Wednesday, November 12, 2014

यांना कोणीतरी सन्मान द्या हो!

Shiv Sena begging for respect

शिवसेनेला सध्या सन्मानाची प्रचंड आवश्यकता आहे. राज्याचा सन्मान अनुशेष भरून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी प्राणपणाने प्रयत्न चालवले आहेत. याबाबतीत त्यांची, अशाच सन्मान आणि स्वाभिमानाच्या नावाने वेगळी चूल मांडणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेसशी जोरदार स्पर्धी आहे.

Sunday, November 9, 2014

अटीतटीचे राजकारण!

चर्चा, मग ती जागा वाटपाची असो किंवा मंत्रिमंडळात जागा मिळण्याची, ती सुरू असली की मला माझेच हे जुने व्यंगचित्र हमखास आठवते. आता सरकारमध्ये सामील होण्यासाठी भाजपशी बोलणी करण्याआधी आणखी एक अट टाकून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेच एक पाऊल टाकले आहे. त्याआधी भाजपनेही आधी विश्वास प्रस्ताव व मगच मंत्रिमंडळात समावेश, अशी अट टाकून याचप्रकारचे राजकारण केले आहे.
शिवसेना आणि भाजपला जे काही सिद्ध करायचे असेल ते करोत. मग तो विश्वासदर्शक ठराव असो किंवा स्वबळावर जिंकण्याची क्षमता असो. पण त्यासाठी जनतेला वेठीस धरून ही मंडळी काय साध्य करत आहेत?
विधानसभा निवडणुकीपूर्वी या लोकांनी असेच अटी-प्रतिअटींची हुतूतू खेळले आणि दोघांचाही दम निघेल एवढी चिखलफेक केली. ती कमी म्हणून की काय, आता सरकारमध्ये जायचे अथवा नाही, यावर अटीतटीचे राजकारण चालू आहे.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाल्यावरही सरकार स्थापनेसाठी 12 ते 17 दिवस लागले होते. कारण तीही मंडळी एकमेकांना अशा स्वतःच्या बेटकुळ्या दाखविण्यात गर्क होती. आज त्यांचे हाल सर्वांच्या समोर आहेत. यांचेही असे न होवो, म्हणजे मिळवली!

Tuesday, November 4, 2014

नवे मुख्यमंत्री बेबंदशाही थांबवणार का?

1.9 महाराष्ट्राचे 18 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन वळण दिले आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची सर्व जण फडणवीस यांच्याकडून अपेक्षा करत असले, तरी राज्याची गाडी रुळावर ठेवण्यासाठीच नव्या मुख्यमंत्र्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. बेबंदशाही या एका शब्दात वर्णन करता येईल, अशी परिस्थिती मागील सरकारने त्यांच्यापुढे ठेवली आहे. कायदा सुव्यवस्था असो का आर्थिक व्यवस्था, सगळीकडे आनंदीआनंद पसरला आहे.

फडणवीस यांनी शपथ घेतली त्याच दिवशी पुण्यात सहा मजली इमारत कोसळली. त्यात एक व्यक्ती दगावली. त्यापूर्वी आठ दिवस आधी अहमदनगर जिल्ह्यात दलित कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. आधीच्या सरकारने घालून ठेवलेल्या घोळाची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणे.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करणार, असे नवे मुख्यमंत्री ठासून सांगत आहेत आणि त्यांच्या आजवरच्या निष्कलंक चारित्र्याकडे पाहता ते खरे होईलही. परंतु राज्याच्या कारभारात जरब कशी बसवणार, हा प्रश्न त्यांना आधी सोडवावा लागेल.

कमळाच्या चिन्हावर घड्याळ्याची अनेक माणसे निवडून आली आहेत. शिवाय वर बिनशर्त पाठिंब्याचा टाईम बॉम्ब आहेच. त्यामुळे सरकारचा चेहरा बदलला तरी स्वभाव तोच राहीला, असे व्हायला नको. याचीही काळजी फडणवीस यांना घ्यावी लागणार आहे.

या उप्पर स्वपक्षातील नाठाळांना वठणीवर लावण्यातही तरुण मुख्यमंत्र्यांची ऊर्जा खर्ची पडणार आहे. गेल्या वर्षी भाजप राज्य कार्यकारणीची बैठक पुण्यात झाली होती. त्यावेळी स्थानिक भाजप नेत्यांनी केलेली हडेलहप्पी आणि पत्रकारांना गृहित धरण्याची त्यांची वृत्ती, यामुळे अनेक पत्रकारांनी फडणवीस यांच्या उपस्थितीतच वाभाडे काढले होते. पक्षाचे प्रदेश अध्यक्ष या नात्याने त्यांनी त्यावेळी प्रत्यक्ष माफी मागितली होती.

त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या बेमुर्वतपणाबद्दल मी फडणवीस यांना इमेलही केला होता आणि त्यावर प्रत्युत्तरादाखल माफी मागणारा इमेलही केला होता. त्यातून त्यांचा प्रांजळपणा दिसला असला तरी ठिकठिकाणच्या अशा स्थानिक नेत्यांना ते कसे आवरणार, हा प्रश्नच आहे. कारण पुण्यातील भाजप नेत्यांच्या वर्तनात त्यानंतरही काही परिणाम पडलेला दिसला नाही. इतका की, ऐन निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.

तेव्हा अशा सर्वच आघाड्यांवरील बेबंदशाही रोखण्याचे काम फडणवीस यांना करावे लागणार आहे. हे काम त्यांनी पार पाडावे, हीच मनापासून इच्छा आणि त्यांना शुभेच्छा!

Wednesday, October 22, 2014

सरकारहीन दिवाळीच्या शुभेच्छा!

Cartoon-21 Oct 2014A

यंदाच्या दिवाळीत राज्यात सरकार नाही. म्हणजे यंदाची दिवाळी सुखात जाण्यास हरकत नाही! सरकारहीन दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Monday, October 20, 2014

आता तरी शहाणे व्हा!


ऐन दसऱ्याच्या दिवशी नाशिकमध्ये सहज प्रवासात एका शिवसैनिकाची भेट झाली. काय एकूण राजकीय परिस्थिती, असे त्याला विचारलेतेव्हा पहिल्यांदा मोठ्या आत्मविश्वासाने त्याने सांगितले, की शिवसेनेला स्वतःच्या बळावर सत्ता मिळेल. मात्र आणखी थोडी चर्चा केल्यानंतर त्याचा अभिनिवेश गळून पडला आणि सत्य बाहेर पडले. “नुकसान तर होणारच आहे. दोन्ही पक्षांना नुकसान होईल,” असे त्याने अत्यंत खालच्या आवाजात सांगितले.

ज्यावेळी उद्धव ठाकरे हातात धनुष्यबाण घेऊन उत्तरेतून अफझलखानाचे सैन्य आल्याची आरोळी ठोकत होते आणि भाजपचे लोक शिवसेनेने हटवादीपणा केला, असे सांगत होते त्यावेळी दोन्ही पक्षांच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना हीच होती. सत्तेचा कितीही वास आलेला असला तरी आपण आपल्या बळावर सत्ता मिळवू शकत नाही, एवढे शहाणपण जमिनीवर काम करणाऱ्या माणसांना होते.

नेमके हेच भान मुंबईतील वातानुकूलित कार्यालयांमधून राज्याचा गाडा हाकण्याची इच्छा बाळगणाऱ्या नेत्यांकडे उरले नव्हते. म्हणूनच तब्बल महिना-दोन महिना चुरस निर्माण केल्यानंतर आलेले निवडणुकीचे निकाल शिवसेना व भाजपला हरखून टाकणारे असले तरी त्यांचा काहीसा विरस करणारेही असतील, यात शंका नाही. कारण हुकुमी बहुमताने भाजपला दगा दिलेला आहे तर शिवसेनेचा बाण लक्ष्यभेद करण्यात अपयशी ठरला आहे. आजही दोन्ही पक्ष जेव्हा विजयाचे फटाके फोडतील तेव्हा आम कार्यकर्त्यांचा
आवाज ते ऐकणार की नाही, हाच कळीचा प्रश्न असणार आहे.
आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यात तथ्य असेलही. परंतु तसे करणे भाजपला परवडेल का, हा प्रश्नच आहे.
कोणीही काहीही म्हटले तरी शिवसेना हाच भाजपचा नैसर्गिक साथीदार आहे. त्यात विचारसरणी वगैरेंचा मुद्दा नाही परंतु सहवासाची सवय हा एक भाग आहे. गेली पंधरा वर्षे राज्यात दंडेली, टगेगिरी आणि लुटीचे वातावरण निर्माण करणाऱ्या राष्ट्रवादीला भाजप कसे काय सोबत घेऊ शकतो?  केवळ आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच पक्षाविरुद्ध आग ओकत होते. आता त्याच पक्षाशी घरोबा कसा काय होऊ शकतो?
बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवसेना नेत्यांनी भाजपची खिल्ली उडवायची आणि भाजपच्या नेत्यांनीही कधीतरी शिवसेनेबद्दल तोंड वाजवायचे, ही परंपरा चालत आलेली आहे. त्यानंतर दोन्ही पक्ष विषयावर पडदा पाडत आणि जनतेनेही त्यांची ही रीत स्वीकारली होती. तेव्हा निवडणुकीतील रंगपंचमी विसरून दोघांनीही पुन्हा गळाभेट घेतली, तर त्यात काही विलक्षण असेल, असे नाही.
शिवसेनेलाही एक पाऊल मागे घेऊन भाजपशी पुन्हा बंधनाचा गंडा बांधावा लागेल. कारण 15 वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर आणि बाळासाहेबांसारखे करिश्माई नेतृत्व नसताना शिवसैनिकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी जबरदस्त डिंकाची गरज आहे. उद्धव ठाकरेंचे नेतृत्व अशा डिंकाचे काम करू शकत नाही. तेव्हा पराभूत सैन्याप्रमाणे नाही तर बरोबरीच्या प्रतिस्पर्ध्याप्रमाणे शिवसेना भाजपशी व्यवहार करू शकत नाही. आपण ज्याला पराभूत करू शकत नाही त्याच्याशी हातमिळवणी केली पाहिजे, ही जुनी म्हण इतिहासप्रेमी उद्धवजींना माहीत असेलच. खरं तर शिवसेना व भाजपने युती म्हणून निवडणूक लढविली असती, तर त्यांना कितीतरी उदंड यश मिळाले असते. तसे झाले असते तर 200 जागांचा टप्पा दूर नव्हता, असे अनेक विश्लेषकांचे आजही मत आहे. परंतु कुठेतरी माशी शिंकली आणि वेगवेगळे लढण्याचा निर्णय दोघांनी घेतला.
बरं, स्वतंत्रपणे लढणे याचा अर्थ एकमेकांशी लढणे, असा ग्रह दोघांनी करून घेतला. एवढे करून दोघांना 200 च्या जवळपास जागा मिळाल्याच आहेत. म्हणजे या दोन पक्षांची समजूत काहीही असो, मतदारांची समज चांगली आहे. उलट असे म्हणता येईल, की या दोन्ही पक्षांनी युती न करून अनेक जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना निवडणे मतदारांना भाग पाडले. मुख्यमंत्र्यांसकट अनेक मंत्री काही फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असणे, यातून हाच संदेश मिळत आहे.  संधी मिळाली असती तर मतदारांनी सत्ताधाऱ्यांना दूर भिरकावून दिले असते, हे स्पष्टपणे दिसते. मतांचे विभाजन केल्याने ती संधी हिरावल्याचेही दिसून येते.
जेव्हा एखाद्या निवडणुकीत मतदार सत्ता बदलण्याचा आदेश देतात, तेव्हा सत्तेतील सर्व घटकांना बदलण्याचाच तो आदेश असतो. विजयाच्या कैफात बुडालेल्या भाजपला हे विसरता येणार नाही. तेव्हा घड्याळाला हातभर अंतरावर ठेवणे, हाच कमळापुढचा एकमेव पर्याय आहे.
सेना-भाजप युतीचे जागा वाटपाचे चर्चेचे गुऱ्हाळ चालू होते, तेव्हा सेनेच्या बाजूने एक संदेश सोशल साईट्सवर फिरत होता. त्यात  'शहा'णे व्हा असा संदेश अमित शहांच्या चित्रासह दिलेला होता. आज दोन्ही पक्षांनी शहाणे होऊन परत एकत्र येण्याची वेळ आली आहे.


(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता.)

Wednesday, October 15, 2014

या मोदींचं काय करायचं?

Modiलोकसभा निवडणुकांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची नेतेमंडळी जेव्हा प्रचारासाठी फिरत तेव्हा अन्य कुठल्याही विषयावर बोलायला तयार नव्हती. स्वतःचा कारभार, राज्याचे प्रश्न, लोकांचे म्हणणे यापेक्षा त्यांच्याकडे अधिक तातडीचा आणि अधिक महत्त्वाचा विषय होता - नरेंद्र मोदी.

त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्याची महत्त्वाकांक्षा आहे, त्यांना केवळ केंद्रातील सत्ता हवी आहे, ते हुकूमशहा आहेत, ते देशात विभाजन घडवत आहेत अशा नानाविध आरोपांची राळ राज्यातील सत्ताधाऱ्यांनी उडविली होती. अर्जुनाला ज्याप्रमाणे केवळ पक्ष्याचा डोळा दिसत होता त्याप्रमाणे पुरोगामी  लोकशाही आघाडीच्या नेत्यांना केवळ मोदी आणि मोदीच दिसत होते. बाकी कुठलाही मुद्दा त्यांच्या दृष्टीने रद्दबातल ठरला होता.

त्याचा व्हायचा तो परिणाम झाला आणि लोकांनीही अन्य सर्व बाबी नजरेआड करून केवळ मोदींच्या नावावर शिक्कामोर्तब केले. अन्य कोणतीच बाब पाहिली नाही. आपण मोदींवर जरा जास्तच लक्ष केंद्रीत केले, अशी उपरती आघाडीच्या नेत्यांनाही झाली तर विधानसभा निवडणुकीचा सागरही दगडांवर मोदीनाम लिहून तरून जाण्याचा मनसुबा भाजपच्या मंडळींनी केला.

साडेचार महिन्यांनंतर आज आघाडीच्या नेत्यांसमोर तोच प्रश्न उपस्थित राहिलेला दिसतोय. प्रदेश काँग्रेसने प्रचाराचा नारळ फोडताना ज्या दोन प्रचार पुस्तिका प्रकाशित केल्या, त्यातील एक संपूर्णतः मोदी सरकारवर केंद्रीत आहे आणि दुसऱ्या पुस्तिकेतील बहुतांश भाग मोदींवरच केंद्रीत आहे. यावरून दोन्ही काँग्रेस नरेंद्र मोदींनी केवढ्या पछाडल्या आहेत, याची कल्पना येऊ शकते.

त्यावेळी मोदी अलेक्झांडरच्या आवेशात फिरत होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करणे काँग्रेस-राष्ट्रवादीला शक्य होते. आज मोदी नेपोलियनच्या आविर्भावात राज्य करत आहेत. आघाडीच्या नेत्यांना काहीही वाटले तरी अद्याप तरी जनतेच्या मनातून पार उतरून जावे, असे काही त्यांनी केलेले नाही. उलट पाकिस्तानशी चर्चा थांबविण्यासारख्या त्यांच्या पावलामुळे त्यांची प्रतिमा आणखी उजळली आहे. मुख्य म्हणजे मोदींच्या धसक्याने दिल्लीतील नोकरशहा वेळेवर काम करू लागले आहेत, या एकमेव बातमीने सामान्य माणूस किती हरखून गेला असेल, याची आघाडीच्या नेत्यांना कल्पनाच नाही!

अशा परिस्थितीत मोदींना कसे हाताळायचे, ही विवंचना काँग्रेस-राष्ट्रवादीला आजही छळू शकते. एका युरोपियन परिकथेत पुंगीवाला येतो आणि शहरातील सर्व उंदरांना भुलवून आपल्यामागे नेतो. त्याचप्रमाणे अनेक पक्षांतील उंदीर या गारुड घालणाऱ्या पुंगीवाल्याच्या मागे जाण्यास उत्सुक आहेतच.

मोदी नावाचा हिंदू ही केवढी समृद्ध अडगळ आहे, याचा चांगला (खरे तर अगदी वाईट) अनुभव राज ठाकरे यांनी घेतला आहे. स्वतःच्या पक्षाचे नवनिर्माण करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, यातच सारे काही आले. तेव्हा या व्यक्तीशी जुळवून घेणेही अवघड आणि थेट विरोध करणेही अवघड, अशी अवघडलेली परिस्थिती त्यांच्यावर आली आहे.

नागपूर आणि सोलापूरमध्ये झालेल्या कार्यक्रमांच्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना याचा फटका बसला आणि पुन्हा या व्यक्तीचा सहवास नको, असे जाहीर करून ते मोकळे झाले. त्यांचं तरी काय चुकलं? गेली १५ वर्षे ते स्वतःसारख्याच नोकरशहा पंतप्रधानाला पाहत होते. आता अचानक त्यांनी राजकारणी पंतप्रधान पाहिला तेव्हा धक्का बसणारच.

भारतीय जनता ही भारतीय स्त्री सारखीच आहे. नेता भ्रष्टाचारी असो, निष्क्रिय असो किंवा हेकेखोर असो, जोपर्यंत तो त्यांच्याशी संपर्क राखून असतो, जनतेचा त्याच्यावर विश्वास असतो तोपर्यंत जनता त्या नेत्याच्या मागे राहते. शक्यतोवर त्याच्यासोबत नांदण्याकडे तिचा कल असतो. त्यात नेता स्वतःला स्वच्छ म्हणवून घेत असेल, काम करताना दिसत किंवा दाखवत असेल तर मग तर बोलायलाच नको. त्यामुळे शक्यतो कोणाला धुडकावून लावायचा भारतीय जनतेचा स्वभावच नाही. अगदीच कडेलोट झाला तर गोष्ट वेगळी.

याच कारणामुळे मुंदडा प्रकरणात खोलवर गुरफटलेल्या, आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी केवळ दीड वर्षाच्या अंतराने सत्तेत परतू शकल्या. बोफोर्समध्ये गुंतलेल्या राजीव गांधींना १९८९ मध्ये जवळपास २०० जागा मिळवता आल्या आणि १९९१ साली ते परत पंतप्रधान बनण्याच्या मार्गावर होते. सतत चार वर्षे माध्यम आणि विरोधकांच्या तोफखान्याला तोंड देऊनही अशोक चव्हाण मराठवाड्यात स्वतःचे वर्चस्व कायम ठेऊ शकतात. कर्नाटकात येडियुरप्पा, तमिळनाडूत जयललिता आणि प. बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हेच दाखवून दिले.

महाराष्ट्रात आज जर कोणत्या गोष्टीचा अभाव असेल तर नेमक्या या गोष्टीचा. इथल्या नेत्यांवर जनतेचा सोडा, त्यांच्या कार्यकर्त्या आणि अनुयायांचा विश्वास नाही, तेथे बाकींच्याची काय कथा. स्वतःचे काम नाही आणि इतरांचा विश्वास नाही, अशा परिस्थितीत झोडपायला एक बरे खेळणे म्हणून मागच्या वेळी त्यांना नरेंद्र मोदींचा वापर करता आला. यावेळी ते मोदींचं काय करणार?

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता.)

Tuesday, October 14, 2014

...खग भेणे वेगळाले पळाले!

post महाराष्ट्र हे प्रवासी पक्षांचे राज्य म्हणून ओळखला जाते. हिवाळ्यात थंडी जाणवू लागली, की हिमालयातून किंवा अगदी रशिया, सायबेरिया अशा प्रांतांतून पक्षी उडत येतात आणि उष्ण वातावरणात काही काळ काढून आपल्या देशात परत जातात. या पक्ष्यांनाही अचंबा वाटावे, असे काही प्रवासी पक्षी निवडणुकांच्या हंगामात आपले पक्ष बदलून कुंपणाच्या पलीकडे उडी मारतात आणि राजकीय वारे फिरले, की परत आपल्या जागी जातात. कालपर्यंतचे बगळे आज कावळे होतात आणि आजचे कावळे उद्या बगळे होतात. सत्तेची ऊब हे त्यांचे एकमेव लक्ष्य असते.

लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची जी वाताहत झाली, त्याचा धसका घेऊन त्या शिविरातील डझनावारी नेत्यांनी आपल्या टोप्या फिरविल्या आहेत. खरं तर गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी या दोन सणांच्या दरम्यान, ऐन पितृपक्षात, पक्षांतराचा हंगामच सुरू झाला आहे. गेली 15 वर्षे सत्ता भोगणारी मंडळी आता सत्ताबदल होणार, अशी शंका मनात येताच धडाधड कुंपणाच्या पलिकडे उडी मारू लागली आहेत. दुसरीकडे भगव्या झेंड्याखाली नांदणाऱ्या काही मंडळींनीही अचानक धर्मनिरपेक्षतेची दीक्षा घेतली आहे. मात्र त्यांची संख्या आणि चेहरे किरकोळ आहेत.

बबनराव पाचपुते, भास्करराव पाटील खतगांवकर, प्रताप पाटील चिखलीकर, विजयकुमार गावित लोकांनी कमळाच्या आश्रयाखाली जाण्याचा निर्णय घेतला आहे. कमळाच्या पानावरील जलबिंदू ओघळावेत एवढ्या सहजतेने हे नेते आपापले पक्ष सोडून नवीन पक्षाची पायरी चढले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी भाजपमध्ये प्रवेश करून या सर्वांवर कडी केली. हत्ती खड्ड्यात पडला म्हणजे वटवाघूळ सुद्धा त्याला लाथ मारते, अशा अर्थाची एक बंगाली म्हण आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेचे राजकारण करणाऱ्या राज ठाकरे यांना ही म्हण माहीत असण्याची शक्यता धूसर असली, तरी तिचा अर्थ आज नक्कीच जाणवत असणार.

रघुनाथ पंडितांनी नलोपाख्यानात नल राजा आल्यानंतर हंसांची जी त्रेधातिरपिट उडाली होती, त्याचे वर्णन केले आहे. त्यात त्यांची 'तदितर खग भेणे वेगळाले पळाले' अशी एक ओळ आहे. नल राजा येताच भीतीने गाळण उडून सगळे हंस मिळेल त्या दिशेने उडाले', असे ते म्हणतात. आपल्या या प्रवासी पक्ष्यांची गती नेमकी अशीच आहे. त्यांच्या या राजकीय उड्डाणाचे याहून समर्पक वर्णन करणारी ओळ दुसरी सापडणार नाही.

कुठल्याही दूषित गोष्टीवर गोमूत्र शिंपडून तिची शुद्धी करता येते, अशी भारतीय (मुख्यतः हिंदू) समाजात समजूत आहे. कालपर्यंत ज्यांच्या विरोधात कंठशोष केला, त्याच मंडळींना पावन करून घेताना भाजपेयींनी कुठले गोमूत्र वापरले माहीत नाही. मात्र नांदेडची जिल्हा बँक बुडविणारे खतगांवकर आणि नंदूरबार जिल्ह्यात घराण्याची सत्ता प्रस्थापित करणारे गावित भगवे उपरणे घालताच कसे काय स्वीकारार्ह होतात, हे गौडबंगाल जनतेला समजले तर त्यांच्या प्रबोधनात भरच पडेल.

इटालीच्या जनतेला फॅसिस्ट विचारसरणीची भूल देताना मुसोलिनी म्हणाला होता, "आपले लक्ष्य केवळ राष्ट्र असले पाहिजे. बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". आपल्या पुरोगामी, लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्ष, समतावादी, राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी, प्रखर राष्ट्रीय, देशभक्तीचा अंगार इ. इ. पक्षांनी एक नवीन मंत्र दिला आहे, "काहीही करून खुर्ची मिळवा, बाकी सर्व गोष्टी अनुषंगिक आहेत". मग विचारसरणी, तत्वे आणि इतिहास अशा क्षुल्लक गोष्टींची चाड बाळगण्याची गरजच काय?

कालपर्यंत ज्यांच्या विरोधात आरोपांची राळ उडविली, ज्यांच्या विरोधात आंदोलने केली आणि ज्यांना घालवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, त्यांचीच गळाभेट घेताना ही मंडळी तीळमात्रही कचरत नाहीत. नाहीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिलेलाच आहे 'सबका साथ, सबका विकास'. त्याची तामिली ही अशी चालू आहे.

असे म्हणतात, की या जगात प्रलय आला तरी झुरळ हा एकमेव प्राणी त्यात तग धरून राहू शकतो. याचे कारण कोणत्याही परिस्थितीत चिकाटीने राहण्याची झुरळाची शक्ती अपार असते. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, खुर्चीवर बसणारी व्यक्ती तीच असते, तेव्हा शास्त्रज्ञांचे हे निरीक्षण खोटे नसल्याचे जाणवते.

एक प्रश्न राहून राहून समोर येतो - निवडणुका हा एखादा बोधिवृक्ष आहे का, की ज्याच्या जवळ आल्यावर या लोकांना आत्मसाक्षात्कार कसा काय होतो? जिथे 10-10 वर्षे काढली त्या पक्षात आपले कोणी ऐकत नाही, पक्ष धनदांडग्यांच्या ताब्यात गेला आहे, आपली मुस्कटदाबी होत आहे, असे एकाहून एक शोध यांना लागतात. ज्या पक्षाच्या बळावर आमदारकी-खासदारकी भोगली तिथेच त्यांची घुसमट होत असल्याचा साक्षात्कार होतो. जनतेच्या प्रश्नांबद्दल वर्षानुवर्षे अनभिज्ञ असलेल्या लोकांना, कुठल्याही प्रश्नावर 'मी माहिती मागवली आहे, माहिती घेऊन सांगतो' असे साचेबद्ध उत्तर देणाऱ्यांना, वातानुकूलित कक्ष आणि स्कॉर्पियो-हमर यांसारख्या गाड्यांमध्ये वावरणाऱ्यांना घुसमटीची जाणीव करून देणाऱ्या त्या निवडणूक नामक बोधिवृक्षास नमस्कार असो!

(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. ही नोंद आपण येथेही वाचू शकता).