Wednesday, September 25, 2013

राहुल गांधी रोजगार हमी योजना - दिवसभराची

   येणार येणार असा मोठा गाजावाजा झाला होता. त्यानुसार युवराज आले, त्यांनी पाहिले व हात हातविला, आणि आले त्यापेक्षा त्वरेने निघून गेले...या एका वाक्यात त्यांच्या पुण्याच्या दौऱ्याची हकीगत खरे तर लिहिण्यासारखी आहे. परंतु त्यासाठी जो जामानिमा उभा केला गेला आणि माध्यमांना ताटकळत ठेवण्यात आले, त्यातून 'नववधू प्रिया मी बावरते'चा युवराजांचा हट्ट अजूनही गेल्या नसल्याचे स्पष्ट झाले.

सकाळी दहाच्या सुमारास काँग्रेस पक्षातर्फे बालेवाडीतील क्रीडा संकुलात जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तेथे गेल्यानंतर कळाले, की येथे येऊन काहीच काम करायचे नाही. वाहिन्यांची मंडळी आधीपासूनच ठाण मांडून बसली होती, तर वृत्तपत्रांचे प्रतिनिधी याला विचार, त्याला विचार, असे करून 'काहीतरी' मिळविण्याचा प्रयत्न करत होते. दात कोरून पोट भरण्याचा प्रकार चालू होता.

त्यानंतर एकामागोमाग काँग्रेसजन राहुल गांधी कसे ताजेतवाने वाटत आहेत, यावेळी कसे छान बोलले, त्यांची धोरणे स्पष्ट वाटली, असे थर्ड पार्टी वर्णन करू लागले. मात्र ते आमच्याशी बोलतील का, असे विचारले, की काढता पाय घेऊ लागले. एका क्षणी कार्यकर्त्यांसाठी केलेल्या भोजनाच्या व्यवस्थेत वाटा मिळाला आणि पोटभर जेवून आम्ही तिथेच लोळू लागलो. दोन तास व्हायला आले, तरी आपण येथे कशासाठी आलो, याचे प्रयोजनच कळेना. साडेतीन वाजता ते केवळ संपादकांशी बोलणार असल्याचे कळाले.

तितक्यात पुण्याचे उपमहापौर संजय गायकवाड आले आणि त्यांनी सुरेश कलमाडी यांना पक्षात परत घेण्यासाठी राहुलना निवेदन दिल्याचे सांगितले. त्यामुळे माना टाकलेल्या कलमबहाद्दरांमध्ये जान आली. (प्रत्यक्ष वार्तांकनात अद्यापही नोंदी हातानेच घेतल्या जात असल्याने, टॅब्लेट किंवा तत्सम साधनांचा वापर होत नसल्याने वार्ताहर कलमबहाद्दरच राहिले आहेत.) लहान मुलाला वाळूच्या ढिगात छोटा शंख सापडावा आणि त्याला त्याचेच अप्रूप वाटावे, असे ते दृश्य होते. त्यासाठी चोहोबाजूंनी माहितीची खोदाई चालू होती, पण आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार?

त्यानंतर दोन तास सर्व श्रमिक बौद्धिक कामगारांनी एकमेकांशी गप्पा मारत, आलेल्या मंत्री, पदाधिकारी आणि अन्य लोकांवर टीका-टिपण्या करत घालविला. कोणाशी बोलायला गेले, तर पंजाछाप टाकसाळीतील चलनी वाक्येच कानी पडत होती. मारुतीची बेंबी गार असल्याचे सगळेच सांगत होते, मारुती आणि त्याची बेंबी दिसायची मारामार होती.

तितक्यात काही वेळाने मुख्य रस्त्यावर काहीतरी गडबड झाली आणि पांढऱ्या जीपचे थवे कोणत्यातरी दिशेने निघाले. रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली. काही वेळात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या कोंदणात युवराज साक्षात जमिनीवरून पायी चालताना दिसले. ''वा, काय पर्सनलिटी आहे, किती गोरा आहे, काय दिसतो आहे,'' असे भिन्नलिंगी आवाजातील वाक्ये मागून कानी पडत होते आणि समोर 'खारूताई खारूताई तोंड दाखव'ची आठवण करून देत युवराजांची स्वारी दिसेनाशी झाली. 'वेटिंग फॉर गोदो'चा खेळ परत सुरू झाला.

तितक्यात काही कर्तव्यनिष्ठ पोलिसांना आपण कामावर असल्याचा त्याचवेळेस साक्षात्कार झाला. त्यांनी पत्रकारांनाच हाकलण्यास सुरूवात केली. एकाने 'आम्हाला करा अटक आणि टाका आत,' असे खास उत्तर दिल्यानंतर 'मी माझ्या वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करत आहे,' असे तितकेच खास पोलिसी उत्तर आले. मग तिथून जाणाऱ्या हुसेन दलवाईंना बोलावून ही तक्रार त्यांच्या कानी घालण्यात आली. तद्दन राजकारण्याच्या खुबीने गोड शब्दांत जबाबदारी झटकून तीही स्वारी निघून गेली.

त्यानंतर उल्हास पवार यांच्या आगमनानंतर उल्लास पसरला. त्यांची रसवंती पाझरू लागली आणि मारुतीच्या गार बेंबीचा पुनःप्रत्यय सुरू झाला. तेच जंगी इरादे, त्याच कठोर कानउघाडण्या आणि तीच चिरपरिचित वाक्ये.

थोड्याच वेळात परत युवराजांची स्वारी आली आणि यावेळेस उलट्या दिशेने गेली. कोपऱ्यापर्यंत आल्यावर माध्यमीयांनाच जनता समजून ते कडे तोडून आले आणि माध्यमीयांचे कॅमेरे आणि कार्यकर्त्यांच्या सोनसाखळ्यांनी भरलेली मनगटे, यांचा असा काही कल्लोळ झाला, की झटक्यात आपली मान काढून घेऊन त्यांनी वेगाने पुढचा मार्ग पत्करला. एव्हाना संपादकांशी बोलून झाल्यावर ते माध्यमांतील 'आम आदमी' म्हणजे बातमीदारांना भेटतील, असे संदेश पसरविण्यात आले होते. त्यामुळे थांबणे भाग होते.

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ थांबण्यास माध्यमीयांना सांगण्यात आले होते. त्यानुसार अर्धा किलोमीटरचा फेरा घालून सगळी वरात तिथे पोचली आणि कॅमेरे, बूम आणि लेखणीचे रुखवत सजवले गेले. सुमारे अर्धा तास झाला, तरी युवराज आले नाहीत म्हणल्यावर ते परस्पर गेले की काय, अशी असुरी शंका निर्माण झाली. एक दोघांनी त्याची वाच्यताही केली. परंतु ठिय्या कायम होता.

जवळपास तासाभराने जीपचा तोच ओळखीचा ताफा येऊ लागला. आता गाड्या थांबतील, म्हणून सर्वांच्या नजरा व माना रस्त्याकडे वळल्या. परंतु हाय रे दैवा, युवराज त्यांच्या अधीर जनतेला त्यांच्या गाडीच्या खिडकीतूनच पाहत आणि हात हलवत गेले. ते हात हलवत गेले आणि हे हात चोळत बसले. मात्र हात हलवताना त्यांची ती गालावरची मोहक खळी विलसत होती, त्यामुळे ते खोटे हसत नसतील, असे समाधान करून घेणे भाग होते.

तात्पर्यः ग्रामीण भागात रोजगार हमी पुरवणाऱ्या काँग्रेसच्या युवराजांनी बुधवार, 25 सप्टेंबर 2013 रोजी पुण्यातील माध्यमीयांना एक दिवस कामाला लावले.

No comments:

Post a Comment