Saturday, January 25, 2014

भ्रष्टाचार आणि 'आप'वर राष्ट्रपतींची टिप्पणी - एक नवा पायंडा

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणातून भ्रष्टाचाराच्या विरोधात केवळ स्पष्टोक्तीच केली असे नव्हे, तर त्यातून सरकारे कोसळतील, असा इशाराही दिला आहे. राष्ट्रपतींच्या बोजड भाषणांच्या परंपरेत हा एक वेगळा पायंडा आहे आणि त्याचे स्वागतच करावे लागेल.
भ्रष्टाचार हा असा कर्करोग आहे जो लोकशाहीला कमकुवत बनवतो तसेच आपल्याक राज्यांची पाळेमुळे पोकळ बनवतो. भारताचे नागरिक, क्रोधित आहेत तर त्यायचे कारण भ्रष्टाचार तसेच राष्ट्रीय साधनांचे नुकसान त्यांना दिसत आहे. जर सरकारांनी या त्रुटींचे निराकरण केले नाही तर मतदार सरकारांना खाली खेचतील,
असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे. देशातील सत्ताधारी यातून बोध घेतील, अशी शक्यता कमी असली, तरी देशाचा सर्वोच्च अधिकारी हे वक्तव्य करतो आणि तेही प्रजासत्ताक दिनासारख्या पवित्र दिवसाच्या पूर्वसंध्येला, ही खचितच महत्त्वाची बाब आहे. राष्ट्रपतींनी ‘आप’च्या नावाने निघालेल्या टोळीलाही जाता जाता टपली मारली, हे खूप बरे केले. ते म्हणाले, 
काही निराशावाद्यांनी लोकशाहीप्रती आपल्‍या कटिबध्‍दतेची खिल्‍ली उडवली असेल, मात्र जनतेने कधीही आपल्‍या लोकशाहीचा विश्‍वासघात केला नाही, जर कुठे काही त्रुटी असतील, तर त्‍या ज्‍यांनी इच्‍छा पूर्ण करण्‍याचा मार्ग म्‍हणून सत्‍तेचा मार्ग स्विकारला आहे त्‍यांच्‍यामुळे आहेत...याचप्रमाणे सार्वजनिक जीवनात वाढलेला पाखंडीपणाही धोकादायक आहे. निवडणूका कोणत्‍याही व्‍यक्‍तीला आभासाशी खेळण्‍याची परवानगी देत नाहीत. ज्‍या लोकांना मतदारांचा विश्‍वास हवा आहे, त्‍यांनी केवळ अशीच आश्‍वासने दिली पाहिजेत, जी पूर्ण होऊ शकतील. सरकार ही धर्मादाय संस्‍था नाही. लोकवादी अनागोंदी शासनाचा पर्याय असू शकत नाही. खोटया वचनांचा परिणाम अपेक्षाभंगात होतो, ज्‍यामुळे राग उफाळून येतो आणि स्‍वाभाविकपणे या रागाचे लक्ष्‍य असतेः सत्‍ताधारी पक्ष.

राष्ट्रपतींचे उरलेले भाषण नेहमीच्या चाकोरीतील होते, त्यात छोट्या राज्यांपासून दहशतवादासारखे अनेक विषय होते. वाचता येते आणि दूरचित्रवाणीवर दिसू लागले तेव्हापासूनच्या प्रत्येक राष्ट्रपतींना याच विषयावर वार्षिक प्रवचन देताना वाचले वा ऐकले आहे. त्यात काही नाविन्य नाही. ताज्या घडामोडींची बऱ्यापैकी दखल घेणारे हे भाषण म्हणून त्याची एवढीच दखल घेतलेली पुरे!