Tuesday, September 2, 2008

विंचूरकर वाड्याची दुरवस्था

वघ्या महाराष्ट्रात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. उत्साहाच्या या काळात, ज्या ठिकाणी या उत्सवाने बाळसे धरले, जेथे तो वाढला ती जागा मात्र आज दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाची बळी ठरत आहे. बहुतेकांना तर या जागेचे महत्त्वही माहित नाही. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली ही वास्तु अगदी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहे.

विंचूरकर वाडा ही तशी पेशवेकालीन वास्तु. पेशव्यांच्या सरदारांपैकी असलेले विठ्ठ्ल शिवदेव यांनी बांधलेला हा वाडा सुमारे १६,००० चौ। फुट आकाराचा आहे. लोकमान्य टिळक येथे १८९२ पासून १९०७ पर्यंत राहत होते. याच काळात लोकमान्यांनी १८९४ साली पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. लोकमान्यांच्याही आधी भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गणपतीची स्थापनी केली होती. मात्र त्याला सार्वजनिक आणि सुसंगत रूप मिळाले लोकमान्यांमुळे. त्यावेळी लोकमान्य टिळक कायद्याच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत असत. त्यामुळे या गणपतीला 'लॉ क्लासचा गणपती' म्हणून ओळखले जात असे. लोकमान्य गायकवाड वाड्यात जाईपर्यंत येथेच सार्वजनिक गणपती बसत असे.

आज मात्र हा वाडा अगदीच दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राचे घोषणाशूर गॄहमंत्री आर। आर. पाटील यांनी या वाड्याला भेट दिली होती. त्यावेळेपासून या वाड्याबद्द्ल मला उत्सुकता होत्ती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात आम्ही या वाड्याला भेटही दिली होती. तेव्हा तिथली अवस्था पाहून मन जरा खट्टूच झाले. त्यामुळे यंदा बातमी करण्याची संधी मिळाली, तेव्हा या वाड्यावर मी लक्षच ठेवून होतो. बातमी करण्यासाठी गेलो तेव्हा कळाले, की वाड्याचा ताबा मुळात या गणेश मंडळाकडे नाहीच आहे. 'लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट' या मंडळाला गणपतीच्या केवळ दहा दिवसांसाठी ताबा मिळतो. इतर वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हा ताबा असतो. या मंडळाचे कर्मचारी सामान ठेवण्यासाठी या खोलीचा वापर करतात, असे कळाले. ट्र्स्ट्चे एक विश्वस्त रविंद्र पठारे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी तर या कर्मचार्‍यांनी खोलीतील ऐतिहासिक तसबिरी बाहेर काढण्याची मजल गाठली होती. हे ऐकून मी मराठी माणसांच्या इतिहास प्रेमाला मनातूनच साष्टांग दंडवत घातला.

पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाडा विकल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. "पुढच्या वर्षी गणपती बसवू का नाही, याची आम्हाला शंकाच आहे," पठारे म्हणाले तेव्हा परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव झाली।

केवळ गणपतीच नाही, आणखी एका ऐतिहासिक घटनेमुळे या वाड्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद यांचे या वाड्यात काही दिवस वास्तव्य होते. लोकमान्य टिळक मुंबईहून पुण्याला येताना त्यांची आणि स्वामींजीची भेट झाली होती. स्वामींजीच्या विद्वत्तेने प्रभावित झालेले लोकमान्य त्यांना घरी घेऊन आले. याच विंचूरकर वाड्यातील एका खोलीत स्वामीजी राहत होते. काही दिवस वास्तव्य केल्यानंतर स्वामीजी कोणालाही न सांगता एके दिवशी निघून गेले. अशा या विलक्षण घटनेची माहिती आज केवळ मोजक्या लोकांना आहे. आमच्या वर्तमानपत्राने घेतलेल्या लोकांच्या मुलाखतीतून हीच माहिती समोर आली. खरे तर स्मृतीस्थळ म्हणून वर्षभर सुरू असावे, अशी योग्यता असलेली ही वास्तू आज शेवटच्या घटका मोजत आहे. 'कालाय तस्मै नम:' दुसरे काय?

No comments:

Post a Comment