Monday, February 27, 2017

सव्वा शहाणा फडणवीस

“लिहिणे-वाचणे ही आता ठराविक लोकांची मक्तेदारी राहिलेली नाही!”


बारा वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्राला वीज टंचाईच्या झळा जाणवत होत्या आणि भारनियमनाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका होत होती, तेव्हा शरद पवार यांनी उच्चारलेले हे एक मार्मिक वाक्य. ज्येष्ठ सनदी अधिकारी माधव गोडबोले यांनी या संदर्भात अहवाल सादर केला होता. त्यावर पवारांनी टीका केली असता “पवारांनी हा अहवाल वाचला आहे की नाही, हीच शंका आहे,” असे गोडबोले म्हणाले होते. तेव्हा पवार हे बोलले होते.


वाचन, लेखन, शिक्षण किंवा एकूणच विचारांच्या क्षेत्रावर आतापर्यंत ब्राह्मणांची मक्तेदारी होती. आता ती राहिलेली नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवायचा प्रयत्न करू नका, असे पवारांना म्हणायचे होते. कारण विजेचा प्रश्न हाताळण्यात सरकारला अपयश आल्याचा ठपका गोडबोले आयोगाने ठेवला होता. आता गोडबोले म्हणजे ब्राह्मण आणि त्यांनी आम्हाला उपदेश करू नये, हा पवारांच्या वक्तव्याचा आशय होता.


अर्थात पवार हे पुरोगामी नेते असल्यामुळे त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हे सूचकपणे सांगितले होते. मात्र जायचा तो संदेश गेला होता. “वीज क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा, जी राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे, ती पवार यांनी इतक्या खालच्या पातळीवर नेली आहे की यापुढे मी त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेणार नाही व भाष्यही करणार नाही. माझ्यापुरता हा विषय संपलेला आहे. यापुढे सुजाण समाजानेच समितीच्या अहवालाबाबत मत बनवावे,” असे उद्वेगाने गोडबोले म्हणाले होते.


शिक्षण ही जशी काही काळापूर्वी ब्राह्मणांची मक्तेदारी होती, तशी राजकारण ही साखर कारखानदार, सहकार दरोडेखोर (सम्राट!) आणि पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्यांची मक्तेदारी झाली होती. ती तशी आता राहिलेली नाही, हे पवारांना सांगणारा नेता महाराष्ट्रातच निघाला आहे.


बापट, देशपांडे, जोशी इ. ब्राह्मणांना आम्ही पदरी बांधू, त्यांच्यामार्फतच व्यवसाय-उद्योग चालवू पण त्यांनी आमच्या राजकारणात येऊ नये, हा पवारांचा अलिखित दंडक. त्यांच्या पुरोगामी वगैरे वगैरे गणंगांनी तो प्राणपणाने जपला होता. तो मोडला नागपूरच्या देवेंद्राने. पेशवे, फडणवीस म्हणून ज्या देवेंद्र फडणवीस यांची हेटाळणी केली त्यांनीच पवारांच्या गढीला सुरुंग लावला आहे. पवारांच्याच काय, मुंबई (शिवसेना), पुणे, पिंपरी-चिंचवड (एनसीपी), सोलापूर (काँग्रेस) अशा सगळ्याच गडांना या फडणवीसाने धक्के दिले आहेत.


ऑक्टोबर २०१४ पासून म्हणजे फडणवीस यांनी सत्ता हाती घेतल्यापासून पवार यांनी येता-जाता त्यांची जात काढण्याचा प्रयत्न केला. पवारांच्या वरदहस्ताने मोठे झालेल्या झिलकऱ्यांची त्याला साथ होतीच. तसा तो त्यांनी ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टी यांची जात काढूनही केला होता.


मात्र फडणवीस यांच्या नावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी. हा कोण मोठा दिड शहाणा लागून गेला, अशाच आविर्भावात प्रस्थापित राजकारणी वावरत होते. म्हणून त्यांच्या कारभाराची फडणवीशी अशा शिवीवाचक शब्दांनी संभावना करण्यात आली. ज्यांच्या ऐतिहासिक उपमा संपल्या त्यांनी डोरेमॉन-शिनचान वगैरेंना हाताशी धरले. आज त्यांचेच कार्टून झाले आहे.


म्हणूनच छत्रपती पेशव्यांना नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना खासदारकी देत आहेत, असा तद्दन जातवाचक उल्लेख त्यांना करावा लागला. “छत्रपती पेशव्यांची नेमणूक करत होते. तर पेशवे फडणवीसांची नेमणूक करत होते. पण आता मात्र फडणवीसांनी छत्रपतींची नेमणूक केली,” हे वक्तव्य काही प्रामाणिक पणातून आलेले नाही. त्याच प्रकारे मराठा मोर्चाच्या वेळेस पवारांची भूमिका त्यांच्या स्तुतीपाठकांना वाटते तेवढी पुरोगामी खचितच नव्हती. अन् तरीही फडणवीस यांनी या सर्वावर मात करून एकहाती यश मिळवले आहे.


‘तावद् भयेषु भेतव्यं यावत् भयम् अनागतम्’. म्हणजे भीती वाटते ती गोष्ट येत नाही, तोपर्यंतच तिचे भय असते. ब्राह्मणाचे राज्य आले, तर पेशवाई परत येणार, ही भीती हेच आजपर्यंत काँग्रेस-एनसीपीचे कुरण ठरले होते. फडणवीस आल्यावर तसे काही नाही, हे जाणवल्यानंतर ती भीती सरली आणि त्यासरशी त्या भीतीवर जगणाऱ्यांची दुकानेही उठली. उलट गेल्या काही दिवसांत फडणवीसांचा विश्वास निर्देशांक हा अन्य कोणत्याही नेत्यापेक्षा अधिकच झालेला आहे. म्हणून तर “लिहून देतो” म्हणणाऱ्या शदर पवारांवर लोक भरवसा ठेवत नाहीत. “मी शब्द देतो,” म्हणणाऱ्या फडणवीसांवर ठेवतात. विश्वास एकदा गेला की गेला..


पालिकेच्या या निवडणुकांसाठी भाजपचे केंद्रीय पातळीवरील कोणतेही नेते वा चेहरे फिरकले नाहीत. अगदी उद्धव ठाकरेंनी आव्हान दिल्यानंतरही. प्रचाराची सगळी जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांभाळली. पायाला भिंगरी लावल्यासारखे फडणवीस हेच राज्यात फिरले. शिवसेनेचे नेते भाजपवर तुटून पडत असले, तरी फडणवीस यांच्यावर त्यांनी हात राखूनच राळ उडवली, हे मान्य करावे लागेल. मात्र काँग्रेस-एनसीपीचा सगळा भर फडणवीस यांच्यावरच होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तर फडणवीस यांनाच लक्ष्य केले होते.


फडणवीसांनी अगदी हळूवारपणे आपले काम चालूच ठेवले. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित कामाला लावले. इतकेच नाही, तर निवडणुकीतल्या निकालानुसार मंत्र्यांवर कारवाई करणार, असे सांगून चुकार मंत्र्यांना इशाराही दिला. दिल्लीश्वरांचे अभय असल्यामुळे आपले कर्तृत्व दाखवायची पूर्ण संधी त्यांना मिळाली आणि ती त्यांनी 100 टक्के साधली.


स्वच्छ चारित्र्य हे फडणवीस यांचे मुख्य चलनी नाणे. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचीही तीच जमेची बाजू. पण चव्हाण यांनी स्वच्छ चारित्र्य हे निष्क्रियतेचे समानार्थी करून ठेवले होते. ती चूक फडणवीसांनी टाळली. स्वच्छ प्रतिमा हे फडणवीस यांचे बलस्थान. या दोन वर्षांच्या काळात एकही गैरव्यवहार झालेला नसल्याचा आनंद त्यांनी नुकताच व्यक्त केला आहे. विरोधी पक्षांनी अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले, मात्र मुख्यमंत्र्यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावून ते परतवून लावले. तरीही एकनाथ खडसे यांना ते वाचवू शकले नाहीत. या सर्व प्रवासात झाले एवढेच, की राज्यात सरकारचा एकमेव चेहरा बनण्यात फडणवीस यांना यश आले आहे. महापौरपद वगळता अन्य कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या एखाद्या राजकारण्यासाठी हे मोठेच यश आहे. प्रशासकीय कौशल्याबरोबरच आपल्या राजकीय बुद्धिकौशल्याने त्यांनी अनेक पेचप्रसंगावर मात केली आहे.


नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून उत्तर पेशवाईच्या काळात अर्धा शहाणा मानला जाई. काँग्रेस-एनसीपीने 15 वर्षांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात उत्तर पेशावईचीच अवस्था निर्माण केली होती. त्याला उत्तर म्हणून लढाया (निवडणुका) खेळून तो जिंकणारा फडणवीस प्रतिस्पर्ध्यांना मिळाला आहे. हा शहाणा पूर्ण शहाणाच नाही, तर सव्वा शहाणा आहे.


– देविदास देशपांडे

Tuesday, January 3, 2017

आता तो पुतळा परत बसवू नका…!

“बाष्कळ बडबड ऐकून चित्ती हास्याचे ध्वनी उठतात, अन् आतडी तुटतात!”


छत्रपती संभाजी उद्यानातून उखडलेला हाच तो राम गणेश गडकरी यांचा पुतळा


ज्या राम गणेश गडकरी यांनी वरील वाक्य लिहिले, त्यांच्याच पुतळ्यावर उन्मत्त जातीयवाद्यांनी हल्ला केला. त्यांचा पुतळा उखडून टाकून नदीत टाकला. अन् वर ही एक मर्दुमकी असल्याची व त्यामागे तर्क असल्याचा दावाही केला. ‘रिकामपणची कामगिरी’ लिहिणाऱ्या लेखकावर नियतीने केलेला हा काव्यगत अन्यायच होय. आता जे कोणी निर्णय घेणारे असतील, त्यांनी एक करावे…तो पुतळा परत त्या जागी बसवू नये. नव्हे, कुठेच बसवू नये आणि सत्ताधारी जातींशिवायच्या अन्य कोणत्याही जातीची चिन्हे सहजगत्या दृष्टीस पडतील, असे करू नये.


खरे तर ‘संभाजी ब्रिगेड’सारख्या उपद्रवी माकडसेनेला कला, साहित्य, संस्कृती अशा तैलबुद्धीच्या गोष्टीत रस नसल्याचा सर्वसाधारण समज होता. पुतळे, इमारती आणि तोडफोड यातच त्यांना गम्य असल्याचे लोक मानत होते. मात्र गडकऱ्यांच्या एका नाटकात छत्रपती संभाजी यांचा अपमान केल्याचे कारण देऊन त्यांनी एका पुतळ्याला आपले लक्ष्य केले. या निमित्ताने ही मंडळी नाटके वगैरे वाचत असल्याचेही कळाले. त्यामुळे आता अभिजनांच्या इतिहासाचे पुनर्लेखन झाले, तसे साहित्याचेही पुनर्लेखन होईलच. शंका नसावी.


नालंदा विद्यापीठावर जेव्हा तुर्की-अरबी आक्रमकांनी (कुतबुद्दीन ऐबकचा सेनापती बख्तियार खिलजी) हल्ला केले, तेव्हा तेथील समृद्ध ग्रंथालयाला चूड लावण्यास ते सरसावले. त्यांना रोखण्याचा काही भिक्खूंनी प्रयत्न केला, तेव्हा आक्रमकांनी त्यांना सांगितले, “या पुस्तकात कुराणाच्या विरोधात काही लिहिले असेल, तर ते टिकण्याच्या लायकीचे नाही. ते नष्ट झालेच पाहिजे. अन् जर ते कुराणास अनुकूल असेल, तर त्यांची गरजच नाही. कारण जे काही ज्ञान पाहिजे, ते कुराणातच मिळू शकते. त्यामुळे तसेही ते व्यर्थच आहेत.”


संभाजीसारख्या महापुरुषांच्या नावावर उच्छाद मांडणाऱ्या आजच्या टोळ्यांची स्थिती यापेक्षा वेगळी नाही. जे आम्हाला नको, ते प्रतिकूल असल्यामुळे आणि जे आमचे आहे, ते स्वतंत्र कशाला पाहिजे, या मानसिकतेतून ही विध्वंसयात्रा निघाली आहे. आधी ब्राह्मण, मग धनगर, मग अन्य जाती असे करत आता ही यात्रा चांद्रसेनीय कायस्थ प्रभूंच्या स्थानकावर आली आहे. (गडकरी यांना सीकेपी असल्याचा अभिमान होता आणि त्यांनी चिंतामण लक्ष्मण देशमुखांचे कौतुक त्याच दृष्टीने केले आहे.) गडकरी हे कदाचित ब्राह्मण असल्याच्या समजातूनच त्यांनी हा उच्छेद केलेला असावा, परंतु पुरेसे पुस्तक वाचल्यामुळे (किंवा फक्त इतिहासश्रीमंत पुस्तकेच वाचल्यामुळे) फसगत झाली असावी. आता या फसगतीला कोणी बामणी कावा म्हणू नये, एवढीच अपेक्षा.


ही यात्रा अशीच पुढे चालू ठेवावी, अशी समस्त ब्रिगेडियांना शुभेच्छा आहेत. त्यांना अधिकाधिक काम मिळावे, म्हणून हजारो कोटी रुपये खर्चून राज्य सरकार नव्या पुतळ्यांची निर्मितीही करत आहे. त्यामुळे त्यांना भविष्यातही कधी रोजगार कमी पडणार नाही, याची खात्री बाळगावी. फक्त तो पुतळा पुन्हा त्या जागी बसवू नये. अन् कुठेच बसवू नये, कारण ब्रिगेडींच्या पुढच्या पिढ्यांना त्याच त्या पुतळ्यांना उखडण्यासाठी पुन्हा-पुन्हा श्रम करावे लागतील. त्यात त्यांचे श्रम अनाठायी खर्ची पडण्याचा संभव आहे. शिवाय त्यामुळे राज्यातील व खासकरून पुण्यातील अन्य जातींच्या इतर पुतळ्यांची तोडफोड मागे पडण्याची शक्यता आहे.


इतिहासाची नवी जाणीव निर्माण करायची, तर अशी नासधूस करणे फार फार महत्त्वाचे असते. खासकरून विधानसभा किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत सापडलेला असणे, अशा प्रसंगी ही जाणीव व्यक्त करणे अत्यंत महत्त्वाचे असते. ते काम जोमाने झाले पाहिजे. ब्रिगेडींच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा. अन् ब्रिगेडींच्या या मूर्तिभंजनावर कोणतीही प्रतिक्रिया न देणाऱ्या पुरोगामी, वैचारिक, विवेकवादी, प्रागतिक, लिबरल इ. सर्व निवडक बोलभांडांना अनेकानेक धन्यवाद!

Thursday, December 1, 2016

शिरपेचात तुरा, सिंहासन बळकट



महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला विजय मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अधिकृततेची आणखी एक मोहोर उमटली आहे. तब्बल 25 जिल्ह्यांतील १४७ नगरपालिका आणि १७ नगर पंचायतींच्या या निवडणुका होत्या. त्यात भारतीय जनता पक्षाने ५२ नगराध्यक्षपदे जिंकली. नगरसेवकांच्या संख्येतही भाजपने अव्वल स्थानापर्यंत उसळी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा तर खोवला गेला आहेच, पण त्यांचे सिंहासनही बळकट झाले आहे. 

या निवडणुका फडणवीस यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या होत्या. काँग्रेसचे तीन माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादीचा एक माजी उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचा एक इच्छुक मुख्यमंत्री यांच्याशी त्यांचा सामना होता. त्यात नोटाबंदीच्या निर्णयाने घोळात घोळ करून ठेवला होता. लोकांच्या हातात पैसा नसताना पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आपले नाणे खणखणीत वाजवून घेतले आहे. दर्शनी विरोधकांना ते शांत करत असतानाच त्यांच्या अघोषित स्पर्धकांच्या 'हद्दीमध्ये'ही संबंधित मंडळी बेतास बेत ठरली आहेत. आता यात नेत्याचा हात किती आणि नियतीचा हात किती, हे कोण सांगणार?
फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने नुकतीच दोन वर्षे पूर्ण केली. त्यामुळे एकप्रकारे हे त्यांच्या कारभाराचे लेखापरीक्षणच होते. प्रचार ऐन भरात असताना 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतला. नोटाबंदीच्या या निर्णयाची किंमत फडणवीस सरकारला द्यावी लागेल, असा 'जाणकारांचा' होरा होता. या निर्णयाचा फार मोठा फटका देशातील नागरीकांना बसत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला. मात्र या फटक्याचा आसूड फडणवीस सरकारवर ओडण्याएवढीही ताकद त्या पक्षांमध्ये राहिली नव्हती, हेच निकालांनी सिद्ध केले. मराठा मोर्चांच्या आडून जातीच्या पेढ्या चालविणाऱ्यांनाही चांगलाच धडा मिळाला. 
या निवडणुकीत मतदारांची संख्या अर्ध्या कोटीपेक्षा थोडी अधिक होती. एकूण मतदारसंख्येच्या मानाने ती क्षुल्लक आहे. तरीही बहुतांश विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघ हे शहरीबहुल भागांमध्ये आहेत, हे लक्षात घेतले तर त्यांचे महत्त्व लक्षात येऊ शकते. 
शिवसेनेचे २५ नगराध्यक्ष निवडून आले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठेही प्रचारात भाग घेतला नाही, हे निकालानंतर वारंवार अधोरेखित करण्यात आले आहे. मात्र त्यात आगळेवेगळे असे काही नाही. याचे कारण म्हणजे ठाकरे यांचे नेतृत्व अबाधित आङे.
समजा या निवडणुकीत शिवसेनेचा पूर्ण सफाया झाला असता, तरी त्यांना काहीही फरक पडला नसता. शिवसैनिकांची त्यांच्यावरची निष्ठा तसूभरही कमी झाली नसती. फार फार तर काही जणांची इकडे तिकडे पळापळ झाली असती. त्यापेक्षा जास्त काही नाही. याच्या उलट फडणवीस यांच्याभोवती होतकरू नेतृत्वाचा गराडा पडला आहे. मुख्यमंत्र्याच्या पायाखालचे जाजम कधी खेचतो आणि त्यांच्या गादीवर अलगद उडी कधी मारतो, याची संधीच अनेक जण पाहत आहेत. म्हणूनच राज्याचा कारभार पाहताना 55 सभी एकट्या देवेंद्रांनी घेतल्या आणि जवळपास एकहाती विजय खेचून आणला. कारण येथे अपयश आले असते, तर त्यांच्या आसनाला सुरूंग लागला असता. वर नोटाबंदीमुळे ही अवस्था झाल्याचे अपश्रेयही पदरी पडले असते. तसेच विधानसभेत मिळालेले यश हे निव्वळ मोदीलाटेवर होते आणि राज्यातील भाजपकडे स्वतःचे बळ नाही, असेही चित्र निर्माण झाले असते! थोडक्यात म्हणजे भाजपची बाजी लागली होती. त्यामुळे उद्धवनी या भानगडीत न पडणे आणि राष्ट्रीय-राज्य पातळीच्या विषयांवर लक्ष केंद्रीत करणे साहजिक नसले, तरी समर्थनीय नक्कीच आहे.
वास्तविक विरोधकांना मुद्दे देण्यात भाजपने कोणतीही कसूर ठेवली नव्हती. नोटाबंदी, चिक्की, औषधे आणि स्वेटर खरेदीचे घोटाळे, महागाई असे अनेक मुद्दे समोर वाढून ठेवले होते. पण दे रे हरी, पलंगावरी हे ज्यांनी आपले धोरण म्हणून ठरवले आहे, त्यांना साक्षात कल्पवृक्षाच्या खाली बसविले तरी त्यांचा करंटेपणा काही जाणार नाही. 
नारायण राणे विरुद्ध अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांचे शाब्दिक युद्ध पाहिल्यानंतर विरोधकांच्या अपयशाची आणखी चिकीत्सा करण्याची गरजच राहत नाही. काँग्रेसने राष्ट्रवादीला मागे टाकून तिसरे स्थान पटकावले, हीच मोठी गोष्ट आहे. फडणवीस यांनी जसे विदर्भावरील आपली पकड दाखवून दिली, तशीच अशोक चव्हाणांनी मराठवाड्यावरील आपली मांड दाखवून दिली असेही म्हणता येईल.
थोडक्यात, हा निकाल भाजपला खुश करणारा, शिवसेनेला स्मित करायला लावणारा आहे. काँग्रेसला आता ‘सिंहासन की बात’ विसरून ‘खाट पे चर्चा’ करायला सांगणारा आहे. पुरोगामी, प्रागतिकपणा आणि सर्वसमावेशकतेचे सोंग उघडे पडून कालबाह्य होऊ शकते, हे राष्ट्रवादीला सांगणारा आहे. शिवसेना-भाजप हे मोठ्या शहरांपुरचे पक्ष आहेत, असे अनेक जण मानतात. राज्यातील बहुतांश गावांचे झपाट्याने शहरीकरण होत आहे, हा संदेश वरची समजूत असणाऱ्यांना देणारा हा निकाल आहे. 

Saturday, November 26, 2016

अदियोस ढोंग

सोळाव्या लुईचा शिरच्छेद केला, तेव्हाही जनता नाचली होती. हिटलर आणि मुसोलिनी उंदरासारखे बिळात घुसून मेले, तेव्हाही लोकांनी आनंदाने चित्कार केला होता. स्टॅलिन मेला तेव्हा लोकांना आनंद व्यक्त करता येईल एवढे पुरोगामी आणि समतावादी वातावरण रशियात नव्हते. तरीही बेरियासारखे त्याचे विरोधक-स्पर्धक छद्मी हास्य करत होते. मृत्यूच्या दारातील घंटा वाजवून आल्यावर स्टॅलिन काही काळ उठून बसला, तेव्हा हाच बेरिया हवालदिल झाला होता. मग परत तो मेल्याची खात्री पटल्यावर त्याने नि:श्वास सोडला. पूर्व जर्मनीतील एरिख होनेकरची कारकीर्द संपल्यावर जनतेने अशाच उत्साहातिरेकाने दोन जर्मनीतील भिंत फोडली होती. 1994 साली तो गेला तेव्हाही कित्येकजण आनंदले होते. हिटलर हा आदर्श आहे, म्हणून इतरांकडे बोटे दाखविणाऱ्यांनी या सत्तांधांबद्दल वावगा शब्द काढल्याचे दिसले नाही. 
सांगायचा मुद्दा हाच, की हुकूमशहा हा हुकूमशहाच असतो. जुलूम हा जुलूच असतो. त्यात डावे उजवे असे काही नसते. 
मात्र बुद्धिवंतांच्या क्षेत्रावर नागाप्रमाणे वेटोळा घालून बसलेल्या डाव्यांनी आणि त्यांच्या वळचणीला बसून आपली प्रज्ञा गहाण टाकणारे पुरोगामी, यांनी गेल्या अनेक दशकांपासून हुकूमशहा म्हणजे फक्त हिटलर आणि भारत माता की जय म्हणणारे त्याचे आराधक असा एक धुरळा उडवून दिला आहे. चुकूनही डावीकडे झुकलेला कोणी इसम किंवा व्यवस्था चुकीची असूच शकत नाही, त्या व्यक्ती किंवा व्यवस्थेने केलेली आगळीक ही मानवकल्याणासाठीच असते, यावर या विचारवंतांची अगाध श्रद्धा असते. म्हणूनच पन्नास वर्षे क्युबाच्या जनतेला तोबा तोबा करायला लावणारा हुकूमशहा त्यांना महान क्रांतीकारक वाटलाच नसता. एरवी स्टॅलिन, होनेकर आणि तत्सम मंडळी काय आणि हिटलर-मुसोलिनी काय, ही एकाच माळेची मणी आहेत.
कॅस्ट्रोच्या मरणानंतर आज अमेरिकेच्या रस्त्यांवर आनंदोत्सव साजरा करणारे लोक मनोरोगी नाहीत. आपल्या अनेक पिढ्यांच्या उच्छादाचे एक साकार कारण नष्ट झाल्याची बालिश (अगदी विकृत म्हणता येईल) अशी मजा ते घेत आहेत. 


फिडेल कॅस्ट्रो हे डाव्या आणि पुरोगाम्यांच्या ढोंगाचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांनी सुरू केलेली जुलूमशाही अद्याप संपलेली नाही. जनतेला दडपण्याचा वारसा आपल्या भावाला सोपवून ते गेले आहेत.हुकूमशहा, फॅसिस्ट आणि जगाचा कर्दनकाळ म्हणविले जाणारे डोनाल्ड ट्रम्प
राजकीय परिघाबाहेरून मुसंडी मारून सत्तेच्या पायरीवर पोचले आहेत. आणि समतावाद, क्रांती व सर्वहारांचे तारणहार म्हणून म्हटल्या जाणाऱ्या कॅस्ट्रोंनी साठ दशके सत्ता आपल्याच घरात कोंडून ठेवली आहे.  तरीही क्रांतीचा तारा ढळला आहे, असा कंठशोष करायला पुरोगामी - तेच ते, लिबरल - मोकळे आहेत. कारण ढोंग हा त्यांच्या स्वभावाचा भाग बनला आहे. एरवी किमान 14 हजार खून पाडणारा चे गवारा यांचा पोस्टर बॉय बनता ना!
ढोंगाच्या शेवटचा प्रभावी स्तंभ कोसळला आहे. अलविदा ढोंग, एवढेच आपण म्हणू शकतो! 

Thursday, November 17, 2016

नोटाबंदी आणि इंद्राचा शाप


noteban demonitization
पुराणातील एक कथा आहे. (पुराण म्हणताच ज्यांच्या कपाळाला आठ्या चढतात आणि चेहरा वाकडा होतो, त्यांनी येथून पुढे नाही वाचले तरी चालेल). देवांचा राजा इंद्राला एकदा शाप मिळतो. त्यानुसार काही काळ त्याला डुकराच्या रूपात घालवायचा असतो. या शापाची अंमलबजावणी सुरू होते.
इंद्र जमिनीवर येऊन एका गटारात राहू लागतो. त्याचा कुटुंबकबिला वाढतो. काही काळाने त्याचा शापाचा कालावधी संपतो. परंतु इकडे गटाराची सवय लागलेल्या डुकराला म्हणजेच इंद्राला काही हे सुख (!) सोडून जाण्याची इच्छा होत नाही. दुसरीकडे राजेपद रिकामे राहिल्याने देवमंडळात खळबळ माजते. म्हणून राजेंद्रांना परत आणण्यासाठी ते नारदमुनींना पृथ्वीवर पाठवतात.
 नारदमुनी येतात तर काय पाहतात, तर डुकराच्या रूपातील इंद्र डुकरिणी आणि पिलांसोबत घाणीमध्ये सुखेनैव पडलाला असतो. आपण देवकुळातील असल्याचाही त्याला विसर पडलेला असतो.
"देवा, आता स्वर्गात चला. तुमचे इथले अवतारकार्य संपले आहे," नारद म्हणतात.
"कशासाठी?" डुक्कर विचारते.
"कशासाठी म्हणजे? अरे, तुझे राज्य तुझी वाट पाहत आहे! तुझा महाल, शची (इंद्राची पत्नी), ते नंदनवन सगळे तुझ्यासाठी प्रतीक्षा करत आहेत," नारद उत्तरतात.
"पण तेथे जाऊन काय होणार," डुक्कर परत विचारते.
"अरे, तेथे तुला सर्वोत्तम शय्या, स्वादिष्ट पदार्थ, आपल्या माणसांचा सहवास मिळतील," नारदमुनी नेट लावण्याचा प्रयत्न करतात.
"पण त्याने काय होणार?" डुक्कर परत विचारते.
"अरे, तू स्वर्गात चल. तू सुखात लोळशील, सुखात!!!" नारदमुनी आणखी जोर लावून विचारतात.
"मग आता मी काय करत आहे?" डुक्कर गटारात जागच्या जागी वळवळत विचारते.
 व्हाटस् अॅप नावाच्या अफवाप्रसव आणि छद्मवैचारिक साधनावर गेल्या आठ-दहा दिवसांत ज्या प्रकारे लेखांचा रतीब पडत आहे, त्यामुळे या कथेची वारंवार आठवण होते. यातील नावानिशी येऊन पडणाऱ्या लेखांना किमान मतप्रदर्शन म्हणून ढकलपास तरी करता येईल. पण परस्पर दुःखितांच्या वेदनांचे कढ काढत स्वतःची अक्कल पाजळणाऱ्यांचाच जास्त सुळसुळाट झाला आहे. इतका की, रघुराम राजन यांचा लेख म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या बनावट शहाण्यांचे खर्डे खपविणाऱ्यांचा खूपच सुळसुळाट झाला आहे. स्वत:सोबत इतरांनाही गटारात लडबडायला लावून इंद्रपणाचे जाणूनबुजून विस्मरण करविण्याचे कारस्थान रचले जात आहे.
 काळा पैसा ही घाण आहे, हे तोंडदेखले बोलून दुसरीकडे ही घाण काढायला विरोधही चालू आहे. आणि हा विरोध करायला पुढे कोण येत आहे, तर सारदा चिटफंडात मानेपर्यंत रुतलेल्या ममता बॅनर्जी, दिल्लीत यथेच्छ गोंधळ घालून लोकांना त्राही माम करणारे अरविंद केजरीवाल, 'वृद्धत्वातही निज शैशवास' जपणारे राहुल गांधी! शंकराच्या वऱ्हाडात सामील झालेली भूतावळसुद्धा यांच्यापेक्षा अधिक साजरी असेल! अन् तर्कटपणाची हद्द गाठत त्यांच्या नावावर आपले शहाणपण विकणारे विचारवंत.
काय तर युक्तिवाद म्हणे बँकांबाहेरच्या रांगांमध्ये काळ्या पैसेवाले, धनाढ्य कोणी नाही. जो धनाढ्य आहे, उदा. शरद पवार, अंबानी किंवा गेला बाजार बजाज इ., त्यांच्याकडे कितीही पैसा असला तरी त्याचा हिशेब लावण्यात ते वाकबगार असतात. अन् त्यांना पैसे बदलायला जायचे असेल तर त्यांच्याकडे शंभर माणसे असतात. वर बँकांबाहेर ज्या रांगा आहेत त्या मुळात कष्टाचा, उजळमाथ्याचा पैसा असलेल्यांच्या आहेत. काळ्या पैसेवाल्यांची बँकांपर्यंत येण्याची हिंमत होणार तरी आहे का?
पुण्यातील कचराकुंडीत पडलेला, गंगेच्या पाण्यात वाहिलेला, निरनिराळ्या ठिकाणी पोलिसांनी पकडलेला पैसा हा कोणत्या रंगांचा होता की ज्यामुळे त्यांच्या मालकांना तो दिवसाउजेडी बाहेर आणता आला नाही. नागपुर महापालिकेत गेल्या ७८ वर्षांतील सर्वाधिक करभरणा झालाय. पुणे पालिकेला १०० कोटींपेक्षा जास्त कमाई झालीय. सोलापूरला स्वतः महापौरांसकट लोकांनीही कर भरल्यामुळे कधी नव्हे ती तिजोरी भरलीय. कर न दिलेला पैसा हा काळा पैसा, ही व्याख्या मान्य दिली तर कररूपाने आलेला हा पैसा काळा पैसाच नाही का? इतके दिवस तो डबोले दाबून बसलेल्यांच्या बुडाखाली होता, आता तो सरकारी यंत्रणेमध्ये आला. हा फायदा नाही का? का विद्यापीठीय पुस्तकांमधून आलेली ही कल्पना नाही म्हणून तिचे दृश्य परिणामही नाकारायचे आहेत? अन् अदृश्य परिणामांपर्यंत आपण अजून आलेलोही नाहीत.
या देशात काहीही होऊ शकत नाही, नशिबी आलेय ते भोगावे लागेल, अशी एक मनोवृत्ती गेल्या कित्येक वर्षांत झाली होती. त्या मनोवृत्तीला पहिल्यांदा धक्का लागला आहे. मात्र आधीचीच व्यवस्था किती छान होती, आपण सगळे कसे सुखाने जगत होतो, सगळ्यांचं कसं मजेत चाललं होतो, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न चालू आहे. ती व्यवस्था म्हणजे आपल्याला मिळालेल्या शापाचा काळ होता, असे समजून वागलो तरच दिवस बदलतील. नाही तर केवळ दिवस केवळ येतील आणि उलटतील. अन् शेवटी यातून खरोखरच फक्त हानी झाली, तर २०१९ फारसे दूर नाही. त्यावेळी आपली ताकद लोक दाखवून देतीलच. कारण शेवटी इंद्राला फक्त शाप मिळालेला असतो, त्याचे इंद्रपद गेलेले नसते!

Wednesday, October 26, 2016

ट्रम्प बनणार का नरेंद्र मोदी?

दोन वर्षांपूर्वी 2014 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाने मोठा विजय नोंदवला. त्यावेळी स्वघोषित लिबरल गोटाने असे एक मिथक तयार केले, की ती निवडणूक अमेरिकेच्या धर्तीवर लढल्या गेली होती. अमेरिकेत ज्या प्रकारे अध्यक्षपदासाठी एक उमेदवार असतो आणि सगळी निवडणूक त्याच्याच अवतीभोवती फिरते, तशीच ती निवडणूक नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीवर केंद्रीत झाली होती, हा त्यांचा आवडता सिद्धांत होता. पुरोगामी किंवा नेहरूवादी सेक्युलरिजमच्या नावावर खपविल्या जाणारी विचारसरणी पिछाडीवर पडली आहे, हे मानण्यास नकार देण्यासाठी निर्माण केलेला तो एक युक्तिवाद होता. आता पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच निवडणुका अशाच पद्धतीने लढल्या गेल्या होत्या, ही गोष्ट वेगळी.

ही आठवण येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील अध्यक्षपदाची सध्या चालू असलेली निवडणूक. तिथे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात टक्कर आहे. अन् नरेंद्र मोदी यांनी ज्या परिस्थितीचा सामना केला होता, जवळपास अशाच परिस्थितीचा सामना ट्रम्प या टक्करीमध्ये करत आहेत. असंही म्हणता येईल, की अमेरिकेतील ही निवडणूक भारतातील निवडणुकांसारखीच लढली जात आहे. (प्रचाराची खालची पातळी आणि शिवीगाळीसह!) भारतात ज्या प्रकारे स्वघोषित उदारवादी मंडळी आणि माध्यमांनी मोदींना हरविण्यासाठी एक आघाडी उघडली होती, त्याच प्रकारे जवळपास संपूर्ण अमेरिकी माध्यमांनी  ट्रम्पना हरविण्याचा विडा उचलला आहे. रिपब्लिकन समर्थक आणि अनेक निष्पक्ष निरीक्षकांचे मत बनले आहे, की ट्रम्प फक्त हिलरींसोबतच लढा देत नाहीत, तर अमेरिकेच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांसोबतही लढाई करत आहेत. 

म्हणूनच पाश्चिमात्य माध्यमांत असे म्हटले जात आहे, की या नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक केवळ ट्रम्प आणि हिलरी यांच्या दरम्यानच नसून माध्यमांची विश्वासार्हतेची बाजी लागलेली आहे. भारतात ज्या तऱ्हेने मोदींनी मुख्य प्रवाहातील माध्यमांना बाजूला सारून नवीन माध्यमांच्या मदतीने आपले नाणे खणखणीत वाजवून घेतले, तशीच जादू अमेरिकेत  ट्रम्प करू शकतील का, हा आता प्रश्न आहे.

वॉशिंग्टन पोस्टमधील ताज्या लेखात माध्यमांच्या या पक्षपाती वागणुकीवर कठोर टीका करण्यात आली आहे. या लेखाचे उपशीर्षक आहे 'डोनाल्ड ट्रम्प यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांचे पितळ उघडे पाडले'. या लेखात म्हटले आहे, "मुख्य प्रवाहातील माध्यमांनी डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने आपला कल प्रदर्शित करण्यातील सारे पडदे दूर केले आहेत." फॉक्स न्यूजच्या हॉवर्ड कुर्टझ् यांच्या शब्दांत, "माध्यम बिचाऱ्या डोनाल्डवर तुटून पडले आहेत."

याचे एक उदाहरण वॉशिंग्टन पोस्टनेच दिले आहे. त्यानुसार ट्रम्प यांच्या सभेत अडथळा आणण्यासाठी लोकांना पैसे वाटण्याचे एक  स्टिंग ऑपरेशन समोर आले. तेव्हा हे स्टिंग करणारे लोक मुख्य प्रवाहातील पत्रकार नव्हते, असे सांगून हिलरींनी त्याची सच्चाई मान्य करण्यास नकार दिला. यावर वर्तमानपत्राने म्हटले आहे, की एक लॅपटॉप आणि मोबाइल असणारी कोणतीही व्यक्ती आजकाल पत्रकार असतो.मात्र मुख्य माध्यमांनी या घटनेकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. वोक्स या संकेतस्थळाचे राजकीय विश्लेषक एज्रा क्लाईन यांनी लिहिले आहे, की न्यूयॉर्क आणि वाशिंग्टनमध्ये असलेल्या माध्यमांचा स्वतःचा 'कॉस्मोपोलिटन' पूर्वग्रह आहे, तो  ट्रम्पसारख्या बाहेरच्या व्यक्तींच्या विरोधात काम करतो.   ट्रम्पच्या विजयाची या माध्यमांनी संस्थात्मक, व्यक्तिगत आणि शारीरिक भीतीही वाटते, असेही त्यांनी लिहिले आहे. मोदींच्या विजयापूर्वी 'दिल्लीच्या वर्तुळातील बाहेरच्या व्यक्तीच्या विजयाबाबत' भीतीचे जे वर्णन होते, त्यात आणि यात काही फरक आहे का?

अध्यक्षपदाच्या मुख्य उमेदवारांच्या शेवटच्या वादविवादापूर्वी एका कार्यक्रमात हिलरींसोबत ट्रम्पही सहभागी झाले होते. तेथे उपस्थित पत्रकारांकडे इशारा करत आणि प्रत्येकाचे नाव घेऊन ते हिलरींना उद्देशून म्हटले,  "अहो बघा, तुमचे सगळे पाठिराखे येथे आले आहेत." अमेरिकेचे राजकारण आणि पत्रकारितेतील हा एक नवा अध्याय होता. 

नरेंद्र मोदी हे एक सुसंस्कृत नेता आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधकांबद्दल किंवा माध्यमांबद्दल त्यांनी कधी अपशब्द काढला नाही. येथे करण थापर यांच्या 'डेविल्स अॅडव्होकेट'  या कार्यक्रमातील त्यांच्या एका मुलाखतीची आठवण येणे साहजिक आहे. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या कार्यक्रमात थापर यांनी गुजरात दंगलींबाबत एकच प्रश्न वारंवार विचारला होता. मोदींनी त्यांना अत्यंत संयमाने एकच उत्तर दिले. शेवटी जेव्हा थापर आपल्या प्रश्नावर अडून बसले, तेव्हा मोदी म्हणाले, 'थापर साहेब, तुम्ही माझे मित्र आहेत आणि तुम्ही मित्रच राहावेत, अशी माझी इच्छा आहे.' आणि त्या कार्यक्रमातून ते निघून गेले.

ट्रम्पची मात्र गोष्टच वेगळी. त्यांच्या सैल सुटलेल्या जिभेसाठीच ते ओळखले जातात. परिस्थिती अशी आहे, की कोलोराडोतील एका सभेतट्रम्पनी आपल्या पाठिराख्यांना सांगितले, "वर्तमानपत्रे विसरून जा, इंटरनेट वाचा. तिथे मला जास्त प्रामाणिकपणा सापडतो."  

नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे मुख्य प्रवाहातील माध्यमांना अर्थहीन बनवत  सोशल मीडियाचा आश्रय घेतला आणि त्यात यशही मिळविले, त्याच प्रकारे ट्रम्प यांनी फेसबुकच्या साहाय्याने प्रचार सुरू ठेवला आहे. म्हणूनच अमेरिकेतील भारतीय लोकांसमोर प्रचार सभेत 'मी मोदींचा प्रशंसक आहे आणि त्यांच्या प्रकारे काम करण्याची माझी इच्छा आहे,' असे ट्रम्प म्हणतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ असतात. आता ते नरेंद्र मोदी बनणार का, हे फक्त काळ आणि अमेरिकी मतदातेच सांगू शकतात. 

Friday, October 14, 2016

'धृतराष्ट्र विकारा'चा पहिला अपवाद

            पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात फिरत असताना जरा जनमानसाचा अंदाज घेण्याचा जरा प्रयत्न केला. अलम दुनियेत बदनाम झालेल्या तेथील सरकारबद्दल लोकांना काय वाटते, याचा अंदाज घेऊन पाहिला. रेल्वेतील सहप्रवासी असोत किंवा कानपूरच्या रस्त्यावर वाहने चालवणारे चालक, त्यांच्या तोंडून एकूण वर्तमानाबद्दल फारशी तक्रार दिसली नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती असल्याचे जाणवत होते. त्यांच्या काळात राज्यात विकास झाल्याचे उदाहरणानिशी ते सांगत होते. कानपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून काही वर्षांपूर्वी 15-16 किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास लागायचे. आता हा वेळ अर्ध्या तासावर आला आहे, याचे चालकाला समाधान होते. त्यांच्या काळात लखनौमध्ये तयार झालेल्या पर्यटन केंद्राचीही बरीच स्तुती ऐकली. अर्थात् उत्तर प्रदेशातील विकासाची तळरेषा खरोखरच एवढ्या तळाशी आहे, की काहीसे बोटभर वर गेले तरी त्यांना आकाश ठेंगणे वाटावे. एकूण व्यवस्थेतील अनागोंदी (किंवा अनागोंदीची व्यवस्था) या बाबतीत त्या राज्याची स्पर्धा फक्त महाराष्ट्राशी होऊ शकेल.
            सांगायचा मुद्दा हा, की अखिलेश यादव हे वाटतात तेवढे अक्षम मुख्यमंत्री नाहीत, असा साधारण सूर आहे. अशा या मुख्यमंत्र्याला त्याच्याच वडिलांनी गच्ची देण्याचा एकूण अंदाज दिसतोय. भारतीय राजकारणातील – किंबहुना भारतीय समाजजीवनातील – हे एक आक्रितच म्हणायला पाहिजे. याचे कारण भारतातील प्राचीन म्हणजे अतिप्राचीन परंपरा. आपला पुत्र कसाही असला, तरी त्याची पाठराखण करायची, भलेही त्यात स्वतःचा नाश झाला तरी चालेल, ही ती परंपरा. सत्यम या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा फुगा फुटला तेव्हा एका फ्रेंच संकेतस्थळासाठी मी लेख लिहिला होता. त्यावेळी धृतराष्ट्र सिंड्रोम (धृतराष्ट्र विकार) हा वाक्प्रयोग मी केला होता. आपला मुलगा/मुलगी चुकूच शकत नाहीत, आपली गादी त्यांनीच सांभाळावी, त्यांचे सगळे दोष इतरांनी गोड मानून घ्यावेत, हा या विकाराने ग्रस्त असलेल्यांचा आग्रह असतो. राजकीय नेते असो की उद्योगपती, कलावंत असो की खेळाडू, भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात या रोगाची लक्षणे आढळतील. अपोलो टायर्सच्या रौनकसिंग आणि त्यांचा मुलगा ओमकारसिंग कन्वर यांच्यातील वाद हा एक अपवाद, पण तोही संपत्तीचा वाद होता. 
         खासकरून राजकीय क्षेत्रामध्ये या विकाराने पार उच्छाद मांडलेला दिसून येईल. 'धृतराष्ट्र विकारा'ची लागण झालेली नाही, असा एकही पक्ष दिसणार नाही. आपल्या वंशाच्या दिव्यांसाठी इतरांना राबवून घेणारे, त्यांना पणाला लावणारे आणि प्रसंगी त्यांचा राजकीय बळी घेणारे अनेक धृतराष्ट्र देशाने पाहिले आहेत. त्यात वैविध्यही भरपूर. 
       द्रामुकच्या करुणानिधींनी आधी आपल्या ज्येष्ठ पुत्राला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा एम. जी. रामचंद्रन यांनी वेगळी चूल मांडली. तरीही तो मुलगा वारल्यानंतर करुणानिधींनी आधी आपल्या अळगिरी या मुलाला बढती दिली आणि आता स्टॅलिन यांना गादीचा वारस म्हणून नियुक्त केले आहे. तेलुगु देसमच्या एन. टी. आर. यांनी ज्येष्ठ पुत्र हरिकृष्णा, मुलगी पुरंदरेश्वरी देवी यांना राजकारणात आणले आणि तिसरा मुलगा बाळकृष्णाला चित्रपटांत आणले. ते अजून आपापल्या क्षेत्रांमध्ये आहेतच, शिवाय आता त्यांचा नातू ज्युनियर एनटीआर चित्रपटांमध्ये त्यांचा वारसा चालवत आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एच. डी. देवेगौडा यांनी आपला मुलगा कुमारस्वामी यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपविली आहेत. केरळमध्ये ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांनी आपल्या मुलाला आणलेच होते. शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी पुतण्याला अडगळीत टाकले. त्यांचे 'जाहीर' विरोधक व जुने'जाणते राजे' शरद पवार यांनीही आपल्या मुलीसाठी पुतण्याला हातभर अंतरावरच ठेवले आहे. अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल यांच्या तर संपूर्ण कुटुंबानेच सत्तापदे बळकावून ठेवली आहेत. मात्र त्यातही मुलगा सुखबिरसिंग बादल यांना उपमुख्यमंत्री नेमून 'हातचा एक' ठेवला आहेच. काँग्रेसमध्ये तर पक्ष अकबर रोडवर (पक्ष कार्यालय) सुरू होतो आणि 10, जनपथपाशी (सोनिया व राहुल गांधींचे निवासस्थान) संपतो. बाकी मग राज्यात त्याच पाढ्याची उजळणी चालू असते. राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादवांबद्दल तर बोलायलाच नको. भाजपमध्ये महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी मुलीसाठी असाच राजहट्ट करून पुतण्याला अलगद राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत टाकले. जाऊ द्या, कोळसा उगाळावा तेवढा काळा...
          यातील एकाही वारसदाराने आपल्या कर्तृत्वाने आसमंत उजळून टाकलेला नाही किंवा असामान्य दूरदृष्टी दाखवून लोकोपकार केलेला नाही. फक्त त्यांच्या त्यांच्या पित्याची नेमप्लेट हीच त्यांची जमेची बाजू. अखिलेश यादव सत्तेवर आले, तेव्हा तेही याच यादीतील आणखी एक भर हेच वर्णन त्यांना लागू होते. आजही त्यांनी फार काही असामान्य कामगिरी केलेली नाही. मात्र कुटुंबात पेचप्रसंग उद्भवलेला असताना त्यांच्या पिताश्रींनी आपले वजन मुलाच्या बाजूने न टाकता भावाच्या बाजूने टाकावे, हे वेगळेपण खरे. त्यातही फरक आहे. धृतराष्ट्र आपल्या पोरावर आंधळा विश्वास दाखवत असताना चुकीच्या बाजूने उभा टाकला होता. आज मुलायमसिंग मुलगा विकासाच्या गोष्टी करत असताना गुंडगिरी आणि हेकेखोरी करणाऱ्या भावाच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे पुत्रप्रेमाला बळी न पडल्याबद्दल त्यांचे धड अभिनंदनही करता येत नाही.
         आपल्या संपूर्ण कुळाचा एकमेकांशी भांडून नाश होताना जेथे कृष्णाने पाहिला, त्याच यादवांच्या भूमीतील ही घडामोड उदात्त वगैरे आहे, अशातला भाग नाही. फक्त भारतीय राजकारणाच्या काळ्याकुट्ट पडद्यावर पडलेला हा जरा वेगळ्या रंगाचा - पण डागच – होय. हेच त्याचे आगळेपण!