Thursday, December 3, 2015

तीन शहाण्यांची वर्षपूर्ती

Fadnavis
गेल्या वर्षी ३१ ऑक्टोबरला शपथविधी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक वर्ष पूर्ण केले, ही खरोखरच एक उपलब्धी मानायला हवी. आधी बहुमताच्या अभावात आणि नंतर उधार घेतलेल्या बहुमताच्या ओझ्याखाली हे सरकार चालताना लोकांनी पाहिले.
महिन्याभरापूर्वी भाजपच्या मंडळींनी आपली वर्षपूर्ती साजरी करून वचनपूर्ती केल्याचेही सांगितले. परंतु शिवसेना या सरकारमध्ये एक महिना उशिराने सामील झाली आणि तोपर्यंत सरकारचे अस्तित्व कागदोपत्रीच होते. पहिला एक महिना बहुमताची तजवीज करण्यातच गेला होता अन् कामाला मुहूर्त मिळालाच नव्हता. त्यामुळे ती वर्षपूर्ती फक्त भाजपची होती, सरकारची नव्हे, असेच म्हणावे लागेल.
आधीच्या सरकारांनी जराजर्जर केलेली राज्याची यंत्रणा आणि तिजोरी, कायद्याच्या राज्यावरील लोकांची उडालेली श्रद्धा आणि वेगळेपणाचे लेबल लावल्यामुळे आलेली जास्तीची जबाबदारी - ही नव्या सरकार पुढची भली मोठी आव्हाने होती. थोडक्यात उत्तर पेशवाईच्या वर्णनाशी जुळणारी मागील सरकारची कारकीर्द आणि तीवर मात करण्यासाठी नव्या सरकारच्या बुद्दीचा लागलेला कस, असा हा सामना होता. परंतु ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईला साडे तीन शहाण्यांनी सावरून धरले होते, त्या प्रमाणे या सरकारच्या वर्षभरात केवळ तीन शहाण्यांनी कामातून आपले अस्तित्व दाखवले.
खुद्द मुख्यमंत्री फडणवीस हे पहिले आणि निर्विवाद शहाणे. सर्वात मोठ्या खुर्चीवर बसल्यानंतर आलेली जबाबदारीची जाण, त्यासाठी मेहनत करण्याची तयारी, केवळ परीक्षा देणार एवढ्यावर न थांबता पेपर उत्तम सोडविणारच हा निश्चय अशा सर्व आघाड्यांवर फडणवीसांची छाप उमटताना दिसली. परदेशी गुतवणूक खेचून आणायचा विषय असो अथवा स्वपक्ष, विरोधी पक्ष आणि मित्रपक्ष अशा तीन पातळ्यांवरील विरोधकांना पुरून उरणे असो, हा माणूस एकहाती लढताना दिसत होता. राज्यात अभूतपूर्व दुष्काळ पडल्यावर त्याच्याशी दोन हात करतानाही फडणवीस एकटेच होते. जन्मजात ब्राह्मण आणि वास्तव्याने शहरी, हे खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणालाही जोखड ठरणारे गुण. मात्र फडणवीस यांनी आतापर्यंत तरी या वैगुण्याची झळ जाणवू दिलेली नाही.
अर्थात फडणवीस यांच्या कारभारात काही गोष्टी अजूनही झालेल्या नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांची मुजोरी अद्याप कमी झालेली नाही. मंत्र्यांचा - अगदी मुख्यमंत्र्यांचाही - त्यांच्यावर दरारा असल्याचे दिसत नाही. गेल्या दहा वर्षांनपासून पोलिस खाते भरटकल्यासारखे झाले आहे, ते आजही भानावर आल्याचे दिसत नाही. पण मुख्यमंत्री देवेंद्र आहेत, हनुमान नाहीत. त्यामुळे एका घासात सूर्य गिळण्याची अपेक्षा त्यांच्याकडून करता येणार नाही. फक्त किमान त्या दिशेने ते काही प्रयत्न करत असल्याचे तरी दिसले पाहिजे.
शिक्षणमंत्री व सांस्कृतिक कार्य मंत्री असलेले विनोद तावडे हे आणखी एक शहाणे म्हणावे लागतील. आपल्या खात्याचे मंत्रीपद हे काही एक धोरण आखण्यासाठी आहे, एक दिशा देण्यासाठी आहे याची पुरती जाणीव तावडे यांच्या देहबोलीतून जाणवते. त्यांच्या घोषणाप्रेमाची टिंगल होत असली तरी त्यातील बऱ्यापैकी घोषणा मार्गी लागल्या आहेत, हे महत्त्वाचे! तावडे यांच्या पदवीचा वाद अर्थहीनच होता, त्याला फारशी किंमत देण्याची गरज नाही. तावडे यांची आपल्या खात्यावर किती पकड आहे, माहीत नाही. पण आपल्या खात्याचा आवाका आणि मगदूर असलेली ही व्यक्ती आहे, यात संशय नाही.
सुभाष देसाई हा फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील तिसरा शहाणा. काहीसा अनपेक्षित. देसाईंच्या पक्षाची मंडळी नाना विधाने करून नको ते उद्योग करत असली, तरी उद्योग हे नाव व कार्यक्षेत्र असलेल्या खात्याची हाताळणी देसाई ठीकठाक करतायत, असे दिसते. भाजप आणि शिवसेनेतील संबंधांची लागण देसाईंच्या खात्याला झालेली दिसली नाही. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जगभर फिरून, पदर पसरून गुंतवणूक आणायची आआणि उद्योग खात्याने त्यात खोडा घालायचा, किंवा देसाईंनी काही कल्पना मांडली आणि भाजपने त्याची बोळवण केली, असे घडलेले नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांचा एकूण रागरंग पाहिला, तर देसाईंनी पाळलेला संयम हाच त्यांच्या शहाणपणाचा भक्कम पुरावा म्हणायला हवा.
उद्धव ठाकरेंच्या शब्दांमध्ये सांगायचे झाले, तर "त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा पूरेपूर वापर करून घेतला जात असावा."
आता एकीकडे हे तीन शहाणे नीट काम करत असताना त्यांना दृष्ट लागू नये म्हणून काही मंडळी जोमाने कामाला लागली होती. पंकजा मुंडे-पालवे, गिरीष बापट, गिरीष महाजन आदी मंत्री या आघाडीवर अगदी पुढे होती. केवळ सरकारचे सुदैव म्हणून त्यांच्या मागे ओढण्याच्या बळापेक्षा या लोकांचे पुढे ढकलणारे बळ किंचित जास्त ठरले आणि म्हणून त्यातल्या त्यात ते जराSSSS बरे वाटते. एवढ्यावर सरकारला समाधान मानायचे असेल, तर त्यांनी मानून घ्यावे. बाकी कालचे मनोरंजन आजही चालू, इतकेच.

Monday, November 2, 2015

तेव्हा कुठे गेला होता तुमचा धर्म?

pen-red एखाद्या जंगलात शिकार करण्यापूर्वी काही लोक हाकारे घालतात आणि शिकार होणाऱ्या प्राण्याला जाळ्यापर्यंत ढकलत नेतात. हे लोक त्या जनावराला एका दिशेने ढकलतात जेणेकरून त्याची शिकार सहजतेने करता येईल. सध्या देशात पुरस्कार परतीचा जो तमाशा चालू आहे, त्यामुळे या हाकारे घालण्याचीच आठवण येते. स्वतःला साहित्यिक आणि कलावंत म्हणवून घेणारे एका सुरात ओरडत आहेत, जेणेकरून वातावरणात गोंधळ माजेल आणि सरकारला एका दिशेने जाणे भाग पडेल व मग त्याची शिकार करणे सोपे जाईल.

परत करण्यासाठी आपापले पुरस्कार फडताळ्यातून काढणाऱ्यांचे म्हणणे आहे, की देशात फॅसिस्ट विचारसरणी वाढत आहे आणि अभिव्यक्तीचा गळा घोटला जात आहे. त्यांच्या या म्हणण्यात प्रामाणिकता असती तर त्यांच्या बोलण्यावर लक्षदेता आले असते. परंतु वास्तव तसे नाही. जे लोक तारस्वरात अभिव्यक्ती स्वतंत्र्याची भलामण करत आहेत, त्यांच्या दुटप्पीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. अन् हा सवाल अन्य कोणी नाही तर अशा व्यक्तीच करत आहेत, ज्यांच्या अभिव्यक्तीचे दमन करण्यातच या लोकांनी सहा दशके कुठलीही कसर बाकी ठेवली नाही.

"अभिव्यक्तीचे गाऱ्हाणे मांडण्यासाठी आज ज्या व्यक्ती आवाज काढत आहेत, त्याच लोकांनी वैचारिकता आणि शिक्षणाच्या क्षेत्रावर आपला एकाधिकार ठेवला होता. त्यांच्यापेक्षा वेगळ्या अशा कुठल्याही विचाराला पायदळी तुडविणे, हेच त्यांनी जीवनकार्य बनविले होते. त्यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची त्यांची ही चाड कुठे गेली होती," हा थेट सवाल आहे प्रसिद्ध कन्नड लेखक एस. एल. भैरप्पा यांनी. स्वतःला विवेकाचे ठेकेदार म्हणविणाऱ्यांकडे याचे काय उत्तर आहे?

भैरप्पा हे कोणी सामान्य लेखक नाहीत. आधुनिक कन्नड साहित्यातील सर्वोच्च शिखरांपैकी ते एक होत. कर्नाटकातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांना दैत्य प्रतिभेचे लेखक म्हणजे विराट प्रतिभा असलेले लेखक म्हणून ओळखले जाते. केवळ कन्नडच नव्हे तर भारतीय साहित्यात लोकप्रियता, विक्री तसेच समीक्षकांची मान्यता या निकषांवर त्यांच्या कादंबऱ्यांनी विक्रम स्थापित केले आहेत. अशा लेखकाला सरकारी मान-सन्मान मिळू नये, यासाठी अनेक प्रकारचे घाणेरडे राजकारण खेळले गेले आहे.

पाटील पुटप्पा हे कन्नड भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक आहेत. चार वर्षांपूर्वी भैरप्पांना बाजूला सारून डा. चंद्रशेखर कंबार यांना ज्ञानपीठ पुरस्कार दिला गेला, तेव्हा पुटप्पा यांनी जाहीर आरोप केला होता, कि 'विशिष्ट विचारांच्या लोकांनी लॉबिंग करून भैरप्पांना ज्ञानपीठापासून वंचित ठेवण्यासाठी प्रयत्न केले होते.'

तीन वर्षांपूर्वी गिरीश कार्नाड पुण्यात आले होते, तेव्हा भैरप्पांबाबत त्यांना प्रश्न विचारला गेला. त्यावेळी ते म्हणाले होते, “भैरप्पा चांगले लिहितात, परंतु ते हिंदुत्ववादाच्या नादी लागले.“ याचा अर्थ एवढाच, की साहित्यिक लिहितो कसा, तो काय म्हणतो हे महत्त्वाचे नाही तर तो कोणत्या विचारांचे अनुसरण करतो हे महत्त्वाचे आहे.

म्हणूनच डाव्या मंडळींच्या या मुस्कटदाबीचा मीही बळी आहे, या लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत बोलण्याचा काही एक हक्क नाही, असे भैरप्पा म्हणतात तेव्हा त्याला विशेष धार येते. लालभाईंच्या या सुनियोजित थयथयाटामागे कुठले ईप्सित आहेत, याबद्दल वेगळे सांगावे लागत नाही.

डाव्या मंडळींच्या एकांगी अभिव्यक्तिप्रियतेवर हा काही पहिलाच प्रहार नाही. यापूर्वी गेल्या महिन्यात असाच एक आवाज पुढे आला होता. मोकळ्या वातावरणाच्या नावाने गळे काढून सुनियोजित पुरस्कार परती सुरू करण्यापूर्वीची गोष्ट आहे ही.

हा आवाज होता प्रा. शेषराव मोरे यांचा. त्यांच्या संशोधन आणि विद्वत्तेचे स्वरूप असे, की भारताच्या फाळणीवर त्यांनी पुस्तक लिहिताना आवाहन केले होते, की या पुस्तकाचे खंडन कोणी केले, तर त्याचेही पुस्तक प्रकाशित केले जाईल.

मात्र प्रा. मोरे हे नेहरूंना नायक आणि डाव्या मंडळींना मुक्त विचाराचे प्रेषित मानण्यास नकार देतात, म्हणून महाराष्ट्रातील विचारवंतांनी त्यांना जवळपास वाळीतच टाकले होते. परंतु गेल्या महिन्यात अंदमान येथे झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. मोरे यांची निवड झाली आणि आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी याच सेक्युलर दुटप्पीपणावर तोफ डागली.

स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्यांवर हल्ला करताना त्यांनी याला पुरोगामी दहशतवाद असे नाव दिले. त्यामुळे पुरोगामी गोटामध्ये खळबळ माजली. त्यानंतर प्रा. मोरे यांना दुर्लक्षित केले गेले किंवा त्यांना छुपा हिंदुत्ववादी म्हटले गेले. परंतु जे भैरप्पा आज म्हणत आहेत, तेच मोरे तेव्हा सांगत होते आणि त्यांच्या पूर्वीही अनेक लोकांनी हेच सांगितले होते, की डाव्या मंडळींच्या अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य निरपेक्ष नाही. जेव्हा त्यांचा स्वतःचा आवाज क्षीण होतो, तेव्हाच ते जागे होते.

महाराष्ट्रातच बोलायचे झाले, तर पु. भा. भावे हे एक प्रसिद्ध नाव आहे. मराठी नवकथेच्या चार शिलेदारांपैकी ते एक. मात्र भावेंना त्यांच्या पात्रतेनुसार कधीही सन्मान मिळाला नाही. इतकेच नाही, 1977 मध्ये ते मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष झाले, तेव्हा ते संमेलनच उधळून लावण्यात आले आणि हे मुख्यतः ते हिंदुत्ववादी असल्यामुळे, सावरकरांचे अनुयायी असल्यामुळे. त्यावेळी कोणत्याही कलावंत, कोणत्याही साहित्यिकाला अभिव्यक्तीचे दमन झाल्याचे मनातही आले नाही. फक्त गेल्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि या लोकांना वाटू लागले, की देशात द्वेषाचे वारे वाहू लागलेत.

हे म्हणजे कुरुक्षेत्रात युद्धाच्या वेळेस कर्णाला त्याच्या रथाचे चाक फसल्यावर धर्मसंमत आचरण आठवला होता तसे आहे. त्यावेळी कृष्ण आणि अर्जुनाने जो प्रश्न कर्णाला विचारला होता, तोच प्रश्न आज डावे, समाजवादी आणि स्वयंघोषित विचारवंतांना विचारता येईल – तेव्हा तुमचा धर्म कुठे होता?

Friday, October 9, 2015

कार्यक्रम तर झालाच पाहिजे…

गुलाम अली यांचा कार्यक्रम झालाच पाहिजे. कारण त्याशिवाय आमचे पुरोगामीत्व कसे सिद्ध होणार?

9 Oct 2015

Tuesday, October 6, 2015

संस्कृतला विरोध सेक्युलरांचाच

18 व्या शतकातील अल्लोपनिषद हा मुस्लिम धर्मियांसाठी ग्रंथ संस्कृतमध्ये असून बायबलच्या कितीतरी संस्कृत आवृत्या आहेत. या शिवाय केरळमधील पी सी देवाशिया यांनी क्रिस्तुभागवतम् या नावाने येशु ख्रिस्तावर एक महाकाव्य लिहिले आहे अन् त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ही मिळालेला आहे. म्हणजे संस्कृतला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो सेक्युलरांच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये. त्यांच्या या अतिरेकी विरोधामुळेच आणि उपेक्षेमुळेच हिंदुत्ववाद्यांना संस्कृतवर एकाधिकार करता आला आहे. हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या झापडा काढाव्या imageलागतील. ते करतील तो सुदिन!

ता. 3 ऑक्टोबर रोजी डॉ. रुपा कुळकर्णी यांच्या 'मोदी, संस्कृत आणि धर्मनिरपेक्षता' हा लेख प्रकाशित झाला आहे. संस्कृत भाषेच्या अभ्यासिका असे म्हणविणाऱ्या डॉ. कुळकर्णी यांनी या लेखात सत्याचा अत्यंत अपलाप केला आहे आणि दिशाभूल करणारी अनेक विधाने केली आहेत. या विधानांना कुठलाही आधार नाही आणि त्यात तर्काधिष्ठितता तर नाहीच नाही. उलट या लेखातील प्रत्येक वाक्याला द्वेषाची किनार आहे.

"भाजपाला एकहाती सत्ता मिळाली तेव्हाच, दोन गोष्टींचं आता महत्त्व वाढणार हे ठरून गेलं होतं. एक म्हणजे देशाचं हिंदुस्थान हे नाव व दुसरं म्हणजे संस्कृत," असं वाक्य लिहून लेखिकेने हिंदुत्ववाद आणि संस्कृत यांची सांगड स्वतःच घातली आहे आणि वर ‘संस्कृत फक्त हिंदूंची’ असा शिक्का मारण्यासाठी हिंदुत्ववाद्यांनाच जबाबदार धरलेले आहे.

या देशात 1994 साली, म्हणजे नरेंद्र मोदी राजकीय रडारवर ठिपक्या एवढेही नसताना संतोषकुमार आणि अन्य लोकांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. त्यात शालेय अभ्यासक्रमात संस्कृतला ऐच्छिक विषय म्हणून उपलब्ध करून देण्यास विरोध करण्यात आला होता. त्याच याचिकेत न्यायालयाला अशी विनंती करण्यात आली होती, की संस्कृतला जर शालेय अभ्यासक्रमात स्थान दिले तर तिच्या सोबत फार्सी (पर्शियन) आणि उर्दू यांनाही स्थान द्यायला हवे. न्यायालयाने ही विनंती फेटाळून लावताना असे स्पष्ट म्हटले होते, की संस्कृत शिक्षणाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा काहीही संबंध नाही.

त्यानंतर 2000 साली अरुणा रॉय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात अशीच याचिका दाखल केली होती आणि त्यातही हीच मागणी केली होती. मात्र न्यायालयाने तेव्हाही त्यांची मागणी धुडकावून लावत 1994 मधील याचिकेवरील निकालच कायम ठेवला.

आता डॉ. कुळकर्णी यांच्या लेखातही "पाली आणि अरेबिक या भाषा अभिजात" आहेत, असे वाक्य आहे. पाली ही भारताच्या सांस्कृतिक महत्त्वाची भाषा आहेच आणि अनेक विद्यापीठांमधून त्याचे शिक्षणही चालू आहे. पण अरेबिकचे काय? अरबी भाषेचा आणि भारताचा संबंधच काय? अगदी मोगल सत्ताधाऱ्यांचा कारभारही फारसीत चालत असे. परंतु ज्या धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) विचारांचे प्रतिनिधित्व डॉ. कुळकर्णी करू पाहतात, त्यांनी अरबी, उर्दू अशा भाषांना धर्मनिरपेक्षतेशी जोडले आहे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल त्या आग्रही दिसतात.

घटना समितीत बोलत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृतला राष्ट्रभाषा करावी, असे म्हटले होते. त्यांच्या जोडीला नजीरुद्दीन अहमद यांनीही संस्कृतच्या बाजूने मत व्यक्त केले होते. त्यांच्या मते, "एवढ्या विविध भाषा बोलल्या जाणाऱ्या या देशात राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली जाणारी भाषा ही निष्पक्ष असावी. ती कोणत्याही प्रदेशाची मातृभाषा नसावी, सर्व प्रांतांना सामाईक असावी आणि तिचा स्वीकार केल्याने एका प्रांताचा फायदा तर दुसऱ्याचे नुकसान होता कामा नये". संस्कृतमध्ये हे गुण असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्यासारख्या ज्ञानी माणसाने संस्कृतला केवठे मोठे योगदान दिले! संस्कृतची सांगड हिंदुत्ववाद्यांनी त्यांच्या धर्माशी घातली होती, तर या स्पष्टपणे अहिंदु असलेल्या व्यक्तींच्या संस्कृतमधील कर्तृत्वाची माहिती देण्यासाठी सेक्युलरांनी तरी काय केले?

त्यानंतर लेखिकेने काही ग्रंथांची नावे दिली आहेत आणि ते हिंदूंची धर्मग्रंथ आहेत, असे सांगितले आहे. कालिदासाची काव्ये, काही नाटके आणि अन्य साहित्याचाही त्यांनी या धर्मग्रंथात समावेश करून टाकला आहे. ही तर या लेखातील कमालच म्हटली पाहिजे! वास्तविक हिंदु समाज कधीही ग्रंथाधारित नव्हता. अगदी वेदांपासून भगवद्गीतेपर्यंत सर्व ग्रंथ हिंदूंच्या दृष्टीने पूज्य असले, तरी ते त्यांच्या व्यवहाराचे आधार कधीच नव्हते. 'शास्त्रात् रूढीर्बलियसी' हाच येथील लोकांचा मंत्र राहिलेला आहे. त्यामुळे कुराण किंवा बायबल यांच्या प्रमाणे धर्मग्रंथात काय म्हटले आहे, या ऐवजी लोकाचार आणि कुळाचार काय आहे, हेच महत्त्वाचे ठरत आले आहे.

हिंदू समाजाला आलेल्या ग्लानीचे कारण म्हणजे त्यांना वेदांचे झालेले विस्मरण होय, इसे आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी निदान केले होते. याचाच अर्थ वेद बाजूला ठेवून सुद्धा हिंदू संस्कृती जीवंत राहू सकते. त्याचप्रमाणे मध्य युगात ८० टक्के समाजाला संस्कृतमधील ग्रंथ आणि पुराणांपासून अनभिज्ञ होता. तरीही हा समाज हिंदूच राहिला. त्यामुळे संस्कृत ही अपरिहार्यपणे हिंदू समाजाशी जोडली गेलेली आहे, या म्हणण्यात काही तथ्य नाही.

एवढे कशाला, बौद्ध आणि जैन धर्मियांनी संस्कृतमध्ये विपुल ग्रंथरचना केली, असे खुद्द लेखिकाच म्हणतात. ते खरेही आहे. याचाच अर्थ संस्कृत ही ब्राह्मणांपुरती मर्यादित नव्हती. बौद्ध जातककथा या पंचतंत्र आणि हितोपदेश एवढ्याच आवडीने वाचल्या जातात. आता बौद्ध आणि जैन साहित्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, हा लेखिकेने स्वतःच काढलेला निष्कर्ष आहे. शिवाय या साहित्याला नास्तिक म्हणण्यात आले, ही सुद्धा तद्दन थापच होय. नास्तिक मत वेगळे आहे आणि त्यालाही यथोचित मान मिळाला होता, म्हणूनच आजही चार्वाकांसारख्या विद्वानांचा उल्लेख आपण करू शकतो.

लेखिकेने आणखी स्वतःच म्हटले आहे, की मुस्लिम, ख्रिश्चनांनी संस्कृतला कधीच विरोध केला नाही. त्यात तथ्य आहे. पण लेखिकेने असे म्हटले आहे, की धर्मनिरपेक्षतावाद्यांनी त्याला कधीच विरोध केला नाही, ते निखालस खोटे आहे. ते कसे, ते वर उल्लेख केलेल्या याचिकांवरून दिसून येईल. इतकेच कशाला, कर्नाटक (2009) आणि केरळमध्ये (2002) संस्कृत विद्यापीठांच्या स्थापनेचे प्रस्ताव आले, तेव्हा विधिमंडळात त्याला विरोध करण्यात स्वतःला सेक्युलर म्हणविणारे होते आणि तेव्हाही त्यांनी संस्कृतसोबत उर्दू विद्यापीठ स्थापन कराव्यात, असे सांगितले होते. म्हणजे भाषा आणि धर्माचा संबंध कोण कसा जोडते, ते समजेल.

'टी.व्ही. वरील शास्त्रीय नृत्याचे सर्वच कार्यक्रम विविध हिंदू देवी-देवतांच्या पौराणिक आख्यानांवरच बेतलेले असतात. इतर धर्मांमधील महापुरुष म्हणजे येशू, मुहम्मद, बुद्ध किंवा झरतृष्ट हे या शास्त्रीय नृत्यांचे विषय होताना माझ्या एकदाही पाहण्यात आले नाहीत,' असं एक विनोदी विधान लेखिकेने केले आहे.

भरतनाट्यम, कथकली यांसारख्या कला देवळांमध्ये जन्मल्या आणि वाढल्या. आता २१व्या शतकातील सेक्युलर विचारांना पात्र होण्यासाठी १०-१२व्या शतकात कोणीतरी देवळांमध्ये बुद्धवंदना किंवा इस्लामी आख्यान सादर करावे, ही अपेक्षा अगोचर म्हणायला हवी. शिवाय इस्लाममध्ये ईश्वर (अल्लाह) आणि पैगंबर सोडून अन्य कोणाची स्तुती करणे निषिद्ध आहे, त्याला कलावंत काय करणार? पण १८ व्या शतकातील अल्लोपनिषद हा मुस्लिम धर्मियांसाठी ग्रंथ संस्कृतमध्ये असून बायबलच्या कितीतरी संस्कृत आवृत्या आहेत. या शिवाय केरळमधील पी सी देवाशिया यांनी क्रिस्तुभागवतम् या नावाने येशु ख्रिस्तावर एक महाकाव्य लिहिले आहे अन् त्याबद्दल त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार ही मिळालेला आहे.

लोकांना माहीत नाही परंतु हे सांगावेच लागेल, की अलीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरही संस्कृतमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्माण होत असून त्यातील किमान तीन महाकाव्ये महत्त्वाची मानली जातात. पहिले बलदेव मेहराद्ध यांचे 'अम्बेडकरदर्शनम्', प्रभाकर जोशी यांचे 'भीमायनम्' आणि बौद्ध विद्वान सुगतकविरत्न शान्तिभिक्षु शास्त्री यांचे 'भीमाम्बेडकरशतकम्'.

थोडक्यात सांगायचे म्हणजे संस्कृतला कोणत्याही धर्माचा किंवा संस्कृतचा कोणत्याही धर्माला विरोध नाही. विरोध आहे तो सेक्युलरांच्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये. त्यांच्या या अतिरेकी विरोधामुळेच आणि उपेक्षेमुळेच हिंदुत्ववाद्यांना संस्कृतवर एकाधिकार करता आला आहे. हा एकाधिकार मोडून काढण्यासाठी त्यांना आधी स्वतःच्या झापडा काढाव्या लागतील. ते करतील तो सुदिन!

Monday, September 7, 2015

'आमच्या' मोरे सरांचे अभिनंदन!

अंदमान येथे विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून पुरोगामी मंबाजींचे बुरखे टराटराWP_20150717_009  फाडत शेषराव मोरे सरांनी त्यांच्यावर वैचारिक दहशतवादाचा जो हल्ला केला तो खऱ्या अर्थाने वैचारिक क्षेत्रात होत असलेल्या बदलांचा निदर्शक आहे. 'हम बोले सो कायदा, हम बोले सो पुरोगामी' या लाल मठांमधून उठणाऱ्या हाळीला मोरे सरांनी एक जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 'सौ सुनार की एक लुहार की' असा त्यांनी एकच तडाखाच दिला आहे. पुरोगामी या शब्दाच्या नावाखाली चालणाऱ्या अनाचाराला वैचारिक दहशतवाद असा स्वच्छ शब्द त्यांनी दिला आहे. त्याबद्दल मोरे सरांचे अभिनंदन.

विश्वास पाटील यांच्यानंतर 'बहुजनां'मधून स्वयंनियुक्त पुरोगाम्यांवर आणखी एक पेटता गोळा पडला आहे. अंदमानातून लागलेल्या ही या अग्नीचा मुकाबला करण्यासाठी प्रगतीशील विचारांनी एव्हाना अग्निशमनाची बुकिंग करायला सुरूवातही केली आहे.

मोरे सरांची निवड झाली, तेव्हाच या संमेलनातून काहीतरी खणखणीत ऐकायला मिळणार, हे स्पष्ट झाले होते. त्यांची निवड झाली, तेव्हा वैयक्तिकरित्या मला अनेक कारणांनी आनंद झाला. एक तर स्वा. सावरकर यांच्या विचारांचे परखड अभ्यासक म्हणून इतरांप्रमाणेच मलाही त्यांच्याबद्दल आदर आहे. त्यात ते नांदेडचे त्यामुळे या आदराचे मूल्यवर्धन झाले . एवढ्यावर न थांबता, मला त्यांच्या हाताखाली शिकता आले, ही दुधात सागर होती. योगायोगाने अंदमानच्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे त्यांनी हाती घेतली तीही शिक्षक दिनीच.

साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणून साहित्य परिषदेत त्यांचा सत्कार झाला तेव्हा गेलो असताना नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनची आठवण त्यांना करून दिली आणि मी तुमचा विद्यार्थी होतो, हेही सांगितले. त्यावर सध्या काय करता, असे त्यांनी विचारले. पत्रकार आहे, म्हणून सांगितले तेव्हा ते अंमळ खुश झाल्यासारखे वाटले. आपला विद्यार्थी अभियंता न बनता अन्य चांगल्या मार्गाला लागला, याचा कदाचित त्यांना आनंद झाला असावा!

WP_20150725_005 मोरे सरांचे पहिले पुस्तक - सावरकरांचा बुद्धिवाद: एक चिकित्सक अभ्यास - गाजत होते त्याचवेळेस ते शिकवत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये माझा प्रवेश झाला, हा अगदी योगायोगच म्हणावा लागेल. त्यातही विशेष म्हणजे स्वा. सावरकरांच्या आत्मार्पणाचे ते २५ वे वर्ष होते. त्यापूर्वी एक-दोन वर्षे सावरकरांच्या साहित्याने मला झपाटले होते.

त्यामुळे तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश घेताना तेतील अभ्यासक्रमापेक्षा आकर्षण होते ते मोरे सरांना भेटता येणार याचे. आम्हाला पहिल्या वर्षी सर शिकवत नसले तरी त्यांच्याबद्दल ऐकायला मिळायचे. अत्यंत नैष्ठिक आचरण आणि आपला विषय तळमळीने मांडणे, ही त्यांची खासियत.

त्या काळात घडलेला एक किस्सा. एकदा एका संस्थेने त्यांना भाषणासाठी आमंत्रित केले. त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचल्यानंतर तिथे गोपाळ गोडसे हेही तिथे हजर असल्याचे सरांना दिसले. त्यावेळी त्यांनी तडक व्यासपीठ सोडले आणि गोपाळ गोडसे असतील तर मी बोलणार नाही, असे ठामपणे सुनावले.

या गोष्टीची त्यांना आठवण करून दिल्यानंतर त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला. ते म्हणाले, "माझ्या एक-दोन पुस्तकांची नावे झाल्यावर आमच्या गावाकडच्या लोकांनी मला सत्कारासाठी बोलावले. सत्कार झाल्यावर गावाचे कारभारी बोलायला उठले. ते म्हणाले, की मोरे सरांनी आतापर्यंत बामणांवर लिहिले (सावरकर), दलितांवर लिहिले (आंबेडकरांवर), आता त्यांनी आपल्या माणसांवर (मराठा) लिहावे. तेव्हा मी त्यांना माझ्या भाषणात सुनावले, की मी असे जाती पाहून लिहीत नाही."

नांदेडच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये पहिल्याच वर्षी माझा सरांशी संबंध आला. त्या वर्षी शासकीय तंत्रनिकेतनात स्नेहसंमेलन झाले नाही. म्हणून वसतिगृहातील मुलांनी मुद्दाम थाटात स्नेहसंमेलन आयोजित केले होते. त्यात वक्तृत्व स्पर्धाही आयोजित केली होती आणि तिचा विषय होता 'अंधश्रद्धा आणि समाज'. या स्पर्धेसाठी परीपरीक्षक होते मोरे सर आणि स्पर्धकांपैकी एक होतो मी. सांगायचा भाग हा, की त्या स्पर्धेत मामाझा पहिला क्रमांक आला होता.

दुसऱ्या वर्षी मात्र मोरे सर प्रत्यक्ष आम्हाला शिकवायला होते. इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग हा विषय ते आम्हाला शिकवत. फ्लक्स कसा वाहतो आणि मॅग्नेटिक फिल्ड कशी तयार होते, हे ते विषयाशी एकरूप होऊन शिकवत आणि विद्यार्थ्यांमध्ये त्याची खास चर्चा असायची. तेव्हा मोठमोठ्या विद्वज्जड ग्रंथांचे परिशीलन करणारे हेच का ते सर, असा प्रश्न पडायचा. याच वेळी त्यांच्याशी थोडासा परिचय वाढला, पण तेवढ्यात सरांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याचे कळाले. आम्हाला शिकविलेले १९९४ हेच सरांच्या अध्यापनाचे शेवटचे वर्ष ठरले. (मात्र त्यात माझा कोणताही हात नाही!).

याच काळात नांदेडहून मुंबईला माझ्या फेऱ्या सुरू झाल्या होत्या. एकदा 'तपोवन एक्स्प्रेस'मध्येच सरांची भेट झाली. हातात कुठलेतरी जाड पुस्तक आणि नोंदी काढण्यासाठी एक डायरी. त्यांच्या सोबत आणखी एक व्यक्ती होती. पण त्या व्यक्तीशी चर्चा न करता सर कुठल्याशा पुस्तकातून नोंदी काढण्यात मग्न होते. धावत्या गाडीतही सरांचे ज्ञानाराधन अविरत सुरू होते.

त्या नंतर नांदेडमधील सरांच्या घरी एक-दोनदा जाणे झाले. तेव्हाही पुस्तकात गाढ बुडालेले आणि संशोधनात रममाण झालेले सरच पाहायला मिळाले. त्यांच्याच शब्दात सांगायचे म्हणजे, "गेल्या अनेक वर्षांमध्ये मी चित्रपट पाहिलेला नाही. कित्येक वर्षांमध्ये मी शर्ट विकत घ्यायला गेलेलो नाही इतकेच काय चप्पल सुद्धा विकत घ्यायला गेलेलो नाही. "

पुण्याला आल्यानंतर मात्र सरांशी संपर्क तुटला. या काळात त्यांचे एकामागोमाग ग्रंथ प्रकाशित झाले. पुण्यात त्यांच्या जाहीर मुलाखतीही झाल्या पण पत्रकारितेचा व्यवसाय असा विचित्र, की आपल्याला जेव्हा रामेश्वरला जायचे असते तेव्हा सोमेश्वरला जाणे भाग पडते. त्यामुळे त्यांची भेट होत नव्हती.

आता परत योगायोग असा आला, की सरांच्या विद्वत्तेचा सन्मान होत असताना त्याचा साक्षीदार होण्याची मोकळीक मला मिळाली. म्हणूनच साहित्य परिषदेत त्यांना आवर्जून भेटायला गेलो. त्यावेळी त्यांनी आपल्या संशोधनाची मांडणी जशी केली तसेच त्या मागच्या ध्यासाचीही पोतडी काही प्रमाणित मोकळी केली.

त्याच वेळेस गोडसेंच्या संदर्भातील घटनेची मी त्यांना स्मरण करून दिले. त्या नंतर ते भरभरून बोलायला लागले. कार्यक्रमाच्या त्या घाईतील संभाषणातसुद्धा त्यांचे सावरकरांवरचे प्रेम लपून राहत नव्हते. "गांधीहत्येत सावरकरांचा यत्किंचितही हात नव्हता. त्यांना थोडी जरी कटाची कल्पना असती तर ती हत्या टाळण्याचे त्यांनी शक्य तेवढे प्रयत्न केले असते. पण सरकारने त्यांना या गुन्ह्यात गुंतविले आणि नंतर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांचे भयंकर नुकसान केले," असे त्यांनी परखडपणे सांगितले.

मात्र त्यांचा हा परखडपणा प्रागतिक विचारांच्या पथ्यपाण्याला मानवत नाही. प्रागतिक पद्धतीत सेक्युलरिझम म्हणजे नेहरूवादी सेक्युलरिझम आणि हिंदू किंवा हिंदुत्ववादी म्हणजे दुष्ट, असा थेट कृष्ण-धवल मामला असतो. हाही बरोबर असू शकतो आणि तोही काही प्रमाणात योग्य असू शकतो, अशा विचारांचे तिथे वावडे असते. मग त्यात रोगी मेला तरी चालते. तेव्हा मोरे सरांनी पुरोगाम्यांच्या दंभावर प्रहार केल्यावर त्याचे प्रतिध्वनी उठणे स्वाभाविकच होते.

म्हणूनच मग ज्या लेखकाने आपल्या ग्रंथाचा प्रतिवाद करण्याचे आवाहन करून त्याचा एक वेगळा ग्रंथ बनविला, त्या लेखकावरच हेत्वारोपाचे आरोप करण्यास लोक सरसावतात. अर्थात् कावळ्यांच्या ट्वीटने गायी मरत नसतात, पण ज्या प्रवृत्तीबद्दल मोरे सर बोलतायत, तिची खरीखुरी झलकच यातून दिसते.

Shesharao More comments आता तर सुरूवात झाली आहे. अंदमानच्या काळ्या पाण्यातून उठलेल्या या उज्ज्वल विचारांचे तरंग येथून आणखी उमटणार आहेत. हिंदुत्ववादी आणि पुरोगाम्यांचे टोळीयुद्ध पाहण्यास आता खरी मजा येणार आहे!

Tuesday, August 18, 2015

हा पुरस्कार महाराष्ट्राला भूषणावहच!

image

गेल्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात सत्तापालट झाला. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आधीच्या सरकारच्या तुलनेत वेगळे वाटतील असे फार काही निर्णय घेतले नाहीत. फक्त निर्णय घेणाऱ्या व्यक्ती बदलल्या, निर्णयामागचे तत्वज्ञान आणि विचार बदलले आहे, असे जाणवलेच नाही. जे काही मोजके वेगळे निर्णय घेतले त्यात गोवंश हत्या बंदीचा कायदा हा पहिला आणि त्यानंतर आता शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचा निर्णय हा दुसरा. त्यातील पहिल्या निर्णयाची (निर्णय कमी आणि आदेश जास्त!) उपयुक्तता आणि औचित्य वादग्रस्त आहे मात्र हा दुसरा निर्णय निर्विवादपणे उत्तम आहे. महाराष्ट्राचे भूषण म्हणून हा पुरस्कार दिला जात असला तरी या पुरस्काराचे भूषण महाराष्ट्रालाच वाटावे, असे हे पाऊल आहे.

एरवी महाराष्ट्रात गेली काही वर्षे दुष्काळी परिस्थिती असली तरी पुरस्कारांच्या बाबतीत सुकाळ आहे. कोणतीतरी संस्था, कोणत्या तरी कर्तृत्ववान व्यक्तींना शोधून काढून कोणते तरी भूषण म्हणून ठरवून टाकते. अन् सत्कारार्थी व्यक्तीही 'अङ्गं गलितं पलितं मुण्डं दशनविहीन जातं तुण्डम्' अशा अवस्थेत मंचावर जाऊन त्या पुरस्कारामुळे मी धन्य झालो, असे जाहीर करून टाकते. मात्र काही व्यक्ती अशा स्थानी असतात, की त्या कोणत्याही पुरस्कारांच्या पलीकडे गेलेल्या असतात. बाबासाहेब पुरंदरे हे अशाच व्यक्तीमत्वांपैकी एक!

ज्या लोकांना बाबासाहेबांच्या नावाला विरोध करून आपल्या जातमंडूक (कूपमंडूक तसे जातमंडूक!) वृत्तीचे ढळढळीत प्रदर्शन करायचे आहे त्यांना ते खुशाल करू द्या. 'आमचेच ऐका नाहीतर खड्ड्यात जा,' अशा मानसिकतेची ही मंडळी राज्यात सत्ताधाऱ्यांच्या कृपेने पुन्हा डोके वर काढून बसली आहेत. ज्या प्रमाणे उत्तर पेशवाईत रावबाजीच्या आश्रयाने भट-पुरोहितांचे वर्चस्व वाढले आणि त्यांनी सगळ्या समाजाच्या विवेकबुद्धीला ग्रहण लावले तशीच प्रवृत्ती आजही आहे. खरे तर राज्यातील कायदा-सुव्यवस्था, किरकोळ मुद्द्यांना आलेले महत्त्व आणि खुज्या लोकांचे वाढलेले महत्त्व, हे पाहिल्यावर ज्यांनी उत्तर पेशवाईचे वर्णन वाचले आहे त्यांना तोच काळ आठवेल.

पुरोगामीपणाचे सोवळे सांभाळणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ब्रिगेडी बांशिद्यांना मोकळे सोडले. भांडारकरसारख्या निरूपद्रवी आणि बऱ्यापैकी जमिनी बाळगून असलेल्या संस्था ते फोडत होते तोपर्यंत चांगले चालले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना मात्र याच लोकांची मजल शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करण्यापर्यंत गेली आणि तेही सरकारी शिवजयंतीच्या मुहूर्तावर! त्यानंतर नाकापेक्षा जड होऊ पाहणाऱ्या या मोत्यांचे प्रस्थ हळूहळू आश्रयदात्यांनीच कमी केले. नंतर वाघ्या कुत्र्याच्या निमित्ताने परत या लोकांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला परंतु दादोजींप्रमाणे हा मुद्दा काही फळला नाही. उलट त्याची तीव्र प्रतिक्रिया आली म्हणून तलवारी म्यान करून ही मंडळी बसली. आता बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार मिळणार म्हटल्यावर परत आपले हमखास यशस्वी नाट्य रंगेल म्हणून ही मंडळी आपली शीतनिद्रा सोडून बोलायला लागली आहेत.

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाविषयी खरे तर आवर्जून सांगायची गरज नाही. आपण इतिहासकार नाही, हे त्यांनी स्वतःच्या मुखाने अनेकदा सांगितले आहे. स्वतःच्या इतिहास वर्णनात काळानुरुप बदल करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे. तरीही ब्रिगेडींनी एकदा ही जमीन मऊ लागली आणि मग कोपऱ्याने खणण्याची सवय त्यांना लागली. परत त्यांना जितेंद्र आव्हाडांसारखा भक्कम आधारस्तंभ मिळाला म्हणल्यावर काय पुसता? मुंब्र्यातील बेकायदा बांधकाम पाडू न देण्याचा विडा उचलणारे, दहीहंडीची घातक उंची कमी करू देणार नाही अशी भीष्मप्रतिज्ञा करणारे आव्हाड याबाबतीत मागे कसे राहतील? राम जेठमलानींनंतर नेहमी चुकीच्या बाजूने सकृद्दर्शनी तार्किक मांडणी करणारा पण रेटून खोटे बोलणारा एक बडबडतज्ज्ञ आव्हाडांच्या रूपाने देशाला मिळाला, एवढेच म्हणायचे. उरला त्यांच्या टिकेचा प्रश्न तर त्याला भर्तृहरीनेच उत्तर देऊन ठेवले आहे – तत्को नाम सुगुणिनां यो न दुर्जनै नाङ्कित (सज्जनांचा असा कोणता गुण आहे ज्यावर कद्रू मंडळी टीका करत नाहीत)?

स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेले पाहवत नाही, अशा कायम दुखणाईत अवस्थेतील ब्रिगेडची मंडळी सकारात्मक गोष्टीसाठी कधी पुढे आल्याचे महाराष्ट्राला आठवत नाही. शिवाजीराजांचे सावत्र राजे व्यंकोजी यांनी राजांचा कायम दुस्वास केला. त्यांच्या सततच्या किरकिरीला कंटाळून राजांनी त्यांना एक खरमरीत पत्र लिहिले. त्यात त्यांनी व्यंकोजींना 'पराक्रमाचे तमाशे दाखवा' असे एक मार्मिक वाक्य लिहिले आहे. विनाकारण कुरकुर करण्यापेक्षा काहीतरी घडवून दाखवा, असे त्यांनी सांगितले होते. ब्रिगेडच्या सदस्यांना आज परत हेच वाक्य ऐकविण्याची वेळ आली आहे.

Tuesday, August 11, 2015

घुमानच्या निमित्ताने-9 घुमानचे इष्टकार्यं सिद्धम्!

tumblr_nm9z1uycif1u5hwlmo1_500[1] अमृतसरला हरमंदिर साहेब आणि जालियांवाला बागेचे दर्शन झाल्यानंतर त्या दिवशी तिथेच मुक्काम केला. तेथून परतताना वाघा सीमेवर नेणाऱ्या ऑटोवाल्यांचा पुकारा चालला होता. मात्र एकाच दिवशी हे सर्व करण्याची माझी इच्छा नव्हती. शिवाय संमेलनानंतरचा एक दिवस मी त्यासाठी राखीव ठेवला होता. त्यामुळे त्या दिवशी विश्रांती घेण्याचे ठरवले आणि बस स्थानकावरील खोलीत परतलो.

रात्री बस स्थानकाशेजारीच एका हॉटेलमध्ये जाऊन मिनी थाळी मागविली. तमिळनाडूत ज्या प्रमाणे राईस प्लेट या संज्ञेत चपातीचा समावेश होत नाही, त्याच प्रमाणे पंजाबमध्ये थाली या संज्ञेत भाताचा समावेश होत नाही, अशी माहिती या निमित्ताने झाली. तरीही मिनी थाली ४० रुपये आणि भाताची प्लेट ३० रुपये या हिशेबाने ७० रुपयांत अगदी शाही जेवण झाले. बटाटा आणि टोमॅटोची भाजी आणि शेजारी गरमागरम रोटी असा जामानिमा होता. गायकाला जसा जोडीला तंबोरा लागतो तसा या जेवणाला सोबत करण्यासाठी अख्खा मसूर होताच. आधी ते दृश्यच पोटभर पाहून घेतले. आचार्य अत्रे असते तर 'तो पाहताच थाला, कलिजा खलास झाला' असे एखादे गाणे त्यांनी नक्कीच लिहिले असते. मग जेवण जे काय रंगले म्हणता, पाककर्ता सुखी भव असा तोंडभरून आशिर्वाद देऊन मी रजा घेतली आणि झोपेच्या स्वाधीन झालो.

सकाळी खाली उतरून लगेच समोरच्या प्लॅटफॉर्मवर घुमानची गाडी शोधली. पंजाबच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा असे झाले असेल, की अमृतसरहून सुटणाऱ्या बसमध्ये पंजाबी लोकांपेक्षा मराठी लोक जास्त असतील. एकूण प्रवाशांपैकी सुमारे अर्धे लोक मराठी होते आणि त्यांच्यापैकी बहुतेकांकडे शबनमी होत्या. परंतु ते संमेलनालाच निघाले होते, हे ओळखण्यासाठी शबनमींची गरजच नव्हती. ज्यांच्याकडे शबनम नव्हती, त्यांच्याही तोंडातून मराठी शब्द बाहेर पडला, की त्यांचे तिकिट कुठले असणार, याचा अंदाज यायचा. एखाद्या जत्रेला निघावे, तशी ही मंडळी घुमानला निघाली होती. त्यात अकोला, बुलढाणा अशा गावांमधून आलेले लोक होते. माझ्याशेजारी बसलेली व्यक्ती पुण्याहून आली होती. त्यांच्यासोबत देहू संस्थानचे माजी विश्वस्त आणि तुकाराम महाराजांचे वंशज होते. ते बियासवरून आले होते. त्यांनी एक गंमत सांगितली. मुंबईहून सुटणारी गाडी येणार म्हणून जागोजागच्या गुरुद्वारांमधील लोकांनी स्वागताची, पाहुणचाराची जय्यत तयारी केली होती. परंतु या गाडीला उशीर झाल्यामुळे त्या लोकांची तयारी फलद्रूप होऊ शकली नाही. माझ्या सोबत बसलेली मंडळी जेव्हा बियासला उतरली तेव्हा या लोकांनी त्यांना बळेबळेच आपल्यासोबत नेले आणि मुक्काम करायला लावला. त्यांना खाऊ-पिऊ घातले.

ते काही असो, घुमानला गाडी पोचली आणि तेथील चौकातच पताका-झेंडे आणि बॅनरनी आमचे स्वागत केले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बॅनर तर लावले होतेच पण काही स्थानिक शिवसैनिक गळ्यात भगव्या पट्टे घालून उत्साहाने जमले होते. संपूर्ण रस्त्याच्या कडेने पांढरी रांगोळी होती, रस्त्यावर पताका फडकत होत्या. घुमानचा गुरुद्वारा मुख्य रस्त्यापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे. हा संपूर्ण रस्ता १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला सजावा तसा सजला होता. जागोजागी लोकांनी लंगर लावले होते आणि चहा-पकोडे मुक्तहस्ते वाटल्या जात होते. मुख्य म्हणजे संपूर्ण गावात पंजाबीपेक्षा मराठी वाक्ये अधिक ऐकू येत होती.

गावात लॉज आहे का, असे मी एकाला विचारले. कारण मी आगाऊ नोंदणी केली नव्हती. संमेलनासाठी पुण्यातून जे वऱ्हाड निघाले होते त्यात मी नव्हतो. इतकेच काय, संजय नहार यांची ओळख असली तरी मी येणार आहे, हे मी त्यांनाही सांगितले नव्हते. त्यामुळे गावात उतरायला जागा मिळेल का, ही माझ्या मनात धाकधूक होतीच. मला उत्तर मिळाले, की गावात लॉज नाही. गुरुद्वाऱ्याचे यात्री निवास आहे, मात्र त्याची नोंदणी आधीच झाली असणार. मग एका इंटरनेट कॅफे चालकाने सल्ला दिला, की शेजारच्या शाळेमध्ये जागा असेल तिथे चौकशी करा. तेथे गेल्यावर जागा आहे का, असे विचारल्यानंतर तेथील व्यक्तीने होकार भरला आणि नाव-गावाची नोंद केल्यानंतर एका मुलाला मला जागा दाखविण्यास पाठविले. दशमेश पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात अशा तऱ्हेने माझा मुक्काम पडला.