Thursday, January 7, 2016

विचारवंतांचे कैसे बरळणे

मराठी साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष हार-तुरेच घेत फिरत असतो आणि मी काय काय करणार आहे, हे सांगत फिरत असतो. त्याच्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी अशाच प्रकारे काही बाही सांगितलेले असते आणि त्यातील तसूभरही काही केलेले नसते, हे अशा नियोजित संमेलनाध्यक्षाने विसरायचे असते आणि लोकही ते विसरून चालले आहेत, असे मानून चालायचे असते. हारतुऱ्यांसह मिरविण्याची ही परंपरा एवढी जबरदस्त की खुद्द पु. ल. देशपांडे यांनाही त्याची बाधा झाली होती. संमेलनाध्यक्ष म्हणून पु. लं.चे सत्कार जेव्हा अंमळ जास्तच होऊ लागले, तेव्हा ज्ञानेश सोनार यांनी एक व्यंगचित्र काढले होते. त्यात पु. लं.ना दाखवून आता 'उरलो हारतुऱ्यापुरता' अशी मल्लीनाथी केली होती. त्याला दाद देताना पु. लं.नीही 'सोनारांनी कान चांगलेच टोचले आहेत', असे उद्गार काढले होते.
आता पु.लं.सारख्याचे हे हाल तर श्रीपालांची काय गत? एक तर विचारवंतांना, त्यातही स्वयंघोषित विचारवंताला, कोणी साहित्यिक मानत नाही आणि आलाच साहित्यिकांच्या पंक्तीत तर त्याला कोणी अध्यक्ष करत नाही. तो मणीकांचन योग सबनीस यांच्या नशीबात आला आणि त्या सरशी त्यांची सभा-समारंभात मुशाफिरी सुरू झाली. आता या मुशाफिरीत वेगवेगळे अनुभव तर येणारच. काही लोकांचे, काही पदरचे असे शब्द तर निघणारच. पवनचक्क्यांमध्ये शत्रूचे सरदार पाहणाऱ्या आणि ... पाहणाऱ्या डॉन क्विक्झोटप्रमाणे काही नसलेली वीरश्री दाखविण्याचे प्रसंग तर येणारच. 
फक्त एकच झाले. निळा रंग ल्यालेल्या कोल्ह्याने जसे कोल्हेकुई करताच त्याचे अंतरंग प्रकट झाले, तसे विचारवंतांचे बरळणे सुरू झाले तसे त्यांच्या वैचारिकतेची शालही सरकू लागली. विशेषता सर्वविदां समाजे विभूषणं मौनपण्डितानाम् असे म्हणून पूर्वजांनी चार युक्तीच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. पण पार सॉक्रेटिस आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष काढण्याच्या नादात अशा उपदेशांकडे लक्ष कोण देतो. 
एकुणात पी. डी. पाटील यांच्या कृपेने होणारे साहित्य संमेलन पाडूनच स्वाभिमानी आणि विवेकवादी बुद्धिवंतांचे वैचारिक उद्यापन होणार, असे दिसतेय.

2 comments: