Saturday, January 30, 2016

दर साल दर शेकडा वादाचे संमेलन

'नेमेचि येतो मग पावसाळा' या उक्तीतील पावसाने आता आपला नेम सोडला आहे. उलट पावसाने अवकाळी कोसळण्यातच अलीकडे अधिक सातत्य दाखवले आहे. मात्र पावसाच्या बरोबरीने सातत्य राखणाऱ्या साहित्याच्या बरसातीने अद्याप तरी तेवढा दगा दिलेला नाही. त्यामुळे दर साल दर शेकडा या दराने साहित्यिक मंडळी एकत्र जमून वाद-वाद खेळतात. (श्लेष साधल्याचा आनंद काही वेगळाच असतो!) त्यालाच साहित्य संमेलन असे म्हणतात.
साहित्य व कलेच्या नावाने चालणारी ही रंगपंचमी यंदा जरा जास्तच रंगली. दरवर्षी संमेलनाचे ठिकाण किंवा त्याचे नेपथ्य अथवा विषयपत्रिकेवर असलेले नसलेले मुद्दे अशा विषयांवर शाब्दिक आहेर दिले घेतले जातात. यंदा मात्र खुद्द संमेलनाध्यक्षांनीच असा काही पवित्रा घेतला होता, की जणू बघतोच हे संमेलन कसे होते ते, असेच काही ते विचारत होते.
८९व्या साहित्य संमेलनाची चर्चा सुरू झाली ती श्रीपाल सबनीस यांची योग्यता, त्यांनी निवडून येण्यासाठी वापरलेले भले-बुरे मार्ग, साहित्यक्षेत्रातील स्थान इ. विषयांवरून. नंतर त्यांनीच ती वेगळ्या दिशेने वळवली. आधी नको ते बोलून आणि नंतर नको त्या प्रकाराने त्याचे समर्थन करून त्यांनी या वार्षिक मेळाव्याचा नूरच पालटून टाकला. आधी सबनीसांनी उत्तम वातावरण निर्मिती करून आता विचारस्वातंत्र्याच्या यज्ञात पुढची आहुती त्यांचीच पडणार आहे, असा रागरंग निर्माण केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोंदीवरच शरसंधान केल्याने - आणि तेही अध्यक्ष सोडा कुठल्याही साहित्यिक म्हणविणाऱ्या माणसाच्या दृष्टीने लज्जास्पद रीतीने - अचानक त्यांच्यावर पुरोगामीत्वाचा शेंदूर फासला गेला आणि बघता बघता एका दगडाचा शेंदूर झाला. त्यामुळे सगळी विवेकवादी टाळकरी मंडळी त्यांच्या अवतीभोवती जमली. कोणी पत्रके काढली तर कोणी प्रभात फेऱ्या. त्यातच सनातन संस्थेच्या वकीलांनीही पाहुण्याच्या काठीने साप मारावा म्हणून आपलीही दुकानदारी करून घेतली.
मात्र अवतीभोवती जमलेल्या समस्त समाजवाद्यांचा मुखभंग करून श्रीपाल सबनीस यांनी अचानक जाहीर दिलगिरी व्यक्त केली. आदल्याच दिवशी सर्व पुरोगाम्यांच्या साक्षीने आणि साथीने सबनीस सर पुणे स्थानकाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्यापासून डॅा. आंबेडकर पुतळ्यापर्यंत चालत गेले होते. 'खुशाल मला गोळ्या डाला, पण सत्य सांगणे मी सोडणार नाही,' म्हणत होते. अन् चोवीस तास उलटायच्या आत तेच सबनीस पंतप्रधानांना दिलगिरीचे पत्र लिहिले असल्याचे सांगत होते. तसे हे पत्र त्यांनी पाच जानेवारी रोजीच लिहिले होते. याचा अर्थ आपण आगळीक केली आहे, ती आपल्या अंगावर शेकणार आहे, याचा अंदाज त्यांना आला होता. तरीही गॅलिलिओच्या आवेशाने मी माझे सत्य सोडणार नाही, असे सांगत ते सुटले होते.
याचे कारण म्हणजे नरेंद्र मोदी, रा. स्व. संघ किंवा हिंदुत्ववाद असे विषय आले, की त्यांना विरोध करणे हेच आपले जीवितकार्य आहे, असे ज्यांना वाटते त्यांची फूस किंवा त्यांच्याबद्दलचा विश्वास. भाजपच्या नाठाळ कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या शैलीत सबनीसांच्या विरोधात ठणाणा सुरू केला, तेव्हाच सुतकी चेहऱ्याने वावरणाऱ्या पुरोगामी वासरांच्या कानात वारे शिरणार हे नक्की झाले होते. तेव्हा 'उजव्या' विचारसरणीच्या विरोधात तुम्ही तंबू ठोका, आम्ही शिबंदी घेऊन आलोच, असा कोणीतरी सर्वसमावेशक निरोप तरी दिला असावा. नाहीतर 'मी पुरोगामीत्वाची तलवार उपसल्यानंतर प्रगतीशील विचारांच्या झुंडी आपल्या मागे येणार म्हणजे येणार,' हा पक्का आत्मविश्वास सबनीस सरांकडे असावा. ज्या अर्थी दिलगिरीचे पत्र खुशाल पाठवून आठ दिवस पुरोगाम्यांना 'फिरविण्याचा' वामाचार सबनीसांनी केला, त्याअर्थी दुसरी शक्यता अधिक सबळ वाटते.

ते काही असो. आपल्या तिसऱ्या भूमिकेची अनोखी अदा सबनीसांनी दाखविली आणि सबनीसांच्या नादाला लागून महाराष्ट्रात 'असहिष्णुता पार्ट २'चे खेळ करण्याचे समाजवाद्यांनी केलेले मनसुबे पुरते उधळले गेले.
(क्रमशः)

Tuesday, January 12, 2016

सबनीसांनी केले सेक्युलरांचे पाखंड उघडे!

सहा महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात एक आगळेवेगळे वातावरण पाहायला मिळत होते. पुरोगामीत्व आणि विवेकवादाच्या टोप्या घातलेले साहित्यिक एकामागोमाग चवताळून उठत होते आणि आपापले ठेवणीतले पुरस्कार परत करत होते. सत्तेवर येऊन ज्या सरकारला जेमतेम एक वर्ष झाले होते, त्या सरकारच्या आश्रयाने देशात असहिष्णुता आणि अतिरेक वाढला असल्याचा शोध या लोकांना लागला होता. मागील सरकारच्या साहित्यिकपणाची प्राणप्रतिष्ठा झालेल्या आणि म्हणून सामान्य रसिकांपासून सहस्त्र योजने लांब असलेल्या व्यक्तींचाच त्यात बहुतांशी भरणा होता, हा आपण केवळ योगायोग मानायचा! आम्ही पुरोगामी म्हणजे किती सोज्वळ आणि राष्ट्रवादाची भाषा करणारे 'कित्ती कित्ती' जहरी, असा आपल्याच विचारांचे सोवळे नेसलेल्या या नवब्राह्मणांचा आविर्भाव होता. सरकारी कृपा सुटलेल्या आणि सूर्यमुखी फुलासारखे इंग्लंड-अमेरिकेच्या दिशेनुसार आपली दिशा बदलणाऱ्या माध्यमांचीही त्यांना साथ लाभली होती. त्यामुळे पुरोगामीपणाला असा काही बहर आला होता आणि भारतातील फॅसिस्ट निर्मूलनाला असा काही ऊत आला होता, की खुद्द हिटलर, मुसोलिनी आणि स्टॅलिनच्या देशांनाही त्याचे अप्रूप वाटावे!
या सेक्युलर नाट्याचा प्रभाव असा काही जबरदस्त होता, की शेषराव मोरे यांच्यासारख्या विद्वानानेही पुरोगामी दहशतवाद संपविण्याचे आवाहन केले, तेव्हा ते हिंदुत्ववादाच्या वळचणीला लागल्याचे आणि हे हिंदुत्ववाद्यांचेच कारस्थान असल्याचे सिद्ध करण्याऱ्या युक्तिवादांनी विवेकवाद्यांच्या संगणकांचे पडदे भरून जाऊ लागले.
पण हाय रे दैवा, केवळ चार महिन्यांच्या आत सेक्युलरांच्या सोवळ्याचे वस्त्रहरण त्यांच्या पंथातील एकाने केले आणि सेक्युलरांची दातखिळी बसली. आणि आता जेव्हा अतिरेक, आक्रस्ताळेपणा आणि माथेफिरूपणा हा केवळ गैर-सेक्युलरांची मक्तेदारी नाही तर आपल्यातही अशी माणसे निपजतात, हे कळाल्यावर विश्वामित्री पवित्रा घेऊन ही मंडळी बसली आहेत.
पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्रीपाल सबनीस यांची निवड झाली तेव्हा मराठी साहित्य जगताशी थोडाफार संबंध असलेल्यांच्या चेहऱ्यावर, ओठांवर आणि डोळ्यांमध्ये एकच प्रश्न तरळला - तो म्हणजे कोण हे श्रीपाल सबनीस? तेव्हा आपण दलित, साम्यवादी आणि पुरोगामी चळवळीतून आलेलो आहोत, हे खुद्द सबनीस यांनीच सांगून टाकले. त्यांच्या घरी माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली कुळपरंपरा सॉक्रेटिसपासून कबीर, न्या. रानडे, महात्मा फुले ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत सांगितली होती, तेव्हा सदर लेखक तिथे उपस्थित होता. नावांची ही माळ एवढी लांब होती, की त्या वेळेत एखाद्या निष्णात लेखकाने शंभर पानी एखादे पुस्तक लिहिले असते.
येथे लक्षात घेण्यासारखे म्हणजे सबनीसांनी ही कुळपरंपरा कथन केली, तेव्हा पुरोगाम्यांच्या कुठल्याही पंथ-उपपंथातून त्याला विरोध किंवा आक्षेप झाला नाही.  याचा अर्थ त्यांनी या परंपरेवर केलेला दावा या लोकांना अमान्य नव्हता किंवा नाही. इतकेच नाही, तर त्यांच्याबद्दल उठलेल्या वादंगानंतर भाई वैद्य आणि विलास वाघ या धर्मनिरपेक्षतेच्या झेंडा हाती घेतलेल्या दोघांनीच आपली भेट घेतल्याचेही त्यांनी सांगितले. आता या दोन्ही नावांचे समाजवादी-साम्यवादी गोटाला वावडे नाही. बाकी य. दि. फडके, ग. प्र. प्रधान ते गंगाधर पानतावणे यांच्यापर्यंत अनेक नावे सबनीस घेतात. याचाच अर्थ सबनीस हे महाराष्ट्रात स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या मंडळींमधीलच एक आहे, याबद्दल शंकेला जागा नाही. 
अन् मग सबनीसांनी आपली ओळख पटविण्यासाठी मुक्ताफळे उधळायला सुरूवात केली. त्यांना मुक्ताफळे म्हणण्याऐवजी बरळणे म्हटले तरी चालेल. सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख केला. "शांतता शांतता करत हा जगभर फिरतो. मोदी पाकिस्तानात गेला. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या असत्या तर पाडगावकरांच्या मोदींना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आपल्यावर आली असती," हे सबनीसांचे शब्द आहेत. तसेच "गोध्रातील मोदी हे कलंकित असून असा पंतप्रधान मला चालणार नाही," असेही म्हटले. त्यानंतर या वक्तव्यावर वादळ उठले तेव्हा माझे शब्द चुकले तरी मला पंतप्रधानांबद्दल आदरच आहे, मी त्यांच्याबद्दल काळजीमुळेच बोललो, अशी मखलाशी त्यांनी करून पाहिली. त्यानंतर मी मोदींना राष्ट्रभक्तच म्हटले, असेही म्हणून पाहिले.
परंतु सबनीसांनी केलेला एकेरी उल्लेख हा मूळ आक्षेप नसावा.  तसा तो आहेच मात्र त्यावर लक्ष केंद्रीत केले तर खऱ्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. अशी भाषा पुरोगाम्यांना नवीन नाही. फक्त त्यांच्या गोटातून ती येते तेव्हा ते उद्वेगाचे लक्षण असते आणि हिंदुत्ववाद्याने कोणी वापरली, तर मात्र ती फॅसिस्ट विचारसरणीचा वसा असतो. "माझ्या हाती बंदूक असती तर नरेंद्र मोदींना मी गोळ्या घातल्या असत्या," हे उद्गार विजय तेंडुलकरांनी काढले होते तेव्हा सेक्युलरांनी ते गोड मानून घेतलेच होते ना. सबनीसांच्या कथनातील आक्षेपाचा मूळ मुद्दा त्यातील खोटेपणा आणि त्यावरची सेक्युलरांची प्रतिक्रिया हा आहे. 
मोदी कलंकित आहेत, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आपले मत दिलेले आहे. विद्यार्थ्यांपुढे राजकीय भाषण करणाऱ्या प्राध्यापकाला अशा कायदेशीर बाबीकडे दुर्लक्ष करता येते का? का खोटे बोल पण रेटून बोल, या पुरोगामी काव्यानुसार चाललेला हा प्रकार आहे? मोदी यांनी पाकिस्तानात अचानक जावे का नाही, हा वादाचा विषय आहे. परंतु तो वाद करावा कोणी? काय गंमत आहे पाहा, संरक्षण शास्त्र आणि मुत्सद्देगिरीशी जिचा तिळमात्रही संबंध आलेला नाही, अशी व्यक्ती पंतप्रधानाला आंतरराष्ट्रीय राजकारण व युद्धशास्त्र शिकवते. आता याच व्यक्तीने तौलनिक भाषाशास्त्र या विषयाचे आयुष्यभर अध्ययन-अध्यापन केले आहे (असा त्या व्यक्तीचाच दावा आहे) आणि ही व्यक्ती 'मी खेड्यातून आलो आहे, मला शब्दांची माहिती नाही,' असे रडवेल्या चेहऱ्याने सांगत आहे. हा जर भंपकपणा आणि अगोचरपणा नसेल, तर आणखी काय असू शकते?
कॉ. पानसरे यांच्या खुनानंतर वाहिन्यांवर चर्चेची गळती सुरू होती, तेव्हा एका स्वयंघोषित पुरोगामी लेखकाने चर्चेत एक वाक्य म्हटले होते - "कोणताही पुरोगामी माणूस कोणाचा खून करू शकत नाही आणि जो खून करतो तो पुरोगामी असू शकत नाही." थोडक्यात म्हणजे समस्त पुरोगामी आणि विवेकवादी शुचिर्भूतपणाची कवच-कुंडले घेऊनच आलेली असतात. म्हणूनच आता सबनीसांनी आपले रंग दाखवले तेव्हा त्यांनी आपल्या कोंडाळ्यातून दूर करायचे शिताफीचे प्रयत्न चालू आहेत. कानठळ्या बसविणारी शांतता (डीफनिंग सायलन्स) असा एक वाक्प्रयोग इंग्रजीत आहे. त्याची अशा वेळेस आठवण येते. एरवी हिंदुत्ववाद्यांची असहिष्णुता आणि आक्रमकता याबद्दल ज्यांची टकळी थांबता थांबत नाही, असे सगळे मुखंड कोठे नाहीसे झाले आहेत?  
काल एका वाहिनीवर भाई वैद्य येऊन म्हणाले, की झाले गेले ते विसरून हे संमेलन पार पडू द्यावे. याचा अर्थ असा, की पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या कोणाचीही कसलीही आगळीक सगळ्यांनी नजरेआड करावी आणि वैचारिकतेच्या प्रांगणात त्याने मोठे योगदान दिले, म्हणून त्याला मुकाट्याने कुर्निसात करावा. हिंदुत्ववाद्यांना, त्यातही ब्राह्मणांना, मनाला येतील त्या शिव्या घालायच्या आणि पुरोगामीत्वाचा, सेक्युरिझमचा किंवा विवेकवादाचा पासपोर्ट मिळवायचा आणि त्या पासपोर्टवर सांस्कृतिक विश्वाची सैर करायची, असा हा 60 वर्षांचा साचाच या निमित्ताने उघड झाला आहे. श्रीपाल सबनीसांचे साहित्यातील योगदान वाटेल ते असो, हे पाखंड उघडे करण्याचे तरी योगदान त्यांच्या नावावर नक्कीच जमा होईल.

Monday, January 11, 2016

हे आहे 'विचारवंतां'चे दुःख!


मोठ्या धाडसाने रडणाऱ्यांचे पीक महाराष्ट्रात फोफावले आहे. बोलघेवडेपणाची परिसीमा गाठलेल्या या विचारवंतांचे दुःख कदाचित काहीसे असेच असावे.

Saturday, January 9, 2016

एका ट्विटचा परिणाम!

संमेलनाध्यक्षांच्या संपूर्ण साहित्याने समाजाला जेवढे जागृत केले नाही, तेवढे एका ट्विटने सावध केले आहे. बाकी, एक कळाले नाही. ट्विटर या आधुनिक साधनाचा वापर करणे सनातन मूल्यांमध्ये बसते का नाही?

Thursday, January 7, 2016

विचारवंतांचे कैसे बरळणे

मराठी साहित्य संमेलनाचा नियोजित अध्यक्ष हार-तुरेच घेत फिरत असतो आणि मी काय काय करणार आहे, हे सांगत फिरत असतो. त्याच्या आधीच्या संमेलनाध्यक्षांनी अशाच प्रकारे काही बाही सांगितलेले असते आणि त्यातील तसूभरही काही केलेले नसते, हे अशा नियोजित संमेलनाध्यक्षाने विसरायचे असते आणि लोकही ते विसरून चालले आहेत, असे मानून चालायचे असते. हारतुऱ्यांसह मिरविण्याची ही परंपरा एवढी जबरदस्त की खुद्द पु. ल. देशपांडे यांनाही त्याची बाधा झाली होती. संमेलनाध्यक्ष म्हणून पु. लं.चे सत्कार जेव्हा अंमळ जास्तच होऊ लागले, तेव्हा ज्ञानेश सोनार यांनी एक व्यंगचित्र काढले होते. त्यात पु. लं.ना दाखवून आता 'उरलो हारतुऱ्यापुरता' अशी मल्लीनाथी केली होती. त्याला दाद देताना पु. लं.नीही 'सोनारांनी कान चांगलेच टोचले आहेत', असे उद्गार काढले होते.
आता पु.लं.सारख्याचे हे हाल तर श्रीपालांची काय गत? एक तर विचारवंतांना, त्यातही स्वयंघोषित विचारवंताला, कोणी साहित्यिक मानत नाही आणि आलाच साहित्यिकांच्या पंक्तीत तर त्याला कोणी अध्यक्ष करत नाही. तो मणीकांचन योग सबनीस यांच्या नशीबात आला आणि त्या सरशी त्यांची सभा-समारंभात मुशाफिरी सुरू झाली. आता या मुशाफिरीत वेगवेगळे अनुभव तर येणारच. काही लोकांचे, काही पदरचे असे शब्द तर निघणारच. पवनचक्क्यांमध्ये शत्रूचे सरदार पाहणाऱ्या आणि ... पाहणाऱ्या डॉन क्विक्झोटप्रमाणे काही नसलेली वीरश्री दाखविण्याचे प्रसंग तर येणारच. 
फक्त एकच झाले. निळा रंग ल्यालेल्या कोल्ह्याने जसे कोल्हेकुई करताच त्याचे अंतरंग प्रकट झाले, तसे विचारवंतांचे बरळणे सुरू झाले तसे त्यांच्या वैचारिकतेची शालही सरकू लागली. विशेषता सर्वविदां समाजे विभूषणं मौनपण्डितानाम् असे म्हणून पूर्वजांनी चार युक्तीच्या गोष्टी सांगून ठेवल्या आहेत. पण पार सॉक्रेटिस आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची साक्ष काढण्याच्या नादात अशा उपदेशांकडे लक्ष कोण देतो. 
एकुणात पी. डी. पाटील यांच्या कृपेने होणारे साहित्य संमेलन पाडूनच स्वाभिमानी आणि विवेकवादी बुद्धिवंतांचे वैचारिक उद्यापन होणार, असे दिसतेय.

Sunday, December 13, 2015

शरद पवार सगळं सगळं खरं सांगतील?


महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्माचार्य (केवळ वय आणि ज्येष्ठत्वाच्या दृष्टीने, प्रतिज्ञापालनाच्या दृष्टीने नव्हे) शरद पवार यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस काल, १२ डिसेंबर रोजी, साजरा झाला. पवारांनी विधानसभेत प्रवेश केला तेव्हा ते सर्वात तरुण राजकारण्यांपैकी एक होते. आज ते राज्यातील सर्वात ज्येष्ठ व देशातील सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. या त्यांच्या प्रवासात पवारांचे मौन किंवा त्यांचे सूचक वक्तव्य हीच त्यांनी ओळख बनली आहे. गमतीने असं म्हटलं जातं, की पवारांच्या मनात काय चालले आहे हे प्रतिभाताईंनाही ठाऊक नसते. असंही म्हणतात, की पवार जांभई देतात तेव्हा त्याचेही वेगवेगळे अर्थ असतात.
सोयिस्कर मौन आणि राजकीय कसरती, यांची अशी जबरदस्त प्रतिमा असणाऱ्या पवार साहेबांनी लेखणी हाती धरून राजकीय आत्मकथा लिहीली आहे. साहेबांच्या शब्दांभोवती गूढ वलय आणि साहेबांच्या वाक्याला रहस्याची झालर. साहेबांचे वजन असे जबर, की सत्ता गमावल्यानंतर एका वर्षानंतरही सध्याचे सरकार त्यांच्याच जोरावर चालल्याचे  लोक मानतात.
ही सगळी रहस्ये साहेब आता उलगडून दाखविणार आहेत, असं म्हणतात. तसं महाराष्ट्राचे शाश्वत सत्ताधारी असलेल्या पवार साहेबांवर साहित्य काही कमी आहे, असे नाही. परंतु आतापर्यंत ते सगळे अंदाज, अनुमान आणि आराखडे यांच्या पलीकडे नाही. राजकारणाच्या रंगपटलावरील हा महानायक स्वत: काही बोलायला तयार नाही आणि बोलणाऱ्यांची धाव अनमान धपक्यापलीकडे नाही, अशी ही अवस्था होती.
'लोक माझे सांगाती' हे पवारांचे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले असून १० डिसेंबर रोजी ते प्रकाशित झाले. राजहंस प्रकाशनाचे संपादक डॅा. सदानंद बोरसे यांच्या मते, "शरद पवारांची राजकीय कारकीर्द अनेक उतार-चढावांनी भरलेली आहे. ती अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांमध्ये अडकलेली आणि अनेक प्रवाद-विवादांमध्ये सापदलेली आहे. पवारांच्या स्वभावातील अनेक वैशिष्ट्यांमुळे, त्यांनी रेखाटलेल्या राजकीय व्यक्तिचित्रांमुळे तसेच अनेक राजकीय घडामोडींच्या त्यांनी केलेल्या वर्णनामुळे ही आत्मकथा म्हणजे महाराष्ट्राच्या अर्ध-शतकाच्या राजकीय वाटचालीचा महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे."
आता या पुस्तकात पवारांनी पुलोदची स्थापना, मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना, पंजाब व अयोध्या यांसारखे विषय यावर लेखन। केले असल्याचे प्रकाशकांनी जाहीर केले आहे. पवारांनी अनेक वेळा केलेले पक्षबदल, त्यांच्यावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि मुख्य म्हणजे दाऊद इब्राहीमशी संबंधांचे आरोप यांबाबत त्यांनी लिहिले आहे, असेही सांगितले गेले.

आता पवारच हे सांगतायत म्हटल्यावर हे पुस्तक चर्चेला खाद्य देणार, हे नक्की. याचे कारण म्हणजे ज्यांची उत्तरे पवारांकडून हवी आहेत, असे अनेक प्रश्न आहेत. मावळमधील गोळीबार झाला तेव्हा पवार उत्तर न देता पत्रकारांसमोरून (पळून) गेले, स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून घेत स्वतः कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांच्या देशातील सर्वाधिक आत्महत्या कशा घडू दिल्या, इतकेच नव्हे तर शेतकऱ्यांना शेती सोडा असा सल्ला का दिला, अलीकडेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून कोलांटउड्या का मारल्य, असे अनेक प्रश्न पवारांभोवती पिंगा घालत होते आणि घालत राहतील. त्यांची उत्तरे त्यांनी द्यावीत, ही सामान्य अपेक्षा आहे.
मात्र सह्याद्रीच्या फत्तराप्रमाणे अभेद्य असणारे पवारांचे मौन सुटणार का आणि त्यांच्या मनातील संपूर्ण संचित बाहेर पडणार का, हा खरा प्रश्न आहे. 

Thursday, December 3, 2015

तीन शहाण्यांची वर्षपूर्ती

Fadnavis
गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला शपथविधी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले, ही खरोखरच एक उपलब्धी मानायला हवी. आधी बहुमताच्या अभावात आणि नंतर उधार घेतलेल्या बहुमताच्या ओझ्याखाली हे सरकार चालताना लोकांनी पाहिले.
महिन्याभरापूर्वी भाजपच्या मंडळींनी आपली वर्षपूर्ती साजरी करून वचनपूर्ती केल्याचेही सांगितले. परंतु शिवसेना या सरकारमध्ये एक महिना उशिराने सामील झाली आणि तोपर्यंत सरकारचे अस्तित्व कागदोपत्रीच होते. पहिला एक महिना बहुमताची तजवीज करण्यातच गेला होता अन् कामाला मुहूर्त मिळालाच नव्हता. त्यामुळे ती वर्षपूर्ती फक्त भाजपची होती, सरकारची नव्हे, असेच म्हणावे लागेल.
आधीच्या सरकारांनी जराजर्जर केलेली राज्याची यंत्रणा आणि तिजोरी, कायद्याच्या राज्यावरील लोकांची उडालेली श्रद्धा आणि वेगळेपणाचे लेबल लावल्यामुळे आलेली जास्तीची जबाबदारी - ही नव्या सरकार पुढची भली मोठी आव्हाने होती. थोडक्यात उत्तर पेशवाईच्या वर्णनाशी जुळणारी मागील सरकारची कारकीर्द आणि तीवर मात करण्यासाठी नव्या सरकारच्या बुद्दीचा लागलेला कस, असा हा सामना होता. परंतु ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईला साडे तीन शहाण्यांनी सावरून धरले होते, त्या प्रमाणे या सरकारच्या वर्षभरात केवळ तीन शहाण्यांनी कामातून आपले अस्तित्व दाखवले.
खुद्द मुख्यमंत्री फडणवीस हे पहिले आणि निर्विवाद शहाणे. सर्वात मोठ्या खुर्चीवर बसल्यानंतर आलेली जबाबदारीची जाण, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, केवळ परीक्षा देणार एवढ्यावर न थांबता पेपर उत्तम सोडविणारच हा निश्चय अशा सर्व आघाड्यांवर फडणवीसांची छाप उमटताना दिसली. परदेशी गुतवणूक खेचून आणायचा विषय असो अथवा स्वपक्ष, विरोधी पक्ष आणि मित्रपक्ष अशा तीन पातळ्यांवरील विरोधकांना पुरून उरणे असो, हा माणूस एकहाती लढताना दिसत होता. राज्यात अभूतपूर्व दुष्काळ पडल्यावर त्याच्याशी दोन हात करतानाही फडणवीस एकटेच होते. जन्मजात ब्राह्मण आणि वास्तव्याने शहरी, हे खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणालाही जोखड ठरणारे गुण. मात्र फडणवीस यांनी आतापर्यंत तरी या वैगुण्याची झळ जाणवू दिलेली नाही.
अर्थात फडणवीस यांच्या कारभारात काही गोष्टी अजूनही झालेल्या नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी अद्याप कमी झालेली नाही. मंत्र्यांचा - अगदी मुख्यमंत्र्यांचाही - त्यांच्यावर दरारा असल्याचे दिसत नाही. गेल्या दहा वर्षांनपासून पोलिस खाते भरटकल्यासारखे झाले आहे, ते आजही भानावर आल्याचे दिसत नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र आहेत, हनुमान नाहीत. त्यामुळे एका घासात सूर्य गिळण्याची अपेक्षा त्यांच्याकडून करता येणार नाही. फक्त किमान त्या दिशेने ते काही प्रयत्न करत असल्याचे तरी दिसले पाहिजे.
शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री असलेले विनोद तावडे हे आणखी एक शहाणे म्हणावे लागतील. आपल्या खात्याचे मंत्रीपद हे काही एक धोरण आखण्यासाठी आहे, एक दिशा देण्यासाठी आहे याची पुरती जाणीव तावडे यांच्या देहबोलीतून जाणवते. त्यांच्या घोषणाप्रेमाची टिंगल होत असली तरी त्यातील बऱ्यापैकी घोषणा मार्गी लागल्या आहेत, हे महत्त्वाचे! तावडे यांच्या पदवीचा वाद अर्थहीनच होता, त्याला फारशी किंमत देण्याची गरज नाही. तावडे यांची आपल्या खात्यावर किती पकड आहे, माहीत नाही. पण आपल्या खात्याचा आवाका आणि मगदूर असलेली ही व्यक्ती आहे, यात संशय नाही.
सुभाष देसाई हा फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील तिसरा शहाणा. काहीसा अनपेक्षित. देसाईंच्या पक्षाची मंडळी नाना विधाने करून नको ते उद्योग करत असली, तरी उद्योग हे नाव व कार्यक्षेत्र असलेल्या खात्याची हाताळणी देसाई ठीकठाक करतायत, असे दिसते. भाजप आणि शिवसेनेतील संबंधांची लागण देसाईंच्या खात्याला झालेली दिसली नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जगभर फिरून, पदर पसरून गुंतवणूक आणायची आआणि उद्योग खात्याने त्यात खोडा घालायचा, किंवा देसाईंनी काही कल्पना मांडली आणि भाजपने त्याची बोळवण केली, असे घडलेले नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांचा एकूण रागरंग पाहिला, तर देसाईंनी पाळलेला संयम हाच त्यांच्या शहाणपणाचा भक्कम पुरावा म्हणायला हवा.
उद्धव ठाकरेंच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर "त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पूरेपूर वापर करून घेतला जात असावा."
आता एकीकडे हे तीन शहाणे नीट काम करत असताना त्यांना दृष्ट लागू नये म्हणून काही मंडळी जोमाने कामाला लागली होती. पंकजा मुंडे-पालवे, गिरीष बापट, गिरीष महाजन आदी मंत्री या आघाडीवर अगदी पुढे होती. केवळ सरकारचे सुदैव म्हणून त्यांच्या मागे ओढण्याच्या बळापेक्षा या लोकांचे पुढे ढकलणारे बळ किंचित जास्त ठरले आणि म्हणून त्यातल्या त्यात ते जराSSSS बरे वाटते. एवढ्यावर सरकारला समाधान मानायचे असेल, तर त्यांनी मानून घ्यावे. बाकी कालचे मनोरंजन आजही चालू, इतकेच.