Friday, March 11, 2011

नारायण मूर्तींचा अस्मितेचा धडा

  • आपले कन्नड राज्य दोन हजार वर्षांचा इतिहास बाळगणारे राज्य आहे. राजे-महाराजांनी आपल्या कन्नडची पताका उंचावली. अक्कमहादेवी, बसवण्णा, वचनकार इत्यादी याच मातीत जन्मले आणि त्यांनी ही संस्कृती समृद्ध केली. हे सर्व आपल्याला प्रातः स्मरणीय आहेत... 
  • मी दक्षिण कर्नाटकात जन्मलो आणि उत्तर कर्नाटकात राहिलो. माझी व्यवहाराची भाषा इंग्रजी असली तरी मी सदैव कन्नडीगच राहीन... 

तब्बल २५ वर्षांनतंर विश्व कन्नड संमेलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री यडियूरप्पांना बेळगाववर कर्नाटकाचा हक्क दाखवून द्यायचा होता, तर मूर्तींना स्वतःचे कन्नडिगत्व सिद्ध करावे लागले. 
ही वक्तव्ये आहेत इन्फोसिसचे संस्थापक आणि भारतातील माहिती तंत्रज्ञान क्रांतीचे धुरीण डॉ. नागवार रामराय नारायण मूर्ती यांची. आज, शुक्रवार ११ मार्च २०११ रोजी विश्व कन्नड संमेलनाचे उदॆ्घाटन करताना मूर्ती यांनी वरील वक्तव्य केले. या प्रसंगी त्यांनी कन्नडमध्येच भाषण केले, हे विशेष.

कन्नड भाषा आणि संस्कृतीबद्दल आदर व्यक्त करतानाच मूर्ती यांनी त्यांच्यावर आक्षेप घेणाऱ्या कन्नड भाषासमर्थकांनाही चपराक लगावली. इंग्रजी भाषेबाबत मूर्ती यांना प्रेम असल्यामुळे, बेळगावात होणाऱ्या विश्व कन्नड संमेलनासाठी त्यांना बोलावू नये, अशी आग्रही मागणी कर्नाटकातील अनेक साहित्यिकांनी केली होती.  डॉ. बरगुरु रामचंद्रप्पा, चंपा, गौरी लंकेश अशांचा त्यात समावेश होता. त्यामागे मूर्ती यांनी कधीकाळी केलेली,  कर्नाटकात इंग्रजी माध्यमांच्या अधिक शाळा असाव्यात,  ही भलामण होती.  

मूर्ती यांचे उद्योग व सामाजिक जगतातील स्थान ओळखून असलेल्या मुख्यमंत्री यडियूरप्पा यांनी मात्र त्यांनाच उदॆ्घाटनासाठी बोलाविण्याची ठाम भूमिका घेतली. इकडे मूर्ती यांनीही स्वतःची बाजू मांडण्यास सुरवात केली. गेल्या आठवड्यात टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले होते. समाजाच्या खालच्या थरात इंग्रजी शिक्षणाकडे ओढा वाढत आहे आणि त्यामुळे या शाळांमध्ये प्रवेशासाठी झुंबड उडते. त्यासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळा अधिक काढाव्यात, अशी सूचना मूर्ती यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांना केली होती. 

काल बंगळूरु येथे एका सभेत बोलताना त्यांनी याच विषयावर आणखी स्पष्टीकरण दिले."कन्नड भाषेला बळ मिळायचे असेल, तर त्यासाठी कन्नडिगांना बळ मिळायला पाहिजे, " असे मत त्यांनी व्यक्त केले. आपण 'किती कन्नड' आहोत हे सांगण्यासाठी उत्तर कर्नाटकात पूरग्रस्तांसाठी ३० कोटी रुपये दिल्याची आठवणही त्यांना करून द्यावी लागली. 

केवळ आर्थिक प्रगती करून अस्मिता बाळगता येत नाही, त्यासाठी अस्मितेच्या मुखंडांची भाषाही बोलावी लागते, हा धडा तीस वर्षांनंतर का होईना मूर्तींना  गिरवावा लागत आहे, हा या प्रकरणाचा मथितार्थ! 

1 comment:

  1. अस्मितेच्या मुखंडांची भाषाही बोलावी लागते, हा धडा नारायण मूर्ती यांना ३० वर्षा नंतर घ्यावा लागला हे बरोबर आहे. पण आज ४०-४५ वर्षा नंतर ही मराठीच्या अस्मितेचा नावाचा दुरुपयोग करत निजामाच्या रजाकारा प्रमाणे आपल्याच मराठी बांधवाना लुटणाऱ्या मराठी राजकारण करण्याऱ्या आणि भ्रष्ट्राचाराच्या लोण्याच्या गोळ्या साठी दोन बोक्या प्रमाणे भांडणाऱ्या आपल्या मराठी नेत्यांना अस्मितेची भाषा करायची असेल तर आधि स्वत: पेक्षा जनतेची आर्थिक ताकद वाढवणे आवश्यक आहे, हे या मराठी नेत्यांना अजून समजत नाही. हे मराठी माणसाचे दुर्देव आहे.

    ReplyDelete