Monday, June 8, 2015

पीत पुरोगाम्यांनी जात दाखवली!

महाराष्ट्रातील (कु)प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी नामक कोणा व्यक्तीमधील संभाषण सध्या व्हाटस अॅप, फेसबुक आणि ट्विटरवरून गाजत आहे. वागळेंनी ब्राह्मण जातीतील लोकांना 'ठोक के भाव' में खूनी आणि दंगेखोर ठरवून टाकल्याचे या संभाषणातून दिसत आहे. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आधार घेत वागळेंनी मनातील (बहुतांश) सगळी गरळ ओकली असल्याचे कोणालाही ही ध्वनिफीत ऐकल्यावर वाटेल. मोदी सरकार आल्यापासून समस्त पीत पुरोगाम्यांचा झालेला कोंडमारा आणि या सरकारमुळे (किंवा हिंदुत्ववाद्यांमुळे) आपल्याला बेकार व्हावे लागले, या वैफल्यातून कदाचित वागळेंनी 'पॉईंट ब्लँक'वरून शूट केला असावा. यातील वागळेंची ख्याती अलम जगाला माहीती आहे तर हे अनिरुद्ध जोशी कोण, काळे की गोरे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वागळेंच्या या समाजवादी बहादुरीची 'मी मराठी' नावाच्या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर यांनी पाठराखण केली आहे. याच वाहिनीवरून वागळेंचा कार्यक्रम प्रसारित होत असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे जीवन समृद्ध केलं, तर त्यात कोणाला काही वावगे वाटायचे नाही. प्रामाणिकपणाची कमाई आणि पाठराखण ही नेहमीच कौतुकास्पद असते. ब्राहण जात आणि ब्राह्मणी मनोवृत्ती या वेगळ्या आहेत, अशी मखलाशी आंबेकरांनी केली आहे. अरे बाबा, पण वागळे त्यात चक्क 'तुम्ही भटांनी, तुम्ही ब्राह्मणांनी' असे शब्द पेरतो, त्याचे काय?

वागळेंच्या प्रामाणिकपणाबद्दल भाऊ तोरसेकरांसारख्या ज्येष्ठ आणि वागळेंच्या समकालीन पत्रकाराने पुरेसे पुरावे दिलेच आहेत. त्यातून त्यांच्या चारित्र्यावर झक्क उजेड पडतो. चार वर्षे ज्या दर्डा शेठचा पगार खाल्ला, त्यांनीच कामावरून कमी केल्यानंतर ट्वीटरवरून शिव्या घालताना वागळ्यांची जीभ सैलावते. दर्डा हे कोळसा गैरव्यवहारातील आरोपी आहेत, हे यांना आधी माहीत नव्हते का? की केवळ 2014 च्या जून महिन्यांनंतरच हा साक्षात्कार झाला. गुटख्याच्या निर्मात्यांकडून स्वतःच्या पुस्तकाला प्रायोजकत्व मिळवून आपण समाजासाठी काहीतरी भव्यदिव्य केले आहे, अशी फुशारकी मिरविणारे हे पत्रकार.

 

A Police Complaint has been Lodged against Nikhil Wagle for inciting communal hatred @Dev_Fadnavis Plz take Action? pic.twitter.com/ZdwaPkWtT4

— Chandrabhushan Joshi (@MatruBhakt) June 7, 2015

अनिरुद्ध जोशींच्या संभाषणातून वागळेंनी ब्राह्मण जातीवर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत, त्या त्यांनाच लखलाभ. पण त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू (आणि नव्याने कळलेले पेरियार! तेच ते, "तमिळनाडू हा स्वतंत्र देश आहे, सगळे हिंदी भाषक आणि तमिळ भाषक ब्राह्मण हे सैतानाचा अवतार असून त्यांचे शिरकाण करावे,” असे विचार मांडणारे पेरियार!) यांचे नाव घेऊन हे कृत्य केले आहे, ते जास्त धोकादायक आहे. आंबेडकरवादी, दलित संघटना आणि कोणत्याही प्रागतिक विचाराच्या व्यक्तीने याचा निषेध करायलाच पाहिजे. कारण बाबासाहेब आम्हीही वाचले आहेत आणि त्यांच्या विचारावर आमची श्रद्धाही आहे.

'कुठल्याही व्यक्तीचे चारित्र्य किंवा गुण हे तो कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मला यांवर आधारित नसून तो काय करतो, त्याचे विचार काय आहेत, यावर ठरतात,' ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे, असे वाटते. याच्या उलट व्यक्तीला जन्मजात गुण, दोष किंवा योग्यता चिकटविणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एखाद्या वंचित गटातील व्यक्तीचे आई-वडिल निरक्षर आहेत म्हणून ती व्यक्तीही शिकण्यास किंवा इतरांच्या बरोबरीने समाजात भाग घेण्यास नालायक आहे, हे मानणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका ब्राह्मण व्यक्तीने म. गांधींना मारले म्हणून सगळ्या ब्राह्मणांच्या संपत्तीला आगी लावणे, त्यांना जीवे मारणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका शीखाने इंदिरा गांधींना मारले म्हणून सगळ्या शिखांचे शिरकाण करायला निघणे, ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. या उलट प्रत्येक व्यक्तीशी व्यक्ती म्हणून वागणे, हा आंबेडकरवादी विचार आहे.

कुठल्या तरी प्रसंगात ब्राह्मण दोषी आढळला, म्हणून जोशी यांना गृहित धरून वागळे जेव्हा सगळ्या ब्राह्मण जातीला आरोपी बनवितात (पिंजऱ्यात उभे करतात नव्हे!) तेव्हा निखिल वागळे नावाचा एक महाभंपक इसम बाबासाहेबांच्या नव्हे तर ब्राह्मणी विचारांच्या मार्गाने जातो. म्हणून दलित संघटनांनी ताबडतोब त्यांच्यापासून दूर व्हावे. जोशी हे नाव गैर-ब्राह्मणांमध्येही असते हे वागळ्यांना माहीत असायला पाहिजे. आणि तेवढेच असेल तर गेल्या पाच वर्षांतील अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंद झालेल्या किती प्रकरणांचे आरोपी ब्राह्मण जातीतील आहेत, हे 'आमच्यामुळे झाला, आमचा इम्पॅक्ट' असं जेव्हा तेव्हा छाती पिटून सांगणाऱ्या 'मी मराठी' वाहिनीने शोध करून सांगावे.

खरं पाहिलं तर निखिल वागळे आणि अरविंद केजरीवाल या दोन इसमांची कारकीर्द एकाच गोष्टीवर उभी आहे - लोकांना चिथावून मारहाण करायला लावायची आणि बघा, मी कसा अत्याचाराला बळी पडलोय याची जाहिरातबाजी करायची. (समानशीलेषु सख्यम). जेव्हा जेव्हा वृत्तपत्र चालत नाही, नोकरी सुटलेली असते किंवा आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसते तेव्हा वागळेंना कोणाची तरी छेड काढून मोठे व्हायची तल्लफ येते. बरे, जेव्हा शिवसैनिक मारायला येतात तेव्हा 'मला मारू नका, मी हर्ट पेशंट आहे' असा कांगावाही करता येतो.

जोशींशी बोलताना मी धर्मांतर करीन, अशी धमकी वागळे देताना ऐकू येते. असल्या दांभिकांच्या धर्मांतराची काय पर्वा बाळगायची? बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्याला नैतिक अधिष्ठान होते, एक तपश्चर्या होती. त्यांच्याकडे बोट दाखवून कोणीही दुकानदार करू पाहत असेल तर त्याला खुशाल जाऊ द्यावे. प्रासादशिखरस्थो ऽपि काको न गरुडायते (राजमहालावर बसल्याने कावळ्याचा गरूड होत नाही).

वारुणी आणि तरुणी यांचा आस्वाद घेत दलित, शोषितांच्या नावाने बाळंतकळा दाखविणाऱ्या झोळीवाल्यांचे एक पीक गेल्या पन्नासेक वर्षांत फोफावले आहे. याचे उदाहरण म्हणजे सध्या गजाआड असलेला तरुण तेजपाल. हाही असाच समाजाचा सगळा व्यभिचार मीच झाडून काढणार, अशा तोऱ्यात सफाई अभियान करायचा. (याच तहलका आणि तेजपालाच्या प्रत्येक ट्वीटला रिट्वीव करण्याचा पूर्णवेळ उद्योग वागळे करायचे, हे येथे नोंदण्याजोगे). यथावकाश त्याच्या लीला उजेडात आल्या, अन् तेही धर्मांध, प्रतिगामी व फॅसिस्ट सरकार सत्तेत नसताना, आणि तहलका काहीसा हलका झाला. परंतु याच पंथातील आणखी काही मंडळी आपल्या मार्गावरून ढळली नव्हती. माकडांनी एकमेकांनी पाठ खाजवावी, तसे एकमेकांची स्तुती करून मोठे करायचे आणि गरिबांच्या दुखण्यावर आपल्या पोतड्या भरायचा, हा यांचा उद्योग. विशेष म्हणजे या पंथातही ब्राह्मण जातीतील लोकांचीच संख्या जास्त असते.

दारु पिताना तोंडी लावायला खारे शेंगदाणे तोंडात टाकावेत तशी ही मंडळी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहूंची नावे घेणार आणि आपली समाजवादी दुकाने चालविणार, असा हा प्रकार होता.

गेल्या पन्नासेक वर्षांत म्हणायचे कारण म्हणजे त्यापूर्वी जी मंडळी होती ती अस्सल समाजवादी होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सचोटी होती. साने गुरूजी आणि ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या समाजवाद्यांकडे त्याग होता, प्रामाणिकपणा होता. समाजवादाच्या नावाखाली दाढी वाढवून आपली दुकाने मांडणारी वागळेंसारखी पिढी तेव्हा नव्हती किंवा असली तरी कमी प्रमाणात होती. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना मान मिळतो हे पाहिल्यानंतर केवळ संस्कृत पोपटपंची करून पोटार्थी भटांची जशी पूर्वी पैदास झाली तशी अलीकडे समता, बंधुता वगैरे बडबड करून तुंबड्या भरणारी एक जमात उगवली आहे. तीच पीत पुरोगाम्यांची जमात. सवंग, नाटक्या आणि पोकळ पुरोगाम्यांची जमात.

जोपर्यंत वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी ही माध्यमे मूठभर कम्युनिष्ट आणि पीत पुरोगाम्यांच्या ताब्यात होती, तेव्हा यांचे चांगले चालले होते. वाचक-प्रेक्षकांकडे त्यांना आव्हान देण्यासाठी काही साधनेच नव्हती. मात्र आंतरजालाच्या प्रसारामुळे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची सोय झाली आणि यांच्या पोटात मुरडा आला. तुम्ही जे बोलताय, त्यामागे तर्क काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या. त्यात यांच्या आक्रस्ताळी, एकांगी आणि अतार्किक वागण्यामुळे आपल्या ब्रँडला धोका पोचतो, हे कळाल्यावर वागळे-केतकर-राजदीप संप्रदायाला त्यांच्या त्यांच्या मालकांकडून नारळ मिळाले. (अंबानींनी काढल्यानंतर वागळेंना कोणीही घेतले नाही, हे सूचक होते.) पण हे सर्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षामुळेच घडल्याचा समज वागळेंचा झाला. आताच दर्डा शेठच्या मदतीने नवीन चॅनल काढून परत हातवारे करायला मिळणार, असा मनसुबा चालला होता. पण तोही फिसकटला आणि प्रसिद्धीला चटावलेल्या या पीत पुरोगाम्याने जोशीच्या निमित्ताने आपली 'जात' दाखवली.

(निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या संभाषणाची हीच ती ध्वनिफीत - https://t.co/Mx7BOxklCi)

18 comments:

  1. धन्यवाद, विद्याधर. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  2. खूप खूप धन्यवाद, अमोल.

    ReplyDelete
  3. धन्यवाद, दीपकजी. तुम्हाला बरे वाटले, आनंद वाटला.

    ReplyDelete
  4. Nice counter argument, keep it up DD !

    ReplyDelete
  5. आभारी आहे, हृषिकेशजी. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

    ReplyDelete
  6. पुरोगामी का झोडपले जातात? या विषयावर एकदा कुणी पुस्तिका लिहिली पाहिजे

    ReplyDelete
  7. http://www.aisiakshare.com/node/3361 अब्राह्मणी प्रबोधनाला पर्याय नाही. प्रा प्रतिमा परदेशी

    ReplyDelete
  8. निखिल वागळे हा मनुष्य विक्षिप्त असल्याने त्याला जर भडकवले तर त्याचा तोल ढळू शकतो. मग त्याचे भांडवल करता येते. माणसाचे सर्व गुण अवगुणाला तो अपवाद नाही.

    ReplyDelete
  9. "मला चळवळींमधे तसेच आंतरजालावर काही ठिकाणी एक गोष्ट जाणवली. जातीअंताच्या लढ्या ऐवजी जातीय अस्मितेचच राजकारण होताना दिसते आहे.अनेक बुद्धीदांडगे जातीय दरी कमी करण्याऐवजी विश्लेषणाच्या बहाण्यातून जातीय त्वेष व द्वेष फुलत राहतील याचीच व्यवस्था करतात. तरुणांची माथी सतत भडकत राहतील याची व्यवस्था करतात.विवेकी व विचारी अशी भूमिका कुणी घेतली वा घेण्याचा प्रयत्न केला कि त्याला 'भटाळला' विचारांचे बामनी करण झाले अशी दूषणॆ द्यायला सुरवात करतात. असो. विवेक व विद्रोह हे एका ठिकाणी नांदत नाही".
    आमचा विरोध ब्राह्मणांना नसून ब्राह्मण्याला आहे ही शब्दरचना तर मी कित्येक वर्षे ऐकतो आहे. यात ब्राह्मण्य म्हणजे काय तर अज्ञानाचा फायदा घेउन केलेले शोषण, समाजात जेजे काही विषमता पसरवणारे आहे ते म्हणजे ब्राह्मण्य. अन्यायाचे जे समर्थन करते ते ब्राह्मण्य.जे जे सकल कुटील ते ब्राह्मण्य. असा तो ब्राह्मण्याचा अर्थ अभिप्रेत आहे. सहवेदनेचा विचार तुम्ही मांडलात की त्याला ब्राह्मणी कावा म्हणतात. अंनिस चे नरेंद्र दाभोलकर देखील या आरोपातून सुटले नाहित. त्यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाच्या मनोगतात पान ७ वर वाचा.http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?

    ReplyDelete
  10. खरं आहे. पुरोगामी म्हणजे ढोंग असा अर्थ आणून ठेवला आहे या लोकांनी. रावसाहेब कसबे यांच्यासारखे विचारवंतही आता असे बोलू लागले आहेत. ब्राह्मणांनी ढोंगाच्या आधारावर शोषणाची आपली व्यवस्था उभी केली तसेच हे करत आहेत.

    ReplyDelete
  11. nice article..! hats off..!

    ReplyDelete
  12. हे म्हणजे 'जाने दो पियेला है' असे म्हणण्यासारखे है. 'आपल्याकडे सभ्य संवाद होत नाही, वैचारिक आदान प्रदान होत नाही' असे उठता बसता म्हणायचे आणि स्वत: तोंडाचा पट्टा वाटेल तसा सोडायचा. लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: कोरडा पाषाण...

    ReplyDelete
  13. सर एकदम छान
    गरज होती या टोल्याची

    ReplyDelete
  14. धन्यवाद, मुकेश. वाचत राहा आणि प्रतिक्रिया देत रहा.

    ReplyDelete