Thursday, March 18, 2010

काम करा, गाणी ऐका पण बोलू नका

KARUNANIDHIमहाराष्ट्रातील मराठी नेत्यांना, म्हणजे मराठी भाषेसाठी आग्रह धरा असं सांगणाऱ्या नेते अडचणीत आले किंवा त्यांचे युक्तिवाद खुंटले, की दक्षिणी राज्यांचे उदाहरण देण्याची त्यांची रीत आहे. दक्षिण भारतात  खासकरून तमिळनाडूत पाहा, कसा हिंदीला विरोध होतो, हे ते वारंवार सांगत असतात. मात्र हिंदीला विरोध करतानाच, हिंदी भाषकांना जी वागणूक दक्षिणेतील नेते किंवा एकूणच समाज देतो, ते अधूनमधून समोर येतं. का कोणास ठाऊक, आपल्याकडे या गोष्टींची चर्चा होत नाही.

आता करूणानिधींचंच घ्या ना. हिंदी आणि हिंदू विरोधावर कारकीर्द उभी करणाऱ्या करुणानिधींनी परवा हिंदी भाषक कामगारांना चेन्नईत जी जागा दाखवून दिली, ती अगदी दाद देण्यासारखीच होती. तमिळनाडू विधानसभेच्या नव्या इमारतीचे बांधकाम झाल्याबद्दल 15 मार्चला दहा हजार कामगारांना तमिळनाडू सरकारच्या खर्चाने जेवण देण्यात आले. मेजवानीच म्हणा ना. या कामगारांमध्ये बहुतांशी उत्तर भारतीय होते. त्यामुळेच या समारंभात हिंदी गाणीही लावण्यात आली होती. “हिंदू”चे संपादक एन. राम यांनी करुणानिधींना याबद्दल छेडले, तेव्हा एकाक्ष (व चाणाक्ष) कलैञर (करुणानिधींची तमिळ उपाधी) उत्तरले, की सगळ्या भाषकांनी मिळून मिसळून बोलले पाहिजे. त्यानंतरचं जे वाक्य ते बोलले ते अधिक महत्वाचे होते.

“या कामगारांना खाऊ द्या, हिंदी गाणी ऐकू द्या. पण तमिळनाडूत हिंदी बोलण्याची गरज नाही,” असॆ करुणानिधींनी जाहीर भाषणात  सांगितलं. (लिंक तमिळ भाषेतील दिली आहे मात्र त्याला इलाज नाही. दिनकरन या सन समुहाच्या पर्यायाने करुणानिधींच्याच वर्तमानपत्रात आलेलं हे जशास तसे भाषण आहे. हीच बातमी वेगळ्या स्वरूपात हिंदूत आली आहे. ) हिंदी वाहिन्या किंवा अन्य माध्यमांनी याकडे लक्ष न देणं समजता येईल. मात्र आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी किंवा माध्यमांचेही इकडे लक्ष गेलं नाही. “बिहार, ओरिसा यांसारख्या राज्यांतील लोकांनी ही इमारत उभी केली आहे. त्याबद्दल त्यांना आनंद झाल्यामुळे ते नाच-गाणे करत आहेत,” असं कलैञरांचं म्हणणं आहे.

त्यांची वाक्यं पाहा आणि ते किंवा तत्सम कुठे ऐकले आहेत का, जरा आठवून पाहा. करुणानिधींच्याच शब्दांतः एखादी भाषा सगळ्या भारतभर बोलली जाऊन त्यातून एका राज्याचा दुसऱ्या राज्याशी संपर्क होणे, यावर आमचा काही आक्षेप नाही. मात्र एखादी भाषा मोठी आणि अन्य भाषा दुय्यम ही भूमिका आम्हाला मान्य नाही. दुसऱ्या राज्यातून आलेले तुम्ही, आता मनाप्रमाणे आपल्या भाषेतील गाणी ऐकली. त्याचप्रमाणे तमिळ गाणी लागली तेव्हा त्याला आक्षेप घेतला नाही. असं एकमेकांशी एकोप्याने न वागता, एखाद्याने दुसऱ्याला वरचढ असल्याचे दाखवणे, याला आमचा विरोध आहे. (आणखी एकः हिंदी कामगारांसमोर भाषण मात्र तमिळमध्येच केलं कलैञरांनी! )

आपल्याकडे राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे काय सांगतात? मात्र त्यांच्याविरूद्ध काय गहजब झाला असता. करुणानिधींच्या भाषणाच्या दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी तिथेच होते. मात्र बिहारी लोकांच्या या  अपमानाचे वारे त्यांच्या कानावरूनही गेले नाही. अजापुत्रं बलीं दद्यात्, दुसरं काय?