Thursday, February 18, 2010

फोलपटरावांचा लोकलप्रवास

डीडीच्या दुनियेत फोलपटराव त्या दिवशी अंमळ खुशीतच होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घराबाहेर पाय ठेवला तेव्हाच त्यांना माहित होतं, की सरकारने आपले खरे कर्तव्य गांभीर्याने मनावर घेतले आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यारस्त्यावर चोख बंदोबस्त असून, एक नागरिक या नात्याने आज आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. सकाळी घरातून जसे निघालो तसेच वन पीस घरी परतणार आहोत. कुठे बाँबस्फोट होणार नाही का कुठे दंगल होणार नाही. रस्त्यावर फारसे पोलिस नसतीलच आणि जे असतील त्यांची जरब गुन्हेगारांवर असणार आहे. आपल्या पाकिटातील ऐवज कोणी चोरू नये म्हणून वाटा घेण्यासाठीच पोलिस उभे आहेत, असे लोकांनाही वाटणार नाही.

अशा रितीने गगनात मावत नसलेल्या आनंदाचा हवाई प्रवास थांबवून फोलपटरावांनी रेल्वे स्टेशनवर पाय ठेवला. त्यावेळी स्टेशनवर अगदी सगळं कसं शिस्तीत चाललं होतं. ऑटोरिक्षा वाट चुकल्यासारख्या रस्त्यात थांबल्या नव्हत्या, का मुसंडी मारणाऱ्या डुकरासारख्या टॅक्सी आवारात ठाण मांडून बसल्या नव्हत्या. आपले सांस्कृतिक संचित मांडून बसलेले भिकारी नव्हते, का उंदरावर झेप घेण्यासाठी सज्ज असलेल्या मांजरांसारखे ट्रॅव्हल एजंट उभे नव्हते. मुख्य म्हणजे फोलपटराव स्टेशनमध्ये शिरत असताना वाट कशी सगळी मोकळी होती. तिकीट काउंटरवर गटार तुंबल्यासारखी लोकांची रांग नव्हती का नाल्यात अडकलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्यांसारखी कोणाची धक्काबुक्कीही नव्हती.

त्याच वेळेस फोलपटरावांना आपण घरातून फारसे पैसे न घेताच हवाई प्रवास केल्याचं लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब एका टॅक्सीवाल्याला हात करून एटीएमचा रस्ता धरला. जवळचं भाडं असूनही टॅक्सीवाल्याने किंचितही कुरकुर न करता फोलपटरावांना अदबीने 'चला, साहेब' असं म्हटलं. माता-भगिनींचा उद्धार न करता टॅक्सीवाल्यानं त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधल्याने फोलपटरावांना अगदी गदगदून आलं. त्यांना जवळपास हुंदकाच आला होता, पण त्यांनी तो खूप प्रयासाने आवरला. इतके दिवस मराठीत बोलण्याची उबळ त्यांनी जशी आवरली होती, तसाच त्यांनी हा हुंदकाही आवरला. एटीएममध्येही रांग नसल्याने त्यांनी लगेच पैसे काढले.

परत येऊन बघितले, तर तेव्हाही तिकीटबारीवर सामसूम होती. आज रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप आहे का, अशी शंकाही त्यांच्या मनाला चाटून गेली. मात्र आज आम आदमींचे राजे फोलपटरावच येणार म्हटल्यावर संपावर गेलेले कर्मचारीही खास कामावर रूजू झाले असते, हे त्यांना माहितच होतं. त्यामुळे त्यांनी काउंटरवर जाऊन शंभराची नोट सरकवली. पलिक़डच्या मराठी माणसाने (होय, तो मराठी होता आणि चक्क सुहास्य वदनाने उभा होता.) फोलपटरावांची नोट घेऊन त्यांना मुकाट्याने चिल्लर परत केले. त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत आयमायचा न काढता असे वर्तन करण्याचे कारण फोलपटरावांना माहित होते, ते म्हणजे त्यांच्यावर आयचा वरदहस्त होता.

कोणत्याही प्रकारची वाट न पाहता फोलपटरावांना सहज गाडी मिळाली. आता त्यांना कुठेही ऑफिसमध्ये जायचे नव्हते, दिसल त्या गाडीत त्यांना बसायचे होते त्यामुळे गाडीसाठी खोळंबा होण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. वारूळात येरझारा घालणाऱ्या मुंग्यासारखे लोकं गाडीच्या डब्याला चिकटले नव्हते. त्यामुळे अगदी सावकाश आणि तब्येतीने फोलपटरावांनी डब्यात प्रवेश केला. कोणताही सव्यापसव्य त्यांना करावा लागला नाही का झटापटींमुळे त्यांना इजा झाली नाही. डब्यात असलेल्या इनमीन दहा पंधरा लोकांनी अगदी दोन्ही हात पसारून फोलपटारावांचे स्वागत केले. त्यातलं कोणीही गुजराती किंवा हिंदी बोलत नव्हतं. सगळे अगदी शुद्ध मराठी बोलत होते. त्यातल्या एकाने लगेच सरकून फोलपटरावांना खिडकीशी जागा करून दिली. पुढल्या दोन ते तीन मिनिटांत लोकलच्या खडखडाटासोबतच फोलपटराव आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. त्यातल्या काहिंनी तर फोलपटरावांना, “तुमच्यासारखे सामान्य लोक प्रवास करतात त्यामुळे या लोकलची शान आहे,” असंही सांगितलं. त्यामुळे फोलपटरावांना उगीचच अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे झाले.

साधारण अर्धा तास प्रवास केल्यानंतर फोलपटरावांना त्या सुखावह प्रवासाचा कंटाळा आला. त्यांचा 'एक उनाड दिवस' पुरा झाला होता. एक चांगल्यापैकी स्टेशन बघून त्यांनी सहप्रवाशांचा निरोप घेतला आणि ते डब्यातून खाली उतरले. तिथे मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्याला सामोरे जायचे होते. तिथे काही मंडळी कसलेतरी झेंडे घेऊन उभी होती. तो सगळा जमाव फोलपटरावांच्या दिशेने धावत आला आणि त्यांच्या गळ्यात एक जाडजूड हार घातला. सामान्य मध्यमवर्गीय असल्याने फोलपटरावांना हा सगळा प्रकार नवा होता.

भांबावलेल्या स्वरातच त्यांनी विचारले, “हे काय आहे?”

जमलेल्या मंडळींनी एका स्वरात उत्तर दिले, “आणखी एक दिवस कोणताही अपघात किंवा घातपात न होता लोकलचा सुरक्षित प्रवास केल्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करत आहोत.”

Friday, February 12, 2010

अघोरपंथीयांची मात्रा

sadhu12 फेब्रुवारी 2009. सायंकाळी सहा वाजण्याच्या वेळेस हरिद्वारला हिंदु धर्मियांचा सर्वोच्च धार्मिक सोहळा कुंभमेळा एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोचला होता. नागा साधुंच्या मानाच्या स्नानानंतर गंगेची आरती सुरु झाली होती. इकडे मुंबईत हिंदुंत्वाचे निशाण खांद्यावर घेतलेली आणि या हिंदुत्वाला देशभक्तीशी जोडणारी शिवसेना चारी मुंड्य़ा चीत झाली होती. एका किरकोळ अभिनेत्याच्या तद्दन चित्रपटासाठी स्वतःची प्रतिष्ठा पणास लावून, द्युतात हरलेल्या पांडवांसारखे शल्य उराशी बाळगण्याची वेळ या पक्षावर आली. दीड वर्षांपूर्वी फुसके स्फोट करून हिंदुंची प्रतिष्ठा घालवू नका, असे सांगणाऱ्या शिवसेनाप्रमुखांना आता चवली-पावली सारखे चॅनेलवाले हिणवत आहेत.

खरं सांगायचं, तर एक शेंडा-बुडखा नसणारे आंदोलन तब्बल एक आठवड्याहून अधिक काळ चालविल्याबद्दल शिवसेनेचे अभिनंदन करावे तेवढे थोडे आहे. सरकार (त्याची कार्यक्षमता संशयास्पद असली तरी धर्मनिरपेक्षतेसारख्या काल्पनिक गोष्टींसाठी ते अगदी इरेला पेटते), पैशास पासरी झालेल्या वृत्तवाहिन्या (यावर बडबड, दृश्य आणि मतांची गटारगंगा धो-धो सारखी वाहत असते म्हणून वाहिन्या) आणि सहकारी राजकीय पक्षही विरोधात असताना सेनेने तिच्य़ा वकुबापेक्षाही जास्त किल्ला लढविला, हे इथे मानलेच पाहिजे. जुने बाळासाहेब अद्याप सक्रिय असते तर काय बिशाद होती सरकार आणि बॉलिवूडची आपलं म्हणणं खरं करण्याची. बाळासाहेबांसाठी खेळपट्ट्या उखडणारे शिशिर शिंदे आणि बाळा नांदगावकरसारखी मंडळी आता मनसेत आहेत. त्यामुळे सेनेच्या योजना मनसुबे या पातळीवरच थांबतात.

अशोक चव्हाण यांचे सरकार खरोखऱच उच्चीचे ग्रह घेऊन आले असावे. कारण आपण आंदोलन करणार नाही, हे सांगून राज ठाकरे यांनी त्यांना आधी बाय दिला. त्यानंतर विचारायला हवे असे प्रश्न सेनेलाही विचारावेसे वाटले नाहीत. उदा. मुंबई आणि नांदेडमध्ये शाहरूखच्या चित्रपटाला मागितले नसताना संरक्षण देणारे सरकार ‘झेंडा’च्या वेळेस काय झोपले होते काय? त्यावेळेस मूग गिळून गप्प बसलेले राणे सरकार यावेळेस मात्र सेनेवर बंदी घालण्याची मागणी कशी काय करू शकतात? आता कोणीतरी म्हणत होतं, शिवसेनेने सीमेवर जाऊन लढावे, तिथे त्यांची जास्त गरज आहे. जणू काही हा एक चित्रपट पाहिल्याने देशातील समस्त हुतात्म्यांना मुक्ती मिळणार होती.

शिवसेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या लाठ्या खात होते, तेव्हा काही मंडळी म्हणत होती, की सेनेच्या गुंडगिरीमुळे महाराष्ट्राची अब्रू जात आहे. मला तसं वाटत नाही. महाराष्ट्राची मान खालण्याचे पुण्य एकट्या त्या पक्षाचे नाही. आपल्या मुलासारख्या नेत्याचे जोडे उचलणारे मंत्री, शेतकरी आत्महत्या करत असताना आयपीएलसाठी जीव खालीवर करणारे  नेते, नित्य भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर येत असतानाही लोकांना उपदेश करत फिरणारे अधिकारी आणि सरतेशेवटी मूक साक्षीदार बनण्याचे जागतिक विक्रम मोडीत काढणारी जनता यांचा -त्यात सिंहाचा वाटा आहे. शिवसेना ही फार-फार तर या ‘मानमोड्यांची' ब्रँड अँबॅसिडर म्हणता येईल.

जे अत्याचार करतात त्यांना संपविल्यास पाप लागत नाही आणि जे अत्याचार किंवा यातना सोडवितात त्यांना संपविल्यास मुक्ती दिल्याचे पुण्य लागते, अशी अघोरपंथी साधुंची शिकवण असते. सरळमार्गी साधुंची (इथे द्विरुक्ती झाली) शिकवण हिंदु धर्मियांना पचलेली नाही, हे तर सध्याच्या समस्येवरून दिसतच आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाला  आता कदाचित अघोरपंथीयांचीच मात्रा लागू पडेल.

Thursday, February 11, 2010

प्राण गेला तरी बेहत्तर, पिक्चर पहावाच लागेल

महाराष्ट्र हे एक प्रगतीशील राज्य आहे. किमान तसं म्हणण्याची प्रथा आहे. या पुरोगामी राज्यात आमच्या सरकारने सगळ्या तरुणांना काम दिले आहे. राज्यातील सगळ्या गरीबांना पोटापुरते अन्न दिले आहे. राज्यातीलच कशाला, उत्तर प्रदेश, बिहार आणि अगदी बांगलादेशातून आलेल्या गरीबांच्या पोटाची खळगी भरण्याची सोयही आमच्या धडाडीच्या सरकारने केली आहे.  त्यामुळे अन्न, पाणी आणि निवारा यांची ददात मिटलेल्या या राज्यात आता प्रश्न केवळ मनोरंजनाचा उरलेला आहे. त्यासाठी लोकांना हवे ते, नको ते असे सगळेच चित्रपट पहायला मिळावेत, यासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत.

हे पहा, मनोरंजन पुरवावे म्हणजे थिएटर आणि मल्टिप्लेक्स यांत लागणारे चित्रपट असंच आम्हाला अभिप्रेत आहेत. आमच्या विधानांमुळे आणि कृत्यांमुळे कोणाची करमणूक होणार असेल, तर तो त्यांचा प्रश्न आहे.  अगदी कालपरवा मला एक अभिनेता सांगत होता, की मला अभिनय शिकत असताना तुमच्या व्हिडिओ क्लिप्सची खूप मदत झाली. मात्र तो वेगळा प्रश्न आहे. लोकांनी मल्टिप्लेक्समध्ये जावे, चित्रपट पहावे यासाठी आमचा सगळा खटाटोप आहे. काय आहे, आम्ही आमच्या निर्णयांवर मनोरंज कर कसा लावणार? अलिकडे या वृत्तवाहिन्या वाढल्यामुळे सदोदीत आमचं दर्शन घडतं. त्यामुळे आधीच लोकांना थिएटरमध्ये जाण्याची इच्छाच उरलेली नाही. तशात या लोकांनी आंदोलने केली, तर चित्रपटनिर्मात्यांचं किती नुकसान होणार?

नाही, नाही. हा कोणा एका अभिनेत्याला वाचविण्याचा किंवा कोणाची पाठराखण करण्याचा प्रश्न नाही. मुळातच बॉलिवूडला संरक्षण देण्याचे आमचे धोरण आहे. त्याची कारणं तुम्हाला माहितही असतील. एक तर, अलिकडे आमच्या पक्षात किंवा दुसऱ्याही पक्षात, येणारी मंडळी बॉलिवूडमार्गेच येतात. तोच जर पुरवठा बंद केला तर आमचं कसं होणार? दुसरं म्हणजे, गेल्या वेळेस आमच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला हीच मंडळी आली होती ना. लोकांची गर्दी जमविण्यासाठी आमचे चेहरे चालत नाहीत, बॉलिवूडवालेच लागतात, त्याला आम्ही काय करणार? मग त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी आम्हाला सज्ज राहावंच लागेल ना.

हो, आम्ही कंबर कसून सज्ज आहोत. राज्यातील बाकी सगळे विषय बाजूला ठेवून आम्ही सगळी यंत्रणा या चित्रपटासाठी पणाला लावण्यास तयार आहोत. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनात आमच्याच मंत्र्यांनी खोडा घातला तेव्हा आम्ही म्हणालो होतो, की कोणी तक्रार केली तर आम्ही संरक्षण पुरवू. मात्र हिंदी चित्रपटांच्या बाबतीत मात्र न मागताही आम्ही सगळी सुरक्षा पुरविली आहे. तुम्हाला एक कळत नाही का, की यानिमित्ताने का होईना सरकारच्या कार्यक्षमतेबाबत लोकांना विश्वास वाटतो हे आम्हालाही कळतंय.  आमच्या सरकारसाठी हा आश्चर्याचा धक्काच आहे. सरकार काही कृती करील म्हणून कोणी आमच्याकडे पाहतं, ही मोठीच घटना नाही का.

तातडीने निर्णय? तातडीने निर्णय घ्यावा, अशी काही प्रकरणेच असतात. शेतकऱ्यांचा प्रश्न असो, महागाईचा प्रश्न असो, प्रधान अहवालाचा मुद्दा असो आम्हाला काही कागदपत्रे पहावी लागतात. त्यासाठी मंत्रिमंडळा चर्चा करायची असते. पुन्हा ती चर्चा काय झाली आणि काय झाली नाही, याच्यावर आठवडाभर भवति-न भवति करावी लागते. असं पुन्हा होऊ नये म्हणून काथ्याकूट करावा लागतो. चित्रपटाच्या बाबतीत असं काहीच करावं लागत नाही. आम्हाला वाटलं आणि आम्ही निर्णय घेतला. संपला प्रश्न.

पहा, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही दिली आहेत. त्यामुळे आता एकच सांगतो, प्राण गेला तरी बेहत्तर पण पिक्चर पाहावाच लागेल.

Tuesday, February 2, 2010

भागवतधर्म

संघचालक मोहन भागवत

 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची धुरा हाती घेतल्यानंतर मोहन भागवत यांनी भारतीय जनता पक्षाच्या साफसफाईची मोहीम हाती घेतली. लोकसभेतील भाजपच्या पराभवानंतर त्यांनी आस्तेकदम त्या पक्षाच्या नेतृत्वातही बदल केला. मात्र मूळच्या महाराष्ट्रीय असलेल्या भागवत यांच्याकडून भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेलाही उभारी देण्याचे काम होईल, अशी कोणाला अपेक्षा नव्हती. केवळ एका विधानाच्या माध्यमातून शिवसेनेला महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यभागी आणण्याचे काम डॉ. भागवतांनी अगदी कौशल्याने केले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या झंझावातामुळे आणि विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे शिवसेना काहीशी क्षीण होत होती. अशावेळेस अगदी संजीवनी मिळावी, तशी भागवतांनी उत्तर भारतीयांचे रक्षण करण्याची घोषणा केली. उत्तर भारतीयांच्या विरोधात मनसेचे आंदोलन 2008 सालापासून चालू आहे. शिवसेनेनेही मध्यंतरी आंदोलन केले. याकाळात संघाने फारसा आवाज केला नाही. त्यामुळे नेमके आताच ही घोषणा करण्यामागचे गौडबंगाल काय असावे? त्यातही शाहरूख खानच्या विरोधात शिवसेनेने चालविलेली मोहीम संघाच्या धोरणांशी अनुकूलच होती. त्यामुळे संघाला उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ पुढे येण्याचे सकृद्दर्शनी तरी काहीही कारण नव्हते.

सकृद्दर्शनी म्हणायचे कारण, खुद्द महाराष्ट्र सरकारने मराठीच्या हिताच्या नावाखाली घेतलेले अनेक निर्णय मनसेच्या पथ्यावर पडणारे होते. त्यातून मनसेला महत्त्व देऊन शिवसेनेला खच्ची करण्याचा डाव सरकारचा होता. हा प्रकार असाच चालू राहिला तर शिवसेना आणि पर्यायाने भाजपच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभे राहिले असते, ही गोम युतीच्या धुरिणांना आली असणारच. त्यासाठी डॉ. भागवतांनी मराठी विरूद्ध उ. भारतीय वादाचे पिल्लू सोडून शिवसेनेकडे पास दिला.  त्यांच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया शिवसेनेकडून आली, याचा अर्थ तो पास योग्यप्रकारे घेतला गेला.

भागवत यांची खेळी यशस्वी झाली याची पावती काल राज ठाकरे यांच्या विधानावरून आली. जन्माने महाराष्ट्रीय तोच मराठी असं विधान करून राज ठाकरे यांनी मनसेला पुन्हा झोतात आणण्याचा प्रयत्न केला. राजकारणात वरचढ ठरण्याच्या प्रयत्नात केलेली त्यांची ही घोषणा फाऊल करण्याच्या दिशेने पुढे पडलेले पाऊल आहे. त्याचा फायदा शिवसेनेलाच होणार. त्यातून सेनेचा ‘संघ’र्ष कमी होऊ शकतो.

Wednesday, January 27, 2010

भारतीय भूमीवरील ब्रिटिश गोपालक

एडमंड पायपरएडमंड पायपर यांना भेटण्यापूर्वी केवळ एक ब्रिटीश व्यक्ती मंचरला गाईंचा गोठा सांभाळण्या साठी आला आहे, हीच आमची कल्पना होती. पायपर यांच्याशी तासभर गप्पा मारून निघाल्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यावसायिकता यांच्याबद्दलच्या अनेक नव्या कल्पनांनी आमची झोळी भरून गेली होती. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली होती. भारतीय शेतकऱ्यांचे दुखणे कुठे आहे, याची अंधुकशी कल्पना आली होती. तसेच भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे, मला काहीही माहित नसताना वाटायचे सगळे माहित आहे आणि जसजसे कळत गेले तसतसे जाणवत गेले, की मला काहीही माहित नाही.

गोवर्धन फार्मगेल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, दररोज चाळीस टन चीज बनण्यासाठी 'गोवर्धन'ला लागणारे दूध पुरविले जाते ते मंचरजवळच असलेल्या एका फार्मवर सांभाळलेल्या गाईंपासून. 'लोकमत'मध्ये पायपरबद्दल आलेली एक त्रोटक बातमी वाचून आम्ही तिथे गेलो होतो. आमच्यादृ्ष्टीने ही एक रंजक घटना होती. त्यात रंजक काही नसून व्यावसायिकता आणि वैज्ञानिक माहितीचे ते एक उपयोजन होते, हे कळाले पायपर यांच्याचकडून.

शेतीविज्ञानात पदवी घेतल्यानंतर पायपरनी मायदेशी इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कामे केली. लहानपणापासून शेतावर राबल्यामुळे शेतातच काम करण्याची आवड होती. इंग्लंडमधील यंत्रणेमुळे आणि लाल फितीच्या कारभारामुळे पायपरला कंटाळा आला आणि स्वारी निघाली पोलंडला. तिथून हंगेरी, सौदी अरेबिया बहारिन आणि जॉर्डन अशी यात्रा करून पायपरची  स्वारी भारतात आली. शहा यांनी 'गोवर्धन’च्या उत्पादनांसाठी ऑऱ्गॅनिक फार्मिंगचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी डेअरी व्यवसायातील आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करण्यासाठी त्या प्रकारचे ज्ञान असणारी व्यक्ती हवी होती. त्यातून आधी मायकेल नावाच्या एकाची आणि दीड वर्षांपूर्वी पायपर यांची निवड करण्यात आली.

“मला केवळ काम म्हणून करायचे असते, प्राण्यांवर माझं प्रेम नसतं तर इथं एक क्षणभरही थांबलो नसतो,” पायपर म्हणाले. कारण सुमारे तासभर जनावरांच्या पालनाबाबत मांडलेली भूमिका आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे असे काही गणित मांडले होते, की गाय म्हणजे त्यांना केवळ कच्चा माल वाटतो की काय अशी शंका मला आली होती. 2300 गाई आणि सुमारे शंभरेक कालवडी सांभाळणाऱ्या पायपरना विचारलं, की कालवडींना पिंजऱ्यात का ठेवलं आहे तर ते म्हणाले, कारण त्या उद्याच्या गाई आहेत. त्यांना काहीही इजा होऊ द्यायची नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे. ते अशा थराला, की कालवडींना देण्यात येण्याऱ्या खाद्यावर माशा बसू नयेत, म्हणून ते झाकून ठेवण्यात येतं. त्यामुळे त्या प्राण्यांवर त्यांचे प्रेम आहे का नाही हा प्रश्न मला सतावत होता.

भाग्यलक्ष्मी फार्म, मंचर सुमारे तेवीसशे गाईंना तसेच कालवडींना स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या अंगावर एक चिप बसविण्यात आली आहे त्यातून त्या गाईवर संगणकाद्वारे लक्ष ठेवण्यात येते. या गाईने किती खाद्य घेतले, तिच्य़ापासून किती दूध मिळाले, तिला कोणता आजार आहे का, तिच्यात आजाराचे काही लक्षणं आहेत का, हे सगळं त्या एका चिपच्या साहाय्याने पाहण्यात येतं. एवढंच नाही तर एखाद्या गायीने दिलेल्या दुधाचे तापमान जास्त असलं तर काहीतरी गडबड आहे, हेही त्या संगणकाच्या साहाय्याने कळतं. पन्नास गाईंचा एक गट अशा रितीने रोलर पार्लर नावाच्या यंत्रावर चढवून पाच मिनिटांत दूध काढण्यात येतं. या सगळ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पायपर साहेबांवर आहे.

ते हे काम काटेकोरपणे करत आहेत, याची चुणूक आमची गाडी भाग्यलक्ष्मी फार्ममध्ये प्रवेश करतानाच मिळाली. फाटकाजवळच जीपवर जंतुनाशकाचा फवारा करण्यात आला. त्यानंतर कालवडींच्या गोठ्यात जातानासुद्धा जंतुनाशक मिसळलेल्या पाण्यात पाय बुडवूनच आत प्रवेश करावा लागला. गायींचे दूध यंत्राद्वारे तीन वेळेस काढण्यात येते. ते पाहण्यासाठी खास प्रेक्षागृह केलेले आहे. तिथेच पायपर आणि आमचा संवाद झाला. आधी काहीसा आखडू वाटणारा हा माणूस नंतर एवढा खुलला, त्याला आवरताना आमच्या नाकी नऊ आले होते.

“भारतात सर्वाधिक गायी आहेत, पशुधन आहे. मात्र जगात प्रति गाय दुधाचे उत्पादन सर्वात कमी आहे. याचं कारण इथल्या लोकांना दिलेली चुकीची माहिती आणि काळानुसार न बदलणे,” हे त्यांचं निदान होतं. एकावेळी पाच पाच हजार गाईंचे गोठे सांभाळण्याऱ्या माणसानं ते सांगितलं म्हणजे खरंच असणार.

“ब्रिटनध्ये माणसांना पगार खूप द्यावा लागतो. त्यामुळे तिथे एवढा फार्म चालविण्यासाठी दोन किंवा तीन माणसे पुरतात. तुमच्या इथे माणसं मुबलक मिळतात. शिवाय त्यांना अनेक कामं करायला आवडत नाहीत. एक माणूस एकच काम करू पाहतो. गाई ढकलायला एक माणूस आणि मशीन चालू करायला दुसरा माणूस कशाला पाहिजेत? गाईंना एवढे आजार होतात त्यांच्यासाठी आम्हाला लसीसुद्धा मिळत नाहीत. फक्त तीन लसी घेण्यासाठी सरकारी परवानगी देत. इथं एवढ्या माशा आहेत, किडे आहेत त्यामुळे गाईंना खूप सांभाळावं लागतं. आता आम्ही इतक्या कडेकोट वातावरणात गाईंना ठेवलंय आणि त्यासाठी गुंतवणूक केलीय. पण सगळेच ते करू शकतील असं नाही,” त्यांचं सांगणं चालू होतं.

तिथे काम करणाऱ्या माणसांनी सांगितलं, की पायपर यांना जुजबी मराठी येतं. त्याच्या साहाय्याने त्यांनी हाताखालच्या माणसाला अगदी तयार केलंय. एका सहाय्यकाकडे बोट दाखवून ते विचारू लागले, “हाच माणूस जर जनावरांच्या खुराकाकडे लक्ष देऊ शकला, त्यांच्या बारीक सारीक बदलांकडे लक्ष ठेवू लागला, वेळेवर सगळी निरीक्षणे घेऊ शकला तर डॉक्टरची गरजच पडणार नाही. डॉक्टरचे काम फक्त आजारी प्राण्यावर उपचार करण्यापुरतेच राहतील. प्राण्यावर लक्ष ठेवण्याचं, रोगाचं निदान करण्याचं काम हाच माणूस करेल ना.” हे धोरण काहीसं सफल झालं असावंही कारण फार्मवर ठेवलेल्या कालवडींपैकी फक्त एक टक्का कालवडींचा मृत्यू झाला. शिवाय भारतात कालवडींचा वाढीचे सरासरी प्रमाण दररोज तीनशे ग्राम असताना या कालवडींचा वाढीचे प्रमाण दररोज नऊशे ग्राम आहे.

हा माणूस इतक्या दूर का आला असवा? हाच प्रश्न विचारला असता पायपरचे उत्तर होते,  “मला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घ्यायला आवडते. दर दिवशी नवीन काहीतरी जाणून घ्यायला आवडते. शेवटी थेअरी सगळीकडे सारखीच असते. प्रात्यक्षक वेगवेगळे असतात. मी याच्यापेक्षाही उष्ण देशांमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे मला इथं फारसं वेगळेपण जाणवत नाही.”

फार्मजवळच्याच एका बंगल्यात पायपर राहतात. त्यांना कोणीतरी विचारलं,  “तुम्हाला इथं चर्च नाही मग कसं करता?” त्यावर त्यांचं उत्तर होतं, “माझा देव चार भिंतीच्या आत नाही. तो सगळीकडे आहे. त्यामुळे मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाही. ”

Monday, January 25, 2010

दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि

तयार झालेले चीज बाहेर पडताना “हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर पडतात,” मिश्रा साहेब आम्हाला सांगत होते आणि आम्ही ‘वा वा’, ‘ओ हो’ करून वेळ मारून नेत होतो. त्या असंख्य नळ्या, नळ आणि टाक्या पाहून झाल्यानंतर लक्षात काय राहिलं असेल, तर सर्वात आधी दूध असतं आणि सर्वात शेवटी त्याचं चीज होतं.  हे एक सत्य शिकणं, यातच आमच्या बुद्धीचे चीज झाल्यासारखं आहे.

गोवर्धन या ब्रॅण्डने दुग्ध उत्पादन करणाऱ्या पराग मिल्क यांचा चीज उत्पादनाचा प्रकल्प मंचरजवळ आहे. आशियातील चीजचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. कंपनीचे मालक देवंद्र शहा यांच्या आदेशावरून मिश्रा साहेब आम्हाला अख्खा प्रकल्प फिरवून दाखवत होते. त्यात दूध कुठं जमा होतं, कोणत्या टाक्यात जातं, किती डिग्रीवर उकळतं, हे सगळं कसं स्वयंचलीत आहे, कुठंही माणसाचा हात लागत नाही हे ते यथासांग सांगत होते. मात्र आमच्या टाळक्यात त्यातलं काही जाईल तर शप्पथ. बरं, हे त्यांना सांगता येईऩा. पत्रकार म्हणवून घेतात स्वतःला आणि इतकंही काही समजत नाही, असं त्यांना वाटण्याची शक्यता. मग त्यातल्या प्रत्येक गोष्टीला ‘मम’ म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच काय होता?

यंत्रांच्या जंजाळातील चीजचे उत्पादन एक तर त्या सगळ्या आसमंतात दुधाचा वास पसरला होता.  मला त्या वासाने काहीसं अस्वस्थ व्हायला होत होतं. त्यात ते अगडबंब नळकांडे पाहिल्यावर काहीसं खट्टू व्हायला होतं. त्यात दुधाच्या पदार्थांबद्दल आमची पाटी अगदी दुधासारखीच पांढरी शुभ्र. त्यामुळं स्लाईसचं चीज आणि पिझ्झाचं चीज याच्यात काय फरक असतो हे आम्हाला कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्या अधिकाऱ्यांनी बिचाऱ्यांनी आपली कामं सोडून आमची ट्यूशन घ्यावी, अशी अपेक्षा तरी कशी करणार. त्यामुळे मुकाट्यानं ते जे सांगत होते ते ऐकून घेण्यापलिकडे आम्हाला काम नव्हते.

त्या तासाभराच्या धड्यानंतर लक्षात राहिलं एवढंच, की या कारखान्यात दिवसाला चाळीस टन चीजची निर्मिती होते आमि त्यासाठी चार लाख लिटर दूध दररोज लागतं. हे दूध साठवण्यासाठी तीन टाक्या बाहेर उभ्या केलेल्या आहेत. टॅंकरमधून सरळ या टाक्यांत दूध जातं आणि तिथून ते गरम होण्यासाठी जाते.  साधारण 30 अंश सेल्सिअस तापमानाला आल्यानंतर एका ठिकाणी 26 मिनिटांत त्याचं दही करण्यात येते. (विरजणासाठी वापरलेले पावडर डेन्मार्कहून आयात करण्यात येतं-मिश्रा) पुढच्या एका टाकीत या दह्यातील पाणी आणि मुख्य पदार्थ वेगवेगळे केले जातात. अगदी रवाळ स्वरूपात असलेल्या या मुख्य पदार्थाचेच नंतर चीज तयार केले जाते.  त्यातील एक चीज मोठ्या ठोकळ्यांच्या स्वरूपात कापले जाते आणि दुसरे पुढे पाठवून पिझ्झासाठीचे (बहुतेक मोझ्झेरेला) चीज तयार केले जाते.

Cheese storage शीतगृहात साठवलेले चीजगोवर्धनच्या ब्रॅण्डखाली अनेक उत्पादन तयार केले जातात. मात्र त्यातील मुख्य आहे चीजचे. महिन्याला 480 टन चीजच्या उत्पादनापैकी साधारण 320 टन कोरियाला निर्यात करण्यात येते.  आम्ही गेलो तेव्हा प्रकल्पाचे काही बांधकाम चालू होते. मात्र मिश्रा आणि त्यांचे सहकारी अगदी भरभरून आम्हाला कारखाना दाखवत होते. उत्पादनच नाही तर स्टोरेजसुद्धा. “आपको सिमला-काश्मीर देखना है,” असं विचारत त्यांनी कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडला. एक सेकंदात उणे तापमानाची शिरशिरी पायांपासून सुरू होऊन अंगभर पसरली. तिथे अगदी चीजचे भांडारच ठेवलेले. बाहेरच्या जगात दुध टंचाई आणि दुधाच्या दरवाढीवर चर्चा चालू होती आणि तिकडे आम्ही दुधाचे भांडार बघत होतो.  त्या दुधाच्या स्रोताबद्दलच आम्हाला उत्सुकता होती. त्याबद्दल पुढच्या पोस्टमध्ये…

Monday, January 18, 2010

शेतकरी, ज्योतिषी व जादुगार

देशाचे कृषीमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जगभरातील शेतकऱ्यांचे तारणहार शरद पवार यांनी शेवटी आज साखरेचे भाव उतरणार असल्याची बहुप्रतिक्षित घोषणा केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. जनतेचा कडवटपणा बाहेर येईल, अशी  कोणती घटीका जवळ नसतानाही पवार यांनी अत्यंत तडफेने भाव उतरविण्याची किमया केली. त्यांचे हे भावनिक रूप जनतेला पहिल्यांदाच दिसलं आहे. आठवडाभरापूर्वी आपले हात झटकणाऱ्या जाणता राजाने आपल्या हातात काय काय कला आहेत, याचे दर्शनच घडविले जणू.

पवार हे मूळचे शेतकरी. तरीही त्यांना ज्योतिषी म्हणून कोण प्रसिद्धी दिली आणि त्यांची बदनामी (असं म्हणायचं असतं) केली कळत नाही.  नाही म्हणायला त्यांच्यात तशी काही लक्षणे आहेत. कोणी काही विचारलं, की आकडे फेकायचे आणि बऱ्याच दिवसांत कोणी विचारेनासे झाले, की कोड्यात पाडणारे काही तरी बोलायचे ही त्यांची खासियत. ही तशी ज्योतिषाचीच स्टाईल. ते नाही का असं आठव्या घरात शनी, नवव्या घरात रवी वगैरे वाक्प्रयोग साभिनय करतात. तसेच पवार साहेबही ‘चाळीस लाख लोकांना अडीचशे टन साखर,’ ‘तीन महिन्यांत सात टन ज्वारी’ वगैरे शब्दमौक्तिके उधळत असतात.

बिचाऱ्या जाणत्या राजांना दिल्लीत चारही दिशांनी घेरून त्यांची दशा-दशा करण्याची एकही संधी सोडत नाहीत लोकं. (लोकं म्हणजे पत्रकार आणि तत्सम निरुद्योगी मंडळी.) जगात सगळीकडे साखरेचे भाव वाढत असताना फक्त भारतातच ते कमी कसे काय असणार, हे पवार साहेब गळा खरडवून सांगत असताना ते कोणीच ऐकायला तयार नव्हतं. ज्योतिषांचंही तसंच असतं. ‘आम्ही काहीही सांगितलं तरी विधिलिखित बदलता येत नाही,’ हे त्यांचंही डिसक्लेमर असतंच की. मग?

शरद पवारएका बेसावध क्षणी, पत्रकारांनी विचारलं पवारांना आणि त्यांनीही सांगून टाकलं, “मी काही ज्योतिषी नाही साखरेचे भाव कधी उतरणार ते सांगायला.” पवारांचा कधीही देवावर विश्वास नव्हता आणि दैवावरही. त्यांना ओळखण्याऱ्या सगळ्यांना हे माहित आहे. (आता पवारांना कोणी पूर्णपणे ओळखू शकते, यावरही बहुतेकांचा विश्वास नाही हा भाग अलाहिदा. ) तरीही त्यांना कधी नाही तो अडचणीच्या काळात ज्योतिषी आठवला. (कधी नाही म्हणायचं कारण, पवार साहेबांना अडचण काय असते तेच माहित नाही. ) महाराष्ट्रात स्वतःच्याच लोकांकरवी त्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमेनुसार, पवार साहेबांनी भल्याभल्यांच्या कुंडल्या मांडलेल्या आहेत तशाच बिघडविलेल्याही आहेत. त्यामुळे काही लोक त्यांनाच ज्योतिषी समजू लागले, तर त्यात लोकांचा काय दोष.

मात्र ज्योतिषांकडे नसलेली एक गोष्ट पवार साहेबांकडे आहे. ती म्हणजे धक्का देण्याची शक्यता.  हा त्यांचा हातखंडा प्रयोग. याबाबतीत एखादा जादुगारही त्यांचा हात धरू शकणार नाही. (कारण ते हाताने धक्का देतच नाहीत मुळी. फार फार तर असं म्हणता येईल, की घड्याळाने धक्का देतात. ) त्यातलाच एक प्रयोग आज त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत साहेबांनी साखरेचे भाव उतरवून दाखविले बघा. हे जर एका आठवड्याच्या आतच होणार होतं, तर साहेबांनी तेव्हाच सांगितलं असतं तरी चाललं नसतं का? मात्र तसं झालं असतं, तर धक्का कसा बसला असता. एखाद्या कसलेल्या जादुगाराप्रमाणे त्यांनी जनतेला गाफिल ठेवले आणि भाव उतरल्याची घोषणा करून आज सगळ्यांचे तोंड गोड केले पहा. (कसलेले जादुगारच ते. शेतकऱ्याचे सुपुत्र असल्याने कधीकाळी शेतात कसलेलेच आहेत ते, असं त्यांचं म्हणणं आहे.)

आता या जादुगाराच्या या चलाखीवर टाळ्यांचे आवाज मला आताच ऐकू येऊ लागले आहेत. मागच्या वेळेस डाळीचे भडकलेले भाव कमी करण्यासाठी त्यांनी कोरियाहून खास न शिजणारी डाळ आणण्याची हातचलाखी केली होती. त्या टाळ्यांचे प्रतिसाद तुम्हालाही ऐकू येत असतील, कदाचित!