Thursday, January 30, 2014

राष्ट्रपित्याचा व्यवसाय शेती

भारतातील विसंगतींनाही कधीकधी दाद द्यावीशी वाटते. ज्या देशात शेतकरी हर क्षणी नागवला आणि भरडला जात आहे, त्या देशाचा राष्ट्रपिता स्वतःला शेतकरी मानत असावा, आणि ज्या कृषीमंत्र्याच्या अमलात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यालाच ही बाब आढळावी, याला काय म्हणावे?

या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी वकीली शिकलेले होते आणि ते बॅरिस्टर होते, हे तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु खुद्द बापू स्वतःला शेतकरी मानत होते. पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेत याचा पुरावा सांभाळून ठेवलेला आहे. त्यात खुद्द महात्मा गांधीची स्वाक्षरीही आहे.

97 वर्षे जुन्या भांडारकर संस्थेत भारत तसेच आशियाई देशांशी संबंधित अनेक प्राचीन हस्तलिखिते, पोथ्या आणि पुस्तके आहेत. परंतु या दस्तावेजांसोबतच आणखी एक महत्त्वपूर्ण दस्तावेज इथे आहे ते म्हणजे येथील व्हिजिटर्स बुक. सन् 1917 मध्ये स्थापनेनंतर अनेक नामवंतांनी या संस्थेला भेटी दिल्या आणि या व्हिजिटर्स बुकमध्ये आठवणी व टिपण्या मागे ठेवल्या.

याच भेटींमधील एक होती महात्मा गांधी, राजकुमारी अमृत कौर आणि सरदार वल्लभभाई पटेल यांची भेट. येथील दस्तावेजांनुसार 1 सप्टेंबर 1945 रोजी या तीन असामींनी या संस्थेला भेट दिली होती. त्यांच्या सोबत मणिलाल गांधी हेही होते.  या व्हिजिटर्स बुकमध्ये तीन रकाने होते - नाव, टिप्पणी आणि व्यवसाय.

पूर्ण संस्था पाहून झाल्यावर बापूंनी व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी केली. टिप्पणीच्या रकान्यात त्यांनी लिहिले, 'बहुत आनंद हुआ'. व्यवसायाच्या रकान्यात त्यांनी गुजरातीत लिहिले, 'खेडुत' अर्थात शेतकरी. त्यानंतर महात्मा गांधी येथे येऊन गेले होते, हे वारंवार सांगितले तरी त्यांच्या व्यवसायावर कोणीही लक्ष दिले नाही.

आता ही गोष्ट समोर कशी आली, तर ती आता कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यामुळे. 2001 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आता केंद्रीय कृषीमंत्री असलेले शरद पवार हे या संस्थेच्या भेटीवर होते. (त्यानंतर 2004 साली भांडारकर संस्थेवर हल्ला झाला. यात काही संगती आहे का नाही, सांगता येत नाही)व्हिजिटर्स बुकमध्ये स्वाक्षरी करताना 'भांडारकर'चे तत्कालीन मानद सचिव मो. . धडफळे यांनी त्यांना सांगितले, की महात्मा गांधी हेही एके काळी येथे येऊन गेले होते. तेव्हा पवारांना उत्सुकता वाटली, की बापूंनी त्यांचा व्यवसाय काय लिहिला असावा.  तेव्हा जुने व्हिजिटर्स बुक मागवण्यात आले आणि तेव्हा ही बाब समोर आली.

याच पानांमध्ये असेही दिसते, की राजकुमारी अमृता कौर यांनी त्यांचा व्यवसाय 'देशसेविका' लिहिला होता तर सरदार पटेल यांनीही स्वतःला शेतकरीच म्हणवले होते. मणिलाल गांधी यांनी व्यवसाय लिहिला होता, 'संपादक, इंडियन ओपिनियन'.

काल राज्यसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवारांनी स्वतःकडे वाहन नसल्याचे जाहीर केले तेव्हा ही मीच दिलेली बातमी आठवली. आज योगायोगाने म. गांधीजींची पुण्यतिथी आहे. तेव्हा हीच बातमी मी अन्यत्र दिली.


म. गांधी देशाचे राष्ट्रपिता होते अथवा नाही, यावर वाटेल तेवढा वाद घाला. परंतु 'हा देश खेड्यांचा आहे आणि शेतकऱ्यांचा आहे' असे जेव्हा तो महात्मा सांगायचा, तेव्हा ते तोंडदेखले नव्हते, इतके नक्की!

No comments:

Post a Comment