Tuesday, October 9, 2007

पाण्यात न गेलेले पैसे

देवा, याही देशात पाऊस पाड
देवा, याही शहरात पाऊस पाड...

दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी देवाला उद्देशून ही कविता लिहिली. त्यामागे त्यांचे जे काय हेतू असायचे ते असोत. (जर्मनमध्ये तिचं भाषांतर व्हावं, असा हेतू निश्चितच नसावा.) मात्र हीच कविता सध्या मी दिवस रात्र आलापत आहे. मेघराजांची अशी आराधना एखाद्या जातीवंत बेडकानंही केली नसेल. अर्थात तळमळीतील ही उणीव आवाजाने भरून निघते, हा भाग अलाहिदा.

तर, पर्जन्यराजाचा हा असा धावा करण्यामागे माझा काय स्वार्थ असावा, असं वाटलं ना?. शहरातच राहत असल्याने भरपूर पाऊस होऊन चांगले पीक काढावे, असा मी शेतकरीही नाही. पावसाच्या प्रत्येक थेंबासरशी कवितेचे पाट वाहू घालण्याएवढी काव्यप्रतिभाही आता राहिली नाही. खरं तर, पावसाला देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. मात्र तरीही पाऊस पडावा, यासाठी मी अगदी चातकासारखी वाट पाहत आहे. कारण...

कारण...माझे जर्कीन उर्फ जॅकेट उर्फ् सामान ठेवायची पिशवी उर्फ....बरंच काही! चार महिन्यांपूर्वी विकत घेतलेल्या या सर्वऋतूसमभाव चीजेसाठी मला हवाय पाऊस. एकदा या शहरात चांगला दणदणीत पाऊस पडू दे, त्यात न भिजण्यासाठी या प्रावरणाचा उपयोग करू दे...मग तीन वर्षे दुष्काळ पडला तरी चिंता नाही, (एक्चुअली कोरडा दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ...मी कोणत्याच गोष्टीची चिंता करत नाही. याबाबतीत महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि माझं एकमत आहे.) एवढीच माझी आता महत्त्वाकांक्षा आहे.
काय आहे, गेली दोन वर्षे महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीची परंपरा चालू आहे. त्या दोन संकटांशी झगडता झगडता तनू भागलेल्या जुन्या जर्कीनने यंदा कॉलर टाकली आणि त्याच्या रिप्लेसमेंटची तरतूद करण्याची जबाबदारी आली. आता हा योजनाबाह्य खर्च अंगावर पडल्यावर त्यासाठी हालचाली करणंही आलंच. आधीच खरेदीची काडीचीही अक्कल नसल्याची पंचक्रोशीत ख्याती! त्यात पावसाळ्याचा हंगाम बघून विक्रेत्यांनी केलेली सुगीची बेगमी. मग काय विचारता?

म्या पामराने कसाबसा छातीचा कोट करून जून महिन्यात एक जंगी जर्कीन विकत घेतले. आठशेपासून सुरू झालेली बोली खाली आणत पाचशे रुपयांत विक्रेत्याला पटविले आणि काखोटीला मारून ते गाठोडं आणलं. तरीही मनात धाकधूक होतीच. त्यामुळे आधी नव्या वस्तूचं खासगी प्रदर्शनही सुरू झालं. त्यात सर्वांनी 'छान छान, चांगलं आहे' असे शेरे मारल्यावर आमचे गंगेत घोडे न्हाले. आता हा पाऊस आणि हे जर्किन...पहिल्या पावसाच्या मेघगर्जनने मोराने पिसारा फिरवून नाचावे, तसा आनंद झाला.

हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता, हे मला लवकरच कळाले. (दोन अतिपरिचित वाक्यांचे कॉम्बिनेशन करण्याची खुमखुमी बऱयाच दिवसांपासून होती. त्याची आज संधी मिळाली.) खरं सांगायचं तर अपेक्षांवर पाणी फिरले असं म्हणायचंही संधी दिली नाही. जून महिन्यापासून आकाशात ढग जमतायत, वातावरण कुंद होतंय, पण...पावसाचे थेंब काही पृथ्वीपर्यंत येत नाहीत. पावसापासून बचाव करण्यासाठी जर्किन घालून फिरावं आणि घरी परतताना जर्किनमुळे घामाघूम होऊन, ओल्या अंगाने परतावं हेच आता नशिबी आलंय.

हे जर्किन नावाचं प्रकरण अंगावर घेतल्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पाचशे रुपये पाण्यात गेल्याचं दुःख मला दिवसरात्र खायला लागलं. त्याची नुकसानभरपाई करण्यासाठी या जर्किनचा अधिकात अधिक उपयोग करून घ्यायचा धोरणात्मक निर्णय घ्यावा लागला. (व्यवस्थापनशास्त्रातील मॅक्झिमाईजिंगची संकल्पना हीच ना?) त्याचा पहिला प्रयोग जर्किनच्या दोन्ही बाजूंच्या खिशांवर झाला. मोबाईल, ऑफिसचे कार्ड, पासबुक...अशा चीजवस्तू वाहण्यासाठी हे दोन्ही खिसे अगदी चपखल कामी आले. त्यामुळे वेगळी एखादी बॅग ऑफिसला नेण्याची गरज नाहिशी झाली. मात्र त्याचा एक परिणाम असा झाला, की जर्किनचे दोन्ही खिसे पाण्याने भरलेल्या पखालीसारखे आकाराने फुगु लागले. त्यामुळे आजबाजूच्या लोकांच्या नजरा वेगळ्या अर्थाने जर्किनवर खिळू लागल्या.

त्यानंतर हीच उपयोगाची क्लृप्ती थोडी ताण देऊन वाढविण्याचा मार्ग पत्करला. जर्किनचा विस्तार तसा ऐसपैस असल्याने याबाबतीत फारसा विचार करावा लागला नाही. पूर्वीच्या काळी धोतराचा ज्याप्रमाणे शरीराचा खालचा भाग झाकण्यापासून अंथरूण-पांघरूण होण्याएवढा सर्वप्रकारे उपयोग होत असे, त्याप्रमाणे या जर्किनचा उपयोग होऊ लागला. छातीपर्यंत चेन ओढून घेऊन सदऱयाचे तुटलेले बटन झाकणे, बसमध्ये मळलेल्या सीटची धूळ टाकण्यासाठी असे जर्किनवर प्रयोग सुरू झाले. अगदी अलिकडे तर रेल्वेच्या बर्थवर झोपण्यासाठी अंथरण्यापर्यंत या वस्तुच्या उपयोगाचे क्षितिज रुंदावले आहे. त्यामुळे डेल कार्नेजीसारखं मीही ‘हाऊ टू यूझ जर्किन इन १०० वेज इन इव्हरी वेदर' या किंवा तत्सम नावाने एखादे पुस्तक लिहावे असा विचार करतोय. (या प्रस्तावित पुस्तकासाठीची काही टिपणे जर्किनच्या डाव्या खिशात ठेवली आहेत. )

हे एवढे प्रात्यक्षिक करूनही त्यातून मिळतं ते एकप्रकारचं कोरडं समाधानच! एवढे होऊनही माझा आशावाद मला अद्याप सोडून गेलेला नाही. हवामान विभागाच्या अंदाजावर कोणाचाही नसेल एवढा माझा विश्वास आहे. आज ना उद्या शहरात पाऊस पडेल, आज ना उद्या पावसापासून बचावल्याच्या आनंदाचा शिडकावा तरी मिळेलच, याची आशा अद्याप माझ्या मनात शिल्लक आहेच. त्यासाठीच...केवळ त्यासाठीच पाऊस पडावा, यासाठी मी देवाचा धावा करतोय!
--------------

कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !

गेला सुमारे महिनाभर झाला तमिळनाडू आणि खासकरून त्या राज्याचे मुख्यमंत्री मुथ्थुवेल करुणानिधी चर्चेत आहेत. अर्थात ही चर्चा त्यांना किंवा अन्य कोणालाही फारशी भूषणावह ठरावी, अशी नाही. मात्र करुणानिधी यांचा वैचारिक आणि राजकीय प्रवास ज्यांना माहित आहे, त्यांच्यासाठी ही गोष्ट फारशी नवी नाही. इंग्रजी माध्यमांतील खबरांवर पोसलेल्या आणि तमिळ वगळता अन्य माध्यमांनीही यात करुणानिधी यांच्याबद्दल वेगळवेगळ्या बातम्या देण्यात कसूर ठेवली नाही. मात्र देवाच्या नावाने बोटे मोडणारे करुणानिधी स्वतः अंधश्रद्धाळू असून, आपली पिवळी शाल घेतल्याशिवाय घराबाहेरही पडत नाहीत, अशी एखादी माहिती कोणी दिली असेल तर शप्पथ! मात्र कशी देणार? त्यासाठी तेथील माहिती असायला हवी ना?


असो. मात्र करुणानिधींच्या या बडबडीमुळे त्यांचे काही चांगले कामही दुर्लक्षिले जातात. या संपूर्ण काळात मला आठवत होते सुमारे वर्षभरापूर्वी तमिळनाडूत सत्तांतरानंतर घडलेले एक सांस्कृतिक नाटक. एखाद्या देशात, राज्यात आपल्या आवडत्या अथवा कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करणे ही सामान्य बाब आहे. ही व्यक्ती कोणती असावी, याचेही निकष सामान्यतः ठरलेले आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे सत्तांतरानंतर रस्त्यावरील धुळीत मिळाल्याची चित्रेही दिसतात. मात्र एखाद्या साहित्यकृतीतील पात्राचा पुतळा एखाद्या शहराने मानाने उभारावा, त्याला अस्मितेचे प्रतिक बनवावे आणि हा पुतळा हलविल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सत्तांतराचा कौल द्यावा, ही जगाच्या इतिहासात क्वचितच घडणारी घटना. ती घडली तमिळनाडूत. कण्णगीच्या पुतळ्याच्या निमित्ताने!
जैन आचार्य व कवी इलंगो अटिगळ याने लिहिलेल्या "सिलप्पदीकारम्‌' या महाकाव्याची कण्णगी ही नायिका. तमिळ साहित्यात गेली सुमारे हजार एक वर्षे हे महाकाव्य अभिजात कृती म्हणून मान्य पावले आहे. त्यातील कण्णगीला स्त्रीशक्तीची प्रतिनिधी, देवी, न्याय मागणाऱ्यांची एक प्रतिमा असे स्थान आहे. तिच्या याच रुपातील एक पुतळा तमिळनाडू सरकारने तयार करवून, चेन्नईतील "मरीना बीच'वर स्थापित केला. सुमारे चार दशके मानाने उभा असलेला हा पुतळा पाच वर्षांपूर्वी जयललिता यांच्या सरकारने रातोरात हलविला. अन्‌ त्यानंतर तिच्या पुनर्स्थापनेसाठी सुरू झालेल्या मागण्यांची परिणती गेल्या वर्षी करुणानिधी सरकारने हा पुतळा पुन्हा "मरीना'वर बसविण्यात झाली. एका राजकीय लढ्याचा विषय ठरलेली कोण ही कण्णगी आणि तिचे स्थान काय?


या प्रश्‍नांच्या उत्तरासाठी आपल्याला "सिलप्पदीकारम'चा कथाभाग लक्षात घ्यावा लागेल. कण्णगी, तिचा पती कोवलन आणि त्याची प्रेयसी माधवी ही यातील मुख्य पात्रे. कण्णगी व तिचा पती ही दोघेही संपन्न व्यापाऱ्यांची मुले. कावेरीपूम्पट्टीनम या गावात त्यांचा सुखाचा संसार चालू असतो. अशातच कोवलनची गाठ माधवी या नृत्यांगनेशी पडते व तो तिच्या प्रेमात वाहवत जातो. त्यात सर्व संपत्ती गमावल्यावर दरिद्र कोवलनचा माधवी उपहास करते, अन्‌ पश्‍चात्तापदग्ध कोवलन कन्नगीकडे परततो. त्यानंतर दोघेही शहर सोडण्याचा निर्णय घेऊन, मदुराईच्या दिशेने निघतात. या वेळी त्यांच्याकडे असते फक्त कण्णगीची रत्नांनी भरलेली तोडयांची जोडी! कोवलन व कण्णगी मदुराईत येतात. त्या वेळी तिथे पांड्य राजा नेडुनचेळियन याचे राज्य असते. तेथे पैशांची जमवाजमव करण्यासाठी कण्णगीचे एक तोडे बाजारात विकण्यासाठी कोवलन घेऊन जातो. त्याच वेळेस राणीच्या तोड्याची चोरी केल्याचा आरोप ठेवून त्याला पहारेकरी अटक करतात. तडकाफडकी सुनावणी करून राजा चोरी केल्याबद्दल कोवलनचा शिरच्छेद करण्याची आज्ञा देतो. त्याची लगेच अंमलबजावणीही होते.


हे ऐकून कण्णगी दरबारात धाव घेते. राजाला जाब विचारते. राणीच्या तोड्यात मोती भरलेले असताना, स्वतःचे तोडे मोडून त्यात भरलेली रत्ने दाखवते. राजाशी वादविवाद करून न्यायनिवाड्यात त्याची चूक झाल्याचे सिद्ध करते. हे ऐकताच अन्यायाची जाणीव होऊन राजा व राणी प्राणत्याग करतात. तरीही कण्णगीचे समाधान होत नाही. ती मदुराई शहराला शाप देते अन्‌ तिच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने शहर जळून खाक होते. यानंतर शहराच्या ग्रामदेवतेच्या कृपेने तिला मोक्ष मिळतो, अशी या महाकाव्याची कथा आहे. स्त्रीचे पावित्र्य, निष्ठा यांसाठी दक्षिण भारतात कण्णगी प्रसिद्ध आहे. मोक्ष मिळविण्यापूर्वी ती पोलची पर्वतांकडे गेली होती. या भागांतील आदिवासी देवीस्वरूपात "कण्णगी अम्मन'ची पूजा करतात. येथील "मुदुवन' आदिवासी स्वतःला कन्नगीसोबत आलेल्यांचे वंशज मानतात. श्रीलंकेतही तिची पूजा होते. तेथे सिंहली बौद्ध लोक "पतिनी' या नावाने; तर तमिळ हिंदू "कण्णगी अम्मन' नावाने तिची पूजा करतात.


एका हातात तोडा घेऊन, दुसऱ्या हाताचे बोट राजाकडे करणाऱ्या कण्णगीचा पुतळा चेन्नईकर अभिमानाने मिरवित. त्यांच्यासाठी तो तमिळ अस्मितेचे प्रतिक होता. द्रमुक पक्ष पहिल्यांदा सत्तेवर आला, तेव्हा दुसरी जागतिक तमिळ परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी जानेवारी 1968 मध्ये हा पुतळा उभारण्यात आला. सी. अन्नादुराई हे मुख्यमंत्री व करुणानिधी तेव्हा सार्वजिक बांधकाम मंत्री होते. कवि, लेखक, पटकथा लेखक व समीक्षक असलेल्या करुणानिधी यांना "कलैञर' (कलामर्मज्ञ) असे म्हटले जाते. "सिलप्पदिकारम'मधील अनेक वचने ते भाषणांत वापरतात आणि या महाकाव्यावर आधारित "पुम्पुहार' या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली होती. त्यांच्याच पुढाकाराने हा पुतळा "मरीना'वर बसविण्यात आला.


डिसेंबर 2001च्या एका मध्यरात्री जयललिता यांच्या आदेशावरून हा पुतळा हलविण्यात आला. एगमोरमधील एका संग्रहालयात त्याला हलविण्यात आले. त्याचे निश्‍चित कारण अद्याप माहित नाही. ती जागा सपाट करून त्यावर रस्ता तयार करण्यात आला. "वास्तुशास्त्रा'च्या दृष्टीने तो अशुभ असल्याचे ज्योतिषाने सांगितल्याने जयललितांनी हा आदेश दिल्याचे सांगण्यात येते. यावर मोठा गदारोळ झाला. गेल्या वर्षीच्या निवडणुकीत रंगीत टीव्ही, दोन रुपये किलो तांदूळ अशा मुद्यांबरोबरच कण्णगीची पुनर्स्थापना करण्याचेही आश्‍वासन करुणानिधी यांनी दिले. तेरा मे रोजी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन जून रोजी त्यांनी या पुतळ्याची खरोखरच पुनर्स्थापना केली. करुणानिधी यांच्या या निर्णयाचे राजकीय नेत्यांबरोबरच कवी, विद्वान आणि साहित्यिकांनी स्वागत केले. त्यावेळी पेनसिल्व्हानिया विद्यापीठाचे प्राध्यापक एरिक मिलर यांनी 'हिंदू'मध्ये लेख लिहून या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणतात,"" संपत्ती नसतानाही अथवा कुटुंबीयांचे पाठबळ नसतानाही एखादी स्त्री न्याय मागू शकते, तो मिळवू शकते हे कण्णगी दर्शविते. ती खरोखरच न्याय मागणाऱ्या सामान्यांची प्रतिनिधी आहे.'' न्यायदानातील चुकीमुळे पतीचा जीव गेल्यामुळे आकांत करणारी कण्णगी "मरीना बीच'वरून विनाकारण हलविल्यानंतर काही करू शकली नाही. एरवी कित्येक क्षुल्लक पुतळ्यांवरून राजकारण होणाऱ्या समाजात कुठल्याशा काव्यातील एका पात्राच्या पुतळ्यासाठी कोण दाद मागणार? मात्र तमिळ साहित्य जगत आणि करुणानिधी यांच्यासारख्या कलाप्रेमी राजकारण्यामुळे पाच वर्षांनंतर तिला तिचे स्थान परत मिळाले. हे कण्णगीचे सौभाग्यच! मात्र त्याच करुणानिधी यांना वावादुक विधाने करून स्वतःची प्रतिमा काळवंडून घेण्याची दुर्बुद्धी सुचावी हे त्यांचे दुर्दैव!

---------------


Friday, September 28, 2007

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

दुसरी इनिंग
----------
हमदशाह अब्दाली याच्या भारतातवर तीन स्वाऱया झाल्यानंतर त्याला हग्या मार देऊन परत कधीही न येण्यासाठी जाण्यास मराठ्यांनी भाग पाडले. त्याप्रमाणेच गेल्या दीड एक वर्षात सर्व स्पर्धांमध्ये मार खाल्यानंतर अचानक बीसीसीआयच्या संघाने विजय मिळविला. यात त्यांचे कर्तृत्व होतेच. विजयासाठी त्यांचे कौतुक होणेही साहजिकच होते. मात्र 'अति सर्वत्र वर्जयेत्' या पूर्वजांच्या सल्ल्याकडे लक्ष देतील तर ते भारतीय कसले? त्यामुळे मग केवळ एखाद्या राजाचा राज्याभिषेक सोहळाच भासावा, असा या खेळाडूंचा जंगी सत्कार करण्याचा घाट घालण्यात आला. अंतिम सामना सुरू होण्यापूर्वीच युवराजची आई, रोहितचे बाबा अशा नामवंत आणि तज्ज्ञांच्या मुलाखती विविध वाहिन्यांवरून दाखविण्यात आल्या, तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती. मात्र संघ जिंकल्यानंतर पालीचे हे चुकचुकणे डायनासोरच्या गुरगुराटीत बदलले होते.

रणांगण आणि 'रनांगण' यात भारतीयांची नेहमीच गल्लत होते. त्यात समोर पाकिस्तान म्हटल्यानंतर तर काही बोलायलाच नको. बीसीसीआयचा संघ मुंबईत दाखल झाला आणि तेथून वानखेडे मैदानापर्यंत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. त्यासाठी अख्ख्या मुंबई महानगरीच्या वाहतुकीला वेठीस धरण्यात आले. मुंबई म्हणजे काही पुणे नाही, की वाहतूक चालेल आपली रामभरोसे. आधीच गणेश विसर्जनासाठी आदल्या दिवशी शहराला विश्रांती मिळालेली नव्हती, त्यात हा त्रास. अनुत्पादक कामासाठी देशाच्या आर्थिक राजधानीला वेठीस धरण्याची काय ही वृत्ती? अन गप्पा करायच्या महासत्ता होण्याच्या.

आता पब्लिक जमा झाली म्हणजे आपले स्वयंघोषित पब्लिक सर्वंटही तिथे पोचणारच. त्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष शरद पवार म्हणजे या खेळातील 'मंजे हुए खिलाडी.' साहेब सर्वांत आधी मैदानात शड्डू ठोकून हजर होते. त्यांच्या जोडीला महाराष्ट्राचे अतिकर्तृत्ववान मुख्यमंत्री विलासराव देशमुखही मांड ठोकून बसले होते. पवार यांच्या कारकीर्दीतच तर भारतीय क्रिकेटची भरभराट झाली ना! इंग्लंड, दक्षिण आफ्रिका दौऱयातील एकदिवसीय सामन्यांतील मानहानीकारक पराभव, चॅपेल गुरुजींच्या ट्यूशन घेऊन गांगुलीच्या कारकीर्दीचा केलेला खेळखंडोबा, त्यानंतर विश्वचषक स्पर्धेत १९७९ नंतर न जमलेली पहिल्याच फेरीतील एक्झिट...अशा एकाहून एक चढत्या पायऱयांनी बीसीसीआयचा संघ प्रगती करत होता. त्यात विश्वचषक, मग ती वीस-२०चा का असेना, संघाने जिंकल्यानंतर आपल्या अध्यक्षपदाचे सार्थक झाल्यासे साहेबांना वाटले तर काय नवल? त्यामुळे समस्त भारतीयांना सात शतकांत न मिळालेला गौरव मिळवून दिलेल्यांचा गौरव करण्यासाठी ते ही आले.

'राष्ट्रवादी' आल्यावर 'महाराष्ट्र'वादी न येऊन कसे चालेल. त्यामुळे लातूरचे देशमुखही आले. गेल्या वर्षी पंतप्रधानांनी पॅकेज दिल्यानंतरही विदर्भात दीडशे-दोनशे शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. तेव्हा देशमुखांचे मन द्रवल्याचं दिसलं नाही. उलट केंद्रातील शंकरसिंह वाघेला नामक नेत्याच्या साथीने गेल्याच महिन्यात शेतकऱयांबद्दल आक्षेपार्ह उदगार काढल्य़ाबद्दल त्यांचा अनेक ठिकाणी उद्धारही झाला. मात्र वीस-२० स्पर्धेत संघाने विजय काय मिळविला, देशमुखांची देशभक्ती १०० टक्के जागी झाली. त्यातून त्यांनी खेळाडूंसाठी बक्षीसही जाहीर केले. महाराष्ट्रातील पन्नासेक जवान तरी गेल्या वर्षभरात काश्मीर आणि देशाच्या अन्य भागात शहीद झाले. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काही केल्याचे, केल्याचे कशाला जाहीर केल्याचेही आठवत नाही.
याच राज्यातील अन्य खेळांतील अनेक खेळाडू प्रोत्साहनावाचून खितपत पडले आहेत. कोल्हापूरच्या वीरधवल खाडे या जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभागाची संधी मिळावी, यासाठी सकाळने गेल्या वर्षी मोहीम चालविली. शिवछत्रपती पुरस्कार आणि दादोजी कोंडदेव पुरस्कार जाहीर करूनही अनेक खेळाडूंना ते वेळेवर मिळत नाहीत. त्यावेळी सरकार हलल्याचं दिसत नाही. आता मात्र क्रिकेटपटूंसाठी पुरस्कार वाटण्यात पुढाकार घ्यायला तयार. एकतर बीसीसीआय आणि अन्य पुरस्कर्त्यांनी जाहीर केलेल्या पुरस्कारांपुढे राज्य सरकारचे पुरस्कार म्हणजे हत्ती बुडतो आणि शेळी ठाव मागते असाच प्रकार आहे. पण काय करणार, सभा हसली की माकडाला हसावंच लागतं.

एकूणात भारतीयांचं सेन्स ऑफ प्रोपोर्शन चांगलंच बहरू लागलंय. आपल्याच देशात आपण असे वागू लागलो, तर परकीय शत्रूंची गरजच काय?

Thursday, September 27, 2007

क्रिकेट, मनोरंजन का केवळ राजकारण

सबकुछ ट्वेंटी-२०!

त्रिभुज हिंदुस्तानी उपखंडात एकदिवसीय क्रिकेटचं वेड कमी होतं म्हणून की काय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 'आयसीसी' आता ट्वेंटी-२० क्रिकेट सुरू केलं आहे. खरं सांगायचं तर या सामन्यांना आपला मनापासून पाठिंबा नव्हता. आताही नाही. त्यात या सामन्यांमध्ये डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी पाच साडेपाच फुटांचे हलते आणि जीवंत देखावे उभे केल्यामुळे हे क्रिकेटचे सामने आहेत, की रामगोपाल वर्मा किंवा डेव्हिड धवनचे सिनेमे आहेत, हा कूटप्रश्नच निर्माण झाला.

तरीही भारतीय संस्कार असे एकाएकी थोडेच जाणार? त्यामुळे एकदा सामन्यांना सुरवात झाली आणि 'मन मॅचरंगी रंगले' अशी अवस्था झाली. संपूर्ण स्पर्धा बारा-तेरा दिवस चालली. यात दोन वेळेस हृदयविकाराचे झटके येण्याची वेळ आली होती. मात्र त्याच वेळेस गणेशोत्सव चालला असल्याने तेवढे एक विघ्न टळले.

पहिल्या काही सामन्यांमध्ये किरकोळ संघांशी गाठ पडली. नंतर मात्र पाकिस्तानशी सामना आला आणि ट्वेंटी-२० विरोधातील सगळा अभिनिवेश मागे टाकून आपण बीसीसीआयच्या संघाला पाठिंबा दिला. (भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत नाही, असे प्रतिज्ञापत्र बीसीसीआयने दोन वर्षांपूर्वी दाखल केले होते, आठवते ना.) त्या सामन्यात बीसीसीआयच्या संघाने ट्वेंटी-२०च्या मानाने अत्यंत कमी धावा केल्या. त्यामुळे सामन्याचा निकाल ऐकणे आपल्या कानाला झेपणार नाही, याची खूणगाठ बांधली होतीच. मात्र त्या दिवशी निळ्या कपड्यांतील गड्यांनी वेगळाच डाव केला. त्यांनी पाकिस्तान संघाच्या एकामागोमाग विकेट काढल्या. झालं, आता आम्हाला काम सोडून मॅच पाहावा लागणार! झालंही तसंच. हातातलं जे काय काम होतं, ते उरकलं, नाहीतरी दुसऱया दिवशी आम्ही लावलेले पान कोणी वाचणारच नव्हतं. लोकं मॅचची बातमीच वाचणार होते. साधारण अकराच्या पुढे स्वारी दूरचित्रवाणी संचाच्या समोर स्थानापन्न झाली. (म्हणजे उभी राहिली. ऑफिसमधील खुर्च्यांचे बुकिंग आधीच झाले होते.) क्रिकेटच्या मोठ्या सामन्यांचं एक बरं असतं. जमलेली गर्दी त्यांच्या कॉमेंटस् अगदी जीवाच्या कराराने देत असतात, त्यामुळे आपल्यासारख्या नाठाळ क्रिकेटबाजाला सामना कसा चालू आहे, ते कळत राहतं.

गर्दीच्या कॉमेंटमधून वाट काढत मॅच अशा वळणावर पोचला की, आता १९८६ सालच्या शारजातील सामन्याची रिप्ले बघायला मिळणार याची खात्री पटली. मात्र शेवटच्या चेंडूवरही धावा काढण्यात पाकिस्तानचे फलंदाज अपयशी ठरले आणि सामना बोल आऊट मध्ये गेला. आता बोल आऊट, फ्री हिट इ. इ. यावर भवती न भवती सुरू झाली. छातीवर मणामणाचं ओझं ठेवणारे ते काही मिनिटे गेले. बॉल आऊट सुरू झालं आणि काही मिनिटांनी बीसीसीआयचा संघ जिंकल्याचंही दिसलं. आपले गंगेत घोडे न्हाले. आता विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकलो गेलो, तरी काळजी नाही, असं निश्चिंत बसलो होतो. पण हाय रे दैवा, यंदा बाप्पा काही वेगळाच प्लॅन करून आले होते. एरवी काळेनिळे होईपर्यंत मार खाणारे मेन इन ब्लू आता पार अंतिम फेरीपर्यंत गेले होते.

सोमवार. २४ सप्टेंबर. सुदैवाने अंतिम सामना साडेपाच वाजता सुरू व्हायचा होता. त्यामुळे स्वारी कार्यालयात असली तरी कामात नव्हती. याहीवेळी समोर पाकिस्तान होता. आता साखळी सामन्याची रिप्ले होणार का छोड दे इंडिया होणार, हे याची देही याची डोळा पाहणे ही काळाची गरज होती. प्रथेप्रमाणे कार्यालयातील टीव्हीसमोर मानाचा शेवटचा प्रेक्षक म्हणजे डीडी आल्यानंतर सामना सुरू झाला. याही वेळी १५७ धावा काढून नीलपुरूष कपड्यांच्या खोलीत (ड्रेसिंग रूम) परतले. आता पुढे काय होणार याची स्थानिक, प्रामाणिक, वैतागिक आणि अगतिक(ही) तज्ज्ञांमध्ये चर्चा सुरू झाली. काही वेळाने पाकिस्तानचा डाव सुरू झाला. तेव्हाच मॅच संपल्याशिवाय पान लावायला येणार नाही, असा निरोप पाठविला होता. पाकिस्तानचा डाव मागील पानावरून सुरू झाला आणि तिथेच संपला. कोण खेळतंय, कोण हरलंय आणि कोण जिंकलंय, अशा मूलभूत जिज्ञासेपलिकडे जाण्याचा आपला स्वभाव नाही. त्यामुळे कोण बाद झालंय, कोण आबाद झालंय...वगैरे वगैरे बाबींकडे आपलं लक्षच नव्हतं. क्रिकेटचे सामने पहायचे ते केवळ प्रेक्षकांतील हलते देखावे पाहण्यासाठी आणि जाहिरातींद्वारे प्रबोधन करून घेण्यासाठी, असं आपलं नेटकं धोरण आहे.

या धोरणाला पहिला तडा गेला सामन्याच्या शेवटून दुसऱया षटकात. मिस्बाहने एकामागोमाग षटकार आणि चौकारांची मालिका सुरू केली. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही षटकार गेला आणि हृदयविकाराचा दुसरा झटका येण्याची चिन्हे दिसू लागली. चार चेंडू अन् सहा धावा...इकडे बाप्पांचा धावा सुरू झाला. मात्र बाप्पांनी तोपर्यंत तरी निरोप घेतलेला नसल्याने ते धावून आले...मिस्बाहने विनाकारण विकेट फेकली आणि चेंडू उंच भिरकाविला...हाताचा रिस्टबँड नीट करण्यात गुंतलेल्या श्रीशांतनेही तो फटका लीलया झेलला आणि एकदिवसीय क्रिकेटच्या लिंबू-टिंबू स्पर्धेत बीसीसीआयच्या संघाने विजेतेपद पटकावले.

स्पर्धेची एक इनिंग इथे संपली. आता दुसरी इनिंग आपण पाहणारच आहोत, मात्र ते ब्रेक के बाद!

Saturday, September 22, 2007

राम बोलो भाई राम बोलो

राम सेतु नामक एका प्राचीन जागेवरून आधुनिक काळात एक ‘ऐतिहासिक वाद’ चालू आहे. या वादाबद्द्ल काही जणांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही मत मतांतरे...








Monday, September 17, 2007

गणेश‘खाद्य’उत्सव

णेशोत्सव म्हणजे (साऊंडसिस्टिमवाल्यांच्या) उत्साहाचा उत्सव! गणेशोत्सव म्हणजे चैतन्याचा (दुकानदारांच्या...यात शॉपपासून मंदिरांपर्यंत सर्व आले) काळ. गणेशोत्सव म्हणजे मांगल्याची पर्वणी (दहा दिवसांत दोन सुट्या...शिवाय शनिवार, रविवारे वेगळे...याहू!) अशा या काळात पोट आणि जीभ या दोन्ही अवयवांना सुस्थितीत ठेवण्यासाठी तसेच आनंद द्विगुणित ठेवण्यासाठी वेगवेगळे खाद्यपदार्थ करण्यात येतात. मात्र आहे त्याच पदार्थांची पारंपरिक चव घेण्यात काय "चीज' नाही. त्यासाठी उत्सवाला येणाऱ्या आधुनिक स्वरूपाप्रमाणे काही पदार्थांची वेगळी मांडणी करावी लागणार आहे. अशाच काही "रिमिक्‍स' पदार्थांची ही वेगळी झलक.
  • अंगाची कडबोळी

हा खास पुण्यासाठी तयार करण्यात येणारा पदार्थ. इतर शहरात लोकांना हा पदार्थ "रुततो,' पुणेकरांना मात्र हा पदार्थ जरा जास्तच रुचतो. गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या गल्लीबोळांमधून खास या पदार्थाचे अनेक प्रात्यक्षिके चालू असतात. खास करून रात्रीनंतर हा पदार्थ अधिक "आस्वाद्य' असल्याची "दंतकथा' आहे. गणेशोत्सवाशी या पदार्थाचा तसा "उत्सवी' संबंध असला, तरी वर्षभर रस्त्यावर या ना त्या प्रकारे हा पदार्थ उपलब्ध असल्याचा फायदा या शहरातील लोकांना मिळतो.

हा पदार्थ तसा खेडेगावात दुर्मिळ. गर्दीच्या वेळेत आणि गर्दीच्या संगतीतच याची खुमारी वाढते. अन्य ठिकाणीही हा पदार्थ करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी पुण्यनगरीतच हा पदार्थ खऱ्या अर्थाने खुलतो. त्यासाठी पुण्याची खास भौगोलिक रचना कारणीभूत आहे. या पदार्थामुळे शरीर अगदी लवचिक होते, असे म्हणतात.अरुंद गल्लीबोळ, बेशिस्त वाहनचालक, हेकेखोर फेरीवाले असे अनेक प्रकारचे वाणसामान या पदार्थासाठी लागते.

  • कानाची शंकरपाळी
हाही तसा मूळचा पुण्याचाच, मात्र हळूहळू "अख्ख्या' महाराष्ट्रात "फेमस' होत असलेला पदार्थ. शंकरपाळ्याचं जसं वैशिष्ठ्य हे, की ते कितीही दिवस पुरवून खाता येतात, त्याचप्रमाणे हाही पदार्थ! अगदी तीस तीस वर्षांची जुनीच गाणी वाजवून वाजवून या पदार्थाला "साग्रसंगीत' स्वरूप देता येते. प्रत्येक गणेश मंडळांच्या अध्यक्षाच्या मर्जीनुसार या पदार्थाची चवही बदलते. त्यामुळे कॉलनी-कॉलनी नुसार हा पदार्थ वेगळा लागतो. अलीकडे पुण्यात दिवसभर "इटस हॉट' करत दिवस व रात्रभर, अन्‌ तेही बारा महिने याच्या अनाहूत विक्रीची व्यवस्था सुरू असते. महाराष्ट्राच्या अन्य शहरातही तो पदार्थ पोचविण्याचे प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कानाच्या पाळ्या गरम होतात, असा अनुभव आहे.
शंकरपाळे हे जसे सपकपासून गोडपर्यंत सर्व चवींमध्ये "ऍडजस्ट' होऊ शकतात, तसे हा पदार्थही कुठल्याही म्हणजे फिल्मी, पॉप (कॉंटिनेंटल), रिमिक्‍स (ए भाऊ..ते ब्राझील लाव रे जरा!!), पंजाबी (दलेर लाव दलेर!)अशा विविध पद्धतीने मिळू शकतो. या पदार्थाची रेसिपीही तशी सोपी आहे. कुठल्याही कंपनीचा थोडासा "डल' झालेला "डेक' कार्यकर्त्याच्या घरून आणायचा. त्यात "कॅसेट' टाकून तारस्वरात लावायची आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहून फिदीफिदी हसत बसायचं. नंतर दोन "तार सुटल्या' की झाला "कानाच्या शंकरपाळी' तयार.

  • गाण्यांचा म्हैसूरपाक
हा खास विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी होणार पदार्थ. अलीकडे नवरात्रात "तोरण' नावाच्या कार्यक्रमामुळे त्याचा पुनःप्रत्यय येत असतो. म्हैसूरपाक जसा जुना झाल्यावर खाल्यास मजा येते, तसंच या पदार्थाचेही असते, असे जाणकार सांगतात. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक अशा "ओ की ठो' न कळणाऱ्या भाषेतील कोणत्याही एका गाण्याचे दळण घालायचे, त्याला फक्त ठेक्‍याच्या आचेवर परतायचं की झाला गाण्यांचा म्हैसूरपाक तयार. याचा "बार' भरल्यानंतर ते सहन झालं नाही, तर काहीजण पेटके आल्यासारखे हात-पाय झाडतात असं काही वरिष्ठांचं म्हणणं आहे. मात्र ज्यांनी एकदा का या पदार्थाची चव घेतली, ते पुन्हा दुसऱ्या पदार्थांकडे वळत नाहीत, असं या पदार्थांची विक्री करणारे सांगतात.
या पदार्थाचं वैशिष्ठ्य असं, की याला गोड, तिखट, कडू अशी कोणतीही चव असण्याचे कारण नसते. खाण्याऱ्यांचाही त्यासाठी काही आग्रह नसतो. हा पदार्थ कशाचा केलेला असतो, याच्याशीही अनेकांना देणे-घेणे नसते. तो विंध्याचलाच्या खालच्या प्रदेशातला असावा आणि फक्त तोंडात टाकला की "किक्‌' बसली पाहिजे, एव्हढीच माफक अपेक्षा खाण्याऱ्यांची असते. या पदार्थाच्या धर्तीवर काही जिन्नस पाडण्याचे प्रयोग महाराष्ट्र देशातही होत आहेत. मात्र अद्याप तरी त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही, एव्हढे खरे.

  • आराशींचे अनारसे
पुण्यात सुमारे सत्तर-पंचाहत्तर वर्षांपूर्वी जन्माला आलेला आणि महाराष्ट्रात लोणच्याप्रमाणे मुरलेला हा अत्यंत ज्वलज्जहाल पदार्थ. सुग्रास अन्नपदार्थांनी भरलेल्या ताटात चटणीचे जे स्थान, तेच आरास आणि सजावटींचे गणेशोत्सवाच्या "मेनू'त स्थान. थोडक्‍यात म्हणजे अन्न पदार्थांऐवजी सर्वाधिक खपाचा जिन्नस हाच. गणेशोत्सवाचा भटारखाना "मॅनेज' करणाऱ्या सर्व मंडळांना याच पदार्थावर ध्यान द्यावे लागते. पंचतारांकित हॉटेल्समध्ये ज्याप्रमाणे अधूनमधून "एथनिक फूड फेस्टिव्हल' असतो, त्याप्रमाणे अपार लोकप्रिय असलेल्या गणेश मंडळांना दरवर्षी विविध भागांतील मंदिरे उभा करावी लागतात, इमारती खड्या कराव्या लागतात. त्याशिवाय या पदार्थाची भट्टी जमत नाही. लोकल टेस्ट येत नाही.

या भटारखान्यांचा धंदा "आराशींचे अनारसे' नामक पदार्थावर अवलंबून असतो. मात्र या पदार्थाची रेसिपी एव्हढी क्‍लिष्ट आणि महागडी आहे, की त्या भागातील लोकांना आराशीचे अनारसे म्हणजे त्यांच्या राशीला आलेला मंगळच वाटतो. ते काहीही असले तरी आराशींचे अनारसे नामक पदार्थ जमला, तर गणेशोत्सवाच्या मेजवानीला एक वेगळीच रंगत चढते हे नक्की!

  • शिस्तीचे खोबरे

अस्सल लोकांचा पदार्थ. हा पदार्थ केवळ भारतासारख्या लोकशाही देशामध्येच जन्म घेऊ शकतो. कोणताही ठराविक घटक पदार्थ नसलेला, करण्याची पद्धत नसलेला असा हा स्वयंभू पदार्थ आहे. शहरी वातावरणात याची चव जास्त रेंगाळते. चार पादचारी, दोन दुचाकीचालक, एक कार, एक पीएमटी (मुंबई वगळता अन्य शहरांत स्थानिक बसेस चालतील, मुंबईत हा पदार्थ क्वचितच मिळतो) या सर्वांचे एक वाटण करायचे. त्याला बंद ट्रॅफिक सिग्नलच्या मंद आचेवर काही वेळ ठेवावे. त्यात कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये वाद झाला, की कुठल्याही रस्त्यावर अगदी "इन्स्टंटातल्या इन्स्टंट' फूडपेक्षाही तडकाफडकी असा हा पदार्थ तयार होतो. सायंकाळी करायचा झाल्यास, "आराशींचे अनारसे' या पदार्थासह तयार होतो. शिवाय भारनियमन, दंगल, मोर्चे अशा प्रसंगीही हा पदार्थ तयार होऊ शकतो. त्यादृष्टीने सर्वात सोपा! थंड हवामान या पदार्थाला अजिबात मानवत नाही, त्याचप्रमाणे खाणाराही थंड डोक्‍याचा असून चालत नाही.

  • देणगीचे मोदक

जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी...कोणत्याही स्थळी न चुकता "दर्शन' देणारा हा पदार्थ. गणेशाला मोदक जरा जास्तच आवडत असल्याने तर गणेशोत्सवात या पदार्थाला काहीसा जास्तच वाव मिळतो. बहुतांश ठिकाणी हा गणेश मंडपातच असतो, मात्र गणपतीच्या आधीच तो नजरेला पडतो. हा स्वभावाने काहीसा "सामिष' पदार्थ असल्याने एक फार मोठा वर्ग या पदार्थापासून हात राखूनच असतो. याचा एक विशेष असा, की खाणारा आणि खाऊ घालणारा यांतील भेदच हा पदार्थ मिटवून टाकतो.

या पदार्थाला काही चवच नसून, चवीचा केवळ आभास आहे, असं सांगणार एक वर्ग आहे. याउलट जगात खाण्यासारखा असा हा एकच पदार्थ असून, बाकी केवळ "तोंडी लावण्या'साठी आहे, असं मानून चालणारा एक वर्ग आहे. हे दोन्ही वर्ग गणेशोत्सवात एकत्र येतात, त्यामुळे या दहा दिवसांत हा पदार्थ विशेषत्वाने खपतो. बाजाराच्या नियमानुसार ज्याचं दुकान अधिक चकचकीत, त्याच्याकडे हा पदार्थ अधिक खपतो. तरीही हा पदार्थ तयार होण्यास काहीसा वेळ लागतो. गणेशोत्सवासाठी हा पदार्थ तयार करायचा झाल्यास सुमारे एक ते दीड आधीपासून तयारी करावी लागते. तयार करतानाही मिश्रण सारखे "हलवावे' लागते. सातत्याने चव बघावी लागते. हा पदार्थ दिसायला सर्वत्र दिसला तरी त्याची चव मात्र फार कमी जणांना मिळते. अगदी अल्प स्वल्प संख्येतील काही जण हे वर्गणीचे मोदक पोटभर खातात. पण त्यामुळे त्यांची प्रकृती जी काही सुधारते म्हणता, पोट असे तरारून येते...पुढल्या वर्षी त्यांचा देह साक्षात गणेशमूर्तीशीच स्पर्धा करायला लागतो. अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असे हे खाद्य असल्याचे खाणारे सांगतात.

ही झाली काही वानगीदाखल मांडलेल्या पदार्थांची नावे. खरं तर गणेशोत्सवासारखा उत्सव अशा विविध पदार्थां आणि रंगाढंगांनी भरला आहे. त्याची लज्जत काही औरच आहे. ते सर्व इथे देणे शक्य नाही. तरी ‘फुल ना फुलाची पाकळी’ म्हणून हेच गोड घ्यावे. इत्यलम!

Friday, September 14, 2007

युरेका...युरेका! असू दे इंडिया!

युरेका...युरेका! फॉर्म्युला सापडला...! यशाचा हमखास फॉर्म्युला मिळाला आहे. आता या देशात कुठल्याही क्षेत्रात हमखास काही कामगिरी करणे बिल्कुल अशक्‍य नाही. भरघोस काही करायचं असलं, की फक्त एकच करायचं...चित्रपट काढायचा! सत्यघटनेवर असला तर दुधात साखर. मात्र नसला तरी बिघडत नाही. एक स्टार घ्यायचा, बाकी "चांदण्या' घ्यायच्या...तो रिलीज करायचा आणि घ्या...आपल्या पदरात प्रत्यक्ष घबाड पडणारच!

आशिया चषक हॉकी स्पर्धेत कोरियाला हरवून भारताने विजय मिळविला. त्यामागे संघाला खरी प्रेरणा प्रशिक्षक किंवा खेळाडूची होती का? तुमची जीभ रेटते कशी हो म्हणायला...प्रशिक्षक काय यापूर्वी घसा खरवडून शिकवत नव्हते? खेळाडू त्यांच्या हॉकीचे पाणी मैदानावर दाखवत नव्हते? होते...मात्र "चक दे इंडिया' आला आणि या खेळाडूंनी हम भी कुछ कम नहीं, हे प्रत्यक्ष दाखवून देण्याची संधी साधली. त्यामुळे आता भारत मार खात असलेल्या अन्य क्षेत्रांत (अन्‌ त्यांची जंत्री केवढी मोठी आहे!) हेच सूत्र वापरून देशाला प्रगतिपथावर नेणे शक्‍य नाही का?

आता हेच बघा ना! अणु कराराच्या मुद्द्यावरून सरकार आणि डाव्यांची केवढी रस्सीखेच चालू आहे? तडजोडी, वाटाघाटी आणि चर्चा करता-करता अनेक युवा कम्युनिस्ट नेते अकाली प्रौढ आणि अकाली वृद्ध होताहेत. त्यांच्यासाठी एखादा चित्रपट काढता येईल. एक नेता परदेशात करार करायला जातो. त्याच्यावर देशात प्रचंड टीका होते. मात्र तो नेता स्तब्ध असतो. (गंभीर किंवा खंबीर नव्हे!) काही दिवसांनी भारतावर शत्रू आक्रमण करत येतो. त्यावेळी आपला नेता शत्रूला कराराचे बाड फेकून मारतो. शत्रू पळून जातो...अन्‌ भारतात करारासाठी देशभक्तीची लाट उसळते...पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतंय..."साईन कर इंडिया!' असा एखादा सिनेमा काढायला हवा. त्यामुळे गेले काही दिवस कुंद झालेले राजकीय वातावरण झटक्‍यात मोकळे होईल नाही...?

जे राजकारणात तेच साहित्याच्या बाबतीतही. एक प्रसिद्ध लेखक गेले काही दिवस पडेल कादंबऱ्या लिहित असल्यामुळे टीकेचा धनी झालाय. त्याला प्रकाशकांनीही आता वाळीत टाकलंय. तितक्‍यात या लेखकाला भेटण्यासाठी काही तरुण मुली येतात. त्या लेखकाला नवीन काही तरी लिहिण्याची गळ घालतात. लेखक महाशयही त्या प्रेमळ विनंतीला मान देतात आणि एक नवीन महाकादंबरी लिहितात. पुढे त्याच कादंबरीला नोबेल पारितोषिक मिळते. चित्रपट संपताना पार्श्‍वभूमीवर गाणं वाजतं..."लिहू दे इंडिया..लिहू दे!'

अशा रीतीने विविध क्षेत्रांमध्ये नवीन काही घडामोड घडवून आणण्यासाठी आता हे हुकमी हत्यार हातात आले आहे. त्यासाठी आपण "चक दे इंडिया' आणि त्यांच्या "टीम'लाच धन्यवाद द्यायला नको का?