Saturday, June 7, 2008

पत्रकाराची प्रतिज्ञा

भारत माझा हल्ल्यांचा देश आहे. सारे हल्लेखोर भारतीय माझे बांधव आहेत. हल्ल्यांनंतर येणाऱया पुळचट प्रतिक्रियांवर माझे प्रेम आहे.

माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविध, तसेच वांरवार घडणाऱया हिंसक घटनांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा लक्ष्य होऊ नये, यासाठी मी प्रत्येक क्षणी देवाचा धावा करण्याचा सदैव प्रयत्न करीन.

मी माझ्या मालकांचा, राजकीय नेत्यांचा, पोलिस अधिकाऱयांचा व गावगुंडांचा नेहमी मान ठेवीन आणि त्यांच्याशी शक्य होईल तेवढे सौजन्याने वागेन.

माझ्या अवतीभवतीचे गुंड, समाजकंटक आणि टोळ्या यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी यांतच माझ्या जीवाचे सौख्य आणि संरक्षण सामावले आहे.