Friday, August 3, 2007

दिग्दर्शनाचा ‘नायक’

सेट मॅक्स वाहिनीच्या कृपेने अनिल कपूरचा नायक हा चित्रपट अलिकडे दर दोन दिवसांनी पहायला मिळत आहे. एका साध्या टीव्ही पत्रकाराचा मुख्यमंत्रीपदापर्यंत होणारा प्रवास या चित्रपटात अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे. गेल्या महिन्यात प्रत्येक वृत्तवाहिनी आणि वर्तमानपत्राच्या रकान्यांची शोभा वाढविणाऱया ‘शिवाजी-द बॉस’ या चित्रपटाचा दिग्दर्शक एस. शंकर हाच या चित्रपटाचा दिग्दर्शक. तमिळमधील ‘मुदलवन’ आणि तेलुगुमधील ‘ओक्के ओक्कुडु’ या चित्रपटांचा हा रिमेक. मूळ चित्रपटात अर्जून आणि मनिषा कोईराला यांच्या मुख्य भूमिका आहेत. शंकर या दिग्दर्शकाच्या चित्रपटांची काही वैशिष्ट्ये आहेत.

एक, त्याच्या चित्रपटांमध्ये सामाजिक संदेश काही तरी असतोच. त्याच्या पहिल्या ‘जंटलमन’ चित्रपटात शिक्षणाचे बाजारीकरण आणि त्यामुळे गरिब विद्यार्थ्यांची होणारी वंचना त्याने दर्शविली होती. या चित्रपटाचा हिंदीतील दुर्दैवी रिमेक पाहून (त्याचा नायक चिरंजीवी असलातरी) मूळ चित्रपटाची कल्पना येणार नाही. हिंदुस्तानी (तमिळमधील इंदियन) या चित्रपटात देशातील भ्रष्टाचाराच्या समस्येवर प्रकाश टाकण्यात आला होता. नायक (मुदलवन) मध्ये सडलेल्या सरकारी यंत्रणेवर भाष्य केले आहे. गेल्या वर्षीच्या ‘अन्नियन’ (हिंदीतील अपरिचित) मध्ये त्याने नागरिकांचा छोट्या मोठ्या गुन्ह्यांकडे, कायदेभंगाकडे गांभीर्याने न पाहण्याकडे नजर टाकली होती. ‘चांगले सरकार हवे म्हणतो, आधी चांगले
नागरिक बना,’ हा त्याने त्या चित्रपटात दिलेला संदेश होता. आता ‘शिवाजी’त तर त्याने काळा पैसा, हवाला, शिक्षण संस्थांमधील नफेखोरी अशा अनेक मुद्द्यांना हात घातला आहे.


दोन, शंकरच्या चित्रपटात कॉम्प्युटर ग्राफिक्सचा मोठा वापर केलेला असतो. ‘जंटलमन’मध्ये हा वापर केवळ ‘चिक बुक रयिले’ या गाण्यापुरता होता. त्यानंतर कादलन (हम से है मुकाबला) या चित्रपटात त्याने ग्राफिक्सचा सडाच टाकला. प्रभु देवाची नृत्ये, ए. आर. रहमानचे संगीत यांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या या चित्रपटातील सात पैकी तीन गाण्यांमध्ये ग्राफिक्सचा वापर केला होता. त्यातील ‘मुक्काला मुकाबला’मध्ये तर थेट माईकेल जॅक्सनच्या ‘डेंजरस’ या गाण्याच्या धर्तीवर ग्राफिक्स वापरल्या होत्या.
त्यानंतरच्या ‘जीन्स’मध्ये त्याने ग्राफिक्सच्या सहायाने स्वतंत्र व्यक्तिमत्व निर्माण करण्याची अफलातून शक्कल लढविली होती. ‘हिंदुस्तानी’त त्याने ग्राफिक्सच्या माध्यमातून कमल हासन याला सुभाषचंद्र बोस यांच्याशी हस्तांदोलन करताना दाखविला होता. ‘अन्नियन’मध्ये कम्प्युटर आणि वेबसाईट हा कथेचाच भाग दाखविल्याने त्यातही ग्राफिक्स होतेच. त्यात हाणामारीची दृश्ये ‘मॅट्रिक्स’च्या धर्तीवर दाखविली आहेत. ती प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय त्यातील गंमत कळणार नाही. ग्राफिक्स आणि कॉम्प्युटर हा ‘शिवाजी’तलाही एक महत्त्वाचा भाग आहेच.


तीन, चित्रपटांची व्यावसायिकता. मुख्यतः सामाजिक मुद्द्यांवर आधारलेले असले तरी शंकरच्या चित्रपटात प्रचारकीपणा अजिबात नसतो. किंबहुना त्याचा चित्रपट पाहताना अमुक मुद्दा यात ठळक आहे, हे अर्धा-अधिक चित्रपट पाहिल्याशिवाय कळत नाही. आपल्याला सवय असलेल्या व्यावसायिक चित्रपटांच्या मार्गानेच त्याचा चित्रपट धावत असतो. अचानक एखादे वळण येते आणि मग आपल्याला जाणवते, की अमुक बाब शंकरला जाणवून द्यायची आहे. ‘जंटलमन’ पाहताना ही एका चोराची प्रेमकथा असल्याचे वाटत राहते. ‘हिंदुस्तानी’ ही चंद्रू आणि त्याच्या दोन मैत्रिणींची कथा असल्याचा आधी समज होतो, तर ‘अन्नियन’मध्ये अंबी आणि रेमोच्याच द्वंद्वात प्रेक्षक पडलेला असतो. त्यामुळे शंकरचा चित्रपट मनोरंजनाच्या आघाडीवर कधीही फसत नाही. सादरीकरणावर एवढी हुकुमत असणारा दुसरा दिग्दर्शक सध्याच्या घडीला तरी दुर्मिळ आहे. चार, संगीत. शंकरच्या चित्रपटातील संगीताने रसिकांना मोहिनी घातली नाही, असं क्वचितच झालंय. ‘रोजा’द्वारे संगीत क्षेत्रात उपस्थिती नोंदविली असली तरी ए. आर. रहमानला खरी ऒळख शंकरच्या चित्रपटांनीच दिली (विशेषतः उत्तर भारतात). ‘जंटलमन’ प्रदर्शित झाला तेव्हा ‘एमटीव्ही’ भारतात नुकताच आला होता. त्याद्वारे हे गाणे हिंदी भाषक राज्यांतही हिट झाले. ‘राजा बाबू’ या चित्रपटात या गाण्याची नक्क्ल करण्यात आली. मात्र त्यात गंमत नव्हती. ‘जंटलमन’च्या रिमेकमध्येही हे गाणे वापरण्यात आले. मात्र त्यातही चिरंजीवीचे नृत्यही फिकेच पडले. मूळ चित्रपटात प्रभु देवाचे नृत्य हे चित्रपटाइतकेच प्रेक्षकांच्या आकर्षणाचा भाग होते. (चित्रपटाच्या पडद्यावरील प्रभु देवाचे हे पदार्पण.) याच चित्रपटातील ‘वट्ट वट्ट पुचक्कु’ (रूप सुहाना लगता है) आणि ‘उसलमपट्टी पेणकुट्टी’ (आशिकी में ह्द से) याही गाण्यांच्या हिंदी आवृत्तींनी मोठी लोकप्रियता मिळविली. बाकीची तीन गाणी तमिळमध्येही आजही हिट आहेत. त्यानंतरच्या ‘हम से है मुकाबला,’ ‘जीन्स,’ ‘हिंदुस्तानी,’ ‘नायक’ या हिंदी प्रेक्षकांना ऒळखीच्या
चित्रपटांतील संगीतानेही त्यांचा काळ गाजविला आहे. ‘बॉयज’ची गाणी तमिळ आणि तेलुगुत अत्यंत लोकप्रिय झाली. ‘अन्नियन’चे संगीत हरिश जयराजचे होते. तरीही त्यावर शंकरची छाप होतीच. ‘शिवाजी’ला पुन्हा रहमानचे संगीत आहे. त्यात त्याची पूर्वीची जादू आहेच.


केवळ संगीत आणि गाणीच नव्हे तर त्यांचे चित्रीकरण हीही शंकरच्या चित्रपटांची खासियत आहे. भव्य, देखणी आणि काहीतरी वेगळ्या कल्पना असलेली गाणी पहावीत तर ती शंकरच्याच चित्रपटात. मग ती जगातील सात आश्चर्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रीत केलेले ‘पूवुक्कुळ अतिशयम’ (जीन्स) असो, की तंजावरच्या प्रसिद्ध बाहुल्यांचे रूप दिलेल्या व्यक्तींसह चित्रीत केलेले ‘अऴगान राक्षसीये,’ असो! ‘अन्नियन’मध्ये ‘अंडक्काका कोंडक्कारी’ हे गाणे आहे. या गाण्यात केवळ दोन ते तीन मिनिटांच्या एका तुकड्यासाठी
तेनकासी या गावातील ५०० घरांना वेगवेगळ्या रंगांनी रंगविले होते. ‘हिंदुस्तानी’त त्याने ऑस्ट्रेलिया, तर ‘शिवाजी’त स्पेनमध्ये गाण्यांचे चित्रीकरण केले. ‘नायक’मधील ‘सैया पडू पय्या,’ हे गाणे आठवते. त्यात त्याने कॉम्प्युटर ग्राफिक्सचा हातचे काही राखून न ठेवता उपयोग केला आहे. ‘कादलन’मधील ‘उर्वशी उर्वशी’साठी त्याने एक खास बस तयार केली होती.


शंकरच्या चित्रपटातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील ठळक न जाणवणारी मात्र अगदी अविभाज्य असलेली भारतीय पुराण-इतिहासांची उपस्थिती. दक्षिण भारतातील सर्वच दिग्दर्शकांप्रमाणे शंकरच्या चित्रपटांतही भारतीय संस्कृतीला अनुसरूनच कथा असतात. ‘कादलन’मध्ये भरतनाट्यम आणि अन्य नृत्यकलांचे दर्शन आहे, तर ‘हिंदुस्तानी’त केरळम्धील ....या कलेची माहिती येते. तेही अगदी कथेच्या ऒघात! ‘अन्नियन’मध्ये तर तमिळनाडुतील अय्यर आणि अय्यंगार ब्राम्हण, त्यांचे ज्ञानाराधन आदींची माहिती अगदी सांगोपांग येते. याच चित्रपटात ‘गरुड पुराणा’चा अगदी खुबीने केलेला उपयोग प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय कळायचा नाही. ‘शिवाजी’त ‘शिवाजीशी लग्न केल्यास त्याचा मृत्यु होईल, हे भविष्य बदलणे शक्य नाही,’ असं नायिकेला ज्योतिषाने सांगणे आणि अगदी वेगळ्या प्रकारे शिवाजीची मृत्यू होणे, ही कथेतली गंमत त्याशिवाय कळायची नाही. एकामागोमाग आठ हिट चित्रपट देणाऱ्या शंकरने स्वतःची एक शैली विकसित केली आहे. त्याच्या जंटलमन वगळता अन्य कृती (बॉयज) सुदैवाने हिंदीत डब झाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही त्याला यश मिळाले आहे. ‘अन्नियन’ हा फ्रेंच भाषेत ड्ब झालेला आतापर्यंतचा एकमेव भारतीय चित्रपट आहे. शिवाजी एकीकडे विक्रमामागोमाग विक्रम करत असताना आता हिंदीतही येऊ घालत आहे. आता शंकर शाहरूख खान सोबत ‘रोबोट’ नावाचा चित्रपट काढणार आहे. असो. मात्र माझ्यासारख्याला त्याच्या तमिळ चित्रपटाचीच अधिक प्रतिक्षा असणार आहे.


3 comments:

  1. विलक्षण आहे सगळंच....
    शंकरही विलक्षण आणि हे सगळं आमच्यापर्यंत पोहचवणारा देविदासही...
    लगे रहो...
    इतर दाक्षिणात्य चित्रपटांविषयी आणखी मजकुराच्या प्रतीक्षेत...
    सागर

    ReplyDelete
  2. त्याबाबतीत विचार आणि नियोजन दोन्ही सुरू आहे. नवीन विषय तयार झाला की लवकरच वाचायला मिळेल. पुढील बदलाकडे लक्ष ठेवा.

    ReplyDelete
  3. अरे काय ही आत्मस्तुती. ठिक आहे की देविदास नावाचा दाक्षिणात्य प्राणी चांगला लिहितो. म्हणून काय आपण काहीही वाचायचे का? त्याला काही मर्यादा. तो लिहिणार आणि जबरदस्तीने वाचायला सांगणार, वर परत कॉमेंटही टाकायला सांगणार हा कुठला धंदा..... याला आवरा रे कुणीतरी. नाहीतर..............

    ReplyDelete