Friday, April 25, 2014

इस थप्पड का कव्हरेज...

निवडणुकांचा मोसम होता. मोदी विरुद्ध इतर सर्व (होय, अगदी भाजपच्या मंडळीसहित) असा छान सामना रंगला होता. फक्त एकच रुखरुख लागली होती. बातम्यांच्या थंड्या हंगामात ज्याने तमाम चॅनेले आणि छापेवाल्यांना रोजगार पुरवला, त्या आम मीडिया पक्ष, छे छे, आम आदमी पक्षाचे कोणीही नाव घेत नव्हते. दिल्लीची (धाकली) गादी केवळ जनतेच्या भल्यासाठी सोडणाऱ्या या पक्षाच्या नेत्याला आठ-आठ दिवस दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून गायब केल्याने सर्वसामान्य जनतेचे भले साधण्याचा दुसरा मार्गच त्याला सापडत नव्हता.

अशात एक घटना घडली. लाली नावाच्या कोणा ऑटो रिक्षाचालकाने मिरवणुकीत येऊन अरविंद केजरीवालांना हार घातला आणि त्यानंतर सणसणीत वाजवली. एवढी सणसणीत की त्यामुळे त्यांचा चेहरा सुजला. ही थप्पड केवळ केजरीवालांवर नव्हती, ती होती तमाम कॅमेरेवाले आणि लेखणीवाल्यांना. प्रजासत्ताक भारतात क्रांती करू पाहणाऱ्या एका होतकरू युगपुरुषाकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची प्राज्ञा तरी कशी झाली. साहजिकच या थपडीमुळे सर्व माध्यमीय मंडळी खडबडून जागी झाली आणि पुन्हा एकवार केजरीवाल व त्यांच्या कोंडाळ्यावर लेन्सा केंद्रित झाल्या.

वास्तविक केजरीवालांसाठी चपराक खाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. राजकारणाचे त्यांचे मनसुबे पाहून अण्णांनी खडे बोल सुनावले तेव्हा, मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर लोकांनी केलेल्या टिकेच्या वेळेस अशा लाक्षणिक थपडा त्यांना कितीतरी वेळी बसल्या. मात्र, त्याही पलीकडे प्रत्यक्ष थपडा किती खाव्या लागल्या, याचीही स्वतंत्र गणती करावी लागेल. असो.

(लोकसत्ता.कॉमवरील सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)


4 comments:

  1. आता थपडांचे पण फिक्सिंग का?

    ReplyDelete
  2. एकूणात दिसते तर तस. आपचे राजकारण ज्या पद्धतीने चालले आहे त्यात त्यांना हा एकमेव मार्ग दिसतो.
    एक प्रश्न आहे. केजरीवालांवर दरवेळी हल्ला होतो तेव्हा त्या व्यक्तीला आजूबाजूचे कार्यकर्ते यथेच्छ चोप देतात. मग केजरीवाल किंवा अन्य मंडळी महात्मा गांधींच्या नावाने अहिंसेची साक्ष काढतात. पण त्या व्यक्तीला कोणीही पोलिसांत घेऊन जात नाही. अगदी नेलेच तरी योगेंद्र यादवांसारखे लोक तक्रार मागे घेऊन त्यांना पोलिसांतून सोडवून आणतात. का?

    ReplyDelete
  3. एकूणात दिसते तर तस. आपचे राजकारण ज्या पद्धतीने चालले आहे त्यात त्यांना हा एकमेव मार्ग दिसतो.
    एक प्रश्न आहे. केजरीवालांवर दरवेळी हल्ला होतो तेव्हा त्या व्यक्तीला आजूबाजूचे कार्यकर्ते यथेच्छ चोप देतात. मग केजरीवाल किंवा अन्य मंडळी महात्मा गांधींच्या नावाने अहिंसेची साक्ष काढतात. पण त्या व्यक्तीला कोणीही पोलिसांत घेऊन जात नाही. अगदी नेलेच तरी योगेंद्र यादवांसारखे लोक तक्रार मागे घेऊन त्यांना पोलिसांतून सोडवून आणतात. का?

    ReplyDelete