Wednesday, October 31, 2007

प्रश्न लोकशाहीच्या विश्वासार्हतेचा

भारतात आपण अनेक गोष्टी स्वाभाविक मानलेल्या असतात. त्यात विविध पातळींवरील निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा उपयोग हीही एक गोष्ट आहे. अगदी ग्रामपंचायतींच्या पातळीवरही इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर आपण आता गृहित धरलेला आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या दृष्टीने ते योग्यही आहे. लोकशाहीच्या बाबतीत भारताला तोडीस तोड आणि अन्य सर्व बाबतींत जगात सर्वांनाच वरचढ अशा अमेरिकेत मात्र याच प्रश्नावरून संभ्रम आहे. वॉईस ऑफ अमेरिकेच्या एका वृत्तांकनात नुकतीच या विषयाची चर्चा वाचनात आली.
सात वर्षांपूर्वी अमेरिकेच्या इतिहासात अभूतपूर्व अशा निवडणुकीच्या गोंधळाला सामोरे गेल्यानंतर त्या देशातील (म्हणजे राज्यांच्या संघाने) कागदी मतपत्रिकांऐवजी यंत्रांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला. आता चार वर्षांनंतर पुन्हा अध्यक्षपदाच्या निवडणुकीला तोंड देताना मात्र अमेरिकेसमोर या मतदान यंत्रांच्याही विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. भारत आणि अमेरिकेतील मतदान यंत्रांच्या स्वरूपात काही मूलभूत स्वरूपाचे फरक आहेत. भारतातील मतदार यंत्रांवरील बटन दाबून उमेदवारांची निवड करतात. उमेदवारांची संख्या जास्त असल्याने आणि उमेदवारांच्या नावापेक्षा त्यांच्या निवडणूक चिन्हाला अधिक महत्त्व असल्याने ही व्यवस्था सोयीची ठरते. अमेरिकेत मात्र उमेदवारांची संख्या अत्यंत मर्यादीत असल्याने, तसेच मतदार तुलनात्मकदृष्ट्या सुशिक्षित असल्याने मतदानासाठी 'टच स्क्रीन' यंत्रे असतात.
नेमक्या या यंत्रांच्याच त्रुटीबद्दल आणि परिणामतः निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेबद्दल अमेरिकी तज्ज्ञांनीच शंका घ्यायला सुरवात केली आहे. यंत्रात नोंदल्या जाणाऱया आकड्यांवर कोणीही लक्ष ठेवू शकत नाही. त्यामुळे यंत्रांनी जाहीर केलेला निकाल अंतिम मानला जातो. या दोषावर वॉशिंग्टन, डिसीच्या यू. एस. पब्लिक इंटरेस्ट रिसर्च ग्रुपचे विश्लेषक गॅरी कालमन यांनी बोट ठेवले आहे. मतगणनेला कोणी आव्हान दिले आणि पुन्हा मतमोजणी घ्यायला सांगितली, तरी शेवटी यंत्र जे सांगेल तेच आपल्याला ऐकावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
वॉशिंग्टन येथीलच जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीचे बेंजामिन गिन्सबर्ग यांनीही या त्रुटीमुळे यंत्रांसोबतच कागदी मतांनाही स्थान देण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, "कोणत्याही ठिकाणी संगणक किंवा त्यावर आधारित यंत्रणा आली, की त्याच्याशी छेडछाड करण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे या यंत्रांना कागदी दस्ताऐवजाचा आधार द्यायलाच हवा." एखाद्या मतदाराने मत टाकले, की त्याची प्रिंट आऊट मिळावी. त्यामुळे पुन्हा मतमोजणी केल्यास फायदा होईल, असे गिन्सबर्ग यांनी मत मांडले आहे.
---------
इथे अमेरिकेच्या निवडणुकीबद्दलचा वृत्तांत संपला. मात्र खरा प्रश्न पुढे आहे. आपल्याकडे या यंत्रांचे स्वागत एक मोठी व आधुनिक घडामोड म्हणून झाले. मात्र त्या यंत्रांची कार्यक्षमता, उपयोग आणि त्यांची विश्वासार्हता यांबाबत कोणतीही चर्चा झाल्याचे ऐकिवात नाही. सरकार काही सांगणार आणि लोकांनी तो मुकाट ऐकायचा, हीच आपली परंपरा आहे. त्यामुळेच कुठलाही अभ्यास वा संशोधन न करता रामसेतू मानवनिर्मित नसल्याचा दावा सरकार न्यायालयात करतं आणि १०० कोटींच्या देशात त्यावर कोणी प्रश्नही विचारत नाही. हा या दोन देशांतील फरक आहे.
----------

No comments:

Post a Comment