Wednesday, November 14, 2007

दिवाळी, केवळ आठवणींचीच...

दिवाळी म्हटली, की मला आठवणी सुचू लागतात. दरवर्षी दिवाळी आली, की आपल्या बालपणीची दिवाळी किती चांगली होती आणि त्या तुलनेत आजची दिवाळी किती फिकी आहे, याची जाणीव मला होऊ लागते. मराठी जगताच्या परंपरेनुसार भूतकाळातील दिवाळीचे वर्णन करण्यासाठीही मोठी संधी मिळालेली असते. खासगी गप्पा, सार्वजनिक गप्पा, वर्तमानपत्रे, वाहिन्या, गेला बाजार "पवनाकाठचा मावळा' किंवा "सा. गायब बहाद्दर' यांसारख्या दिवाळी अंकसुद्धा सध्याच्या दिवाळीपेक्षा बालपणीच्या दिवाळीत आपण काय दिवे लावले, याचीच जास्त खबरबात घेतात. मीही त्यामुळे दरवर्षी नवरात्र संपली की लेखणी सरसावून बसतो. (म्हणजे आताशा किबोर्ड सरसावून बसतो. जुन्या काळची पेन हातात घेण्याची मजा आता राहिली नाही!) लहानपणीच्या दोन-चार आठवणींचा खजिना कोऱ्या पानावर रिता करून, एखाद्या ठिकाणी तो छापून यावा यासारखी मजा शंभर सुतळी बॉंबमध्येही नाही. त्यामुळे दीपावली हा साजरा करायचा सण नसून तो आठवणी काढायचा सण आहे, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे.

यंदाच्या वर्षीही मी माझ्या आठवणींची पोतडी रिकामी करण्यासाठी सज्ज बसलो होतो. पण काय करणार, यंदा कोणीही मला पांढऱ्यावरती काळे करायला आमंत्रण दिले नाही. कोण्या पाहुण्याकडेही जायचा चान्स मिळाला नाही. त्यामुळे माझा अगदी कोंडमारा झाला आहे. पोट फाटेस्तोवर खाल्लेला दिवाळीचा फराळही आता पूर्ण पचत आला आहे, मात्र माझ्या आठवणींचं हे संचित काही जीरता जीरत नाही. त्यामुळे कुठेतरी पोट मोकळं करावंसं वाटतंय! त्यासाठीच हा लेखप्रपंच.

दिवाळी म्हटली, की आनंद, मांगल्य, सुख-समृद्धीच्या शुभेच्छा वगैरे वगैरे...शालेय अभ्यासक्रमात निबंध लिहिण्यासाठी पाठ केलेल्या या ओळी कोणत्याही वेळेस वापरायच्याच असतात ना? पण मला मात्र आता खरं खरं सांगायचंय...त्यामुळे मी खऱ्या आठवणी सांगतो. अन्‌ नीट सांगायचं तर मला लहानपणीच्या कोणत्याही दिवाळीच्या वेळेसचं काहीच आठवत नाही. शेजारच्या पिंटूचे फटाके चोरून तेच दिवाळीत उडविले, आजोळी गेलो असताना लाडू चोरून खाल्ले आणि ती चोरी पकडली गेल्यावर धम्मकलाडूही खाल्ले...अशा काही रंजक घटना सोडल्या तर दिवाळी म्हणजे एकदम संस्मरणीय असं काही आठवतच नाही हो!

एक तर दिवाळी म्हटली की लहानपणी मला हुडहुडी भरायची. कारण दिवाळीच्या चारही दिवसात सकाळी लवकर उठावं लागायचं. (ही शिक्षा अजूनही कमी झालेली नाही!) माझ्या सूर्यवंशी प्राण्याला रामप्रहरी उठायची गरजच काय, हा मूलभूत प्रश्‍न तेव्हा पडायचा. दिवाळीच्या सगळ्या फराळावर अन्‌ फटाक्‍यांवर ताण करणारा हा त्रासदायक प्रकार असायचा. बाहेर झुंजुमुजु व्हायच्या आत घरात झुंज सुरू व्हायची. आईच्या पहिल्या हाकेने युद्धाचा बिगुल फुंकला जायचा. दोन हाकांनंतर चादर अंगावरून काढल्यानंतर लढाई हातघाईवर यायची. या प्रयत्नात दोनदा लाथा झाडून मी अंगावर पुन्हा चादर घ्यायचो. ""मेल्या, दिवाळीच्या काळात तरी लवकर उठत जी नं. एरवी तर पडलेला असतोच दुपारपर्यंत अंथरुणात,'' अशी रणगर्जना कानावर आली, की मी पांढरे निशाण फडकावत असे. दिवाळीची सुरवात 'रागा-रागां'नी करायची असते व त्यासाठी तिकीटही काढावे लागते, हे मला खूप उशिरा अलीकडे कळाले. लहानपणी मात्र माझ्या सर्व दिवाळींची सुरवात रागातच झालेली आहे. अलीकडे मी पार पहाटेच्या वेळेसच झोपतो, मात्र लहानपणी त्या शिव्या खाण्याची मजाच काही और होती.

जी गोष्ट उठण्याची, तीच गोष्ट उटण्याची. तिळाचा तो लिबलिबित लगदा अंगावर चोपडून अंघोळ केल्याने पुण्य मिळते यावर माझा तेव्हाही विश्‍वास नव्हता आणि आजही नाही. मुळात थंडीच्या दिवसांत अंघोळ करण्याची गरजच काय, यावर एक बौद्धिक घेण्याची मला खूप इच्छा होती. पण त्या बौद्धिकाचे रूपांतर लगेच चर्चासत्रात झाले असते, अन्‌ घरातील सगळीच मंडळी त्या चर्चासत्रात माझ्यापेक्षा ज्येष्ठ वक्ते होण्याची शक्‍यता असल्याने माझ्या त्या शुभसंकल्पाला मी अनेक वर्षे आवर घालत होतो. आताही मी दिवाळीत उटणे लावतो, मात्र त्यावेळी त्या उटण्याचा जो कंटाळा यायचा, तो आता येत नाही. असो.

आणखी काही आठवणी "ब्रेक के बाद'...

2 comments:

  1. mast lihilieyt :)
    agadi shalet astanachya diwalichi ani aaibarobarchya ranadhumalichi athavan zali

    ReplyDelete
  2. अाेय डीडी...
    दिवाळीचा हा फटाका चांगला पेटलाय..
    अाठवणीतली दिवाळी छानच..तेव्हढ उटण्याच्या अंघाेळीचं बघा बुवा...
    प्रशांत

    ReplyDelete