Tuesday, November 17, 2009

विक्रम वेताळ आणि सच्छील खेळाडू

राजा विक्रमाने परत आपली जुनी-पुराणी भंगार फटफटी बाहेर काढली आणि तिला कीक मारली. अनेक शतकांच्या शिरस्त्याप्रमाणे तो वेताळाला घेऊन येणार होता. बायपासवरून दहा मिनिटांतच तो शहराजवळच्या जंगलात पोचला. वेताळाची बसण्याची जागा तर त्याला माहितच होती. शिवाय ज्या झाडाजवळून रिअॅलिटी शोचा आवाज ऐकू येतो, तिथे वेताळ असतो हे त्याला माहित होतं. त्यामुळे त्याने तिकडे मोर्चा वळवला आणि वेताळाला उचलून खांद्यावर घेतले. वेताळाचेही आवडते पात्रं शोमधून बाहेर पडल्याने त्यालाही शो बघण्यात रस नव्हता. त्यापेक्षा राजाला जरासे छेडून त्याला ताज्या घडामोडीवर आजचा सवाल विचारावा निघून जावे, असा खासा बेत त्याने रचला होता.

गाडी महामार्गाला लागताच वेताळाने आपले तोंड उघडले. तो म्हणाला, “ए राजा, परिवहन अधिकाऱ्यांनी गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये असा नियम केला आहे. केवळ बोलण्यासाठी तो लागू नाही. तरीही तू असा गप्प गप्प का?  दुचाकी चालकांना अद्याप टोल द्यावा लागत नाही, त्यामुळे तू मला नेण्यासाठी कितीदाही येऊ-जाऊ शकतोस. तरीही सत्ताधारी नेत्यांसारखे न बोलता तुला मुका कावा साधायचा असेलच, तर मी मात्र विरोधी पक्षांसारखा आवाज काढतच राहणार. त्यासाठी कितीदाही निलंबित होण्याची माझी तयारी आहे. कारण मेली कोंबडी आगीला भीत नाही. मग वेताळ कशाला निलंबनाला घाबरेल? मी तुला आता एक फर्मास कथा सांगतो. ती नीट ऐक.  मी त्या कथेवर आधारित एक प्रश्न विचारेन. त्याचे उत्तर कार्यक्रमानंतर एसएमएसद्वारे दे.”

इतके बोलून वाहतूक पोलिस जसे नियम मोडणाऱ्या वाहनांची वाट पाहात रस्त्याच्या कडेला उभे राहतात, तसा एक सहेतूक पॉज वेताळाने घेतला. मग तो महागाईसारखा सुटला, “एक नगरी होती. ती राज्याची राजधानी नव्हती तरी राज्याच्या राजधानीपेक्षा त्या नगरीचा तोरा जास्त होता. कारण राज्याच्या राजाचा, मंत्र्यांचा, सरकारी अधिकाऱ्यांचा, झालंच तर सरकारचाही खजिना भरण्याची ताकद त्या नगरीत होती. अशा या नगरीत राज्याच्या सगळ्या भागातून लोक येत होते. त्याबद्दल त्या नगरीच्या लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळेच नाराजीचे नाराजकारण करणारे पक्षही तिथे होते. ही नगरी उभी करण्यासाठी नगरीच्या लोकांनी दिलेल्या लढ्याचे उदाहरण पक्ष देत होते. तरीही नगरी आडवी करण्याऱ्यांना अडवण्याची त्यांची प्राज्ञा नव्हती. नगरीबाहेरचे लोक याच्याविरूद्ध होते. आता पुढे काय झाले ऐक.

“या नगरीतून मोठे झालेले काही लोक होते. त्यांच्यामध्ये एक सच्छील असा खेळाडू होता. तोंडावर नियंत्रण असल्याबद्दल त्याची ख्याती होती आणि त्याची कामगिरीही चोख होती. राज्यात सगळीकडे त्याच्या नावाचा दबदबा होता. या नगरीच्या लोकांना त्याचा खास अभिमानही होता. आपला माणूस म्हणून त्याच्याकडे सगळे अपेक्षेने पाहायचे. एकदा काय झाले, कोणालाही अशक्य अशी प्रदीर्घ खेळी केल्याबद्दल या सच्छील खेळाडूचा सत्कार सगळ्यांनी आयोजित केला. राज्याच्या, नगरीच्या नव्हे हां, मुखंडांनी त्याला एका मंचावर ठेवले. याचवेळी बोलताना कधी नाही ते या सच्छील खेळाडूने जाहीर केले, की ही नगरी केवळ त्या नगरीच्या नव्हे तर सगळ्या राज्याची आहे. त्याच्या या वाक्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. ज्येष्ठांनी टीका केली तर कनिष्ठांनी दुर्लक्ष केले. तर आता तू मला सांग, काहीही गरज नसताना या सच्छील खेळाडूने असा बाँबगोळा का टाकला?  गेला काही वर्षे त्याने फिरकी गोलंदाजी केलेली नाही म्हणून का असा दुसरा टाकला? माझ्या प्रश्नाचे उत्तर ताबडतोब दे, राजा नाहीतर तुझ्या या मतलबी मौनाचा मी कडक शब्दांत निषेध करीन. झालंच तर तुझ्या पुतळ्याचे दहन करीन. फेसबुकवरील तुझ्या सगळ्या मित्रांपर्यंत तुझे हे अपयश पोचवीन…” थेट प्रक्षेपण करताना वृत्तवाहिन्यांचे बातमीदार करतात तशी असंबद्ध बडबड करत वेताळ हातवारे करू लागला. तितक्यात कौटुंबिक मालिकांमधील पुरूष मंडळी करतात तसा मख्ख चेहरा करून राजा बोलला.

 

“वेताळा, अरे रिएलिटी शो आणि दररोजच्या मालिका सोडून हा तमाशा बघितल्यामुळे तुला हा प्रश्न पडला का? अरे, ज्या ठिकाणी, ज्या मंचावर हा प्रसंग घडला तो जरा आठवून पाहा बरे. त्यात मुळचे नगरीचे माणसं किती आणि नगरीबाहेरचे मात्र राज्यातील किती, याचा तू अंदाज घेतला का? या सच्छील खेळाडूला फारसे बोलून कधी माहित नव्हते, असे तूच म्हणतोस. माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या मुलाखती घेणाऱ्यांनीही त्याला कधी राजकारणाचे प्रश्न विचारले नाहीत. मात्र त्या दिवशी माध्यमांच्या लोकांनी त्याला तावडीत घेऊन त्याला असे काही प्रश्न विचारले, की त्याला ते वाक्य बोलावेच लागले. वरच्यांना सांभाळण्यासाठी जे खालच्यांना दाबतात, त्यांनाच माध्यम म्हणतात हे तुला ठाऊक नाही का? भौगोलिकदृष्ट्या नगरी ही राज्याचाच भाग आहे, हे कोणीही बोलू शकतो. शिवाय वर्षातले आठ-दहा महिने नगरीबाहेर तेही राज्याबाहेरच काढणाऱ्या त्या खेळाडूला वास्तव परिस्थिती काय आहे, याचं ज्ञान असण्याची शक्यता किती?

“वेताळा, आपल्याला हवं ते कोणाकडून कसं बोलवून घेतलं जातं याचा एक उत्तम नमुना तुला माहित आहे का? सर्वोच्च धर्मगुरु पोप एकदा परदेश दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी त्यांचे विमान जमिनीला लागताच पत्रकारांनी त्यांना घेरले. पत्रकारांनी त्यांना विचारले, तुम्ही येथील वेश्यांना भेटणार का? त्यावर पोप उत्तरले, येथे वेश्या आहेत का? दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत ठळक मथळा होता, पोप विचारतात येथे वेश्या आहेत का? अशा परिस्थितीत त्या बिचाऱ्या खेळाडूचा दोष काय? त्याच खेळाडूचे दुसरे वाक्य होते, की त्याला या नगरीचा नागरिक असल्याचा अभिमान आहे. त्याला मात्र पत्रकारांनी कशी बगल दिली, हे तू पाहिले नाहीस काय? त्यामुळे वेताळा, या साऱ्या घटनेत त्या खेळाडूचा दोष किंचितही नसून त्याच्या तोंडून आपला अजेंडा राबवून घेणारे नगरीबाहेरचे पत्रकार  आणि अशा लोकांना तोंड देण्याचा खेळाडूला नसलेला अनुभव, या तेवढ्य़ा दोषी आहेत.”

राजाने आपले भाषण संपविले नाही तोच वेताळाने एक गडगडाटी हास्य केले. तो म्हणाला, “राजा, तू राजा असल्याने पत्रकारांना कसे हाताळावे तुला माहित आहे. त्यामुळेच तू काहीही बोलत नाहीस. मात्र वेताळ होण्यापूर्वी मीही पत्रकारच होतो. त्यामुळे गप बसणाऱ्यांना कसे बोलते करावे, हे मलाही माहित आहे. आता तू बोललास आणि मी चाललो. आता पुढल्या इलेक्शनपर्यंत मला असेच झाडावर मालिका पाहत बसू दे.”

इतके बोलून वेताळाने फटफटीवरून रस्त्यावर उडी मारली. विरूद्ध बाजूने जाणाऱ्या एका सहा आसनी रिक्षाला हात दाखवून त्याने ती थांबविली आणि राजाला कळायच्या आत तो रिक्षात बसलाही. भाज्यांचे वाढणारे भाव बघत राहावेत तसा राजा त्या रिक्षाकडे पाहत राहिला.

Saturday, November 14, 2009

शेतकरी आणि राजाः माध्यमांची अदलाबदल

-अँड्रयू ब्राऊन (गार्डियन)

जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये ७० लाख डॉलरच्या जाहिराती गुगल देणार आहे, हे ऐकून एक पत्रकार म्हणून मला आनंद झाला. जणू काही आता ख्रिसमसच आहे. मात्र कुडकुविणाऱया थंडीचा ख्रिसमस व मी जणू एक शेतकरीच आहे. या शेतकऱयाला उदार राजाने पाहिले स्वयंपाकासाठी लाकडे गोळा करताना पाहिले.

हा राजा-गुगलचा अध्यक्ष एरिक श्मिड्ट- आपल्या हुजऱयासोबत येतो आणि त्याच्या मेजवानीतून उरलेले पक्वान्न मला पोचत करायला सांगतो. या पक्वान्नांबाबत माझी काहीच तक्रार नाही. मात्र राजा गेला आणि मी झोपडीत परतलो, की तो राजाच राहणार आणि मी शेतकरीच राहणार. राजा आणि शेतकऱयातील फरक एवढाच नाही, की एकाला पोटभर खायला मिळते आणि दुसऱयाला नाही. हा फरक महत्वाचा आहे, मात्र तो बदलू शकतो खरा महत्वाचा फरक म्हणजे राजा शेतकऱयाचे आहे नाही ते अन्न हिरावून घेऊ शकतो. शेतकऱयाची ती प्राज्ञा नसते. त्याचा तर त्याने स्वतःच्या मेहनतीने कमाविलेल्या संपत्तीवरही हक्क नसतो.

वर्तमानपत्रे ऑनलाईन होत असताना त्यांची गती हीच होणार असल्याची त्यांना भीती आहे. नव्या जगात आपण गुगलचे मजूर असणार आहोत. आतापर्यंत लोक वर्तमानपत्रे विकत घेत. आता, लोक जाहिरातदारांकडून मिळणाऱया सेवांशिवाय इतर कशासाठीही पैसा देण्यास तयार नाहीत. बातमीचे कार्यही आता केवळ जाहिराती मिळविणे, एवढेच राहणार आहे. पत्रकारांना मान्य नसले तरी हे कायमचे सत्य आहे. आता इंटरनेटच्या काळात तर प्रत्येक गोष्टीमागे हेच सूत्र असणार आहे.

वर्तमानपत्रांतून पैसा कसा मिळतो, हे केवळ वर्तमानपत्रे चालविणाऱयांनाच माहित. लॉर्ड बीवरब्रुक यांनी तर त्यांच्या यशाचा एक नियमच तयार केला होताः कोणत्याही पत्रकाराच्या जागी दुसरा एखादा पत्रकार आणता येतो. मात्र वर्तमानपत्रांतून पैसे मिळविणारे लोक आता वर्तमानपत्राचे नव्हे, तर गुगलचे मालक आहेत. ते एक पाऊल पुढे टाकून असंही म्हणू शकतातः कोणत्याही वर्तमानपत्राच्या जागी दुसरे वर्तमानपत्र आणता येते.

गुगल काही दुष्ट नाही. सुरक्षितही आहे. मात्र पन्नास वर्षांनी याच कंपनीचा इंटरनेटच्या बाजारावर कब्जा राहिल, असे म्हणणे मूर्खपणाचे होईल. खरं तर त्यावेळी लोकांना टाईप करताना किंवा कोणाशी बोलताना आपण एखाद्या बाजाराचा हिस्सा आहोत, याची कल्पनाही येणार नाही. त्यांना ती जादूच वाटेल. मात्र त्या जादूतून कोणीतरी पैसे कमाविलच आणि तो कोणीतरी आपण नसू. आता गुगल पुस्तकांच्या जगात प्रवेश करत आहे. वर उल्लेख केलेल्या जाहिराती या जगातील सर्व महत्वाच्या ग्रंथालयांचे डिजिटाईजेशन करून ते मोफत उपलब्ध करून देण्याच्या मोठ्या योजनेचा भाग आहेत. या पुस्तकांचे प्रताधिकार असणाऱयांना, ज्यांच्यासाठी त्या जाहिराती दिल्या आहेत, विशिष्ट रक्कम दिली जाईल. रेडियोवर प्रसारित होणाऱया संगीतासाठी कलाकारांना मानधन मिळते, तसेच आहे हे. अशा व्यवस्थेतून गेल्या वर्षी मी ३७.५० पौंडांची कमाई केली. त्यामुळे मी सांगू शकतो, की या योजनेत खाचखळगे आहेत. पण तो गुगलचा दोष नाही.

पुस्तकांचे प्रकाशन इलेक्ट्रॉनिक स्वरूपातच केवळ होणार असेल, तर लेखकांचे आणखी मरण आहे. कारण पुस्तक लिहिणे हे कॉपी प्रोटेक्शनच्या दृष्टीने सर्वमान्य आणि साधे साधन आहे. पुस्तकांचीही डिडिटल संगीतासारखी उचलेगिरी होणार असेल, तर पुस्तक लिहिणाऱयांच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा ठरेल. एखाद्या बाजाराचेही काही कायदे असतात व त्यांच्या अंमलबजावणीचे मार्गही. शेतकऱयांना राजांची भीती वाटत असे, मात्र त्यांना अराजकाची जास्त भीती वाटत असे. त्याला तशी कारणेही होती. गुगल हा चांगला, समर्थ, समंजस राजा वाटतो. मी तरी या राजाचे स्वागत करतो. 

----------------------

सहा महिन्यांपूर्वी गार्डियन वृत्तपत्रात आलेल्या लेखाचा Andrew Brown यांच्या लेखाचा हा अनुवाद. यात गॉर्डन यांनी गुगलमुळे वृत्तपपत्रांवर
होणाऱ्या परिणामांची चर्चा केली आहे.



Friday, November 13, 2009

मनसेला पाठींबा दक्षिणेचा

राज ठाकरे आणि त्यांची मनसे यांच्याबद्दल मराठी माध्यमांत आणि ब्लॉगवर इतकं काही लिहिले जात आहे. मात्र अन्य माध्यमांत, खास करून दक्षिण भारतीय भाषांमध्ये काय प्रतिक्रिया उमटत आहेत, याचा कोणीही अदमास घेताना दिसत नाही. काही तेलुगु आणि तमिळ वर्तमानपत्रे व ब्लॉगचा धुंडाळा घेण्याचा प्रयत्न केला. वर्तमानपत्रांची प्रतिक्रिया साधारण आपल्यासारख्या वर्तमानपत्रासारखीच आहे. मात्र ब्लॉगवरील प्रतिक्रिया या अधिक मोकळ्या आणि खऱ्या आहेत.

काही ठिकाणी हिंदी न शिकल्यामुळे तमिळ लोकांचे नुकसान झाले आहे, असा सूर आहे तर काही ठिकाणी पेरियार यांनी एके काळी जे केले तेच राज आणि मनसे आता करत आहेत, अशीही स्पष्टोक्ती आहे. मनसेच्या आमदारांची कृती देशाच्या ऐक्याला घातक आहेत असे काही म्हणतात. एका व्यक्तीने मात्र, या आमदारांची कृती विघातक असल्याचे सांगतानाच, हिंदी हि देशाची राष्ट्रभाषा असल्याचे असत्य पसराव्नियात येऊ नये, अशीही विनंती केली आहे.

आन्ध्रप्रभा हे एक्सप्रेस समुहाचे तेलुगु प्रकाशन. या वर्तमानपत्राने १२ नोवेम्बेरच्या अग्रलेखात मनसेचा समाचार घेतला आहे. "भाषा आणि प्रांताच्या दुराभिमानाचे प्रतिक असलेल्या  शिवसेनेत राज यांनी अनेक वर्षे काम केले आहे. त्यांच्यात आणि शिवसेनेत फारसा फरक नाही. भाषा आणि अन्य कारणावरून लोकांमध्ये फूट पाडणारे अनेक पक्ष, संघटना आणि व्यक्ती या देशात आहेत. केवळ उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या वैयक्तिक भांडणामुळे राज यांनी हा तमाशा चालविला आहे," असे मत आन्ध्रप्रभाने व्यक्त केले आहे.

सिंगापूर येथील तमिळ अभियंता को वी कन्नन याचा ब्लॉग आहे 'कालम' नावाचा. त्याच्या १० नोवेम्बेरच्या पोस्टाचे शीर्षक आहे 'महाराष्ट्राविल परवुम द्राविड वियादी' (महाराष्ट्रात पसरणारा द्रविड रोग). त्यात त्याने लिहिले आहे, की हिंदी न शिकल्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे चित्रपट पाहता येत नाहीत, तमिळ पर्यटकांना देशाच्या इतर प्रांतात गेल्यावर नीट  आस्वाद घेता येत नाही. उत्तर भारतीय उद्योजक तमिळनाडूत व्यवसाय करण्यापूर्वी चार-चारदा विचार करतात. मोठ-मोठे राष्ट्रीय नेते तमिळनाडुत गेल्यावर केवळ भाषेच्या अज्ञानामुळे जनतेशी संवाद स्थापू शकत नाहीत. द्रविड नेत्यांच्या हिंदी विरोधाची आठवण करून देऊन लेखकाने वर, 'म्हणजे द्रविड संस्कृती संपूर्ण भारतात पाय पसरत आहे,' अशी मार्मिक टिप्पणी केली आहे.

मुंबईमध्ये राहणाऱ्या राजा वैस या तमिळ लेखकाने एकप्रकारे मनसेची पाठराखण केली आहे. जेमतेम २५०-३०० शब्दांची ही पोस्ट मुळातूनच वाचण्यासारखी आहे. रजनीकांतच्या एका जुन्या संवादाची आठवण करून राजा म्हणतो, "अबू आझमीला आधी सांगून मारले या घटनेतून राज यांनी आपला शब्द पाळला. ज्याप्रकारे हिंदी वाहिन्या अबूच्या कुटुंबावर फोकस करत होत्या ते पाहून या माणसाला इतके महत्व देण्याची गरज आहे का, असा प्रश्न पडत होता. हिंदी आणि मराठीच्या लिपीत फारसा फरक नसल्याने ज्याला हिंदी येते त्याला मराठीही येते. अशा परिस्थितीत मला मराठी येत नाही हे अबुचे म्हणणे कोणालाच मान्य होण्यासारखे नाही. मारहाण करणे चुकीचे असले तरी त्या मारहाणीमागे  काही योग्य कारण आहे. असा राग ५० वर्षांपूर्वी तमिळ लोकांनी दाखविला म्हणूनच हिंदीच्या विरोधात लढा यशस्वी झाला."

अर्थात याच्या उलटही काही प्रतिक्रिया आहेत. त्यात राज ठाकरे हे दहशतवाडी असल्याचे म्हणणारे जसे ब्लोग आहेत तसे केवळ हिंदी माध्यमांतील बातम्यांचे भाषांतरही आहेत.

Thursday, November 12, 2009

माहिती हवीय तर मोबदला द्या

माध्यम सम्राट रुपर्ट मर्डोक यांनी अखेर गुगल विरूद्ध युद्धाचे बिगुल फुंकले आहे. गेली दोन तीन वर्षे पाश्चात्य माध्यमांना, खासकरून मुद्रीत माध्यमांना गुगलने, त्यातही गुगल न्यूजने जेरीस आणले आहे. विविध पातळ्यांवर याबाबत चर्चा चालू असतानाच, आपल्य़ा मालकीच्या न्यूज कॉर्पोरेशन समूहाच्या संकेतस्थळांवर गुगलच्या बॉट्सना (BOTS) प्रवेश न करू देण्याचे सूतोवाच मर्डोक यांनी केले आहे. आपल्याच स्काय न्यूज ऑस्ट्रेलियाला दिलेल्या मुलाखतीत मर्डोक यांनी म्हटले आहे, की या संकेतस्थळांवर येणारे पाहुणे गुगलच्या शोधपरिणामांतून येतात. त्यांची संकेतस्थळावरील मजकूराशी सलगी नसते. त्यामुळे अशा उचलेगिरी करणाऱ्या लोकांपेक्षा मोजकेच पण पैसे देऊन वारंवार येणारे वाचक या संकेतस्थळांवर यावेत, असा प्रयत्न करण्यात येईल. त्यासाठी मुदत देण्यात आलेली नाही.

बातम्या पुरविणाऱ्या बहुतेक संकेतस्थळांची कमाई ही त्यावरील जाहिरातींच्या उत्पनातून होत असते. मात्र इंग्रजीसारख्या भाषेत जिथे जगभरातील वर्तमानपत्रे, वाहिन्या आणि ब्लॉग्ज अहोरात्र मजकूर (content) पुरवित आहेत, तिथे जाहिराती येणार किती आणि कुठून? गुगलच्याच अॅडसेन्सने प्रकाशकांना जाहिराती मोठ्या प्रमाणात पुरविल्या मात्र त्यातून उत्पन्न अगदी तटपुंजे मिळते. एखाद्या छोट्या ब्लॉगरला कदाचित त्यातून आपली उपजीविका भागविणे शक्य असेल मात्र मोठ-मोठ्या कंपन्यांनी त्यावर कसे भागवावे? मर्डोक यांनी याच मुद्यावर बोट ठेवले आहे. "गुगलवरील एखादे शीर्षक बघून कोणीतरी या संकेतस्थळांवर येतो आणि जातो. त्यातून फायदा काय होणार? लोकांना मोफतमध्ये काही देऊ नये," असं त्यांचं म्हणणं आहे.

मर्डोक यांच्या म्हणण्यात काहीसं तथ्य आहे. अशा पद्धतीने वाचकांना मोफत काही न देता माहितीसाठी मोबदला घेण्याने उत्पन्न काहीसे वाढेल. शिवाय इंग्रजीत नक्कल करणे खूप सोपे आहे. त्यामुळे एखादी बातमी कोणत्याही संकेतस्थळाने पहिल्यांदा दिली, की तीच Ctrl+c Ctrl+v करून जुजबी फेरफार केले, की दुसऱ्या संकेतस्थळांवर दिसायला लागते. अगदी अल्पावधीत ती इतक्या ठिकाणी पसरते, की मूळ बातमी देणाऱ्याचे संकेतस्थळ पाहण्याची कोणाला गरजही पडत नाही. मायकेल जॅक्सनच्या मृत्यूची बातमी सर्वात आधी टीएमझेड या संकेतस्थळाने दिली होती. मात्र भाव खाल्ला लॉस एंजेलिस टाई्म्सच्या संकेतस्थळाने. त्यामुळे मर्डोकसाहेब बोलले ते खरं आहे. मात्र त्यात एक मेख आहे.

बातमी देणाऱ्याने आपले हात आखडते घेतले तरी वाचणाऱ्याला ती वाचायची उत्सुकता हवी. मर्डोक यांच्याकडे वॉल स्ट्रीट जर्नल, फॉक्स न्यूज, स्काय न्यूज अशी यशस्वी ब्रांड्स आहेत. त्यातील डब्लूएसजेने मजकुरासाठी मोबदला घेण्याची पद्धत आधीच राबविली आहे. अन्य संकेतस्थळांवरील मजकुरासाठी तसेच पैसे मोजण्याची वाचकांची इच्छा आहे का, हाच कळीचा प्रश्न आहे. अन् वाचकाने पैसे मोजले तर त्याबदल्यात त्याला त्याच प्रतीचा मजकूर मिळेल, याची काय व्यवस्था आहे. मर्डोक यांच्या मुलाखतीनंतर अनेक ठिकाणी, अनेक फोरमवर चाललेल्या चर्चेचा इत्य़र्थ हाच आहे. इंटरनेटवरील मुक्त आणि मोफत माहितीची सवय झालेला वाचक खिशात हात घालून बातमी वाचणार का, हा मोठा सवाल आहे. या प्रश्नाचे उत्तर खुद्द मर्डोक यांच्याकडेही नाही.

दरम्यान, गुगलने आपली बाजू स्पष्ट करताना म्हटले आहे, की आम्ही वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांवर दर महिन्याला अब्जावधी वाचक (किंवा प्रेक्षक म्हणा) पाठवत असतो. (त्यातील गोम अशी, की गुगल हजारो वृत्तपत्रांच्या संकेतस्थळांची यादी सादर करतो. अब्जावधी वाचक हजारो संकेतस्थळांवर सरासरी दीड मिनिटांसाठी गेल्यानंतर ते कोणत्या जाहिरातींवर क्लिक करणार आणि त्यातून वृत्तपत्रांना काय डोम्बले मिळणार). या वाचकांना खिळवून ठेवण्याची, त्यांना आपल्या व्यवसायाशी बांधून ठेवण्याची संधी प्रकाशकांना (म्हणजे संकेतस्थळ मालकांना) मिळते. प्रकाशकांना वाचक हवे असतात म्हणूनच तर ते मजकूर प्रकाशित करतात. शिवाय आपल्या संकेतस्थळांवर काय असावे-नसावे याचे पूर्ण स्वातंत्र्य संकेतस्थळधारकाला असते.

आता सामना सुरू झाला आहे आणि तो अनेक वळणे घेत जाणार आहे. पाहूया पुढे काय होते ते.


Monday, November 9, 2009

आज खरी विधानसभा जनसभा झाली

महाराष्ट्राच्या विधानसभेत चार आमदारांनी गोंधळ काय घातला, त्या आमदारांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याचे मोठे पाऊल सरकारने उचलले. ज्या त्वरेने हर्षवर्धन पाटील यांनी प्रस्ताव मांडला आणि तो मंजूरही झाला, त्याच तडफेने सरकारने येत्या काळात काम केले तर पुढील चार-पाच सरकारांना राज्यात करण्यासारखे काहीही काम उरणार नाही. मात्र सरकारला चाळीस वर्षांपासून यशस्वी ठरलेली रोजगार हमी योजनाच आणखी यशस्वी करायची असल्याने, भावी सरकारांचा रोजगार हिसकावून घेण्याची आगळीक ते करणार नाही.

विधानसभेत अबू आझमी यांना थोबाडीत मारून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदारांनी सभागृहाची प्रतिष्ठा घालविली, यामुळे पुरोगामी आणि वैचारिक महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे, राडा संस्कृतीची ही पुढची पायरी आणि राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच एवढी अधोगती गाठल्या जाणे हा दैवदुर्विलास आहे….इ. इ. मला या चार ओळी लिहिताना धाप लागली. मात्र अशा चार-चार स्तंभी (पाचवा स्तंभही भरू शकतो मात्र त्याला पंचमस्तंभी म्हणायचे नाही) लेख येत्या काही दिवसांत अगदी धो-धो येणार. नाहीतरी अद्याप जाहिरातींचा रतीब पूर्वासारखा सुरू न झाल्याने जागा कशी भरायची, हा प्रश्नच आहे. मराठी आणि इंग्रजीतील स्वतःला शहाणे समजणाऱ्या पत्रकारांच्या लेखणीला धार येईल.

मात्र कधी न कधी विधानसभेत हे व्हायचेच होते. ज्या विधानसभेत एक सदस्य दुसऱ्यावर पेपरवेट फेकतो, ज्या विधानसभेत माईक आणि राजदंडाची पळवापळव करण्याचे सामाईक वरदान विरोधी पक्षांना मिळाले आहे त्या विधानसभेत सदस्यांनी पडेल चेहऱ्याने चर्चा करावी, ही अपेक्षाच नाही. पाण्याच्या प्रश्नावर मोर्चे काढल्यानंतर बंदुकीतील गोळ्यांना बळी पडणाऱ्या, पुतळ्यांना कोणी हात लावला म्हणून जीवंत माणसांना माणसातून उठविणाऱ्या, वाहतुकीचे नियम मोडले म्हणून कारवाई केल्यास पोलिसांवर डाफरणाऱ्या आणि गंमत म्हणून लोकल गाड्यांवर दगड फेकणाऱ्या लोकांचे प्रतिनिधी एकमेकांशी मुद्याला धरून बोलताहेत, हे चित्रच अनैसर्गिक आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत गेली पन्नास वर्षे अपवाद वगळता हे चित्र अगदी रंगवून-रंगवून प्रदर्शित करण्यात आले. मात्र त्याचे प्रदर्शनीय मूल्य आता संपले असून वास्तविक होण्याचे दिवस आले आहेत, या राज्यस्थापनेला पन्नास वर्षे होत असतानाच दाखवून दिल्याबद्दल खरे तर मनसे आमदारांचे आपण आभारी असायला हवे.

राज ठाकरे याच्या 13 नवनिर्माण सैनिकांपैकी चारांची गच्छंती झाल्याने आता त्यांच्या आमदारांची संख्या 9 वर आली आहे. त्यांना ही संख्या लाभदायक आहे म्हणे.  सभागृहाने या सदस्यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्याऐवजी डायरेक्ट बडतर्फ का केले नाही, हे गौड'बंगाल’ कोण उलगडील बरे. या चार जागांवर कदाचित निवडणूक झाली आणि जादा मतांनी हे चौघे निवडून आले तर कोण उगाच विषाची परीक्षा घ्या.  त्यापेक्षा हे बरे आहे. प्रत्येक प्रसंगात बरेपणा पाहण्याच्या या गुणाला कधीकधी चाभरेपणा असंही म्हणतात. आपल्या विधानसभेच्या सदस्यांना त्यांच्या अंगावर कोणी हात टाकलेले आवडत नाही. त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा अंगिकार करण्याचे त्यांना वावडे नाही. सात-आठ वर्षांपूर्वी मराठवाड्यातील विना-अनुदानित महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सभागृहातच आमदारांच्या अंगावर उड्या मारल्या होत्या. त्यावेळी सभागृहात चर्चाच चालू होती आणि पोरं प्रेक्षक गॅलरीत बसली होती. उड्या मारल्यानंतर सर्व आमदारांनी त्या पोरांना तर चोप दिलाच नंतर त्यांना पोलिसांनीही ताब्यात घेतले. आता मारणारे आणि मार खाणारेही सभागृहाचेच सदस्य असल्याने अॅक्शनपट अधिक रंगणार आहे.

त्यामुळे मनसेचे सदस्यहो, तुम्ही बिल्कुल मनाला लावून नका घेऊ. महाराष्ट्राच्या सध्याच्या मानसिकतेला साजेसेच कृत्य तुम्ही केले आहे. रिझल्ट ओरिएंटेड अशा या मार्गाची कास धरल्याशिवाय, विकासाची सुतराम शक्यता नाही, हे लक्षात घ्या. पारंपरिक मार्गाने जाल तर फार फार तर राळेगण सिद्धीपर्यंत पोचाल. त्यापेक्षा सर्व सिद्धीला कारण ठरणाऱ्या या मार्गावरून तुम्ही जसजसे जाल, तसतसे अधिकाधिक लोकप्रिय व्हाल. कारण, सध्याच्या काळात कोणालाही प्रिय व्हायचे असेल तर अन्य कोणाल तुडविणे, बडविणे, वाजविणे (देशकालपरिस्थिती पाहून)  आवश्यक आहे. आम्हाला कोणाही आजमावून पाहू शकत नाही, हे तुम्ही दाखवूनच दिले. पूर्वी वेडात सात वीर दौडत जायचे, आता वेड पांघरून पेडगावला जाणाऱ्यांना चार जणही ठणकावू शकतात, हा या घटनेचा मथितार्थ.

……………….

वि. सू. अबू आझमी या माणसाबद्दल काहीही लिहिलेले नाही. तो उल्लेख अनवधानाने राहून गेलेला नसून, मुद्दाम केलेला नाही.

Friday, November 6, 2009

कस्त्वं कोऽहं कुत आयातः

मी कोण हा मानवाला पडलेला पहिला प्रश्न आणि त्याचे उत्तर आजतागायत तो शोधतोच आहे. मी कोण हा प्रश्न जसा माणसाला पडतो, तसाच माझा कोण किंवा आपला कोण हाही प्रश्न त्याला फार चटकन पडतो. जे माणसाचे तेच देशाचे. तेच राज्याचे. त्यामुळेच महाराष्ट्रात मराठी माणसाच्या नावाने आंदोलने सुरू झाली, की मराठी कोण आणि उपरा कोण असा वाद सुरू होतो. भारतातही राष्ट्रियतेचा वाद असाच माजलेला आहे. त्यातही काही समूह, काही देश स्वतःची वेगळी अशी ओळख जपतात. मात्र आपण कोण याचा धुंडाळा एक राष्ट्र म्हणून घेणारे देश विरळेच. सध्यातरी हा देश आहे फ्रांस. गेल्याच आठवड्यात मी फ्रांसमधील राजकीय घडामोडींवर लिहून, त्याचा आपल्या देशाशी संबंध जोडला होता. त्यातच याही आठवड्यात तशीच एक घटना घडली, जी आपल्या दृष्टीने रिलिवंट किंवा संबंधित आहे म्हणा.

फ्रांसचे गृह मंत्री एरिक बेसाँ यांनी फ्रासंच्या राष्ट्रीयतेवर, फ्रेंच म्हणून असलेल्या ओळखीबाबत चर्चा सुरू केली आहे. येत्या जानेवारी महिन्यापर्यंत देशातील आणि फ्रांसबाहेर असलेल्या फ्रेंच वसाहतीतील नागरिकांना या चर्चेत सहभागी होता येणार आहे. त्यासाठी त्यांनी एक स्वतंत्र संकेतस्थळही सुरू केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मूळ फ्रेंच नागरिक आणि परकीय नागरिक यांच्यात तणावाचे अनेक प्रसंग आले. 2005 साली तर या तणावाने दंगलींचे स्वरूप घेतले. शिवाय धार्मिक चिन्हांवर बंदी घालण्याचा विषय तर फ्रांसमध्ये अनेक वर्षे वादाचा विषय आहे. बेसाँ यांनीच गेल्या आठवड्यात बुरख्यावर बंदी घालण्याचे सूतोवाच केले होते. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या लोकशाहीच्या तत्वांची देणगी फ्रांसने जगाला दिली आहे. मात्र तेवढे पुरेसे नाही. आताच्या काळाला सुसंगत अशी ओळख आपण निर्माण केली पाहिजे. त्यामुळेच नागरिकांनी या चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन बेसाँ यांनी केले आहे.

हे झाले फ्रांसचे. आपण मारे विविधतेत एकता, गंगा जमना संस्कृती वगैरेंच्या गप्पा करतो. मात्र भारतीय म्हणजे काय याचा आपण कधी विचार केलेलाच नाही. भारतीय सोडून द्या, अगदी महाराष्ट्रीय म्हणजे कोण, याचीही आपण चर्चा केलेली नाही. कोणीतरी येतं आणि मराठी माणसावर अन्याय होतो म्हणतं. पण मराठी माणूस म्हणजे नक्की कोणता, हे कोणीच सांगत नाही. मागे एकदा मॅक्स मुल्लर भवनने जर्मन भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेतली होती. त्यावेळी कॅनडात राहणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने छान निंबध लिहिला होता. कॅनडात असताना मी भारतीय असतो, भारतात आल्यावर अनिवासी भारतीय असतो, काहीजण मला दक्षिण भारतीयच म्हणून ओळखतात, माझ्या राज्यात गेल्यावर मी चेन्नईवाला असतो, चेन्नईला गेल्यावर मी हिंदू असतो, हिंदूंमध्ये मी ब्राह्मण असतो आणि ब्राह्मणांमध्येही मी अमुक शाखेचा असतो…इत्यादी.

खऱोखरच आपल्यालाही ही समस्या जाणवत असते. मी कोण म्हणून कसं सांगायचं. आता माझ्याबद्दलच सांगायचे तर पुण्यात मी मराठवाड्यातला त्यातही नांदेडचा असतो. नांदेडला गेल्यावर इतक्या वर्षांच्या पुण्यातील वास्तव्यामुळे सगळे मला पुणेकरच म्हणतात. पुण्यात आल्यानंतर अनेक दिवस विचित्र उच्चारांमुळे माझ्याशी कोणी मराठी बोलायचेच नाही. दक्षिण भारतीय गाण्यांच्या आवडीमुळे मला अनेक लोकं दाक्षिण्यात्यच समजायचे. दाक्षिणात्य लोकांच्या दृष्टीने मी नेहमीच मराठी माणूस होतो. आज का आनंदमध्ये असताना तर सगळे हिंदी भाषक मला माझ्या मराठीपणाची जाणीव करून देत असत. तो त्यांच्या व्यावसायिक अस्तित्वासाठीच्या संघर्षाचा भाग होता, ही गोष्ट वेगळी.

‘अपनी खुदी को जो समझा, उसने खुदा को पहचाना ,’ अशी ओळ एका जुन्या गाण्यात मी ऐकली होती. मग भारतात एवढ्या प्राचीन काळापासून ऋषीमुनी काय सांगत होते? स्वतःला ओळखा म्हणजे तुम्हाला भगवंत मिळतील, अशीच त्यांची शिकवण होती. तरीही भारतात, महाराष्ट्रात आजपर्यंत या विषयावर कोणीच काही बोलले नाही. भारतीय असणे म्हणजे काय, मराठी माणसाचे लक्षण कोणते, भारतीय माणसाचे गुणधर्म काय, भारतीय नागरिकाचा ठळक अंगभूत गुणविशेष काय याबाबत आजवर आपण चर्चाच केली नाही. त्यामुळेच जगातील दृढतम वर्णव्यवस्था असूनही आपण स्वतःला वर्णविद्वेषविरोधातील लढ्याचे नेते समजतो. मूळ लढवय्या असलेला समाज स्वतःला शांततेचा अग्रदूत म्हणवून घेतो आणि आपसातच लाथाळ्या करून एकमेकांची डोकी फोडतो. अशी चर्चा आपल्याकडे व्हायलाच हवी, होऊ दे थोडी वादावादी आणि आरोप-प्रत्यारोप…पण काहीतरी चांगले हाती लागेल. ते एक वाक्य आहे ना…तुम्ही तारे वेचण्यासाठी जाता तेव्हा अयशस्वी होता. मात्र परत येताना तुमचे हात चिखलाने भरलेले असतील, असंही नाही ना.

Wednesday, November 4, 2009

चार एक्क्यांचा डाव

हाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे कवित्व अद्याप सुरू आहे. मनसे फॅक्टर आणि शिवसेनेची हार ही या निवडणूक निकालांची वैशिष्ठ्ये असल्याचे सांगण्यात येते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे झालेले पुनरागमन अनेकांना रुचलेले नाही. मलाही. मात्र शेवटी हा राजकीय व्यवस्थेचा अटळ परिणाम आहे. तो नाकारून कसा चालेल. मात्र राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने या निकालांमुळे मोठा फायदा झालेला आहे. पुढील काळात राज्याला दिशा देऊ शकतील, असे चार नेते या निवडणुकांमुळे महाराष्ट्राच्या समोर आले आहेत. म्हणजे ते आदी होतेच, मात्र त्यांनी स्वतंत्रपणे आपल्या धोरणीपणाची चुणूक याच वेळेस दाखविली.

राज ठाकरे


हा यंदाच्या निवडणुकीतील हुकुमाचा एक्का. राज ठाकरे आणि त्यांची मनसे गेल्या वर्षभरापासून चर्चेत होती. राज्याबाहेरच्या माध्यमांमध्ये आणि लोकांमध्येही मनसेच्या प्रदर्शनाबाबत खूप उत्सुकता होती. ती वावगी नव्हती हे निकालांनी सिद्ध केले. 2008च्या जानेवारीत राज ठाकरेंनी मराठीपणाचा मुद्दा उचलला आणि जणू एखाद्या मधमाशाच्या पोळ्यात हात घातला. या दीड वर्षात त्यांनी जेवढ्या शिव्या खाल्ल्या असतील, जेवढा अपप्रचार झेलला असेल तेवढा देशात कोणीही झेलला नसेल. न्यायाधीशांच्या निकालपत्रातही त्यांचे दाखले देण्यात येतात, म्हणजे बघा.


मनसेच्या यशामागे राज ठाकरे यांच्याकडे असलेली शिवसेनाप्रमुखांची शैली, त्यांची ढब आहे, हे खरेच. मात्र त्यांनी केलेले इम्प्रोव्हायजेशन, कालसुसंगत बदल फारसे कोणी नोंदले नाहीत. बाळासाहेब हा शिवसेना नावाच्या भव्य व्यासपीठावरचा एकपात्री खेळ होता. त्यांच्या ओघवत्या शैलीत आणि संवादात्मक भाषेत त्यांनी टीका करावी, शिव्याशाप द्यावेत यात कोणाला काही खटकत नसे. राज ठाकरे टीका करतात, नकला करतात मात्र राजकीय व्यासपीठावरून ऐतिहासिक दस्तावेजांचे दाखले देणारा सध्याच्या काळात ते एकमेव नेते आहेत. ही त्यांनी खास कमावलेली शैली आहे. शिवसेनेत असताना ते कधी असे करताना दिसत नव्हते. याकामी त्यांना त्यांच्या अनेक साथीदारांची मदत मिळते, हे खरे असले तरी पी. एचडीच्या प्रबंधात शोभेल अशा संदर्भाच्या टीपण्या जोडत राजकीय भाषण करायला जाण लागते ती खास ठाकरे यांची देणगी.


सगळं जग टीका करत असताना, वेड्यात काढत असताना राज यांनी स्वतःचा पक्ष वाढविला. त्याला मुख्य प्रवाहात आणलं. त्यांच्या या आत्मविश्वासाला दादच द्यावी लागेल. पुण्यात जर्मन शाळेत भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा व्हावा, यासाठी आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावण्यात आल्या. अनेक ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर, पदाधिकाऱ्यांवर खटले भरल्या गेले. त्यातले सगळेच जसे राजकीय सुडबुद्धीने भरलेले नाहीत तसे सगळेच जेन्युइनही नाहीत. काही लोकं पक्ष सोडून गेले आणि जाताना नाना आरोप करून गेले. मात्र अशा परिस्थितीतही मनसेचे इंजिन ट्रॅकवर ठेवण्यात राजना यश आलं. मनसे म्हणजे गुंडगिरी असं म्हणणाऱ्यांना ही एक चपराक आहे.


मनसेतला मोठा दोष म्हणजे एका नेत्यावर अवलंबून असला तरी त्या नेत्याच्या आदेशावर चालणारा तो पक्ष नाही. कार्यकर्ते स्वतःच्या विचारानुसार काहीतरी करतात आणि नेते त्याचे समर्थन करतात, असं चाललं आहे. राजचा राज्याभिषेक झाला आहे मात्र त्यांचे अष्टप्रधान मंडळ अस्तित्वात यायचं आहे. बाळासाहेब स्वतः जेवढे मोठे झाले तेवढेच त्यांनी मनोहर जोशी, सुधार जोशी, छगन भुजबळ, नारायण राणे यांना मोठे केले. मनसेत राज वगळता कोणाचीही सार्वत्रिक ओळख नाही. मनसेचे आमदार तर निवडून आले, आता त्यांना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायला पाहिजेत, काम करायला पाहिजे यावर माझा विश्वास नाही. तसं असतं तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन्ही निवडणुकांत विजय मिळाला नसता. त्या साधूने सापाला दिलेला सल्ला आजही तितकाच खरा आहे, “डसू नको पण फणा काढायला काय हरकत आहे?”


अजित पवार


एका पुतण्याने स्वतःचा पक्ष काढून तो यशस्वी करावा आणि दुसऱ्या पुतण्याने काकांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न करावा, हा अगदीच योगायोग आहे. यंदाची निवडणूक ही अजितदादांनी अगदी अस्तित्वाची लढाई बनविली होती. त्यामुळेच कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीला 20 जागा कमी मिळाल्या आणि अजितदादांचे 15 ते 20 समर्थक अपक्ष आमदार बनले, या योग जुळून आला. खुद्ध पुणे परिसरात तीन आमदार अजित पवार यांना मानणारे आहेत आणि तिघेही बंडखोर असावे, याची संगती त्याशिवाय लागणारी नाही. शिवाय पक्षातर्फे निवडून आलेल्यांमध्ये दादांना विरोध करण्याचा प्राज्ञा कुठे आहे.


आपण केंद्रात पंतप्रधान व्हावे आणि सुप्रिया सुळे यांना वारसदार नेमावे, ही शरद पवार यांची मूळ योजना. लोकसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत ती कागदावर भक्कम वाटायची. मात्र त्या निवडणुकीच्या निकालानंतर योजनेचाही निक्काल लागला आणि अजितदादांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यदाकदाचित राष्ट्रवादीचे अधिक आमदार निवडून आले असते, तर सुप्रियांना मुख्यमंत्री करण्याची चाल साहेब खेळणे शक्य होते. त्यातूनच अजितदादांच्या माणसांना तिकिटवाटपात झुकते माप देण्यात आले नव्हते. केवळ मुख्यमंत्रिपद घ्यायचे यासाठी दोनदा उपमुख्यमंत्रिपद नाकारणाऱ्या अजितदादांच्या हा प्रतिष्ठेचा प्रश्न होता. निव़डणुकीपूर्वी पुण्यात मनसेचीही सरकार स्थापनेसाठी मदत घेता येऊ शकते, ही त्यांची सूचना हा केवळ बोलभांडपणा नव्हता. तो एक गर्भित इशारा होता. आताही उपमुख्यमंत्र्याच्या निवडीवरून जो गोंधळ त्यांनी घातला, तो फुकाफुकी केलेला तमाशा नव्हता. शरद पवार यांच्या अगदी ऐन भराच्या काळात त्यांना स्वतःचे जास्तीत जास्त 60 आमदार निवडून आणता आले. आता पक्षातले 10 ते 15 आणि बंडखोर 15 असे 30आमदार आपण निवडून आणू शकतो, हे अजितदादांनी दाखवून दिले आहे.


राजकारण हा रमीच्या डावासारखा असतो. त्यात केवळ एक्का हातात असून चालत नाही. राजा, राणी असा सिक्वेंसही जुळावा लागतो. शिवाय जोकरचाही जोर पाहावा लागतो. दादांना कदाचित हे यावेळी जमले नसेल. ज्यावेळी त्यांच्या हातात सिक्वेंसचे पत्ते येतील, त्यावेळी राज्यात पुलोदच काय, वसंतदादांचीही पुनरावृत्ती होऊ शकते, हे या निवडणुकीचे इंगित.


अशोक चव्हाण


अशोक शंकरराव चव्हाण महाराष्ट्राला नवी दिशा देऊ शकतील, हे विधान प्रचंड वादग्रस्त होण्याची शक्यता आहे. अकरा महिन्यांपूर्वी त्यांना मुख्यमंत्री केले तेव्हा कॉंग्रेसला पराजयाचे डोहाळे लागले आहेत, असा सूर काढला गेला. त्यांच्या कर्तृत्वावर विरोधकांचा सोडा, त्यांच्या स्वपक्षीयांचाही विश्वास नव्हता. मात्र नांदेड जिल्ह्यात स्वतःच्या राजकारणाची शैली बदलण्याऱ्या चव्हाण यांनी वडिलांच्या राजकारणापासून फारकत घेऊन, नाना क्लृप्त्या लढवून आपल्या पक्षाला विजयी केलं. तोंडाची वाफ फारशी न दवडता प्रतिस्पर्ध्यांची हवा काढण्याचं तंत्र चव्हाण यांनी राबवलं. त्यामुळेच बाळासाहेब शिवरकर, प्रताप पाटील चिखलीकर असे विलासराव समर्थक घरी बसले. राणेंच्या स्वतःच्या जिल्ह्यात पडझड पाहावी लागली.


खुर्चीत बसताच पहिल्याच महिऩ्यात चव्हाण यांनी नांदेडला स्वतंत्र विभागीय कार्यालय स्थापन करून वादाला तोंड फोडलं. पण त्यात स्वतः एका शब्दाचीही भर घातली नाही. लातूरकर देशमुख समर्थक आणि अन्य नेत्यांची ती झुंज दोन महिने चालली. त्यानंतर ऐन लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्रपती शिवाजी स्मारकाच्या समितीवर बाबासाहेब पुरंदरे यांना घेऊन, मराठा संघटनांना उचकवलं. त्या वादात मराठा-मराठेतर असं ध्रुवीकरण झाल्याचं राष्ट्रवादीला निवडणुकीच्या निकालानंतर समजलं. गेल्या खेपेस शिवाजी महाराजांच्या नावावर नौका पार करणारी राष्ट्वादी यावेळेस त्याच शिवाजीमुळे रसातळाला गेली. आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंना बेडूक म्हणून चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना भडकाविण्याचे काम केले. त्यांनी ते केळीचे साल एवढे बेमालूम फेकले, की खरोखरच राज मोठा झाल्याचा भ्रम करून घेऊन उद्धवनी सरकारऐवजी त्यांच्यावरच तोफा रोखल्या. त्या सालीवरून घसरल्याचे दादूंनाही उशिराच समजलं. सत्तेच्या रेसमध्ये कॉंग्रेसचा शंभर वर्ष जुना गाडा विनमध्य़े आणायचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल.


माणसं जोडण्याचे राजकारण शंकररावांनी कधीच केले नाही. हेडमास्तर या नावानेच त्यांना ओळखले जाई. आताआतापर्यंत अशोकरावही माणसं जोडण्याच्या फंदात पडले नव्हते. मात्र गेल्या पाच एक वर्षांपासून त्यांनी स्वतःच्या शैलीत प्रचंड बदल केले आहेत. आपल्या मुख्य आधारवर्गातील प्रत्येकाला समाधानी ठेवण्याचे धोरण त्यांनी अंगिकारले आहे. एखाद्याला तोडून बोलणे, कोणाचा अपमान करणे अशा प्रकारांपासून त्यांनी स्वतःला दूर ठेवले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कारवर चप्पल फेकणारे चिखलीकर समर्थक किंवा हेलिकॉप्टरवर शिवनेरी येथे दगडफेक करणारे मराठा ब्रिगेडचे कार्यकर्ते, यांच्याविरोधात चव्हाण कठोरपणे बोलल्याचे वाचले किंवा ऐकले आहे तुम्ही? पक्षश्रेष्ठी या चार अक्षरी मंत्रावर चव्हाण यांची श्रद्धा आहे. ते त्यांचे बळ आहे आणि दुबळी जागाही. त्यांच्या सगळ्या चालींमध्ये ते भान बाळगलेले असते. त्यामुळेच विलासरावांप्रमाणे काही अवचित घडलं नाही तर ते आपली कारकीर्द पूर्णही करू शकतात. कारण चव्हाणांना सत्य साई बाबा जसे प्रसन्न आहेत तसे सत्तेचे बाबा कोण हेही माहित आहे.


उद्धव ठाकरे


उद्धव ठाकरे हे नायकच मात्र ग्रीक शोकांतिकेतील नायकाप्रमाणे झाले आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या विजयापेक्षा आपल्या पराभवाची चर्चा जास्त व्हावी, याचं शल्य त्यांना असणारच. खरं तर त्यांनी खूप मेहनत घेतली होती मात्र नाटकातील केवळ मुख्य पात्राने चांगलं काम करून भागत नाही, त्याला इतरांची तशीच जोड मिळावी लागते. त्यांच्या दुर्दैवाने त्यांना पात्रं नाही, मेषपात्रं मिळाली आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी रान उठविलं असेल, मात्र त्यांनीच नेमलेल्या रामदास कदमांना मराठवाडा किंवा विदर्भात कोणती पिकं केव्हा घेतात, हे तरी माहित आहे का. बाळासाहेबांच्या सान्निध्यात अनेक कार्यकर्त्यांच्या कर्तृत्वाला बहर आला. दिवाकर रावते, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे अशी अनेक नावे आहेत. उद्धव यांच्याकडे स्वतःची अशी कुठलीच नावे नाहीत. या चपलाच आपली संपत्ती आहे, असं प्रबोधनकार सांगत असल्याचं शिवसेनाप्रमुख नेहमी आठवण सांगतात. उद्धव यांची माणसं कार्यकर्त्यांना त्यांच्यापर्यंत पोचूच देणार नसतील, तर चपला अन्यत्रच वळतील. मीनाताई ठाकरे गेल्या तेव्हा मी मुंबईत होतो. त्यांच्या अस्थी राज्यभर फिरविण्यात आल्या होत्या. मुंबईच्या आमदार निवासात शिवसेना कार्यकर्ते त्या अस्थी नांदेडला नेण्यासाठी थांबले होते. त्या अस्थी मी डोक्यावर घेईन, या कारणासाठी तेव्हा भांडणारे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आहेत. अशी अनेक उदाहरणे आहेत.


मी थकलेलो नाही, पराभूत नाही, हे सांगण्यासाठी उद्धव दोन दिवस न घेते तर त्यांच्या संघर्षाला उदात्ततेची किनार लाभली असती. मनसेसारखे आव्हान, भाजपसारखा आपमतलबी सहकारी, कॉंग्रेस-राष्ट्रवादी सारखे निर्ढावलेले सत्ताधारी आणि शिवसेनाप्रमुखांचा वारसा चालविण्याचे आव्हान, तेही त्यांच्यापेक्षा सर्वस्वी वेगळ्या अशा शैलीत, ही सामान्य गोष्ट नाही. उद्धव यांचा एकट्याचा खांदा त्यासाठी पुरेसा नव्हता, ही गोष्ट त्यांच्याशिवाय इतर सगळ्यांना कळत होती. मी चुकलो, असं म्हणायची पद्धत ठाकरे घराण्यात नाही. त्यामुळेच आपले धोरण चुकले, हे त्यांनी मान्य केलं नाही. उलट दोन वर्षांत मनसे फॅक्टर नाहीसा होईल, असा स्वप्नाळू आशावाद त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे बाहेर पडले तेव्हा भुजबळ 1992 मध्ये बाहेर पडले आणि 1995 मध्ये आम्ही सत्तेत आलो, असा फसवा युक्तिवाद त्यांनी केला. शिवसेनेची राडा संस्कृती त्यांनी नष्ट केली हे खरे, पण त्यामुळे संघटनेची परिणामकारकता गेली त्याचे काय? असाच फसवा युक्तिवाद त्यांनी मुंबई महापालिकेतील विजयानंतरही केला होता.


उद्धव यांच्या नेतृत्वाला भवितव्य आहे का, या प्रश्नाला मी उत्तर देईल, हो आहे. निवडणुकीत जे पानिपत झालंय ते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचं नव्हे तर त्यांच्या माणसांचं झालंय. काही झालं तरी 44 आमदार त्यांनी स्वबळावर निवडून आणलेत. रणांगणात स्वतः उतरून दिशा देण्याची ताकद त्यांच्यात आहे, प्रश्न आहे तो त्यांच्या माणसांची पारख करण्याचा आणि माणसांवर विश्वास टाकण्याचा. आनंद दिघे यांनी स्वतःचे साम्राज्य स्थापन केले तरी बाळासाहेबांनी कधी ठाण्यात लुडबुड केली नाही. कारण त्यांनी काही केलं तरी फायदा संघटनेचा होतो, हे तत्व बाळासाहेबांनी बाळगलं. बाकी काही नाही तरी उद्धवनी तो कित्ता बाळगावा.