Sunday, November 9, 2014

अटीतटीचे राजकारण!

चर्चा, मग ती जागा वाटपाची असो किंवा मंत्रिमंडळात जागा मिळण्याची, ती सुरू असली की मला माझेच हे जुने व्यंगचित्र हमखास आठवते. आता सरकारमध्ये सामील होण्यासाठी भाजपशी बोलणी करण्याआधी आणखी एक अट टाकून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी असेच एक पाऊल टाकले आहे. त्याआधी भाजपनेही आधी विश्वास प्रस्ताव व मगच मंत्रिमंडळात समावेश, अशी अट टाकून याचप्रकारचे राजकारण केले आहे.
शिवसेना आणि भाजपला जे काही सिद्ध करायचे असेल ते करोत. मग तो विश्वासदर्शक ठराव असो किंवा स्वबळावर जिंकण्याची क्षमता असो. पण त्यासाठी जनतेला वेठीस धरून ही मंडळी काय साध्य करत आहेत?
विधानसभा निवडणुकीपूर्वी या लोकांनी असेच अटी-प्रतिअटींची हुतूतू खेळले आणि दोघांचाही दम निघेल एवढी चिखलफेक केली. ती कमी म्हणून की काय, आता सरकारमध्ये जायचे अथवा नाही, यावर अटीतटीचे राजकारण चालू आहे.

पाच वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमत मिळाल्यावरही सरकार स्थापनेसाठी 12 ते 17 दिवस लागले होते. कारण तीही मंडळी एकमेकांना अशा स्वतःच्या बेटकुळ्या दाखविण्यात गर्क होती. आज त्यांचे हाल सर्वांच्या समोर आहेत. यांचेही असे न होवो, म्हणजे मिळवली!

No comments:

Post a Comment