Monday, November 2, 2015

तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?

pen-red एखाद्या जंगलात शिकार करण्यापूर्वी काही लोक हाकारे घालतात आणि शिकार होणाऱ्या प्राण्याला जाळ्यापर्यंत ढकलत नेतात. हे लोक त्या जनावराला एका दिशेने ढकलतात जेणेकरून त्याची शिकार सहजतेने करता येईल. सध्या देशात पुरस्कार परतीचा जो तमाशा चालू आहे, त्यामुळे या हाकारे घालण्याचीच आठवण येते. स्वतःला साहित्यिक आणि कलावंत म्हणवून घेणारे एका सुरात ओरडत आहेत, जेणेकरून वातावरणात गोंधळ माजेल आणि सरकारला एका दिशेने जाणे भाग पडेल व मग त्याची शिकार करणे सोपे जाईल.

परत करण्यासाठी आपापले पुरस्कार फडताळ्यातून काढणाऱ्यांचे म्हणणे आहे, की देशात फॅसिस्ट विचारसरणी वाढत आहे आणि अभिव्यक्तीचा गळा घोटला जात आहे. त्यांच्या या म्हणण्यात प्रामाणिकता असती तर त्यांच्या बोलण्यावर लक्षदेता आले असते. परंतु वास्तव तसे नाही. जे लोक तारस्वरात अभिव्यक्ती स्वतंत्र्याची भलामण करत आहेत, त्यांच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. अन् हा सवाल अन्य कोणी नाही तर अशा व्यक्तीच करत आहेत, ज्यांच्या अभिव्यक्तीचे दमन करण्यातच या लोकांनी सहा दशके कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.

"अभिव्यक्तीचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आज ज्या व्यक्ती आवाज काढत आहेत, त्याच लोकांनी वैचारिकता आणि शिक्षणाच्या क्षेत्रावर आपला एकाधिकार ठेवला होता. त्यांच्यापेक्षा वेगळ्या अशा कुठल्याही विचाराला पायदळी तुडविणे, हेच त्यांनी जीवनकार्य बनविले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्यांची ही चाड कुठे गेली होती," हा थेट सवाल आहे प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांनी. स्वतःला विवेकाचे ठेकेदार म्हणविणाऱ्यांकडे याचे काय उत्तर आहे?

भैरप्पा हे कोणी सामान्य लेखक नाहीत. आधुनिक कन्नड साहित्यातील सर्वोच्च शिखरांपैकी ते एक होत. कर्नाटकातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना दैत्य प्रतिभेचे लेखक म्हणजे विराट प्रतिभा असलेले लेखक म्हणून ओळखले जाते. केवळ कन्नडच नव्हे तर भारतीय साहित्यात लोकप्रियता, विक्री तसेच समीक्षकांची मान्यता या निकषांवर त्यांच्या कादंबऱ्यांनी विक्रम स्थापित केले आहेत. अशा लेखकाला सरकारी मान-सन्मान मिळू नये, यासाठी अनेक प्रकारचे घाणेरडे राजकारण खेळले गेले आहे.

पाटील पुटप्पा हे कन्नड भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. चार वर्षांपूर्वी भैरप्पांना बाजूला सारून डा. चंद्रशेखर कंबार यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला, तेव्हा पुटप्पा यांनी जाहीर आरोप केला होता, कि 'विशिष्ट विचारांच्या लोकांनी लॉबिंग करून भैरप्पांना ज्ञानपीठापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते.'

तीन वर्षांपूर्वी गिरीश कार्नाड पुण्यात आले होते, तेव्हा भैरप्पांबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी ते म्हणाले होते, “भैरप्पा चांगले लिहितात, परंतु ते हिंदुत्ववादाच्या नादी लागले.“ याचा अर्थ एवढाच, की साहित्यिक लिहितो कसा, तो काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही तर तो कोणत्या विचारांचे अनुसरण करतो हे महत्त्वाचे आहे.

म्हणूनच डाव्या मंडळींच्या या मुस्कटदाबीचा मीही बळी आहे, या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलण्याचा काही एक हक्क नाही, असे भैरप्पा म्हणतात तेव्हा त्याला विशेष धार येते. लालभाईंच्या या सुनियोजित थयथयाटामागे कुठले ईप्सित आहेत, याबद्दल वेगळे सांगावे लागत नाही.

डाव्या मंडळींच्या एकांगी अभिव्यक्तिप्रियतेवर हा काही पहिलाच प्रहार नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात असाच एक आवाज पुढे आला होता. मोकळ्या वातावरणाच्या नावाने गळे काढून सुनियोजित पुरस्कार परती सुरू करण्यापूर्वीची गोष्ट आहे ही.

हा आवाज होता प्रा. शेषराव मोरे यांचा. त्यांच्या संशोधन आणि विद्वत्तेचे स्वरूप असे, की भारताच्या फाळणीवर त्यांनी पुस्तक लिहिताना आवाहन केले होते, की या पुस्तकाचे खंडन कोणी केले, तर त्याचेही पुस्तक प्रकाशित केले जाईल.

मात्र प्रा. मोरे हे नेहरूंना नायक आणि डाव्या मंडळींना मुक्त विचाराचे प्रेषित मानण्यास नकार देतात, म्हणून महाराष्ट्रातील विचारवंतांनी त्यांना जवळपास वाळीतच टाकले होते. परंतु गेल्या महिन्यात अंदमान येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. मोरे यांची निवड झाली आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी याच सेक्युलर दुटप्पीपणावर तोफ डागली.

स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांवर हल्ला करताना त्यांनी याला पुरोगामी दहशतवाद असे नाव दिले. त्यामुळे पुरोगामी गोटामध्ये खळबळ माजली. त्यानंतर प्रा. मोरे यांना दुर्लक्षित केले गेले किंवा त्यांना छुपा हिंदुत्ववादी म्हटले गेले. परंतु जे भैरप्पा आज म्हणत आहेत, तेच मोरे तेव्हा सांगत होते आणि त्यांच्या पूर्वीही अनेक लोकांनी हेच सांगितले होते, की डाव्या मंडळींच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निरपेक्ष नाही. जेव्हा त्यांचा स्वतःचा आवाज क्षीण होतो, तेव्हाच ते जागे होते.

महाराष्ट्रातच बोलायचे झाले, तर पु. भा. भावे हे एक प्रसिद्ध नाव आहे. मराठी नवकथेच्या चार शिलेदारांपैकी ते एक. मात्र भावेंना त्यांच्या पात्रतेनुसार कधीही सन्मान मिळाला नाही. इतकेच नाही, 1977 मध्ये ते मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा ते संमेलनच उधळून लावण्यात आले आणि हे मुख्यतः ते हिंदुत्ववादी असल्यामुळे, सावरकरांचे अनुयायी असल्यामुळे. त्यावेळी कोणत्याही कलावंत, कोणत्याही साहित्यिकाला अभिव्यक्तीचे दमन झाल्याचे मनातही आले नाही. फक्त गेल्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि या लोकांना वाटू लागले, की देशात द्वेषाचे वारे वाहू लागलेत.

हे म्हणजे कुरुक्षेत्रात युद्धाच्या वेळेस कर्णाला त्याच्या रथाचे चाक फसल्यावर धर्मसंमत आचरण आठवला होता तसे आहे. त्यावेळी कृष्ण आणि अर्जुनाने जो प्रश्न कर्णाला विचारला होता, तोच प्रश्न आज डावे, समाजवादी आणि स्वयंघोषित विचारवंतांना विचारता येईल – तेव्हा तुमचा धर्म कुठे होता?

1 comment:

  1. http://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-mandar-kale-article-about-media-and-society-5144275-NOR.html

    ReplyDelete