Tuesday, May 19, 2009

नाराज क्यों होते हो भाई?

लोकसभा निवडणुक संपताच आता राजकीय पक्षांची धुळवड सुरु झाली आहे। त्यात शिवसेनेच्या नेत्यांची सॉलिडच गोची झालेली दिसत आहे. तीन दिवसात शिवसेनेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्या नावाने फोडायच्या होत्या तेवढ्या खडी फोडल्या. 'लोकसभेत मुम्बईचा आवाज कोण उठविणार, विचारा राजला,' ही उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया त्याच स्वरूपाची होती. म्हणजे शिवसेनेला मराठी मते मिळावित, यासाठी राज यांनी आपणहून रास्ता मोकळा करावा, ही उद्धव यांची अपेक्षा दिसते. जिथे राज यांची उपस्थिती नव्हती, अशा मराठवाडा आणि विदर्भातील जागाही शिवसेनेला मिळविता आल्या. त्याची संगती अजून त्यांनी सांगितलेली नाही.

राज यांच्यामुळे मराठी टक्का घसरला किंवा मराठी खासदार निवडून आला नाही, हे मला पटत नाही. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गाने निवडणुक लढविण्याचा अधिकार सगळ्याच नेत्यांना वा त्यांच्या पक्षांना आहे. लोकांना ज्या पक्षात विशेष भरोसा वाटतो त्याला ते निवडून देतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेची अनेक मते खाल्ली याबाबत काहीही शंका नाही. मात्र या निवडणुकीत मनसे एक बाजू लावून धरणार आणि मराठी मते मिळविण्याचा प्रयत्न करणार ही गोष्ट तीन वर्षांपूर्वी आपली स्वतंत्र चूल मांडतानाच राज यांनी स्पष्ट केली होती. मात्र त्यावेळी सेनेची मंडळी आणि तथाकथित माहितगार जाणकार लोक मनासेला फारशी प्रतिष्टा देण्यास तयार नव्हते. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसेच्या उमेदवारांनी मर्यादित यश मिळविले, त्याचीही संभावना अपयशात करण्यात आली. आता जेव्हा मनसेच्या उमेदवारांनी आपले उपद्रवमूल्य सिद्ध केले, तेव्हा कुठे सर्वांना जाणीव झाली, की हा पक्ष संसदीय राजकारणातही येऊ शकतो. मनसेच्या आतापर्यंतच्या वाटचालीला हे धरूनच झाले.

राज ठाकरे जेव्हा राज्यातील गणेश मंडळाच्या कार्यकर्यांना भेटत किंवा मुंबईत मी मराठी उत्सवाचे आयोजन करत त्यावेळी त्याची संभावना संक्षिप्त या सदराच्या पलिकडे होत नसे। हा माणूस काहीतरी करतोय, तो आपोआप थंड होईल, द्या त्याला थोडी प्रसिद्धी अशी भावना त्यावेळी होती. त्यानंतर परप्रांतियांच्या मुद्यावर आक्रमक झाल्यावर माध्यमांनी मनसेची दखल घेतली.

राज ठाकरे यांनी मराठी जनतेसाठी काय केले, असा प्रश्नही ही मंडळी विचारत असत। त्याचीच री वर्तमानपत्रेही ओढत असत. मात्र असा प्रश्न विचारणाऱया लोकांनी, थोडक्यात कॉंग्रेस, भाजप किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी मराठीच जाऊ द्या, लोकांसाठी काय केले हा प्रश्न कोणीही विचारला नाही. ज्यावेळी जेटच्या कर्मचाऱयांवर संक्रांत आली आणि त्यांनी राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली त्याचवेळीस वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचा अंदाज आला होता. मात्र त्यावेळी त्यांनी राज यांना दहशतवादी, गुंड अशी प्रतिमा देऊ केली होती. महाराष्ट्रात एकाही व्यक्तीच्या भाषणात दिसून येणारा, अन्य लेख किंवा पुस्तकातला संदर्भ देण्याचा गुण मुद्दाम दुर्लक्षित करण्यात आला. राज यांची ही राजकीय खेळी निःसंशय, मात्र ते वेगळेपणच ठरावे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भात शेतकऱयांच्या प्रश्नावर घेतलेल्या लाखा-लाखांच्या सभा मी पाहिल्या आहेत. तो मुद्दा उद्धव यांच्याइतका कोणीही प्रभावीपणे मांडला नाही. त्यांच्या आंदोलनामुळेच केंद्राला शेतकऱयांसाठी पॅकेज जाहीर करावे लागले. असे असूनही, त्यांना म्हणावे तितके यश मिळाले नाही. याचा दोष राज यांच्याकडे कसा जातो?

आज शिवसेनाप्रमुखांनी जाहीर केले, की राज यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले। मात्र आता गरज संबंध जोडण्याची असताना हे संबंध तोडण्यासारखे आक्रस्ताळे निर्णय जाहीर होत आहेत. मुळात शिवसेना किंवा मनसे एकत्र येण्याने शिवसेनेला मिळणारी मते वाढतील, हे गृहितकच चुकीचे आहे. १९९९ किंवा २००४ मध्ये राज ठाकरे शिवसेनेसोबतच होते ना. मग त्यावेळी पक्षाला अपयश का आले? आज मनसेला मिळणारी मते केवळ मराठी म्हणून नाही. ती तरुणांची मते आहेत. या तरूणांना धर्म, जात किंवा काही प्रमाणात प्रांतांचीही मर्यादा नाही. अरेला कारे म्हणणाऱया या तरूणाला रस्त्यावर येण्यासाठी एका हाकेची गरज आहे. ती हाक देण्याची ताकद सध्याच्या घडीला केवळ राज ठाकरे यांच्याकडे आहे, हे निवडणुकीच्या निकालाने सिद्ध झाले आहे.

त्यामुळे सध्यातरी शिवसेनेने राज यांच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा राजकीय डावपेचांचा अधिक विचार करावा. नाहीतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या मनोरथांमध्ये मोडता घालायला मनसे आहेच.

2 comments:

  1. बाळासाहेबांनी राजला आपला राजकीय वारसदार असे घोषित केले असते तर शिवसेनेला एक वेगळे वळण प्राप्त झाले असते. दोन वर्षांपुर्वी वसंत व्याखानमालेत राज यांनी एक वेगळ्या शैलीत विकासाच्या टप्प्यातील प्राधान्यक्रमाविषयी बोलताना वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज सांगितली होती.

    ReplyDelete
  2. खरं आहे. मात्र पुत्रप्रेम त्यांना ते करू देत नाही. यानिमित्ताने राज ठाकरे यांना स्वतःच्या वाटेने जाऊन स्वतःचे राजकारण विकसित करता आले, तर महाराष्ट्रासाठी ती चांगलीच घटना ठरेल.

    ReplyDelete