Wednesday, January 27, 2010

भारतीय भूमीवरील ब्रिटिश गोपालक

एडमंड पायपरएडमंड पायपर यांना भेटण्यापूर्वी केवळ एक ब्रिटीश व्यक्ती मंचरला गाईंचा गोठा सांभाळण्या साठी आला आहे, हीच आमची कल्पना होती. पायपर यांच्याशी तासभर गप्पा मारून निघाल्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यावसायिकता यांच्याबद्दलच्या अनेक नव्या कल्पनांनी आमची झोळी भरून गेली होती. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली होती. भारतीय शेतकऱ्यांचे दुखणे कुठे आहे, याची अंधुकशी कल्पना आली होती. तसेच भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे, मला काहीही माहित नसताना वाटायचे सगळे माहित आहे आणि जसजसे कळत गेले तसतसे जाणवत गेले, की मला काहीही माहित नाही.

गोवर्धन फार्मगेल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, दररोज चाळीस टन चीज बनण्यासाठी 'गोवर्धन'ला लागणारे दूध पुरविले जाते ते मंचरजवळच असलेल्या एका फार्मवर सांभाळलेल्या गाईंपासून. 'लोकमत'मध्ये पायपरबद्दल आलेली एक त्रोटक बातमी वाचून आम्ही तिथे गेलो होतो. आमच्यादृ्ष्टीने ही एक रंजक घटना होती. त्यात रंजक काही नसून व्यावसायिकता आणि वैज्ञानिक माहितीचे ते एक उपयोजन होते, हे कळाले पायपर यांच्याचकडून.

शेतीविज्ञानात पदवी घेतल्यानंतर पायपरनी मायदेशी इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कामे केली. लहानपणापासून शेतावर राबल्यामुळे शेतातच काम करण्याची आवड होती. इंग्लंडमधील यंत्रणेमुळे आणि लाल फितीच्या कारभारामुळे पायपरला कंटाळा आला आणि स्वारी निघाली पोलंडला. तिथून हंगेरी, सौदी अरेबिया बहारिन आणि जॉर्डन अशी यात्रा करून पायपरची  स्वारी भारतात आली. शहा यांनी 'गोवर्धन’च्या उत्पादनांसाठी ऑऱ्गॅनिक फार्मिंगचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी डेअरी व्यवसायातील आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करण्यासाठी त्या प्रकारचे ज्ञान असणारी व्यक्ती हवी होती. त्यातून आधी मायकेल नावाच्या एकाची आणि दीड वर्षांपूर्वी पायपर यांची निवड करण्यात आली.

“मला केवळ काम म्हणून करायचे असते, प्राण्यांवर माझं प्रेम नसतं तर इथं एक क्षणभरही थांबलो नसतो,” पायपर म्हणाले. कारण सुमारे तासभर जनावरांच्या पालनाबाबत मांडलेली भूमिका आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे असे काही गणित मांडले होते, की गाय म्हणजे त्यांना केवळ कच्चा माल वाटतो की काय अशी शंका मला आली होती. 2300 गाई आणि सुमारे शंभरेक कालवडी सांभाळणाऱ्या पायपरना विचारलं, की कालवडींना पिंजऱ्यात का ठेवलं आहे तर ते म्हणाले, कारण त्या उद्याच्या गाई आहेत. त्यांना काहीही इजा होऊ द्यायची नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे. ते अशा थराला, की कालवडींना देण्यात येण्याऱ्या खाद्यावर माशा बसू नयेत, म्हणून ते झाकून ठेवण्यात येतं. त्यामुळे त्या प्राण्यांवर त्यांचे प्रेम आहे का नाही हा प्रश्न मला सतावत होता.

भाग्यलक्ष्मी फार्म, मंचर सुमारे तेवीसशे गाईंना तसेच कालवडींना स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या अंगावर एक चिप बसविण्यात आली आहे त्यातून त्या गाईवर संगणकाद्वारे लक्ष ठेवण्यात येते. या गाईने किती खाद्य घेतले, तिच्य़ापासून किती दूध मिळाले, तिला कोणता आजार आहे का, तिच्यात आजाराचे काही लक्षणं आहेत का, हे सगळं त्या एका चिपच्या साहाय्याने पाहण्यात येतं. एवढंच नाही तर एखाद्या गायीने दिलेल्या दुधाचे तापमान जास्त असलं तर काहीतरी गडबड आहे, हेही त्या संगणकाच्या साहाय्याने कळतं. पन्नास गाईंचा एक गट अशा रितीने रोलर पार्लर नावाच्या यंत्रावर चढवून पाच मिनिटांत दूध काढण्यात येतं. या सगळ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पायपर साहेबांवर आहे.

ते हे काम काटेकोरपणे करत आहेत, याची चुणूक आमची गाडी भाग्यलक्ष्मी फार्ममध्ये प्रवेश करतानाच मिळाली. फाटकाजवळच जीपवर जंतुनाशकाचा फवारा करण्यात आला. त्यानंतर कालवडींच्या गोठ्यात जातानासुद्धा जंतुनाशक मिसळलेल्या पाण्यात पाय बुडवूनच आत प्रवेश करावा लागला. गायींचे दूध यंत्राद्वारे तीन वेळेस काढण्यात येते. ते पाहण्यासाठी खास प्रेक्षागृह केलेले आहे. तिथेच पायपर आणि आमचा संवाद झाला. आधी काहीसा आखडू वाटणारा हा माणूस नंतर एवढा खुलला, त्याला आवरताना आमच्या नाकी नऊ आले होते.

“भारतात सर्वाधिक गायी आहेत, पशुधन आहे. मात्र जगात प्रति गाय दुधाचे उत्पादन सर्वात कमी आहे. याचं कारण इथल्या लोकांना दिलेली चुकीची माहिती आणि काळानुसार न बदलणे,” हे त्यांचं निदान होतं. एकावेळी पाच पाच हजार गाईंचे गोठे सांभाळण्याऱ्या माणसानं ते सांगितलं म्हणजे खरंच असणार.

“ब्रिटनध्ये माणसांना पगार खूप द्यावा लागतो. त्यामुळे तिथे एवढा फार्म चालविण्यासाठी दोन किंवा तीन माणसे पुरतात. तुमच्या इथे माणसं मुबलक मिळतात. शिवाय त्यांना अनेक कामं करायला आवडत नाहीत. एक माणूस एकच काम करू पाहतो. गाई ढकलायला एक माणूस आणि मशीन चालू करायला दुसरा माणूस कशाला पाहिजेत? गाईंना एवढे आजार होतात त्यांच्यासाठी आम्हाला लसीसुद्धा मिळत नाहीत. फक्त तीन लसी घेण्यासाठी सरकारी परवानगी देत. इथं एवढ्या माशा आहेत, किडे आहेत त्यामुळे गाईंना खूप सांभाळावं लागतं. आता आम्ही इतक्या कडेकोट वातावरणात गाईंना ठेवलंय आणि त्यासाठी गुंतवणूक केलीय. पण सगळेच ते करू शकतील असं नाही,” त्यांचं सांगणं चालू होतं.

तिथे काम करणाऱ्या माणसांनी सांगितलं, की पायपर यांना जुजबी मराठी येतं. त्याच्या साहाय्याने त्यांनी हाताखालच्या माणसाला अगदी तयार केलंय. एका सहाय्यकाकडे बोट दाखवून ते विचारू लागले, “हाच माणूस जर जनावरांच्या खुराकाकडे लक्ष देऊ शकला, त्यांच्या बारीक सारीक बदलांकडे लक्ष ठेवू लागला, वेळेवर सगळी निरीक्षणे घेऊ शकला तर डॉक्टरची गरजच पडणार नाही. डॉक्टरचे काम फक्त आजारी प्राण्यावर उपचार करण्यापुरतेच राहतील. प्राण्यावर लक्ष ठेवण्याचं, रोगाचं निदान करण्याचं काम हाच माणूस करेल ना.” हे धोरण काहीसं सफल झालं असावंही कारण फार्मवर ठेवलेल्या कालवडींपैकी फक्त एक टक्का कालवडींचा मृत्यू झाला. शिवाय भारतात कालवडींचा वाढीचे सरासरी प्रमाण दररोज तीनशे ग्राम असताना या कालवडींचा वाढीचे प्रमाण दररोज नऊशे ग्राम आहे.

हा माणूस इतक्या दूर का आला असवा? हाच प्रश्न विचारला असता पायपरचे उत्तर होते,  “मला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घ्यायला आवडते. दर दिवशी नवीन काहीतरी जाणून घ्यायला आवडते. शेवटी थेअरी सगळीकडे सारखीच असते. प्रात्यक्षक वेगवेगळे असतात. मी याच्यापेक्षाही उष्ण देशांमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे मला इथं फारसं वेगळेपण जाणवत नाही.”

फार्मजवळच्याच एका बंगल्यात पायपर राहतात. त्यांना कोणीतरी विचारलं,  “तुम्हाला इथं चर्च नाही मग कसं करता?” त्यावर त्यांचं उत्तर होतं, “माझा देव चार भिंतीच्या आत नाही. तो सगळीकडे आहे. त्यामुळे मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाही. ”

No comments:

Post a Comment