Saturday, November 22, 2008

गर्व से कहो अतिरेकी है

सुमारे महिनाभर झाला असेल. आमची तबियत बहोत खुश आहे. काय आहे, की फुसके बॉम्ब करू नका अशी समज खुद्द शिवसेनाप्रमुखांनी दिल्यानंतर देशात माणसांना मारण्यासाठी बॉम्बनामक अस्त्रे वापरण्याची खुबी हिंदुनीही उचलल्याची खात्री आताशा होऊ लागली आहे. हिंस्रपणात मागे राहण्याची जी खंत एवढे दिवस आम्हाला लागून राहिली होती, तिची जागा अभिमानाने घेतली आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे, शांतता आणि सबुरी पाळण्याची शिकवण सतत ऐकत राहण्याची आता आपल्याला गरज राहिली नाही. आता अन्यधर्मीयांनाही ते ऐकावे लागणार.

म्हणजे बघा, की आताआतापर्यंत काय व्हायचं की कुठेतरी एखादा फटाका उडावा तसा बॉंब फुटायचा अन लगेच सगळीकडे बोंबाबोंब व्हायची. पोलिस कुठेतरी एक-दोघांना उचलायचे. ते नेमके मुस्लिम निघाल्याने पुढील कारवाई काय करायची याची चिंता सरकारला लागायची. (जे बॉंब फोडल्याशिवाय जागचे सरकत नाही, ते सरकार अशी सरकारची अलिकडची व्याख्या आहे.) मग सरकार हिंदु आणि तत्सम बुळबुळीत धर्मीयांना शांतता आणि सलोखा बाळगण्याचा शहजोग सल्ला द्यायचे.
आता मात्र ती परिस्थिती पालटली. आता हिंदुंचे स्वतःचे दहशतवादी तयार झाले आहेत. आता हे पहिल्या पिढीचे दहशतवादी असल्याने फक्त सायकल किंवा मोटारसायकलींचे तुकडे करणे, एक दोन लोकं मारणे असे किरकोळ प्रकार चालू आहेत. थोड्याच काळात मात्र आपल्या या अतिरेकी बंधुंच्या कौशल्यात बऱयापैकी सुधारणा होणार आणि फुल फ्लेज्ड् दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते सराईत होतील याची आम्हाला शंका नाही.

बाकी हिंदु दहशतवाद्यांची उपद्रवक्षमता काहीशी वादग्रस्त असली तरी त्यांची दखल मात्र अगदी व्यावसायिक दहशतवाद्यांसारखी घेतली जात आहे. आता हेच बघा ना, कोणत्याही घटनेत एखाद्या संशयिताला पकडला, की कशा त्यांच्या शेजाऱयांच्या नाही हो, आम्हाला कधी वाटलंच नाही तो असं काही करत असेल म्हणून, या छापाच्या बातम्या येतात. तो संशयित शाळेत असताना कसा कुशाग्र विद्यार्थी होता, सोसायटीत सगळ्यांना मदत करायचा वगैरै कहाण्या येऊ लागतात. आपल्या हिंदु अतिरेकींबाबतच्या अशा अनेक कथा येऊ लागल्या आहेत. म्हणजे काय, भर रस्त्यातून येता जाता तो ओरडून सांगायचा की मी अतिरेकी आहे, मी अतिरेकी आहे असं अजूनतरी कोणी म्हणालेले नाही, याचा अर्थ आपले अतिरेकी योग्य मार्गावरून जात आहेत.

हिंदु लोकांनी असेच नवनवीन बॉम्बस्फोट घडवून आणले, की मग त्यांनाही आपले खरे जीवन दहा अकरा शतकांपूर्वीच्या कल्पनांनुसार चालवायला हवे, असा साक्षात्कार होईल. पुराणातील कायदे हेच जगाचा उद्धार करू शकतील, हे दाखवून देण्यासाठी हिंदु अतिरेकीही वेबसाईट, ब्लॉग अशा अत्याधुनिक साधनांचा वापर करू लागतील. त्यांचा उद्देश माणसं मारण्याचा नव्हता तर ते गरीब आहेत आणि नोकरी धंदा नसल्याने टाईमपास म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगायला अनेक राजकारणी पुढे येऊ लागतील. मग आधी मुळात दहशतवाद्यांना पकडू न शकलेले आणि पकडलेल्यांना शिक्षा न देऊ शकलेले सरकार लोकांना (म्हणजे स्फोटात मरणे शक्य न झालेल्यांना) शांतता पाळण्याचे आवाहन करू शकेल. त्यामुळेच म्हणा, गर्व से कहो अतिरेकी है.

No comments:

Post a Comment