Tuesday, August 11, 2015

घुमानच्या निमित्ताने-9 घुमानचे इष्टकार्यं सिद्धम्!

tumblr_nm9z1uycif1u5hwlmo1_500[1] अमृतसरला हरमंदिर साहेब आणि जालियांवाला बागेचे दर्शन झाल्यानंतर त्या दिवशी तिथेच मुक्काम केला. तेथून परतताना वाघा सीमेवर नेणाऱ्या ऑटोवाल्यांचा पुकारा चालला होता. मात्र एकाच दिवशी हे सर्व करण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय संमेलनानंतरचा एक दिवस मी त्यासाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे त्या दिवशी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि बस स्थानकावरील खोलीत परतलो.

रात्री बस स्थानकाशेजारीच एका हॉटेलमध्ये जाऊन मिनी थाळी मागविली. तमिळनाडूत ज्या प्रमाणे राईस प्लेट या संज्ञेत चपातीचा समावेश होत नाही, त्याच प्रमाणे पंजाबमध्ये थाली या संज्ञेत भाताचा समावेश होत नाही, अशी माहिती या निमित्ताने झाली. तरीही मिनी थाली ४० रुपये आणि भाताची प्लेट ३० रुपये या हिशेबाने ७० रुपयांत अगदी शाही जेवण झाले. बटाटा आणि टोमॅटोची भाजी आणि शेजारी गरमागरम रोटी असा जामानिमा होता. गायकाला जसा जोडीला तंबोरा लागतो तसा या जेवणाला सोबत करण्यासाठी अख्खा मसूर होताच. आधी ते दृश्यच पोटभर पाहून घेतले. आचार्य अत्रे असते तर 'तो पाहताच थाला, कलिजा खलास झाला' असे एखादे गाणे त्यांनी नक्कीच लिहिले असते. मग जेवण जे काय रंगले म्हणता, पाककर्ता सुखी भव असा तोंडभरून आशिर्वाद देऊन मी रजा घेतली आणि झोपेच्या स्वाधीन झालो.

सकाळी खाली उतरून लगेच समोरच्या प्लॅटफॉर्मवर घुमानची गाडी शोधली. पंजाबच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असे झाले असेल, की अमृतसरहून सुटणाऱ्या बसमध्ये पंजाबी लोकांपेक्षा मराठी लोक जास्त असतील. एकूण प्रवाशांपैकी सुमारे अर्धे लोक मराठी होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांकडे शबनमी होत्या. परंतु ते संमेलनालाच निघाले होते, हे ओळखण्यासाठी शबनमींची गरजच नव्हती. ज्यांच्याकडे शबनम नव्हती, त्यांच्याही तोंडातून मराठी शब्द बाहेर पडला, की त्यांचे तिकिट कुठले असणार, याचा अंदाज यायचा. एखाद्या जत्रेला निघावे, तशी ही मंडळी घुमानला निघाली होती. त्यात अकोला, बुलढाणा अशा गावांमधून आलेले लोक होते. माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पुण्याहून आली होती. त्यांच्यासोबत देहू संस्थानचे माजी विश्वस्त आणि तुकाराम महाराजांचे वंशज होते. ते बियासवरून आले होते. त्यांनी एक गंमत सांगितली. मुंबईहून सुटणारी गाडी येणार म्हणून जागोजागच्या गुरुद्वारांमधील लोकांनी स्वागताची, पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. परंतु या गाडीला उशीर झाल्यामुळे त्या लोकांची तयारी फलद्रूप होऊ शकली नाही. माझ्या सोबत बसलेली मंडळी जेव्हा बियासला उतरली तेव्हा या लोकांनी त्यांना बळेबळेच आपल्यासोबत नेले आणि मुक्काम करायला लावला. त्यांना खाऊ-पिऊ घातले.

ते काही असो, घुमानला गाडी पोचली आणि तेथील चौकातच पताका-झेंडे आणि बॅनरनी आमचे स्वागत केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर तर लावले होतेच पण काही स्थानिक शिवसैनिक गळ्यात भगव्या पट्टे घालून उत्साहाने जमले होते. संपूर्ण रस्त्याच्या कडेने पांढरी रांगोळी होती, रस्त्यावर पताका फडकत होत्या. घुमानचा गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला सजावा तसा सजला होता. जागोजागी लोकांनी लंगर लावले होते आणि चहा-पकोडे मुक्तहस्ते वाटल्या जात होते. मुख्य म्हणजे संपूर्ण गावात पंजाबीपेक्षा मराठी वाक्ये अधिक ऐकू येत होती.

गावात लॉज आहे का, असे मी एकाला विचारले. कारण मी आगाऊ नोंदणी केली नव्हती. संमेलनासाठी पुण्यातून जे वऱ्हाड निघाले होते त्यात मी नव्हतो. इतकेच काय, संजय नहार यांची ओळख असली तरी मी येणार आहे, हे मी त्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे गावात उतरायला जागा मिळेल का, ही माझ्या मनात धाकधूक होतीच. मला उत्तर मिळाले, की गावात लॉज नाही. गुरुद्वाऱ्याचे यात्री निवास आहे, मात्र त्याची नोंदणी आधीच झाली असणार. मग एका इंटरनेट कॅफे चालकाने सल्ला दिला, की शेजारच्या शाळेमध्ये जागा असेल तिथे चौकशी करा. तेथे गेल्यावर जागा आहे का, असे विचारल्यानंतर तेथील व्यक्तीने होकार भरला आणि नाव-गावाची नोंद केल्यानंतर एका मुलाला मला जागा दाखविण्यास पाठविले. दशमेश पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात अशा तऱ्हेने माझा मुक्काम पडला.

1 comment:

  1. घुमान च्या निमित्याने सर्व पंजाब च्या संस्कृतीचे , पंजाबी जेवणाचे खानपानाचे अत्यंत सुंदर वर्णन आपण केलेत . माझ्या पंजाब च्या आठवणी जाग्या केल्यात … पण या घुमान मराठी साहित्य संमेलनाने मराठी साहित्य जगात कोणती मौलाची भर पडली , साहित्य संमेलनातील चर्चा वादविवाद कवी संमेलना कसे झाले . व्यवस्था कशी होती . हट्टाने एव्हढ्या लांब परक्या मुलखात हे संमेलन घेवून काय साध्य झाले. अध्यक्षीय भाषण ह्या बद्दल आपण लिहिले असते तर बरे झाले असते . अश्या परिपूर्ण लेखाची वाट पाहत आहे .

    ReplyDelete