Thursday, December 31, 2009

शुभेच्छा...कशाच्या कशाच्या!

यंदा अद्याप तरी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला नाही. एक दोन इमेल आले आहेत मात्र त्यांचे प्रमाण आटोक्यात आहे. त्याबद्दल शुभेच्छा न देणाऱ्यांचा मी आभारी आहे. एखाद्या विशिष्ट वेळेला कोणा माणसाला विशिष्ठ शब्द बोलल्यास त्याचे भलेच होते, हे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना कसे काय वाटू शकते हे माझ्यापुरते गौडबंगाल आहे. विशिष्ट दिवशी एखादा सण पाळणे ही जर अंधश्रद्धा असू शकते, एखाद्या विशिष्ठ दिवशी उपाशी राहणे हे जर अंधश्रद्धा या सदरात मोडू शकते तर कॅलेंडरच्या एका विवक्षित रकान्यात असलेल्या दिवशी तमाम जगाला सगळं कसं 'गुड गुड' वाटू शकते, हीही अंधश्रद्धाच होय. एवढाच कि, पहिल्या तऱ्हेची अंधश्रद्धा जोपासणारे संख्येने जास्त आहेत आणि दुसऱ्या तऱ्हेचे लोक कमी आहेत, एवढाच काय तो फरक. ज्या अंधश्रद्धेचे अनुयायी जास्त ती प्रथा आणि जिचे कमी ती अंधश्रद्धा, असा काहीसा हा प्रकार आहे.

येणारे वर्ष सुखाचे जावो, असे आपल्याला वर्षातून किती वेळेस ऐकायला मिळते, तुम्ही विचार केला आहे का? १ जानेवारी, गुढी पाडवा, दसरा आणि दिवाळी शिवाय तुमचे काही अमराठी मित्र असतील तर त्यांचेही वेगळे...म्हणजे उगादी, पोंगल, विशू, बैसाखी, बिहू  इत्यादी. गम्मत म्हणजे, इतक्या शुभेच्छा मिळूनही आयुष्य आहे तसाच आहे. मागील पानावरून पुढे चालू असा म्हणण्याचीही सोय राहू नये, इतके सपक, एकसुरी आणि अर्थहीन. कदाचित म्हणूनच असावे, वर्षांताचे निमित्त काढूनगळ्याखाली दारू उतरविणारे अलीकडे वाढू लागलेत. मध्यरात्रीनंतर इकडे नवे वर्ष लागते आणि बस लागावी तसे दारू पिलेल्यांना 'सेलिब्रेशन'  लागते! मग पोटात उतरलेली दारू डोक्यात चढते आणि मौज मजेसाठी जमलेले टोळके धिंगाणा घालू लागते. यंदा या धिंगाण्याला मा. न्यायालयानेही हात द्यायचे ठरविले आहे. दारू पिण्याला काल वेळेचे बंधन नसावे असाच जणू काही न्यायालयाचा हेतू असावा. शिवाय दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांना समजून घ्या, असंही सांगितलं आहे.  न्यायालय आणि मद्यालय अशी बेधुंद युती जगात बहुधा पहिल्यांदाच अस्तित्वात आली असावी.

आता नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अशी टकळी चालू केल्याबद्दल मला कोणी दोष देईलही. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती कशी बदलेल? ज्या शुभेच्छा दिल्या-घेतल्या आहेत, त्या तरी खऱ्या कुठे आहेत? यांत्रिक संदेशांची देवाण घेवाण हेच त्याचे खरे स्वरूप आहे. मी तर गेल्या दिवाळीत आलेले शुभेच्छांचे मेल यंदाच्या दिवाळीत पुढे पाठविले. सगळी गुगलची कृपा, दुसरे काय. त्याच्यामुळेच असे जुने मेल सांभाळून ठेवता येतात ना. पूर्वीच्या काळी नाही का, बायका एका लग्नात आलेला आहेर जपून ठेवत आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या लग्नात तो आहेर म्हणून देत. त्याचीच हि आधुनिक आवृत्ती आहे. येणाऱ्या संदेशांमध्ये जुळ्या, म्हणजे अगदी एकसारख्या एक संदेशांची संख्या पहिली, तर माझे समानधर्मा लोक कमी नाहीत, याची खात्री पटते. खरं म्हणजे इतके हुबेहूब संदेश एकावेळी एकत्र पाहिल्याने त्या संदेशांचे अजीर्णच होते.  त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छा संदेशांना सुट्टी. जे चाललाय ते खूप छान आहे. ते तसंच चालत राहो ही इच्छा. मात्र त्यासाठी जानेवारी किंवा दिवाळी अशा निमित्तांची गरजच काय? एका इंग्रजी लेखकाची प्रतिमा वापरून लिहायचे तर म्हणावे लागेल...आपल्या शुभकामना या ईश्वरासारख्या असाव्यात...सर्वत्र आणि सगळीकडे उपस्थित मात्र कधीही न दिसणाऱ्या!


6 comments:

  1. खरंय तुमचं. कदाचीत काहीही बदलणार नाही.
    पण आशावादी असायला काय हरकत आहे?
    हा, मात्र दारुने माजुन धिंगाणा, तो ठीक नाही.

    आजच दुपारी तुमच्या ब्लॉगला भेट दिली होती आणि विचार आला होता की बरेच दिवस झाले पोस्ट का नाही ते?

    शुभेच्छा! ;-)

    ReplyDelete
  2. धन्यवाद, आनंद. काहीही बदलणार नाही हे खरं. आशावादी असायला हवे हेही खरं. मात्र केवळ औपचारिकता म्हणून काही गोष्टी पाळण्यात काय अर्थ आहे.बाकी हे वर्ष सगळ्यांना चांगले जावे ही माझीही इच्छा आहे.

    ReplyDelete
  3. देविदास,
    खुपच सुंदर झालंय पोस्ट. एकदम झकास.. प्रत्येक गोश्ट एकदम सही... आवडलं...

    ReplyDelete
  4. धन्यवाद महेंद्रजी. सहज सुचलं तसं , मनातले विचार उतरविले. मात्र खरोखरच आपल्या सगळ्या व्यवहारात यांत्रिकपणा आला आहे का, याची पडताळणी करण्याची संधी या निमित्ताने मिळते, हेही काही कमी नाही. मात्र नव्या वर्षाच्या मुहूर्तावर आपण काही वावगं तर बोलत नाही ना, याची मला काळजी होती.

    ReplyDelete
  5. एकदम छान.. मस्त विचार.. पटले आणि आवडले !!

    ReplyDelete
  6. धन्यवाद, हेरंब. मला खरोखर अपेक्षा नव्हती इतरांना हे विचार पटतील म्हणून. पण म्हणूनच सगळ्यांना ह्या गोष्टीचा थोडाफार त्रास होत आहे, हेही कळतंय.

    ReplyDelete