Tuesday, January 2, 2018

गुजराती प्रयोगशाळेचा ‘मेवा'(णी)

गुजरात हे राज्य हिंदुत्वाची प्रयोगशाळा म्हणून ओळखले जाते. हिंदुत्वाची प्रयोगशाळा होते तोपर्यंत तेथे उत्तम रस्ते, चोवीस तास वीज, पाणी, फ्लायओव्हर अशा गोष्टी होत होत्या. पण 12 वर्षे तेथे राज्य केल्यानंतर नरेंद्र मोदी उत्तरेकडे सरकले आणि दिल्लीत स्थानापन्न झाले. मग शिक्षक वर्गातून गेल्यानंतर पुढचे शिक्षक येईपर्यंत वांड मुलांनी गोंधळ घालावा, तसे जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांसारख्यांना रान मोकळे मिळाले. मग एक नवीन प्रयोग गुजरातमध्ये सुरू झाला – फाटाफुटीचा, विद्वेषाचा आणि घडवून आणलेल्या उद्रेकाचा.


याची सुरूवात गुजरातमध्ये ऊनात दलितांना मारहाण करून झाले. त्यावेळी त्या प्रकरणात काँग्रेसच्या स्थानिक लोकांचा संबंध असल्याच्या चर्चा होत्या. पण त्याचे बिल भाजप आणि मोदींच्या नावावर फाडून झाले. त्याचा यथावकाश परतावा मेवाणीला आमदारकीच्या रूपाने मिळाला.


याच प्रयोगाची फळे आता कोरेगाव भीमामध्ये दिसू लागली आहेत. वास्तविक ही फळे दिसावी, यासाठी गेले काही दिवस जाणीवपूर्वक प्रयत्न केले जाते होते. खाजवून खरूज काढावी, तशी मुद्दाम चिथावणी दिली जात होती. मेवाणीला शनिवारवाड्यावर बोलावणे, त्याच्यासोबत मौलानाला बसवणे, ब्राह्मणांच्या नावाने गरळ ओकणे हे सगळे उद्योग त्यासाठीच चालू होते.


नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा संशय असलेला “कबीर कला मंच’ शनिवारवाड्यावरच्या एल्गार परिषदेत पुढे होता. या मंचाच्या सदस्यांनी सादर केलेल्या नाटिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करण्यात आली. त्यानंतर प्रत्यक्ष या ‘विजयस्तंभा’च्या ठिकाणी काही तरी घडावे, असा प्रयत्न चालू होता.


त्यासाठी वढू गावातील शूरवीर गोविंद गायकवाड यांच्या समाधीची काही अज्ञातांनी तोडफोड केली. त्याबद्दल येथे झालेला वाद मिटलेला होता. तरीही तो उकरून काढण्यात आला. त्याचेच पर्यवसान पुणे-नगर महामार्गावरील दगडफेक आणि जाळपोळीत झाले. त्यात पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. आता या दगडफेक आणि हिंसाचारामुळे स्थानिक लोकांमध्ये कोरेगावला जाणाऱ्या दलितांबद्दल आकस आणि त्यांच्या मनात दलितांबद्दल अप्रीतीही निर्माण होणार! पण इकडे मेवाणी आणि त्याच्या कंपूचा हेतू साध्य होणार कारण दलित – मराठ्यांमध्ये बेबनाव झाला तरी उमर खालिद व मौलाना अजहरी हे मात्र दलितांसाठी जवळचे ठरणार. हाच यांचा डाव आहे.


दलित कार्यकर्त्यांवरील हल्ला हा दलित आणि मराठा संघर्ष पेटविण्याचा षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी केला आहे, त्यात म्हणूनच तथ्य आहे. अन् इथून पुढे प्रत्येक पाऊल सावधपणेच टाकावे लागणार आहे. ‘पेशवाई’ मसणात घालण्यासाठी हे लोक संपूर्ण समाजाचेच स्मशान करण्यासही मागे-पुढे पाहणार नाहीत.

No comments:

Post a Comment