Tuesday, January 1, 2008

काही शुभेच्छा आणि काही संकल्प

शुभेच्छा...




...अन संकल्प
राखी सावंतचा संकल्प ः यंदा कोणत्याही वाहिनीवरील कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणार नाही. सह्याद्री वाहिनीवर राखीपौर्णिमेनिमित्त होणाऱया कार्यक्रमाचा अपवाद वगळता ती छोट्या पडद्यावर दिसणार नाही तसेच कोणत्याच वाहिनीवर आरोपही करणार नाही.

भारतीय क्रिकेट संघाचा संकल्प ः ऑस्ट्रेलियाशी ऑस्ट्रेलियातच काय, जगाच्या कुठल्याही खेळपट्टीवर दोन हात करून त्यांचा पराभव आम्ही करू, हे केवळ तोंडानेच म्हणणार नाही तर कृतीतूनही सिद्ध करू.

नारायण राणे यांचा संकल्प ः मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदात काडीचाही रस नसून केवळ मराठी जनेतेची सेवा करण्यातच मी माझी हयात खर्च करणार आहे, अशी घोषणा करेन. विशेष म्हणजे त्या घोषणेवर किमान चार आठवडे अंमलही करेन.

गोपीनाथ मुंडे यांचा संकल्प ः या सरकारला सत्तेवर राहण्याचा कुठलाही अधिकार उरलेला नाही, हे वाक्य वर्षभरात तोंडातून चुकूनही काढणार नाही.

मराठी कलावंतांचा संकल्प ः तीस-चाळीस वर्षांपूर्वीच्या गाण्यांचेच कार्यक्रम करण्याऐवजी लोकप्रिय होतील असे गाणे रचून तेच सादर करू.मराठी चित्रपट निर्मात्यांचा संकल्प ः नवीन मराठी चित्रपट मुंबईसह महाराष्ट्रात एकाचवेळेस प्रदर्शित करू. त्यांच्या कथा जुन्या हिंदी चित्रपटांवरून घेतलेल्या नसतील आणि माझी विनंती आहे, की या चित्रपटांना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, अशी दिग्दर्शक-कलावंतांना विनंती न करण्यास लावणार नाही. तरीही हे चित्रपट धो-धो चालवू.

मराठी साहित्यिकांचा संकल्प ः साहित्य हे संमेलन (मेळावा) घेऊन वाद घालण्यासाठी नसून वाचकांना मिळतील, परवडतील आणि वाचावीशी वाटतील अशी पुस्तके लिहिण्यासाठी आहे, हे एकमताने मान्य करू. म. द. हातकंणगलेकर यांच्या समीक्षेची लंडनच्या गल्लीगल्लीतही सटीप चर्चा चालू असते, असे मीना प्रभू यांच्याकडून वदवून घेऊ. त्यानंतर सहा महिन्यांनी प्रभू यांच्या लिखाणात ग्लोबल लोकमान्यता मिळविण्यासाठीचे गुण असतील, अशी कबुली हातकणंगलेकर यांच्याकडून घेऊ. विशेष म्हणजे केवळ या दोघांच्या मतांनाच किंमत देण्यात येत आहे, असा सूर अन्य उमेदवारही काढणार नाहीत.

मराठी जनतेचा संकल्प ः आणखी एक दोन मराठी व्यक्ती आंतरराष्ट्रीय बँका आणि कंपन्यांच्या प्रमुखपदी विराजमान झाले तरी त्यामुळे मराठी अस्मिता धोक्यात आल्याचे कोणालाही वाटणार नाही. तसेच त्या व्यक्तींचे अभिनंदन करतानाच ब्रेन ड्रेनमुळे भारताचे नुकसान कसे होते, यावरही कोणी प्रवचन देणार नाही. परप्रांतीय लोकांविरोधात कितीही बोंबाबोब केली तरी आपण स्वतः काम करणे, हाच त्यावर उपाय असल्याचे मराठी लोकांना कळून येईल. काही मराठी व्यक्ती अगदी परप्रांतांत जाऊनही नोकरी-व्यवसाय करण्याचा निर्धार करून तो पाळतीलही.

मराठी वृत्तपत्रांचा संकल्प ः पाकिस्तानशी मैत्री, विश्वबंधुत्व या गोष्टी कितीही चांगल्या असल्या तरी त्यासाठी महाराष्ट्रातील मराठी जनतेने जीवंत राहिले पाहिजे, हे जाणून घेऊ. त्यानुसार धोरणात बदल करू.
कंपन्यांचा संकल्प ः आता कोणतीही मराठी वृत्तवाहिनी सुरू होणार नाही व त्यावर चार तास बातम्या आणि बाकीचे वीस तास बॉलिवूडचे लफडे, भविष्यकथन, हेल्थ टिप्स अशा वायफळ गोष्टींवर खर्च करणार नाही.
----------

No comments:

Post a Comment