले.

Thursday, May 28, 2015

घुमानच्या निमित्ताने– 4 हरमंदिर साहिबच्या पवित्र प्रांगणात

Golden Temple Amritsar

अमृतसरला पोचल्यानंतर पहिल्यांदा बसस्थानकावरच राहण्याची खोली घेतली. येथील बस स्थानकावर सामान ठेवण्याची आणि खोलीची चांगली सोय आहे. भाड्यानुसार खोलीचा दर्जा बदलतो. नाही म्हणायला हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) आणि अन्य गुरुद्वाऱ्यांच्या यात्री निवासांमध्ये राहण्याची सोय होते, परंतु मी ऐकले, की एकट्या व्यक्तीला सहसा तिथे जागा मिळत नाही. म्हणून असा खासगी निवासाचा मार्ग पत्करावा लागला. चेन्नई, म्हैसूर अशा ठिकाणी मी ही सोय पाहिली आहे. बस स्थानकावरच राहण्याची सोय उपलब्ध असते. आपल्याकडे मला मुंबईचे माहीत नाही परंतु अन्य शहरात तरी अशी सोय मला दिसली नाही. पुण्यात तर बस स्थानकांचाच पत्ता नाही तिथे राहण्याचा काय ठावठिकाणा?

अमृतसरला आल्यानंतर पाहण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे हरमंदिर साहिब. सुवर्ण मंदिर या नावाने ते अधिक प्रसिद्ध आहे. ते शिखांचे उपासनामंदिर आहे, प्रसिद्घ पर्यटनस्थळ आहे आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. शहरातील एका भव्य तलावाच्या मध्यभागी वसले आहे. वास्तविक या तलावामुळेच या शहराला अमृतसर हे नाव मिळाले आहे. ज्या तलावातील पाणी अमृत आहे तो अमृतसर. शिखांचे चवथे गुरु रामदास यांनी या शहराची स्थापना केली. तेव्हा या शहराला रामदासपूर असे नाव होते. या गुरुद्वाऱ्याचा उल्लेख स्थानिक लोक हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर अशा नावांनीही करतात. 

शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिब पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. एखाद्या गुरुद्वाऱ्यात गुरु ग्रंथसाहिब ठेवणे याला प्रकाश होना असे म्हणतात. तर गुरु ग्रंथसाहिबचा पहिला प्रकाश पहिल्यांदा येथे प्रकट झाला. त्यामुळे या मंदिराला शीख संप्रदायात सर्वोच्च स्थान आहे. गुरु रामदास यांनी त्याचा पाया घातला. विशेष म्हणजे गुरु रामदास यांनी एका मुस्लिमाच्या हातून पायाचा पहिला दगड रचला. पुढे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतर वेळोवेळी सभोवतीच्या प्राकारातील वास्तूत बदल होत गेला. मात्र मूळ मंदिराची रचना होती तशीच आहे. 

Golden Temple Amritsar
हरमंदिर साहिबची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मुंबईच्या हाजी अलीची आठवण यावेळी येते. सध्या तेथे भलीमोठी रांग लागते आणि भक्तांना किमान दोन तास वाट पाहावी लागते. मला स्वतःला दोन तास लागले आणि घुमान येथे भेटलेल्या काही जणांनी अडीच-तीन तास लागल्याचेही सांगितले. नुसता वेळच लागत नाही तर या रांगेमध्ये चांगलीच रेटारेटी आणि ढकलाढकली चालू असते. एखाद्या हिंदू मंदिरातील स्थितीची आठवण करून देणारा हा गोंधळ असतो. त्यामुळे हरमंदिर साहिबपर्यंत पोचणे हा मोठाच अवघड प्रसंग ठरतो.

मंदिराची मूळ वास्तू दुमजली आणि त्यावर घुमट अशी आहे. येथे भव्यता कमी आणि पवित्रता जास्त आहे. मुख्य म्हणजे एवढी मोठी वास्तू सोन्याची असल्यामुळे ती झळाळीच डोळ्यांने पारणे फेडते. त्यामुळे भव्यता कमी असली तरी चालून जाते. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. 

अहमदशहा अब्दाली याने या मंदिरावर विध्वंसक हल्ला केला होता. पुढे शिखांच्या बाराव्या मिस्लने मंदिराची झालेली पडझड दूर करुन पुनर्बांधणी केली. महाराजा रणजितसिंग यांनी मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याची पुनर्बांधणी संगमरवरी दगडात केली व कळस तांब्याच्या पत्र्याने मढवून त्याला सोन्याचा मुलामा चढविला. (नांदेड येथील गुरुद्वाराही महाराजा रणजितसिंह यांनीच बांधून घेतला आहे.) तेव्हापासून ते सुवर्णंमंदिर म्हणून ख्यातनाम आहे.  शिखांच्या संदर्भातील सर्व निर्णय घेणारे ‘अकाल तख्त’ हरिगोविंद यांनी मंदिरासमोर बांधले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान गुरुद्वारे आहेत. त्यांत शिखांच्या ऐतिहासिक शौर्यगाथा दर्शविणाऱ्या धातूंच्या तबकड्या लावल्या आहेत. त्यावर वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत.

Thursday, May 21, 2015

घुमानच्या निमित्ताने– 3 सुवर्ण मंदिराच्या शहरात

tumblr_nm9zlj5iky1u5hwlmo1_1280[2] नवी दिल्लीहून आधी अमृतसर येणे. त्यासाठी दिल्लीच्या महाराणा प्रताप आंतरराज्य बस स्थानकावर यायचे. तिथे गाडी पकडायची, असे सगळे सोपस्कार पार पाडले. परंतु तिथे गेल्यावर लक्षात आले, की दिल्लीहून थेट अमृतसरला बस नाही. म्हणजे गाड्यांवर पाट्या अमृतसरच्याच लागतात परंतु त्या तिथपर्यंत जात नाहीत. मार्गात जालंधर (पंजाबीत जलंधर) येथे थांबतात. त्यातही काही गाड्यांसाठी आधी तिकिट घ्यावे लागते आणि त्यांचे आसन क्रमांक ठरलेले असतात. त्यामुळे जालंधरच्या एका गाडीत चांगला बसलेलो असताना उतरावे लागले.

अशा दोन तीन गाड्या सोडल्यानंतर रात्रीचे साडे दहा-अकरा वाजू लागतात आणि आपला धीर खचायला लागतो. अमृतसरला कधी पोचणार, तिथले सुवर्ण मंदिर कधी पाहणार, जालियांवाला बाग कधी पाहणार, अशा नाना प्रकारच्या चिंता मनात येऊ लागतात. तेवढ्यात देवाने धाडल्यासारखी दिल्ली-अमृतसर अशी पाटी लागलेली एक गाडी येते. हिय्या करून आपण त्याला विचारतो, "गाडी अमृतसर जाएगी ना?" त्यावर तद्दन बाऊन्सरसारखा दिसणारा मात्र कंडक्टरचे काम करणारा इसम आपल्याला सांगतो, की जाईल पण साडे अकराला निघेल. तिकिट मीच देणार आहे, असेही सांगतो. आपल्याला वाटते, झाले, अब अमृतसर दूर नहीं. परंतु तिकिट फाडून हातात देताना कंडक्टर आपल्याला सांगतो, की तिकिटांचे यंत्र जालंधरचे असल्यामुळे जालंधरपर्यंतचे तिकिट घ्या आणि पुढचे नंतर देतो. पाऊण प्रवास झाल्यानंतर तोच कंडक्टर आपल्याला सांगतो, की गाडी जालंधरपर्यंतच जाणार आहे, तिथे अर्धा तास थांबेल. तुम्हाला उशीर होईल म्हणून तुम्ही दुसऱ्या गाडीने जा. शेवटी अडला हरी...ही म्हण मनातल्या मनात घोळत जालंधरच्या अलीकडे चार-पाच किलोमीटरवर आपण दुसऱ्या गाडीत बसतो. दुःखात सुख एवढेच, की कंडक्टर आपल्याला त्या गाडीत लवकर जाऊन बसायला सांगतो आणि दुसऱ्या गाडीच्या चालक-वाहकांना आपल्यासारख्या प्रवाशांसाठी थांबण्यास सांगतो.

असा हा प्रवास करून एकदाचा अमृतसरच्या दिशेने गाडीत जाणाऱ्या गाडीत बसलो. पहाट सरून ऐन सकाळची वेळ. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा आणि संपूर्ण गाडीत आपल्या अवतीभवती पगडीधारी मंडळी. अशा स्थितीत रस्त्यातील पाट्या नि गुरुद्वारे न्याहाळत मी प्रवास चालू ठेवला. अमृतसर...नांदेडमध्ये पहिल्यांदा ब्रॉडगेज ही गाडी धावू लागली (आणि हा मोठा ऐतिहासिक क्षण होता बरं का) तेव्हापासून ज्या शहरास जाणारी वाट नित्य दिसायची तेच हे शहर. नांदेड स्थानकावरून मुंबई पाठोपाठ ज्या शहरासाठी लांब पल्ल्याची गाडी सुरू झाली ते हे शहर. सचखंड एक्स्प्रेसने येथे यायचे, हा मनसुबा ही गाडी सुरू होऊन वीस वर्षे होत आली तरी मनसुबाच राहिला होता. तो काही अंशी पूर्ण होण्याची वेळ आज आली होती.

अमृतसर येण्यापूर्वी एकामागोमाग शुभ्र झळाळत्या घुमटांचे गुरूद्वारे मागे क्षितीजावर दिसू लागले. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हवते गारवा होता आणि ओलाव्यामुळे या गुरुद्वाऱ्यांचे संगमरवरी पृष्ठभाग आणखीच उजळून निघत होते. अन् येथे काळ व वेळेचा गुंता निर्माण होऊ लागला. 'अॅन एरिया ऑफ डार्कनेस' या पुस्तकात सर व्हिवियन नायपॉल यांनी आपल्या जन्मगावाला भेट दिल्यानंतर अनेकदा काळ व वेळेची सरमिसळ झाल्याचा उल्लेख केला आहे. भारतीय खेड्यांमध्ये आपल्या पूर्वजांच्या गावांमध्ये नायपॉल यांना जन्मभूमीच्या, बालपणीच्या खाणाखुणा दिसत जातात आणि आपण कुठे आहोत, नक्की काळ कोणता आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात उमटत जातात.

इथे उलट घडत होते. जन्मगाव सुटल्यानंतर १९ वर्षांनी एका परक्या प्रदेशात एका व्यक्तीला त्याच्या जन्मगावाशी साधर्म्य सांगणारी परिचित दृश्ये दिसत होती आणि आपण नक्की कुठे आलो आहे, काळ पुढे गेला आहे का मागे गेला आहे, असे विचार मनात गर्दी करू लागले. खुद्द अमृतसरला आल्यानंतर तर अशा ओळखचिन्हांची गिरवणी सुरू झाली. नांदेडची आठवण करून देणारे तेच अरूंद रस्ते, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर तयार होणारे तेच डबके, तशाच पायरिक्षा, तोच गर्दी-गोंधळ आणि रस्त्यांच्या कडेने उघड्या हॉटेलांमधून येणारा तोच पराठा, भाजी व तंदुरी चिकनचा वास! खिशातील तिकिटे आणि खर्च झालेला पैसा यांची जाणीव होती म्हणून, नाही तर आपण परक्या प्रदेशात आलो आहोत, हे कोणी सांगूनही मी मान्य केले नसते.

Tuesday, May 5, 2015

घुमानच्या निमित्ताने – 2 ‘झेलम’मधील चर्चासत्र


Devidas0633
झेलमचा प्रवास मात्र मस्तच झाला. भोपाळ, ग्वाल्हेर, झाशी अशा मोक्याच्या स्थानकांवर गाडी दिवसा पोचली. त्यामुळे अवतीभवतीचा प्रदेश तर चांगला न्याहाळता आलाच, परंतु दररोज ये-जा करणाऱ्या ‘जिव्हाळ्या’च्या प्रवाशांच्या अनौपचारिक गप्पांमुळे बरीच मनोरंजक माहितीही मिळाली. भारतीय रेल्वेमध्ये बसायची जागा मिळाली, तर त्यासारखे प्रबोधन आणि मनोरंजन करणारे दुसरे साधन नाही, याची प्रचिती परत एकदा आली. सतत येणाऱ्या कंत्राटी फेरीवाल्यांकडून मधूनच चहा घ्यायचा आणि मस्त गप्पा ऐकायच्या. ही ‘चाय पे चर्चा’ आपल्याला एकदम शहाणी करून सोडते.

दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मागे टाकून गाडी परत उत्तर प्रदेशात आली होती. मथुरा पार पडले, की दिल्लीच्या हवेच्या वास यायला लागतो. उत्तर प्रदेशापासूनच गिलावा न केलेल्या उघड्या बांधकामांचे घर दिसायला लागतात. एरवीही संपूर्ण प्रदेशावर गरिबीचीच सावली दिसत राहते. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले दिसत होते. शेतात पिके होती परंतु पिकात जान दिसत नव्हती.

मध्य प्रदेशातील दातिया येथून ग्वाल्हेरपर्यंत आमच्या डब्यात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या एका गटाची चर्चा चांगलीच रंगली. राज्यातील भ्रष्टाचार, तरुणांमधील बेरोजगारी, ग्ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर अशा अनेक विषयांवर ते बोलत होते. मी सकाळी एक वर्तमानपत्र घेतले होते. पण संपूर्ण वृत्तपत्र वाचून जेवढी माहिती मिळाली, त्याच्या कित्येकपट जास्त माहिती त्या दीड दोन तासांच्या चर्चासत्रात मिळत गेली. शिवराज चौहान यांच्या स्वच्छ कारभाराच्या चकचकीत प्रतिमेवर त्यातून ओरखडे तर पडत होतेच, नव्या पिढीच्या भविष्याची चिंताही सतावत होती.

बच्चों को यहां नौकरी ही नहीं है, साब. हमारे गांव से गुजरात के लिए एक बस हर दिन भरकर निकलती है. अहमादाबाद और राजकोट में सब हमारे लड़के काम कर रहै है,” “हमारे गांव का एक लड़का पूना में पानीपुरी बेचता था. मैंने उसको देखा तो पूछा, ये क्या कर रहे हो. उसने बताया, साब हमने एक फ्लैट ले लिया है. अभी सोचो साब पंदरह साल पहले की बात है, आज उसकी क्या कमाई होगी. मुंबई, पूना में काम है कमाई है, हमारे यहां क्या रखा है,” ही त्यातील काही लक्षात राहिलेली वाक्ये.
त्याच्या पुढची हद्द आणखी पुढे होती.

हमारे गांव के तो कितने लोग महाराष्ट्र-गुजरात में सिक्युरिटी गार्ड का काम करते है,” एकाने सांगितले.

त्यावर दुसऱ्याने विचारले, “हां, और एक दो काण्ड भी करके आए थे ना वो.”

पहिल्याने सांगितले, “हां, किए थे ना.”

आपल्या राज्यातील सर्व भल्या-बुऱ्या गोष्टींची धुणी रेल्वे कपार्टमेंटमधील दोन बाकांवर समोरासमोर बसून ही बाबू मंडळी धूत होती. अन् त्या चर्चेत मी तर पडलोच नव्हतो. शेवटपर्यंत. त्यांच्या आपसातील चर्चेतूनच ही मौलिक माहिती मिळत होती. मी ही चर्चा कान देऊन ऐकत आहे, याची जाणीव असूनही त्यांच्यापैकी कोणी ती थांबविण्याचा किंवा तिला वळण देण्याचा प्रयत्न करत नव्हते. ही बाब मला मोठी लक्षणीय वाटली.

गाडीत पी. जी. वुडहाऊसचे 'स्मिथ दि जर्नलिस्ट' हे पुस्तक वाचून पूर्ण केले. आधी हे पुस्तक काहीसे वाचून झाले होते परंतु ते संपविण्यात यश आले ते या प्रवासात. महत्त्वाचे म्हणजे ते वाचले माझ्या मोबाईलवर.

Devidas0628
एरवी १४ तास, १७ तास अशा विलंबाचे छाती द़डपून टाकणारे आकडे नोंदवून झेलम एक्स्प्रेसने सर्वार्थाने आसेतू हिमाचल आपली दहशत निर्माण केली आहे. या गाडीची ही ख्याती ऐकून असल्यामुळे असावे कदाचित, गाडीने केवळ ४५ मिनिटांच्या उशीराने नवी दिल्ली स्थानकावर सोडले, याचे मोठेच कौतुक वाटले.

Friday, April 24, 2015

घुमानच्या निमित्ताने – 1 शुभास्ते पंथानः

When you return to a place after a long time, you realize how much you yourself have changed over the time – Nelson Mandela

पंजाबला कधीही गेलेलो नसलो तरी पंजाबी भाषा, पंजाबी संस्कृती आणि शीख पंथ हे माझ्यासाठी अपरिचित कधीही नव्हते. किंबहुना जन्मल्यापासून पंजाबी वातावरण मी अवतीभोवती पाहतच होतो. नांदेडचा असल्यामुळे गुरुद्वारा काय, अरदास किर्तन काय किंवा होला मोहल्ला काय, यांचे अप्रूप मला नव्हते. ते माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग तर होतेच, पण शीख वर्गमित्र, कुटुंबाचे शीख स्नेही यांच्यामुळे पंजाबीपणा हा माझ्या जाणिवेचा भागच होता. नांदेड सोडण्यापूर्वी एक दोन वर्षे, १९९६-९७ च्या दरम्यान, तर जवळ जवळ प्रत्येक दिवशी गुरुद्वारा हुजूर साहिब आणि गुरुद्वारा लंगर साहिब ही आमची हक्काची ठिकाणे होती. अठरा वर्षे पुण्यात राहिल्यामुळे ही जाणीव पुसट झाली होती. नंतर दक्षिण भारतीय संस्कृतीचा ध्यास लागल्यानंतर तर ही जाणीव अगदीच झिरझिरीत झाली. लुई टॉलस्टॉय यांच्या भाषेत सांगायचे, तर "एखाद्या खानावळीवरील जुन्या पाटीसारखी ती झाली होती. त्यावर काहीतरी लिहिले होते, हे समजत होत परंतु काय लिहिले आहे हे कळत नव्हते.”

त्यामुळे घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या साहित्य संमेलनाला जायचे हे जेव्हा नक्की झाले, त्यावेळी पहिल्यांदा माझी भावना नेल्सन मंडेला यांच्या वरील वाक्यासारखी होती. हा एक प्रकारचा शोधच होता. पुण्याहून झेलम एक्प्रेसने नवी दिल्लीला निघालो त्यावेळी तरी ही भावना अंधुक स्वरूपात होती. कारण नाही म्हटले तरी पंजाबचे भूदृश्य अनोळखी असल्याची भावना मनात होती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पूर्ण १९ वर्षांनी मी उत्तर भारतात जात होतो. मनमाड-भुसावळ आणि तेथून मध्यप्रदेश या मार्गावर एकेकाळी प्रवास केला होता. त्यावेळी निव्वळ भणंग म्हणून वाट मिळेल तिकडे मी भटकत होतो. आज २०१५ साली त्याच मार्गावरून जाताना माझ्या स्वतःमध्ये किती बदल झाला, याचीच चाचणी या प्रवासात होणार होती. किमान तशी व्हावी, ही अपेक्षा होती.

नाही म्हणायला गेल्या वर्षी दिल्लीची एक फेरी झाली होती. परंतु त्यात भोज्याला शिवून येण्यासारखा प्रकार होता. त्यात अनुभव घेणे, हा प्रकार फारसा झालाच नाही. या फेरीत मात्र अनुभवांची आराधना तेवढीच असणार होती. त्यामुळे या प्रवासाची असोशी अधिक होती.

Devidas0622 पुणे रे ल्वे स्थानकावर झेलम एक्प्रेसमध्ये बसलो ते या पार्श्वभूमीवर. गाडीत बसल्यावर आश्चर्याचा पहिला धक्का बसला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकातील घोषणांची अंमलबजावणी वेळेआधीच झालेली दिसली. वास्तविक अंदाजपत्रकातील घोषणा एक एप्रिलपासून अमलात येतात. परंतु ३१ मार्चलाच झेलम एक्स्प्रेसच्या शौचकूपात बायो टॉयोलेट बसविलेले होते. प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंगची सोय केलेली होती. इतकेच नाही तर वरच्या आसनावर जाण्यासाठी अधिक चांगल्या पायऱ्यांची सोय केलेली दिसली.

जातानाच पूर्णपणे स्वतंत्र गाडीने आणि स्वतंत्र मार्गाने जायचे, याचा निश्चय मी आधीच केला होता. त्यामुळे झाले काय, की वृत्तपत्रांतून ठळक घोषणा केलेल्या पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ऐन परीक्षेच्या काळात रेल्वेच्या डब्यात केलेल्या कवितांचे सादरीकरण, फ्लॉवर आणि टमाटे या झक्कास मिश्रण असलेल्या भाज्यांची मेजवानी अशा प्रक्षोभक मनोरंजनाला मी मुकलो. परंतु हाच निर्णय योग्य होता, हे घुमानला पोचल्यानंतर सिद्ध झाले. नवी दिल्ली, अमृतसर आणि घुमान अशी त्रिस्थळी यात्रा केल्यानंतर कळाले, की संयोजकांच्या सौजन्याने धावणारी ती गाडी वास्तवात धावलीच नाही. कण्हत-कुंथत साठ तास घेऊन ती गाडी अमृतसरला पोचेपर्यंत संमेलनाच्या उद्घाटनाची वेळ येऊन पोचली होती.

Sunday, March 8, 2015

शिवरायांची जयंती वाटेल तेव्हा पाहिजे!


१९ फेब्रुवारीला तारखेनुसार आणि ८ मार्च रोजी तिथीनुसार शिवजयंती आल्यामुळे महाराष्ट्रातील मावळ्यांना मोठाच उत्साह आला होता. त्यामुळे प्रत्येक शहराच्या रस्त्या-रस्त्यांवर तीन तीन जण बसून उलट्या बाजूने रस्त्यावरून दुचाकी नेणे काय, हातात शीतपेये वा बियरच्या बाटल्या आणि दुसऱ्या हातात तलवारी नाचविणे काय किंवा रस्त्याने मोठमोठ्याने ओरडत जाणे काय, अशा शौर्य दाखविणाऱ्या बाबींना उधाण आले होते.

टरा टरा आवाज करत जाणाऱ्या दुचाकी म्हणजे हिंदवी स्वराज्याचा जयघोषच होता जणू. ज्याचा आवाज जास्त त्याची शिवाजी भक्ती मोठी. शिवाय एखादी मुलगी किंवा मुलींचा घोळका जवळून जाऊ लागला, की या इतिहासप्रेमाला आणखी उधाण येणारच. त्यामुळे त्यावेळी दुचाकीच्या आवाजासह हॉर्नचा आवाजही वाढलाच पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्राच्या अस्मितेची जाणीव लोकांना कशी होईल.

शिवाय महाराजांनी कायद्यांचे पालन करावे, सौजन्याने वागावे अशी शिकवण दिलीही असेल कदाचित. पण ती पाळण्याची आता गरजच काय. हवे तेवढे प्रदूषण करा, हवे तेवढे आवाज काढा...सरकार आपलेच आहे. बजाते रहो! आणखी तुमचे शिवाजी अन् गणेशोत्सव मग आमचे बाबासाहेब, तुमचे बाबासाहेब तर आमचे परशुराम ही स्पर्धा आहेच. त्यांनाही बिचाऱ्यांना आपल्या भावनांचा निचरा करण्याची संधी मिळायला हवी. प्रत्येक महापुरुषाची जयंती आणि पुण्यतिथी शिमग्यासारखीच साजरी झाली पाहिजे, दिवाळीसारखी नव्हे! तरी बरे गणपती बाप्पांच्या जन्मतारखेचा काही वाद नाही.

तेव्हा महाराजांच्या नावाने हा जो गलका चालला होता, त्यामुळे त्यांना भरून आले असेल. ही भक्ती अशीच दाखवायची असेल, तर शिवरायांची जयंती केवळ दोनदा साजरी करून चालणार नाही. इंग्रजी तारीख आणि मराठी तिथी यासोबतच वारानुसारही जयंती साजरी करावी. शिवाय ग्रेगरीयन आणि रोमन कॅलेंडर वेगवेगळे असल्यामुळे त्यांनुसारही वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी करावी. म्हणजे डॉल्बी सिस्टम आणि भर रस्त्यात घातलेले मंडप यांच्या मदतीने आपण आपल्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देऊ शका. वर्षातून अनेकदा, वाटेल तेव्हा!