Friday, April 25, 2014

इस थप्पड का कव्हरेज...

निवडणुकांचा मोसम होता. मोदी विरुद्ध इतर सर्व (होय, अगदी भाजपच्या मंडळीसहित) असा छान सामना रंगला होता. फक्त एकच रुखरुख लागली होती. बातम्यांच्या थंड्या हंगामात ज्याने तमाम चॅनेले आणि छापेवाल्यांना रोजगार पुरवला, त्या आम मीडिया पक्ष, छे छे, आम आदमी पक्षाचे कोणीही नाव घेत नव्हते. दिल्लीची (धाकली) गादी केवळ जनतेच्या भल्यासाठी सोडणाऱ्या या पक्षाच्या नेत्याला आठ-आठ दिवस दूरचित्रवाणीच्या पडद्यावरून गायब केल्याने सर्वसामान्य जनतेचे भले साधण्याचा दुसरा मार्गच त्याला सापडत नव्हता.

अशात एक घटना घडली. लाली नावाच्या कोणा ऑटो रिक्षाचालकाने मिरवणुकीत येऊन अरविंद केजरीवालांना हार घातला आणि त्यानंतर सणसणीत वाजवली. एवढी सणसणीत की त्यामुळे त्यांचा चेहरा सुजला. ही थप्पड केवळ केजरीवालांवर नव्हती, ती होती तमाम कॅमेरेवाले आणि लेखणीवाल्यांना. प्रजासत्ताक भारतात क्रांती करू पाहणाऱ्या एका होतकरू युगपुरुषाकडे दुर्लक्ष करण्याची त्यांची प्राज्ञा तरी कशी झाली. साहजिकच या थपडीमुळे सर्व माध्यमीय मंडळी खडबडून जागी झाली आणि पुन्हा एकवार केजरीवाल व त्यांच्या कोंडाळ्यावर लेन्सा केंद्रित झाल्या.

वास्तविक केजरीवालांसाठी चपराक खाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. राजकारणाचे त्यांचे मनसुबे पाहून अण्णांनी खडे बोल सुनावले तेव्हा, मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर लोकांनी केलेल्या टिकेच्या वेळेस अशा लाक्षणिक थपडा त्यांना कितीतरी वेळी बसल्या. मात्र, त्याही पलीकडे प्रत्यक्ष थपडा किती खाव्या लागल्या, याचीही स्वतंत्र गणती करावी लागेल. असो.

(लोकसत्ता.कॉमवरील सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण ब्लॉग वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)


Sunday, April 6, 2014

भाऊ माझा... मी भावाचा… वैरी!

हत्ती भांडतात तेव्हा गवत चिरडले जाते, अशी एक आफ्रिकी म्हण आहे. मुंबईत गुरुवारी झालेल्या राड्यानंतर या म्हणीचा पडताळा किमान या दोन सेनेच्या मागे फरफटत जाणाऱ्या कार्यकर्ते व मतदारांना आला असेल. 

खरं तर अफलातून खेळी करत उमेदवार देण्याची घोषणा करणाऱया राज ठाकरे यांच्याकडून चांगल्या व वेगळ्या प्रचाराची अपेक्षा होती. मात्र, त्यांनी पूर्ण भ्रमनिरास केला.मागील निवडणुकीच्या वेळेस मध्यंतर झालेल्या 'संगीत भाऊबंदकी'च्या प्रयोगाची सुरुवात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुण्यनगरीत मुळा-मुठेच्या तीरावर केली. कुठलाही आशय नसलेल्या, विषय हरविलेल्या आणि दिशा नको असलेल्या बेचव सभेला फोडणी देण्यासाठी त्यांनी महायुतीत सामील न होण्यामागच्या कारणाची (सनक्कल) जंत्री सादर केली. 

जणू काही या आवतणाची वाटच पाहत असलेले शिवसेनेचे 'मर्द' कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही तोच धागा पुढे चालवला व त्यांना पेलवेल अशा इर्षेने प्रत्युत्तर दिले. त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी मेनूच सादर केला. त्यावेळी त्यांनी जे तपशील दिले, त्यानुसार पाचवीत असताना माझे दोन चॉकलेट कशाला खाल्ले किंवा लहानपणी रेल्वेतून जाताना खिडकीशी जागा कशी मिळू दिली नाही, अशा आठवणीच यायच्या बाकी होत्या.त्याची परिणती शेवटी दोन्ही सेनांना प्राणप्रिय असलेल्या प्रत्यक्ष हाणामारीत झाली. सख्खा भाऊ पक्का वैरी या मराठमोळ्या म्हणीला जरा वेगळे वळण देऊन ठाकरे बंधूंनी चुलत भाऊ पक्के वैरी अशी स्थिती तयार केली आहे. 
(लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. संपूर्ण नोंद वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)

Tuesday, April 1, 2014

सहकुटुंब सहपरिवार सत्ताधारी

अखेर भारतीय जनता पक्षाने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही नवसंस्थानिकांची निर्मिती करण्यावर शिक्कामोर्तब केले. जळगाव जिल्ह्यातील सत्तापदे एकनाथ खडसे यांच्या घरातच राहावीत, असा धोरणात्मक निर्णय जणू पक्षाने घेतला आहे. भारतीय राज्यघटनेनुसार महाराष्ट्रात लोकशाही असली आणि वरपांगी तरी हे पुरोगामी राज्य असले, तरी घराणे हेच येथील जनतेच्या मानसिकतेचा भाग असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

असं म्हणतात, की महाराष्ट्राचे राजकारण मोजकी घराणी चालवतात. बहुतांशी नेत्यांचे एकमेकांशी असलेले नाते पाहिले तरी या विधानाची सत्यता पटते. खुद्द शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हेच एकमेकांशी जोडलेले आहेत, तेव्हा अन्य छोट्या मोठ्या सग्या-सोयऱ्यांबद्दल तर विचारायलाच नको. त्यामुळे सत्तेची देवी कशीही फिरली तरी तिने आपला उंबरठा ओलांडू नये, याची तजवीज या सर्व मंडळींनी केली आहे.
(लोकसत्ता.कॉमवरील सत्तार्थ मालिकेतील माझा ताजा ब्लॉग. पूर्ण नोंद वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.)

Wednesday, March 19, 2014

हवे आहेत...कार्यकर्ते!

१६ व्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन दोन आठवडे उलटत आले तरी देशातील बहुतांश मतदारसंघात अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. यात महाराष्ट्रातील सत्ताधारी काँग्रेसच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा पुणे व नांदेड मतदारसंघांचा जसा समावेश आहे, तसा सत्तेसाठी आतुर झालेल्या शिवसेना-भाजप युतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा मुंबई व विदर्भातील जागांचा समावेश आहे. निवडणुकीच्या बोहल्यावर चढण्यासाठी उत्सुक असलेले उमेदवार दिल्लीत मुंडावळ्या बांधून तयार असले, तरी प्रत्यक्ष रणांगणात एका गोष्टीची उणीव सर्वांना भासत आहे. ती म्हणजे कार्यकर्त्यांची.
कुठला झेंडा घेऊ हाती म्हणणारे कार्यकर्ते आता इतिहासजमा झाले...झेंडा देऊ कोणाच्या हाती, असे म्हणण्याची वेळ उमेदवारांवर आली आहे.
गेल्या दहा वर्षांमध्ये यूपीए सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने कित्येक आंदोलने पुकारली. मात्र ऐनवेळी कार्यकर्त्यांचा त्यांत सहभाग नसल्यामुळे त्यांचा कसा फज्जा उडत गेला, हे भाजपच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यक्रमांवर नजर टाकली तरी कळून येईल. भाजपला रा. स्व. संघाच्या कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळते ते केवळ मतदानापुरते. प्रत्यक्ष पक्षाच्या कामात घरोघरी मातीच्या चुली अशीच अवस्था आहे. शिवाय अन्य कुठल्याही पक्षाइतकेच, किंबहुना अधिकच, याही पक्षाला गटबाजीने पोखरले आहे.
लोकसत्ताच्या सत्तार्थ मालिकेतील माझी ब्लॉग पोस्ट. पुढील पोस्ट वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

Wednesday, March 12, 2014

बोक्यांची मन(से)धरणी!

महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक लढविणार मात्र निवडून आल्यास नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देणार, अशी घोषणा करून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन बोके आणि माकडाच्या कथेला मूर्त रूप दिले आहे. एक तिरंगी बोका आणि एक संपूर्ण केशरी बोका, असे दोन भांडणारे बोके पंचवार्षिक लोण्याच्या वाटपासाठी रंगीबेरंगी माकडाकडे गेले होते. त्यातील दोघांचेही थोडे-थोडे हातचे राखून राज यांनी स्वतःच्याही पदरात काही पडेल, याची तजवीज केली आहे.

मनसेने निवडणूक लढवावी जेणेकरून भगव्या बोक्याची मते कमी व्हावीत आणि स्वतःचा मार्ग सुकर व्हावा, असा तिरंगी बोक्याचा आग्रह. मनसेने निवडणूक लढवू नये, असा भगव्या बोक्याचा प्रयत्न. त्यासाठी नितीन गडकरी, विनोद तावडे आणि शेलार यांच्यासारख्या तगड्या प्रतिनिधींनी राज यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचाही प्रयत्न केला. गेल्या निवडणुकीसारखी मतविभागणी टाळावी आणि देशातील तिसऱ्या सर्वाधिक जागा असलेल्या राज्यात जागांसाठी फारसे झगडावे लागू नये, हा त्यामागे हेतू.
मनसेने हुशारी दाखवून दोन्ही बोक्यांशी सलगीही ठेवली आणि स्वतःला हवे ते पदरातही पाडून घेतले. आता निवडणूक लढविल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीही मनसेवर खुश आणि निवडणुकीनंतर मोदींना पाठिंबा देणार असल्यामुळे भाजपही खुश. मनसेचे भांडण एकट्या शिवसेनेशी (किंबहुना नेमके सांगायचे तर उद्धव ठाकरेंशी), तर त्यांची गोची केल्याचे पुण्यही पदरात पडणार.

लोकसत्ता.कॉमच्या  सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग. अधिक वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

Friday, March 7, 2014

उमेदवार व्हायचंय मला...

हॅलो, मला उमेदवार व्हायचंय. काहीही करून, कसंही करून मला लोकांकडे जायचंय, मतं मागायला! तसा मी लोकांच्या मताला फारशी किंमत देत नाही, पण निवडणुकीत जिंकायचं म्हणजे मतं मागावी लागतात. म्हणून मला मतांची भीक म्हणा, दान म्हणा मागण्यासाठी जायचंय. नवरात्रात कसं देवीच्या नावाने जोगवा मागतात, त्यामुळे कोणी भिकारी होतं का? मग लोकशाही देवीच्या नावाने मतं मागितल्याने मी काय भिकारी होतो का?

...तर त्यासाठी हवी उमेदवारी. कुठल्याही पक्षाची चालेल. काँग्रेस म्हणू नका, 'राष्ट्रवादी' म्हणू नका, सेना-भाजप, गेला बाजार मनसेसुद्धा...हे आपलं एक चाल म्हणून म्हणालो, नाही तर बाजारचा शब्दशः अर्थ घेईल कोणी. यांच्यापैकी कोणी नाही तर 'आप' देईल आणि 'आप'नेही दिला दगा तर बाप देईल. अरे, स्वतःच्या ताकदीवर अपक्ष म्हणून उभा राहील मी. एका खिशात थैली आणि दुसऱ्या खिशात तरुणांचे तांडे घेऊन फिरतो मी...

(लोकसत्ता ऑनलाईनच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग)...संपूर्ण नोंद कृपया येथे वाचा...

Tuesday, March 4, 2014

द्राविड मोदीत्व कळगम!

करुणानिधी, रामविलास पासवान, शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला इ. मंडळी ज्या प्रकारे सत्तेच्या दिशेला तोंड करून उभे राहतात, त्यावरून त्यांना आता राजकीय वातकुक्कुट म्हणून मान्यता मिळायला हरकत नसावी. द्राविड मुन्नेत्र कळगम पक्षाचे नेते एम. करुणानिधी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे त्यांचे चांगले मित्र असल्याचे जे विधान केले आहे, ते याचेच उदाहरण म्हणायला पाहिजे. 

तमिळनाडूतील राजकीय परिस्थितीच अशी बनली, की गेली दहा वर्षे भारतीय जनता पक्षाचा वाराही सहन न होणाऱ्या करुणानिधी यांना ही कोलांटउडी घ्यावी लागली आहे. शिवाय येत्या निवडणुकीच्या निकालाचा अंदाजही त्यातून मिळाला आहे. करुणानिधी यांच्या हाडवैरी आणि अण्णा द्रामुकच्या नेत्या मुख्यमंत्री जयललिता यांनी आधीच पंतप्रधानपदावर दावा ठोकून राज्यातील मतदारांना भावनिक आवाहन केले आहे. राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या निर्णयाने त्यांनी बऱ्यापैकी जनमतही बाजूला करून घेतले आहे. हा निर्णय योग्य का अयोग्य हा मुद्दा अलाहिदा, मात्र त्यांनी करुणानिधींवर याबाबतीत कडी केली, यात शंका नाही.

(लोकसत्ता ऑनलाईनच्या सत्तार्थ मालिकेतील माझा ब्लॉग)...संपूर्ण नोंद कृपया येथे वाचा...